कहाणी स्त्रीपुरुष समानतेची
ऐका स्त्रीपुरुष समानते तुमची कहाणी.
आटपाट नगर होतं. त्या नगरांत एक ब्राह्मण होता. तो नित्य लाईक, कमेंटी, वावाचान आणायला सोशल मिडियावर जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं,”काय ग बायांनों, कसला वसा वसतां? तो मला सांगा.” ” तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील.” ब्राह्मण म्हणाला, “उतत नाहीं, मातत नाहीं, घेतला वसा टाकीत नाहीं.” तेव्हां त्या म्हणाल्या, “८ मार्च येईल, तेव्हां पहिल्या आदितवारीं मौन्यानं (मुकाट्यानं) उठावं, सचीळ (वस्त्रासहित) स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची सिमॉन दी बुव्हा काढावी. सहा रेघांचं मंडळ करावं, सहा सुतांचा तातू करावा. त्याला सहा गांठी द्याव्या. पानफूल वहावं, पूजा करावी. कल्चरल फेमिनिझमचा विडा, मार्क्सिस्ट फेमिनिझमच्या फुलांचा झेला, रॅडिकम फेमिनिझमचा धूप, लिबरल फेमिनिझमचा नैवेद्य दाखवावा, सहा मास चाळावी, सहा मास पाळावी, माघी रथसप्तमीं संपूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं? इको फेमिनिझमच्या पोळ्या, ब्लॅक फेमिनिझमच्या बोटव्यांची खीर, इंडिव्हिज्युअल फेमिनिझमच्या लोणकडं तूप, मेहूण जेवूं सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी, ती नसेल तर दोन पैसे दक्षणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं.” असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला स्त्रीपुरुष समानता प्रसन्न झाली.
ताराबाई शिंदे स्वप्नांत आली. तेव्हां राजाच्या राणीनें ब्राह्मणाला बोलावूं धाडलं, ब्राह्मण जाते वेळेस भिऊं लागला. कांपूं लागला. तेव्हां राजाच्या राणीनं सांगितलं, ” भिऊं नका, कांपू नका, तुमच्या मुली आमचे येथें द्या” “आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरीं कशा द्याव्या? मिसॉजिनी कराल, शोव्हेनिशम कराल, दासी बनवाल , बटकी बनवाल.” राणी म्हणाली, ” मिसॉजिनी करीत नाहीं, शोव्हेनिशम करीत नाहीं. ब्रा बर्निंग करू. स्लटवॉक करू. मुलगी झाली हो करू. ”
मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं फेमिनिष्ठांना मुली दिल्या, एक राजाचे घरीं दिली. दुसरी प्रधानाचे घरीं दिली. गेल्या पावलीं मुलींचा समाचार घेतला नाहीं. बारा वर्षांनीं समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेंकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. “ बाबा बाबा, गूळ खा पाणी प्या.” गूळ खात नाहीं, पाणी पीत नाहीं. माझी कहाणी करायची आहे ती तूं ऐक.” तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाहीं. राजा अपर्णा तीर्थंकरांकडे जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याचे मनांत राग आला. तेथून निघाला प्रधानाच्या घरीं गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला. म्हणून बसायला पाट दिला; पाय धुवायला पाणी दिलं. “बाबा, बाबा, गूळ खा, पाणी प्या.” ” गूळ खात नाहीं पाणी पित नाहीं, माझी कहाणी करायची आहे, ती तूं अगोदर ऐक. ” तुझी कहाणी नको ऐकूं तर कोणाची ऐकूं?” घरांत गेली, उतरडींची सहा मोत्यें आणलीं. तीन आपण घेतलीं. तीन बापाच्या हातांत दिलीं. त्याने मनोभावें सेकंड सेक्स वाचली लेकीनं चित्तभावें ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरीं आला. बायकोनं विचारलं, ” मुलींचा समाचार कसा आहे?” जिनं कहाणी ऐकलीं नाहीं, ती राखी सावंत बनली. धिनचाक पूजा बनली. बुरसटलेपणानं व्यापली. जिनं कहाणी ऐकली होती, ती भाग्याने जगते आहे. विदा वाचून वाचून बेभान होते आहे. ज्योती म्हापसेकर झाली आहे. प्रमिला दंडवते झाली आहे. मृणाल गोरे झाली आहे. ”
इकडे राखी सावंत जी झाली होती, तिनं आपल्या लेकीला सांगितले. “मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन कांहीं दिलं तर घेऊन ये.” पहिल्या आदितवारीं पहिली मुलगी उठली, तळ्याच्या पाळीं जाऊन उभा राहिली.” अग अग दासींनों, तुम्ही दासी कोणाच्या?” ” आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीची मुलगी आला आहे.” “कशी आली आहे? तळ्याच्या पाळीला उभी राहिली आहे.” ‘परसदारनं घेऊन या.’ परसदारानं घेऊन आल्या. न्हाऊं माखूं घातलं, साडीचोळी नेसवली, जेवू खाऊं घातलं. कोहोळा पोखरला, होनमोहोरा भरल्या. “वाटेस आपली जाऊं लागली. तों बेटी फ्रीडमन परीक्षा घेण्याकरता आली. हातींचा कोहोळा काढून नेला. घरीं गेली. आईनं विचारलं, ” काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?” दैवें दिलं, कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं. पण सर्व गेलं.
