सुरतेवर स्वारी
‘ब्रीद इन बीट ऑफ गुजरात’ अशी साद घालणारा अमिताभ बच्चन यांचा आवाज आपण बऱ्याचदा विविध माध्यमातून ऐकतो.’स्वर्णिम गुजरात’ हे तर त्यांच्या पर्यटन मंत्रालयाचं ब्रीद्वाक्यच आहे.या अशा बहुचर्चित गुजरातेत जाण्याचा योग मात्र आला तो अपघातानेच..
यतीन नामक माझ्या मित्राच्या वसतिगृहावर मी बऱ्याचदा अभ्यासानिमित्त जातो.तिथेच अंकितशी ओळख झाली.तो आमचापेक्षा साधारण पाच-एक वर्षांनी मोठा आहे.त्याचे लग्न ह्या ३१ जानेवारीला सुरतला होते.त्याने मला तिथे येण्याचा आग्रह केला.सबब मी आणि यतीनने सुरतला जायचे पक्के केले.तर या प्रवासात घडलेल्या असंख्य गमतीजमती,प्रसंगोपात्त विनोद,भेटलेल्या व्यक्ती आणि वल्ली,कटू-गोड अनुभव इ.विषयी काही लिहावं असा मनात आलं म्हणून हि लेखणी हातात धरली.म्हटलं पाहूया त्यानिमित्ताने तरी लिखाणातून ते दिवस पुन्हा जगता येतात का?
३१ जानेवारीला पहाटे ४ वाजता आम्ही ‘गुजरात एक्स्प्रेस’ने निघालो.या प्रवासात भेटलेली पहिली वल्ली म्हणजे पका भाई.गाडीत चढताच त्यांनी आरोळी ठोकली ,’’खमण लेलो भाई,खमण....बाद मी नही बोलने का कि पका भाई खमण लेके नही आये आज’’. त्यांची हि साद थेट हृदयापर्यंत(खरतर पोटापर्यंत) पोहचली आणि मग क्षणाचाही विलंब न लावता आम्ही खमण वर तुटून पडलो.
अखेर ११ वाजता ट्रेन सुरतला पोहचली आणि तिथे गाडीला २ मिनिटांचा थांबा होता.मात्र उतरणारी आणि चढणारी सुद्धा गर्दी इतकी जास्त होती कि गुदमरायला झालं.त्यात आम्हा भारतीयांची सार्वजनिक शिस्त वाखाणण्याजोगीच.ट्रेनमधल्या त्या छोट्याशा बोळात कोणीतरी भलीथोरली गाठोडी ठेवून तो मार्ग आणखीच अरुंद केला होता.त्यामुळे गर्दी मुंगीच्या पावलाने पुढे सरकत होती.या गर्दीत चक्क एक प्रेक्षणीय स्थळदेखील होतं.उतरताना पाहिलं तर त्या मुलीकडे दोन मोठ्या बॅगा(बॅग्स म्हणायला हवं पण ‘बॅगा’ म्हणण्यातील मजा काही औरच...)होत्या.मी काहीसा पुढे उभा असल्याने लवकर उतरलो पण यतीनने(नेहमीप्रमाणेच) स्त्री-दाक्षिण्याचं प्रदर्शन करण्याची संधी सोडली नाही.आणि या उपद्व्यापात ट्रेन सुटण्याची वेळ झाली.अखेर आमचे मित्रवर्य विरुद्ध दिशेच्या दारातून थेट ट्रॅकवरच उतरले.अशाप्रकारे सुरतेच्या स्वारीची सुरुवात दणक्यात झाली.
सुरत स्टेशनच्या बाहेर आम्हाला न्यायला एक गाडी आली होती पण ऐन वेळेस गाडीतील सदस्यांची संख्या वाढल्याने मी आणि यतीन डिकीत बसलो.गाडी प्रथमतः अंकितच्या घरी जाणार होती पण कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून कल्पना आली आणि आम्ही थेट समारंभाच्या ठिकाणी जायला निघालो.आता मात्र पंचाईत झाली कारण मी नाईटड्रेसवरच प्रवास करत होतो.शेवटी ६ फूट १ इंच उंची असणाऱ्या मी डीकीतच कपडे बदलायचा आत्मघातकी निर्णय घेतला अर्थात तो तसा सिद्ध झाला नाही हे माझ सुदैव.मग शवासन,कुक्कुटासन,वज्रासन,एक पाद प्रसरणासन अशी विविध चित्तथरारक योगासने करत कुर्ता-पायजमा घालण्यात यशस्वी ठरलो.अजूनही हा किस्सा आठवला तरी ओठांवर हसू तरळतं.
