सत्याचा विजय - लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली (भाग २)
(१२ फेब्रुवारी - आज डार्विनचा जन्म होऊन २०४ वर्षं झाली. त्यानिमित्ताने त्याच्या स्मृतीला अभिवादन करून या लेखमालेचा पुढचा भाग सादर करतो आहे.)
गेल्या काही शतकांत पाश्चिमात्य देशांत मानवी मनावरचा धर्माचा व देवाचा पगडा हळूहळू कमी होत आला आहे. (हीच प्रक्रिया माझ्या मते सर्वत्र चालू आहे, पण या लेखांपुरतं तरी मी अमेरिका व युरोपवर लक्ष केंद्रित करतो आहे) एकेकाळी लोकांचे काय विश्वास होते ते पाहू. विश्वाची उत्पत्ती व त्याबरोबर मनुष्यप्राण्याची निर्मिती ही देवाने केली असं मानलं जायचं, ते अजूनही अनेक लोक मानतात. पण त्याहीपलिकडे देवाच्या ठायी अनेक शक्ती मानल्या होत्या. चंद्र-सूर्य देवाच्या आज्ञेने फिरतात. जगात येणाऱ्या आपत्ती - पूर, भूकंप, ज्वालामुखीचे उद्रेक हे देवाच्या इच्छेने होतात. वेगवेगळे रोग आणि साथी देवाच्या कोपामुळे होतात. प्रत्येक माणसाच्या जीवनातल्या उलाढालींचा नियंता तोच असतो. देवाला दिलेल्या या महत्त्वापोटी धर्माचं अवडंबर उभं राहिलं. या इतक्या शक्तिशाली देवाशी नातं राखण्याची एकाधिकारशाही धर्मसंस्थेकडे आली. हे काम सांभाळण्यासाठी प्रचंड पैसा चर्च मिळवू शकलं. याला कारण देवाची लोकांच्या मनात असलेली भीती व आदर. पण गेल्या काही शतकांत देवाच्या शक्तीच्या मंदिराचे खांब एक एक करून निखळून पडत आहेत. गुरुत्वाकर्षणाच्या शोधाने पृथ्वीकेंद्री दृष्टीकोन मोडून पडला. रोग कसे होतात याविषयी भक्कम शास्त्र तयार झालं, आणि आजारी पडल्यावर देवाचा धावा करण्यापेक्षा डॉक्टरच्या औषधाने गुण येतो हे लोकांना पटायला लागलं. बहुतेक देशांमध्ये धर्म व राज्यसंस्था विभक्त झाल्या, आणि माणसांच्या अनेक गरजा देव धर्माच्या वाटेला न जाता सेक्युलर पद्धतीने सोडवल्या जाऊ लागल्या.
पृथ्वी हे विश्वाचं केंद्र नसून पृथ्वीच इतर ग्रहांप्रमाणे सूर्याभोवती फिरते हा एक महत्त्वाचा धक्का होता. मनुष्याची निर्मिती करणं हे देवाचं ध्येय होतं ही कल्पना मोडून पडली नाही, तरी तिला तडा गेला. कारण सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी हे मानवासाठी निर्मिलेलं नसून, अवाढव्य विश्वात एका छोट्याशा ताऱ्याभोवती फिरणाऱ्या अनेक ग्रहांपैकी एका ग्रहावर आपण आहोत हे मानवकेंद्री प्रतिमेशी फारकत घेणारं होतं. म्हणूनच चर्चने शक्य तितका काळ हे सत्य दडपून ठेवण्याचा प्रयत्न केला.
पण त्याहूनही प्रखर धक्का होता तो उत्क्रांतीवादाचा. मानवासाठी देवाने हे विश्व निर्माण केलं. आणि ते प्राण्यांनी, वनस्पतींनी भरलं. अर्थातच सिंह, हत्ती, घोडा, कोंबडी, बकरी, माकड हे प्राणीही देवानेच तयार केले. काही मानवासाठी खाद्य म्हणून, तर काही मानवासाठी उपयुक्त पशू म्हणून, काही आपले असेच. देवाची सृष्टीनिर्माता म्हणून तरी पत शिल्लक होती. पृथ्वी केंद्रस्थानी आहे की नाही, ती का नाही, हे देवच जाणे म्हणणं फारसं कठीण नव्हतं. पण ही प्राणी-वनस्पती सृष्टीदेखील देवाने तयार केली नाही असं मानणं म्हणजे देवाचं महत्त्व फारच कमी करण्यासारखं होतं. कारण देवाने पृथ्वी बनवली नाही, तिच्या परिभ्रमण-परिवलनाचे नियम क्षुद्र गुरुत्वाकर्षणाने ठरतात, तिच्यापेक्षाही प्रचंड उत्पात सूर्यावर घडतात... हे एक वेळ मान्य करता येतं. शेवटी या भौतिक घटना आहेत, त्यांचं नियंत्रण देव करत नसला तरी नियम तोच घालून देतो असं म्हणता येतं. पण या सगळ्या पलिकडे असलेली जीवसृष्टी तर देवाचीच किमया आहे. डार्विनने जेव्हा या चित्रातल्या त्रुटी दाखवायला सुरूवात केली तेव्हा हा सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात मजबूत खांब डळमळीत व्हायला लागला.