पुढं दुसर्या आदितवारीं दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळीं जाऊन उभा राहिला. “अग अग दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या?” “आम्ही दासी प्रधानाच्या.” प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरीं नेऊन न्हाऊं माखूं घातलं पीतांबर नेसायला दिला, जेवूं खाऊं घातलं. काठी पोखरून होनामोहोरांनीं भरून दिली. ” बाबा, ठेवूं नको. विसरूं नको. जतन करून घरीं घेऊन जा, ” म्हणून सांगितलं. वाटेंत सावित्रीबाई फुले परीक्षा घेण्याकरता आली, हातची काठी काढून घेतली. घरीं गेला, झालेली गोष्ट राणीला सांगितली. “दैवें दिलं, तें सर्व कर्मानं नेलं.”
पुढं तिसरे आदितवारीं तिसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळीं उभा राहिला. त्यालाही पहिल्यासरखं प्रधानाचे घरीं नेऊन न्हाऊं माखूं घातलं, पीतांबर नेसायला दिला, जेवूं खाऊं घातलं, नारळ पोखरून होनमोहोरांनीं भरून दिला. ” ठेवू नको, विसरूं नको.” म्हणून सांगितलं, घरीं जाताना विहिरींत उतरला. तों नारळ गडबडून विहिरींत पडला. घरीं गेला. आईनं विचारलं. ” काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?” आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं तें सर्व बुडालं.”
चवच्या आदितवारी चवथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळीं उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरीं नेऊन न्हाऊं माखूं घातलं, पीतांबर नेसायला दिला. जेवूं खाऊं घातलं. त्याला दह्याची शिदोरी होनामोहोरा घालून बरोबर दिली. वाटेल माया अँजेलो परीक्षा घेण्याकरता आली. हातची शिदोरी घेऊन गेला. घरीं गेला. आईनं विचारलं, “काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?” “आई मावसशीनं दिलं, पण दैवानं तें सर्व नेलं.”
पांचव्या आदितवारीं आपण उठली, तळ्याच्या पाळीं उभी राहिली. दासींनीं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरीं नेलं. न्हाऊं घात्लं. माखूं घातलं, पाटाच बेसायला दिला. प्रधानाची राणी स्त्रीपुरुष समानतेची कहाणीकरूं लागली. ” काय वसा करतेस तो मला सांग.” बहीण म्हणाली, “अग अग चांडाळणी, पापिणी, बापाची कहाणी ऐकली नाहींस, म्हणून तुला दरिद्र आलं.” राजाच्या राणीनं विचारलं, “याला बहिणीच्या घरीं राहिली. ८ मार्च आला. सांगितल्याप्रमाणं स्त्री पुरुष समानतेची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावूं धाडलं. “मावशी मावशी, तुला छत्रं आलीं, चामरं आलीं, ग्लास सीलिंग फुटलं. इक्वल पे आला. स्त्रियांचं सर्व शिक्षण मोफत झालं. गर्भजल परीक्षा थांबली. स्त्रीभ्रूणहत्या थांबली. बालविवाह थांबले. रेप कल्चर गेलं. हुंडाबंदी आली. ” “मला रे पापिणीला छत्रं कोठली? चामरं कोठलीं? पाईक कोठले? परवर कोठे?” बाहेर जाऊन दाराशीं बघतात, तो राजा बोलावूं आला आहे. राजा आला तशी घरीं जायला निघाली. एकमेकींना बहिणीबहिणींनीं अहेर केले. वाटेनं जाऊं लागलीं.
दोहो बहिणींना आणि बाकी कित्येकींना कोणा डोळा मांसाचा गोळा, इतक्यांना जशी स्त्रीपुरुष समानता प्रसन्न झाली , तशी तुम्हां आम्हां होवों. ही साठां उत्तराची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.
प्रतिक्रिया
पार्वतीने कैलासनाथास विचारलं
पार्वतीने कैलासनाथास विचारलं "भूतलावर गौरी पूजन बंद का झालं?"
रामतीर्थकर आईंचं प्रवचन
रामतीर्थकर आईंचं प्रवचन ऐकणारी राखी सावंत झाली?
राखी सावंतची बदनामी थांबवा !!!