लग्नाच्या सभागृहामध्ये सकाळपासून दुपारपर्यंत फक्त छायाचित्रीकरण होतं.दुपारच्या जेवणात तेथील प्रसिद्ध केशर आंब्यांचा रस,पुरी,मोहनथाळ इ. पक्वान्न होती.त्यांच्या जेवणात गाठीया आणि भजीया हे महत्वाचे अन्नपदार्थ.जसं बटाटावड्याशिवाय मराठी जेवण अपूर्ण तसचं गाठीया आणि भजीया शिवाय गुजराती जेवण निरसचं...त्यांच्याकडे पाहिलेली आणि मनापासून भावलेली गोष्ट म्हणजे लग्न असो वा मुंज वा परिचय समारंभ गुजराती लोकं(स्पेशली पटेल) आजही न संकोचता मांडी घालून बसतात आणि जेवणावर ताव मारतात.
क्षुधातृप्ती झाल्यावर आम्ही अंकितच्या घरी गेलो.काही कारणाने यतीन बाहेर गेला आणि मी त्यांच्यात एकटा पडलो.नाही म्हणायला अंकित,रमेशभाई होते पण ते सुद्धा आपापल्या गडबडीत.त्यामुळे मी एका कोपरयात देवासारखा बसून होतो.त्यांच संभाषण;एखादा इंग्लिश चित्रपट सबटायटल्सशिवाय बघावा;तसं अनुभवत होतो.आपल्याकडे सामान्यतः भांडतानाच आवाज वाढतो पण गुजरात्यांसाठी ती आवाजाची पट्टी बहुधा प्रेम व्यक्त करण्यासाठी वापरली जात असावी असं वाटत होतं.
इतक्यातच अंकितच्या काकांनी टी.व्ही. वर ‘मोरारी बापूंचं’ रामायणावरील प्रवचन लावलं.ते पाहता पाहता मला झोप येऊ लागली(अर्थात या मध्ये भरपेट जेवणाचा वाटाही तितकाच महत्वाचा). मला डोळे बंद केलेले पाहून त्यांना वाटलं कि मी तल्लीन झालो आहे.आणि कुठल्याश्या आवाजाने मला जाग आली,पाहतो तर घरातील बुजुर्ग मंडळी माझ्याकडे कौतुकाने पाहत होती.त्यांच्यापैकी ज्यांना बऱ्यापैकी हिंदी बोलता येत होतं अशी मंडळी माझ तोंड भरून कौतुक करू लागली.अंकितचे काका म्हणायला लागले कि ‘’तुझे देखके हि मैने पेहचान लिया था कि तू मोरारी बापू का भक्त है”.या सगळ्यावर मी फक्त स्मितहास्याच करत राहिलो.कारण अशा प्रसंगी जर मी माझे अज्ञेयवादी विचार सांगितले असते तर त्यांनी मला नुसतं घरातूनच नाही तर गुजरातमधूनही हाकलून दिलं असतं.
सायंकाळी वराती सोबत लग्न मंडपात जायच होतं.जाताना अर्थातच बँड सोबत होता.फार फार तर ५ मिनिट लागेल एवढे अंतर पार करायला वीस-एक मिनिट लागली. बँडवाल्यांवर पैसे उधळले जात होते आणि त्यांची लहान मुले पैसे गोळा करण्याचे काम करत होती.खरतर त्यांना त्याचं मानधन सन्मानाने देण्यातच खरा मोठेपणा आहे ना कि त्यांच्यावर पैसे उधळण्यात. त्या निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील ते अगतिक भाव,उडवलेली प्रत्येक नोट मिळवण्यासाठी चाललेली त्यांची धडपड,प्रसंगी रस्त्यावरील येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांचीही त्यांनी तमा न बाळगणं वगैरे सारख्या गोष्टींनी मला अंतर्मुख केलं.असो,ते बाजूला ठेवू.
