खाऊजा ची २५ वर्षे आणि पठारेंची स्वगते
परवा रविवारच्या इंडियन एक्सप्रेस मध्ये खाजगीकरण, उदारीकरण, आणि जागतिकीकरण(खाऊजा) वर्षे झाल्या निमित्ताने विशेषांकात बरेच लेख आले होते. काही दिवसांपूर्वीच मी रंगनाथ पठारे यांचे नामुष्कीची स्वगते हे पुस्तक वाचले होते. आणि प्रतिक्रिया म्हणून हे पुस्तक एकमेकांशी निगडीत आहे असे वाटले. त्याबद्दल थोडे लिहिले होते. ते येथे देत आहे. खाऊजाचे समाजावर झालेले परिणाम या विषयावर विशेषांक काढायला हरकत नाही असे वाटते.
पठारेंची स्वगते
रंगनाथ पठारे. मराठीतील अजून एक महत्वाचे लेखक. तेही शाम मनोहरांसारखे विज्ञानाचे प्राध्यापक. त्यांच्याबद्दल मी काही वर्षांपूर्वी त्यांच्या ताम्रपट या महाकादंबरीच्या निमित्ताने ऐकले, वाचले होते. पण मी अशा महाकादंबरी बाबत जरा जपून असतो. त्यामुळे मी विशेष लक्ष देवू शकलो नाही. काही दिवसांपूर्वी मराठीतील ‘ऐसी अक्षरे‘ या पोर्टलवर त्यांचा एक विशेषांक वाचनात आला, जो नव्वदोत्तरी फिक्शनच्या संदर्भात होता. त्यात पठारेंच्या काही पुस्तकांचा उल्लेख होता. बुकगंगा वर त्यांची पुस्तके पाहिली, चाळली. त्यातील एक नामुष्कीची स्वगते, मी ते लगेच मागवले, त्याच बरोबर त्यांचे चोषक फलोद्यान, तसेच प्रत्यय आणि व्यत्यय हे देखील मागवले. त्यांच्या पुस्तकांची शीर्षके देखील वेगळीच असतात. स्वगते वाचून काढले, आणि आता त्याबद्दल लिहायला बसलो आहे.
ही कादंबरी आहे का, तर नाही. कथा संग्रह तर बिलकुल नाही. शीर्षकावरून आपण असा अंदाज करतो की हे आत्मचरित्र किंवा आत्मचरित्रपर असावे. तसेही नाही. तर प्रत्येक प्रकरण हे स्वतंत्र असे स्वगत आहे. त्याला आगा पिछा नाही. नामुष्की का आणि कसली आहे? काही कळत नाही. नामुष्की म्हणजे असहायता, असे जर म्हटले तर थोडासा संदर्भ लागतो. स्वगतं ही थोडीफार परिस्थितीसमोर असहायता मान्य करणारी आहेत. वर्तमानाबद्दल मनाची भडभड आहे.
पुस्तकाच्या सुरवातीलाच त्यांचे निवेदन आहे. त्यात वाचकाला सावधानतेचा इशारा दिला आहे. त्यांना बहुतेक सगळे लिहिल्यानंतर वाचकांना ते दमवणारे, थकवणारे वाटेल असे लक्षात आल्यामुळे त्यांनी तसा इशारा दिला आहे. अशी लेखकाची कबुली कधी कुठे पाहण्यात आली नव्हती. जसे जसे आपण वाचत जातो, तसे तसे त्या इशाऱ्याचा अर्थ समजू लागतो. मोठ-मोठी वाक्ये, स्वगताचा फॉर्म असल्यामुळे मन मानेल तसे भरटकणे. संगणकशास्त्रात memory dump अशी संकल्पना आहे, ज्याचा अर्थ तो घेताना संगणकाची स्थिती काय होती, ती नोंदवणे. प्रत्येक प्रकरण तसेच memory dump आहे असे वाटते. चिकाटीने पुस्तक वाचावे लागते. असेही वाटत राहते, की काय आपण वाचतो आहे. निवेदनाच्या पठारे इतक्या विषयांना, घटनांना स्पर्श करत जातात त्याची कमाल वाटते. आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे एका विषयावरून दुसरीकडे उडी, कोलांटी उडी, लांब उडी असे सर्व दिसते!
