पुस्तक परीक्षण: "असा होता सिकंदर"
पुस्तक परीक्षण: "असा होता सिकंदर"
लेखिका: इंद्रायणी सावकार
रिया पब्लिकेशन
अजब डीस्ट्रीब्युटर्स
सूचना:
अलेक्झांडर = सिकंदर
पोरस = पुरू = पुरुषोत्तम = पौरव देशाचा राजा
चाणक्य = कौटिल्य = विष्णुगुप्त
परीक्षण:
नुकतेच "असा होता सिकंदर" हे पुस्तक मी वाचून पूर्ण केले.
लेखिका "इंद्रायणी सावकार" यांची "लेखनशैली" काय वर्णावी? एकदम अद्भुत अशी शैली!
कठीण आणि क्लिष्ट असलेला इतिहास विषय आणि त्यातल्या त्यात अलेक्झांडर सारख्या जगप्रसिद्ध प्राचीन ग्रीक व्यक्तिमत्वाबद्दल लिहायचे म्हणजे एक आव्हान होते पण इंद्रायणी यांनी कमाल केली आहे. हे त्यांचे मी वाचलेले पहिले पुस्तक आणि त्यानंतर मी त्यांचा फॅन झालो आहे. माझ्या आवडीच्या ऐतिहासिक पौराणिक लेखकांमध्ये त्यांचे नाव आता वर राहील.
फिलीप, ऑलिम्पिया आणि अलेक्झांडर या पात्रांबद्दल माहिती आणि त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये त्या हळूहळू आणि कथेच्या गरजेनुसार आणि प्रवाहानुसार उलगडत जातात.
ज्या अलेक्झांडरबद्दल अख्खी लायब्ररी भरेल एवढी पुस्तके लिहिली गेली आहेत आणि ज्याच्या जग जिंकण्याच्या इच्छेने बेफाम झालेल्या इच्छाशक्तीच्या रथाला आपल्या भारतभूमीत खीळ बसली त्या भारत भूमीचा त्यावेळचा इतिहास सुध्दा त्या थोडक्यात सांगतात. जसे चंद्रगुप्त मौर्य, चाणक्य आणि पुरू (पोरस) याबद्दल अगदी छान माहिती मिळते. चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्यबद्दल मी या आधी वाचलेल्या गोष्टींना आणि गृहितकांना त्यामुळे जबरदस्त हादरा बसतो. पर्वतक, कल्याणी वगैरे व्यक्तिरेखा यात नाहीत तसेच चाणक्यच्या वडीलांबद्दल तसेच शकदाल वगैरे बद्दल यात उल्लेख नाही. (भा. द. खेर यांच्या "चाणक्य" मध्ये त्या आहेत)
अरिस्टॉटल या अलेक्झांडरच्या गुरुने विविध देशांतील व्यापाऱ्यांच्या कथनावर आधारित जो जगाचा नकाशा बनवला असतो (जग चौकोनी आहे असे समजून) तो खूप अपूर्ण असतो आणि हे सत्य अलेक्झांडरला भारतात समजतं. ही खूपच नावीन्यपूर्ण आणि वेगळीच माहिती या निमित्ताने मला मिळाली.
साहित्यप्रेमी आणि असामान्य ताकदीचा योद्धा अशी दोन व्यक्तिमत्वे एकाच व्यक्तीत (सिकंदर) एकत्र नांदू शकतात हेही या निमित्ताने कळले.
पर्शियन राजा डरायस आणि अलेक्झांडर यांच्यातील खेळ हा टॉम अँड जेरी सारखा रंगतदार वाटला.
पुरू जेव्हा राजा होता त्यावेळेस चंद्रगुप्त मौर्य हा त्याच्या मुलाच्या (सैंधव) वयाचा होता हे समजले आणि त्यामुळे ऐतिहासिक चित्र आणि कालखंड आणि क्रम स्पष्ट होत गेला.
या पुस्तकानुसार पोरस आणि अलेक्झांडर यापैकी कुणीही युद्ध जिकले किंवा हरले नाही. अलेक्झांडरने पोरसला गाफील ठेऊन पावसात युध्दाला सुरुवात केली आणि एवढे मोठे युद्ध होऊन सैंधव मेल्यानंतर सुध्दा हाफेश्टियन आणि चंद्रगुप्त बोलणी करून त्यांची (ग्रीक आणि भारतीय) मैत्री होते आणि सेल्युकस निकेटोरच्या मुलीशी चंद्रगुप्तचा विवाह होतो. तसेच या पुस्तकात आपल्याला बिंदुसारच्या (सम्राट अशोकचे वडील) जन्मामागची आणि त्याच्या नावामागची अद्भुत कथा सुध्दा कळते.
सगळेच अद्भुत आणि अविश्वसनीय पण सत्य!
चाणक्यने बऱ्याच गोष्टी ग्रीक लोकांकडून शिकल्या हे या पुस्तकात प्रथमच कळले.
काही गोष्टी मात्र अनुत्तरित राहिल्या जसे -
मात्र पोरस राजा तक्षाशिलेच्या अंभि राजाला सहजासहजी माफ कसा काय करतो? अंभीचा पाहुणा असलेला अलेक्झांडर पौरव देशावर (आणि तेही अंभीला टाळून) आक्रमण करतो याबद्दल पुरूला संशय येऊन त्याने अंभिला जाब विचारायला हवे होते असे वाटते.
अलेक्झांडर मेल्यानंतर मगध मध्ये काय होते ते कळले पण पुरू राजाचे नंतर काय होते? हे या पुस्तकात समजत नाही.
नंतर पौरव आणि तक्षशिला राज्य पण मगध च्या अंकित होते का?
असो.
एकूणच हे पुस्तक नक्की वाचलेच पाहिजे असे आहे.
- निमिष सोनार, पुणे
प्रतिक्रिया
पुस्तक मजेदार असावं. इतिहासच
पुस्तक मजेदार असावं. इतिहासच आहे का काही तर्कसुद्धा आहेत?
अलेक्झांडरवरची फिल्म हिस्ट्री चानेलने केली आहे ती मी पाहिली आहे. ( युट्युबवर आहे) अलेक्झांडर शेवटी शेवटी त्याच्या अगदी जवळच्यांनाही मारतो याबद्दल जाणून घ्यायचे आहे.
खरा इतिहास काय आहे?
ह्या लेखाच्या निमित्ताने एका दुलक्षित विषयावर मला काही लिहिण्याची संधि उत्पन्न झाली आहे. तो विषय म्हणजे अलेक्झँडर, पौरस, अम्भी ह्या सर्व गोष्टीमागचे ऐतिहासिक सत्य. त्यातून निघतो एक अधिकच मौलिक प्रश्न आणि तो म्हणजे चन्द्रगुप्त मौर्य हा अलेक्झँडरचा समकालीन ह्या पायावर उभारलेली भारताच्या प्राचीन इतिहासाची मांडणी कितपत विश्वासार्ह आहे.
प्रस्तुत धागा हा इन्द्रायणी सावकार ह्यांच्या कलाकृतीचा आस्वाद घेण्यासाठी निर्माण झाला असल्याने हे वरचे मुद्दे त्याच्या संदर्भात गैरलागू आहेत म्हणून त्याबाबत येथेच काही लिहिणे प्रशस्त ठरणार नाहीत. एका वेगळ्या स्वतन्त्र धाग्यात त्याची मांडणी उचित ठरेल. येथे केवळ सूतोवाच करून ठेवतो.
**प्रस्तुत धागा हा इन्द्रायणी
**प्रस्तुत धागा हा इन्द्रायणी सावकार ह्यांच्या कलाकृतीचा आस्वाद घेण्यासाठी निर्माण झाला असल्याने~~
सहमत.
रंजक लेखन आहे का ऐतिहासिक स्वरुपाचे असं विचारायचं आहे.
सिकंदर भारतात आला तेव्हा मोहिमेला खूप काळ लोटलेला,सैन्य थकलेले आणि माघारी जाण्याच्या तयारीत होते. शिवाय सिकंदरालाही वाटू लागले की मायदेशात आता दुसराच कोणी प्रबळ होईल तर तिथे परतायला हवे. समजा तो इथेच राहिला असता तर मजा आली असती
हे तंतोतंत खरे आहे की ...
सिकंदर भारतात आला तेव्हा मोहिमेला खूप काळ लोटलेला,सैन्य थकलेले आणि माघारी जाण्याच्या तयारीत होते. शिवाय सिकंदरालाही वाटू लागले की मायदेशात आता दुसराच कोणी प्रबळ होईल तर तिथे परतायला हवे.
हे तंतोतंत खरे आहे आणि इंद्रायणी सावकार यांच्या पुस्तकात असेच दिले आहे
माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-निमिश्किल
https://nimishexpress.blogspot.com/
युट्युबवर history Chanel:
युट्युबवर history Chanel: Persian Empire, किंवा Egypt किंवा Alexander,Cyprus, Greece शोधल्यावर भरपूर करमणूक होते. The bible ही आहे. बाहुबलीपेक्षा ओओरे राजा आहे.