काळानुसार लग्नाच्या पद्धतीमध्ये होणारे बदल तिथेही अनुभवता आले. आपल्याकडे साधारणतः सर्व विधी आटोपायला पाच-एक तासांचा अवधी लागतो.त्या यज्ञाभोवती घामाने डबडबणारा देह,धुराने चोन्द्लेलं नाक,लाल झालेले डोळे इ. घेऊन ५ तास विविध कसरती करणं म्हणजे खरतर अग्निपरीक्षाच.आणि यातील बहुतांश गोष्टी आपण का करतो हे माहित नसलं तरीहि त्या न कंटाळता करणं आव्हानात्मकच.त्यामुळे आजकाल या प्रक्रियेमध्ये शोर्टकट्स मारण्याचा फंडा सर्वत्र दिसून येतो;तसाच तो येथेही दिसून आला.विधी सुरु असतानाच नेहमीची जेवणाची वेळ झाली म्हणून अंकित आणि त्याची होणारी बायको त्यांच्या नातेवाईकांसोबत जेवायच्या पंक्तीत येऊन बसले.जेवणानंतर उर्वरीत विधी पुन्हा सुरळीतपणे सुरु झाले.त्यानंतर लग्नाचे फेरे झाले.त्यांच्याकडे लग्नात चारच फेरे घेण्याची प्रथा आहे.अर्थात हा मात्र शोर्टकट नव्हता याची नोंद घ्यावी.अशाप्रकारे ज्या कारणासाठी सुरतेवर स्वारी केली ते प्रकरण सिद्धीस गेले.
तोपर्यंत ९ वाजले होते.खरतर एव्हाना ‘बॅक टू पॅव्हेलियन’ म्हणत आम्ही मुंबईस निघायला पाहिजे होत.पण अचानक यतीनने प्लॅन बदलला आणि आम्ही तिथून वडोदरा येथे जायला निघालो.सुरत स्थानकावर पोहचायला रात्रीचे ९.४५ वाजले होते.आणि वडोदरयाला जाणारी ट्रेन फलाटावर उभी होती.पुढच्या १५ मिनिटात ती सुटणार होती.तिकीट काढण्यासाठी पाहिलं तर भलीमोठी रांग.एवढ्यात एक गृहस्थ आम्हाला भेटले व त्यांची टी.सी. शी कशी घट्ट मैत्री आहे याचे रसभरीत वर्णन ऐकवायला लागले.या संभाषणावरून तो माणूस एजंट आहे हे ओळखायला वेळ लागला नाही.त्याने आम्हाला सांगितले कि,”मी प्रत्येकी १०० रुपये घेईन.त्यातील प्रत्येकी २० रु, कमिशनचे असतील.” आणीबाणी ची परिस्थिती असल्याने आम्हीही घासाघीस न करता त्याला २०० रु. देऊ केले.यतीनला नेहमीप्रमाणे त्याच्या अंतरातम्यातून आवाज आला कि हा माणूस आपल्या मदतीला आला आहे.पण पुढे जाऊन तोच माणूस ‘स्पेशल छब्बीस’ चा नायक म्हणून सिद्ध होईल याची लेकाला सुतराम कल्पना नव्हती.जेव्हा तिकीट आमच्या हातात आलं तेव्हा त्यावर १२० रु. लिहिलं होतं.यासंबंधी विचारल्यावरतो म्हणाला “साहेब प्रत्येकी २० रु.माझ कमिशन पण तेवढेच टी.सी. पण द्यायला नको का?” यावर आम्ही निरुत्तर झालो.आणि शेवटी ट्रेनमध्ये चढलो आणि वडोदरयाला निघालो.पुढचा २ तासांचा प्रवास अगदी सुरळीत पार पडला. वडोदरा स्थानकावर यतीन चा मित्र भार्गव आम्हाला न्यायला आला होता.त्या कृष्ण-सुदाम्याच्या भेटीचे सोपस्कार पुढची दहा-एक मिनिट चालले.मग आम्ही भार्गवच्या वसतिगृहावर जायला निघालो.
