कांदेपोहे -३
आधीच्या भागांच्या लिंक्स
http://www.aisiakshare.com/node/5946
http://www.aisiakshare.com/node/5965
कांदेपोहे (Continued)
११.
ताजा किस्सा. दोन तिन महीन्यांपूर्वी एका मुलाशी बोलणं झालं होतं. मुलाची स्वतःची कंपनी आहे वीस पंचवीस साॅफ्टवेयर इंजिनियर्स त्याच्याकडं काम करतात वगैरे. मुलगा शास्त्रिय संगीतात रस असणारा. बोलताना सेन्सिबल वाटलेला. म्हणून फोन काॅल क्रमांक एक नंतर फोन काॅल क्रमांक दोनच्यावेळी बोलताना विशेष बोर झालं नाही. बरं वाचन आहे मुलाचं हे समजलं या दोन फोनकाॅल्स मधे. सेपियन्स बद्दल काही बोलला. म्हण्टलं चला वपुलंव्यतिरिक्त वाचणारी माणसं खरंच अस्तित्वात असतात, नुसतीच सोशल नेटवर्कींगवर नाहीत. मग फोन काॅल क्रमांक दोन नंतर काॅल क्रमांक तिन च्या वेळी म्हणाला मला वाटतं आता आपण भेटलं पाहीजे. ठीक आहे काळ वेळ ठीकाण कळव भेटू असं ठरलं. मधे आठ एक दिवस गेले. फोन मेसेज नाही. मग फोन आला 'बिझी होतो साॅरी जमलं नाही फोन मेसेज करायला. आपण कधी भेटायचं ते कळवतो.' मी म्हणाले 'तू एक काम कर तू इकडे ये.' मग म्हणाला 'नको तुम्हीच या इथे माझी कंपनी पाहता येईल.' मुद्दा पटला. तसंपण घरी कंटाळा आलेला. म्हण्टलं ट्रीप होईल एक तेवढीच वेगळ्या गावात. 'मान्यय' असं सांगितलं. मग परत मनुष्य गायब. सुमारे एक महीना काहीच नाही. परवा रात्री अचानक मेसेज आला 'उद्या सकाळी तुम्ही या इथे' मेसेज आल्यापासून सगळी तयारी करून जायचं म्हण्टलं तरी बारा चौदा तासाचा प्रवास करून पोहोचेपर्यंत दुपारचे बारा नक्कीच वाजले असते. 'उद्या लगेच जमणार नाही' मी म्हणाले. 'आलात तर उद्याच या नाहीतर राहूदे मला आत्ता वेळ नाही, नंतर मग परत कधीतरी' तो म्हणाला. मग मात्र मी सांगितलं 'बाऽऽऽय .' तर तो परत म्हणाला 'बघ विचार करून बोलतेयस ना? नक्की नाही भेटायचं? तू मला नाही म्हणतेयस. ठीके काय ते तुला कळवतो.' दुसऱ्या दिवशी फोन. 'असं परस्पर तोडांवर जमणार नाही कसं काय सांगू शकते तुमची मुलगी?' फोनवर मीच माझी आई म्हणून बोलत होते. त्या काकू म्हणे, 'काही ताळतंत्र आहे की नाही? शिकलेल्या मुली म्हणायच्या म्हणजे स्वैराचार आहे का सगळा? आमच्या मुलाची कंपनी आहे, पंचवीस एक साॅफ्टवेयर इंजिनियर्स त्याच्याकडं कामाला आहेत. अशा मुलाला भेटायला तुमची मुलगी नाही म्हणतेय म्हणजे काय?' मला मेजर हसायला येत होतं त्या काकूंचं. मी म्हणाले 'होय हो आमच्या मुलिला ना आम्ही नाहीच बघा काही शिकवू शकलो, तिला सांगायला हवं होतं. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी आमच्याशी चर्चा कर, उद्या जेवण झालं का असा प्रश्न कुणी विचारला तरीही आमच्याशी म्हणजे वडीलधाऱ्यांशी चर्चा करून मगच उत्तर दे. शिकलेय म्हणजे आपल्या आपण उत्तरं देणं आणि निर्णय घेण्याचा स्वैराचार करतेय म्हणजे काय हो, तुम्ही एक काम करा तुमच्या मुलाला ना सद्गुणी, हागल्या पादल्या गोष्टी विचारून करणारीच मुलगी बघा.' त्या काकूंना काय झालं कुणास ठाऊक म्हणे 'तसं नाही हो पण तरी आपली मुलिकडची बाजू आहे हे तरी तिनं समजून घ्यायला हवं नाही का? तो म्हणत होता आजच त्याला वेळ आहे तर यायचं की एवढं काय होत होतं काय सांगा बघू तुम्ही, असं मुलाला नाही म्हणणं म्हणजे त्याचा अपमान नव्हे काय? तेवढं फक्त तुम्ही तिला एक साॅरीचा मेसेज त्याला 'व्हाॅट्सअप' करायला सांगा की त्याचा मूड चांगला होईल आणि मग तो भेटेल तिला. आपल्याला काय हो चांगली मुलं आहेत का सांगा बघू तुम्ही, तुमची मुलिची बाजू आहे आणि आम्ही सुशिक्षित आहो म्हणून समजून घेतो हो, फक्त तेवढा मेसेज करायला सांगा तिला.' यावर इकडून मी म्हणे, 'ते काय जमत नसतंय हो, आमची मुलगी फार माँड आहे. तुम्ही एक काम करा फोन ठेवा आणि परत करू नका.' आई असती तर काय बोलली असती माहित नाही पण ह्यापेक्षा साॅलिड कायतरी बोलली असती एवढं नक्की.
१२.
