आनंदवन प्रयोगवन - पुस्तकातला काही मजकूर
'आनंदवन, प्रयोगवन' या पुस्तकातला काही मजकूर, सचिन कुंडलकरचे लेख (लेख क्र १, लेख क्र २) आवर्जून वाचणाऱ्या किंवा न वाचणाऱ्या, लेखांवर खरडफळ्यावर चर्चा करणाऱ्या आणि न करणाऱ्या सर्वांना सप्रेम.
लेखक - डॉ. विकास आमटे
शब्दांकन - गौरी कानेटकर
समकालीन प्रकाशन
पृष्ठसंख्या - १९१
किंमत - २५० रुपये
(माझ्याकडे २०१४मध्ये प्रकाशित झालेली पहिली आवृत्ती आहे.)
पान क्र. १२८
... अंध, अपंग अन् कर्णबधिरांसाठी काम केलं पाहिजे यासाठी त्यांचा जीव सतत तुटायचा. पण शाळा प्रत्यक्षात सुरू व्हायला एक वेगळीच घटना निमित्त ठरली.
घनश्याम गायधने नावाचे एक अंध संगीत शिक्षक अंधांसाठी कुठे कोणतं काम चालतं, कुठे शाळा सुरू करता येतील का, हे बघण्यासाठी विदर्भात फिरत होते. एकदा ट्रेनमधून प्रवास करत असताना वरोऱ्याच्या अलीकडे त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण झाली. त्यामुळे ही मंडळी वरोरा स्टेशनवर उतरली. तिथे स्टेशन मास्तरांनी त्यांचं औषधपाणी केलं, त्यांनी विचारपूस केली. त्यांच्या प्रवासाचं कारण लक्षात आल्यावर स्टेशनमास्तर म्हणाले, "तुम्ही आनंदवनात बाबा आमट्यांना का भेटत नाही? ते तुम्हाला नक्की मदत करू शकतील." स्टेशनमास्तरांनी गायधन्यांना आमच्याकडे आणून पोहोचवलं. आनंदवनातलं काम समजून घेतल्यावर गायधन्यांनी बाबांना आनंदवनात अंधशाळा काढण्याची विनंती केली. बाबांच्याही डोक्यात ते होतंच. ते म्हणाले, "जरूर काढू. त्यासाठी काय काय करावं लागतं ते सांगा." मग बाबा, गायधने आणि त्यांचे सहकारी यांनी बरीच धडपड करून शाळेसाठी परवानगी मिळवली आणि कामाला सुरुवात झाली. तेव्हा अख्ख्या मध्य भारतात ग्रामीण भागामध्ये फक्त अंधांसाठीची निवासी शाळा नव्हती. आमची पहिलीच शाळा!
सुरुवातीला शाळेची सगळीच जबाबदारी गायधन्यांकडे होती, पण नंतर मुकुंद वैशंपायन यांना बाबांनी अंधशाळेचं मुख्याध्यापक नेमलं. मुकुंदराव हेही कुष्ठमुक्त कार्यकर्ते. आनंदवनातल्या असंख्य कुष्ठरुग्णांप्रमाणेच त्यांचीही एक कहाणी आहे. ते मुंबईतल्या सुखवस्तू घरातले; पण कुष्ठरोग झालेला. त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर भावंडांनी त्यांचा सांभाळ करायला नकार दिला आणि ते अक्षरशः रस्त्यावर आले. कुठे जावं, काय करावं कळत नसताना त्यांनी स्वतःला बेगर्स ॲक्ट अंतर्गत अटक करवून घेतली आणि ते वडाळ्याच्या एका हॉस्पिटलमध्ये कुष्ठरुगण्यांसाठीच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये येऊन दाखल झाले. तो एक प्रकारचा तुरुंगच होता. तब्बल चौदा वर्षं ते तिथे राहिले. एकदा चिवडा गुंडाळलेल्या कागदावर त्यांनी आनंदवनाबद्दलची माहिती वाचली. लगोलग त्यांनी बाबांना 'आपल्याला आश्रय द्यावा' अशी विनंती करणारं पत्र लिहिलं. बाबांनी त्यांना उत्तर पाठवलं, "आमच्याकडे 'आश्रय' हा शब्द नाही. पण आनंदवन तुमचंच आहे. कधीही या आणि कामाला सुरुवात करा." समाजापासून पूर्ण तुटलेल्या अवस्थेत अस्तित्वहीन जिणं जगणारा माणूसच या उत्तराचं महत्त्व जाणू शकेल.
---
पान क्र १४९-१५२
१९९३ च्या सप्टेंबरमध्ये किल्लारीत विनाशकारी भूकंप झाला. ....
आमचे लोक किल्लारीत पोहोचले तेव्हा तिथे सगळा सावळा गोंधळ होता. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नव्हता. त्यामुळे सुरुवातीला आमच्या कार्यकर्त्यांचा मुक्काम उघड्यावरच होता. पण एका तहसीलदाराने आमच्या लोकांना काही तंबू पुरवले. त्यामुळे त्यांना थोडा आसरा मिळाला. पण का कुणास ठाऊक, तिथल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला ते पाहवलं नाही. भूकंपग्रस्तांसाठी परदेशातून आलेले तंबू बाबा आमट्यांच्या कुष्ठरुग्णांना कसे दिले, अशी विचारणा केली. आमच्या कार्यकर्त्यांनी मला हे कळवल्यावर मी ताबडतोब किल्लारीत दाखल झालो. तिथे बोलताना लक्षात आलं की कुष्ठमुक्त इथे आलेले लोकांना रुचलेलं नाही. इतर संस्थांचा डेरा ज्या ठिकाणी पडला होता तिथेही कुष्ठमुक्तांना घेऊन राहणं अशक्य दिसत होतं. त्यामुळे आम्ही तिथून हलण्याचा निर्णय घेतला आणि तिथून एक किलोमीटर अंतरावर जाऊन मुक्काम ठोकला. राहण्याची सोय केली आणि कामाला लागलो.
... त्या आपत्तीच्या काळातही लोकांच्या मनात असलेली कुष्ठरोगाबद्दलची भीती उफाळून वर येत होती... आम्हाला तिथून हुसकावून लावण्याचेही अनेक प्रयत्न झाले; पण आम्ही त्या सगळ्याला पुरून उरलो, टिकून राहिलो.
माझ्यासोबत तेव्हा अरुण होता. तो आणि मी तिथल्या मदतकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना भेटलो आणि आमची कल्पना सांगितली. आम्हाला एखादी जागा मिळाली तर आमची वैशिष्ट्यपूर्ण घरं आम्ही लोकांसमोर प्रत्यक्ष बांधू आणि त्यांना प्रशिक्षण देऊ, असं आम्ही त्यांना सांगितलं. अनेक खेटे मारल्यावर अखेर त्यांनी आम्हाला जागा दिली. आमच्या टीमने एकीकडे घरं बांधण्याची तयारी सुरू केली आणि दुसरीकडे आम्ही तिथल्या लोकांशी बोलायला लागलो. पण थोड्याच दिवासांत आमच्या लक्षात आलं, की भूकंपग्रस्तांना मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा इथे सुळसुळाट झाला आहे. कोणी घरं बांधून देतंय, कोणी कपडे पुरवतंय, कोणी अन्नपाण्याची सोय करतंय तर कुणी आणखी काही. मदत आली हे चांगलंच होतं; पण त्या मदतीमुळे लोकांची काम करण्याची इच्छा मारली जात होती. आम्ही भूकंपग्रस्तांशी बोलू लागलो, त्यांना आमच्या घरांचं वैशिष्ट्य समजावून सांगू लागलो. खर्च कमी, मजबुती भक्कम, नैसर्गिक वातानुकूलन, देखभाल-दुरुस्ती जवळपास नाही आणि मुख्य म्हणजे एक कुटुंब अल्पावधीत स्वतःच आपलं घर बांधू शकेल, इतकं सोपं वगैरे पटवून देऊ लागलो. आम्ही सगळं प्रशिक्षण द्यायला दिमतीला आहोत, हेही सांगून पाहिलं ; पण कुणालाही ते पटताना दिसेना.
आम्ही थोडं सबुरीने घ्यायचं ठरवलं. लोकांना पटवून देण्यावर कष्ट घेण्याऐवजी आमचं मॉडेल घर उभं करण्यावर लक्ष द्यावं असं ठरवलं. म्हटलं, एकदा घर बांधून झालं आणि लोकांनी ते प्रत्यक्ष पाहिलं की त्यांना आपल्या घराचं महत्त्व कळेल. झालंही तसंच... ... आमच्या जागेवर आम्ही दोन वेगवेगळ्या प्रकारची घरं बांधली.
...
...
...
त्यानंतर 'मराठी विज्ञान परिषदे'तर्फे प्रसिद्ध स्ट्रक्चरल इंजिनियर डॉ. सी. एम. पंडित आणि आणखी काही कार्यकर्ते किल्लारीत दाखल झाले. त्यांनी आमची घरं पाहिली. इतर तज्ज्ञांनी आमच्या घरांच्या प्रयोगाकडे दुर्लक्ष केलं होतं. आमची घरं बांधली जात होती तिथून जवळच ज्येष्ठ वास्तुविशारद लॉरी बेकर राहत होते. न्युबियन घरांच्या डिझाइनमधल्या माझ्या गुरूंपैकी ते एक होते. त्यांना भेटण्याची आणि आमचं काम दाखवण्याची माझी मनापासून इच्छा होती. तसा प्रयत्नही मी अनेकदा केला ; पण ते आले नाहीत. का ते कळलं नाही. पण डॉ. पंडित मात्र आवर्जून आमच्या साइटवर आले, त्यांनी आमची अर्धवर्तुळाकार छत असलेली घरं पाहिली आणि घर बांधून दाखवण्याचं कामही त्यामणि आम्हाला दिलं. (पुढे आणखी चार-सहा घरं बांधण्याचे तपशील) ...
पाहता पाहता या घरांची माहिती सगळीकडे पसरली. किल्लारीच्या ग्रामसभेनेही आनंदवनाची घरं हवीत, असा ठराव पास केला. त्यामुळे किल्लारीच्या आसपासच्या ग्रामपंचायतींनीही तसेच ठराव पास केले. पण त्यात एक अडचण होती. किल्लारी भागात नव्याने बांधली जाणारी घरं प्रमाणित करण्याचं काम महाराष्ट्र शासनाने आयआयटीला (रुरकी) दिलेलं होतं. आयआयटी (रुरकी)तील संबंधित तज्ज्ञांनी आम्हाला कोणत्याही आयआयटीत 'शेक टेबल'वर, म्हणजे एका मोठ्या हलत्या प्लेटवर घर बांधून त्याची भूकंपरोधकता सिद्ध करण्याची अट घातली. आमची घरं भूकंपविरोधी आहेत याबद्दल मला पूर्ण खात्री होती. पण मी पडलो डॉक्टर. तिथल्या शास्त्रज्ञांसमोर मी हे सिद्ध कसं करून दाखवणार? शिवाय हे घर बांधण्यासाठी शंभर कुष्ठरोगी घेऊन तिकडे कसं जाणार आणि कुठे राहणार? या प्रश्नांची उत्तरं ना त्यांच्याकडे होती ना माझ्याकडे. किल्लारी परिसरातल्या गावकऱ्यांना आमचीच घरं हवी होती. पण या अशक्य अटीमुळे ते काम पुढे जाऊ शकलं नाही. त्यामुळे आम्ही आनंदवनात परत आलो.
.
.
.
आज किल्लारी व परिसरात शासकीय आणि खाजगी संस्थांनी बांधलेल्या बहुतेक घरांना क्रॅक्स गेले आहेत, पण आम्ही तेव्हा बांधलेली घरं मात्र अजूनही भरभक्कम उभी आहेत.
----
(मला हे पुस्तक भेट म्हणून देणाऱ्या मित्राचे ऋण मी मानते. त्यानं ते मान्य करावं.)
प्रतिक्रिया
ते खूप समाजसेवा करतात.
ते खूप समाजसेवा करतात. पुस्तकातून,लेखातून आणि टिव्हीवरच्या मुलाखती झाल्या आहेत. त्यांचं नाव रस्त्यांना द्यायला हवं इतर शहरातल्या.
माहितीपर
माहितीपर धागा म्हणुन छाने. ("अमुक पुस्तकात अमुक मजकूर आहे" असं सांगणारा धागा.) पण हे निव्वळ तितकच नसावं. काहितरी मिश्किलपणा असावा, काहितरी सुचवायचय, मुद्दाम व्यंगचित्रासारखी काहितरी टिप्पणी करायचीये, असं वाटलं.
पण ती टिप्पणी कोणती, मिश्किलपणे बोलण्यासारखा मसाला कोणताय धाग्यात, ते मात्र समजलं नाही.
.
ता.क.--
इथेच खालच्या प्रतिसादात तपशील दिल्याबद्दल अदितिचे आभार. मैश्किल्य आता जाणवतय
आमटे कुटुंबियांची महती आणि
आमटे कुटुंबियांची महती आणि पुण्य एवढे आहे की , मनोबा तुला यात किती कितीही व्यंग चित्र किंवा मिश्किली दिसली तरी त्याने फरक पडणार नाही .
एखादे संत चरित्र लिहिल्याप्रमाणे जरी या लिखाणाची भाषा असली तरीही बाबा आमटेजींच्या प्रखर समाजसेवेमुळे अध्यात्मिक संतांच्या पेक्षा हे थोर समाज संत जास्त जनतेच्या हृदयात कायम घर करून बसले आहेत हे निर्विवाद .
धन्य ती विदरभु ,
जिथे राष्ट्र पिता गांधीजींनी आश्रम स्थापला , राष्ट्र संत प पु विनोबाजींनी मौन पाळले , त्याच पवित्र भूमीत बाबा आमटेजीनी हा समाज कार्ययद्न्य मांडला .
विदरभू!
विदरभू हा शब्द आवडलाय. मनोबा, तुला सवडीनं लिहिते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
गाडगे महाराज चौक,रस्ते आहेत
गाडगे महाराज चौक,रस्ते आहेत तसे बाबा आमटे रस्ते असले पाहिजेत यात सरळपणेच लिहिलं आहे. जैन लोक त्यांच्या मुनिंची नावे स्थानिक रस्त्यांना देत असतातच.
मनोबासाठी नवनीत.
पहिला भाग -
अंधशाळेसाठी विदर्भात भटकत होते गायधने आणि त्यांचे सहकारी. गायधने स्वतः अंध, म्हणजे अंधांना काय समस्या येतात याचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव. शाळा सुरू करण्यात त्यांचाही सहभाग. मग पुढे बाबा आमटेंनी ज्यांना आजन्म उपकृत केलं आहे, अशा माणसाला शाळेचं मुख्याध्यापक का नेमलं? गायधनेंचं पुढे काय झालं? शाळेचं पुढे काय झालं?
शाळेचं पुढे काय झालं, हा प्रश्न विशेषतः महत्त्वाचा कारण त्यात अनेकांचा प्रश्न येतो. एवढंच नाही, 'मॅझी घॅरं नॅही बँधू दिली' म्हणून पुढे जी रडारड होते त्यात 'आमची घरं कश्शी छान' अशी "मिरवणूक" आहेच.
दुसरा भाग -
कुष्ठमुक्त किल्लारी परिसरात मदतीला आल्याचं स्थानिकांना आवडलं नव्हतं. मग त्यांच्यावर आपली मदत लादावी का त्यांचं मतपरिवर्तन करावं? तेव्हा गावकरी मतपरिवर्तनाच्या मनस्थितीत नसतीलही, त्यामुळे तो पर्याय बाद. पण मदत करणाऱ्या इतर संस्थांबद्दल कुजकट कशाला बोलावं! काय वाट्टेल झालं तरी मदत करूनच सोडणार, हा पवित्रा कशासाठी? ही एक बाब.
पुढे, ज्येष्ठ वास्तुविशारद लॉरी बेकर गुरूस्थानी असल्याचं म्हणून, त्यांच्याबद्दल उगाच पुडी सोडून देणं... 'का भेटले नाहीत कोण जाणे', कशाला! त्याऐवजी, जरा मनाचा मोठेपणा दाखवून 'पण आमची भेट होऊ शकली नाही', असं म्हणता आलं असतं.
आपण डॉक्टर आहोत इंजिनियर नाही, हे माहीत असताना घरं बांधण्याचा प्रयत्न करणं गोड आहे. पण इतर इंजिनियरांनी त्यांच्यावर विश्वास का ठेवायचा? "आमची घरं भूकंपविरोधी आहेत याबद्दल मला पूर्ण खात्री होती", असं बाबा आमटेंचा मुलगा म्हणतो म्हणून मान्य करायचं का? स्वतः विज्ञान - डॉक्टरकी शिकून, वैज्ञानिक मनोवृत्ती कशी येत नाही यांच्याकडे! गावकऱ्यांना आमची घरं हवी होती, असं म्हणण्यासाठी हे काय एसेमेसचा जोगवा मागत घरं बांधणारेत का?
शेवटी पुन्हा, 'त्यांची घरं कशी वाईट आणि आमचीच कशी चांगली' वगैरे प्रकार का? आपली रेघ मोठी दाखवण्यासाठी दुसऱ्यांची लहान दाखवण्याची गरज आहे का? ते करायलाही ना नाही; पण मग त्याला काही पुरावा, सांख्यिकी, आणि आमची घरं चांगली का याचं काही विश्लेषण वगैरे प्रकार नाही.
एकंदर सगळा प्रकार विकास आमटेंच्या मनाजोगता झाला नाही. कोणी त्यांना 'चान-चान' म्हटलं नाही, म्हणून लोकांना दुगाण्या झाडणं यापलीकडे दिसत नाही. गावकरी, फॅन्सी तंबूवरून बोलणारे सरकारी अधिकारी, लॉरी बेकर, मग आयायटीतले इंजिनियर ... 'गरीब बिचाऱ्या विकासला। सगळे टपले छळण्याला॥'
मी पुस्तक वाचून काही काळ लोटला. पण एकाही ठिकाणी 'या बाबतीत आमची चूकच झाली' असं काही म्हटल्याचं आठवत नाही. मनासारखं झालं नाही की चुका इतरांच्या आणि हे पीडीत, उपेक्षित किंवा 'जितम् मया' मोडमध्ये. किंवा कुठे 'त्या प्रसंगातून बरंच काही शिकता आलं', अशासारखं अंतर्मुख होणंही नाही. सगळा बटबटीत प्रकार.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
+१/२
+१/२
याचीच वाट बघत होतो
तुंम्ही काहीतरी वेगळं बोलणार, हा अंदाज होताच.
दर रविवारच्या लोकसत्तात अामटेंचे लेख येतात. मी ते वाचले नाहीत. कुंडलकर अाणि भारदेंचे वाचतो. मागच्या एक दोन वर्षात मला अनेक मित्रांकडून अानंदवनला अार्थिक मदत करा असे अावाहन करणार्या इमेल्स अाल्या होत्या. मला वाटायचं संस्था एवढी प्रसिध्द, वाढलेली अाहे, अजून किती वाढवायची? जशी एखादी कार्पोरेट कंपनी मार्केटींग करते, तसं मार्केटींग का? उलट त्यांच्या कामाचा प्रभाव म्हणून संस्थेचा अाकार, तिथे अाश्रय घेणारे कमी व्हायला हवे होते. अशा संस्था खूप वाढतात का?
सुरूवातीच्या दिवसांत बाबांबरोबर काम करणारे मुकुंद दीक्षित एक दोनदा भेटले होते, ते बाबांबाबत चांगलंच बोलले. तसेच बायको प्रत्यक्ष अानंदवनात जाऊन अालेली अाहे, तिच्या मनात मात्र या कामाबाबत खूप अादराचीच भावना अाहे.
काहीशी सहमती
आमटेंचे लेख मी वाचलेले नाहीत.
शहरी, मध्यमवर्गीय भागांत जशी सुस्थिती आलेली आहे तशी महाराष्ट्रात आणि भारतात सगळीकडेच आलेली आहे असं नाही. सामाजिक कार्याची गरज आजही आहे, हे मला मान्य आहे. समाज कुष्ठमुक्त झाला तरीही सगळ्या अडचणी सुटल्यात असंही नाही. तळागाळातल्या लोकांसाठी काम करण्याची गरज आहेच.
पण यांचा जो प्रथमपुरुषी-मी-वचनीपणा* चालतो, त्याबद्दल मला आक्षेप आहे. शिवाय, स्थानिकांमध्ये नेतृत्वगुण रुजवण्याबद्दलही पुस्तकात चकार अक्षर नाही. (मागे मी 'राईट टू पी' या आंदोलनाबद्दल लिहिलं होतं; त्याला उत्तेजन देणारी संस्था 'कोरो' तळागाळातून नेतृत्व पुढे यावं यासाठी प्रयत्न करते.) 'तुम्हाला मदतीची गरज होती; थोडी केली आणि आता तुम्ही देणाऱ्यांचे हात घ्या', असा सूर कुठेच दिसत नाही. त्यामुळे तसा हेतू मनात असल्याचंही जाणवत नाही. कुंडलकर म्हणतो तसं, मध्यमवर्गीयांच्या अपराधगंडाच्या भांडवलावर स्वतःची देवळं बनवणं सुरू आहे; अशी शंका हे पुस्तक वाचून फारच येते. (विकास आमटेंबद्दल काही परिचितांचे व्यक्तिगत अनुभव असेच आहेत.)
त्यावर मला आश्चर्य वाटतं ते म्हणजे मराठी मध्यमवर्गाला हे पुस्तक बेस्टसेलर बनवावंसं वाटतं! खरं तर, आश्चर्य वाटू नये. कुंडलकर त्याला मध्यमवर्गीयांचा अपराधगंड म्हणतोय.
*शब्दाचं श्रेय - उसंत सखू.
या प्रकाराचा विरोधाभास म्हणून आता पुन्हा मी माझ्या लाडक्या 'न्यू यॉर्कर'मधल्या लेखाचा दुवा डकवणार आहे. लेख तसा मोठा आहे, वाचायला २०-३० मिनीटं लागू शकतात. नफ्यासाठी सामाजिक कार्य असाही प्रकार अस्तित्वात आहे; तो सध्या बाल्यावस्थेत असेलही, पण यशस्वी होताना दिसत आहे, याबद्दल या लेखात लिहिलेलं आहे. स्वतः स्वतःबद्दल लिहवून घेतलेलं पुस्तक आणि त्रयस्थ पत्रकारानं लिहिलेला लेख, अशीही तुलना त्यातून करता येईल. अमेरिकेत राहणारे उद्योजक आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट लोक आफ्रिकेत सौर ऊर्जा-पॅनल्स लोकांना विकून त्यांचं आयुष्यमान सुधारत आहेत आणि नफाही कमावत आहेत; त्याचे तपशील आणि काहीसं विश्लेषण असलेला हा लेख -
The Race to Solar-Power Africa
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आवडला,
आवडला,
सूर, भावना आणि प्रतिसाद
सहमत
प्रतिसादाशी सहमत. एकच सर्वव्यापी, कुटुंबाच्या ताब्यातली संस्था मोठी, मोठी, अजून मोठी न करता, अनेक अशा संस्था उभ्या राहिल्या असत्या तर बरे झाले असते. जसे मी विपश्यना केंद्रांबाबत पाहिले. कोणतेही प्रस्थ नाही, एकाच व्यक्तीचे अवडंबर नाही, इतकेच काय देणगी केवळ जे लोक त्यांचा कोर्स करतील त्यांच्याकडूनच स्विकारली जाते. मी ७-८ वर्षांपूर्वी त्यांचा कोर्स केला, पण देणगी वा संस्थेचे काम करण्यासाठी कसलाच संपर्क नाही. भारतात अाणि परदेशात, बरीच केंद्रे अापअापली सुरू अाहेत, न की एकच महाप्रचंड केंद्र अाहे.
अनेक मोठ्या संस्था, व्यक्ती जिवंतपणीच दंतकथा बनून जातात व त्यांच्याविषयी बहुसंख्य लोक भक्तीभाव ठेऊ लागतात. हे भारतीय लोक फारच करतात. उदा. नारायणमूर्ती, टाटा उद्योगसमूह इ. त्या मुळे तशी प्रतिक्रिया न देणारे अल्पसंख्य अाहेत. नंतर कुठेतरी काहीतरी बारीकसारीक कानावर अालं, तरी समाज दुर्लक्ष करतो. अापल्याला मात्र श्रध्दाळूंची देवळं बघायला मजा येते.
अनेक मोठ्या संस्था, व्यक्ती
अनेक मोठ्या संस्था, व्यक्ती जिवंतपणीच दंतकथा बनून जातात व त्यांच्याविषयी बहुसंख्य लोक भक्तीभाव ठेऊ लागतात. हे भारतीय लोक फारच करतात
अगदी सहमत ... हा प्रकार भारतात तरी सर्वत्रच दिसतो अगदी लहान कुटुंबापासून ते मोठ्या संस्थांपर्यंत.
तुम्ही मूर्ती आणि टाटांचे नाव घेतले ...पण त्यांच्यापैकी कुणीही स्वत: भोवती आरती ओवाळून घेत असलेले अथवा कुठल्या पुरस्काराच्या रांगेत उभे राहीलेले पाहिले अथवा ऐकले नाहीये.
श्री बाबा आमटे यांचे कार्य थोरच आहे यात दुमत असायचे कारण नाही.
व्यक्तीपुजा करणारे, करवून घेणारे आणि करण्याची जबरदस्ती करणारे लोक मात्र उबग आणतात.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
( गरीब बिचार्या ) आफ्रिकेत
( गरीब बिचार्या ) आफ्रिकेत 'एड 'देणाऱ्या संस्था , त्यांचं जाळं वगैरे या बाबतीत उल्लेख केलात हे फार बरे झाले. वेगवेगळ्या ठिकाणच्या वाचनातून असं दिसतं कि आफ्रिकेतील एड हा एक मोठा सर्वव्यापी व्यवसाय असावा . त्याचा आणि आफ्रिकेच्या भल्याचा फार संबंध आहेच असं काही नाही . या एकंदरीत प्रकारावर मोठी पुस्तके पण आहेत . पण अगदी ती पुस्तकं सोडली तरी पॉल थरो च्या "डार्क स्टार सफारी "मध्ये या व्यवस्थेबद्दल रोचक माहिती आहे . त्यात हे आता सोलर अजून नवीन एडिशन दिसतंय .
अर्थात आमटे आश्रमात त्यापेक्षा बरंच ग्राउंड लेवल च काम पूर्वी तरी झालं असावं . पण भक्तिभाव व्यवस्था आता योग्य पद्धतींनी चालू असावी असं दिसतं .
( जन्तेला भाबड्या भक्तिभावाची मानसिक गरज असावी ,. अगदी श्री श्री किंवा अनिरुद्ध बापू इथे हि भक्ती अर्पिण्यापेक्षा हिकडं तो भक्तिभाव कमी वाईट म्हणावा अजून तरी )
यातीलच एक नक्की माहिती असणारी रोचक कहाणी म्हणजे बॉब Geldoff नावाच्या १९८० च्या दशकातल्या फेडींग पॉप स्टार नी इथिओपिया मधील दुष्काळाची BBC डॉक्युमेंटरी बघून त्यांच्याकरता इतर काही कलाकारांना बरोबर घेऊन "डु दे नो इट्स ख्रिसमस टाइम "नावाची रेकॉर्ड काढली . त्याच्या विक्रीतून जमलेले कायसेसे मिलियन पौंड वापरून बऱ्याच गोष्टी इथिओपियात पाठवल्या . तो तिथे गेल्यावर असं लक्षात आलं कि तिथल्या हुकूमशाहशी संबंधित ट्रान्सपोर्ट कार्टेल नि पैशे भेटत नाहीत म्हणून पोर्ट वरून ते सामान हलवलंच नाही . उद्विग्न अवस्थेत पेटून त्यांनी मामला पुढे नेण्यासाठी १३ एप्रिल १९८४ साली वेम्ब्ले आणि केनेडी स्टेडियम , फिलाडेल्फिया मध्ये एकाच वेळी "लाईव्ह एड* "नावाची कॉन्सर्ट केली ,जगभर त्याचं लाईव्ह प्रसारण केलं(अगदी दूरदर्शन वर पण बघितली होती ती ) अनेक रॉक स्टार्स ना अक्षरशः धक्क्याला लावून तिथे गायला लावलं .
प्रचंड पैशे जमवले ( १५० मिलियन च्या वर ) आणि मग त्याचा वापर करून दुष्काळग्रस्तांपर्यंत हि मदत पोचवली . यात तो भयानक उद्विग्न झाला होता .
* लाईव्ह एड कॉन्सर्ट हा एक मोठा रोचक प्रकार होता . त्यानंतर लाईव्ह अमुक आणि लाईव्ह तमुक अशा बऱ्याच कॉन्सर्ट्स च पेव फुटलं . जास्त माहिती साठी या विषयावर BBC च्या भारी डॉक्युमेंटरीज आहेत .
तात्पर्य : आफ्रिकेतील मदत एड .. हा फार अवघड प्रकार आहे , तसाच रोचक पण .
(विकी द्न्यानानं थोडिशी भर)
आफ्रिका हा लै इंट्रेस्टींग प्रकार आहे. १९वं शतक (म्हंजे १८०० ते १८९९ पर्यंतचा काळ) म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर जागतिक चित्र काय येतं? आख्ख्या जगाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ताब्यात,कब्जात घेउ पाहणारा युरोपिअन वसाहतवाद, कलोनिअलिझम. रैट्ट? म्हंजे आजचा आख्खा दक्षिण आशिया(सार्क देश्) , आग्नेय आशिया (मलेशिया इंडोनेशिया वगैरे) आणि चीनमधला लहानसा पण मोक्याचा भाग (मकाउ, हाँगकाँग वगैरे), अमेरिकन खंड, आफ्रिका....इथं सगळीकडे थेट युरोपिय देशाचा ताबा किंवा त्यांच्या प्रभावातली तुलनेनं दुबळी सरकारं.(अफगाणिस्तान , नेपाळ, थायलंड, खुद्द चीन वगैरे).
पण जस्ट अ मिनिट माय लॉर्ड. १८७० पर्यंत केवळ १०% आफ्रिकाच युरोपियन वसाहतवादाच्या अंमलाखाली होती!
इथिओपियासारखा काही भाग वगळता उरलेली बहुतांश आफ्रिका पुढच्या पन्नास वर्षात युरोपातल्या काही देशांनी बळकावली.
(https://en.wikipedia.org/wiki/Scramble_for_Africa)
.
तर सांगायचं म्हंजे ह्या सगळ्यातली एक महत्वाची घटना म्हणजे १८८४ मधली बर्लिन कॉन्फरन्स. (बड्या युरोपीय देशांची बैठक). त्या बैठकीचं एक महत्वाचं घोषित उद्दिष्ट होतं "आफ्रिकेस गुलामांच्या व्यापारातून वाचवणं " (https://en.wikipedia.org/wiki/Berlin_Conference)
तर सांगायचं म्हंजे तेव्हा आफ्रिकेला वाचवायचच ह्या इरेला पेटलेले युरोपीय देश कामाला लागले, आणि पुढच्या चाळीसेक वर्षात ताबा घेउन त्यांनी वाचवलंसुद्धा (जसं की बेल्जियम राजे किंग लिओपाल्ड. ह्यांनी सुमारे आर्धा ते एक कोटी आत्म्यांना मुक्ती मिळवून दिली.)
https://en.wikipedia.org/wiki/Atrocities_in_the_Congo_Free_State
.
आजही असे वाचवायचे अनेक प्रयत्न सुरु आहेत.
.
एक इंटरेस्टींग लेख --
https://www.theguardian.com/commentisfree/2013/jun/10/african-hunger-hel...
रोचक माहिती मनोबा .
रोचक माहिती मनोबा .
अजून एक गम्मत : हा सगळा घोळ इकडे चालू असताना , गेल्या दशकात चीन आफ्रिकेत अक्षरशः 'घुसले 'आहे . उगा मानवतावादी मुखवटे वगैरे नाही . शिस्तीत घुसले आहेत . पैसे , मशिनरी , आणि मनुष्यबळासकट* . दणादण हायवे बांधत आहेत . नजर आहे त्यांची पण मिनरल रिसोर्सेस वरच .
येत्या १० वर्षात आफ्रिकेतील बऱ्याच देशांमध्ये चीन च स्थान कमालीचं बळकट होणार आहे .
* मी आमच्या तिथल्या सर्वज्ञानी डायवर कडून असं ऐकलं कि नैरोबीतल्या प्रसिद्ध झोपडपट्टीत चिनी अंडीवाला** भेटला तर आश्चर्य वाटून घेऊ नका .
**हा अजून एक रोचक प्रकार आहे . तो पुन्हा केव्हातरी .
आफ्रिकेतील इन्फ्रा
आफ्रिकेतील इन्फ्रा प्रोजेक्टांवरती चीन कधीही आफ्रिकन मजूर घेत नाही, गाड्या भरभरून चिनी मजूरच आणतो वगैरे वाचले होते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मूळ पोस्ट शी फार विषयांतर
मूळ पोस्ट शी फार विषयांतर होतंय ..पण एवढं लिहून थांबतो . सगळं ऐकीव आहे डायवर कडून
केनिया मध्ये चीन नि काही वर्षांपूर्वी हायवे बांधायला सुरुवात केली तेव्हा पब्लिक खुश होतं . पण आधी मशीनरी आली मग इंजिनिअर आले तेव्हा पर्यंत ठीक होत . पण नंतर मजूर पण आले . त्यातील काही नैरोबी च्या सुप्रसिद्ध झोपडपट्टीत राहू लागले . पब्लिक काऊ लागले . पण जेव्हा त्याच झोपडपट्टीत लोकल अंडीवाल्या शेजारी बसून चिनी (मजुरांच्या घरचे ) अंडी विकू लागले तेव्हा प्रजा जाम कावलीय . अर्थात तिथल्या पब्लिक ला स्वतःवर होणाऱ्या अन्यायाची भयंकर सवय आहे .
अति अवांतर : गेल्या केनियातील निवडणुकी च्या वेळी (२०१३)पश्चिमी लोकशाहीप्रेमी देशांकडून जेव्हा स्थानिक लोकशाहीत अवाजवी हस्तक्षेप होऊ लागला तेव्हा याच चीन नावाच्या लोकशाही न मानणाऱ्या देशाने (नेहमीप्रमाणे ) अत्यंत थंड आणि शांतपणे हस्तक्षेप करून या देशातील लोकशाही वाचवली . (!) अजिबात गाजावाजा न करता .
अगायायाया लैच की हे तर!!
अगायायाया लैच की हे तर!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
चीन म्हणे तुरुंगातले कैदी
चीन म्हणे तुरुंगातले कैदी आफ्रीकेत मजुर म्हणुन पाठवतो, खरे आहे का ते माहिती नाही.
अदितीदेवी , हे रत्न शोधून
अदितीदेवी , हे रत्न शोधून येथे इतर सर्वाना वाचन लाभ दिल्याबद्दल आपले अनेक आभार .
काय झाले बापटण्णा?
काय झाले बापटण्णा? वाढदिवसाच्या दिवशी कोणावर टिका करायची नाही असा पण आहे का?
तसाही तुमचा प्रतिसाद तुमच्या नेहमीच्या प्रतिसादांशी थोडाच मेळ खात होता.
लॉरी बेकर बहुतेक केरळात फेल
लॉरी बेकर बहुतेक केरळात फेल गेला. दुबईतून येणाय्रा पैशावर छान बंगले बांधायच्या वादळात स्वस्त कामचलाऊ घरांकडे दुर्लक्ष झाले असेल.
खिडक्यांच्या चौकटी बसवण्यासाठी केलेला बदल मला फार आवडलेला.
किल्लारी अथवा इतर गावांत घराच्याच एका भागांत गुरांचा गोठा असतो तसा बय्राच जणांनी प्लानमधून वगळला होता.
खोदकाम
आज वेगळ्याच कारणानं ह्या धाग्याची आठवण झाली. इथे प्रतिसादांत आफ्रिकेबद्दल बापटांनी लिहिलेलं आहे; २०२३चा दिवाळी अंक आफ्रिकेबद्दल काढू, ही कल्पनाही त्यांचीच. एक वर्तुळ अपूर्णच राहिलं. दिवाळी अंकात बापटांनी उल्लेख केलेल्या विषयाबद्दल काही लेखन मिळालं नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.