अशा प्रकारे सकाळी सुरु झालेली ‘सुरतेची स्वारी’; रात्री वडोदऱ्यात आटोपली.अर्थातच हे सगळ आपण लिहू शकू अस क्षणभरही वाटल नव्हतं.पण हा-हा म्हणता ३ पानं भरली सुद्धा.त्यामुळे आता विश्रांती घेणचं इष्ट.हि सुरतेची सैर तुम्हीसुद्धा एन्जॉय कराल अशी अपेक्षा आहे,बाकी वडोदऱ्यातील गमती-जमती पुन्हा केव्हा तरी....
प्रतिक्रिया
त्यांच्याकडे लग्नात चारच फेरे
त्यांच्याकडे लग्नात चारच फेरे घेण्याची प्रथा आहे.
लग्नात चार फेरे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांचे असतात. पहिल्या तीन फेर्यांमध्ये स्त्री पुढे असते आणि चौथा फेरा घेताना पुरुष पुढे असतो. माझे लग्न हि एका संस्कृत मध्ये उच्च शिक्षित बनारसी ब्राह्मणाने लावले होते. मी हि चारच फेरे घेतले होते. (स्पष्टीकरण त्यांनीच दिले होते). सात फेर्यांची प्रथा बहुतेक सप्तपदी वरून आली असेल. (असे मला वाटते).
महत्वपूर्ण माहितीकरता
महत्वपूर्ण माहितीकरता धन्यवाद.
लग्नात चार फेरे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांचे असतात.
आणी बाकीचे तीन?
खुसखुशीत अंगाने लिहिलेलं
खुसखुशीत अंगाने लिहिलेलं प्रवासवर्णन आवडलं. प्रवचन ऐकताना झोप लागली आणि लोकांनी म्हटलं 'वावा, काय भक्ती आहे. समाधीच लागली चक्क.' असं म्हणण्याचा प्रसंग फारच मजेदार.
वडोदऱ्याच्या गमतीजमतीही येऊद्यात.
ही स्वारी?
सुरतवर स्वारी करून तुम्ही मोरारी बापूंच्या भक्त मंडळींना लुटलं नाहीत! शिवाजी महाराजांना१ काय उत्तर द्याल उद्या२? असो. वडोदऱ्याततरी शिवाजी महाराजांची शान राखली असेल अशी अपेक्षा आहे. नसेल तरी तसं लिहा पुढच्या लेखात.
१. बोगस उत्तरं देण्याचं समर्थन करण्यासाठी अस्मितेचं राजकारण खेळणं सोपं असतं. पुण्यातला अनुभव आहे; खोटं कसं असेल?
२. मी नास्तिक असले तरी हिंदू नास्तिक आहे आणि हिंदू धर्मात कयामत ही संकल्पना नसल्यामुळे उद्या-परवा अशी काहीतरी भविष्यकालीन शब्दयोजना करावी लागते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
वडोदऱ्यात सयाजीराव सोबतीस
वडोदऱ्यात सयाजीराव सोबतीस असल्याने विजय निश्चित होता. सुरतेत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती प्रकर्षाने टाळली. सुरतेत 'यतीन' समयास पावला असता तर तेथेही झेंडा फडकावून आलो असतो...पण असो.
'कयामत' संकल्पनेची भविष्यकालीन योजना 'बिग क्रंच' या संकल्पनेवरुन घ्यावी अस मला वाटत.
भाजपाचे "काउबॉइज" सध्या जो पराक्रम गुजरातेत गाजवत आहेत
भाजपाचे "काउबॉइज" सध्या जो पराक्रम गुजरातेत गाजवत आहेत
त्यावरुन तरी सुरतेवर स्वारी सध्या शक्य नाही.
वा! मस्तच. त्याच्या
वा! मस्तच.
अरारा!!
पण हे प्रवासवर्णन वाचायला एकंदर फारच मजा आली.