पुण्यात एका मुलाला भेटायचं ठरवलेलं. घरीच भेटुया असं ठरलेलं. मग त्याचं घर कुठेय वगैरे विचारल्यावर म्हणे 'अभिमानश्री माहितीये का? तिथेच.' अभिमानश्री म्हण्टल्यावर मी हरखेश. माझा अतिशय आवडता एरिया पुण्यातला. एकापेक्षा एक देखणी घरं आहेत तिथं. मी तिथं होते तेव्हा बराच शांत असणारा एरिया. भरपूर झाडी वगैरे. सावली पुष्कळ वगैरे. मग आमची भेटायची वेळ ठरली. ठरल्यावेळी मी आईबाबा दिदी अभिमानश्रीमधे हजर. तिथे जाऊन त्याला फोन केला घर नंबर सांग, गेट नंबर सांग वगैरे. तर म्हणे तिथं नाही काय सकाळनगरमधे. सकाळनगर एकदम पोपट एरिया आहे. तिथं एक नंबरची घाणेरडी पापु मिळत होती मी NCL मधे असताना. तिथल्या इतरही अनेक आठवणी आठवून तोंडच कडू झालं. पण आम्ही गेलो वगैरे. त्या मुलाचं घर ज्या बिल्डिंगीत होतं तिथं गेलो. बिल्डिंगीच्या दारातच कचऱ्याचा मोठा ढीग होता. मुलाच्या घरी गेलो. त्याच्या आईनी दार उघडलं. दार उघडायला अवकाश भपकन् मुतारीचा वास आला. आम्ही तरीही आत गेलो. आत दोन खुर्च्या आणि एक काॅट होता. काॅटवरची गादी बाजूला काढून ठेवली होती. आणि नुसतंच भोक पडलेलं बेडशीट घातलं होतं. आत गेल्यावर अजूनच शूचा वास यायला लागला. नेहमीप्रामाणे जरा त्या घराचं निरिक्षण करताना पंख्याला लोंबत असलेली केंबळं, टीव्हीवर धूळीची पुटं, लिव्हिंगरूम मधे असणाऱ्या काॅटशेजारी कोपऱ्यात कपड्यांचा ढीग, भिंतीवर खूप प्रमाणात जळमटं असं ते विहंगम दृश्य दिसलं होतं. मुलगा येऊन बसला समोर. आला तो चक्क मावा खात होता. आधीच त्याला नापास केलं होतं. आता अजूनच शून्य मार्क करून टाकलेले. तरीही काहीतरी बोलायचं म्हणून घरी कोणकोण असतं असा एक खरंतर मंद प्रश्न त्याला विचारला आमच्या बाबांनी. त्यानं सांगितलं. तो, त्याची आई, भाऊ, वहिनी. जिथून हे स्थळ समजलं होतं त्यांनी त्या मुलाला बहीण आहे हे ही सांगितलं होतं. मग बाबांनी तसं विचारलं तर त्याने तो विषय टाळला. बहीण आहे हा विषय तो मुलगा टाळत होता. लपवत होता. त्याची बहीण घरातच होती तिथं. बहुतेक ती आजारी असावी. पण ती बाथरूमच्या दारातून डोकावून बघत होती आम्ही तिथे असेपर्यंत हे चाणाक्ष नजरेनी हेरलं होतं आमच्या सगळ्यांच्या. आम्हाला सगळ्यांनाच तिथून कधीएकदा बाहेर पडतोय असं झालं होतं. तिथून बाहेर पडल्यावर हुश्श झालं दाबून धरलेला श्वास घेता आला वगैरे. हे सगळं झाल्यावर त्या मुलाला मायनसमधेच मार्क होते.
१३.
बहिणीला एक स्थळ आलेलं. मुलगा पुण्यात नोकरी करणारा होता पण त्याचे आईवडील गावी रहात होते. बहीण आणि तिचे आईबाबा मुलाला आणि त्याच्या कुटुंबियांना भेटायला त्यांच्या गावी गेले. बहीण सांगत होती, ते घर ठीकठाक होतं, मुलगा बरा होता, क्लिक काही झाला नाही. मुलाची आई हे लोकं गेल्या गेल्या बहीणीला आणि तिच्या आईला सतत 'चला की सैपाक्घरात' म्हणून मागं लागली होती. ह्या दोघी आत गेल्यावर त्या बाईंनी यांच्यासमोर पुरणपोळ्याच ठेवल्या खायला. बहीण आणि तिची आई डोळे मोठे करून ऑ झाल्या. तर त्या बाई म्हणे 'आमच्यात कोणपण येणार असलं की पुरण करायला लागतंयच, ही पहीलीच खेप आहे त्याची पोरगी बघायची. म्हणून केले. खावाच बघा तुमी आता. खाल्ला नहीत तर आमचे ह्येनी ओरडतील मलाच. ते नव्हे, भायेर पुरुषमाणसास्नी पुरणपोळी घेऊन जातीस काय गं मुली? आग्रह कर. नंतर तुलाच करायचंय की सगळं' बहीण आणि तिची आई काय बोलावं, काय करावं हे न सुचून तशाच बसून राहिल्या. त्या बाईच 'भायेर' पुरणपोळ्यांचा आग्रह करायला गेल्या. बहीणीच्या बाबांना काय ते कळालं असावं, 'आम्ही निघतो, कळवतो काय ते' असं सांगून ते तिथून निघाले. नंतर पुढं कितीतरी दिवस घरी पुरणपोळी केली की त्या तिघांना तो प्रसंग आठवत असे.
१४.