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हा हा
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
ग्लास सीलिंग फुटलं. इक्वल पे
(१) कॅट कॉल्स थांबले,
(२) बोलताना, वारंवार इन्टरप्ट केलं जाणं थांबलं,
(३) बसमध्ये, ट्रेनमध्ये,रस्त्यात, ऑफिसात, कुटुंबात, शाळा-कॉलेजात सुरक्षित वाटू लागलं
(
४) जरा मोकळेपणाने हसून बोलल्यास लगेच कॉफीची ऑफर येणं थांबलं(५) तुझ्या जाडेपणाबद्दल टिका-टिप्पणी थांबली
(६) तुझ्या शरीरावरचा तुझा हक्क अबाधित राखला गेला
(७) स्वयंपाकघरातून, समाजाकडुनच्या बोजड व भारंभार अपेक्षांपासून तुला मुक्ती मिळाली
(८) आईबहीणींवरच्या शिव्या हद्दपार झाल्या
टेड टॉक
मध्यंतरी एक फिमेल सेक्श्युॲलिटीवरचा टेड टॉक ऐकला. बहुते क्लिटरसी नावाचा. आठवत नाही. त्यात वक्ता होती एक स्त्री जिने एक स्लाईड दाखवली ज्यात क्लिटरस आतमध्ये कशा शेपचे असते. कितपत एक्स्टेंड झालेले असते ती रेखाकृती होती. वक्ता म्हणाली की आताआतापर्यंत क्लिटरस आतपर्यंत कसे असते, कुठवर एक्स्टेन्ड झालेले असते त्याचे वैद्यकिय द्न्याच नव्हते. आणि स्त्रियांच्या शस्त्रक्रियांमध्ये हा एक ब्लाईंड स्पॉट होता ....... आता आता कुठे वैद्यक शास्त्राला पोझिशन, आकार, आतवरील एक्स्टेन्शन कळते आहे ....... वगैरे वगैरे....
.
डिनरच्या वेळेला एका पुरुषाने तिला तिरकस प्रश्न केला, 'तू जो प्रश्न ऐरणीवर घेतला आहेस, संशोधन केले आहेस, तो अगदी १००% फर्स्ट वर्ल्ड इश्श्यु आहे ...असे तुला वाटत नाही का?"
.
ती काय जे ते म्हणाली ते म्हणाली पण टेड टॉकवर ती म्हणाली की स्त्रियांची सेक्श्युॲलिटी म्हटली की लगेच कसे इतर प्रेसिंग इश्श्युज आठवतात. आणि स्त्रियांच्या लैंगिकतेचा मुद्द कसा त्वरित गौण ठरविण्यात येतो. असतील ना अनेक अन्य मुद्दे पण म्हणून या मुद्द्याने पड खाण्याची मानसिकता कशाला? का? तर तो स्त्रियांबद्दल आहे म्हणुन?
दुकाटाआ
.
गंभीर विषयाला मनोरंजनातून
गंभीर विषयाला मनोरंजनातून हाताळणं योग्यच आहे. आंतरराष्ट्रिय महिला दिनाची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद आणि तीही मनोरंजनातून त्याबद्दल अभिनंदन.
कितपत
कितपत समजलं शंकाय. पण जितकं समजलं तितकं तरी नक्कीच आवडलं.
मुक्तसुनीत कधीतरीच येतात आणि
मुक्तसुनीत कधीतरीच येतात आणि १०० मिटरी सिक्सर मारतात. (ते कधीतरीच का येतात ? )
उत्तम आहे.
आवडलीच..
कथा फक्कड जमली आहे!
जाता जाता: ह्या मूळ कथा कुणी आणि केव्हा लिहिलेल्या आहेत याबद्दल कुणाला काही ठाऊक आहे का? शैलीवरून सतरावं-अठरावं शतक असावंसं वाटतं.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
धन्यवाद.
होय. भाषेच्या काही कन्स्ट्रक्ट्सवरून पेशवाईतली भाषा वाटते. या कहाण्या सरळसरळ ब्राह्मणी आहेत. सगळीकडे "गरीब ब्राह्मण" असतो. त्यावरूनही पेशवाईकडे असण्याचा मी अंदाज बांधला. "चातुर्मास" नावाच्या compadium मधे या मी लहानपणीं वाचल्या होत्या. ज्या कुणी सुरवातीला या मौखिक परंपरेतून आलेल्या गोष्टींना ग्रथित करून परत छापलंही असेल त्यांचं आपण ऋण मानायला हवं.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
आशावादी लोकांसाठी त्या
आशावादी लोकांसाठी त्या कहाण्या लिहिल्या आहेत.
// शनिवारी पत्रावळ थोड्या अन्नासह वळचणीला ठेवतो, त्याचे हिरेमाणकं होतात.//
तशीच ही गोष्ट आहे आशावादी बिचाऱ्या स्त्रियांसाठी. स्त्री पुरुष समानता येणार.
वीमेन्स डे निमित्त कंट्री साँग
.
https://www.youtube.com/watch?v=KfDr_7LN-Ew&list=PLo4u5b2-l-fDxT8iRSbF6-...
.
इथे सैनिक सीमेवर मरत आहेत आणि तुम्हांला स्त्री-पुरुष समानतेची पडल्ये.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आई ग्ग!!!
आई ग्ग!!!
वा!
वा!
- नी