आगमन, निर्गमन पुनरागमन (भाग ४)

भाग १
भाग २
भाग ३

माझ्या आयुष्यात कन्नड साहित्य उशीरा आले. तोपर्यंत मराठी साहित्याने माझ्या मनावर गरूड केले होते. (इथे साहित्य हा शब्द मी कथा आणि कादंबरी इतक्या मर्यादित अर्थानेच वापरला आहे. त्यात वैचारिक लेखन गृहीत धरलेले नाही.) पण उशीरा येऊनसुद्धा एक मात्र स्पष्ट जाणवले की मी वाचलेले कन्नड साहित्य मी वाचलेल्या मराठी साहित्यापेक्षा खूप वेगळे आहे. बहुतांश मराठी कादंबऱ्या मला व्यक्ती आणि निसर्ग किंवा व्यक्ती आणि व्यक्ती किंवा व्यक्ती आणि त्याचा समाज यांच्यापैकी कुठल्यातरी एकाच नातेसंबंधांवर भाष्य करणाऱ्या वाटल्या. पण एकाच वेळी इतिहास आणि वर्तमान, व्यक्ती आणि समग्र समाज, भावना आणि तत्त्वविचार, पुराण आणि विज्ञान, लैंगिकता आणि अध्यात्मिकता; या सगळ्यांना कवेत घेण्याची कन्नड कादंबऱ्यांची क्षमता मी वाचलेल्या मराठी कादंबऱ्यांपेक्षा जास्त आहे असे मला वाटते.

माझ्या तोकड्या दृष्टीने केलेल्या निरीक्षणाप्रमाणे; कदाचित कन्नड समाजातील प्रस्थापित किंवा उच्च वर्णीयांनीच समाजातील विस्थापितांच्या किंवा निम्नवर्णीयांच्या आयुष्याचे प्रत्ययकारी चित्रीकरण केले आहे. त्यामुळे जातीभेद, धर्मभेद, अस्पृश्यता, शोषण, स्त्री पुरुष संबंध, अर्थकारण, राजकारण आणि या सर्वांतून होणारी व्यक्तीची मानसिक जडणघडण या सर्व बाबींचा कन्नड साहित्याने सहजतेने स्वीकार केलेला आहे. त्यामुळे त्याचा वाचकवर्ग सर्व सामाजिक आणि आर्थिक स्तरांतून येतो. याउलट मराठीत मात्र विविध स्तरांतील लोकांनी आपापले साहित्य तयार केले आहे. त्यामुळे ब्राह्मणी साहित्य, दलित साहित्य, शहरी साहित्य, ग्रामीण साहित्य असे भेद मराठी साहित्यात मोठे होत जाऊन जुने आणि नवे असे दोन ठळक प्रवाह दिसून येण्याऐवजी लोकानुयायी, विद्रोही, रंजनात्मक, धक्कादायक, सुबोध, दुर्बोध असे अनेक छोटे छोटे प्रवाह दिसून येतात. परिणामी साठोत्तरी किंवा नव्वदोत्तरी साहित्य अशी विभागणी करूनही मराठी साहित्य एकाच वेळी अनेक आर्थिक आणि सामाजिक स्तरांतील वाचकांचा पाठिंबा मिळवण्यास कन्नड साहित्यापेक्षा तोकडे पडते, असे माझे मत आहे.

चंपूकाव्य परंपरा सोडून कन्नड साहित्याने नवता धारण करताना जी सफाई दाखवली आहे तितक्या सफाईने मराठीला संत, पंत आणि तंतसाहित्याचा प्रभाव मोडून काढणे शक्य झालेले नाही. त्याशिवाय कन्नड साहित्यिक जितक्या ठळकपणे सामाजिक आणि राजकीय भूमिका घेतात तितक्या ठळकपणे सामाजिक आणि राजकीय भूमिका घेताना मला मराठी साहित्यिक दिसत नाहीत. आणि या ठळक भूमिकेच्या अभावाने तिचा आग्रह धरणे किंवा पाठपुरावा करणे दूरच राहते.

