चलो कुंभ चले ऽऽऽऽ
माझ्या अबोध मनात कुंभविचाराची रुजवण एके दिवशी सकाळी लोकसत्तेसोबत आलेलं कुंभमेळ्याचं रंगीबेरंगी, रंजक प्रसिद्धीपुस्तक बघून झाली होती. फेसबुकवर पत्रकार शर्मिष्ठा भोसलेचे कुंभवृत्तांत वाचून विचार बळकट होऊ लागला. एका कलीगने, तुम्ही हा अनुभव घ्यायलाच हवा, योगीच मुख्यमंत्री असल्याने सुव्यवस्थेच्या दृष्टीनं हा कुंभ न भूतो न भविष्यती आहे अशी खात्री दिली.या आधीच्या एका कुंभाला तो बरेच दिवस राहून आला असल्याने त्याचे अनुभवाचे बोल मानून जायचं नक्कीच केलं.सध्या प्रवासी भारतीय असलेल्या मैत्रिणीला विचारलं तर ती माझ्यासोबत कुंभ धाडसाला एका पायावर तयार होतीच. आणखी कोणाला घ्यायचं का सोबत म्हणून मी माझं एक प्यादं पुढं सरकवलं तर तिने एकदम तिचा उंट आणून चेकमेटच केला.खेळ खल्लास !! घोळ इल्ले !! आता फक्त दोघींच्याच सोयीच्या तारखा जुळवून आणि पवित्र दिवसांची शाही गर्दी टाळून जायचे ठरले.कुठलेही धार्मिक साध्य किंवा इतर हेतू नसलेली ही एक कुतूहल यात्रा होती.
माझ्या पतिदेवांना रेल्वे रिझर्वेशनचं व्यसन असल्याने, ते प्रसंगी स्वतः रूळ टाकून,अगदी एक डब्याचीसुद्धा गाडी शोधून काढतील अशी खात्री होतीच. त्यांनी कुंभ स्पेशल सिकंदराबाद- रक्सोल अशी अचाट गाडी शोधून काढली. सकाळी पावणेआठला गाडी नागपुरातून निघून रात्री साडेबाराला अलाहाबाद, छिवकी स्टेशनवर पोचणार होती. तीच गाडी नेपाळला चिकटून असलेल्या रक्सोलहुन परत जातानाचं नागपूर बुकिंग मिळालं. गाडी भल्या पहाटे साडेचारला निघून संध्याकाळी साडेसात वाजता नागपुरात पोहोचणार होती.दोन्ही वेळेस एसी टू टायर कन्फर्म रिझर्वेशन मिळून आनंदीआनंद झाला. ऑनलाईन कुंभमेळ्यात काही तंबूनगरींचे तपशील होते. त्यातून एक वाजवी दर असलेला पर्याय म्हणून वेदिक टेंट सिटी मधल्या साबरमती टेंट्स रोमहर्षक वाटल्या. पिकअप ड्रॉपिंग आहे असं गाजर असल्याने आणखी निर्धास्त झालो. गाड्यांच्या विचित्र वेळांमुळं दोन दिवस तिथे राहायचे असूनही तीन दिवस टेंट बुक करावं लागणार होतं. ममव कंजूषपणा करत चार बेड असलेल्या साबरमती टेंट मध्ये पहिल्या दिवसाचं बुकिंग केलं. भलत्याच प्रजातीसोबत टेंट शेअर करायला लावतात का याची धाकधूक होती. दोन बायका असल्यानं असलं काही करणार नाही अशी वेडी आशाही होतीच. रागरंग पाहून फक्त दोन बेड असलेल्या जास्त महाग टेंटमध्ये नंतर शिफ्ट होऊ असा विचार केला. जागा आहेत किंवा नाहीत याची खात्री नव्हती. बिनधास्त जाऊया, जे जमेल ते ,योग्य वाटेल ते करूया म्हणून बुकिंग झाल्यावर आम्ही दोघी मैत्रिणी कुंभमेळ्याला जातो आहे असा बॉम्बस्फोट केला आणि अपेक्षित प्रतिक्रिया उमटू लागल्या .
अध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावर अग्रेसर असलेली कट्टर धार्मिक मंडळी सोडून, आम्ही दोघी टवाळ मैत्रिणीनी अचानक कुंभमेळ्याचं बुकिंग जाहीर केल्यानं सुईपटक सन्नाटा पसरला. नव्वदीला टेकलेले माझे पिताश्री माझ्यावर संतापलेच. मला पुन्हा शाळकरी वयात असल्याचं सुखद फिलिंग आलं.
कशाला जायचं आहे कुंभमेळ्याला ? मुळीच जाऊ नकोस.अचानक इतकी धार्मिक कशी काय झालीस म्हणे. हा कूटप्रश्न तर अनेकांना छळताना दिसत होता त्यामुळे मनोमन उकळ्या फुटून येणारं हसू आटोकाट लपवावं लागलं. तसलं काहीच घडलं नव्हतं पण लहानपणापासून कुंभमेळा हा अचाट गर्दी, घाण आणि हरवणारी मंडळी यासाठी कुप्रसिद्ध असल्याने दोन बायकाच खुशाल जायला निघाल्यानं छुपा असंतोष पसरला.
आमच्या साठी गंगेचं पाणी आण अशा सूचनांपेक्षा माझ्या पिताश्रींनी दिलेल्या आज्ञा पालन करणं सोयीचं होतं .
जसं की...
तिथे नदीच्या पाण्यानं चुळ भरू नकोस... तिथलं पाणी सुद्धा (त्रिवेणी संगमाचं) नागपुरात येताना आणू नकोस !
आणि कुंभचा क स्वप्नात देखील न उच्चारलेले लोक्स तयारी कशी करायची याचे सल्ले देऊ लागले. कुठेही प्रवासाला निघालं की प्रथम चिवडा करायला घ्यावा लागतो म्हणे. त्यांना प्रथम षटप केलं.
गाडीत पॅन्ट्रीकार नसल्याने सोबत खायचे सोपे पदार्थ घेतले होते ज्यात उकडलेली अंडी सुद्धा होती. कुंभस्थळी नॉनव्हेज चालणार नसल्याने अंडी संपवणं अपरिहार्य होतं. प्रवास मजेत सुरू होता. गाडी तऱ्हेवाईक पद्धतीनं चालली होती.स्टेशनवर दोन/पाच मिनिट थांबून आऊटरला तासंतास थांबायची तर कधी अंगात आल्यागत भरधाव सुटायची. गाडी किती लेट होईल याचा अंदाज पृथ्वीतलावर तर कोणालाच नव्हता. साडेबाराऐवजी दोननंतर कधीतरी पोचणार असल्याचा मेसेज, माझ्या प्रवासावर जालीय नजर ठेवून असणाऱ्या पतिदेवाने केला होता. आम्ही सावध होतो. पहाटे अडीच वाजल्यापासूनच दरवाजाशी सामान घेऊन उभे राहिलो कारण गुगल तिथून अलाहाबाद स्टेशन फक्त दोन किमी दाखवत होते. गाडी अर्धा तास तिथेच थांबली होती शेवटी कुल्हडमधला चहा पिऊन टाईमपास केला. पायी पायी निघालो असतो तरी कधीच पोचलो असतो असे वाटले. शेवटी पहाटे तीन नंतर पोचलो आणि स्टेशनावर टेंट सिटीचा काउंटर शोधला तर तो तिथे नव्हताच. एक चित्रविचित्र सजवलेला, गुलाबी डिस्को लाईटनी झगमगता रिक्षा मिळाला. गुलाबी प्रकाशमय रिक्षायान आम्हाला थेट मंगळग्रहावरच नेणार आहे असं वाटलं.अवघा आसमंत स्वच्छ कुंभ प्रकाशानं उजळून निघाला होता. लखलखती टेंट सिटी आणि संगमावरचे असंख्य दिवे झगमगत होते.
पहाटे चार वाजता आमचा टेंटप्रवेश झाला.
तंबूत चारऐवजी फक्त दोनच पलंग ठेवून त्यांनी आमचं शेअरिंग संकट दूर केलं होतं. एक पातळ ब्लॅंकेट पाहून हुडहुडीचं भरली. थंडी असणार याची कल्पना होती. भरपूर गरम कपडे, थर्मल वेअर घेतले होते. तेही पुरेसे नव्हते म्हणून व्यवस्थापकाला जाऊन आणखी पांघरुणं मागितली तर तो म्हणे बाजूच्या रिकाम्या टेंटातली घ्या खुशाल. झिपचे दरवाजे बंद करून रिकामे टेंट कुलूपबंद असल्यानं आम्ही ब्लॅंकेट लुटण्यापासून वंचित झालो. नदीपात्रात तयार केलेल्या त्या तंबूनगरीतल्या बर्फगार अंथरुणावर पाठ टेकली.झोप येण्याचा प्रश्नच नव्हता. चार वाजता बर्फाच्या लादीवर पाठ टेकली आणि पाचच्या सुमारास दशदिशांनी लाउडस्पीकरवर भक्तीगीतांचा रतीब सुरु झाला. एकजण डास गुणगुणल्या सारखा काहीतरी मंत्रोच्चार करत होता.एकीकडे संथ सुरात प्रवचन चालले होते. साडेसहा वाजता बाहेर पडून दिशाहीन फिरत असताना अकस्मात पूर्वेला आलो आणि सुंदर सूर्योदय बघितला. भोजनगृहात शुकशुकाट होता त्यामुळे चहाचा शोध घेत ऑफिसजवळ आलो. तिथं आम्हाला घाटावर फुकट ने आण करणाऱ्या इरिक्षावाल्याजवळ आम्ही आता काय करायचं बुवा याची चौकशी केली. आम्हाला आता त्रिवेणी संगमावर स्नान करायचं नाही म्हटल्यावर त्यांना धक्का बसला. नाव करून पैलतीरी जा आणि तिथे अकबराच्या किल्ल्यात असलेला अक्षय वट (वडाचं रामायणकालीन झाड), विहिरीच्या रूपात असलेली सरस्वती कूप आणि काही मंदिरं बघायला सांगितली. ऐलतिरी शुकशुकाट असल्याने आम्ही दोघींसाठीच स्पेशल, सुंदरशी नाव करून गेलो. आमचा तरुण नावाडी पगारी नोकर होता. त्याने त्रिवेणी संगम म्हणजे काय याचे ज्ञान दिले. केसांची तीन पेडी वेणी गुंफली तरी दोनच पेड दिसतात, तिसरा गुप्त असतो, तद्वत गंगा यमुना दिसतात आणि सरस्वती गुप्त असते असं समजलं. त्याच्या आज्ञावजा सूचनेनुसार आम्ही संगमाच्या पवित्र पाण्यात हात ओले करून अंगावर पाणी शिंपडून शुद्ध का कायसे झालो. नावेत चढताना पाय ओले करून झाले होतेच. नावाडी आमच्यासोबत गाईडसारखा फिरला त्यामुळं तीन तासात फिरून परतलो. फारशी कुंभमेळी गर्दी नव्हती आणि पोलीस बंदोबस्त चोख होता. घाटावर शौचालये विपुल प्रमाणात होती आणि एकंदरीत स्वच्छता उत्तम होती.
घाटावर असलेल्या एका प्रेमळ दिल्लीकराच्या ढाब्यात चहा घेऊन मग पुरी भाजी खाल्ली. टेंट सिटीत तुम्हाला चहा सुद्धा १३० रुपयांचा मिळतो असं तो म्हणाला. ते सगळ्यात महागड्या टेंट मध्ये असावे कारण नंतर आम्हाला चाळीस रुपयाला एक कप चहा मिळाला होता. टेंट सिटीमध्ये परतून आणखी दोन दिवसांचं बुकिंग केलं आणि चिंतामुक्त झालो. जास्तीची चार ब्लॅंकेट मागून घेतली. आम्ही हिटर मागितला तर तो हजार रुपये चार्ज पडेल पण इथे लोड घेऊ शकत नाही म्हणे. वॉटर हिटरच्या गरम ,शुद्ध गंगाजलाने आम्ही शाही स्नान केलं आणि सगळी न केलेली पापं धुवून निघाली. दुपारच्या उन्हानं, खाली लाल कार्पेट आणि भोवताली फिकट पिवळं तंबूचं कापड यांचा अदभूत प्रकाश तयार झाल होता.गरम उबदार तंबूत शेकून निघत निष्पाप निद्रा आली.
संध्याकाळी अरियल घाटावर फेरफटका मारला. बायकांना स्नान केल्यावर कपडे बदलायला विपुल प्रमाणात रंगीबेरंगी आडोसे होते जे पैलतीरावर जास्त दिसले नाहीत. बँकेच्या कुंभ स्पेशल शाखा होत्या. उप डाकघर होते. उत्तरप्रदेश जल निगमच्या गाड्या सतत हिंडत होत्या. ठिकठिकाणी नळ लावले होते. तिथे कोणीही कधीही अंघोळी उरकून घेत होते. ड्रोन कॅमेरा घिरट्या मारत होता. सगळीकडे खाकी गणवेश तैनात आणि कार्यरत दिसला. एका आश्रमाच्या सेटवर यज्ञ सुरु होता. पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांची भजनं ऐकू येत होती. मोठ्ठाले स्क्रीन होते त्यावर अमिताभ बच्चन कुंभाची जाहिरात करत होता आणि शंकर महादेवन चलो कुंभ चले म्हणून टकाटक थीम सॉंगसाद घालत होता.
प्रसन्न हवा होती आणि लोभस,सुंदर सुर्यास्ताचा नजारा बघितला. गंगेची आरती बघितली. ढाबेवाल्याकडे पोटपूजा करून टेंट सिटीतली शोभिवंत प्रदर्शनांची झलक बघत तंबूतील गारठ्यात परतलो.जास्तीची पांघरुणे असुनही .रात्र नकोशी वाटावी असा थंडीचा कडाका होता.
दुसऱ्या दिवशी पूर्वकल्पना असल्याने नेमका सूर्योदय बघून टेंट सिटीतले स्वयंपाकघर हुडकून थेट तिथेच चहाचा आस्वाद घेतला. टेंटसिटी भागात सुव्यवस्था आणि स्वच्छतेचा कडेलोट होता. सगळा गोंगाट आणि गर्दी पैलतीरीच होती. एका इरिक्षावाल्याने आम्हाला पुलावरून पलीकडे नेऊन तिथल्या साधुसंत आखाडे नगरीचा दिवसभर फेरफटका मारून आणायची सुपारी घेतली. नदीवरून पैलतीरी जायला आणि यायला वेगवेगळे तात्पुरते पूल तयार केले आहेत. मोक्ष, मुक्ती आणि संकटहरण वगैरे मार्गांची रेलचेल असल्याने आम्ही त्या मार्गाला फिरकलो नाही.
धार्मिक रंगसज्जेच्या रुद्राक्ष, नवग्रहासह चक्क कवटीसदृश माळा, चंदन, भस्म, उदबत्त्या, धूप, भगव्या शाली, भगवी ब्लँकेटंसुद्धा आणि धार्मिक पुस्तकं यांनी कुंभमेळा ओसंडून वाहात होता. भक्तीरसाने ओतप्रोत कुंभसाहित्यामधून नेमके निवडून "रावण संहिता" हे दणदणीत पुस्तक माझ्या आईसाठी खरेदी केले.
रंगीबेरंगी माळा खरेदी करायच्या ,फोटो काढायचे ,चौकशा करायच्या असा आमचा उद्योग सुरु होता. दोन्ही तीरांवर खोया-पाया केंद्रावर क्षणोक्षणी कोणीतरी सापडलेलं असून त्याला कोणी घेऊन जायचं आहे याच्या उद्घोषणा सुरू असायच्या. कुठल्याही आखाड्यात जाऊन बघायचं, आता भेटायची वेळ नाही म्हटल्यावर दुसरा आखाडा गाठायचा. एका आखाड्यात फारशी गजबज नव्हती आणि शांती, स्वच्छता दिसली म्हणून फेरफटका मारला तर तिथे त्यांच्या भोजनालयात छानशी चहा नि भरपेट नाश्त्याची सोय दिसली. आम्हाला साठ रुपयांच्या कूपन मध्ये हवा तेवढा पुरी, भाजी, साबुदाणा वडे आणि इमरतीचा नाश्ता मिळाला.आम्ही त्यांच्या इथे रहात नाहीये अशी शंका येऊनही त्यांनी आम्हाला कुपनं दिली.
पोटोबा झाल्यावर आम्ही पुन्हा भटकत असताना चक्क महाराष्ट्रातली नाशिक, जळगाव, लातूर, नागपूर, नगर अशी लेझीम पथकं, वाघ्या मुरळी, शिवाजीराजे, पौराणिक पोशाखातली मंडळीची मिरवणूक दिसली. मराठी मंडळी दिसल्याने गहिवरून येऊ लागलं .त्यानंतर विविध आखाड्यांचे प्रमुख, फुलांनी सजवलेल्या रथावर आरूढ होऊन समस्त प्रजेकडे आशीर्वादरुपी पंजा हलवत जात होते. त्या अंतहीन शोभायात्रेत, टळटळीत उन्हासोबत आसमंतात धूळ आणि वाळूचं साम्राज्य होतं. भक्तिरसाच्या सगळ्या भारतीय उपनद्या गंगेत जाऊन मिळत होत्या.छोट्या छोट्या कुटीतून नागा साधू आरशात बघत राखेचा मेकअप करत होते, फोटो काढला तर पोझ देत होते. आशीर्वाद देत होते.
मोठाल्या आखाड्यांची एकापेक्षा एक वरचढ प्रवेशद्वारे होती. तिच्यात यज्ञ ,प्रवचन ,भक्तीसंगीत आणि अन्नछत्रे सुरु होती. भक्तीरसात आकंठ बुडालेला भगवा जनसागर शाहरुख सारखा "रंग दे तू मोहे गेरुआ sss" म्हणत मोक्षप्राप्ती साठी टाहो फोडत होता.
मोक्षाचा गेरुआ रंग न चढवता, संसाराच्या भवसागरात आम्ही पुन्हा गटांगळ्या खायला निघालो, तेंव्हा गाडी फक्त बाराच तास लेट होऊन आमची अनोखी कुंभयात्रा समाप्त झाली.
प्रतिक्रिया
आवडला हा प्रकार!
आवडला हा प्रकार!
==================
भूतकाळातील आस्वल्य.
मस्तं वृत्तांत!
मस्तं वृत्तांत!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मस्त
आवडला लेख
मज्जा.
तुझ्या डोक्यात काय कल्पना येतील सांगता येत नाही. मला शंका आहे, लोकांच्या काय-काय असंतुष्ट प्रतिक्रिया येतील, हे बघण्यासाठीच तू कुंभमेळ्याला जाऊन आलीस. हे लोक तसेही ऐसी वगैरे गोष्टी वाचणार नाहीयेत.
आपल्या पतिदेवांच्या कर्तबगारीबद्दल एवढा विश्वास दाखवणारी तू एकमेव आर्य-पतिव्रता नारी असणार. एरवी 'आपला नवरा कसा बावळट आहे', छापाच्या नवऱ्यांनीच केलेल्या विनोदांनी ५६% व्हॉट्सॅप आणि १७.५% फेसबुक भरलेलं असतं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तेच तर ....
बावळट तर सगळेच नवरे असतात पण त्यातून अतोनात फायदा कसा होईल ते जास्त महत्वाचं आहे .
हा हा हा...
आपल्यासारख्या बायांचीही लग्नं होतात, यावरून सगळे नवरे बावळट असतात, हा निष्कर्ष काढणं सोपं होतं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सुतावरून स्वर्ग गाठू नका...
सुतावरून स्वर्ग गाठू नका... काहीतरी विदाभान ठेवा!
-अनामिक
तसं नाही. नवराबायकोला
तसं नाही. नवराबायकोला एकमेकांविषयी खवचट श्रद्धा आणि विश्वास ठेवल्यानेच भवसागरात तरता येतय.
-----------
आतापर्यंत वाचलेल्या प्रवासाची सुरुवात ते पर्यटन प्रकारातला चांगला लेख. एका त्रयस्थ वृत्तीने कुंभ पाहिला तर कसा दिसेल ते छान लिहिलं आहे.
फोटोविडिओंवर चिंजंचा कॅापीराइट आलाय म्हणजे तेसुद्धा कुंभला गेलेत.
एकूण आटोपशिर झकास लेखन.
लेखा सोबतचे फोटो...
लेखासोबतचे फोटो मीच मोबाईल वर काढले आहेत. ते अपलोड करणे मला जमणार नव्हते ,त्यामुळे जंतू गुरुजींनी संपादनाचे कौशल्य पणाला फोटो तर जोडून दिलेच शिवाय थीम सॉंग चा व्हिडीओ जोडून चार चांद लावले.
<खवचट श्रद्धा > अय्या तुम्हाला कसं माहित
आता कौतुकातही खवचट श्रद्धा
आता कौतुकातही खवचट श्रद्धा आहेच >>
जंतू गुरुजींनी संपादनाचे कौशल्य पणाला लावून फोटो तर जोडून दिलेच>>
---
शेवटल्या फोटोतला दाढीवाला मनुष्य श्री रा रा जंतू तर नाहीत ना दाढी वाढवून अशी शंकाही आली. कट्ट्याचा फोटो आठवून पाहिला.
---
एकूण लेखनातली विनोदी झालर पाहून जरा बरं वाटलं. बाकी एक किस्सा फसलेल्या रेझर्वेशनचा माझा आहेच.
निबिरु
त्या सूर्योदयाच्या फोटोत आणखी एक ग्रह दिसतोय तो 'निबिरु' का हो ? तसं असेल तर लवकरच सर्वांना मोक्ष !
:) :)
जाहिरातीचा बलून होता अॅडग्रह
मस्त आहे लेख! एकंदरीत
मस्त आहे लेख! एकंदरीत स्वच्छता उत्तम होती हे ऐकून मोद जाहला.
छान
छान. काही वर्षांपुर्वी नाशिक त्र्यंबकेश्वर च्या कुंभ मेळ्याचा लाभ घेता आला. त्यानंतर मध्य प्रदेश आणी युपीतील कुंभ याला हजेरी लावायची होती पण काही कारणास्तव जमले नाही. तुमच्या लेखात काही मंदीरांचे आणी गंगेचे दर्शन फोटोरुपाने झाले असते तर घर बैठे कुंभ का आनंद घेता आला असता पण असो. हरी तरी खाटल्यावरी किती देणार ! असो, फुल ना सही फुलाची पाकळी ही सही ! ३ मार्चपर्यन्त कार्यक्रम आहे, बघुया जमते काय ते !
कुंभबद्दल नुसतेच ऐकून होतो,
कुंभबद्दल नुसतेच ऐकून होतो, प्रत्यक्षदर्शी वृत्तान्त ऐकून बरे वाटले. ते फोटो तेवढे दिसेनात.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बॅटमन,
बॅटमन,
https://www.flickr.com/photos/chintaturjantu/33259350798
इथे सर्व आहेत. शिवाय इतरही.
कुंभ
कुंभमेळ्याच्या धर्तीवर, एक 'अखिल भारतीय कुत्रे संघटनेचा', 'भुंक मेळा' भरवायला पाहिजे.
वृत्तांत आवडला. या
वृत्तांत आवडला. या कुंभमेळ्यातील अध्यात्मिक उन्नतीकरिता केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबद्दल काही लिहाल काय ?
'भुंक मेळा' म्हणजे वार्षिक
'भुंक मेळा' म्हणजे वार्षिक डॅाग शोज होतात प्रत्येक शहरांत तसे, का आणखी काही तिरकस विनोदी सुचवायचय?
"अध्यात्मिक उन्नतीकरिता
"अध्यात्मिक उन्नतीकरिता केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबद्दल " ~~~ कोणाच्या? भाविकांच्या?/ मठाधिपतींच्या?
सर्व्यांच्या !!!एकंदरीतच
सर्व्यांच्या !!!एकंदरीतच म्हणजे