एका मैत्रिणीचं लग्न ठरवत होते. ती मैत्रिण दिसायला फारच सुंदर आहे. हुशारपण आहे. उत्तम नोकरी आहे वगैरे. थोडक्यात लग्नाच्या बाजारात डिस्टिंक्शन असणारी. तिला एक स्थळ आलं. मुलगा छान होता. तिला तो, त्याला ती आवडले होते. त्यांच्या घरच्यांनाही ते एकमेक आवडले होते. सगळंच छानछान होतं. लग्न ठरत आलं होतं. अचानक मोडलं. काय झालं समजत नव्हतं. मुलाच्या बाबाला हीचे बाबा फोनवर फोन करत होते ते एकही फोन उचलत नव्हते. सगळ्यांना सगळे पसंत असताना अचानक असं काय झालंय हेच समजत नव्हतं. मैत्रिणसुद्धा त्या मुलाला फोन करत होती तो उचलतच नव्हता फोन. मग मैत्रिणीनं एका वेगळ्या नंबरवरून त्या मुलाला फोन केला. त्या मुलाने तो काॅल उचलला, मग त्यांच्यात जे बोलणं झालं त्यानंतर मैत्रिणीनं त्याला दोन कोल्हापूरी शिव्या हासडल्या आणि 'गेट लाॅस्ट' म्हणून टाकलं. हे लग्न मोडण्याचं कारण होतं म्हणे की त्या मैत्रिणीच्या मावशीला कोड होतं अंगावर. हे कारण समजल्यावर मैत्रिण भयंकर भडकली होती.
१५.
वरच्या मैत्रिणीच्या बाबतीत जो किस्सा घडला तसाच एका मित्राच्या बाबतीतही घडला होता. त्याला सांगून आलेली मुलगी, तिचे आई वडील, भाऊ वहिनी सगळेच डाॅक्टर होते. मुलाच्या आजोबांना कोड होतं अंगावर. केवळ या एका कारणासाठी त्या डाॅक्टर कुटुंबानी साखरपुड्याच्या आधी एका डीनरला सगळे भेटल्यानंतर लग्न मोडलं. अंगावर कोड असणं, श्वेतकुष्ठ असणं किंवा अल्बिनिझम हा कुठलाही आजार, रोग नाही हे डाॅक्टरलोकं सुद्धा समजून घेऊ शकत नाहीत ते ही आजच्या काळात ह्यासारखं वैचारिक दुर्भिक्ष्याचं दुसरं लक्षण काय असेल!
~ अवंती
प्रतिक्रिया
१४/१५ कठीण आहे.
१४/१५ कठीण आहे.
बाकी गोष्टी मस्त लिहिल्यात!
->पापु काय प्रकार आहे ते थोडा विचार केल्यावर कळलं.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
(No subject)
पापु
पापु म्हणजे काय, हे विचार करुनही नाही कळलं. शेवटी, पापु म्हणजे 'पारण पुळ्या', अशी मनाची समजूत करुन घेतली.
पापु = पाणीपुरी.
पापु = पाणीपुरी.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
नाही, पण...
...'पारण पुळ्या'च जास्त छान वाटतो. सबब, आपले मत 'पारण पुळ्या'लाच.
एवढे सगळे
एवढे सगळे नगं तुमच्याच राशीला ? बादवे तुमची रास कंची ? एकाच जीवनात एवढे सगळे अनुभव म्हणजे क्काय ? जबरदस्तच !!
आयला!
'अभिमानश्री' नावाचा असा काही एरिया पुण्यात आहे???
पुण्यात लहानाचा मोठा झालो, आणि अर्धे आयुष्य पुण्यात काढले, पण आज हे नाव पहिल्यांदाच ऐकतोय. (फॉर्द्याट्म्याटर 'हिंजवडी' हे नावदेखील पुण्यात असताना कधी ऐकले नव्हते, तेव्हा असो चालायचेच.)
म्हणून आख्खा एरिया पोपट???
ऐसे कितके हो कितके पापुवाले पालथे घातलेत सकाळनगरातले?
सकाळनगरातल्या कुठल्यातरी कोपऱ्यातल्या कोण्या एका पापुवाल्याकडची पापु घाणेरडी होती, हा आख्खे सकाळनगर पोपट ठरविण्यासाठी जर क्रायटेरियॉन ठरत असेल, तर गंमत आहे.
बादवे सकाळनगरात एकदाच गेलो होतो, १९८०च्या दशकाच्या उत्तरार्धात कधीतरी. तेव्हा नुकत्याच पुण्याला (आणि सकाळनगरात) शिफ्ट झालेल्या एका (आता दिवंगत) मित्राला भेटायला. (त्यापूर्वी कधी 'सकाळनगर' हेही नाव ऐकले नव्हते, पण असो तेही चालायचेच.) तेव्हा मला काही तो एरिया पोपटबिपट वाटला नाही ब्वॉ.
(तुम्ही जर १७६० साली खाल्लेल्या एका सपोज़ेडली घाणेरड्या पापुवरून तो आख्खा एरिया पोपट ठरवू शकता, तर मग मी १९८६ किंवा देअरअबौट्समध्ये तिथे एका मित्राला भेटायला गेलो होतो तेव्हा मला पोपट वाटला नाही एवढ्या आधारावर तो एरिया पृथ्वीवरील नंदनवन - किंवा पृथ्वीवरील स्वर्ग, आ ला ग़र फ़िर्दौस बर्-रू-ए-ज़मीं अस्त फेम, टेक युअर पिक - का ठरवू नये? मग भले असो वा नसो!)
आय मीन, काय पण निकष आहे!
:प
तुमची पुणेरी अस्मिता सकाळनगरची का काय!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नाय ब्वॉ!
आधी म्हटल्याप्रमाणे, उभ्या आयुष्यात सकाळनगरास एकदाच गेलोय. सबब, अस्मितेचा सवाल नाही. फक्त, ('पालींची बदनामी थांबवा!!!!!!'च्या धर्तीवर) 'सकाळनगराची बदनामी थांबवा!!!!!!' एवढेच म्हणणे (झालेच तर माफक आग्रह) आहे, इतकेच.
का थांबवा?
आमचे एक अमेरिकास्थित जालमित्रवर्य म्हणतात की भारतात (म्हणजे कोथरुडात) चांगली सोय असते की घराबाहेर पडलं की लगेच पाच-दहा मिनीटं चालण्याच्या अंतरात बहुतांश जीवनावश्यक गरजा भागतात. हे मित्रवर्य म०म०व० आणि मध्यमवयीन असल्यामुळे त्यांच्या जीवनावश्यक गरजा म्हणजे इडली-सांबार, गोडमिट्ट (फिल्टर) कॉफी, झेरॉक्सचं दुकान आणि रिक्षास्टँड! अशा गरजा भागवण्यासाठी अमेरिकेत फार कष्ट करावे लागतात. त्या हिशोबात, म०म०व० परंतु मध्यमवयीन नसलेल्या अवंतीसाठी पाणीपुरी जीवनावश्यक गरज असेल तर मला आश्चर्य वाटत नाही.
असा एखादा प्रसंग असेल याचा विचार करा - ऑफिसात किंवा कामाच्या ठिकाणी प्रचंड वैतागवाडी झालेली आहे, रात्रीच्या जेवणासाठी (आपणच) दोडका आणून ठेवलाय; सुदैवानं स्वयंपाकाच्या काकू आलेल्या नाहीत, पण घरी आल्यावर जेवायलाही काही नाही. तर मग पाणीपुरी चरण्याची इच्छा झाली आणि घरापासून हाकेच्या अंतरावर एकही बरा भय्या नसावा, हा किती दुर्धर प्रसंग असेल.
अर्थात, पुण्यात कुठेही बरी पाणीपुरी मिळत नाही, असा माझा तीन वर्षांचा सहा वर्षं शिळा अनुभव आहे. फक्त चांगली पाणीपुरी खाण्यासाठी, भावाबद्दल प्रेम उतू चाललंय असं दाखवत मी पुण्याहून ठाण्याला जात असे. त्यामुळे मुद्दाम सकाळनगरची बदनामी करू नये, याबद्दल सहमत. शिवाय सकाळनगरात सुंदर, हुशार आणि तीक्ष्ण विनोदबुद्धी असणारी एक मैत्रीण राहते; तिचं नाव अस्मिता नसलं तरीही तिच्याखातर मीही 'सकाळनगरची बदनामी थांबवा' या अभियानात सामील व्हायला तयार आहे.
(जमलं का नबांना टशन देणं?)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कोथरुडात पापु
कोथरुडात पापु .
आपण जी एक जीवनावश्यक गोष्टींची लिष्ट लिहिलीत त्यात दोन तीन गोष्टीं वगळल्यात . आपल्या माहिती करीत त्या देत आहे .
१. कोथरुडात उत्तम पाणीपुरी मिळते . अनेक ठिकाणी .
२. भरपूर ट्राफिक (जॅम ) दररोज मिळतात .
३. कोथरुडात चिंतातुर जंतू यांच्या सारखे उच्च्भ्रू दिग्गज ( फार दिवस त्यांच्या बाबतीत हा शब्द वापरायची मनीषा होती . .... आता मनीषा हा शब्द आलाच आहे , तर हेही सांगतो मनीषा पाणीपुरी आणि भेळ पण बरी असते ) राहत असावेत असा संशय .
४. आदूबाळ सारखी विलायतेत राहणारी मंडळी सुद्धा खास पान खायला कोथरूडच्या येतात ( कर्वेनगर हे कोथरुडातच पकडतोय मी . उगाच प्रभागाचा वाद नको )
५. शिवाय सारखी सारखी फाईन डाइन नावानी चालू होऊन काही काळातच बंद पडणारी रेस्टो पण इथेच आहेत . ( हा एक वेगळा विषय आहे )
आणि इतर अनेक
तात्पर्य : अमेरिकेत सहज न मिळणाऱ्या अनेक गोष्टी कोथरूडच्या मिळतात . म्हणून कोथरूड ची 'हि 'बदनामी थांबवा . ( इतर बऱ्याच मार्गानी ती करायला स्कोप आहे )
( मला कोथरूडचे विशेष प्रेम नाही . तरीही मुद्दा नंबर ३ आणि ४ आपण लक्षात घ्याल अशी आशा . )
कोथरूड /कर्वेनगर चे पुणे ५२ , २९ आणि ३८ हे बदलून पुणे ३० करावे अशी लोकचळवळ चालू होणारे म्हणे .
धत्
तुम्हां उच्च-मध्यमवयीन लोकांना चांगली पाणीपुरी काय ते समजत नाही. मुळात कोथरुडात पान खाण्याची गरज काय! पाणीपुरी चांगली मिळत नाही! धड जेवण नाही मिळत तर पानाची काय करणार, गादी?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
प्लेसहोल्डर.
प्लेसहोल्डर.
(काहीसे अवांतर)
एकएक किस्से वाचून आमच्या गंगारामपंतांची आठवण आली. अगदी हुबेहूब गंगारामपंतांची फीमेल आवृत्ती पाहातो आहोत की क्कॉय, असा भास झाला. शिवाय, त्रिभुवनातील कोणत्याही पुरुषाने यांच्याशी लग्न नक्की काय म्हणून करावे, असाही एक कुतूहलमिश्रित प्रश्न मनास चाटून गेला. आणि आजकाल जसजसा एकएक नवनवीन भाग येतोय, तसतसा 'कन्फेशन्स ऑफ अ सीरियल/करियर कांदेपोहिस्ट'चा नवा एपिसोड पाहातोय, असे वाटू लागले आहे.
थोडक्यात, पहिले एकदोन एपिसोड वाचताना (काहीशी voyeuristic१ का होईना, परंतु) माफक मजा आली होती. परंतु आता कंटाळा येऊ लागलेला आहे, आणि 'आता बास!'ची भावना मूळच नव्हे, तर बाळसेसुद्धा धरू लागलेली आहे.
शेवटचे, पूर्वजांपैकी कोणास कोड असण्याचे किस्से खरोखरच गांभीर्याने दखल घेण्यायोग्य आहेत, परंतु या आजूबाजूच्या frivolityमध्ये साइडलाइन होतात; दुर्लक्षित राहातात.
बाकी तुमचे चालू राहू द्या.
..........
१ Voyeurism: the sexual interest in or practice of spying on people engaged in intimate behaviors, such as undressing, sexual activity, or other actions usually considered to be of a private nature. - विकीबाबावरून.
सेपियन्स बद्दल काही बोलला.
सेपिअन्स वाचणाऱ्यांपेक्षा वपु, पुल वाचणारी लोक बरी म्हणायची तर्.
--------------------
कोड असण्याची/होण्याची शक्यता जर असेल आणि त्या कारणासाठी लग्न होण्याच्या आधी मोडले तर काही चुक केली नाही.
त्रिभुवनातील कोणत्याही
त्रिभुवनातील कोणत्याही पुरुषाने यांच्याशी लग्न नक्की काय म्हणून करावे, असाही एक कुतूहलमिश्रित प्रश्न मनास चाटून गेला.
आणि आजकाल जसजसा एकएक नवनवीन भाग येतोय, तसतसा 'कन्फेशन्स ऑफ अ सीरियल/करियर कांदेपोहिस्ट'चा नवा एपिसोड पाहातोय, असे वाटू लागले आहे.
कंटाळा येऊ लागलेला आहे, आणि 'आता बास!'ची भावना मूळच नव्हे, तर बाळसेसुद्धा धरू लागलेली आहे.
कोड असण्याची/होण्याची शक्यता जर असेल आणि त्या कारणासाठी लग्न होण्याच्या आधी मोडले तर काही चुक केली नाही.
>> या वाक्यांना +1.
===
कशाला एवढा आटापिटा करून लग्न करताय? फिनांशीअली स्वतंत्र आहात ना? नसेल तर व्हा. आणि मूल हवेच असेल तर स्पर्म डोनेशन बँकेतून इवफ करून घ्या आणि द्या आईबापाला सांभाळायला.
मला पण हे सर्व काय चालु
मला पण हे सर्व काय चालु आहे ते कळेनासे झाले आहे. कित्येक घटना तर मला खोट्या वाटल्या होत्या पण त्या खऱ्याच आहेत असे सांगितल्यावर मी वेगळ्या जगात रहाते हे माझ्या लक्षात आले. पण ह्या नवनविन घटना वाचुन त्या स्वतावर ओढवुन आणल्यासारख्या वाटत आहेत्.
कोणीतरी व्यक्ती २-३ दिवस बोलते आणि मग एकदम आठवडा महिना बोलत नाही. अश्या व्यक्तीचा आठवडा/महिन्यानंतर फोन तरी का घ्यावा? त्याला आपली किंमत नाही हे समजायला ही वर्तणुक पुरेशी नाही का?
कोणाच्याही घरी जायच्या आधी त्यांच्या घराचा पत्ता / रस्ता वगैरे न विचारता कोणी अभिमानश्री च्या इथे या म्हणले की जायचे का? बघुन ठरवुनच लग्न करताना, त्यामुलाची आणि त्याच्या घरच्यांची आर्थिक, सामाजिक, वैचारीक , कौटुंबिक बाजु न बघता एकदम पुरणपोळ्या खायला घरी धडकावेच का?
----------------------
मला कंटाळा मात्र आला नाहिये, असेच नवनविन भाग येऊ देत्. वाचायला मजा येतीय्.
अशा घटना ऐकल्या आहेत.
अशा घटना ऐकल्या आहेत. बर्यापैकी कॉमन आहेत.
पण ह्या नवनविन घटना वाचुन त्या स्वतावर ओढवुन आणल्यासारख्या वाटत आहेत्. >> याला +1. कोणाला भेटायचं हे शोर्टलिस्ट नीट केलं नाही कि असं होतं.
बघुन ठरवुनच लग्न करताना, त्यामुलाची आणि त्याच्या घरच्यांची आर्थिक, सामाजिक, वैचारीक , कौटुंबिक बाजु न बघता एकदम पुरणपोळ्या खायला घरी धडकावेच का? >> सहमत आहे.
----------------------
मला कंटाळा मात्र आला नाहिये, असेच नवनविन भाग येऊ देत्. वाचायला मजा येतीय्. >> गुड एंजॊय
कांपो
कांपोच्या सत्यकथा जर इतक्या फॅंटसीवाल्या आहेत तर काल्पनिक किती छान असतील ? सबब, संपादकांनी ' कांपो' या विषयावर एक स्पर्धा ठेवावी.
त्यातून अगणित रत्ने हाती लागतील.
तसेच, पुण्यांत, चांगली पापु का मिळत नाही, या विषयावर एक चर्चा घडवून आणावी.
चांगली पापु बहुधा गुजराती
चांगली पापु बहुधा गुजराती भागात मिळते .