पुस्तक १९९९ चे आहे. जवळ-जवळ दोन दशकं झाली. त्यावेळच्या काळाचे, राजकीय, सामाजिक, आर्थिक घटनांचे संदर्भ येतात. १९९१ नंतर भारतात मुक्त अर्थव्यवस्था, आर्थिक सुधारणांना सुरुवात झाली. त्याबद्दल त्यांनी अगदी खुमासदार पद्धतीने लिहिले आहे. पुस्तकात १२ प्रकरणं आहेत. जवळ जवळ प्रत्येकात स्त्री-पुरुष संबंध, लैंगिक व्यवहारासंबंधी आले आहे. एका प्रकरणात तर त्यांनी कमाल केली आहे. तांत्रिक संप्रदायात, अघोरी संप्रदायात फार पूर्वी प्रचलित असलेल्या पंचमकारयुक्त अशी कंचुकी प्रथेशी साधर्म्य असणारी घटना त्यांनी वर्णिली आहे, आणि तीही ‘स्त्री मुक्ती’ नावाच्या प्रकरणात. अशी प्रथा, आज तरी पांढरपेशा समाजात आहे असे वाटत नाही. प्रत्येक प्रकरणाचे त्यांचे विषय वेगळे आहेत. उदा. शोषण नावाच्या प्रकरणाचा विषय आहे सैनिक भरतीच्या वेळेस होणारी तरुणांची ससेहोलपट, त्यांचे शोषण. कॉर्पोरेट कुणबिकचा विषय आहे आजची शेती, त्यात कॉर्पोरेट जगताचा झालेला प्रवेश आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न. सौंदर्य जबाबदारी इत्यादी नावाच्या प्रकरणात सुंदरता, सौंदर्य, तसेच देशातील सद्यस्थितीत असलेला विरोधाभास याबाबतीत त्यांचे स्वगत आहे. प्रेमभाव प्रकरणाचा विषय आहे प्रेमभावना, वासना याबद्दल चिंतन. १९९९ चा काळ म्हणजे मुक्त-अर्थव्यवस्था, जागतिकीकरण वगैरे गोष्टी सुरु होवून ७-८ वर्षे झाली होती. हे पुस्तक त्याबद्दलची त्यांची प्रतिक्रिया आहे असे जाणवते. पुस्तकभर हरलेली मनोभूमिकेच्या, नामुष्कीचा प्रत्यय येतो, पण शेवट मात्र, अचानक, वर्तमानाशी लढण्याचा निर्धार व्यक्त करून होतो.