मराठी साहित्याच्या तुलनेत कन्नड साहित्याचे आणि त्याला मिळालेल्या लोकाश्रयाचे मला जाणवलेले हे गुणविशेष डोक्यात असताना, प्रो टी पी अशोक यांनी भारतीपूरसाठी लिहिलेली प्रस्तावना वाचली. प्रोफेसर ही उपाधी मिळवण्यासाठी विचारांची स्पष्टता किती असावी आणि ते सहजपणे मांडण्याची हातोटी कशी असावी याचा वस्तुपाठच मिळाला. कन्नड साहित्यातील नव्य किंवा नव्योदय चळवळीबाबत लिहिताना प्रो अशोक यांनी “आगमन, निर्गमन आणि पुनरागमन” हे सूत्र मांडले आहे. प्रो. अशोकांच्या मते कन्नड साहित्यातील नव्योदयाच्या प्रवाहात तीन वेगवेगळे प्रवाह एकामागून एक येताना दिसतात. त्यांना ते अनुक्रमे “आगमन, निर्गमन आणि पुनरागमन” म्हणतात. या तिन्ही संज्ञांबाबत प्रो. अशोकांनी अगदी थोडक्यात विवेचन केले आहे पण ते वाचून माझ्या मनात जे विचार आले ते आता लिहितो.

भाग ५
भाग ६

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान धागा मोरे साहेब . लिखाण आवडले .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखमाला आवडते आहे. पुभाप्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आव‌ड‌ला, पुढील भागाच्या प्र‌तीक्षेत‌. ब्रिटिश‌पूर्व‌कालीन क‌न्न‌ड‌ साहित्याचा आढावा घेणारा नाग‌राज‌ यांचा एक अप्र‌तिम लेख ह्या पुस्त‌कात‌ आहे त्याची आठ‌व‌ण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

संदर्भासाठी धन्यवाद. वाचतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

[माझ्या तोकड्या दृष्टीने केलेल्या निरीक्षणाप्रमाणे; कदाचित कन्नड समाजातील प्रस्थापित किंवा उच्च वर्णीयांनीच समाजातील विस्थापितांच्या किंवा निम्नवर्णीयांच्या आयुष्याचे प्रत्ययकारी चित्रीकरण केले आहे. त्यामुळे जातीभेद, धर्मभेद, अस्पृश्यता, शोषण, स्त्री पुरुष संबंध, अर्थकारण, राजकारण आणि या सर्वांतून होणारी व्यक्तीची मानसिक जडणघडण या सर्व बाबींचा कन्नड साहित्याने सहजतेने स्वीकार केलेला आहे. त्यामुळे त्याचा वाचकवर्ग सर्व सामाजिक आणि आर्थिक स्तरांतून येतो. याउलट मराठीत मात्र विविध स्तरांतील लोकांनी आपापले साहित्य तयार केले आहे. त्यामुळे ब्राह्मणी साहित्य, दलित साहित्य, शहरी साहित्य, ग्रामीण साहित्य असे भेद मराठी साहित्यात मोठे होत जाऊन जुने आणि नवे असे दोन ठळक प्रवाह दिसून येण्याऐवजी लोकानुयायी, विद्रोही, रंजनात्मक, धक्कादायक, सुबोध, दुर्बोध असे अनेक छोटे छोटे प्रवाह दिसून येतात. परिणामी साठोत्तरी किंवा नव्वदोत्तरी साहित्य अशी विभागणी करूनही मराठी साहित्य एकाच वेळी अनेक आर्थिक आणि सामाजिक स्तरांतील वाचकांचा पाठिंबा मिळवण्यास कन्नड साहित्यापेक्षा तोकडे पडते, असे माझे मत आहे.]

