नैनं छिन्दन्ति शस्त्राणि - मिथकाची मोडतोड
ह्या लेखाच्या पार्श्वभूमीसाठी हा पहिला ललित लेख - नैनं छिन्दंति शस्त्राणि
"वरच्या शेखरदादाला बघायला मुलीकडचे लोक आले आहेत," असं मी आईला म्हटलं, तेव्हा तिच्या डोळ्यांत क्वचितच दिसणारा डँबिसपणा दिसला. तिची प्रतिक्रिया अशी का, हे मला तेव्हा समजलं नाही. भाषेतल्या अशा अनेक गमती मला अजूनही समजत नाहीत; पाचवी-सहावीत असताना काय समजणार होत्या!
भाषेतली लिंग-समानता ही गोष्ट मी गृहीत धरते, 'कमीतकमी तेवढं तरी हवंच.' माझेही पाय पाळण्यापासून दिसायला लागले होते; आईवडलांनी माझे पाय कधी बांधलेही नाहीत. पण 'हे असं का', याची उत्तरं मिळायला बराच काळ जावा लागतो. बरंच मोठं व्हावं लागतं.
'नैनं छिन्दंति शस्त्राणि' वाचून अनेकांचं म्हणणं पडलं की मी तेव्हा का बोलले नाही, याचं अधिक विवेचन हवं. या लेखात केलेलं विवेचन अगदी व्यक्तिगत पातळीवरचं आहे. माझ्यासारख्या जाड कातडीच्या लोकांना हे थोड्या-बहुत प्रमाणात लागू पडेल; पण ते सरसकट कितपत लागू होईल याबद्दल मला कल्पना नाही. हे लिहिताना शक्यतोवर भावनिक गुंता बाजूला काढलेला आहे. Quotient of robotness बराच जास्त असणाऱ्या माझ्यासारख्या चतुर, धोरणी, डँबिस, crooked, manipulative लोकांची विचारप्रक्रिया समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे.
मागच्या लेखावर फेसबुकवर एक प्रतिक्रिया आहे - "हो, हे अनवांछित स्पर्श त्रासदायकच असतात. त्यावर बोलूच नये असे वाटण्याइतपत. बोलून आपण ते पर्मनंट करू, पुसून टाकू शकणार नाही असं काहीसं फिलींग. अजूनही कधी आठवले तर त्या ठिकाणी तीव्र चटक्याचा भास होतो."
अशा स्त्रियांना काय आणि किती त्रास होत असेल, याची मी कल्पनाच करू शकत नाही. अशा सगळ्यांना अपमानाची, अपराधाची जाणीव माझ्यापेक्षा अधिक तीव्र असणार. त्यांना वाटणारी भीती, लाज यांची कल्पनाही मी करू शकत नाही; पण ह्या नकारात्मक भावना अतिशय तीव्र आहेत याची जाणीव मला आहे.
तेव्हा का बोलले नाही यासंदर्भात, बोलायची लाज वाटते किंवा मुलींना सोशिक बनायला शिकवलं जातं, ही उत्तरं माझ्या बाबतीत कुचकामी आहेत.
मी तेव्हा काहीही का केलं नाही, याचं उत्तर म्हटलं तर सोपं आहे. ते बाळाचे पाय होते, विक्षिप्तपणा (आणि π) मिरवण्याची क्षमता बाळगणाऱ्या कणखर स्त्रीचे नव्हते. 'द सेकंड सेक्स'मध्ये सिमोन दी बोव्हार म्हणते की स्त्रियांनाही इगो असला पाहिजे. तो इगो जन्माला आल्यापासून होता, पण माझ्यासारखा तोसुद्धा मोठा होत गेला. सोळाव्या किंवा विसाव्या वर्षी माझ्याकडे आत्मसन्मान नव्हता असं नाही; पण माझ्या कल्पना, विचार, आकलन सगळ्याच गोष्टी बाळबोध होत्या. ही गोष्ट फक्त आत्मसन्मानाबद्दलच नाही.
'वाईट' लोकांबद्दल आई माझ्याशी बरेचदा बोलत असे. पाळी आली साधारण त्याच वयात मी मैत्रिणींबरोबर घराबाहेर जायला सुरुवात झाली, आठवीत असताना, तेव्हापासून ही 'सल्लाफेक' वाढलीच. पण त्यात भीती परक्या लोकांची असायची. "अनोळखी लोकांकडून काही चॉकलेट, केक, खाणंपिणं घ्यायचं नाही." पण ओळखीचे लोक आपल्याशी वाईट, विचित्र वागू शकतात, याची मानसिक तयारी प्रत्यक्षात गोष्ट घडेस्तोवर झालेलीच नव्हती. अवांछित स्पर्श म्हणजे काय, तो कसा ओळखायचा याबद्दल सर्वसाधारण बुद्धीमत्ता असणाऱ्या कोणालाही, फक्त स्त्रियांनाच नाही, वेगळं शिकवावं लागत नाही. पण या गोष्टीबद्दल बोलण्याची गरज मला अजूनही वाटते. कोणीतरी चॉकलेटमधून गुंगीचं औषध देऊन पळवून नेईल आणि भिकारी बनवून रस्त्यावर बसवतील, यापलीकडे माझी आई बोलू शकत नव्हती. तिला इतर शक्यतांचा विचारच करायचा नव्हता, का माझा निरागसपणा जपायचा होता, याबद्दल काही माहिती, अंदाज नाहीत.
निरागसपणा तिच्या 'भीती दाखवण्या'मुळे संपला नाही. आपण बोललं नाही की गोष्टी आपसूक व्यवस्थित होतील, अशी आशा आपल्याला सगळ्यांना वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये वाटते. राहुललाही अशीच आशा असणार, त्याशिवाय त्याने आश्चर्य नसतं व्यक्त केलं; "तुला आठवतो तो प्रसंग अजून!" म्हणत.