खरी सुरतेची मोहीम
खर्या सुरतेच्या मोहिमेची (३ ऑक्टोबर १६७०) लंडनमधील The London Chronical ह्या वृत्तपत्राच्या १७-२० फेब्रुअरी १६७२ च्या अंकामध्ये आलेली बातमी खाली दाखवीत आहे. बातमीमधील तत्कालीन स्पेलिग्ज - s च्या जागी f सारखे दिसणारे अक्षर, battle साठी battel, Surat च्या जागी Suratte, Sevajee - लक्षणीय आहेत. बातमी अलेप्पो शहराच्या मार्गे आलेली आहे.अलेप्पो शहर आज आयसिसचे एक महत्त्वाचे ठाणे असून त्याचा सध्याच्या धुमश्चक्रीमध्ये जवळजवळ संपूर्ण विनाश झाला आहे. पण जुन्या काळात आशिया-युरप व्यापाराचे ते एक महत्त्वाचे मध्यस्त नाके होते
बातमीमधील तारखांमध्ये मात्र काही गोंधळ आहे असे दिसते. पहिले म्हणजे बातमी १९ नोवेंबर १६७२ च्या पत्रातून अलेप्पोहून निघाली असे म्हटले आहे. तर मग ती लंडनला फेब्रुअरी १६७२ ला कशी पोहोचली. दुसरे म्हणजे ३ ऑक्टोबर १६७० ची बातमी लंडनपर्यंत पोहोचण्यासाठी दीड वर्ष का लागावे? ईस्ट इंडिया कंपनीची ४-५ जहाजे प्रतिवर्षी हिंदुस्थान ते लंडन प्रवास करीत असणार. त्यांच्याबरोबर ही बातमी आधीच लंडनला का पोहोचली नाही?
(तारखांचा गोंधळ स्पष्ट करण्यासाठी १७व्या शतकात इंग्लंडमध्ये ग्रेगोरियन कॅलेंडर चालू नव्हते, ग्रेगोरियनच्या १० दिवस मागे असलेली जुनी ज्यूलियन गणनाच चालू होती हे पुरेसे ठरणार नाही कारण तारखांचा फरक १० दिवसांहून बराच अधिक आहे. ह्या फरकाविषयी अधिक जिज्ञासा असेल तर माझेच 'लीप इयर, अधिकमास इत्यादि' हे लेखन वाचावे.)
खुपच् नविन माहिति मिलालि.
खुपच् नविन माहिति मिलालि. धन्यवाद.
एस या अक्षराचे फॉण्ट आहेत.
एस या अक्षराचे फॉण्ट आहेत. कोणत्या वेळी कोणता फॉण्ट वापरायचा त्याचे लॉजिक कळले नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
तो एफवाला एस बहुधा शब्दान्ती
तो एफवाला एस बहुधा शब्दान्ती सोडून कुठेही चालतो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
नावावरून काहीतरी ऐतिहासिक
नावावरून काहीतरी ऐतिहासिक घटनेवर वितंडवाद असेल असं वाटलं.प्रवासवर्णन आहे हे आता समजलं.लग्नसमारंभाला जाऊनही खाद्यपदार्थांचं वर्णन नाही ( फोटोही नाहीत )म्हणून लुटीतला आनंद कमी झाला.विनोदी { स्वत:वरच्या}शेरेबाजीने थोडं सुसह्य झालं.तिकडे आमटी,भाजी,उसळी फार गोड्ड करतात.सुरतेची घारी ,सुतरफेणी याबद्दल हवे होते.तुम्हाला सबटाइटलस कळले नाहीत म्हणून वाचलात.शेलक्या शिव्या असतात सहज बोलताना.इथली बाजारपेठ कन्याकुमारी,कोलकाता,राजस्थान वगैरेतील धार्मिक ठिकाणी साड्या पुरवतात त्याच आपण तिकडच्या म्हणून घेऊन येतो.हिराघासू उद्योग फारच जुना आहे.तिकदच्या बॅामबे मार्केटातली पाचशे रुपयाला(लेबल किंमतीने) घेतलेली साडी ठाण्यात पंधराशेला होती.शेजारची गुजराती बाई म्हणाली घासाघीस करून साडेतिनशेला मिळाली असती.