रोचक निरीक्षण. मराठी साहित्य आणि समाज यांचा जैविक संबंध इथे लक्ष्यात येईल. ब्राह्मणी/दलित/ग्रामीण हे साहित्यातले भेद मुळात मराठी समाजातच खोलवर रुजलेले भेद आहेत. मराठीत आणखी एक महत्वाची घटना घडली जी इतर भारतीय समाजांत इतक्या प्रभावीपणे आणि प्रकर्षाने प्रकटली नाही: एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ब्राह्मणेतर ह्या कौंटर-कल्चरल ऐतिहासिक दृष्टीचा मराठी साहित्य-संस्कृतीवर चांगलाच प्रभाव पडला, त्यामुळे ब्राह्मणजातीय व्यक्तीच्या अब्राह्मणी विश्व व्यक्त करता येण्याच्या शक्यतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं. श्री म माटे ह्यांचं उदाहरण लक्षणीय ठरावं. (दलित चळवळीसंदर्भात विठ्ठल रामजी शिंदे हे उदाहरण आणखी प्रस्तुत ठरेल.)

नवे आणि जुने हे भेद महत्वाचे ठरण्याऐवजी लोकानुयायी, विद्रोही, रंजनात्मक, धक्कादायक, सुबोध, दुर्बोध असे अनेक छोटे छोटे प्रवाह महत्वाचे ठरू लागले हे तुमचं निरीक्षणदेखील विचार करण्यासारखं आहे. ह्याचाहि संबंध पुन्हा एतद्देशीय समूहाच्या ऐतिहासिक जडणघडणीशी आहे. मराठी समीक्षेत जुने/नवे हे साहित्यिक द्वंद्व परंपरा आणि नवता ह्या भाषेत मांडले गेले, पण लोकप्रिय मराठी साहित्यात मात्र हे प्रमुख द्वंद्व न ठरता (जे बंगाली, कानडी अश्या इतर साहित्यात फारच महत्वाचे ठरले) मराठी समाजाच्या ज्या अंतर्गत दुफळ्या होत्या – जातीय, इत्यादी – त्यांच्या अनुषंगाने साहित्यिक फाळण्या घडत गेल्या. नवे/जुने हे द्वंद्व मुख्यत: भारतीय समाजाच्या वरिष्ठ स्तरातल्या – जातीय/वर्गीय अश्या दोन्ही अर्थाने – नवशिक्षित वैचारिक वर्गाची निर्मिती आहे. इंग्रजी शिक्षणाने पारंपारिक भारतीय समाज आणि वसाहतवाद ह्यांच्या कात्रीत सापडलेला हा वर्ग जुन्या नव्याची फारकत करून स्वतःला “नव्या”च्या आधाराने पुनर्निर्मित करण्याचा प्रयत्न करत होता. (ह्याच भानगडीतून पुरोगामित्वाची संकल्पना आकाराला आली, अर्थात तिचा समकालीन आशय फारच निराळा झालाय). पण निम्नशिक्षित आणि निम्न-जात-वर्गीय विचारवन्तांसाठी पाश्चात्य आधुनिकता (नवता) विरुद्ध भारतीय परंपरा ह्या द्वंद्वाऐवजी भारतीय शोषणकर्ते विरुद्ध (भारतीयच) मूकनायक हे द्वंद्व प्रधान ठरलं. ह्याची सुरुवात फुल्यांपासून होते. नवं/जुनं हे द्वैत कन्नड किंवा बांग्ला साहित्यात प्रधान ठरलं कारण ते समाज महाराष्ट्रापेक्षा अधिक एकात्म झालेले समाज होते.

[परिणामी साठोत्तरी किंवा नव्वदोत्तरी साहित्य अशी विभागणी करूनही मराठी साहित्य एकाच वेळी अनेक आर्थिक आणि सामाजिक स्तरांतील वाचकांचा पाठिंबा मिळवण्यास कन्नड साहित्यापेक्षा तोकडे पडते, असे माझे मत आहे.]