प्रत्यय आणि व्यत्यय या पुस्तकात रंगनाथ पठारे यांचा आणि दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा संवाद आहे. त्यात या पुस्तकाबद्दल एक उल्लेख आला आहे. पठारे यांना कुठल्याश्या कार्यक्रमात आजच्या जमान्यातील एक तरुण मुलगी भेटली, आणि तिने त्यांना नामुष्कीचे स्वगत हे पुस्तक आवडल्याचे सांगितले, तसेच हे ही सांगितले की ती आणि त्यांच्या कॉलेज मधील काही जण ह्या पुस्तकातील कोठलेही एक प्रकरण घेवून त्याचे वाचन करतात, आणि त्यांना मजा येते. मला ते अगदी पटले. ह्या पुस्तकाचे जाहीर अभिवाचन करायला हरकत नाही. मोठी मोठी वाक्ये, तिरकस शैली, यामुळे नक्कीच श्रवणीय ठरू शकेल. पुस्तकाच्या सुरवातीला एक निवेदन आहे. ते निवेदन अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यात पुगेत साऊंड भागात(Puget Sound area) सुक्वामिश(Suquamish) या मूळ निवासी जमातीच्या(native American, Red Indian) प्रमुखाचे आहे. १८५१ मध्ये जेव्हा अमेरिकेत राज्यकर्ते मूळ निवासी लोकांची जमीन येन केन प्रकारेण गिळंकृत करत होते, तेव्हा, प्रमुखाने(Chief Seattle) नामुष्कीने, असाहयपणे केलेले हे निवेदन. हे निवेदन अलास्कामध्ये झालेल्या १९७९ मधील पर्यावरणसंदर्भातील परिषदेत आले होते(Alaska Future Frontier Conference). आणि हे पर्यावरणाशी निगडीत अतिशय परिणामकारक(world’s most profound statement) निवेदन आहे असे म्हटले जाते. हे देखील प्रतीकात्मकच आहे असे म्हणावे लागेल, कारण त्यांची जागतिकीकरण आणि देशीवाद या विचारांशी निगडीत आहे. मूळ इंग्रजी मला येथे सापडले. Brexit सारख्या घटना जागतिकीकारण विरोधी आणि देशीवादी आहेत, त्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक जर वाचले तर आणखीनच relevant वाटते.
काही दिवसांपूर्वी शाम मनोहरांचे कळ हे पुस्तक वाचले होते. ते आणि पठारे, यांची पुस्तके अशीच शैली, फॉर्म, शीर्षके, त्यांना जे सांगायचे आहे ते, विज्ञानाचे संदर्भ, या बाबतीत समान वाटतात मला. त्या पुस्तकाबद्दलही लिहीन कधीतरी असाच.
प्रतिक्रिया
बॅन
रंगनाथ पठारे वाचायचा प्रयत्न केला होता. मुक्त शब्द मध्ये त्यांची एक कथा वाचली. पठारे शैलीत फार अडकून डोक्यात जातात. खाउजा, खाउजा या शब्दाचे ग्लॅमर सध्या साफ उतरले आहे. विषेशतः सध्या पन्नाशीत-साठीत असणार्या "ज्येष्ठ" लेखकांचा तो मात्र अजूनही खूप जिव्हाळ्याचा विषय दिसतो. सध्याचे काही बझवर्डस वापरून मॉडर्न कथा लिहिण्याच्या नादात आणि करायचे म्हणून फॅन्सी कथाप्रयोग करायच्या नादात ह्या ज्येष्ठांच्या कथा/कादंबर्या वाचवेनाश्या होतात.
शिवाय बुकगंगावर चाळता चाळता " मला माहीत असलेले शरद पवार " हे पुस्तक शेल्फावर दिसले. या पुस्तकाच्या लेखकयादीत सन्माननीय लेखक दिसल्यामुळे मी त्यांच्यावर बॅन टाकला आहे. ( पुस्तकाची लेखक मांदियाळी : फ. मु. शिंदे , इंद्रजीत भालेराव , डॉ. जब्बार पटेल , डॉ. जनार्दन वाघमारे , महावीर जोंधळे , नरेंद्र सिंदकर , प्रदीप निफाडकर , प्रा. राम शेवाळकर , रंगनाथ पठारे , डॉ. विश्वास मेहेंदळे )
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
"मला माहीत असलेले शरद पवार "
"मला माहीत असलेले शरद पवार " चा दुसरा भाग आपण काढायचा का ? त्यात हितेंद्र ठाकूर,पप्पू कलानी, तेलगी, सुनील तटकरे, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, अजित पवार, नसली वाडीया, गौतम अडानी वगैरे प्रभृतींचे लेख घेऊया. शिवाय त्यात "कात्रजचा घाट दाखवणे", "भूखंड" वगैरे संज्ञांचे अर्थही देता आले तर पाहूया. लवासा, बारामती या सारख्या ठिकाणच्या पर्यटनाबद्दलही लिहिता आलं तर पाहूया. गुटख्याचे आरोग्यावरचे परिणाम यावरही काही लिहिता येईल. बीसीसीआय या, समाजातल्या तळागाळातल्या घटकांचा उद्धार करण्यास झटणार्या संघटनेबद्दलही पवारांच्या संदर्भात काही आणता आले तर पाहता येईल.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
शिवाय बुकगंगावर चाळता चाळता "
अतिसहमत. पण काकांना २०० वर्षाचे आयुष्य लाभु दे ही मात्र मनापासुनची इच्छा आहे.