देवाने सगळं विश्व सहा दिवसात, सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी तयार केलं असं बायबलमध्ये म्हटलेलं आहे. याचा अर्थ आत्ता जे प्राणी दिसतात ते जसेच्या तसे त्याने तयार केले. माकडं, उंट, घोडे, बैल, वेगवेगळी झाडं, कीटक, मासे... सगळे तयार केले. आणि अशा पृथ्वीवर माणसालाही तयार करून ठेवलं. देवाचं हे क्रिएशन माणसासाठी आहे, कारण या पृथ्वीवर फक्त एका माणसालाच त्याने बुद्धी, आत्मा दिलेला आहे. ज्या काळात पन्नास शंभर वर्षांपूर्वीच्या गोष्टी आठवणंही कठीण होतं त्या काळात काही हजार वर्षं ही अनंत काळाप्रमाणेच होती. त्यामुळे या कथांवर विश्वास बसणं सहज शक्य होतं. 'प्रजाती बदलत नाहीत' यावर ऍरिस्टॉटलपासून अनेकांचा विश्वास होता.
डार्विनला मात्र हे पटलं नाही. त्याला आसपासच्या जगात प्राणी दिसत होते, तसेच उत्खननात सापडलेले, आत्ता न दिसणारे प्राण्यांचे अवशेषही दिसत होते. गॅलॅपेगोस बेटांवर त्याला जे प्राणी दिसले ते इतरत्र दिसणाऱ्या प्राण्यांपेक्षा थोडे वेगळे होते. म्हणजे प्रजाती वेगळी, पण इतरत्र सापडणाऱ्या प्रजातींशी नातं सांगणारी. असं का? मानवासाठी विश्व निर्माण करणारा देव, कुठच्या तरी बेटांवर २५ वेगवेगळ्या प्रजातींचे फिंच पक्षी का ठेवेल? यापेक्षा सोपं उत्तर असं आहे की अनेक वर्षांपूर्वी काही पक्षी त्या बेटांवर कसे कोण जाणे पोचले, आणि परिस्थितीमुळे बदलून गेले.
मानवी प्रयत्नांनी अगदी थोड्या काळात प्राणी बदलू शकतात हे त्याने पाहिलेलं होतं. कुत्रे, घोडे वगैरे प्राण्यांची पैदास करणारे लोक आपल्याला हवे ते गुणधर्म मिळवण्यासाठी संकर करतात याचा त्याने अभ्यास केला होता. पिढ्यान पिढ्या आपल्याला हवे ते गुणधर्म निवडत गेलं की साध्या कुत्र्यामध्ये किती वैविध्य आणता येतं हेही तो चांगलं जाणून होता. पण या निवडीतही माणसाचा हात आहे. नैसर्गिकरीत्या अशी निवड कशी होईल? या प्रश्नाचं उत्तर त्याला माल्थसचा 'लोकसंख्येच्या नियमनाचा निबंध' वाचल्यावर सापडलं. माल्थसने त्यात असं सांगितलं की लोकसंख्या अपरिमित कधीच वाढू शकत नाही. कारण अन्नाचा पुरवठा मर्यादित आहे. कितीही भरपूर अन्नाचं उत्पादन असेल आणि कितीही कमी लोकसंख्या असेल तरी लोकसंख्या चक्रवाढीने वाढत असल्यामुळे ती अन्नाचा पुरवठा कमी पडेपर्यंत वाढते. मग जे अन्न मिळवायला लायक नसतात ते उपाशी मरतात. गंमत अशी की माल्थसला या प्रक्रियेत लोकसंख्या नियंत्रण करणारा देवाचा हात दिसला. तर डार्विनला तटस्थ निसर्ग दिसला. निसर्गातल्या प्राण्यांची लोकसंख्याही अशीच मर्यादित रहाते. आणि ज्या प्राण्यांच्या अंगी त्या त्या वेळी, त्या त्या परिस्थितीत जगण्यासाठी आवश्यक गुणधर्म असतात त्यांची प्रजा टिकून रहाते. ज्यांच्यात ते गुण कमी प्रमाणात असतात त्यांना मुलं कमी होतात, आणि अशा काही पिढ्या गेल्यानंतर शिल्लक राहिलेले प्राणी हे मूळ जमातीपेक्षा वेगळे झालेले दिसू शकतात. घोड्यांची पैदास करणारे डोळसपणे अधिक लांब मजल मारणारे प्राणी निवडतात. निसर्ग हेच काम आंधळेपणाने करतो.