पूर्वी ऐसीअक्षरे वर लिहिलेल्या एका लेखात मी ना सी फडकेंचं एक विधान उधृत केलं होतं. कादंबरीकार ना. सी. फडके ह्यांचे १९६६ सालचे हे उद्गार पहा :
"ज्यातून ज्यातून रसनिर्मिती करता येते, असे जीवनाचे सर्व प्रकार साहित्याचे वर्ण्यविषय होऊ शकतात, आणि झाले पाहिजेत, असे आपण नेहमी म्हणतो. राजे, राण्या, प्रधान, मंत्री, सेनापती, यांच्या प्रमाणेच रस्ता झाडणारा झाडूवाला, सफाई करणारा मेहेतर, ढोर, चांभार, मांग, महार यांची म्हणून काही सुखदु:खे आहेत आणि शुद्ध साहित्यिक दृष्टीला ती दिसली पाहिजेत असे आपण नेहमी म्हणतो. परंतु हे सर्व म्हटल्यावरदेखील असा प्रश्न विचारावासा वाटतो की, ढोर-चांभारांच्या जीवनातील घटक घेऊन त्यावर कादंबरीची रचना करता येईल काय? दलितांच्या सुखदु:खावर लहान कथा लिहिता येईल, परंतु मोठ्या विस्ताराची कादंबरी लिहिता येईल काय? लिहिता येईल, असे मला वाटत नाही. कादंबरीचा चित्रफलक फार मोठा असतो. ह्या विस्तीर्ण फलकावर भरघोस चित्र रंगवायचे झाले तर ज्या प्रकारच्या प्रसंगांची आणि घटनांची गरज असते, तसे प्रसंग आणि घटना दलितांच्या जीवनात आढळत नाहीत; कादंबरीची भव्य इमारत ज्यावर उभी राहील, असा भरघोस भक्कम पाया सापडत नाही."

मला वाटतं ह्यातून मराठी अभिजन लेखकाची असम्वेषक दृष्टी पुरेशी स्पष्ट होते. मराठीला दुर्दैवाने ज्या अनेकानेक मर्यादा आकुंचित करत गेल्या त्यात जात-जाणीव हा घटक प्रमुख ठरावा.

कन्नड अभिजन वर्गालाही जातीची मर्यादा होतीच, मग मराठीच जातीय मर्यादेने का विशेष आकसावी? कन्नड अभिजात साहित्य ज्या खोलवरपणे जीवनार्थाचा वेध घेऊ पहाते (अनंतमूर्ती, शिवराम कारंथ, द रा बेंद्रे, गिरीश कर्नार्ड, मास्ती व्यंकटेश, यशवंत चित्ताल इत्यादी) त्याचा मराठी अभिजन साहित्यात काहीसा अभाव का असावा?

हा खरा महत्वाचा प्रश्न आहे, ज्याचं विश्लेषण करण्याची ही जागा नसल्याने थांबतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

हा खरा महत्वाचा प्रश्न आहे, ज्याचं विश्लेषण करण्याची ही जागा नसल्याने थांबतो.

तुमचं विश्लेषण वाचायला आवडेल.

माझ्या मते कानडी लोकांच्या तुलनेत मराठी लोक स्वातंत्र्यलढ्यात जास्त सक्रिय असणे, गांधींचा खून एका मराठी ब्राम्हणाच्या हातून होणे, रास्वसंघाचा जन्म महाराष्ट्रात होणे, वारकरी संप्रदायातही भजनात एकी आणि भोजनात बेकी आहे असे जनसामान्यांना वाटत राहणे आणि लिंगायत सारखा पंथ महाराष्ट्रात न रुजणे; या कारणांनी मराठी मन कानडी मनापेक्षा अधिक खंडीत आहे असं मला वाटतं.

आणि महाराष्ट्रातील संतपरंपरा मोठ्या प्रमाणावर अध्यात्मिक राहिली तिने राजकीय वर्चस्व तयार करण्याचा प्रयत्न केला नाही. त्याशिवाय कर्नाटकात वडेयार राजे शेवटपर्यंत राजे राहिले... महाराष्ट्रात मात्र सत्ताकेंद्र मराठ्यांकडून ब्राम्हणांकडे गेले आणि नंतर इंग्रजी अंमल आला त्यामुळे सर्वच जातींना एकाच वेळी आपण राज्यकर्ते होतो आणि आपल्यावर इतर जातींनी कुरघोडी केली असा समज करून घेण्यास वाव मिळाला... आणि मराठी समाज, कानडी समाजाच्या तुलनेत, खंडीत कोशात धुमसत राहण्यास अजून कारणे मिळाली असावीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महाराष्ट्रात मात्र सत्ताकेंद्र मराठ्यांकडून ब्राम्हणांकडे गेले आणि नंतर इंग्रजी अंमल आला त्यामुळे सर्वच जातींना एकाच वेळी आपण राज्यकर्ते होतो आणि आपल्यावर इतर जातींनी कुरघोडी केली असा समज करून घेण्यास वाव मिळाला... आणि मराठी समाज, कानडी समाजाच्या तुलनेत, खंडीत कोशात धुमसत राहण्यास अजून कारणे मिळाली असावीत.

साधार‌ण‌प‌णे स‌ह‌म‌त‌. ब्राह्म‌ण‌, म‌राठा आणि द‌लित‌ या तीन मोठ्याच फॉल्ट‌लाईन्स म‌राठी स‌माजात आहेत‌ त्यांची उत्प‌त्ती क‌लोनिय‌ल‌ आणि इमिजिएट‌ली प्रीक‌लोनिअल‌ काळातील म‌हाराष्ट्राच्या इतिहासात‌ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>कदाचित कन्नड समाजातील प्रस्थापित किंवा उच्च वर्णीयांनीच समाजातील विस्थापितांच्या किंवा निम्नवर्णीयांच्या आयुष्याचे प्रत्ययकारी चित्रीकरण केले आहे. त्यामुळे जातीभेद, धर्मभेद, अस्पृश्यता, शोषण, स्त्री पुरुष संबंध, अर्थकारण, राजकारण आणि या सर्वांतून होणारी व्यक्तीची मानसिक जडणघडण या सर्व बाबींचा कन्नड साहित्याने सहजतेने स्वीकार केलेला आहे. त्यामुळे त्याचा वाचकवर्ग सर्व सामाजिक आणि आर्थिक स्तरांतून येतो. याउलट मराठीत मात्र विविध स्तरांतील लोकांनी आपापले साहित्य तयार केले आहे. त्यामुळे ब्राह्मणी साहित्य, दलित साहित्य, शहरी साहित्य, ग्रामीण साहित्य असे भेद मराठी साहित्यात मोठे होत जाऊन जुने आणि नवे असे दोन ठळक प्रवाह दिसून येण्याऐवजी लोकानुयायी, विद्रोही, रंजनात्मक, धक्कादायक, सुबोध, दुर्बोध असे अनेक छोटे छोटे प्रवाह दिसून येतात. परिणामी साठोत्तरी किंवा नव्वदोत्तरी साहित्य अशी विभागणी करूनही मराठी साहित्य एकाच वेळी अनेक आर्थिक आणि सामाजिक स्तरांतील वाचकांचा पाठिंबा मिळवण्यास कन्नड साहित्यापेक्षा तोकडे पडते, असे माझे मत आहे.<<

