मी ह्या सगळ्याकडे कसं पाहते..
आपली आपली म्हणता येणारी अनेक माणसं एकेक करत सोडून जातात. आधी वाईट वाटायचं आता थोडीफार सवय घालून घेतली. पूर्वी मी हातातून सुटून चाललेली नाती जपण्याचा खूप प्रयत्न करत असे. पण आता जाणार्याला शांतपणे जाऊ देते. थांबवण्यासाठी अजिबात प्रयत्नांची शर्थ वगैरे करून जिवाचे हाल करून घेत नाही. आपण कुठे चुकलो का ह्याचा भरपूर विचार करते. जेव्हा आपल्या बाजूने आपण शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला पण समोरची व्यक्ती नाही समजू शकली ह्याची खात्री पटते तेव्हा मी चर्चा, स्पष्टीकरणं, तडजोड, वाद असं काही करायला जाणं सोडूनच दिलय जणू. कारण मला ह्या सगळ्याचा मानसिक थकवा येतो. अतिशय. हेही वाटतं की जिथे स्पष्टीकरणं द्यावी लागत आहेत, नको त्या गोष्टींचा पराचा कावळा केला जातो आहे, कायम आपल्यालाच ऐकावं लागणार आहे आणि समोरची व्यक्ती कायम आपली घुसमटच करणार आहे तिथे मलाही त्या नात्याबाबत, मैत्रीबाबत कोरडेपणा यायला लागतो. नात्याबद्दल कोरडेपणा येण्याची माझी स्टेज कधी फार काळानंतर तर कधी झटक्यात येते.
एकदा का व्यक्ती मनातून उतरली की ती माझ्यासाठी शहीद जरी झाली तरी पुन्हा ते प्रेम माझ्याकडून होणं शक्य नसतं. कारण ह्या सगळ्या भानगडीत आणि गुंतागुंतीत नात्यातल्या हिंदकळीतील सहजता निघून गेलेली असते. हे माझेच आहे असे नाही. बहुतांश कुभ राशीच्या माणसांचे असे असेल असे वाटते. आयच्या गावात ! डोक्याला शॉट. पण अनेकांचं असं असतं. मला झटक्यात राग येतो तसा जातोही. मानसिक पिळवणूक करणारे.. थोडक्यात पीळ करणारे, मी प्रेम आहे म्हणून सहन करू शकते पण डोक्याची पावडर व्हायला लागली की मला मनात जे आहे ते दाबून ठेवता येत नाही. जे आहे ते स्वच्छ बोलून मी मोकळी होते. ज्यांना हा स्वभाव झेपतो ते राहतात नाहीतर जातात.
गैरसमज करून आकाडतांडव करणार्या काही लोकांची आता मला बर्यापैकी अॅलर्जी निर्माण झालेली आहे. काहीजणं शांतपणेही प्रोलॉन्ग्ड आकाडतांडव करू शकतात. हुषारीने कुणालाही कळणार नाही अश्याही पद्धतीने आक्रस्ताळेपणा करू शकतात, गृहीत धरू शकतात, घाण करूच शकतात. आधी प्रेमाखातर अश्या लोकांसमोर फार कमकुवत असल्यासारखी मी वागे. माफी मागणे, गिडगिडणे असेही करे. पण आता फूट म्हणते. हे म्हणताना मनात माज असतो असे अजिबात नाही. आतून तुटत असतं भाजत असतं. पण मला आता व्हीक्टीम व्हायचं नाही. मानसिक छळ हाही गुन्हा आहे. अनेकजणं तो नात्यात, मैत्रीत, प्रेमसंबंधांत छुप्या पद्धतीने खेळत असतात. मी आता अश्या खेळांना बळी न पडण्याइतपत मजबूत झालेली आहे. मैत्रीच्या नावाखाली स्त्रिया स्त्रियांनाही असा त्रास देतात. पुरषांमधे मात्र असे फालतू गेम्स खेळण्याचा प्रकार कमीच दिसतो. त्यांना बिचार्यांना बर्यांचदा काही कळत नसतं.
माणसं सोडून गेली की हताशा येते. पण मला हल्ली वेगळच वाटतं. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात एक योगायोग म्हणून येत नसावा. त्याची भूमिका असते तिथे. ती पार पाडली की तसंही त्याचं आपल्या आयुष्याच्या रंगमंचावर काय काम.. मग तो एक्झिट घेतो. तिथे जागा हवी असते. एक नवं नाट्य घडवून आणण्यासाठी नव्या कलाकाराची, नव्या नात्याची, नव्या माणसाची गरज असते. केवळ म्हणून काही ताटातूटी होत असाव्यात आणि काही ऋणानुबंध जुळत असावेत कायमचे.
माणसं कोणत्याही कारणाने आयुष्यातून कमी झाली की मी दु:खी होते. पण मी निराश होत नाहीये हे नक्की.
प्रतिक्रिया
लौव यू
अगदी. बऱ्याच लोकांचा कंटाळा येतो, तो व्हिक्टिम व्हायचं नाही म्हणून.
हल्ली उलट उदाहरणं दिसतात ते म्हणजे इमोशनल इंटलिजन्स नसणारे पुरुष. त्यांच्या वागण्या-बोलण्यातलं साटल्य त्यांनाच समजत नाही. "तुमचं बोलणं या-या कारणांसाठी आक्रमक होतं", असं सकारण म्हटलं की वर आपल्यावरच इमोसनल अत्याचाराचे आरोप होणं.
सुदैवानं आजूबाजूचे बहुतांश लोक 'आपल्याला इमोशनल इंटेलिजन्स कमी' हे मान्य करणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या वर्तनाची चिकित्सा केली की पुढच्या वेळेस वर्तनात सकारात्मक बदलही दिसतो. बाकीच्या लोकांना बाय-बाय करताना हल्ली फार दुःख होत नाही. निबरपणा आलाय.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अरे, मस्तच लिहिलंय की.
अरे, मस्तच लिहिलंय की.
Dumping people as a skill
.
आणखी पुढे जाऊन मी म्हणेन की - Learn to dump people. Start dumping people first. हे फार कठीण नैय्ये. एखाद्या व्यक्तीबद्दल विचार करायचा म्हंजे - Where is this relationship going ? Do I see an end to this ? Can I pull that end forward to today ? What will be lost if I terminate this relationship today ?
.
इतरांनी तुमच्याशी संबंध तोडायचे व तुम्ही नेहमी रिसिव्हिंग एंड ला रहायचं - असं का ? तुम्ही सुद्धा कधी ॲग्रेसिव्हली तोडा की संबंध.
.
.
जाताजाता : आमचे मित्र बॅटमॅन म्हणतात तसं - आपण सगळ्यांना समजून घेत बसलो की आपल्याला कोणीच समजून घेत नाही.
.
.
---
.
अपडेट : ह्या गाण्याचं तिसरं कडवं एकदम रिलेव्हंट आहे या धाग्यासाठी.
.
छान लिहीले आहे. पटले. उगाच
छान लिहीले आहे. पटले. उगाच ड्रॅग होणारी नाती तोडलेलीच बरी. ऋणानुबंध संपले की रांगोळी मोडुन टाकायची, नवी घालायची. जोपर्यंत नात्यात आपला विकास होतो आहे, तोवर रहाणे बरे. आपल्या डोक्याला शॉट नको आणि दुसऱ्याच्याही डोक्याला शॉट नको.
त्यामुळे त्यांच्या वर्तनाची
+1 फेस टू फेस चिकित्सा करण्याचे धाडस मात्र असायला पाहिजे. याने एक तर रिलेशनशिप सुधारते तरी - किंवा नाही सुधारली तरी आपल्याला दुसऱ्या व्यक्तीला "सुनावण्याचे" समाधान तरी मिळते. अर्थात ती व्यक्ती सुद्धा आपली चिकित्सा करू शकते - ते ऐकायची पण तयारी पाहिजे.
हो म्हंजे चर्चेशिवाय सोडतो की काय..
जिथे नातं तुटण्याची भीती वाटते आणि ते नको असतं, तिथे पहिल्या प्रथम नक्की कुठे घोडं किंवा घोडी अडली हे पाहण्याचे मी प्रयत्न करते, प्रश्न विचारते, बोलते. पण काहीजणं मुळातच खुदहीमे इतनी टॉक्सिक झालेली असतात की त्यांच्याशी चर्चा वा वाद घालून किंवा त्यांनी सतत हम खुदा है ह्या मोडमधे जाणं.. हे पाहून त्या विषाचा दंश आपल्यालाही होणार आणि आपण मरणार, अशी बाधा होण्याची चिन्ह जेव्हा दिसू लागतात मी स्वत:ला समजावते, आवरा. समोरच्याचीचीही आपण जे बोलू ते ऐकण्याची तयारी असेल तर तिथे काही चर्चा होऊ शकते नं. काही ठरावीक माणसं असतात आयुष्यात तिथे कराव्यात अॅडजस्टमेंट.. म्हणजे बाईच्या जातीला.. नवरा, मुलं इत्यादी. कारण त्यांचं ऐकलं किंवा त्यांच्याशी तडजोडून घेतलं की दुसर्या दिवशी त्यांच्या डोक्यावर बसता येतं.
नाती (मैत्री) तुटतात का हे
नाती (मैत्री) तुटतात का हे पाहण्याअगोदर ती का टिकली आहेत हेच तुम्हाला जोखता येत नाही.
अमुक अमुक झालं तर किंवा मी असा पवित्रा घेतला तर हा नातेवाईक (/मित्र) सोडून जाईल/टाळेल हे ठामपणे सांगता आले पाहिजे.
बाकी मागे झालेल्या घटनांवरचा शोक मांडला आहे चांगला.
बाकी पुरुष/स्त्रिया यांचा
बाकी पुरुष/स्त्रिया यांचा वेगळा अनुभव मांडायचा झाल्यास पुरुषांना लग्नानंतर खूपच मिंधेपणा (ताटाखालचंमांजरपणा) आल्याने अगतिक झालेले असतात. राजेमहाराजांची असंख्य उदाहरणं आहेत.
सामान्य माणूस भोपळ्याच्या भाजीचंही कौतुक करत घराबाहेर पडतो. लादलेली नाती टिकवणे एवढेच करतो.
बहुतांश कुभ राशीच्या माणसांचे
बहुतांश कुभ राशीच्या माणसांचे असे असेल असे वाटते. >> बर्रर्र
काही ठरावीक माणसं असतात आयुष्यात तिथे कराव्यात अॅडजस्टमेंट.. म्हणजे बाईच्या जातीला.. नवरा, मुलं इत्यादी. कारण त्यांचं ऐकलं किंवा त्यांच्याशी तडजोडून घेतलं की दुसर्या दिवशी त्यांच्या डोक्यावर बसता येतं. >> व्वा व्वा. तुम्हीपण 'आदरणीय स्त्रीवादी' आहात तर!!
===
Learn to dump people. Start dumping people first . हे फार कठीण नैय्ये. >> अगदी बरोबर! मी बऱ्याचदा करते हे. ७ अब्ज लोक आहेत जगात. भरपूर पर्याय आहेत. उगाच त्याचत्या माणसांसोबत त्याचत्या पाट्या टाकत बसायची गरज नसते.
??????
म्हणजे, तोडणार ते केवळ (भरपूर) पर्याय आहेत म्हणून / रादर, केवळ (भरपूर) पर्याय असतील तरच???
आणि, पर्याय नसले तर (पर्याय नाहीत म्हणून) तोडणार नाही???
तोडावे जरूर, परंतु ते 'कलेसाठी कला' तत्त्वावर. इट शुड बी अॅन ऑब्जेक्टिव इन इटसेल्फ. तोडण्यासाठी तोडावे. तिथे पर्याय आहेत का, दुसरे पूल बांधता येतील का, याचा विचार करू नये.
तोडण्येवाधिकारस्ते मा पुलेषु कदाचन|
(एनी अदर वे इज़ अ स्वार्थी, आप्पलपोटा, अप्रामाणिक व्यभिचार, असे आमचे नम्र आणि प्रांजळ मत आहे.)
जगात माणसे भरपूर आहेत हो.
जगात माणसे भरपूर आहेत हो.
पण एकाचा पर्याय दूसरा कुणीच असू शकत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती ही एकमेवच असते.
ती काही पर्स किंवा चप्पल नाही, एक खराब झाली म्हणून तशीच दूसरी आणली.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
संवेदनाशील
मी जरी कर्क राशीचा असलो तरी अनुभवाने, आपण, अतिसंवेदनशील असू नये, हे शिकलो आहे. हे शिकताना, पटवून घेताना, सुरवातीला खूपच त्रास झाला. पण, आता कसं, विमान एका ठराविक उंचीवर गेल्यावर एकदम स्थिर होते, तसं माझ्या मनाचं झालं आहे. ज्यांना नातं ठेवावसं वाटतं, ते भेटत रहातात, बाकीचे आपोआपच गळून जातात. त्याहून कधी, एखाद्या समारंभात भेटलेच, तरी एक औपचारिक संवाद होतोच. म्हणून कोणाबरोबरही, मधले पूल कायमचे उध्वस्त करु नयेत. याच विषयावर पूर्वी एक कविता सुचली होती.
प्रियजनांचे कुशल पुसावे
तयांच्या सुखदु:खी समरस व्हावे
तयांचे मनोगत जाणावे
प्रसंगी डोळाभरी दर्शन व्हावे
ही भाबडी आंस ठेवून जगावे
तो एक मूर्ख !
आप्तांचे अंतरंग न कळावे
तयांसी आपुले आस्तित्व नसावे
तयांच्या विश्वै आपण नसावे
हे परि उशीरा कळावे
तो शतमूर्ख !!
परस्वभावे आकलन न व्हावे
अनाठायी संवेदनशील असावे
कालगतीस समयी न ओळखावे
स्वत: कुणाची अडचण व्हावे
तो महामूर्ख !!!
मला नाही जमत असं
तसही कुणाबरोबर मैत्री किंवा नातं जुळायला मला पुष्कळ वेळ लागतो.
काही वर्षानुवर्षे ओळखीची असतात, पण नात/मैत्री आहे असं म्हणवत नाही.
वितुष्ट आलेच तर मनधरणी करायला जात नाही. पण असलेली नाती मी माझ्याकडून तरी तोडत नाही.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
ागदि बरोबर
ागदि बरोबर