नाही
नाही ठाण्यात भय्यांकडे
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ठाण्याची बदनामी थांबवा
आमच्या राम मारुती रस्त्याला 'इव्हनिंग स्पॉट'मध्ये एकदा पाणीपुरी खाऊन बघाच तुम्ही! तालेवार घरातली अळूची भाजी आणि फ्व ग्राची चव विसराल...
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मुलाच्या करिअरची चिंता करणारी
मुलाच्या करिअरची चिंता करणारी वरमायच "आता तुझ्या लग्नाचं बघ,सून आण,हल्ली माझ्याच्याने काम होत नाही" म्हटल्यावरच मुलाने लग्नाला उभे राहायचे असा प्रकार असण्यातली ही स्थळे आहेत हे नवीन मुलींच्या लक्षात यायला वेळ लागत नाही. मग लग्न झालेच तर फियास्को का काय होणारच कारण मुलाने आपली गरज ओळखलेली नसतेच.
बाकी चालू दे.
इतुकेही नसे अवांतर
पुण्याच्या पाणीपुरीबद्दलचा माझा प्रतिसाद हलवला गेला तरी तो पुन्हा इथे चोप्यपस्ते करतो.
बाकी सोडून सोडा, पुण्यात चांगली पाणीपुरी मिळत नाही असे म्हणणाऱ्यांची दया वगैरे येते.
मुळात चांगली पाणीपुरी म्हणजे काय? साधारणपणे आपल्याकडे दोन प्रकारची पाणीपुरी मिळते. एक म्हणजे रगडा प्याटिसातील रगडा घातलेली आणि दुसरी म्हणजे बटाट्याचा लगदा व मसाले इ. घातलेली. पारंपरिकरीत्या महाराष्ट्रात पहिलाच प्रकार जास्त मिळतो. पुणेमुंबैसारख्या ठिकाणी दुसरा प्रकार अलीकडे मिळू लागला आहे. हा प्रकार पुण्यात अलीकडे म्हणजे मी तरी २००११ नंतरच पाहिला. मुंबैत अगोदरपासून असेल थॅंक्स टु बिहारी टक्का.
बटाट्याचा लगदावाली पापु ही खास यूपीबिहारबंगालकडची देणगी आहे. एक लाकडी कम लोखंडी स्टॅंड, मातीचे मडके त्यात पाणी, मसाले, बटाट्याचा लगदा आणि पुरी हे सगळे लाल फडक्यात बांधलेले असते. ती पाणीपुरी जगात जबरदस्त असते असे माझे प्रामाणिक मत आहे. रगडावाली पुरी खरेतर सरसकट बंदच केली पाहिजे.
किमान हडपसर, कल्याणीनगर, वानवडी, इ. ठिकाणी बटाट्याचा लगदावाली पापु मिळतेच मिळते. अजूनही कैक ठिकाणी मिळते. अगदी तुमच्या त्या हुच्चभ्रू मगरपट्ट्यातही मिळते. ही पापु न खाता त्या रगडावाल्या पुरीला शिव्या घालणाऱ्यांनी जरा अभ्यास वाढवावा अशी या ठिकाणी या माध्यमातून नम्र विनंती करण्यात येत आहे.
बाकी, या निमित्ताने कोलकात्यातल्या पाणीपुरीवाल्याची आठवण होऊन भडभडून वगैरे आले. कॉलेज सुटल्यावर काहीबाही हादडायला त्याच्याकडे जात असे तेव्हा कधी त्याचा गाडा सुरू करायला उशीर असायचा. त्यावेळेस ते पाणी सिद्ध करताना त्याच्या टेस्टरचा रोलही निभावलेला आहे. कोलकात्यातल्या पहिल्या दिवशी ज्या पाणीपुरीवाल्याकडे पापु खाल्ली त्याच्याकडेच तिथल्या शेवटच्या दिवशीही पापु खाल्ली आणि मगच निघालो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
छान अनुभवकथन .
छान अनुभवकथन .
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
आंबट-तिखट-गोड पाणी(पुदिना
आंबट-तिखट-गोड पाणी(पुदिना काळी मिरी सेंधव ) आणि विशेष विरघळणाय्रा पुय्रा. हे महत्त्वाचे. (उकडलेले मूग,पांढरे वाटाणे,रगडा,चणे,बुंदी वगैरे एकेकाची आवड.
पाणीपुरीचा विषय निघालाच आहे
पाणीपुरीचा विषय निघालाच आहे तर पहिला नंबर गुरुकृपा सायन आणि प्रशांत कॉर्नर ठाणे यांना विभागून. बाकी नंबर दहानंतर सुरु.
गुरुकृपाजवळच राहायचो पुर्वी.
गुरुकृपाजवळच राहायचो पुर्वी. बुंदीवाली बॅटमॅनला आवडत नाही पण. छोले + समोसा खासच. काय कष्ट घ्यायचा तो सरदारजी समोशाची कणिक हाताने तिंबताना हे पाहिलय. एवढं कोणीच करणार नाही. हां , पहाडगंज दिल्लित असं पाहिलय. यास शॅार्टकट - पावाच्या बेकरीवाल्यांच्या मशिनीने होत नाही गरागरा फिरवून.
पहीला धागा बेअरेबल होता न
पहीला धागा बेअरेबल होता नंतर फार कंटाळा आला विशेषत: माणुसकी नसल्यासारखे वाटले. एखाद्या घरात "भायेर्" म्हणत असतील्ही. भाष्हा ही संवादाचं साधन नाही का? तुम्ही भले लग्न करु नका पण इतका विखार्?
चादरिला छिद्रे आहेत म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती बरी नसेलहि. नसेल बरी चादर भावी व संभाव्य वधुवर भेटिसाठिही.
____________
तुमचे अमृता प्रीतमावरचे उत्कट धागे आठवुन, असे धागे वाचताना वाईटच वाटले.
हेच म्हणणार होतो. एकंदरीत
हेच म्हणणार होतो. एकंदरीत जरा जास्तच जजमेंटल असं वाटलं.
सदैव शोधात..
एवढा बलाढ्य रावण शिवधनुष्य
एवढा बलाढ्य रावण शिवधनुष्य पेलू शकला नाही खरे वाटत नाही. अवांतर आहे परंतू शेवटी बाइला बाप्या अन बाप्याला बाइ शोधणे अवघडच असते. अर्धा एक तासाच्या निरिक्षणातून.
स्पष्टिकरण - कांदापोहे ही
स्पष्टिकरण - कांदापोहे ही लेखमाला छान कथन आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
लिखाणाची शैली खुसखुशीत आहे...
लिखाणाची शैली खुसखुशीत आहे... आता एकदा non fiction लिहीण्याचा प्रयत्न करा... कि़ंवा या स्थळांची दुसरी बाजू??
असेहि कांदेपोहे - ५ वे.
येथे पहा.
भयंकर पकाऊ आणि दवणीय!!
भयंकर पकाऊ आणि दवणीय!!
नकार
प्रसंग १६: लेखमालेला आमचा पण जरा हातभार.
काका, आम्ही हे स्थळ रिजेक्ट केले आहे. (मुलीच्या डाव्या हातावर गोंदवलेले दिसले नाही का तुम्हाला. ००:३८ आणि ९:०७ बघा.)?
पुण्यात एका मुलाला भेटायचं
असं करण्यापेक्षा काही काळ आधी फोनवर बोलून / चॅटिंग करून दुसऱ्या बाजूचा "अंदाज" घेतला असता तर बरे झाले असते.
अवांतर - "अभिमानश्री" हे काय नाव आहे का अपार्टमेन्टला द्यायचं! काहीही करत असतात पुणेरी लोक..
हृदयंगम पेक्षा बराय
हृदयंगम पेक्षा बराय.
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
'हृदयमर्दम' म्हणायच का?
'हृदयमर्दम' म्हणायच का? मुंबईपुणेमुंबई फेम..
युप
तेच तेच
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
किंचित दुरुस्ती
>>"अभिमानश्री" हे काय नाव आहे का अपार्टमेन्टला द्यायचं!
अभिमनश्री अपार्टमेंट्स नाहीयेत. प्रामुख्याने बंगल्यांची कॉलनी आहे. त्याला अभिमानश्री सोसायटी म्हणतात
पुण्यातल्या इतर बऱ्यापैकी प्रसिद्ध सोसायट्यांची नावंही अशीच प्रथमदर्शनी विचित्र वाटतात, उदा. सिंध सोसायटी, महात्मा सोसायटी, रक्षक सोसायटी... कोथ्रुडातील एका सोसायटीचं नाव तर 'गणंजय' सोसायटी आहे.
एका सोसायटीचं नाव 'रक्षालेखा'
एका सोसायटीचं नाव 'रक्षालेखा' आहे. ते वाचून रक्षालेखा म्हणजे रणचंडी, आर्यादुर्गा वगैरे काहीतरी हेवीड्युटी प्रकार असावा असं वाटलं होतं. नंतर समजलं की ते 'डिफेन्स अकौंट्स'चं आर्यीकरण आहे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
महात्मा सोसायटी, रक्षक
ह्या नावांमधे विचित्र काय आहे?
>>ह्या नावांमधे विचित्र काय
>>ह्या नावांमधे विचित्र काय आहे?
पहिल्यांदा ऐकताना ही नावं संदर्भ सोडून आल्यासारखी वाटतात. आजकाल 'ग्रीन लाइफ', 'लाइफ रिपब्लिक', 'लाइफ फलाणा ढिमका' वगैरे नावं असलेल्या सोसायट्यांना जमान्यात ते विचित्र वाटू शकतं.
सनबीम संगीत
नावांच्या वैचित्र्याबद्दल म्हणत असाल तर बोरिवली (पश्चिम) भागात हे एक प्रात:दवणीय नाव आहे:
https://www.google.com/maps/place/Sunbeam+Sangeet+CHS,+Holy+Cross+Rd,+D-...@19.2507271,72.8514444,15z/data=!4m5!3m4!1s0x0:0xb6a121f849f57079!8m2!3d19.2507271!4d72.8514444
आणि या सोसायटीतल्या
आणि या नावाच्या सोसायटीतल्या मुलाना जायला साजेशा नावाची शाळा पण आहे जवळच - Vibgyor High !
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
प्रात:दवणीय
लय हसलो यावर.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
गणंजय' सोसायटी आहे.
लोल!! गांजलेल्या माणसांची सोसायटी आहे का काय असे वाटते!
रक्षक चॉक पण आहे की!
रक्षक चॉक पण आहे की!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
विचित्र नावं?
विचित्र नावं?
ठाण्यात या एकदा.
राबोडी, खोपट, तीन हात नाका, मासुंदा, उथळसर, चितळसर, पोखरण, कावेसर, वाघबीळ, चेंदणी, कोपरी, येऊर, वडवली, ओवळे, गायमुख, टेंभीनाका, जांभळीनाका, चरई.
...इ इ इ...
आणखी वीस एक वर्षांनी
ही सर्व मूळ अस्सल देशी आणि कित्येकदा त्या जागेची भौगोलिक वैशिष्ट्ये दाखवणारी नावे लुप्त होऊन त्या ऐवजी जयंतिभाई गाला चौक, निर्मलाबेन छेडा लेन वगैरे नावे नक्कीच येतील. 'सर' हा शब्द सरोवर किंवा पाण्याचा साठा दाखवतो. पोखरण म्हणजे अर्थात पुष्करिणी. एके काळी ठाणे हे तलावांचे शहर होते. राबोडी म्हणजे पाणथळ रबरबाटी जागा. जुन्या ठाणे जिल्ह्यात अनेक राबोड्या आहेत. तीन हात नाका हे मला वाटते अलीकडले नाव आहे. नवीन आग्रा रोड झाल्यानंतरचे. (चूभूद्याघ्या.) ठाण्याच्या पश्चिमेचा घोडबंदर-बोरिवली-अंधेरीपर्यंतचा भाग हा चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत डोंगराळ आणि दाट रानाचा भाग होता. त्यामुळे वाघबीळ हे नाव खरेच वाघाचे अस्तित्व दाखवणारे असू शकते. गायमुख येथे खरेच गोमुख होते. हा अजूनही अत्यंत निसर्गरम्य भाग आहे. बाकी थेऊर, पणदरे, माढे, जावळी, नेवळे, ओतूर, पिंपळे (निलंग/निलख, सौदागर वगैरे), घोरपडी, फुरसुंगी, भांबुर्डे या सगळ्यांपुढे बिचारे ठाणे शर्यतीतच नाही.
साडेसतरा नळी, पंतांचा गोट आणि
साडेसतरा नळी, पंतांचा गोट आणि छिनाल
मारुतीबालाजी पण!********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
हो ना.
मोदी, माती, ढोल्या, भिकारदास, पासोड्या, सोट्या, खुन्या वगैरे पण.
ते जाऊ दे. कवठे महाकाळ आणि वेताळ बांबार्डे?
छिनाल मारुती पुण्यात आहे??
छिनाल मारुती पुण्यात आहे?? ऐकलं नाही कधी.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
छिनाल मारुती नव्हे - छिनाल
छिनाल मारुती नव्हे - छिनाल बालाजी. आता नाव बदललंय म्हणतात.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
आईशप्पथ
छिनाल बालाजी.... कहर आहे. ठेवतं कोण असली नाव??
- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |
विचित्र नावं?
पुण्याची बदनामी थांबवा.
जुनी आगरी गावांची नावं ती.
जुनी आगरी गावांची नावं ती. सोसायट्यांची नव्हे.
पुण्यातल्या
पुण्यातल्या मारुतींची नांवे नवीन सोसायट्यांना ठेवावी. किंवा 'खुन्या मुरलीधर सोसायटी' असे काहीसे नांव ठेवावे.
खुन्या मुरलीधर
तिथे होणाऱ्या सोसायटीचं नाव '९ सदाशिव' की कायससं असणारे म्हणे...
कारण ९ जुन्या वाड्यांची
कारण ९ जुन्या वाड्यांची/प्रॉपर्टीज ची एक सोसायटी बनणार आहे म्हणे
दहा वाडे असते तर १० रावण
दहा वाडे असते तर १० रावण असे नाव द्यायला पाहिजे होते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तो प्रोजेक्ट अजूनही लटक
तो प्रोजेक्ट अजूनही लटकलेलाच आहे. सदाशिव पेठेतले त्या इमारतींच्या आसपासचे रस्ते अतिक्रमणं जमेस धरून जेमतेम ३० फूट रुंदीचेही नाहीत. आणि हे जे कोणी बिल्डर आहेत ते तिथे तीन का चार १४ मजली टॉवर उभे करायला निघाले आहेत, अगदी प्रत्येक फ्लॅटमागे दोन कार पार्किंग सहित! आहे की नाही मज्जा?
९ - नव सदाशिव असेल
९ - नव सदाशिव असेल
लेखिकेची
लग्न जमवण्याची धडपड करुण आहे.
पहिल्या आवडलेल्या भागावरुन इथपर्यंत वाचल्यावर लेखिकेने रंगवलेल्या नगां पेक्षा नकळत लेखिकेने ती स्वत ही एक भारी नग च आहे हे दाखवून दिलेले आहे. या विरोधी पार्टींची बाजु काय असावी ? जबर चावट उत्सुकता आहे . सर्व माहीत आहे इतका अनुभव तरीही पुन्हा नव्या चिवट उत्साहाने नवा गडी बघूया हो तला जोम हेवा वाटांवा असाच आहे त्याहून कौतुक म्हंजे पुन्हा सगळे अनुभव चोख लिहून बिहुन काढणे म्हणजे उदा. थोर वगैरे सवड आवड सर्वच थोर हो
और देखो
और दीखाओ
अजुन येऊ द्या
बहीण अपंग आहे हे मुलाला
बहीण अपंग आहे हे मुलाला नाकारण्यात महत्वाचं कारण असणं आणि नात्यात पांढरे कोड असल्यावरून नाकारले गेल्याचा सात्विक संताप वाटणं यात अंमळ विरोधाभास जाणवला.
Liberalism is a mental disorder
पर्फेक्ट.. आता ह्या
पर्फेक्ट.. आता ह्या लेखामुळे मागच्या लेखातील अनेक विरोधाभास कळायला लागले. जिद्न्यासूंनी मागचे लेख चाळावेत..
चालकांना प्रश्न: 'द्न्य' कसं लिहायचं?
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
टंकन साहाय्य
इथे पाहा. कोणत्याही पानावर 'आवागमन' असं उजवीकडे लिहिलेलं दिसेल. तिथेच ह्या पानाचा दुवा आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
आभारी आहे..
आभारी आहे..
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
त्रास कसला?
खालच्या वाक्याचा मला समजलेला अर्थ वेगळा आहे. बहिणीचं अस्तित्व नव्हे, तर ते लपवण्याचा मुलाचा प्रयत्न त्रासदायक होता.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||