सरकार ३- अपेक्षाभंग!
प्रदर्शित होऊन इतके महिने लोटल्यानंतर ह्या चित्रपटाची समीक्षा का लिहावीशी वाटली ह्याचं उत्तर म्हणजे अपेक्षाभंग.
बॉलीवूडात नासक्या चित्रपटांचीही एक मांदियाळी आहे, जिला 'बी'ग्रेड असंही एक नाव आहे. अमिताभ बच्चन, मनोज बाजपेयीं, सुप्रिया पाठक सारखे गुणी कलाकार, आणि रोहिणी हट्टंगडी वगैरेही चित्रपटात असताना, राम गोपाल वर्माचं दिग्दर्शन असताना सरकार ३. चक्क 'बी ग्रेड चित्रपटांमध्ये जातो.
चित्रपट सुरू होतो. नेहमीप्रमाणे एक उद्योजक सुभाष नागरेकडे येतो. धारावीतल्या एका प्रकल्पाची जागा रिकामी करण्यासाठी सरकारला लाच देऊ करतो. सुभाष 'सरकार' नागरे नेहमीप्रमाणे चहा फुरकत फुरकत, सप्तपाताळातल्या खर्जात त्याला नाही म्हणतो. नेहमीप्रमाणे घासून गुळगुळीत झालेली लाईन "और तुम्हें भी नहीं करने दूंगा" फेकतो. नेहमीप्रमाणे उद्योजक चिडतो. इथे वल्ल्याची एंट्री होते. हा माणूस उगीच पिकलेली दाढी खाजवणं, फोनवर उगीच संभाषण करणं, अती पुनरुत्पादक दिसणाऱ्या आपल्या बायकोचा उगीच अपमान करणं इतकीच कामं करतो. सरकारचा राजकीय विरोधक देशपांडे मनोज बाजपेयी ह्याची आणि ह्या दोघांची मैत्री जमते. मनोज बाजपेयीच्या अभिनयाला मात्र तोड नाही. टिपीकल मंचीय भाषणं करणाऱ्या मराठी पुढारी त्याने सुंदर उभा केलेला आहे. त्याची लालसा, भय, तोरा उत्तम मांडलेला आहे.
आता येतो चिकू. हा बुवा, सरकारचा नातू एकाएकी २० वर्षांनी तरी मोठा दिसत असला तरी सरकारचं वय जेमतेम दहाच वर्षांनी वाढलेलं दिसतं. सरकारीण बाई ह्या अंथरुणाला खिळलेल्या दाखवल्यामुळे त्यांच्या वयाचा अंदाज नाही. हा चिकू इतकी वर्षं कुठल्या बागेत होता, आणि एकाएकी सरकारचा निष्ठावान पाईक कसा झाला हेही कळत नाही. ह्याचं आणि सरकारचा उजवा हात गोकुळ ह्याचं भांडण का असतं हेही माहित नाही. चिकूची मैत्रीण अन्नुहीही अतिडॅशिंग आणि अतिसुंदर दाखवलेली आहे. ह्या अन्नुच्या पिताश्रींची हत्या म्हणे सरकारने करवून आणलेली असते. त्यामुळे अन्नुला म्हणे सूड हवा असतो.
चिकू आणि गोकुळ ह्यांच्यात सरकारच्या गादीसाठी अर्थात चढाओढ असते. देशपांडेची हत्या होते. लगेच सरकारवरही जीवघेणा हल्ला होतो. सरकार वाचतो. हे चिकूचंच काम ह्यावर त्याची खात्री बसते. चिकू घरातून (अर्थातच, लोल) बाहेर पडतो.
नंतर काय होतं? चिकूच नासका निघतो की दुसरं काही आहे? ही अन्नु इतकी कपटी का भासते? ह्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी सरकार ३ पहायला हवा. ह्या चित्रपटाकडून बऱ्याच म्हणजे बर्ऱ्याच अपेक्षा होत्या. राम गोपाल वर्माने 'गॉडफादर' वरून स्फूर्ती घेऊन हे चित्रपट निर्माण केल्याचं प्रतिपादन एकदा केलेलं आहे. सरकार ३ म्हणजे आधीच्या दोन चित्रपटांवर उमटलेला चरा आहे.
बच्चन, श्रॉफ ह्यांचे अति अति खर्जातले संवाद बरेचदा ऐकू येत नाहीत. बच्चनरावांचं मराठी कानाला चरे पाडतं. पहिल्या भागात केके मेननला आणि सुप्रिया पाठकला मात्र तिन्ही भागात लहेजासह उत्तम मराठी बोलता आलेलं आहे. बाकी लोक उगीच मराठी घासतात. साऊंडट्रॅक आधीच्याच दोन्ही चित्रपटांचा चांगला होता. सरकार ३ चा ठीकठाक आहे. दृक् आणि श्राव्यात सुसूत्रतेचा अभाव बरेचदा जाणवतो. कथेत छिद्रं बरीच राहून गेलेली आहेत. वल्ल्याच्या संपत्तीचं आणि ष्टाईलचं प्रदर्शन, गुळगुळीत चकाचक दिसणारी पात्रं, तसंच सरकारचंही चहा पिणं, हात हलवणं इत्यादी गोष्टींवर वेळोवेळी दिलेला नसता फोकस चित्रपटाला बी ग्रेडच्या मांदियाळीत नेऊन बसवतो. सरकार १ चं यश परिस्थितीशी असलेल्या साधर्म्यावर बरंच अवलंबून होतं. सरकार ३ म्हणून फक्त एक 'चित्रपट'च राहतो. कुठल्याही चष्म्यातून 'जमिनीवरचा' वाटत नाही.
प्रतिक्रिया
पाहतोच आता! झकास परीक्षण.
पाहतोच आता! झकास परीक्षण.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
छान
परीक्षण आवडलं. परीक्षण आवडल्यामुळे सिनेमा बघावा लागणार. राम गोपाल वर्माच्या कामाविषयी माझं कधीच चांगलं मत नव्हतं!
.
इतकी तोलून मापून नावं ठेवली की सिनेमा बघावासा वाटतो. म्हणजे सिनेमाच्या नावानं एकत्र खडे फोडता येतील.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हेच सर्व पुन्हा पाहायचं? नवीन
हेच सर्व पुन्हा पाहायचं? नवीन काही सत्तेबाहेरच्या लोकांवर हवं.
छ्या:
भिकार सिनेमा आहे.
अती पुनरुत्पादक दिसणाऱ्या
महा लोल आणि रोफल
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
खरंच्चे
ज्याकी श्रॉफ तसा काही खूप भारी नट नाही, पण त्यालाही वाया घालवलाय म्हंजे बघा...
सरकार ३ म्हणजे आधीच्या दोन
गॉडफादर सेरीज पण तशीच आहे. पार्ट १ जगात भारी, पार्ट २ तितका भारी नाही, पार्ट ३ बकवास.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं