कलाकारांचे अजब जग...
अफाट समुद्राच्या तीरावर असलेल्या एका डोंगर माथ्यावर बसून अभय दातार बायनाक्युलर्समधून भोवतालचे दृश्य न्याहाळत होता. समुद्राच्या लाटा, लाटावरून उडणारे पक्षी, दूर कुठेतरी मच्छीमारांच्या होड्या इत्यादी गोष्टी बघत असताना त्याचे मन भरून येत होते. हाडाचा कलावंत असल्यामुळे प्रत्येक दृश्य नवीन काही तरी सांगत आहे, असे त्याला वाटत होते. तितक्यात त्याच्या बायनाक्युलर्सचा रोख समुद्राच्या काठावर पसरलेल्या निर्जन वाटणाऱ्या वाळूत केंद्रित झाला. काही क्षण रोखून पाहिल्यानंतर तेथे दूर कुठेतरी हालचाल दिसत होती. बायनाक्युलर्समधून जास्त फोकस करून बघितल्यानंतर त्या रेतीत प्रसिद्ध चित्रकार वासुदेव गायतोंडे त्रिमितीत चित्र काढताना दिसले. अभयला आश्चर्याचा धक्काच बसला. प्रत्यक्ष गायतोंडेना चित्र काढत असताना बघण्याचा योग! चक्क वासुदेव गायतोंडे आणि त्यांचे वाळूवरील चित्र! अभयला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसेना.
काही वेळानी स्वतःला सावरल्यानंतर हे वाळूतील चित्र क्षणिक ठरेल अशी भीती त्याला वाटू लागली. समुद्राच्या लाटा तीरावर येऊन चित्र पुसून टाकतील याची धास्ती त्याला वाटू लागली. ते चित्र वाचवण्यासाठी काय करता येईल याचा तो विचार करू लागला. समुद्राला मागे सरकवणे वा लाटा येऊ न देणे हे व्यावहारिकपणे शक्य नाही, हे त्याला उमगले. वाळूतील त्या त्रिमितीतील चित्राचा साचा (mould) करून त्याची हुबेहूब प्रतिकृती एखाद्या दालनात ठेवता येईल हाही विचार त्याच्या मनात आला. फार फार तर लॉजवर जाऊन झूम कॅमेरा घेऊन यायचे व पाण्याच्या लाटामुळे पुसून जायच्या अगोदर त्या चित्राचे फोटो काढून या कलाकृतीला अमरत्व प्राप्त करून देता आले असते. परंतु वेळ इतका कमी होता की असे काहीही करणे अशक्यातली गोष्ट ठरली असती. शिवाय प्रत्यक्ष चित्रातील सौंदर्य कॅमेरातील फोटोत असणार नाही याची त्याला कल्पना होती. आता या क्षणी फार फार तर समुद्रतीरावर जवळ जाऊन डोळे भरून चित्र न्याहाळायचे एवढेच तो करू शकला असता.
एका अप्रतिम कलाकाराची कृती बघण्यास मिळाली म्हणून आनंदित व्हायचे की ती कलाकृती काही क्षणात काळाच्या पडद्याआड कायमचे जाणार म्हणून दुःखी व्हायचे हा प्रश्न आता त्याच्या समोर होता.
** ** **
एखादी अत्युत्तम कलाकृती दीर्घकाळ टिकत नसल्यास त्याचे दुःख होणे स्वाभाविक आहे. परंतु शिल्पकलेप्रमाणे इतरही कलाकृती – पेंटिंग्स, भित्तीचित्रं, नाटकं, चित्रपट, संगीत, इ.इ. – जास्तीत जास्त काळ सुस्थितीत असावेत ही अपेक्षा ठेवणेसुद्धा चुकीचे ठरेल. कलेच्या सादरीकरणासाठी वापरलेल्या माध्यमाच्या काही मूलभूत मर्यादा असतात. व त्या मर्यादेत राहूनच कलाकृतींचा आस्वाद घेणे योग्य ठरेल. आताच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात फार फार तर एखादी चित्रफीत काढून त्या कलाप्रकाराचे वा त्याच्या सादरीकरणाचे चित्रण करून कलाप्रकाराला इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे दीर्घकाळ टिकवून ठेवता येईल. परंतु हे प्रकार अभिजात कलाकृतीला न्याय देणारे नाहीत, हे रसिकांना व कलावंतांनासुद्धा माहित आहे. म्हणूनच डॉल्बी – बोस सारख्या उच्चदर्जाचे स्पीकर सिस्टिम उपलब्ध असूनसुद्धा 1000-1500 रुपये मोजून संगीताच्या लाइव्ह कार्यक्रमांना रसिक गर्दी करतात. नाटकाचे कॅसेट्स उपलब्ध असले तरी नाट्यगृहात सादर केलेल्या नाटकाचा आस्वाद घेण्याची मजा और असते.
अजंठाच्या लेण्यामध्ये असलेल्या भित्तीचित्रासारख्या वा खजुराहोसारख्या ठिकाणी कोरलेल्या शिल्पासारख्या कलाकृती त्यातल्या त्यात दीर्घ काळ टिकणारे आहेत. त्या कलाकृतींचीही वाट लावणारे उतावळ्या रसिकांची संख्यासुद्धा कमी नाही, हेही तितकेच खरे. परंतु लोककला, नृत्य, गझल-ठुमरी-शास्त्रीय संगीताची मैफल, नाटक, एकपात्री प्रयोग, यासारख्या कलाप्रकारांचे सादरीकरण पुढच्या अनेक पिढ्यापर्यंत पोचवण्यासाठी नेमके काय करायला हवे याचे उत्तर आज तरी आपल्याकडे नाही. गायतोंडेचे अप्रतिम चित्र तर फारच अल्पजीवी ठरेल. त्यामुळे कलाकृतीचे आयुष्य कलावंताने निवडलेल्या माध्यमाच्या आयुष्यावरून मोजावे की काय असे वाटू वागते. फार फार तर चित्रफितीच्या स्वरूपात इलेक्ट्रॉनिक्सच्या (सिलिकॉन-प्लॅस्टिकच्या) माध्यमातून कलाकृतीला थोडे फार जास्त आयुष्य देणे शक्य आहे. मुळात जतन करणाऱ्या या इलेक्ट्रॉनिक पद्धतीच्यासुद्दा मर्यादा आहेत आणि त्याची पूर्ण कल्पना अजून संशोधकांनासुद्धा नाही. उदाहरणार्थ, गाण्यांचे आयुष्य वाढवण्यासाठी प्रथम रेकॉर्ड्सची सोय आली. त्यांनतर स्पूल्स आले. स्पूल्सनंतर व्हीसीआरचे कॅसेट्स आले. वाकमनसाठीचे कॅसेट्स आले. सीडीज आल्या, व्हीसीडीज आल्या, यूएसबीवर रेकॉर्डिंग करता येवू लागले. पोर्टेबल हार्ड डिस्क आले. तरीसुद्धा रेकॉर्डिग किता काळ टिकेल याची कल्पना नाही. बायनरी कोडिंगमुळे 0 आणि 1 ला पर्याय नाही. व हे 0 व 1 साठी चुंबक शक्तीचा वापर होतो. परंतु या चुंबकांच्या गुणधर्मात थोडासा बदल झाला तरी सर्व गणित चुकते.
काही काळानंतर सिलिकॉन-प्लॅस्टिकच्या अंगभूत गुणधर्मामुळे कलाकृतीची गुणवत्ता नष्ट होत चाललेली दिसू लागेल. कदाचित कलाकृती कशी ऱ्हास होते हासुद्धा कलाविष्काराचा भाग म्हणून पुढच्या पिढीला दाखविता येईल.
कलावंत माध्यम निवडतानाच या सर्व गोष्टींचा विचार करत असला पाहिजे. चित्रकार ब्रशेस, रंग, रंगसंगती, कागद-कापड व इतर वस्तू यांची परख करूनच चित्राला सुरुवात करत असेल. त्यामुळे कलावंतच आपल्या कलाकृतीचे आयुष्य ठरवत असतो असे म्हणण्यास हरकत नसावी.
मुळात कलावंत असो वा सामान्य माणूस, प्रत्येक जण आपल्याला अमरत्व प्राप्त व्हायला हवे अशी एक सुप्त इच्छा मनात बाळगून असतो. किडा मुंग्यासारखे आयुष्य काढणाऱ्या सामान्य माणसांना हे जमत नाही. परंतु कलाकार मात्र मृत्युपश्चातही आपल्या कलाकृतीतून अमरत्व प्राप्त करून घेवू शकतो, असे त्याला वाटते. परंतु रसिक म्हणून आपण कलेचा आस्वाद घेत असताना बहुतेक वेळा कलाकार विस्मृतीतच ढकललेला असतो. त्यामुळे काही अपवाद वगळता कलाकाराचे अमरत्वाचे स्वप्न पूर्ण होत नाही. कलाकृती पूर्ण ऱ्हास होईपर्यंतच proxy कलावंताचे आयुष्य असते, असे फार फार तर म्हणता येईल.
वैध-अवैध मार्गाने पुढील सात-आठ पिढ्याला पुरेल एवढी संपत्ती साठवून ठेवणाऱ्यांच्या नंतरच्या पिढ्यासुद्धा मूळ पुरुषाला विसरतात. तिसऱ्या पिढीतल्यांना आजोबा-पणजोबांची नावे प्रयत्नपूर्वक आठवावे लागतात. त्यामुळे अमरत्व हे मृगजळ असून यासाठी एवढा उपद्व्याप करण्याची गरज नाही, हे लक्षात ठेवल्यास संपत्तीची हाव तरी कमी होईल.
कला असो वा कलावंत, हे दोन्ही मर्त्य असून कलेची खरी किंमत कलास्वादातच आहे, कलानुभवातच आहे असे आपण निःसंकोचपणे म्हणू शकतो.
प्रतिक्रिया
सुंदर लेख आहे. आवडला.
सुंदर लेख आहे. आवडला. वेगळ्याच विषयावरचा आहे.
________
कवितेबद्दल एक सुविचार वाचला होता तो साधारण अशा अर्थाचा होता की - कविता ही आस्वादकाकडुन एवढीच अपेक्षा ठेवते की त्याने तिच्याबरोबर असेपर्यंतचा तो काळ / तो क्षण संपुर्णपणे तिला द्यावा.
अर्थात जेव्हा आपण कलास्वाद घेतो तेव्हा वृत्ती निर्मम होते, त्या क्षणापुरता तरी कलेशी पूर्ण तादात्म्य पावते. "mindfulness" ............. "centered in Presence" आणि तेच होणे अपेक्षित असते. अन्य काहीही नाही.
लेखाचा फोकस कळला नाही काय होता
म्हणजे कुठलाही कलाकार आपल्या कलेच्या माध्यमाने आपले अस्तित्व कायम टिकुन राहावे यासाठीच केवळ धडपडत असतो. त्या द्वारे अमरत्व साधण्याचा प्रयत्न करत असतो.
मात्र तसे प्रत्यक्षात होत नसते किंवा तसे शक्य नसते.
त्याऐवजी कलास्वाद हाच अर्थपुर्ण आहे असे म्हणावयाचे आहे काय ?
असे असेल तर कलेची प्रेरणा फारच मर्यादीत अर्थाने घेतलेली आहे असे वाटते. या व्यतिरीत्क इतरही प्रेरणा कलानिर्मितीच्या असतात
अवांतर -
अवांतर -
लेनिन नको होता ते ठीक पण पुतळा फोडलाच. विकता आला असता नको होता तर हे कधी कळणार?