अचानक जेव्हा शिरीषचा हात माझ्या अंगावरून फिरतोय, हे लक्षात आलं तेव्हा माझ्या डोक्यात काहीही विचार नव्हता. विचार काय करायचा हेच समजत नाही, असे अनुभव मला फार नाहीत. त्याचंही एक उदाहरण देते. सातवीत असताना मी एकदा घराशेजारी जिन्यात पडले; डोकं आणि पाठ आपटले; हात-पाय हलवता येत नव्हते; बोलता येत नव्हतं आणि श्वास बंद पडला होता; अशा स्थितीत मी फार तर मिनीटभर असेन. मला आमच्या घरातले बोलण्याचे आवाज ऐकायला येत होते; त्यांच्यापर्यंत पोहोचायचं कसं असा विचार मी करत होते. तेव्हा समोरच्या घराचं दार उघडलं. ३०-३५ वयाची बाई आणि तिचा प्राथमिक शाळेतला मुलगा बाहेर आले. माझ्या डोक्यातून रक्त वाहात होतं. ते दृश्य बघून ती किंचाळली आणि घाईघाईने घरात गेली, तिच्या वडलांना हाक मारायला. मी अशा परिस्थितीत विचार करत होते, "बाई गं, तू माझ्यापेक्षा बरीच मोठी आहेस. इथे मला मदत करायला यायचं सोडून घरात काय पळत्येस!" (तिचा आवाज ऐकून किंवा काही कारणाने लगेचच अद्वैत - भाऊ - तिथे आला आणि त्याने माझ्या हृदयावर हळूच दोन-तीन ठोसे मारले आणि श्वास, आवाज, हालचाल सगळं सुरू झालं.) कोणताही अनुभव घेत असताना डोक्यात विचार नाही, ही गोष्ट मला भीषण वाटते; मृत्युसमान.
'तेव्हा' माझ्या डोक्यात काही विचार नव्हता, याचं कारण, काय-कसा विचार करायचा याबद्दल मला काहीही कल्पना नव्हती. लैंगिकता या गोष्टीबद्दल माझ्याशी कोणीही, काहीही, कधीही बोललं नव्हतं. मुळात माझा कलही गणित, भौतिकशास्त्र अशा विषयांकडे; त्यामुळे कोणत्याही स्टँडर्ड्सने चावट, किंवा हिंसा असलेल्या कथा-कादंबऱ्याही मी कधी वाचलेल्या नव्हत्या; ना फार सिनेमे बघितलेले. मला त्याने असा हात लावणं आवडत नाहीये, यापलीकडे मला काहीही समजत नव्हतं. अशा परिस्थितीत काय करायचं, कसं व्यक्त व्हायचं, यासंबंधित माझी कुठलीही तयारी झालेली नव्हती.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याचं वर्तन 'काही झालंच नाही' अशा प्रकारचं होतं. तो भास होता का, असा प्रश्नही एकदा पडला; पण तो लगेच विरला. माझी स्मरणशक्ती नको तेवढी चांगली आहे. पण ही गोष्ट कोणाला आणि कशी सांगायची? तोवर आईच्या मृत्युला काही महिने झाले होते. एकीकडे वडलांकडे सॅनिटरी नॅपकिन्स किंवा आतल्या कपड्यांसाठी पैसे मागताना जी लाज वाटायची, त्यातून मी जेमतेम बाहेर येत होते. पण हे खरं कारण नाही. माझ्याकडे ही गोष्ट व्यक्त करायला शब्द नव्हते. खरं तर किती सोपं होतं, "बाबा, माझ्या इच्छेविरोधात शिरीषने माझ्या शरीराला स्पर्श केला." बरेच अनुभव घेतलेल्या आणि मुख्य म्हणजे स्वतःची ओळख पटलेल्या स्त्रीसाठी हे शब्द अगदी सोपे आहेत.
'ऐसी'ला दिलेल्या मुलाखतीत आदित्य जोशी आपल्या समलैंगिकतेबद्दल, त्यामुळे आलेल्या अनुभवांबद्दल बोलताना म्हणतो,
एक समलैंगिक माणूस म्हणून माझ्या लोकांकडून फार मोठ्या अपेक्षा नाहीत. लोकांचा दृष्टिकोन बदलावा, बस. माझं स्पष्ट मत आहे, की त्यासाठी आपण लोकांशी प्रादेशिक भाषांमधून बोलायला सुरुवात केली पाहिजे. मी जेव्हा माझ्या आईवडिलांशी माझ्या गे असण्याबद्दल इंग्लिशमधून बोललो, तेव्हा ते माझ्यापासून अधिकच तुटल्यासारखे झाले. हे काहीतरी फॉरेनचं फॅड आहे, कुठल्यातरी इंग्लिश सिनेमातून मी हे शिकलो आहे, असा त्यांचा ग्रह झाला. साहजिक होतं ना ते? आधीच मी त्यांना त्यांच्या जगाबाहेरचं काहीतरी सांगत होतो. त्यात भाषाही परकी. म्हणजे ते समजून न घेण्याची शक्यताच जास्त.
आज माझ्याकडे बघणाऱ्या अनेकांना, मी लहानपणी लहान मूल होते, याचा अर्थ कदाचित नीट लावता येत नसेल. माझ्याकडे आज चिकार आत्मविश्वास असला तरी आजही मी विसंगतीपूर्ण, उणीवा असलेली, मातीचे पाय असलेली व्यक्ती आहे. १५-२० वर्षांपूर्वी मी माझ्या वयाच्या इतर मुलींपेक्षा अधिक आत्मविश्वास असलेली बोलघेवडी होते हे खरं. पण आजच्या माझा विचार करता तेव्हा आत्मविश्वास कमी आणि उणीवा अधिक असा प्रकार होता. १५-२० वर्षांपूर्वीची मी आणि आत्ताची मी यांच्यात चिकार फरक आहे. ती तरुण आणि अपरिपक्व मुलगी तेव्हा बोलली नाही, कारण तिला ते तेव्हा शक्य नव्हतं. आत्ता मला कोणी सांगितलं की ५० किलोचं वजन यंत्र न वापरता उचलून दाखव, तर मी सरळ नाही म्हणेन. त्यात माझी काही चूक आहे असं कोणी म्हणणारही नाही. ५० किलोचं वजन उचलणं ही गोष्ट जेवढी अशक्य आणि अनैसर्गिक आहे, तसंंच तेव्हा बोलणं अशक्य आणि अनैसर्गिक होतं. माझ्या परिसरात कोणीही अशा प्रकारचं, काहीही बोलत नव्हतं.
'नैनं छिन्दंति शस्त्राणि'बद्दल विचार करताना मी म्हटलं की मी स्वतःला माफ केलं आहे. ते तेवढं खरं नाही. मी काहीही चूक केली नाही; माफीचा प्रश्नच येत नाही. मी तेव्हा बोलले असते तर बरं झालं असतं, कदाचित काही फरक पडलाही नसता. तेव्हा न बोलून मी काही चूक केली आहे, असं मला वाटत नाही. त्या प्रकारामुळे माझं काही नुकसानही झालेलं नाही.
शिरीष आणि राहुल या दोन निराळ्या व्यक्ती आहेत. राहुल माझ्याच वयाचा, त्याने हा प्रकार केला तेव्हा तो वीस वर्षांचा, माझ्याएवढाच. म्हटलं तर कायदेशीरदृष्ट्या (अॉलमोस्ट?) सज्ञान. मला अक्कल यायला, या प्रसंगांबद्दल किमान स्वतःशी विचार करण्यासाठीही अनेक वर्षं लागली; किमान २६-२७ वर्षांची असेन. त्या प्रसंगांमध्ये नक्की काय चुकलं याची अक्कल मला बऱ्याच मोठ्या वयात आली, तर तसाच विचार राहुल आणि शिरीषबद्दल करावा, असं मला वाटतं. त्यांच्या कृतींचं समर्थन होऊ शकत नाही. पण हे प्रकार कमी करायचे असतील राहुल आणि शिरीषच्या डोक्यात शिरण्याशिवाय पर्याय नाही. माझ्या गटातल्या लोकांना औषधपाणी करण्यापेक्षा राहुल आणि शिरीष गटाला लस टोचण्याची गरज आहे.
राहुलच्या घरच्या परिस्थितीबद्दल मी आधीच लिहिलेलं आहे. टिपिकल, पारंपरिक, धार्मिक वातावरण. माझ्या घरात उदारमतवादी मोकळेपणा असूनही लैंगिकता हा विषय ऑप्शनला टाकलेला. गेल्या काही वर्षांत मी मुद्दाम अद्वैतला विचारलं होतं, "पाळीबद्दल जसं आई माझ्याशी बोलायची, बोलत राहिली, तसं तुझ्याशी आई-बाबांपैकी कोणी बोलले होते का? लैंगिकता, वयात येणं, कोणत्याही विषयाबद्दल?" तो नाही म्हणाला. माझी पाळी येण्याच्या आधीपासून माझी लैंगिकता जागृत झाल्याची आठवण मला आजही आहे. तो प्रसंगही डोळ्यासमोर येतो. कोणत्याशा बी-ग्रेड, जितेंद्र-सिनेमातला शृंगार सुरू होता. घरात कोणी नसताना, स्वतःच्या शरीराला ठरावीक पद्धतीने स्पर्श करून आनंद मिळतो, तो अनेकदा अनुभवून झाला होता. पण हे सगळं काही तरी वाईट आहे; चारचौघांसमोर करत नाही म्हणजे चूकच, अशा काही विचारांत मी अडकले होते. शिरीष किंवा राहुलबद्दल बोलण्याच्या वेळेस 'आपलं बिंग फुटलं तर' अशी एक (आता निरर्थक वाटणारी) भीतीही मला होती.
'मला तेव्हा पुरती अक्कल नव्हती', हीच गोष्ट शिरीष किंवा राहुलच्या बाबतीत म्हणता येते का, असा प्रश्न मला पडतो. शिरीषच्या नजरेत मी वस्तू होते, हे मला त्या अंधारातही समजत होतं. तो माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा, भारतीय समाजात जो मोठेपणाचा अधिकार दिला जातो, तसा त्याच्याकडे होते. होय, एकेकाळी मी तो मोठेपणाचा अधिकार मानण्याएवढी बाळबोध होते. शिरीषसारख्या लोकांमुळे मला ही गोष्ट समजली की कोणीही व्यक्ती माझ्या आधी जन्माला आली म्हणून मोठी ठरत नाही. माझ्याकडून मोठेपणाचा मान हवा असेल, तो कमवावा लागेल. पण हे म्हणणारी मी तीन देश बघितलेली, तीन भाषा बोलणारी आणि बख्खळ शिकलेली आहे. दहावीतल्या मुलीला एवढा अनुभव आणि अक्कल नसतात.
राहुलच्या हेतूंबाबतीत मला बऱ्यापैकी खात्री आहे. त्याचा हेतू माझा गैरफायदा घेण्याचा नव्हता. त्याने मला ज्या प्रकारे स्पर्श केला त्यावरूनही मला हे तेव्हा थोडंसं समजत होतं. मला त्याच्यात अजिबात रस नव्हता आणि तोंडाने बोलण्याऐवजी त्याने हात वापरला ही त्याची चूक होती. तो गुन्हा होता असं मला अजिबात वाटत नाही.
तो माझ्यापेक्षा सहा महिन्यांनी मोठा - म्हणजे मोठेपणाचा अधिकार गाजवावा असं नाही. मला त्या घरातल्या लोकांचे विचार फार पटले नाहीत तरीही त्या कोणावरही दुष्ट किंवा वाईट असण्याचा आरोप मी करणार नाही. आपण अयोग्य वागू नये, ही नैतिकता त्यांच्याकडे आहे; त्याबरोबरच इतरांना अयोग्य वागू देऊ नये, holier than thou, अशी नैतिकताही येते त्याबद्दल माझी तक्रार आहे. त्याच्या धार्मिक घरामुळे, एकंदरीतच भारतातल्या सामाजिक वातावरणामुळे लैंगिकतेच्या बाबतीत तरुण मुलग्यांची कुचंबणा होते, ही गोष्ट मला समजते. राहुल माझ्याशी जे वागला ते 'चालायचंच' या प्रकारचं नाही. पण तरुण वयात केलेली चूक म्हणून मी राहुलला कधीच माफ केलं आहे. त्याला माफ करून मी काही तीर मारत नाहीये; त्याच्यावर राग धरून बसले तर मीसुद्धा तिथेच अडकून पडेन. माझं आयुष्य त्या दोन-चार-सहा मिनीटांपुरतं मर्यादित नाही, मला तसं करायचं नाही. माझ्या स्वार्थासाठी का होईना, मी त्याला माफ केलेलं आहे.
मुद्दाम नोंद - मी आणि राहुलच्या सामाजिक वर्तुळातले बरेच लोक हे वाचत असतील. त्याने तुमचा काहीही गुन्हा केला नसेल तर तुम्ही त्याला शिक्षा देण्याची गरज नाही. त्याच्या विचारसरणीमुळे त्याची होणारी कुचंबणा आणि आपलं सत्य बाहेर पडलं आहे, याची जाणीवच त्याला शिक्षा म्हणून पुरेशी आहे.
तेव्हाच्या तेव्हा बोलले नाही आणि काही काळानंतर हे बोलण्याला काही अर्थही उरलेला नव्हता. दोघांनीही एकेकदा माझ्याशी दुर्वतन करून झाल्यावर पुन्हा काहीच घडलं नाही. त्याच काळात विविध कौटुंबिक कारणांमुळे शिरीष आणि राहुल या दोन्ही लोकांशी संबंध नसल्यागत झाले होते. हे प्रकरण मुद्दाम उकरून काढावं, असं काही कारण नव्हतं. मला आता कोणाचाही असा त्रास नव्हता आणि शिक्षण, घरची परिस्थिती यामुळे मला त्या दोन-चार-सहा मिनीटांचा विचार करण्याएवढा वेळही नव्हता. हे सगळं बोलायची गरज उरली नाही.
ह्या मूक-माफीचा अर्थ राहुलने, विस्मरण असा लावला. I forgave him years ago, but I didn't forget. इतर काही वैचारिक भांडणात त्याने माझ्या वडलांचा उल्लेख करून, (अर्धवट का होईना) व्यक्तिगत पातळीवर घसरणं मला आवडलेलं नव्हतं. पण मी आता अचानक त्या प्रसंगाबद्दल का बोलले?
मोदींचं पंतप्रधान होणं, त्यापुढे आलेली 'भक्तां'ची लाट, बीफबंदी, साध्वी-संतांची बेताल बडबड ह्या भारतात चालणाऱ्या गोष्टी, ब्रेक्झिट (शिक्षणासाठी मी तीन वर्षं इंग्लंडमध्ये राहिले), आणि आता मी अमेरिकेत ट्रंपची 'अॅक्सेस हॉलिवूड' टेप, स्त्रियांनी त्याच्यावर आरोप करणं, ट्रंपचं एकंदर रेसिस्ट, सेक्सिस्ट संभाषित आणि त्याला असलेला पाठिंबा या गोष्टींचा निवडणुकीपूर्वीही माझ्यावर परिणाम झालेला होता. अनेक ठिकाणी त्या स्त्रियांवर आरोप होत होते की त्यांनी पैसे किंवा प्रसिद्धीसाठी ट्रंपवर खोटेनाटे आरोप केले आहेत. तेव्हाच स्वतःच्या अनुभवांबद्दल लिहावं असं मी ठरवलेलं होतं. पण राहुलबद्दल जाहीर काही लिहावं, किंवा त्याची ओळख काही लोकांना पटेल असं काही लिहावं, असं मला वाटत नव्हतं.
आणि राहुलने मला नेहरुंच्या वर्तनाचा जाब मागितला. ज्या उदारमतवादी आणि पुरोगामी मूल्यांवर मी विश्वास ठेवतो, त्यांची राहुलला कदर नाही. तो मोदीभक्त, मुस्लिमद्वेष्टा आहे (हे त्याच्या फेसबुकवर नजर टाकली की सहज समजतं). थोडक्यात मला जी मूल्यं टाकाऊ वाटतात, ती त्याला पूजनीय वाटतात. एवढंच नाही, अशा वादावादीच्या प्रसंगी माझ्या वडलांबद्दल बोलून, व्यक्तिगत पातळीवर घसरण्याचं कामही त्याने केलं होतं. मी स्वतःला 'नैनं छिन्दंति शस्त्राणि' म्हणवत असले तरी माझाही पारा चढतो आणि मला राग व्यक्त करण्याची, catharsisची गरज वाटते. हा राग व्यक्त करण्यासाठी राहुल हा योग्य "बकरा" सापडला.
जगात जी मूल्यं पुन्हा अस्तित्वात असू नयेत, असं मला वाटतं, राहुल त्यांचं प्रतिनिधित्व करतो. अहमहिकेने ती बाजू मांडतो. आणि माझ्याशी वाद घालताना तो माझ्याच पातळीवर असतो, असं तो समजला. That was my breaking point. 'तू माझ्या पातळीवर येऊन माझ्याशी बोलू नकोस. तुझ्या भूतकाळातल्या वर्तनाने तू खालच्या पातळीवर गेलेला आहेस.' हा विचार माझ्याकडून अभावितपणे (subconsciously) झाला आणि त्यानुसार मी वर्तन केलं. बरेच महिने साठलेला राग मी व्यक्त केला.
हा राग व्यक्त करताना मी मर्यादा ओलांडली नाही; कारण मराठी आंतरजालावर लिहून मला मोजूनमापून लिहिण्याची सवय झाली आहे. मी करत्ये ती तक्रार रास्त आहे याची खात्री होती म्हणूनच मी, मुद्दाम आक्रस्ताळेपणा आणि त्रागा चुकूनही दिसणार नाही, अशा पद्धतीने लिहिलं. अर्थात माझा राहुलवर व्यक्तिगत राग नाही, याचा फायदाच झाला. माझ्या राजकीय संतापाचा फक्त मलाच नाही, मोठ्या प्रमाणात इतरांनाही फायदा करून देता येईल; अशी परिस्थिती येईस्तोवर थांबणं आपसूक झालेलं होतंच. Personal is political असं स्त्रीवादी वाङ्मयात नेहमी म्हटलं जातं; मी खाजगी आणि राजकीय दोन्ही गोष्टी वेगळ्या काढता येणार नाहीत अशा एकत्र केल्या. किंवा माझ्याकडून आपसूकपणे तसं झालं.
भारत, यूके किंवा अमेरिका कुठल्याही राजकारणात रस घेणारे लोक माझ्या ह्या calculative वर्तनाबद्दल आक्षेप घेऊ शकत नाहीत. तुम्ही मोदी, ब्रेक्झिट किंवा ट्रंप समर्थक असाल तरीही एक उदारमतवादी आणि प्रागतिक मूल्य, स्त्रीवाद, याबद्दल कसलीही तक्रार करू शकत नाही. तेवढी चिरेबंद व्यवस्था मी केली आहे.
बहुतांश वेळेला भावना बाजूला ठेवून मी विचार करू शकते. म्हणून मला ही कृती आणि विचार दोन्ही गोष्टी जमल्या. सगळ्यांना भावना बाजूला काढता येतील, अशी अपेक्षा मी ठेवत नाही. पण 'रोबॉटां'च्या डोक्यांत कोणत्या गोष्टी, कशा आणि का चालतात याचीही एक झलक मिळावी, हाही या लेखाचा एक हेतू. 'नैनं छिन्दती शस्त्राणि'मध्ये मी स्वतःचं वर्णन 'चतुर, धोरणी, डँबिस, crooked, manipulative, तोंडाळ, आगाऊ आणि अतिशहाणी' असं केलं; त्याचं कारण हे.
हा लेख वाचणाऱ्या सर्व स्त्रियांना एक विनंती. जे अनुभव मी मांडले, तसे अनुभव थोड्या-बहुत फरकाने आपल्याला सगळ्यांना आलेले आहेत याबद्दल मला खात्री आहे. तुम्हाला असा एकही अनुभव नसेल तर कृपया पुढे येऊन सांगा; तुमच्या अपवादांमुळे नियम सिद्ध होईल. पण त्यापेक्षाही, तुम्हाला आलेले पुरुषी दुर्वर्तनाचे अनुभव मांडायला घाबरू, लाजू नका. मी राहुलला व्यक्तिगत निरोपात म्हटलं, "Every girl, woman has a right to, at least, shame her perpetrator." हा लेख वाचून तुम्ही मला दूषणं दिलीत का माझं अभिनंदन केलंत? जर अभिनंदन केलं असेल तर तुम्हीही या विषयावर लिहा. एरवी 'ऐसी अक्षरे'वर माझ्या लेखांची फारतर ५००-७०० वाचनं होतात. 'नैनं छिन्दंति शस्त्राणि' हा लेख पहिल्या चोवीस तासांत साधारण २५०० वेळा वाचला गेला; निदान १५०० लोकांनी तो वाचला असावा. ९० लोकांनी तो फेसबुकवर लाईक केला.
जेव्हा अशी घटना तुमच्या सोबत घडली तेव्हा तुमची काहीही चूक नव्हती. त्यापुढे अनेक वर्षं तुम्ही बोलला नसाल तर त्यातही काही गैर नाही. त्रासदायक गोष्टींबद्दल बोलणं जड असतं; ही गोष्ट, मला त्रास होत नाही तरीही सैद्धांतिक पातळीवर समजते. पण "न बोलण्याबद्दल स्वतःला माफ केलंय", अशी क्षमाशील (apologetic) भाषा असायची काहीही गरज नाही. आपले अनुभव मांडण्याला कोणतंही statute of limitation नसतं; हे असं तुम्हाला कोणी सांगत असेल, तुमचं तुम्हाला वाटत असेल तर तेही एक मिथक आहे.
लैंगिक दुर्व्यवहाराबद्दल आणखी एक मिथक मोडायची गरज आहे. आणि ही सकारात्मक मोडतोड आपण केल्याशिवाय होणार नाही.
प्रकाटाआ
प्रकाटाआ
पण पुरुषही अशा अनुभवांना
पण पुरुषही अशा अनुभवांना सामोरे जातात का? असणारच.
मागे ट्रेनमधील सहेतूक स्पर्शाचा उल्लेख कोणीतरी एका धाग्यात केलेला होता.
___
सापडले- http://www.aisiakshare.com/node/2977#comment-63636
____
याचा अर्थ जर पुरुष अशा चोरट्या स्पर्शांना सामोरे जातात तर कुमारवयीन मुले तर नक्कीच ...
एका मैत्रिणीने वेगळेच ३
एका मैत्रिणीने वेगळेच ३ मुद्दे मांडले. ती ऐसीवर नाही पण वाचक आहे. -
_____
यातील पहीला मुद्दा मला वादग्रस्त तर वाटतोच पण पटत नाही. मुलांचे "प्युबर्टी हार्मोन्स" म्हणजे अन्य स्त्रियांवरती अन्याय करण्याचा फुकट परवाना नाही. मुली हार्मोन्स कशा "मॅनेज" करतात? त्या तर अन्याय करत नाहीत. पण सहसा पुरुष त्यांना "अव्हेलेबल" असतात हेही सत्य आहेच. अजुन एक तरुण मुले असे करताना मला माझ्या सुदैवाने मर्यादित असलेल्या अनुभवात आढळली नाहीत. आढळले ते मध्यमवयीन पुरुष अन म्हातारे.
________
(४) चवथा मुद्दा माझा आहे. राहुल व शिरीष यांना तेव्हा फटकावले नाही, फटकावता आले नाही.
हा प्रश्न पडण्याचे कारण हेच की - त्या रा-शि यांच्या मुलांना, पत्नीला या सत्याची आता जाणीव करुन देण्याने काय साधेल? त्यांना उलट त्रास होइल असे वाटते. याउलट जर या रा व शि यांना "खाजगीत (इमेल, फोन) वगैरे करुन कान टोचले तर ते जास्त विधायक होइल का?
मला वरच्या लेखातले विवेचन आणि
मला वरच्या लेखातले विवेचन आणि गीतेमधल्या आत्म्याच्या(?)वर्णनासाठी प्रसिद्ध श्लोकाचा ताळमेळ बसवणे ,कळणे आकलनाच्या पलिकडले आहे. पण काही उदाहरणांवरून असे काही समाजातले लैंगिक प्रश्न मग ते वैचारिक ,शारिरीक स्तरावर सोडवण्याची चांगली रीत मिळून जाते. आइवडिलांनी अथवा शाळेत बौद्धिक घेण्यापेक्षा ते फार सोपे आहे.त्यातून प्रश्न सुटत जातात .इथे शुचीच्या मेत्रीणीला पडलेले प्रश्न पाहा.
१) काही आदिवासी लोकांत मुले मुली एकत्रच वेगळी ठेवतात. त्यांचे एकत्र जाणे,बोलणे,नाच यातून त्यांचे ते जोडीदार शोधतात/ घडतात.
२)शहरात बॅाल डान्स, डान्स अकॅडमी, ट्रेकिंगला जाणे, शिबिरं यातून हे शक्य आहे.
-
नैसर्गिक शक्ती वयापरत्वे वाढत असतात त्या दाबून टाकल्या तर त्या वेगवेगळ्या मार्गाने बाहेर पडतात.थकवणारे खेळ , छंद यांतून शक्ती वापरल्या जातात.चवथ्या मुद्याचं उत्तर आलं असेल.एकाची अगोदरची चूक दुसय्राची नंतरची असा आता खल करण्यापेक्षा,ही एक लाक्षणिक समस्या धरून उकल शोधणे योग्य नाही का?
ऐसीवरच्या सर्वांनी लेखावर
ऐसीवरच्या सर्वांनी लेखावर काहीतरी मत मांडायला हवे.
सॉरी, पण घटनेचं गांभीर्य आणि
सॉरी, पण घटनेचं गांभीर्य आणि प्रभावीपण (परिणामकता) राखण्यासाठी पहिल्या लेखानंतर थांबायला हवे होते असे वाटले.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
---पहिल्या लेखानंतर थांबायला
---पहिल्या लेखानंतर थांबायला हवे होते --
मार्ग काढण्यासाठी दुसरा लेख आहे असं मी मानलं आणि त्यासाठी फेसबुक प्रभावी माध्यम नाही.ते फक्त जलद निरोप इतकंच आहे.
तुम्हाला असा एकही अनुभव नसेल
मला असा एकही अनुभव नाही. म्हणजे अति गर्दी मधे असतील ही २-३ अनुभव. पण एकुणातच भारतातली गर्दी ही किळसवाणी वाटत असल्यामुळे गर्दीत जाणे होत नाही. पण ओळखीच्या, मित्र-नातेवाइकांकडुन असा वाईट अनुभव नाही. कोणाच्या मनात काहीही असु शकते, पण प्रत्यक्षात असा अनुभव नाही.
-----
मला त्रास झाला नाही हे सत्य मी सांगितल्या मुळे माझा वास्तवाशी संबंध पूर्ण तुटला आहे असा अर्थ ऐसीवर काढला जाईल. ( आयव्हरी टॉवर मधे रहायचा गब्बु नंतर माझाच नंबर आहे ).
असं अजिबात नाही. मला तर
असं अजिबात नाही. मला तर मनापासून आनंद झाला की कोणालातरी या प्रसंगांचा अनुभव नाही याचा. मला तर आशाच नव्हती कोणी भारतिय स्त्री अशी सापडेल.
माझी शाळा मुलींची आणि कॉलेज
माझी शाळा मुलींची आणि कॉलेज मधे आणि नंतर च्या काहीवर्षात जे पुरुष ओळखीत होते ते त्याकाळचे सो कॉल्ड पुरोगामी होते.
मला वाइट अनुभव नसण्याचे मुळ कारण ती जन्ता पुरोगामी होती हे तर नाही?
उशीरा का होइना, मी ताळ्यावर आले ही गोष्ट निराळी.
-----
अदिती तै - राहुल मोदींच्या आणि संघाच्या दुर्दैवाने त्यांचा भक्त निघाला. तो पुरोगामी आणि सेवादलात असता पण तुमच्याशी दुसर्याच कारणावरुन भांडला असता तर तुम्ही काय केले असते?
मला लेखात कोणी मुस्लिमद्वेष्टा आहे की प्रतिगामी आहे ह्या सत्याचा संमंध काय आहे ते कळला नाही. पुरुष हे पुरुष असतात.
मला वाइट अनुभव नसण्याचे मुळ
ह्म्म्म! रोचक मुद्दा आहे खरा. सहसा पारंपारीक कल हा लैंगिकता, कामेच्छा दमनाच्या उदात्तीकरणाकडेच असतो. याउलट पुरोगामित्व म्हणजे स्वतःची विचार करण्याची कुवत असणे व ती व्यवहारात आणणे. मग ते वेगळ्या वाटा चोखंदळणे, स्त्रीमुक्तीस पाठींबा देणे, एकंदर स्तियांचे वस्तुकरण न करणे यातूनही दिसून येते. सांगण्याचा मुद्दा हा की होय असू शकते.
पुरोगामित्व म्हणजे स्वतःची
शुचि - डिक्षनरी मिनिंग वर जाऊ नकोस. माझी कॉमेंट उपरोधिक होती. पुरोगामी असण्याचे आणि स्त्रीयांचे वस्तूकरण न करण्याचा काहीही संबंध नाही. उलट अतिशहाणपणा असल्यामुळे विकृतीचे रॅशनलायझेशन पण केले जाइल.
तसेही कोणाच्याच वस्तुकरणाला माझा विरोध नाहीये. हव्या त्या व्यक्तीकडुन स्त्रीचे वस्तुकरण न होणे हे फार अपमानास्पद आहे. नको ते फाटे फोडले जाऊ नयेत म्हणुन महत्वाचे शब्द अधोरेखीत केले आहेत.
नम्र विनंती
ह्या धाग्यावरही अवांतरगिरी, अटेंशन सीकिंग आणि पुरोगाम्यांच्या नावानं ट्रोलिंग सुरू आहे ह्याची नोंद घेतली आहे. इथे अधिक अवांतर करू नये ही नम्र विनंती.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हव्या त्या व्यक्तीकडुन
होय. असे काही स्त्रियांना वाटू शकते. पण इथे "हवी ती व्यक्ती" तर नव्हेच उलट अत्यंत घृणास्पद वर्तणूक करणार्या नराधामांचा, चांडाळांचा विषय चालला आहे. असो. हे तुला सांगण्याची गरज नाहीये. मला तुझे म्हणणे, अबाऊट वस्तुकरण कळतय.
पुरुष हे पुरुष असतात.
सहमत.
पुरोगामीवाल्यांनी खरडफळ्यावर
पुरोगामीवाल्यांनी खरडफळ्यावर यावं. वाळूतल्या रेघोट्यांवर एक लाट येईल आणि साफ.
स्पष्टीकरण पटत नाहीये.
स्पष्टीकरण पटत नाहीये.
लोकप्रियता गेली उडत!
अनुतै, एक फुकटचा सल्ला देत्ये. घ्यायचा तर घ्या नाही तर सोडून द्या. लोकांच्या मतापेक्षा निराळं मत मांडायचं असेल तर लोक आपल्याला नावं ठेवणार याची तयारी ठेवा. जगापेक्षा निराळं मत मांडायचं आणि वर लोकांनी नावं ठेवल्यावर रडारड केली तर आपल्या मताला आपणच किती किंमत देतो हे समजतं.
आणि अनुतै, मी काय म्हणत्ये हे तुम्हाला खरं तर समजलेलंच नाही. मी म्हणजे माझं शरीर नाही; मी ज्या उदारमतवादी आणि प्रागतिक मूल्यांवर विश्वास ठेवते ती अतिशय महत्त्वाची आहेत. निरनिराळ्या कारणांमुळे, माझ्या शरीराशी दुर्वर्तन केलेलं मी खपवून घेतलं. पण आज माझ्या मूल्यांचा अपमान केला तर तो मी खपवून घेत नाही. आणि माझी मूल्यं 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि' आहेत; कोणीही, कितीही फडफड केली तरी ती तशीच राहणार. सगळे पुरुष, पारंपरिक विचारांचे, डाव्या विचारांचे, पुरोगामी अशी सरसकटीकरणं मी करत नाही.
ह्या विवक्षित परिस्थितीत मी राहुलची ओळख आम्हाला दोघांना ओळखणाऱ्यांना समजेल असं लिहिलं, कारण तो एका विचारसरणीचा प्रतिनिधी आहे. जर-तरला फार अर्थ नसतो; पण तरीही तो पारंपरिक मूल्यं बाळगणारा नसता, तो डावा किंवा सेवादलवाला असता तर त्याने नेहरुंच्या वर्तनाचं स्पष्टीकरण मागितलं नसतं. त्याने दगड मारला नसता, स्वतः एकेकाळी मोठी चूक केली होती त्या विषयावरून मला डिवचलं नसतं तर त्याच्या पापाची धुणी मी जाहीररीत्या धुतली नसती. माझे स्वतःचे अनुभव फार तपशिलात न लिहिता या विषयाला हात घातला असता.