ह्यामाग‌चं त‌र्क‌शास्त्र‌ म‌ला नीटसं क‌ळ‌लेलं नाही. उदा. प्र‌स्थापितांनीच किंवा उच्च‌व‌र्णीयांनीच‌ विस्थापितांच्या किंवा निम्न‌स्त‌रीयांच्या आयुष्याचं प्र‌त्य‌य‌कारी चित्र‌ण‌ केलेलं अस‌णं ही मूल‌त: वाईट गोष्ट‌ नाही, प‌ण विस्थापित‌ किंवा निम्न‌स्त‌रीय लोक‌ प्र‌त्य‌य‌कारी साहित्य‌ निर्माण‌ क‌र‌त‌ अस‌णं ही स‌माजात‌ल्या अभिस‌र‌णाची आणि शिक्ष‌णाच्या सार्व‌त्रिकीक‌र‌णाची एक म‌ह‌त्त्वाची खूण‌ आहे. म‌हाराष्ट्रात केव‌ळ‌ द‌लित‌, ग्रामीण, व‌गैरेच‌ नाही, त‌र एकंद‌रीत‌च‌ बंड‌खोरांनी साहित्य‌ लिहून‌ प्र‌स्थापितांना आव्हान‌ देत राह‌णं आणि माग‌च्या पिढीची सौंद‌र्य‌दृष्टीच‌ नाकार‌णं हे सात‌त्यानं होत आल‌ंय. तुमच्या मते हे अधिक चांगलं, की प्रस्थापितांनीच सगळ्या समाजाचं प्रत्ययकारी चित्रण करत राहणं अधिक चांगलं? राह‌ता राहिला तो मुद्दा म्ह‌ण‌जे 'मराठी साहित्य एकाच वेळी अनेक आर्थिक आणि सामाजिक स्तरांतील वाचकांचा पाठिंबा मिळवण्यास कन्नड साहित्यापेक्षा तोकडे पडते'. मी काही ह्याचा तौल‌निक‌ अभ्यास‌ केलेला नाही, त्यामुळे क‌न्न‌ड‌ साहित्याशी तुल‌ना क‌र‌ता येणार नाही. मात्र, पुलं, ऐतिहासिक कादंब‌ऱ्या, सामाजिक आशयाच्या कादंबऱ्या, नेमाडे ते द‌लित साहित्याप‌र्यंत‌ अनेक आर्थिक आणि सामाजिक‌ स्त‌रांचं दर्शन घडवणारं आणि अनेक आर्थिक आणि सामाजिक‌ स्त‌रांतल्या वाच‌कांचा पाठिंबा मिळ‌व‌णारं अनेक प्र‌कार‌चं साहित्य‌ म‌राठीत निर्माण झालं असं दिस‌त‌ं. हे तुम्हाला मान्य आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तुम्ही म्हणता तसं, अनेकानेक साहित्यिक अभिसरणातून मराठीतले विद्रोही प्रवाह फार जोमाने व्यक्त झाले आणि अखिल भारतीय किंवा वैश्विक संदर्भात मराठी साहित्याची ओळखच (किंवा एकमात्र ओळख) हे विद्रोही साहित्य आहे हे खरंच. पण मला वाटतं, मोरे मुख्यत: मराठीत ज्याला मध्यवर्ती साहित्यधारा म्हटलं जातं, त्या विषयी बोलताहेत. मराठीत इतर प्रवाह विकसित झाले ते मध्यवर्ती धारेच्या मर्यादांवर टीका करून, त्यामुळे, माझ्या समजानुसार, मोरेंच्या विवेचनाचा रोख ह्या मुख्यधारेचा प्रवाह सर्वव्यापी का झाला नाही, किंवा किमान कन्नडच्या तुलनेत त्यात अभिजात आणि वैश्विक साहित्याची निर्मिती का होऊ शकली नाही ह्या प्रश्नांकडे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

मुद्दा चांगलं किंवा वाईट याचा नसून एकाच वेळी सर्व समाजघटकांना साहित्य आपलं वाटण्याचा आहे.
काही अपवाद सोडल्यास बहुतांशी मराठी साहित्यात अन्यायाला वाचा फोडणे किंवा अन्यायकर्ते परिस्थितीवश होते असे दाखवणे हे प्रवाह दिसतात. लेखक कोणत्याही आर्थिक किंवा सामाजिक स्तरातील असला तरी परिस्थितीचे वस्तुनिष्ठ शब्दांकन करण्याऐवजी कायम आक्रमक किंवा बचावात्मक भूमिकेतून आपल्या समाजघटकांचे समर्थन करताना मला दिसतो. त्याचे प्रमाण मला कन्नड साहित्यातून कमी जाणवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म‌ला अजून‌ही हे नीट‌ क‌ळ‌त‌ नाही. व‌र‌ तुम्ही म्ह‌ण‌ताय‌ :

  • प्रस्थापित किंवा उच्च वर्णीयांनीच समाजातील विस्थापितांच्या किंवा निम्नवर्णीयांच्या आयुष्याचे प्रत्ययकारी चित्रीकरण केले आहे.
  • त्यामुळे जातीभेद, धर्मभेद, अस्पृश्यता, शोषण, स्त्री पुरुष संबंध, अर्थकारण, राजकारण आणि या सर्वांतून होणारी व्यक्तीची मानसिक जडणघडण या सर्व बाबींचा कन्नड साहित्याने सहजतेने स्वीकार केलेला आहे.