काकांना दोनशे वर्षे आयुष्य?
काकांना दोनशे वर्षे आयुष्य? तुम्ही कधीपासून फॅन आहात त्यांच्या?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बॅटोबा, व्यनित उत्तर दिले
बॅटोबा, व्यनित उत्तर दिले आहे.
हा हा! खरेतर काका "इतरांना
हा हा! खरेतर काका "इतरांना माहित होतात" असं पुस्तकाचं नाव असेल तर तिथेच त्याची डेप्थ कळून येते!!
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
अरे बापरे! खणखणीत प्रतिक्रिया
अरे बापरे! खणखणीत प्रतिक्रिया आहे...चांगले आहे. खाउजा या शब्दाचे ग्लॅमर जरी उतरले असले तरी, आणि मला जरा इतिहासात रस असल्यामुळे, खाउजाचे आपल्या समाजावर झालेले बरे वाईट परिणामांची मीमांसा झाली पाहजे असे वाटते मला...
माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com
पठारेंचं काही लेखन वाचलेलं
पठारेंचं काही लेखन वाचलेलं नाही. ही तोंडओळख आवडली.
+१
असेच म्हणते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मोठी जाडजुड पुस्तकं वाचताना
मोठी जाडजुड पुस्तकं वाचताना बिचकायला होतं हे खरंय.नील लोमस +.
बाकी आकार पटेल,शोभा डे वगैर त्यांच्या ब्लॅागमधून थोडक्यात मांडतात ते सोपं पडतं वाचायला.एवढंच नाहीतर चूक ठरले तर तसं पुढच्या ब्लॅागमध्ये तसं लिहितातही.जागतिक पातळीवर होणाय्रा उलाढालीत कोणा एकाचे मत कायमच बरोबर /चूक ठरत नाही.परिणाम दिसण्यासही वर्षं लागतात.पुस्तक आणि लेखकाची ओळख आवडली.
मी ताम्रपट वाचली आहे. चांगली
मी ताम्रपट वाचली आहे. चांगली वाटली . आणखी एक कादंबरी वाचलेली 'टोकदार सावलीचे वर्तमान ' तीपण बरी होती.
गर्दीतला दर्दी
लेख आवडला
लेख आवडला, आता पुस्तकाबद्दल उत्सुकता निर्माण झालीए. बाकी काही वर्षांपुर्वी टोकदार सावलीचे वर्तमान वाचलेली आहे.अत्यंत प्रभावी लेखन. गरीब परिस्थिती आणि कॉम्प्लेक्स कौटुंबिक इतिहास असलेल्या प्राध्यापकाची गोष्ट. पंढरपूर शहराबद्दल एरवी आपल्याला माहिती नसलेला एक विशिष्ट संदर्भ या कादंबरीत आल्याचे आठवते.
'तो' संदर्भ घेऊन लिहिलं
'तो' संदर्भ घेऊन लिहिलं म्हणून अंबर हडप या लेखकाचं "थरारली वीट" नावाचं नाटक संस्कृतीसंरक्षकांनी ब्यान केलं होतं.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
नामुष्कीचे स्वगत अत्यंत
नामुष्कीचे स्वगत अत्यंत captivating वाटली . एकदा हातात घेतल्यावर पूर्ण वाचून संपल्यावरच खाली ठेवू शकलो ... प्रचंड पुस्तक आहे
शरद पवारांशी 'संबंधित ' म्हणून लेखक बॅन करायचे असतील ...... तर मराठीत वाचायला फार कमी उरेल बॅन च करायचे असेल तर SP ना करणे जास्त appropriate
(अर्थात 'मला माहीत असलेले शरद पवार ' दुसरा भाग काढणे हि उत्तम आयडिया आहे ... जास्त इंटरेस्टिंग होईल ...त्याचेही नाव SP बहुधा नामुष्कीचे स्वगत ठेवतील )
पवार
शरद पवारांच्या राजकारणाविषयी तुम्हाला कितीही घृणा वाटली, तरी त्यांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे. समाजात विविध क्षेत्रात कार्यरत माणसांशी त्यांचे स्नेहाचे संबंध आहेत. इतकंच नव्हे, तर समोरच्या माणसाचे आस्थाविषय अचूक ताडून त्याच्याशी त्या विषयावर रोचक गप्पा मारण्याइतपत त्यांना अनेक विषयांतली किमान जाणही आहे. महाराष्ट्रात सध्या हयात असलेल्या कोणत्याही राजकारण्यापेक्षा पवारांना हे अधिक चांगलं जमत असणार असा माझा अंदाज आहे. ह्या बाबतीत ते यशवंतराव चव्हाणांचे चेले आहेत. अर्थात, चव्हाण ह्या बाबतीतही त्यांच्या खूपच पुढे होते.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
तुम्हाला नक्की काय म्हणायचे
तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे?
एक सवाल मै करूं
ज्यानं पठारेंवर बॅन टाकला तो का टाकला तुमच्या मते?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
त्या बाबतीत मी बॅन
त्या बाबतीत मी बॅन घालणार्याशी सहमती आधीच दाखवलीच आहे.
तुमच्या प्रतिसादातुन तुम्हाला काहीतरी वेगळे म्हणायचे आहे असे वाटते. प्रश्न आमच्या लाडक्या काकांबद्दल नसुन त्यांच्यावर लेख पाडणार्यांबद्दल आहे. म्हणजे कोणावर कौतुकाचा वर्षाव करणारा लेख ( जाहीर लेख आहे म्हणुन ) पाडायचा असेल तर काही चेकलिस्ट असावी का?
गुणहा कुणाचा शिक्षा कुणा
मी पवारांची एक क्षमता / खुबी सांगितली आहे. तिच्यामुळे भलेभले लोक पवारांचे स्नेही होतात. म्हणून 'पवारांचा स्नेही = घाला बॅन' इतकं ते सोपं समीकरण नाही. म्हणजेच, अशी माणसं जोडता येणं हा पवारांचा गुण आहे. पवारांशी जोडलं जाणं हा त्या माणसांचा अवगुण नव्हे. तद्वत, कुणाची पवारांशी जवळीक असल्यानं काहीच सिद्ध होत नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हे बाकी खरंय. यशवंतराव चव्हाण
हे बाकी खरंय. यशवंतराव चव्हाण ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक/ऐतिहासिक संस्थांना त्यांनी मुक्तहस्ते मदतही केलेली आहे.
शिवाय दिल्लीकर मराठी माणसाच्या तोंडी शरद पवारांबद्दल बहुधा नेहमी चांगलेच असते. (तो माणूस वैयक्तिकरीत्या भाजपायी/सेमीभाजपायी असला तरीही) कारण दिल्लीत सर्व मराठी माणसांची कामे तर ते करून देतातच, शिवाय मराठी नेत्यांमध्ये देशपातळीवर वजन असलेला आणि जुनाजाणता आजमितीस दुसरा कोणी नाही. (गडकरी आता आलेत)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
गडकरी?
गडकरी आणि पवार? नक्की कुठल्या वजनाबद्दल चर्चा चाललीये ब्वॉ?
राजकीय वजन ऑफकोर्स. गडकरी
राजकीय वजन ऑफकोर्स.
गडकरी म्हणाल तर भाजपा शेकेट्री म्हणून. बाकी मग पवार सोडून प्रमोद महाजन तेवढे होते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं