स्त्री मुक्ती असावी पण त्यात आपली बायको-सून-मुलगी-बहीण...?

माणसाचा जन्म कोणत्या कुटुुंबात व्हावा हे त्याच्या किंवा तिच्या हातात नसतं. माणूस विशिष्ट कुटुुंबात अनवधानाने जन्म घेतो आणि त्याचा पुढील प्रवास सुरू होतो. माणूस ज्या कुटुुंबामध्ये जन्म घेतो त्या कुटुंबाला जातीचे-धर्माचे कंगोरे असतात. कुटुंब हा समाजाचा भाग असल्यानं समाजानुसार भौतिक प्रश्न बदलतात. स्वाभाविकपणे व्यक्तीची जडणघडण बदलते. माझा जन्म असाच पूर्वाश्रमीच्या दलित आणि सध्याच्या बौद्ध कुटुुंबातला. कुटुुंबाला चळवळीचा वारसा. आई-वडील शिक्षक. शिकलेली पहिली पिढी. आई-वडलांकडून बाबासाहेब, सावित्रीबाई ऐकत आम्ही मोठे झालो. बाबासाहेबांच्या जयंतीला दहा वर्षांची असल्यापासून आई-वडील व्याख्यानांना घेऊन जायचे. त्यामुळे एक वैचारिक दिशा भेटत गेली. सामाजिक जाणीव वाढीस लागली. पुढे पुण्यात कॉलेजमध्ये आल्यानंतर वाचन वाढलं. नवे विचार प्रवाह समजले, अनेक परिवर्तनवादी चळवळीशी संपर्क येत गेला व त्यातून सामाजिक जाणीव पक्की होत गेली. समाजात परिवर्तन झाले पाहिजे आणि या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात आपला सहभाग असला पाहिजे हे पक्कं झालं. इतर उच्चजातीय , उच्चवर्णीय मुलामुलींसारखं सामाजिक कार्य हे काय छंद किंवा हौस नसून ती आपली एक जबाबदारी आहे. आपले कर्तव्य आहे ही समज यायला फारसा वेळ लागला नाही. कारण आजूबाजूचं वातावरण हे कास्ट, मर्डर, दंगल, अट्रॉसिटी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या घटनांनी भयांकित करून टाकणारं होतं. काम करायचं तर काय करायचं, पण कसं करायचं हा भला मोठा प्रश्न होता. यासाठी सुरुवातीला मी सिव्हिल सर्विसेसचा मार्ग स्वीकारला पण या टिपिकल पाठांतरवादी परीक्षांशी माझा ताळमेळ बसेना. शासन व्यवस्थेत घुसून काहीतरी करता येईल अशी माझी आशा होती पण हे प्रयत्न अयशस्वी ठरले.

मग पुन्हा L.L.B. करण्याचा निर्णय घेतला. वकील होऊन समाजाचे प्रश्न सोडवू शकतो असं वाटत होतं; मग लॉ कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतली. याचबरोबर झोपडपट्टी भागात शैक्षणिक काम करायला सुरुवात केली. यावेळी वय २४च्या घरात असल्यानं आई-वडलांची “धाकधूक” वाढू लागली. सांगलीच्या सामंती मानसिकतेचा काही प्रमाणात पगडा त्यांच्यावर देखील आहे. आईवडील आंतरजातीय अथवा लव्ह मॅरेजसाठी तयार होते, पण असं काही नसल्यानं तसं घरी सांगितलं.

माझा शिक्षण सुरू असल्यानं विरोध सुरू होता. पण त्यांना कामाबद्दल, माझ्या विचारांबद्दल कल्पना होती, त्यामुळे पाठिंबा देणारा मुलगा व कुटुुंब बघू असं आश्वासन त्यांनी दिलं आणि माझ्या नकळत विवाहस्थळांवर माझं नाव नोंदवलं. स्थळं येऊ लागली, पण माझं शिक्षण आर्टस्‌मध्ये असल्यानं लोकांनी नाकारायला सुरुवात केली. कारण B. A. केलं म्हणजे काहीतरी फालतू शिक्षण घेतलंय असं लोकांना वाटत होतं. आजच्या बाजारू, नवउदारमतवादी समाजात इंजिनिअर, डॉक्टर, सी.ए. , बँकर या नोकऱ्यांचा बोलबाला आहे. भलेही खूप मोठ्या पगाराची नोकरी मिळत नसली तरी या पदव्यांना सामाजिक प्रतिष्ठा आहे. मुलीनं लग्नानंतर नोकरी केली नाही तरी चालेल पण आमचा मुलगा इंजिनिअर आहे तर त्याला इंजिनिअरच मुलगी पाहिजे, असा पालकांचा सूर असायचा. खरं तर मला समाजशास्त्राची आवड असल्यामुळे मी डिग्रीसाठी हा विषय निवडलेला. इतर विद्यार्थ्यांइतकाच अभ्यास केलेला, मग आर्टस् ही विद्याशाखा निवडण्यामध्ये चुकीचं काय? हा प्रश्न संभवत राहायचा. या बरोबरच लोकांना सामाजिक कार्याबद्दल शंका असायची. सामाजिक काम मग घरचा स्वयंपाक कोण करेल? असे प्रश्न असायचे. मुलगा एवढे कमावतो मग सामाजिक कामाची वगैरे काय गरज? सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल एक नकारात्मक सूर येथील मध्यमवर्गात आढळतो. ते म्हणजे कामधंदा नसणारे, मोर्चा-आंदोलनांत दिसणारे, समाजाच्या जीवावर जगणारे, पैसा खाणारे, तर महिला या चारित्र्यहीन... घरदार सोडलेल्या घटकांसोबत आपली बायको, सून राहणार म्हणजे काहीतरी भयंकर पाप घडणार अशी समस्या लोकांच्या चेहऱ्यावर दिसायची.

सौंदर्याच्या पितृसत्ताक संकल्पनेत अडकलेला वर्ग दिसण्याला खूप महत्त्व द्यायचा. साडीवरचे फोटो पाठव, हा तुझा व्हाट्सअपचा DP जुना आहे की रीसेंट आहे, सगळे फोटो जीन्सवरच का? ट्रेडिशनल घालत नाही का? स्वयंपाक येतो का? तुझे केस लहान म्हणजे तू मॉड, मग आई वडिलांना सांभाळणार का? मुलं सांभाळणार का? या प्रश्नांची सरबत्ती व्हायची. काही जण तर ओळख नसताना देखील व्हिडिओ-कॉल करायचे. याच सोबत अनेक जणांनी माझ्या वकिलीच्या शिक्षणावरून वाद निर्माण केला. मुलगी वकिलीचे शिक्षण घेते तर ती उद्या घरात येऊन आम्हाला कायदा शिकवायला लागेल असे एका पालकांनी तोंडावर बोलून दाखवले. तर आम्हाला B. Com, B. A. करणारी पण मुलगी चालेल पण law करणारी नको असं एकाने फोनवर सांगितले. “काय हो तुमची मुलगी कशाला सामाजिक कार्यांत भाग घेते?” आधी तिनं स्वतःचे करिअर करावं, लग्न करून सेटल व्हावं, असे टोमणेवजा सल्ले आई-वडलांना सुनवायला सुरुवात झाली. माझ्याशी बोलण्याआधी माझी फेसबुक प्रोफाईल चाळून चित्रविचित्र प्रश्न लोक उभे करायचे. काही पालक 'इतकी वर्षं पुण्यात राहते, काय केलं' याचा गणिती हिशोब मागायचे. काहींना मी स्वैर वाटायचे, काहींना उद्धट , तर काहींना आक्रमक… मध्यंतरी एकानं विचारलं, “पुण्यात कार्यकर्त्यांच्या धरपकडी सुरू आहेत. एल्गार परिषदेत यात तुझा सहभाग नाही ना?" म्हणजे तुझ्यावर केसेस वगैरे नाहीत ना?

सुरुवातीला हा प्रकार खूपच त्रासदायक होता. ज्या समाजासाठी आपण काम करायचा विचार करतो त्या समाजातील एक घटक आपल्याला अशा प्रकारे झिडकारेल असं कधीच वाटलं नव्हतं. या काळात दोन प्रकारचे लोक भेटले; एक वर्ग असा होता ज्यानं कामाला उचलून घेतलं, प्रशंसा केली, मदत केली, प्रोत्साहन दिलं तर दुसऱ्या वर्गानं झिडकारलं, 'तुझं काम ठीक आहे गं, पण आमच्या घरात अशी मुलगी नको बा'. या परिस्थितीचा मानसिक त्रास आई-वडलांना अधिक होऊ लागला कारण पहिली बातचीत त्यांच्याशी व्हायची व ते त्यांचा राग माझ्यावर काढायचे. तू पण डॉक्टर इंजिनिअर झाली असतीस तर? तू हे केलं असतंस तर? तुझं सामाजिक काम थांबवलंस तर?

या काळात मानसिक स्वास्थ्य बिघडून जायचं. आपल्या विशिष्ट पदवीमुळे, आपले स्वतंत्र विचार, सामाजिक कामातील सहभागामुळे आपण नाकारले जातोय ही भावना मनाला खाऊन टाकणारी होती. रात्र-रात्र झोप लागत नसायची. तब्येत बिघडायची. पण समविचारी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे गाडी पुढे सरकत रहायची. आता मात्र या सगळ्याची सवय झाली आहे. इतर मैत्रिणींचे अनुभवही फार काही वेगळे नाहीत. खरं तर दोन व्यक्तीचं सहजीवन हे त्या दोघांमधील समजूतदारी, एकमेकांचे स्वभाव पूरक असणं यांवर अवलंबून असतं. डिग्री, पैसा, घरदार, गाडी, दिसणं या गोष्टी दुय्यम असतात. मात्र नाम-फेम-पैसा या भांडवली मूल्यांना कवटाळलेल्या वर्गाला विशिष्ट विद्याशाखेत शिक्षण घेतलला माणूस “ढ” कींवा यूजलेस वाटतो. येथील नवउदारमतवादी ब्राह्मणी व्यवस्थेचं प्रारूप असं आहे की इथे विशिष्ट कामाला, शिक्षणाला किंमत आहे. कायद्याचं शिक्षण घेण्यामागे सामाजिक न्यायाचा विचार असतो हे इथे पटवून द्यावं लागतं. मुलीची शिक्षण घेण्यामागची भूमिका ही स्वतःला व कुटुुंबाला उध्वस्त करून टाकण्यासाठी नसते, हेही समजावून सांगावं लागतं. मुळात व्यक्ती ज्या व्यवस्थेमध्ये वाढते त्या व्यवस्थेच्या मूल्यांना नकळत आपलंसं करू लागते. यामुळे प्रतिगामीत्वाचा विरोध करत असताना आपल्याकडून या मूल्यांचे समर्थन होऊ नये यासाठी सर्वांनी सजग असले पाहिजे.

मुळात सामाजिक भान असलेले घटक समाजासाठी लढत असतात. जे आपल्या पूर्वजांच्या वाट्याला आलं ते आपल्या समाज बांधवांच्या-भगिनींच्या वाट्याला येऊ नये असं त्यांना वाटत असतं. लोक स्वतःचा पैसा, इच्छा, मौजमजा यांचा त्याग करत सामाजिक कार्यात भाग घेत असतात. पराकोटीची गुलामी भोगलेल्या समाजातून आज आपण स्व-मेहनतीनं, तसंच आपल्या पूर्वजांच्या उच्च पदावर पोहोचलो आहोत. पण याचवेळी उर्वरित समाजाला सोबत घेउन जाण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, हे त्यांनी जाणलेलं असतं. आज आपण घेत असणारी स्कॉलरशिप, फ्रीशिप, आरक्षण व इतर योजनांचा लाभ हे टिकवून ठेवण्यासाठी या व्यक्तींचा भला मोठा वाटा आहे. तेव्हा मदत नाही केली तरी ठीक पण या व्यक्तींचा आपण सन्मान ठेवला पाहिजे. मुलगा व मुलगी दोघे समान आहेत असं जर आपण मानत असू तर मुलींच्या सार्वजनिक जीवनातील कामावर आपण इतके निर्बंध का घालतोय याचाही आपण विचार केला पाहिजे. बाबासाहेबांच्या चळवळीत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता तर आज आपल्याला आपल्या कुटुुंबातील स्त्रियांचा सहभाग नकोसा का वाटतो ? सामाजिक कार्य म्हणजे काय फक्त दंगे, मोर्चे , आंदोलने असतात का? असाही प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे.

आजची परिस्थिती पहिली तर खाजगीकरण उदारीकरणाच्या धोरणांमुळे शासकीय नोकऱ्या, शासकीय महाविद्यालये कमी होत आहेत. शिक्षण महागडे होत आहे . पैसा असेल तर शिका ही परिस्थिती बळावत चालली आहे. रोजगार घटत गेल्यानं कमीत कमी पगारावर राबवून घेतले जात आहे. तुम्ही डॉक्टरेट (Ph. D) असाल तरीही नोकरी मिळेल याची खात्री नाही. तुम्ही इंजिनिअर आहात पण नोकरीची शाश्वती नाही. आंतरजातीय विवाह केला तर तुमचा खून करण्यापर्यंत लोकांची मजल जाते. तुम्ही काय खावं, काय खाऊ नये हे सरकार ठरवतं. अशा स्थितीत एक तर सरकारच्या भेदभावजनक धोरणांविरुद्ध लढा किंवा निमूटपणे सहन करा असे दोनच पर्याय आपल्यासमोर आहेत.

ह्या परिस्थितीविरुद्ध आपण संघर्ष केला नाही तर कदाचित आपल्या पुढच्या पिढीला शिक्षणापासून, रोजगारापासून तसंच मूलभूत गरजांपासून वंचित राहावं लागेल आणि भेदभाव इतका पराकोटीला जाईल की रोहित वेमुला, नजीब, उना, भीमा कोरेगाव, अमृता-प्रणयसारख्या घटना रोज घडू लागतील. आणि कदाचित यात आपलाही बळी जाईल. तेव्हा समाजाचा एक घटक या नात्यानं आपला विकास हा सामाजिक विकासावर अवलंबून आहे. सावित्रीबाई, रमाई, फातिमाबाई यांचा वारसा आपल्यासमोर आहे. तसंच सामाजिक परिवर्तनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. तेव्हा ‘शिवाजी जन्मावा पण तो शेजारच्या घरात ‘ किंवा ‘स्त्री मुक्ती असावी पण त्यात माझी बायको-सून-मुलगी-बहीण नसावी', असा उपटसुुंभ विचार करून कसं चालेल?

---

लेखिका आंबेडकरी कार्यकर्त्या, 'साऊ-रमाई शैक्षणिक प्रकल्पा'च्या सह-संस्थापक आहेत, आणि पुण्यातील ILS law College मध्ये शिक्षण घेत आहेत.

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

बरीचशी समाजातली मतं तुला कळली ती लग्नाची स्थळं शोधताना. परंतू ती मतं अशीच आहेत. ९९टक्के मुलगे स्वतंत्र नाहीत. लादलेले विचार करणारे आहेत.

>>तुम्ही काय खावं, काय खाऊ नये हे सरकार ठरवतं. अशा स्थितीत एक तर सरकारच्या भेदभावजनक धोरणांविरुद्ध लढा किंवा निमूटपणे सहन करा असे दोनच पर्याय आपल्यासमोर आहेत.>>

सरकार काही सांगत नाही. तुमचा जवळचा समाजच तसा ठरवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'ही आदिलशाही, निजामशाही किंवा मोंगलाई तशी काय वाईट आहे? हवाच कशाला शिवाजी? आणि बरं, कोणाला हवा असेल तर त्यांच्या घरात होऊ द्यावा. आम्ही लांबून बघू काय ते त्याचे पराक्रम. आमच्या घरी त्याचा मावळासुद्धा नको.' ही मानसिकता अनेकांची असते. पण काही मोजके लोक तसा विचार करत नाहीत. ते लोक सापडणं कठीण, पण अशक्य नाही.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपले स्वागत आहे. पोटतिडीकिने लिहीले आहेत. उत्तम लेख. असे विचारप्रवर्तक लेख वारंवार ऐसीवर येवोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखाबद्दल काही म्हणणं नाही. पण,

इतर उच्चजातीय , उच्चवर्णीय मुलामुलींसारखं सामाजिक कार्य हे काय छंद किंवा हौस नसून ती आपली एक जबाबदारी आहे.

असं सरसकटीकरण खटकले. समाजसेवेचे पूर्ण भान राखून ते अव्याहतपणे करणारी कित्येक मुले-मुली मला माहीत आहेत. असे काम करत असताना, ते कुठल्याही जातीचा विचार करत नाहीत.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उच्च जातीत जन्माला आल्यामुळे समाजसेवा किंवा इतरांना मदत करणं हे प्रकरण बहुतेकसं वैकल्पिक असतं. अनेक पर्याय आपल्यासाठी सहज उपलब्ध असतात.

खालच्या जातीत जन्माला आल्यामुळे शिक्षण-उन्नतीचं वातावरण आजूबाजूला नसणं, घरी येणारे लोक अशा विषयांबद्दल बोलत नसणं, ओळखीतून संधी मिळणं असे पर्याय मुळातच कमी असतात किंवा नसतात. पोट भरलं की 'आपल्या' लोकांना मदत करण्याचं काम बहुतेक लोक नेहमीच करतात. पोट भरलेलं नसतानाही मदत करण्याचा विचार करा, तो पर्याय समजू नका; असा त्याचा अर्थ मी लावते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ज्या उच्चवर्णिय लोकांनी समाजसेवा केली असेल तर त्यांना 'वैकल्पिक/छंद किंवा हौस' म्हणणे हे एका टिचकीत उडवुन लावणे असे मी घेते. मलाही ते खटकले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"सुरुवातीला हा प्रकार खूपच त्रासदायक होता. ज्या समाजासाठी आपण काम करायचा विचार करतो त्या समाजातील एक घटक आपल्याला अशा प्रकारे झिडकारेल असं कधीच वाटलं नव्हतं. "
हे प्रत्येक ठिकाणी खरे आहे.
लिहीत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनोगत अावडले. फक्त एकच मला वाटतं, ते म्हणजे, समाजसेवा करणे अाणि अापल्यापुरतं स्वच्छ मूल्याधिष्ठीत जगणे, यात नकळत पहिल्याला अापण मोठे समजतो. समाज सतत बदलत असतो, अाजची मूल्ये उद्या बदलतात म्हणून कुणालाही सुधारायला जाणे यापेक्षा अापल्याला कळतं तसं झापडं न लावता जगणं हे महत्वाचं अाहे. तुमच्या कामाला शुभेच्छा.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0