इथे तुम्ही म्ह‌ण‌ताय‌ -

  • बहुतांशी मराठी साहित्यात अन्यायाला वाचा फोडणे किंवा अन्यायकर्ते परिस्थितीवश होते असे दाखवणे हे प्रवाह दिसतात.
  • लेखक कोणत्याही आर्थिक किंवा सामाजिक स्तरातील असला तरी परिस्थितीचे वस्तुनिष्ठ शब्दांकन करण्याऐवजी कायम आक्रमक किंवा बचावात्मक भूमिकेतून आपल्या समाजघटकांचे समर्थन करताना मला दिसतो.

उच्च‌व‌र्णीयांनी आप‌ल्या स‌माज‌घ‌ट‌कांचं स‌म‌र्थ‌न केलं नाही किंवा ते स्व‌त: (अन्याय‌क‌र्ते म्ह‌णून) प‌रिस्थितीव‌श दाख‌व‌ले नाहीत‌; जातीभेद, धर्मभेद, अस्पृश्यता, शोषण इ.इ.चा त्यांच्या साहित्यानं स‌ह‌ज स्वीकार केला, त‌रीही निव्व‌ळ त्यांच्याव‌र‌च्या अन्यायाला वाचा फोडली नाही; त‌र विस्थापितांच्या किंवा निम्नवर्णीयांच्या आयुष्याचं प्रत्ययकारी चित्रीकरण केलं; आणि उत्त‌म‌ साहित्य‌ निर्माण केलं म्ह‌ण‌जे न‌क्की काय केलं ते स‌म‌ज‌त नाही. उदाह‌र‌णं दिलीत‌ त‌र क‌दाचित मुद्दा नीट‌ स‌म‌जेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

लेखमाला पूर्ण झाली की येतो .. तोपर्यंत वाट पहा ही विनंती Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>मराठीत इतर प्रवाह विकसित झाले ते मध्यवर्ती धारेच्या मर्यादांवर टीका करून, त्यामुळे, माझ्या समजानुसार, मोरेंच्या विवेचनाचा रोख ह्या मुख्यधारेचा प्रवाह सर्वव्यापी का झाला नाही, किंवा किमान कन्नडच्या तुलनेत त्यात अभिजात आणि वैश्विक साहित्याची निर्मिती का होऊ शकली नाही ह्या प्रश्नांकडे आहे.<<

माझ्या म‌ते 'सांग‌त्ये ऐका', नेमाडे, 'ब‌लुत‌ं', 'आम‌चा बाप‌ अन आम्ही' किंवा स‌दानंद‌ देश‌मुखांचं 'बारोमास‌' व‌गैरेसार‌ख‌ं साहित्य‌ प्र‌काशित झालं तेव्हा न‌स‌लं त‌री आता मुख्य‌ धारेत आहे. ते पुरेसं अभिजात किंवा वैश्विक आहे का, किंवा क‌न्न‌ड‌ साहित्याच्या तुल‌नेत ते क‌सं आहे, हा वेग‌ळ्या च‌र्चेचा विषय होईल म्ह‌णून टाळ‌तो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मला मान्यच आहे ते, मुख्य धारेच स्वरूप आता मोठ्या प्रमाणावर बदललं आहे. पण बहुदा मोरे वसाहतिक काळातल्या मराठी मुख्य प्रवाहाविषयी बोलताहेत. अनंतमूर्ती यांच्या संस्कार कादंबरीसंदर्भात वसाहतिक काळातल्या आधुनिक होत जाण्याच्या प्रक्रियांना अभिजनांनी दिलेल्या प्रतिसादांची चर्चा त्यांना करायची आहे असं मला वाटतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

>>पण बहुदा मोरे वसाहतिक काळातल्या मराठी मुख्य प्रवाहाविषयी बोलताहेत.<<

असं म‌ला वाट‌ल‌ं नाही कार‌ण‌ म‌राठी साहित्याब‌द्द‌ल बोल‌ताना ते द‌लित‍-साठोत्त‌री-न‌व्व‌दोत्त‌री असे उल्लेख‌ क‌र‌त आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ज‌री या म‌राठ‌मोळ्या
ब्याट‌म्यानास‌ बोध व्हावा
त‌री त्वां म‌नोबा तुझा
प्र‌तिसाद‌ इथे ड‌क‌वावा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

टिंब म्हाराज की जै

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0