पळवाट
या जगात येणा-या प्रत्येकाला (आणि प्रत्येकीलाही अर्थातच) परमेश्वराने एक देणगी दिलेली असते. माझ्याबाबतीत सांगायचे तर माझे दिशांचे ज्ञान अगाध आहे! अगदी आयुष्याची दिशा वगैरे तर सोडूनच द्या, पण ईशान्य मुंबई, दक्षिण मुंबई या भानगडीही मला कळत नाहीत. माहीममधली एखादी इमारत जर मला शिवाजी उद्यानापासून (की मैदान?) माहिती असेल, तर माटुंगा स्थानकापासून आधी मी शिवाजी मैदानापाशी येते आणि माहितीच्या रस्त्याने परत माहीमपर्यंत जाते.
माझी ही खासियत मित्रमंडळींना माहिती आहे. त्यामुळे ओळखीची माणसे मला निमुटपणे नेण्या - पोचवण्यासाठी येतात. त्यामुळे दिशा, खुणा याबाबतचे माझे अज्ञान अबाधित राहायला - किंबहुना ते वाढायला मदतच झाली आहे. पोस्टमन, रिक्षावाले, टॅक्सीवाले मला थोर वाटतात. आणि आकाशाकडे (तेही रात्री!) पाहून दिशा वगैरे ठरवणारे खलाशी तर मला या भूतलावरचे वाटतच नाहीत!
त्यादिवशी मात्र अघटितच घडले. पुण्यात बसच्या भरवशावर राहण्याचा गुन्हा माझ्या हातून घडला होता. तिची वाट पाहताना अखेर रिक्षाने जाण्याविना पर्यायच उरला नव्हता. मी रिक्षात बसून ’कसबा गणपती ’ असे सांगितले.. पुण्यातला हा प्रसिद्ध आणि मानाचा गणपती कोणा एखाद्या रिक्षावाल्याला माहिती नसेल अशी मी कल्पनाही केली नव्हती. पुण्यातल्या कोणा एका केंद्रिय मंत्र्यांना तो माहिती नसल्याची अफवा एके काळी वाचल्याचे आठवते - पण मंत्र्यांचे सारेच वेगळे!
रिक्षावाला पोरसवदा होता, नवीनही असावा. कारण मी रिक्षात बसताच त्याने "ताई, कसे जायचे ते सांगाल का जरा?” असे नम्रपणे विचारले. नम्र रिक्षावाला भेटण्याचा अनुभव मला नवाच होता. मी काहीशी गांगरले. शिवाय याला कसबा गणपतीही माहिती नाही - म्हणजे दुहेरी संकट! मी इकडे तिकडे पाहिले, पण दुसरी रिक्षा दिसेना. ती मिळती, तर मी ही रिक्षा सोडून दिली असती. पण मला उशीर होत होता. एका थोर गृहस्थांची भेट ठरलेली होती आणि ’वेळ पाळणे’ या विषयावर त्यांचे भाषण ऐकायची माझी तयारी नव्हती.
“ठीक आहे! शनिवारवाडयाकडे घ्या", मी जरा बेफिकीरीचा आव आणत रिक्षावाल्याला सांगितले. तिकडे एखाद्या दुकानात विचारता येईल पत्ता - असा मी विचार केला. “ताई, शनिवारवाडा पण नाही सापडणार मला. पहिलाच दिवस आहे माझा. या गल्लीबोळांनी डोकं पार फिरलयं बघा माझं! तुम्ही सांगाल का रस्ता जरा?” रिक्षावाला काकुळतीने म्हणाला.
ते ऐकून माझ्या पोटात गोळाच आला. मी त्याला रस्ता दाखवणे अशक्यप्राय होते. पण त्या क्षणी कोंडाण्यावरच्या मावळ्यांसारखे माझे सारे दोर कापलेले होते. दुसरी रिक्षा नव्हती, दिग्गजांच्या भाषणाची भीती होती, बस येत नव्हती, हा रिक्षावाला नवा होता, शिवाय तो नम्रही होता. त्याच्या नम्रतेमुळे मी अधिकच हतबल झाले होते.
मला त्या रिक्षावाल्याची नाही, पण स्वत:चीच कीव आली. ’करा किंवा मरा’ अशी वेळ आली की मग मरण्यापेक्षा करणेच परवडते. माझ्यावरच्या संकटाचे निवारण करण्यासाठी आता ईश्वरी अधिष्ठानाचीच गरज होती. या ठिकाणापासून शनिवारवाडयापर्यंत मी आजवर किमान हजार वेळा तरी गेले होते. देवाचे नाव घेऊन मी आजवरच्या त्या प्रवासांच्या असंख्य अनुभवांवर मन एकाग्र केले. डावीकडे - उजवीकडे बघत, दुकानांच्या पाटया वाचत मनाचा हिय्या करून मी रिक्षावाल्याला रस्ता सांगायला सुरूवात केली.
अमूक पेठ कोणती? हा तिरका रस्ता पुढे कुठे जातॊ? इकडून बालगंधर्वला जायला जवळचा रस्ता कोणता? ---- असे नाना प्रश्न विचारून रिक्षावाला मला हैराण करत होता. मी आपली सुचेल ती उत्तरे देत होते – बरोबर चूक पाहायला आम्ही थोडेच पुन्हा भेटणार होतो? आणि भेटलोच समजा चुकून तरी थोडेच एकमेकांना ओळखणार होतो?
लांबून शनिवारवाडयाची भिंत दिसली तेव्हा मला अपरिमित की काय म्हणतात तसला आनंद झाला. माझी सगळी भीती पळाली. बोलण्यात आत्मविश्वास आला. माझ्या आत्मविश्वासाने आणि सहजतेने ते थोर गृहस्थही प्रभावित झाले! माझे त्यांच्याकडचे काम यशस्वी झाले. अशा रीतीने दिवस फारच चांगला गेला!
रात्री या घटनेचा विचार करताना मला फार आश्चर्य वाटले. जो रस्ता मला नीट माहिती नव्हता, ज्याची माझी मला खात्री नव्हती, तो मी बिनधास्त ( नाही, खरे म्हणजे धास्तावतच!) रिक्षावाल्याला सांगितला - आणि त्यातून आम्ही योग्य ठिकाणी पोचलो देखील!
माझ्याभोवती अज्ञानाच्या भिंती रचून घेणे माझे मलाच आवडत असावे! कारण अज्ञानात निष्क्रियतेची, आपला भार दुस-यांवर टाकण्याची सोय आली! पण रस्ता माहिती आहे म्हटल्यावर चालले पाहिजेच, पुढे गेले पाहिजेच! ज्ञानात जबाबदारी येते, काहीतरी करावे लागते. डावीकडे वळावे, उजवीकडे वळावे की सरळ जावे असे निर्णय वारंवार घ्यावे लागणारच रस्ता माहिती असला की! शिवाय आपल्या चुकण्याचे खापर दुस-यांवर फोडता येत नाही! म्हणून मग ’मला रस्ताच माहिती नाही, मला काही कळतच नाही’ अशा मनाच्या पळवाटांना एरवीही किती महत्त्व द्यावे? निदान ही पळवाट आहे इतके तरी भान मला आले आहे का?
प्रतिक्रिया
प्रतिसाद
लेखन नेहमीप्रमाणे दर्जेदार झालेले आहे.
<<<<माझ्याभोवती अज्ञानाच्या भिंती रचून घेणे माझे मलाच आवडत असावे! कारण अज्ञानात निष्क्रियतेची, आपला भार दुस-यांवर टाकण्याची सोय आली! पण रस्ता माहिती आहे म्हटल्यावर चालले पाहिजेच, पुढे गेले पाहिजेच! ज्ञानात जबाबदारी येते, काहीतरी करावे लागते. डावीकडे वळावे, उजवीकडे वळावे की सरळ जावे असे निर्णय वारंवार घ्यावे लागणारच रस्ता माहिती असला की! शिवाय आपल्या चुकण्याचे खापर दुस-यांवर फोडता येत नाही! म्हणून मग ’मला रस्ताच माहिती नाही, मला काही कळतच नाही’ अशा मनाच्या पळवाटांना एरवीही किती महत्त्व द्यावे? निदान ही पळवाट आहे इतके तरी भान मला आले आहे का? >>>>
हा परिच्छेद (अर्थातच) लेखाला निराळ्या उंचीवर नेतो. आमची एक अतिशय लाडकी कविता उधृत करण्याचा मोह होतो :
चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारें
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे.
मी चालतो अखंड चालायचे म्हणून;
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे.
डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे;
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे!
मग्रूर प्राक्तनाचा मीं फाडला नकाशा;
विझले तिथेंच सारे ते मागचे इशारे.
चुकली दिशा तरीही आकाश एक आहे,
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे.
अशा तशी निराशा, हें श्रेय सावधांचे;
बेसावधास कैसे डसणार हे निखारे.
-- विंदा
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
विंदांची ही कविता पुन्हा समोर
विंदांची ही कविता पुन्हा समोर आणल्याबद्दल आभार, मुक्तसुनीत.
***
अब्द शब्द
निदान ही पळवाट आहे इतके तरी
विचारात पडलो आहे. मात्र याचे उत्तर मी (अगदी माझ्यापुरतेही) देऊ शकेन (इच्छितो :P) असे वाटत नाही
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ऋषिकेश, विचारांत 'पडलं' की
ऋषिकेश, विचारांत 'पडलं' की असं होणं स्वाभाविक आहे, नाही का?
***
अब्द शब्द
तर "वाट" नक्कीच सापडते...
लेख छान आहे, शेवट आवडलाय...
आयुष्यातही आपण अश्याच पळवाटा शोधात असतो, आपला ओझं दुसऱ्यांच्या माथी मारण्याची संधी शोधात असतो...
आणि त्यातनं आपलंच नुकसान होईल याची कल्पनाही आपणास नसते...
तात्पर्य - थोडसं धाडस केलं तर "वाट" नक्कीच सापडते...
- सुमित
- सुमित
"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."
सुमित, अडचण एवढीच असते की,
सुमित, अडचण एवढीच असते की, त्यावेळी ते धाडस 'फार मोठं' वाटत असत - ते त्यावेळी 'थोडं' वाटलं तर प्रश्नच येणार नाही!!
***
अब्द शब्द
लेख आवडला पुणेरी रिक्षावाला
लेख आवडला
पुणेरी रिक्षावाला ईतका नम्र भेटणे तेही पत्ता माहीत नसताना हे जगातल आठव आश्चर्य म्हणाव लागेल;)
.
जाई, आठवं आश्चर्य? कदाचित
जाई, आठवं आश्चर्य? कदाचित आठवं आधीच असेल तिथं घडून गेलेलं आणि ते आपल्याला माहिती नसेल ही शक्यता जास्त
***
अब्द शब्द
मला फक्त सात आश्चर्ये माहीत
मला फक्त सात आश्चर्ये माहीत आहेत
.
आवडले.
हे दिशा आणि रस्ता विषयावरून जबाबदारीकडे गेले. तसेच माझ्या अंगभूत महामूर 'कोल्लापुरी' (;)) आळशीपणाबद्दल काही लिहिता येईल काय ? त्याचा विचार करतो आहे.
(फक्त विचारच करतो आहे..विचार करण्यात कसला आला आहे आळशीपणा?
विसुनाना, विचार करण्यात
विसुनाना, विचार करण्यात आळशीपणा नाही हे खरं - त्याबबरोबर विचारही न करण्याचा पण एक आळशीपणा असतोच की
***
अब्द शब्द
पाण्यात पडल्यावर पोहलात हे छान
पाण्यात पडल्यावर थोडे लोक बुडतात, खरे. पण काही लोक हातपाय मारून किनार्याशी पोचतही असावेत. तशा तुम्ही शनिवारवाड्यापाशी पोचलात!
मात्र पुण्यातले सराईत रिक्षेवाले नेहमीच "अमुक रस्त्याने घेऊ का तमुक रस्त्याने" असे साळसूदपणे प्रत्येकवेळी विचारतात, त्याचे मला आश्चर्य वाटते. बहुधा "हा जाणता आहे की बकरा?" हे निदान ते प्रश्नाच्या उत्तरावरून करत असावेत.
असेच सर्वत्र!
पुण्यातच कशाला, मुद्दाम लांबच्या रस्त्याला लागून अजाणत्याकडून जास्त पैसे उकळणारे महाभाग रिक्षावाले गावोगावी आढळतात.
धनंजय, विसुनाना, गावोगावचे
धनंजय, विसुनाना, गावोगावचे रिक्षावाले प्रवाशांचा अंदाज आपापल्या पद्धतीने घेत असतातच - ते एक व्यावसायिक कौशल्य आहे. पुणे शहर याबाबत गाजते, पण इतरही ठिकाणी कमीअधिक असाच अनुभव येतो हे नक्की.
***
अब्द शब्द
किस्सा
किस्सा आवडला.
शेवटचा परिच्छेद नसता तरी चालले असते असे वाटले. 'आयुष्य असेच नसते का रे दिनू, वैजू, सुखाच्या भातावर दु:खाचे वरण, त्या गोमाऊलीला लुचणार्या गोंडस वासराकडे बघून सगुणाचे हृदय भरुन आले. आई, मी चुकलो असे म्हणून दिलीपने आईच्या पायावर लोळण घेतली आणि मातेच्या डोळ्यांतून होणार्या अश्रूप्रपाताने त्याचे दु:ख कुठल्या कुठे वाहून गेले' असले काहीसे त्या शेवटच्या परिच्छेदात दिसले.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
सन्जोप राव, << 'आयुष्य असेच
सन्जोप राव, << 'आयुष्य असेच नसते का रे दिनू, वैजू, सुखाच्या भातावर दु:खाचे वरण, त्या गोमाऊलीला लुचणार्या गोंडस वासराकडे बघून सगुणाचे हृदय भरुन आले.....>> अशा शैलीत मी लिहू शकत नाही असा माझा आजवर समज होता. त्या समजाविषयी माझ्या मनात प्रश्न उभा केल्याबद्दल आभार.
***
अब्द शब्द
किस्सा मस्त >>एका थोर
किस्सा मस्त
>>एका थोर गृहस्थांची भेट ठरलेली होती आणि ’वेळ पाळणे’ या विषयावर त्यांचे भाषण ऐकायची माझी तयारी नव्हती.
थोर गृहस्थांची भेट वेळेवर झाली का? नसल्यास तो किस्सापण सांगा.
थोर गृहस्थ
मन....
नक्कीच झाली असणार....कारण लेखाच्या शेवटी "माझ्या आत्मविश्वासाने आणि सहजतेने ते थोर गृहस्थही प्रभावित झाले! माझे त्यांच्याकडचे काम यशस्वी झाले. अशा रीतीने दिवस फारच चांगला गेला!"...हा उल्लेख आहेच.
बाकी लेख आणि त्यातील भाषेची सहजता ["जसे घडत गेले, तसे सांगत गेले" पद्धती....कोणत्याही जादाच्या रसाचा वापर नाही, जितका आवश्यक तितका आहे हेही विशेष] इतकी सुंदर की सारे प्रसंग 'रनिंग कॉमेन्ट्री' ची रंगत आणत गेले.
अशोक पाटील
मी, अशोक पाटील यांनी
मी, अशोक पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे 'थोर गृहस्थांची' भेट झाली आहे, त्यामुळे त्या न झालेल्या भेटीचा किस्सा नाही.
अशोक पाटील, आभार.
***
अब्द शब्द
आवडले
हे लेखनसुद्धा आवडले. 'अज्ञानात सुख असते' हे वाक्य वेगवेगळ्या अर्थांनी, कसेही लागू व्हावे असे आहे. कधी कधी ज्ञानामुळे पडलेली जबाबदारी आणि कष्ट यामुळे वैतागून माझ्यासारख्या आळशी मुलीला असेच वाटते की हे माहिती नसते तर बरे झाले असते.
शेवटचा परिच्छेद आवडला हे वेगळे सांगायला नकोच.
==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...
स्मिता, 'हे माहिती नसते तर
स्मिता, 'हे माहिती नसते तर बरे झाले असते' अशी एक स्थिती असते आणि 'हे माहिती असते तर बरे झाले असते' अशीही एक स्थिती असते. आपण आपली सोय पहात असतो - इतकेच!
***
अब्द शब्द
कारण अज्ञानात निष्क्रियतेची,
वपुंची एक कथा आठवली. त्यात एक मूर्तीमंत बावळटपणा असणारा माणूस असतो. त्याला धड काही येत नाही, म्हणून बायको शिव्या घालत असते. हा माणूस लेखकाला हळूच सांगतो की हे सगळं नाटक आहे. एखादी गोष्ट करताना दोनचार वेळा घोळ करून ठेवायचा, आणि बायकोची बोलणी खायची तयारी ठेवायची. एवढं केलं की नुसता आराम. काही करावं लागत नाही. सगळं ती करून देते.
यातला विनोदाचा भाग सोडला तर खरोखरच आपण इग्नोरन्सचं ब्लिसफुल पांघरूण घेऊन वावरतो. 'हे मला जमण्यातलं नाही' असं दोनचार वेळा स्वतःला सिद्ध केलं की इतरांवर अवलंबून रहाण्यात आपल्या मनाला खात नाही. प्रत्येकच गोष्ट प्रत्येकाला आलीच पाहिजे असा दावा नाही, पण किती गोष्टींपासून आपण अकारण स्वतःचा बचाव करतो आहोत आणि किती गोष्टी खरोखरच दुसऱ्याने करून देणं योग्य हे प्रत्येकाने स्वतःचं स्वतः ठरवायला हवं.
वपु
घासकडवी कोटिंग वपु! व्हॉट दी वर्ल्ड इज कमिंग टू!
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा