इथे हजारात एखादा निवडला जातो
इथे हजारात एखादा निवडला जातो
आणि हजारोतला एक होऊन जातो
कौशल्यावर आधारित गुणपत्रिकेच्या रद्दीत
भूलतो चकचकत्या गाढवी कामाच्या दुनियेत
पगाराच्या मगरमिठीसाठी राबतो रात्रंदिवस
पोटजीविकेची परिक्रमा आ वासून उभीच असते
वर्षांमागून वर्षे जातात हाडामांसाचा देह खुरडत
अखेरीस ठप्प जोडीदाराच्या नातेसंबंधात
पुन्हा तेच शोभतो लाखात एक जोडा अन्
होऊन जातो लाखोंमधला फडफडणारा कुटुंबवत्सल
नव्याचं नवंपण निघून जातं, जुनं जाणतं नातं विरून जातं
उरतो नंतर बेगड्या जबाबदाऱ्यांचा भडीमार
परिस्थितीचा बागुलबुवा आणि शुष्क स्थैर्याचा आशावाद
उमेदीची वर्षे निघून जातात, स्वप्नरंजनातील दावे उडून जातात
राहतो शिल्लक आमचा काळ अन आम्ही काय केलं त्याच्या बाता
नेमकं उमगतं जग बदलायला निघालो होतो….
होऊन बसलो बदललेल्या जगाचा पदसिद्ध सो कॉल्ड सेटल्ड बैल !!!
--------------
भूषण वर्धेकर
11 जुलै 2010
पुणे
-----------------
प्रतिक्रिया
मुक्तछंदात लिहिणं हे वाटतं
मुक्तछंदात लिहिणं हे वाटतं तितकं सोपं नसतं. एक लय सांभाळावी लागते.
पाडगावकरांनी लिहिलेली एक कविता आठवते, ती जालावर सापडली नाही. '...चेटकिणीच्या हातापरि निज शरीर अपुले, क्षुद्र घृणास्पद...' असे काहीतरी शब्द होते. मुक्तछंद असली तरी स्वतःची लय बाळगणारी होती. दुसरी आठवते ती म्हणजे विंदांची 'सकाळपासून रात्रीपर्यंत तेच, ते अन् तेच ते' छंदात न बसवता, पण यमकं साधत ही कविता पुढे जाते. प्रत्येक कडव्यात वाढत जाणार्या ओळींमुळे तोचतोपणा अधोरेखित होतो.
थोडक्यात मुक्तछंद लिहिताना या लयीकडे जास्त लक्ष द्यावं लागतं, नाहीतर अर्धवट वाक्यांच्या तुकड्यांचा परिच्छेद बनतो, काव्य राहात नाही.
पाडगावकरांच्या 'कधी पाहतो मी
पाडगावकरांच्या 'कधी पाहतो मी माझ्यातच..' या कवितेचा उल्लेख केला असावा असं वाटत. सगळी आठवत नाही, पण खरंच तिला खूप छान अंतर्गत लय होती. शेवट होता
विद्रुप मीही, विराट मीही
साक्षी केवळ आणिक तरीही
त्या दोघांचा
अंधाराचा
आकाशाचा
हो हो. तीच कविता. तुमच्याकडे
हो हो. तीच कविता. तुमच्याकडे उपलब्ध असेल तर वाचायला आवडेल.
सापडली
कधीं पाहातों
मी माझ्यातच विचित्र मानव
शुद्र अविकसित विद्रुप दानव
अंधारांतुन अन चिखलांतुन
वृक्षमुळांपरि भूविवरांतुन
चेटकिणीच्या हातांपरि निज शरीर अपुलें
शूद्र घृणास्पद; फिरे परंतु
मिरवित मिरवित जीवनजंतु
अंधपणांतच सरपटणारा
कुढ्या तमांतच अन जगणारा
विचित्र मानव !
कधीं पाहतों
मी माझ्यातच विराट मानव
पावलांतुनी उमले ज्याच्या उषाच अभिनव !
हिमालयापरि देह जयाचा
मुकुट शिरावर रविकिरणांचा
पवित्र गंगा स्फुरते ज्याच्या वक्षामधुनी !
अन मृत्युंजय मंत्र जयाच्या अधरांमधुनी !
आकाशाला भिडे जयाचा प्रचंड माथा
हसत उलटतो नक्षत्रांचा प्रकाशगाथा
अमर्त्यतेच्या वाटेवरला जीवनयात्री
रवि भाळावर, अमृत गात्रीं
चिरसंजीवन मंगल नेत्रीं !
विद्रुप मीही, विराट मीही
साक्षी केवळ आणिक तरिही
या दोघांचा :
भूविवरांतिल अंधाराचा; आकाशाचा !
धन्यवाद.
धन्यवाद संपूर्ण कविता डकवल्याबद्दल.