माझ्या लेखी शिरीषचा गुन्हा मोठा आहे; पण त्याचं फार काही सामाजिक नुकसान आजही झालेलं नाही. मला त्यांना त्रास देण्याची हौस नाही. (मी रस्त्यावरची मवाली नाही.) माझं मध्यमवर्गीय, गुबगुबीत खुर्ची आणि एसीत असलेलं आणि पुस्तकांत बुडलेलं आयुष्य छान सुरू आहे.
ज्यांना शीर्षक, स्पष्टीकरण, आणखी काही पटलेलं नाहीये - लोकानुनयासाठी मी लिहीत नाही; 'रोबॉटां'च्या विचार करण्याच्या पद्धतीबद्दल लिहून लोकप्रियता मिळेल अशा भ्रमातही मी नाही. माझ्यावर अन्याय झाला होता, पण मी 'बिच्चारी' नाही; अशी भूमिका किती लोकप्रिय होणार?
गेली किमान दहा वर्षंतरी माझा शिरीषशी काहीही संपर्क नाही. राहुलशी आहे किंवा होता. आणि त्याची जालीय वर्तणूक कशी आहे याबद्दल मी लिहिलेलं आहे - एखादीच्या विचारांना विरोध करताना शक्य असल्यास, क्वचित कधी व्यक्तिगत पातळीवर घसरणं. संघिष्ट राहुलकडून स्त्रीवादी भूमिका येणं अ-श-क्य आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
शोषण
दोन भागातलं लिखाण आवडलं. लेखातला मुद्दा लैंगिक शोषणाचा आहे असं वाटतं.
गेल्या वीस पंचवीस वर्षांमधे अन्य गोष्टींबरोबर याही मुद्द्याबद्दलचं लोकांचं भान बरंच वाढलं आहे. पिंकी विराणी यांचं 'बिटर चॉकलेट' सारखं पुस्तक, आमीरखान च्या 'सत्यमेवजयते'चा संस्मरणीय एपिसोड, कविता महाजन यांची 'भिन्न' ही कादंबरी , काही वर्षांपूर्वीचा 'मॉन्सून वेडींग' आणि अलिकडचा आलिया भटची भूमिका असलेला 'हायवे' हे सिनेमे : मेनस्ट्रीममधे "अल्पवयीनांचं लैंगिक शोषण" या गोष्टीवर प्रकाश टाकणार्या अलिकडच्या काही ठळक घटना.
इंटरनेटवर आणि बाह्यजगात याबद्दलची संभाषितं सुरू होणं हळुहळू होत आहे. यात गोष्टींच्या सामाजिक बाबींबरोबर वैयक्तिक अनुभवांची देवाणघेवाण आली. ज्यांचं शोषण झालं आहे त्यांची त्या वेळची असहायता, घुसमट आणि सामाजिक लांच्छनाची भीती (सोशल स्टिग्मा) या गोष्टी आजही आहेत. सोशल स्टिग्माबरोबरच "आपली ओळख केवळ एक व्हिक्टीम म्हणून राहील, लोक आपल्यावर दयेच्या नजरेने बघतील" अशीही एक (रास्त) भीती त्यात आहे. अदितीच्या लेखांनी काहीनाही तर किमान या शेवटच्या भीतीला निवारण्याला बळ मिळेल असं काम केलं आहे.
लैंगिक शोषणाचा प्रॉब्लेम सहजासहजी सुटण्यातला नाही कारण ते अपप्रकार सर्वात अधिक नात्या-मैत्रीच्या माणसांकडून होतात. त्रयस्थ माणसाकडून लैंगिक अपप्रकार झाला असता, पोलिसाकडे जाणं किंवा जमावाकरवी मारहाण करणं यात समस्या कमी आहे कारण तो सरळसरळ तिर्हाईत, काळा राक्षस असतो. जवळचाच नातेवाईक/आप्तस्वकीय असं करतो तेव्हा मग कौटुंबिक/सामाजिक लागेबांधे येतात आणि कुटुंबव्यवस्था आणि कम्युनिटी हे लागेबांधे नीट राहावेत म्हणून शोषिताचा आवाज दाबायला तयारच असते. किंबहुना शोषितांची लाज/भीती ही "आपण आवाज उठवला तर वातावरण प्रदूषित होणार" म्हणूनचीही असते.
असो, लेख आवडले. थोडे पसरट झाले आहेत आणि सद्यस्थितीमधल्या राजकीय वार्यांशी - आणि त्यामागच्या ऐतिहासिक कारणांशी नि सामाजिक घटकांशी - त्यांचा संबंध काही वाचकांना नीट जोडता आला नाही यात लेखिका थोडी अपयशी ठरली आहे असं मला वाटतं.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
ज्यांचं शोषण झालं आहे त्यांची
ज्यांचं शोषण झालं आहे त्यांची त्या वेळची असहायता, घुसमट आणि सामाजिक लांच्छनाची भीती (सोशल स्टिग्मा) या गोष्टी आजही आहेत. सोशल स्टिग्माबरोबरच "आपली ओळख केवळ एक व्हिक्टीम म्हणून राहील, लोक आपल्यावर दयेच्या नजरेने बघतील" अशीही एक (रास्त) भीती त्यात आहे. अदितीच्या लेखांनी काहीनाही तर किमान या शेवटच्या भीतीला निवारण्याला बळ मिळेल असं काम केलं आहे.
खरंय.उत्तर भारतात तर मुलींचे आइवडील फार टोकाची भूमिकाही घेतात.
दोन्ही लेखांबद्दल एकत्रच
दोन्ही लेखांबद्दल एकत्रच लिहितेय .
बापरे , दोन्ही लेख इतक्या पद्धतशीरपाने लिहिणं खरचंच अवघड असणार. आपल्यासोबत भूतकाळात झालेल्या गोष्टी , आणि त्यावर आपण न दिलेलं उत्तर ह्याचा खूप त्रास होतो. शिवाय घडून गेलेली गोष्ट असल्याने मागं जाऊन काहीच बदलता येत नाही त्यामुळे तर अजूनच .
तरीसुद्धा असा लेख लिहिणं , तटस्थ आत्मपरीक्षण ह्यासाठी अदितीचे अभिनंदन.
ह्या वाक्यावर विचार केला तर , हो मी म्हणू शकते.
पण ह्यात माझं काय कर्तृत्व , तर काही नाही... माझ्या नात्यात , ओळखीत, शेजारी , मैत्रीत जे पुरुष होते, ते सभ्य होते. माझ्यावर लाईन मारणे , बघत बसणे, क्वचित कधी पाठलाग करणे ह्या व्यतिरिक्त त्यांनी कधी काही अयोग्य वर्तन केलं नाही. स्पर्शाची तर सीमा कधीच कोणी ओलांडली नाही .
शिवाय कॉलेजमध्ये गेल्यावर उगाच तोंडओळखीवर लाईन मरणार्यांना कटवण्यासाठी मी माझ्या जवळच्या मित्रांचा पद्धतशीर वापर करायला शिकले होते .
पण जवळच्या मित्रांनी , मैत्रीतसुद्धा कधी कोणतीच मर्यादा ओलांडली नाही.
ह्याबाबतीत माझ्या एका मित्राचं कौतुक वाटतं ते अशासाठी : कधीतरी कॉलेजमध्ये एकत्र फिरताना , त्याच्या मनात माझ्याबद्दल रोमँटिक भावना आल्या. २ वर्षांच्या काळात २ वेळा त्याने मला विचारलं , मी नाही म्हणल्यावर ते समजून घेऊन मैत्री चालू ठेवली पण कधी उगीचच गळ्यात हात घालणे किंवा मी बाईकवर मागं बसलेली असताना जोरात ब्रेक मारणे असले प्रकार केले नाहीत.
मी दोन दिवस विचार करतेय, आठवतेय पण माझ्या दृष्टीने सर्वात किळसवाणा अनुभव म्हणजे हा : मी आणि आई एकदा कोल्हापूरहुन पुण्याला रेल्वेने जात होतो , तेव्हा गाडी कोल्हापुरातच होती, आई सामान जागेवर ठेवण्यात बिझी होती तेव्हा एका अनोळखी माणसाने त्याच्या पँटची झिप उघडून मला त्याचं लिंग दाखवलं . मी सातवी-आठवीत असेन. ते काय आहे हे कळेपर्यंत तो माणूस हसत असत निघून गेला आणि मला दरदरून घाम सुटला . मी लगेचच आईला सांगितलं, तिने , वेडा माणूस असेल, TC ला सांगून पोलिसात देऊ असं काय काय सांगून माझी भीती कमी केली. तिने पण आजूबाजूला त्याला शोधायचा प्रयत्न केला, तो माणूस बहुदा असाच छपरी कोणीतरी स्टेशनवरचा असणार , तो काही परत दिसला नाही आम्ही सुखरूप पुण्याला पोहोचलो . पण तो डब्यातच असेल , रात्री झोपल्यावर येईल वैगेरे विचाराने मी खूप घाबरले होते. नीट झोपू शकले नाही . कदाचित आईसुद्धा , पण तिने मला तसं दाखवलं नाही .
मला रेल्वेचा प्रवास कधीच आवडत नाही. आता वरचा परिच्छेद लिहिताना वाटलं , हे कारण असेल का रेल्वे न आवडण्याचं ?
अजून एक: हे असे अनुभव शब्दबद्ध करणं किंवा त्यावर चर्चा करणं हे कितीही गरजेचं असलं तरीसुद्धा त्रासदायक असतं. इतरांच्या तुलनेत तसं तर माझा अनुभव खूपच फुसका तरी मला त्यावर लिहिणं अवघड गेलं. मी आणि आई-बाबा खूप विषयांवर मोकळेपणे चर्चा करतो पण एकदा पुण्याला जाताना असं-असं झालेलं तुला आठवतं का किंवा आईने तुम्हाला हे असं असं झालेलं सांगितलं होता का हे मी आजपर्यंत कधीही विचारलं नाही
अजून बरंच लिहावं वाटतंय , पण आधी डोक्यातले विचार सॉर्ट करून त्यांच्याकडं बघितलं पाहिजे मग नीट मांडता येतील कदाचित.
आणि हो, मी माझ्यापुरते ट्रम्प, नेहरू, संघ आणि दुटप्पी लोक ह्यांना सध्या प्रतिक्रियेतून वगळले आहे .
-सिद्धि
भयंकरच
सिद्धी, तुला आलेला अनुभवही भयंकरच आहे. इच्छेविरोधात हात लावला, अश्लील बडबड केली, लैंगिक अवयवांचं प्रदर्शन करणं, अशा गोष्टी दुर्वर्तनच.
हा किमान सभ्यपणा झाला; पण हे इतकं दुर्मीळ वाटतं की आपण त्याचं कौतुक करतो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
.
.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
आता हा प्रसंग - रस्त्याने
आता हा प्रसंग -
रस्त्याने दुकानांच्या कडेने चाललोय आणि पुढे दोन सहावी सातवीतली मुले चालली आहेत.त्यातला एकजण "देख मैं अब क्या करता हूँ " असे म्हणत त्याने दुकानाबाहेर ठेवलेल्या बाइच्या पुतळ्याचे स्तन जोरात पिळले!!यांच्या डोक्यात कायकाय चालत असेल या वयात?
दुकानाबाहेर ठेवलेल्या
दुकानाबाहेर ठेवलेल्या बाइच्या
पुतळ्याचे स्तन जोरात पिळले!!यांच्या डोक्यात कायकाय
चालत असेल या वयात?>>>>>>>>> या वयात असे विचार डोक्यात येतातच .प्रत्येकाच्या येतात.तुम्हीच सांगा, सुंदर स्त्रीचे अवयव हाताळायला मिळावेत असे तुम्हाला वाटले न्हवते का कधी?
आपल्या समाजात मुक्त लैंगिकता नसल्याने मग राहुल ,शिरीष सारखे लोक तयार होतात.यासाठी पुरुषांच्या अमाप कामेच्छेला व्हेंट करण्यासाठी मुक्त लैंगिक व्य्ववहार स्विकारला पाहीजे ,जो कायद्याच्या चौकटीत असावा.स्त्रीयांची लैंगिकता emotional नसून instrumental असते ,तरीही त्यांनी trade off म्हणून मुक्त लैंगिक समाजाकडे वाटचाल करावी.
™ ग्रेटथिंकर™
सहमत
मी तुमच्या मताशी संपुर्णपणे सहमत आहे.
पोथी पढी पढी जग मुआ...पंडित भया ना कोय...
ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय..