समलिंगीसंबंध समाजमान्यता

६ सप्टेंबर २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ३७७ कलमामधून समलैन्गिकतेला वगळण्यात आले आहे. त्यामुळे अशा संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाली असून समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींना इथून पुढे गुन्हेगार मानण्यात येणार नाही. या निर्णयानंतर समाजमनात आणि समाजमाध्यमांवर अनेक निरनिराळ्या तऱ्हेच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ठराविक सुजाण आणि संवेदनशील नागरिकांनी याबाबत समाधान आणि आनंद व्यक्त केला असला तरीही बहुसंख्य व्यक्तींना न्यायालयाच्या या निर्णयाचे महत्व व गरज लक्षात आले नाही असे, या प्रतिक्रियांवरून दिसते आहे. धर्माच्या व संस्कृतीच्या नावाखाली समलैन्गिकतेला विरोध करण्याऱ्या आणि त्याआधारे राजकीय पातळीवर खळबळ माजवू पाहणाऱ्या व्यक्ती अथवा गटांच्याबाबत मला इथे काही मांडायचे नाही, कारण तो एका स्वतंत्र लेखाचा मुद्दा आहे. पण ज्या व्यक्तींना; ‘असे संबंध पुनरुत्पादनाचा हेतू साध्य करत नसल्याने अनैसर्गिक आहेत, तरीही यांना कायद्याने मान्यता का देण्यात आली व समाजाने का मान्यता द्यावी?’,‘महागाई, भ्रष्टाचार, आरोग्य इ. महत्वाच्या मुद्द्यांच्या जोडीला सध्या कायद्याने समलैंगिकतेचा मुद्दा का आणून बसवला आहे?’ अशा प्रकारचे प्रश्न खरोखरच पडले आहेत, त्यांना उलगडा पडण्यासाठी म्हणून या लेखाचा प्रपंच.
समाजाने आखून दिलेल्या स्त्रीत्व-पुरुषत्वाच्या निकषांप्रमाणे वागणाऱ्या व्यक्ती स्त्री-पुरुष या प्रकारांत वर्गीकृत करून विवाह्संस्थेद्वारे प्रचलित कुटुंबपद्धत अंमलात आणत राहणे, हे पितृसत्ताक पद्धतीला सोपे असते. लैंगिकदृष्ट्या अल्पसंख्यांक असणाऱ्या या समलैंगिक व्यक्ती कोणत्याच साच्यात बसत नाहीत आणि पारंपारिक पितृसत्ताक कुटुंब पद्धतीला ही बाब आव्हानात्मक वाटते. या व्यक्तींना समान-प्रतिष्ठित सामाजिक दर्जा दिल्यास प्रचलित विवाहसंस्थेला पर्याय उपलब्ध होऊन ही चौकट डळमळीत होईल अशी निराधार भीती वाटते. पितृसत्ताक मांडणी ही नेहमीच असमानतेवर आधारलेली असते आणि त्यात ठराविक गटांचे हितसंबंध जुळलेले असतात. म्हणून या असमानतेच्या जपणुकीसाठी अनैतिकतेचा दोष देऊन समलैंगिक व्यक्तींना सामाजिक उतरंडीत तळाशी ठेवणे फायद्याचे असते. आजपर्यंत कायदाच त्यांना गुन्हेगार ठरवून हे काम करत होता, आणि तरीही अप्रतिष्ठा करण्याचे सामाजिक हत्यार अजूनही उपलब्ध आहेच पितृसत्तेकडे. हे खरे तर लैंगिक राजकारण आहे.
हे संबंध प्रजोत्पत्ती करत नसल्याने अनैसर्गिक व त्यामुळे अनैतिक आहेत, असा आरोप केला जातो. प्रामाणिक विचार करून पाहिल्यास लक्षात यावे की सामान्य माणसे ठेवतात ते सर्वच लैंगिक संबंध प्रजोत्पादनासाठी नसतात. मुद्दाम गर्भनिरोधक वापरून बहुसंख्य नागरिक केवळ शरीरसुखासाठी लैंगिक संबंध ठेवतात; मग ते नैतिक कसे काय? लोकसंख्या घटण्याचा काहीच धोका नसतानादेखील माणसाच्या जगण्याचा प्राथमिक हेतू हा मुले पैदा करणे इतकाच असतो का? त्याव्यतिरिक्त अनेक प्रकारे थोर कर्तृत्व दाखवूनही जगण्याचे श्रेय मिळवता येते. आपल्याला जे व्यावहारिकदृष्ट्या सोयीचे असते, ते आपण कृत्रिम असले तरीही योग्य म्हणून स्वीकारतो. उदा.कपडे घालणे, लग्न करणे, गर्भनिरोधक वापरणे इ. आणि जे आपल्याला खटकते-गैरसोयीचे वाटते, ते अनैसर्गिक म्हणून बाद करतो. हा दांभिकपणा आहे. बलात्कार ही गोष्ट निसर्गाच्या दृष्टीने नैसर्गिक संभोग-क्रिया आहे, म्हणून बलात्कारानेसुद्धा अपत्य जन्माला येतेच. पण हा मानवी स्वातंत्र्यावर घाला आहे, या संवेदनशील जाणीवेतून बलात्कार गुन्हा ठरतो. समलैंगिक प्रवृत्ती कोणीही मुद्दाम जोपासत नाहीत, ती निसर्गतः असते. आणि निसर्गात आढळते ते सर्व नैसर्गिक असते, पण केवळ नैसर्गिक प्रक्रीयेपेक्षा माणसाचे स्वातंत्र्य- संवेदनशीलता जास्त महत्वाची आहे.
अल्पसंख्यांक समलैंगिक व्यक्तींची त्यांच्या ‘लैंगिक’ वेगळेपणामुळे अप्रतिष्ठा करणे व त्यांना सामाजिक उतरंडीत खालचे स्थान दाखवून स्वःताचे वरिष्ठ स्थान अबाधित ठेवणे हे प्रस्थापित पुरुषसत्तेला हितावह वाटते. याच प्रकारचे राजकारण स्त्रिया, दलित, आदिवासी, दारिद्र्यरेषेखालील गट, इतर वंचीत-शोषित यांच्या विरोधात केले जात असे; अजूनही केले जाते. त्यांच्याबाबत असलेल्या लढ्यांना पाठींबा द्यावा की नाही हे ठरवणे सामान्यांना सोपे आहे. पण कामवासना व लैंगिकता यांबाबत आपला समाज अजूनही मानसिकदृष्ट्या पौगंडावस्थेच्या पलीकडे गेलेला नसल्याने, समलैंगिक व्यक्तींच्या समानतेने जगण्याचे महत्व व त्याबाबतच्या लढ्याची गरज आपल्या समाजाच्या लक्षात येत नाही. म्हणून इतर महत्वाच्या सामाजिक मुद्द्यांबरोबर न्यायालयाने हा ‘गौण’ मुद्दा आत्ताच का वर आणला हे समजत नाही. न्यायालयाने हा निकाल जास्तीत जास्त व्यक्तींना समलिंगी संबंध ठेवून मजा करण्यासाठी नाही दिला, तर मुळातच असे समलैंगिक संबंध ठेवणे ही ज्यांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे, त्यांना या कारणामुळे गुन्हेगार ठरवले जाऊ नये व त्यांच्यावर अन्याय होऊ नये, म्हणून दिला आहे.
‘गुन्हेगार’ नसलेल्या व्यक्तींना सन्मानाने जगण्यासाठी कोणाचीही मान्यता गरजेची असते का, खरे तर? समाज नावाची कोणी अतिमानवी देहाची, सर्वसामर्थ्यवान, सर्वज्ञ व्यक्ती नसते. सुदृढ समाज हा समानतेच्या, स्वातंत्र्याच्या व न्यायाच्या पायावर उभारलेल्या घटक व्यक्तींचाच असतो, आणि समलैंगिक या घटकांपैकीच एक आहेत. पण आपल्या समाजमनात लैंगिक असमानता इतकी खोल रुजली आहे की; लौकिकार्थाने पुरुषी असलेले कर्तृत्व करून दाखवणाऱ्या नारीचा ‘मर्दानी’ झांशीवाली म्हणून सत्कार होतो आणि लौकिकार्थाने बायकी मानल्या गेलेल्या आवडी असणाऱ्या नराला षंढ-बायल्या म्हणून हिणवले जाते. एवढे आपण कोत्या मनाचे आहोत. पुरुषीपणाचा अंतिम निकष हा अपत्य होणे असा असल्याने विनापत्य जोडप्याला सामाजिक पातळीवर खालचे स्थान असते, इतके आपले जगण्याचे निकष तकलादू आहेत. रोजचे आयुष्य जगताना सहजपणे स्त्रीपणाबद्दल कमीपणा व पुरुषीपणाबद्दल वरचढपणा आपण हद्दपार करू शकलो, तरच लैंगिक समानता येणार आहे. सर्व माणसे सम नाहीत, विषमता आहेच; पण तरीही सर्व समान आहेत– असमान नाहीत, ही जाणीव वर्तनात रुजणे महत्वाचे. असे झाले तर कोणाचे कोणावर प्रेम आहे, याला काहीच अर्थ उरणार नाही, कारण स्त्री व पुरुष हा भेद केवळ प्रजननसंस्थेपुरताच उरेल.
समलैंगिक संबंध म्हणजे केवळ दोन पुरुष / दोन स्त्रिया / तृतीयपंथी यांच्या लैंगिक अवयवांचे तात्पुरते-छुपे संबंध नाहीत. इतर सर्व मानवी संबंधांच्याप्रमाणे दोन सज्ञान समलैंगिक व्यक्तींच्यामध्ये संमतीने प्रेमाचे, भावनांचे व्यवहार होतात, एकमेकांच्या मानसिक आधाराची, आर्थिक पाठबळाची, रोजच्या जगण्यातील जोडपे म्हणून घडामोडींची, बौद्धिक-वैचारिक आकलनांची इ. त्या संबंधानाही तेवढीच गरज असते. समाजाने- नातलगांनी पाठींबा दिल्यास समलैंगिक नातीसुद्धा दृढ-आजीवन होऊ शकतात. उलट आपल्या लैंगिक-भावनिक कला नुसार खरे आयुष्य जगल्यास, खोटेपणाची घुसमट थांबून सुख मिळण्याची जास्त शाश्वती असते. पुरुषीपणाचे/स्त्रीत्वाचे लादलेले जुनाट नियम मोडून जी माणसे मुक्तपणे जबाबदार,कृतीशील,संवेदनशील नागरिक म्हणून प्रतिष्ठेने जगू शकतील, तीच सुदृढ व प्रगत समाज निर्माण करतील. सर्वाना समान हक्क असलेला समाजच योग्य वैचारिक प्रगती, भौतिक विकास आणि मानसिक आरोग्य साधू शकेल. अजूनही ज्या व्यक्ती इतरांचे लैंगिक-भावनिक स्वातंत्र्य मान्य करू शकत नाहीत, त्या बुरसटलेल्या पितृसत्ताक मागास संकल्पनांना कवटाळून बसत आहेत. हा वर्ग समानतेच्या तत्वाशिवाय कोणत्या मानसिक व वैचारिक प्रवासाला-घडामोडींना कसा सामोरा जाणार? समलैंगिक व्यक्तींना त्यांचे विवाह वगैरे पुढील हक्क न दिल्यास, या व्यक्तींचे विवाह नकळतपणे आपल्याशी / आपल्या आप्तांशी झालेले चालणार आहेत का?
भारतीय विवाहसंस्थेचे स्वरूप मागील शतकात खूप बदलत आले आहे. तरीही अजून आंतरजातीय विवाहसुद्धा आपल्याला सहज मान्य होत नाहीत. आपण पारंपारिक कुटुंबपद्धतीच्या चौकटी मोडून नवीन रचना स्वीकारण्याचा लवचिकपणा दाखवत नाही. लवचिक नसलेली कोणतीही गोष्ट शेवटी ताणाने मोडून पडते. दोन बाप वा दोन आया आणि दत्तक मुले अशीही कुटुंबरचना यशस्वी होणे शक्य आहे, पण समाजाचा पाठींबा यास आवश्यक आहे. आणि पाठींबा/ मान्यता द्यायची म्हणजे नक्की काय असे उचलून द्यायचे असते? आपल्याला त्याबद्दल विचित्रपणा/ किळस/घृणा इ काहीही वाटले, तरीही त्या वाटण्याचा बाऊ न करता संवेदनशीलता बाळगून समोरच्याला समानतेने-सन्मानाने माणूस म्हणून जगण्याचा मुलभूत हक्क आहे, हे सत्य स्वीकारणे हेच गृहीत आहे फक्त. ही मान्यता दिली नाही तरीही समलैंगिकता स्वयंभू अस्तित्वात असतेच आणि आता तर कायदेशीररीत्या या व्यक्ती आनंदाने जगूही शकतात, फक्त प्रतिष्ठेमुळे त्यांचा जगण्याचा लढा सोपा होईल.
संख्याबळावर असलेल्या वरचढ भावनेने अजूनही विषमलैंगिक समाज हा पिडीत समलैंगिक गटाला समानतेचा मुलभूत हक्क ‘’देतो’’ आहे, यातच आपल्या सामाजिक संरचनेचा पराजय आहे, खरे तर. मुळात ही मान्यता देण्याचा वा नाकारण्याचा अधिकार ठराविक बहुसंख्य समाजाला आहेच का? समानतेचा संवैधानिक व मानवी हक्क प्रत्येकाला असतोच, तो बजावण्याचा बाकी राहतो फक्त बऱ्याचदा. इथ्रून पुढे बहुसंख्य समाजाला वैचारिक आळसात पडून राहणे परवडणार नाही. आपल्यावर– आपल्या कुटुंबावर याचा विचार करण्याची कधी वेळच येणार नाही, आली तरी पाहून घेऊ; अशा गैरसमजुतीत राहणे अरेरावीचे आहे. सन्मानाने केवळ जगण्यासाठी लढणे हे फार भयानक असते, आणि ही वेळ उद्या तुमच्या मुलांवर, नातेवाईकांवर, मित्र-मैत्रिणींवर कधीही येऊ शकते. कोण समलैंगिक आहे ते चेहऱ्याकडे पाहून सांगता येत नाही. वाचकहो, या विषयाबाबत अज्ञान, भीती, तिटकारा इ वाटणे, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, तो योग्य माहितीच्या आधारे सोडवा, संवेदनशीलता बाळगा. समानतेसाठी ज्ञान मिळवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. प्रबोधन आपोआप होण्याची वाट पाहू नका, तर विविधतेचा स्वीकार, आत्मभान, आत्मप्रबोधन याबद्दल सजग बना. नुसतेच प्रश्न विचारू नका, तर भावनिक न होता, संयमाने उत्तरे शोधा. अन्यथा सुजाण-संवेदनशील, वैचारिकदृष्ट्या प्रगत, जागतिक समाज तुमची वाट पाहत थांबणार नाही, तुम्हाला खांद्यावर वाहून नेणार नाही; तो पुढे जाईल आणि तुम्ही काळाच्या मागे रहाल.
अधिकृत माहितीसाठी पुस्तक : इंद्रधनू- समलैन्गिकतेचे विविध रंग: बिंदूमाधव खिरे.
- अनिकेत गुळवणी
- मानवशास्त्र विद्यार्थी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
-

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी मी एकदम सहमत आहे. समलैंगिक संबंध हे गुन्हेगारी कृत्य नाहीच व नसायलाच हवं होतं.
.
पण तुमचा एकूण लेख डोकं भंजाळून टाकणारा आहे. उदा. खालील वाक्य -
.

सर्व माणसे सम नाहीत, विषमता आहेच; पण तरीही सर्व समान आहेत– असमान नाहीत, ही जाणीव वर्तनात रुजणे महत्वाचे.

.
याचा अर्थ सांगाल का ?
.
A is not equal to B.
B is not equal to C.
However A is equal to B. And B is equal to C. असं म्हणताय काय ??
.
.
----------------
.

संख्याबळावर असलेल्या वरचढ भावनेने अजूनही विषमलैंगिक समाज हा पिडीत समलैंगिक गटाला समानतेचा मुलभूत हक्क ‘’देतो’’ आहे, यातच आपल्या सामाजिक संरचनेचा पराजय आहे, खरे तर. मुळात ही मान्यता देण्याचा वा नाकारण्याचा अधिकार ठराविक बहुसंख्य समाजाला आहेच का? समानतेचा संवैधानिक व मानवी हक्क प्रत्येकाला असतोच, तो बजावण्याचा बाकी राहतो फक्त बऱ्याचदा.

.
.
ह्या वाक्यांबद्दल -
.
(१) विषमलैंगिक समाज हा पिडीत समलैंगिक गटाला समानतेचा मुलभूत हक्क ‘’देतो’’ आहे.
(२) वरील वाक्य (१) मधे हे "देतो" असं म्हणणे हा आपल्या सामाजिक संरचनेचा पराजय आहे असं तुम्ही म्हणता. असं असेल तर ...
(३) संविधानाने जो समानतेचा "हक्क दिला" तेव्हा ते "हक्क देणे" हा संविधानाचा पराजय आहे का ?
(४) समानतेचा हक्क हा मानवी हक्क असतोच - या वाक्याचा अर्थ काय ? तो हक्क निसर्गत:च आहे ? मानव अस्तित्वात आहे म्हणून तो हक्क अस्तित्वात आहे ?
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. सर्व माणसे सम नाहीत, विषमता आहेच; पण तरीही सर्व समान आहेत– असमान नाहीत, ही जाणीव वर्तनात रुजणे महत्वाचे.
याचा अर्थ : माणसांमध्ये सर्व तऱ्हांची विविधता आहे, ती एकमेकांना आवडत नसेलही कदाचित. पण मानवी मूल्यांच्या दृष्टीने सर्व माणसांचा दर्जा एकसारखा आहे. कनिष्ठता ज्येष्ठता नाही. सम = identical / same समान =equal

२.
संख्याबळावर असलेल्या वरचढ भावनेने अजूनही विषमलैंगिक समाज हा पिडीत समलैंगिक गटाला समानतेचा मुलभूत हक्क ‘’देतो’’ आहे, यातच आपल्या सामाजिक संरचनेचा पराजय आहे, खरे तर. मुळात ही मान्यता देण्याचा वा नाकारण्याचा अधिकार ठराविक बहुसंख्य समाजाला आहेच का? समानतेचा संवैधानिक व मानवी हक्क प्रत्येकाला असतोच, तो बजावण्याचा बाकी राहतो फक्त बऱ्याचदा.
याचा अर्थ : पितृसत्ताक सामाजिक संरचना शेतीच्या शोधासोबत अंदाजे दहा हजार वर्षांपूर्वी जेव्हा बनली , तेव्हा तिने लैंगिक समानता मुळातच बहाल केली नाही , ती मिळवण्यासाठी दहा हजार वर्षांनी भारतीय राष्ट्राने ( समाजाने नाही ) संविधान बनवले. म्हणून सामाजिक संरचनेचा पराजय व संविधानाचा जय.

३.समानतेचा हक्क हा मानवी हक्क असतोच - या वाक्याचा अर्थ काय ? तो हक्क निसर्गत:च आहे ? मानव अस्तित्वात आहे म्हणून तो हक्क अस्तित्वात आहे ?
उत्तर : मानवी हक्क हे मानवाने निर्माण केलेले आहेत , ते निसर्गाचे / जैविक नाहीत. इतर प्राण्यांत क्वचित आढळतात. सामाजिक संरचनेने उत्क्रांत होतानाच मानवतेच्या दृष्टीकोनातून समानता हे '' मानवी'' मूल्य स्वीकारणे अपेक्षित आहे. त्यासाठी संविधान / कायदा अवतीर्ण होण्याची वाट बघायची वेळ का यावी ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला काहीही समजलं नाही.
कनिष्ठता ज्येष्ठता नाही ?? - कोणत्या दृष्टीने पाहिलंत तर तुम्हाला ज्येष्ठता व कनिष्ठता अस्तित्वात नसल्याचे दिसते ?
.
उदा. मनमोहन सिंग आणि लालू यादव ह्या दोघांमधे ज्येष्ठ किंवा कनिष्ठ कोणीच नाही असं म्हणताय ?
मोहनदास करमचंद गांधी आणि नथुराम गोडसे हे दोघेही समान आहेत ? त्यांपैकी कोणीही ज्येष्ठ नाही वा कनिष्ठ नाही ?? मग गांधींना महात्मा का म्हणायचं ?
अमिताभ बच्चन, मोहन चोटी, केस्टो मुखर्जी, राजेश खन्ना, सत्येन कप्पू यांच्यापैकी कोणीही ज्येष्ठ नाही वा कनिष्ठ नाही ??
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमिताभ बच्चन, मोहन चोटी, केस्टो मुखर्जी, राजेश खन्ना, सत्येन कप्पू यांच्यापैकी कोणीही ज्येष्ठ नाही वा कनिष्ठ नाही ??

अभिनय हे मूल्य आहे का?
वरती गुळवणी म्हणतायत की मूल्यांच्या संदर्भात माणसाला समान लेखणे आवश्यक आहे.
उदा- माणुसकी, सत्यनिष्ठता, समानता, त्यागीपणा, नि:स्पृहता, न्यायी वृत्ती ही मूल्ये झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरती गुळवणी म्हणतायत की मूल्यांच्या संदर्भात माणसाला समान लेखणे आवश्यक आहे.
उदा- माणुसकी, सत्यनिष्ठता, समानता, त्यागीपणा, नि:स्पृहता, न्यायी वृत्ती ही मूल्ये झाली.

.
कोणत्या मूल्यांच्या दृष्टीने पाहिलं की मो क गांधी व् नथुराम गोडसे यांच्यातली श्रेष्ठता व कनिष्ठता लुप्त होते ?
.
एखादी व्यक्ती महान आहे असं म्हणतो आपण (उदा. टिळक, आगरकर) तेव्हा त्यातून समानता दिसते की असमानता ?
केशव गंगाधर टिळक श्रेष्ठ होते की सोम्यागोम्या कापसे ? जर ते दोघेही समान होते तर सोम्यागोम्या कापसे चा इतिहासात धडा का नसतो ? टिळकांचाच का असतो ?
.
व्यक्ती आईवडिलांच्या पाया पडते तेव्हा त्यातून ज्येष्ठता व कनिष्ठता दिसते की नाही ?
.
मतदानाचा अधिकार हा १८ व्या वर्षीच का दिला जातो ? १७ व्या वर्षी व्यक्ती मतदान करण्यास अपात्र असते ते असमानतेचे प्रतीक की समानतेचे ?
.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माणुसकी, सत्यनिष्ठता, समानता, त्यागीपणा, नि:स्पृहता, न्यायी वृत्ती ही मूल्ये झाली. या वाक्याचा अर्थ तुम्ही असा घेताय की मो क गांधिंची व नथुराम गोडसेची माणूसकी समान होती, त्यांचा चांगुलपणा, सत्यनिष्ठा, त्यागी वृत्ती , नि:स्पृहता समान होती.
तसा अर्थ नसून, आपण या दोहो व्यक्तिंना समान दृष्टीने पहावयास हवे असा आहे. जे की आपण पहातो. गांधिजींनी गोडसेचा खून केला असता तर त्यांना ही तीच शिक्षा झाली असती जी गोडसेने गांधिजिंची हत्या केल्यावर गोडसेस झाली. याला समानता म्हणता येइल.
.
१७ व्या वर्षी मतदान करण्यास 'प्रत्येकजणच' अपात्र असतो ही अध्याहृत समानता. मग गरीब २० व्या वर्षापर्यंत अपात्र व श्रीमंत १० व्यावर्षीच पात्र अशी असमानता नसते.
.
याउलट भिन्नलिंगी व्यक्तींस विवाहास मान्यता पण समलैंगिक व्यक्तिंना अमान्यता या मध्ये स्वातंत्र्य या मूल्याची गळचेपी झालेली आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखकाचं मला समजलेलं म्हणणं-

कर्तृत्वाचे आणि अस्तित्वाचे निकष हे दोन वेगळ्या जातकुळीचे आहेत. पैसा, प्रसिद्धी, मानसन्मान हे कर्तृत्वानुसार मिळतात. आणि ती विषमता समाजात दिसते. पण एक मनुष्य म्हणून काही अधिकार मान्य झालेले आहेत. यातच समानतेचं तत्त्व अंगिकारलं गेलेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कर्तृत्वाचे आणि अस्तित्वाचे निकष हे दोन वेगळ्या जातकुळीचे आहेत. पैसा, प्रसिद्धी, मानसन्मान हे कर्तृत्वानुसार मिळतात. आणि ती विषमता समाजात दिसते. पण एक मनुष्य म्हणून काही अधिकार मान्य झालेले आहेत. यातच समानतेचं तत्त्व अंगिकारलं गेलेलं आहे.

.
.
निळा मजकूर विवेचन आहे. सत्य आहे.
.
१७ वर्ष वयाच्या कोणत्याच व्यक्तीला मतदान करता येत नाही ही समानता आहे असं शुचि म्हणते.
.
आता १७ व्या वर्षी व्यक्ती - (अ) माणूस/ नागरिक नसते किंवा (ब) कमी प्रमाणावर माणूस/ नागरिक असते म्हणून व्यक्तीला मतदान करता येत नाही ???
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनुष्य च्या जागी सद्न्यान असे हवे. उद्या म्हणाल "विवाहास मान्यता" पाळण्यातिल बाळाला का नाही? ते बाळ मनुष्य नाही? तर माझे म्हणणे हे आहे की सद्न्यान व्यक्तींचे जे अधिकार मान्य केलेले आहेत त्यात समानतेचे तत्व अंगीकारलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी लेखकाला काय म्हणायचं आहे त्यातलं मला काय समजलं ते सांगितलं. लाल मजकूर समजण्यासाठी तुम्ही universal declaration of human rights का वाचत नाही? बहुतांश जगाने जे मान्य केलेलं आहे त्याबाबत मला 'अमुक असंच का?' काय विचारता? डोंट शूट द मेसेंजर.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डोंट शूट द मेसेंजर.

.
जो डर गया.... समझो ....
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोहनदास करमचंद गांधी आणि नथुराम गोडसे हे दोघेही समान आहेत ? त्यांपैकी कोणीही ज्येष्ठ नाही वा कनिष्ठ नाही ??

या दोहोंपैकी नेमके कोण ज्येष्ठ आणि कोण कनिष्ठ असे आपले म्हणणे आहे?

..........

निव्वळ वयाने नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या दोहोंपैकी नेमके कोण ज्येष्ठ आणि कोण कनिष्ठ१ असे आपले म्हणणे आहे?

.
तुम्ही "कोण" हा प्रश्न विचारलेला आहे.
"का" हा प्रश्न विचारलेला नाही.

मोहनदास करमचंद गांधी हे श्रेष्ठ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोहनदास करमचंद गांधी हे श्रेष्ठ.

ठीक.

तुम्ही "कोण" हा प्रश्न विचारलेला आहे.
"का" हा प्रश्न विचारलेला नाही.

Smile

पुढचा प्रश्न (/ कुतूहल):

(तुमच्या मते) का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या दोहोंपैकी नेमके कोण ज्येष्ठ आणि कोण कनिष्ठ१ असे आपले म्हणणे आहे?

हा तुमचा मूळ प्रश्न. दोहोंपैकी हा कीवर्ड.

मो क गांधी हे खुनी नाहीत म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपले मूळ विधान:

मोहनदास करमचंद गांधी आणि नथुराम गोडसे हे दोघेही समान आहेत ? त्यांपैकी कोणीही ज्येष्ठ नाही वा कनिष्ठ नाही ?? मग गांधींना महात्मा का म्हणायचं ?

आता, आपल्याच म्हणण्यानुसार, मो.क.गांधी आणि न.गोडसे या दोहोंपैकी मो.क.गांधी हे ज्येष्ठ/श्रेष्ठ, कारण मो. क. गांधी हे खुनी नाहीत म्हणून.

एर्गो, मो.क.गांधी हे खुनी नाहीत म्हणून त्यांना महात्मा म्हणायचे?

अहो पण मीदेखील आजतागायत एकही खून केलेला नाही हो!

- (महात्मा) 'न'वी बाजू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

एर्गो, मो.क.गांधी हे खुनी नाहीत म्हणून त्यांना महात्मा म्हणायचे?
अहो पण मीदेखील आजतागायत एकही खून केलेला नाही हो!

.
यही तो मै कह रहा हूं मालिक.
.
किमान बसंती, मौसी, राधा, रामलाल यांना तरी महात्मा म्हणावे. त्यांनी एकही खून केलेला नाही.
.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. गांधीजीनी खून केला नाही , किंवा इतर महान कार्ये केली ; नथुरामने खून केला , महान कार्ये केली नाहीत .= खाजगी वागण्यात समता नाही / विषमता आहे.
२. गांधीजी अथवा नथुराम; दोघांपैकी कोणीही कोणाचाही खून केला, तरी माणूस म्हणून दोघांवर खटला होऊ शकतो = मानवी - संविधानिक समानता आहे / असमानता नाही .
३. म्हणून गांधी व नथुराम सम नाहीत पण समान आहेत.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लौकिकार्थाने पुरुषी असलेले कर्तृत्व करून दाखवणाऱ्या नारीचा ‘मर्दानी’ झांशीवाली म्हणून सत्कार होतो आणि लौकिकार्थाने बायकी मानल्या गेलेल्या आवडी असणाऱ्या नराला षंढ-बायल्या म्हणून हिणवले जाते.

झाशीच्या राणीच्या बाबतीत आणि एकंदरच कोणती गोष्ट पारंपरिकरीत्या हिणकस समजली जाते याबद्दल तुमची मतं मला फार पटली नाहीत.

मर्दानगी काय ती खरी, आणि ती मर्दानगी अस्सल तेव्हाच ठरते जेव्हा ती 'देव, देश अन धर्मा'साठी वापरली जाते. दे-दे-धसाठी पोरं काढणं, बायकांनी घरकाम करणं आणि पुरुषांनी लढाईच्या मैदानात जीव देणं हेच काय ते खरं असतं. त्या महान कर्माच्या आड येणारे सगळे वाईट. रणांगणावर लढण्यासाठी मुलगा देऊ न शकणारी बाई आणि पुरुष, समलैंगिक, असलेली व्यवस्था नाकारणारे कोणीही हे सगळे वाईट असतात.

झाशीच्या राणीनं ब्रिटिशांशी लढा दिला तोही धर्मासाठीच. 'आपणासारख्या रांडमुंडेला शस्त्र हाती धरावं लागत आहे' याचं तिनं जे कारण दिलेलं होतं, तो देवधर्मच होता. तेव्हा देश ही संकल्पना तेवढीशी साकारलेली नव्हती म्हणून तेवढी सूट तिला मिळते.

स्वतःची थोडी मतं असण्याचा प्रयत्न केला की लगेच हे देव-देश-धर्म कसे ब्लॅकमेलसाठी वापरले जातात ते दिसत नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्वतःची थोडी मतं असण्याचा प्रयत्न केला की लगेच हे देव-देश-धर्म कसे ब्लॅकमेलसाठी वापरले जातात ते दिसत नाही का?
हे वाक्य माझ्या लेखाच्या संदर्भात कळले नाही .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'मर्दानी' झाशीची राणी देव-धर्मासाठी लढली म्हणून ती खपून जाते. केस बारीक कापणाऱ्या, जीन्स वापरणाऱ्या, किंवा एकंदरच पुरुषी असणाऱ्या डाईक वा अन्य स्त्रियांना समाज स्वीकारत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

करेक्ट!!!
तद्वतच, पुरुषांनी हाउसहजबंड होण्यात काय चूकीचे आहे तेच मला कळत नाही. धर्माच्या नावाखाली गांजा ओढत प्रवचन देणारे बुवा चालतात पण हौशजबंड म्हटलं की बायल्या, नालायक अशी शेलकी विशेषणे लागतात.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केस बारीक कापणाऱ्या, जीन्स वापरणाऱ्या, किंवा एकंदरच पुरुषी असणाऱ्या डाईक वा अन्य स्त्रियांना समाज स्वीकारत नाही.

हे आर्ग्युमेंट असेल तर ते तितकंसं बळकट नाही. कदाचित घाईत/संक्षिप्त लिहिल्यामुळे तुमचा मुद्दा स्पष्ट झाला नाही.

प्रतिवाद हा - कायदेशीर, राजकीय, सामाजिक अशा वेगवेगळ्या पातळीवर होऊ शकतो.

(१) डाईक स्त्रियांना गुन्हेगार मानून शिक्षा दिली जात नाही. व समलिंगींची ती समस्या होती. कायदेशीर दृष्ट्या डाईक या गुन्हेगार नाहीत.

(२) दुसरं म्हंजे "फ्रीडम ऑफ असोशिएशन" आहे म्हंजे "राईट ऑफ असोशिएशन" नाही. म्हंजे इतरांनी डाईक्स ना आपलं मानावं, स्वीकारावं अशी संविधानीक/कायदेशीर तरतूद अजिबात नाही. That means a dyke can not require someone else to associate with her. If she is requiring someone else to associate with her then it will be violation of that someone else's freedom of association.

(३) इतरांनी तुम्हाला स्वीकारावं असं वाटत असेल तर इतरांच्या अपेक्षांची पूर्ती करा. म्हंजे "दुनियाने हमको दिया क्या ? दुनिया से हमने लिया क्या ? हम सबकी पर्वा करे क्यो ? सबने हमारा किया क्या ? दम मारो दम - हा होरा कसा चालेल ?

(४) स्त्रियांनी (किंवा पुरुषांनी सुद्धा) विशिष्ठ कपडे, पेहराव करणे हे कोणी एका व्यक्तीने ठरवून दिलेलं व बळजबरीने राब्वलेलं नाही. This norm/convention emerged.

(५) One of the purposes of informal (e.g. conventions, customs, norms) institutions is to set up acceptable and unacceptable forms of behavior. These informal institutions facilitate the process of building trust between transactors participants/associates. "Facilitate" is the key word. If one does not confirm to the norms, conventions then it is hard to develop trust because the other party has no other way to ascertain that you will abide by generally accepted ways (e.g. reciprocity). So the other party becomes reluctant to associate with the dyke. The other party can definitely NOT be blamed for choosing to not associate with a dyke.
.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह शूट डाइक चा अर्थ हापिसातुन पाहीला Sad ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या प्रतिसादाचा वा प्रतिवादाचा माझ्या मूळ मुद्द्याशी संबंध लावून देणाऱ्या व्यक्ती, व्यक्तिसमूह वा सदस्यनामांस व्हाॅट्सॅप विद्यापीठातर्फे विद्यावाचस्पती ही पदवी vivaशिवाय मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या प्रतिसादाचा वा प्रतिवादाचा माझ्या मूळ मुद्द्याशी संबंध लावून देणाऱ्या व्यक्ती, व्यक्तिसमूह वा सदस्यनामांस व्हाॅट्सॅप विद्यापीठातर्फे विद्यावाचस्पती ही पदवी vivaशिवाय मिळेल

.
शाळेत जायला लागलीस की कळेल तुला.
तोपर्यंत तू आपली जुनी भांडी घे आणि नवीन कपडे दे.
बोव्हारणींनी कसं .... आपलं काम बरं आणि आपण बरं - असं वागावं.
घरात नाही दाणा अन म्हणे बर्शन आणा - कशासाठी ?
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ2

कुणा कवीची मदत घेऊन >>शाळेत जायला लागलीस की कळेल तुला.
तोपर्यंत तू आपली जुनी भांडी घे आणि नवीन कपडे दे~~~>> याचं काव्य शार्दुलविक्रिडितमध्ये बांधून घे गब्बर. वाटसपमध्ये फोफावेल नक्की.
तीफुलराणीसारखे शिकवेनमीतुलाधडा.
-
गब्बराच्या विनोदबुद्धीचे कौतुक करावे तेवढे थोडेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या प्रतिसादाचा वा प्रतिवादाचा माझ्या मूळ मुद्द्याशी संबंध लावून देणाऱ्या व्यक्ती, व्यक्तिसमूह वा सदस्यनामांस व्हाॅट्सॅप विद्यापीठातर्फे विद्यावाचस्पती ही पदवी vivaशिवाय मिळेल.

अशा प्रतिसादासाठीच तर गब्बर सिंग यांनी खटाटोप केला नव्हता ना... अशी (उगी) शंका येते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

शंका? आणि तीही कंसातली उगी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संशयाला (चुकून) जागा राहिली असावी म्हणून - शंका.
(संशयाला जागा नसावी इतपत ओळखत नाही.)

अंदाज बहुधा चुकीचा असू शकेल म्हणून - उगी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

गब्बरचा मुद्दा मान्य आहे. उत्तम मुद्दा.

इतरांच्या अपेक्षांची पूर्ती करा.

काही ईझीगोईंग स्त्रिया हा पर्याय निवडतील. तर अन्य बंडखोर स्त्रिया, इतरांच्या अपेक्षा बदलण्याचे जिकीरीचे व थँकलेस काम हाती घेतील.
सावित्रीबाई फुले व म, फुले यांनी जर म्हटले असते की 'स्त्रियांनी शिकू नये' या समाजाच्या अपेक्षांची पूर्ति करणच योग्य आहे. तर आतापरयंत स्त्रियांचे हाल तसेच राहीले असते गब्बर.

बळजबरीने राब्वलेलं नाही

पॅसिव्ह-ॲग्रेसिव्ह बळजोरीच होते ती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केस बारीक कापणाऱ्या, जीन्स वापरणाऱ्या,

?????????????????????????????????????????
कुंकड झालं असं मनायचं?
किमान मागच्या काळात तरी म्हणायचात हो.
======================================
बाय द वे, जास्त केस झाले कि समाज जौ द्या, बाप आणि मास्तर स्वीकारायचे नाहीत ही आम्ही पुरुष असल्याने आम्हाला कथा माहित नाही. उगाच समाजस्वीकृतीचा, न स्वीकृतीचा गाढवासारखा कसा अर्थ काढावा याचं उत्तम उदाहरण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जेन्डर रोल आणि जेन्डर एक्सप्रेशन यात तुम्ही थोडी गल्लत करत आहात.
१ बाईने लग्न करून मुले पैदा करणे, गृहकृत्यदक्ष असणे इ बाईचे जेन्डर रोल्स आहेत. आणि बायकी कपडे , लांब केस हे जेन्डर एक्सप्रेशन .
२. बाईने बायकी दिसले - वागले नाही तर एकवेळ समाजाला ते चालते, पण बाईची कर्तव्ये पार पाडावीच लागतात , नाहीतर स्त्रीत्वाला बट्टा लागतो.
३. झाशीची राणीने पुरुषी कपडे घालून , केस कापून जेन्डर एक्स्प्रेशन झुगारले असेलही कदाचित, पण आईपणा / स्त्रीत्वाचे कर्तव्य पार पाडूनही तिने लढण्याचे ' पुरुषी' कर्तव्य दाखवले म्हणून तिचा सत्कार होतो.
४. यात अनुस्यूत असे की, राणीने बायकी जेन्डर रोल सांभाळून पुरुषी जेन्डर रोल सुद्धा निभावला ; म्हणजे दुय्यम कर्तव्य पार पाडून उच्च कर्तव्य सुद्धा पार पडले. ही समाजाची दुटप्पी मानसिकता . एवढेच माझे म्हणणे . dyke ला समाज स्वीकारत नाही हा अजून निराळा मुद्दा आहे.
५. पुरुषाने पैसे कमावणे इ जेन्डर रोल निभावला नाही तर विरुद्ध पुरुष बायकी असेल तर : समाज परत दुटप्पीपणा दाखवतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वतःची थोडी मतं असण्याचा प्रयत्न केला की लगेच हे देव-देश-धर्म कसे ब्लॅकमेलसाठी वापरले जातात ते दिसत नाही का?
ह्याबाबतीत मीही संदिग्ध.

बाकी उपरोक्त उपरोधितांशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

इंडिअन एक्स्प्रेसमधले लेख वाचले तर उलगडा होईल.
साहचर्य हा मूलभूत उच्चाधिकार मानून इतर त्यास छेद देणारी कलमं काढली हे समजलं.
उदाहरणं घेतल्याने काही गोष्टी आणखीनच क्लिष्ट होतात त्यापैकी एक घटना आणि नागरिकांचे हक्क, विश्वरचना इत्यादि आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुवा द्या च्रट्जी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डेबनेअर मासिकाचा पुर्वीचा संपादक अनिल धारकर अजूनही लिहितो! पण क्रिकेटचा लेख म्हणून वाचला नाही.
------
Indian Express ,Saturday, September 8,
1) Editorial - Arundhati Katju
Rights-over-wrong-

2) by Bibek Debroy
A Law of its time

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. वाचेनच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादकांचे प्रतिसाद वाचून मनोरंजन झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजून आहे हो पुढं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हां तो जैसे मुझे याद है, १९४७ मध्ये मागास, अन्यायी, अवैद्न्यानिक, पापी, इ इ भारतीय समाजाला चंद महाद्न्यानी, आधुनिक, इ इ लोकांनी वळण लावून घटना, व्यवस्था इ इ प्रदान केली होती. मग आता घटनेतलं कलम दुरुस्त झालं असेल, वा कायदा दुरुस्त झाला असेल तर महाद्न्यानी लोकांना शिव्या घाला ना. त्या बिचाऱ्या मागास, अन्यायी, अवैद्न्यानिक, पापी, इ इ भारतीय समाजाला का शिव्या घालताय? त्यांचा संबंधच काय? देश तर शहाणे लोक चालवत होते ना? का मागास, अन्यायी, अवैद्न्यानिक, पापी, इ इ भारतीय समाजाला शिव्या घातल्याशिवाय करमत नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

समाजधारणा बदलत असतात हो. त्यानुसार वेळोवेळी नियम बदलावे लागतात. नियमधर्म बदलता असतो. यमधर्म शाश्वत. (इति कोणीतरी ऋषी) फार पूर्वी सोमरसपान किंवा सोमरसनिर्मिती, संचय गुन्हा नव्हता. आज काही आधुनिक मादक पदार्थ बाळगणे गुन्हा आहे. द्विभार्याप्रतिबंधक कायदा आणावा लागला. एके काळी अनेक अंगवस्त्रे असणे प्रतिष्ठेचे होते. राजरोस होते. आज लपूनछपून करावे लागते. समलैंगिक संबंध प्राचीन काळी मान्य होते असतील पण मध्य युगात तिरस्करणीय झाले. समाजधारणा आणि मान्यता बदलतात तेव्हा
' धारयति इति धर्म:' या व्याख्येप्रमाणे धर्मात बदल घडतात. किंवा काही वेळा समाजधारणा चुकीची आहे, ती बदलली पाहिजे; असे मानणारे ज्नाते आणि द्रष्टे लोक नियमधर्मात बदल घडवून आणतात. दोन्ही प्रकारांत समाजात सुव्यवस्था असावी हाच सद्हेतु असतो. सद् हेतू नसताना केलेले बदल विध्वंसक असतात. घडी बिघडवतात.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही प्रकारांत समाजात सुव्यवस्था असावी हाच सद्हेतु असतो. सद् हेतू नसताना केलेले बदल विध्वंसक असतात. घडी बिघडवतात.

.
सदहेतूंमधून केलेल्या नियमांमुळे विध्वंस घडत नाही / घडी बिघडत नाही - या शक्यतेबद्दल तुम्ही काही टिप्पणी केलेली नाहिये.
मी असं गृहित धरत नैय्ये की तुम्हाला हे माहीती नाहीच वा नसेलच. कदाचित विस्तारभयास्तव तुम्ही ते वगळलं असेल.
पण याकडे मी तुमचं/इतरांचं लक्ष्य वेधू इच्छितो.
Law of unintended consequences असं म्हणतात.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पितृसत्ताक मांडणी ही नेहमीच असमानतेवर आधारलेली असते आणि त्यात ठराविक गटांचे हितसंबंध जुळलेले असतात.

हे कसं झालं म्हणायचं?
--------------------------------------
पितृसत्ताक पद्धतीत कोणाचा कोणता समतेचा अधिकार नसतो?
-----------------------
सध्याला लोकशाहीत लोक सोडून इतर सर्व, जसे की शासक, राजकारणी, शेतकरी, उद्योजक, पत्ते खेळणारे लोक, इ इ सर्वांवर प्रचंड अन्याय होतो म्हणणं जितकं हास्यास्पद आहे तितकं हे विधान जोक आहे.
--------------------------
आणि भाऊ, हे ठराविक गट कंचे मनायचे? आता त्यांना हितसंबंध का नकोत?
------------------------------------
पिता हा घरातील अन्य सर्वांचा शोषक असतो हा जावईशोध कसा लागला म्हणे?
-------------------------
एका घरात बाईला, एकात पुरुषाला इ इ सत्ता दिली असमानता , अन्याय कसा जाईल म्हणे? बायका काय आन पुरुष काय, सत्ता मिळाली की अन्याय करणारच असं का? मग काय सत्ताहिन कुटूंबपद्धती चालवणार का? मंजे सत्ता एका कंसल्टींग कंपनीला आउटसोर्स करून दोघांनी समानतेने घर कसे चालवायचे म्हणे? याचं काही टेंम्प्लेट ॲग्रीमेंट आहे का तुमच्याकडे? उगाच उचलली जीभ नी लावली टाळाला.
---------------------
ह्या जुळलेल्या हितसंबंधांची उदाहरणे देता का? उदा. एका घरातला आजोबा, पुत्र, बाप, पुतण्या, काका, नातू, शेजारचे पुरुष, जावई, व्याही, इ इ मिळून आजींविरुद्ध वा तसेच कोणाविरुद्ध कोणता कट रचत असतात?
---------------------------
पुरुषांत प्रधानत्व करण्याची कलात्मक, गुणात्मक वा मूल्यात्मक लायकी नसते असा शोध कोणत्या प्रयोगशाळेत लागला आहे? मग ते प्रधानत्व काढून बायकांना देण्यात काय पॉइंट आहे? आन ते मिळाल्यावर त्या ते गुपगुमान नीट वापरतील याचा काय भरोसा? मग बाईच्या जागी बाब्या आन बाब्याच्या जागी बाई करायचा खटाटोप कशाला?
------------------------
कोणतीही व्यवस्था प्रधानत्वाशिवाय चालत नाही (माणसांची जौद्या, माकडांची टोळी पण चालत नाही) हे तुम्हाला माहीत नाही का? मग पुरुषप्रधान या शब्दाला तुमचा जो विरोध आहे तो प्रधानत्वाच्या संकल्पनेला आहे (जो असल्यास तुमच्याशी बोलणे होपलेस असावे) कि पुरुषाच्या?
------------------------------
बहुतेक जगात अनेक ठिकाणी समलैंगिकांचा जो काही प्रॉब्लेम होता, आहे तो होता नि आहे नि त्या सर्व ठिकाणी पुरुषप्रधानतेचा या गोष्टींचा काही संबंध नाही. गारो हिल्स मध्ये, बोडोज मध्ये वा केरळ मध्ये (जिथे स्त्रीप्रधान व्यवस्था आहे) तिथे हा प्रॉब्लेम नाही हा जावईशोध कुठून लागला?
-----------------------
असली भंगस वाक्यं पेरलेली पाहून लेखं वाचायची इच्छा होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गरजेप्रमाणे प्रधानत्व असणे आवश्यक; पण एकाधिकारशाही चूक.. त्या ठिकाणी जी कोणी योग्य व्यक्ती असेल तिच्याकडे प्रधानत्व , तिची लायकी पाहून , लिंग पाहून नाही . निर्णय घेण्याचा अधिकार मात्र मिळून , सल्लामसलत होऊन मग.
पितृसत्ताक या शब्दातच पुरुष जातीकडे सत्ता व स्त्री कडे सत्ता नाही / कमी सत्ता हे येते. म्हणजेच समानता नाही. त्याची उदाहरणे अनेक आहेत.
हितसंबंध उदाहरण : एकटी राहणारी , पुरुषांचा आधार नसणारी , भारतातील , गरीब विधवा स्त्री जे पुरुषसत्तेकडून त्रास सहन करते ते. आजोबा, पुत्र, बाप, पुतण्या, काका, नातू, शेजारचे पुरुष, जावई, व्याही, इ मिळून त्या एकट्या स्त्रीला सन्मानाने सहजपने जगू देतात का ?
विवाहित स्त्रीला तिच्या मुलीला शिकवायचे असेल ( आणि त्या मुलीला शिकायचे असेल ) आणि घरातील पुरुषांना त्या मुलीचे लग्न करून द्यायचे असेल तर शेवटी कोणाचा निर्णय मान्य होतो बहुतांश वेळा ?
मातृसत्ता असणेही चुकीचे होईल. समानतेच्या तत्वावर घर चालू शकतेच माता - पिता मिळून निर्णय घेऊ शकतात , ( जे एकाचीच सत्ता असेल तर होत नाही )
पुरुषसत्ता / स्त्रीसत्ता दोन्ही नसावेत , स्त्रीची कर्तव्ये / पुरुषाची कर्तव्ये हा भेद नसावा , कोणीही योग्यतेनुसार कोणतीही जबाबदरी उचलावी. तर पुढील ( समलैंगिकता इ. ) प्रश्न सुटतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0