या नैसर्गिक निवडीतून उत्क्रांत होऊन प्राणी बदलतात, हा डार्विनच्या विचारांचा गाभा. देवाने प्राणी तयार केले असं म्हणणारांना हे सत्य त्रासदायक ठरतं. श्लाफ्लीसारख्या कंझर्व्हेटिव्हांना हे सत्य नाकारायचं असतं. म्हणूनच त्याने लेन्स्कीच्या प्रयोगात मिळालेल्या डेट्याची चिरफाड करायचं ठरवलं. असं नक्की काय होतं लेन्स्कीच्या प्रयोगात? थोडक्यात सांगायचं झालं तर त्याला प्रयोगशाळेत आपोआप, नैसर्गिक निवडीतून जीवसृष्टी बदलताना दिसली होती.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
आवडला.. पण अधिक विस्ताराने
आवडला.. पण अधिक विस्ताराने अधिक आवडला असता
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
+/-
इथे विस्तार नाही झाला तरी चालेल पण राजेश घासकडवी यांनी उपक्रमावर लिहिलेल्या उत्क्रांतीवरील मालिकेचे दुवे देता आले तर बरे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
लेख आवडला.
लेख आवडला.
चुकीच्या ठिकाणी क्रमशः!
चुकीच्या ठिकाणी क्रमशः!
डार्विनचा सिद्धांत शाळेत शिकवला जातो. पण त्याचे तपशील मराठीत आहेत का? (Origin of species वाचताना थोडा कंटाळाच आला.)
१० ब्रिटीश पौंडाच्या नोटेवर डार्विनचं चित्र आहे, हे जाताजाता आठवलं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
भाग लहान वाटला
भाग लहान वाटला, आवडला.
पूर्वीच्याच स्वतःच्या बहुतांश प्रतिसादांतून पेष्टवलेला दिसतोय.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
अँथ्रोपोसेंट्रिझम/फॉक्स
वाचतो आहे, भाग अधिक मोठा असता तर अधिक आवडला असता या वरील प्रतिक्रियांतील भावनेशी सहमत आहे.
अँथ्रोपोसेंट्रिझम अर्थात विश्व हे मानवकेंद्री आहे, ही भूमिका सार्याच धर्मांत दिसून येत असावी. मात्र जेनेसिस १:२६ इतक्या स्पष्टपणे क्वचितच. (And God said, Let us make man in our image, after our likeness: and let them have dominion over the fish of the sea, and over the fowl of the air, and over the cattle, and over all the earth, and over every creeping thing that creepeth upon the earth.) अनेक कॉन्झर्व्हेटिव्ह राजकारण्यांनी विज्ञानविरोधी भूमिका घेताना वेळोवेळी ह्या 'देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया' असं सांगणार्या ह्या सॉमचा आश्रय घेतला आहे.
बेलायेव्ह ह्या रशियन शास्त्रज्ञाने अवघ्या साठ वर्षांत निवडक प्रजननाद्वारे कोल्ह्यांचे माणसाळणे सिद्ध केले असले, तरी 'फॉक्स' उत्क्रांत व्हायला वेळ लागेल असंच दिसतंय
निओअँथ्रोपोसेंट्रिझम
तथाकथित विज्ञानवादी लोकांनी डार्विनच्या थिअरीचा "सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट" असा लावलेला अर्थ आणि म्हणून माणसाच्या 'अस्तित्वा'साठी पृथ्वीवरच्या 'रिसोर्सेस'च्या अनिर्बंध लयलूटीचे समर्थन हा निओअँथ्रोपोसेंट्रिझम आहे.
इतर प्रजातिंपेक्षा माणूस काही तरी वेगळा आहे आणि जगण्यासाठी इतर प्राणी, वनस्पती आणि संपूर्ण पृथ्वीच काय पण अखिल विश्वाकडे एक रिसोर्स म्हणून पाहणे हा युटिलिटेरियन दृष्टीकोण, क्रियेशनिस्ट असोत वा इव्होल्यूशनिस्ट, जसाच्या तसा जपला गेलेला आहे.
माणसासकट लाखो करोडो वर्षे टिकून असलेले प्राणी केवळ ते त्या-त्या परिस्थितीत राहण्यास सक्षम होते म्हणून जगले असे म्हणणे म्हणजे अर्धसत्य होईल. हे सगळे प्राणी जगले कारण ते परिस्थितीशी जुळवून घ्यायला सक्षम तर होतेच पण त्याचबरोबर आपल्या आसमंतासाठी त्यांचे अस्तित्व उपकारक होते. म्हणजे "सर्व्हायव्हल ऑफ नॉट ओनली द फिटेस्ट बट द मोस्ट कोलॅबोरेटिव्ह". या निओअँथ्रोपोसेंट्रिझममुळे सध्याचे माणसाचे अस्तित्व आसमंतासाठी उपकारक आहे असे म्हणण्यास मी धजावणार नाही.
या निओअँथ्रोपोसेंट्रिझमची पुढची पायरी म्हणजे रे कर्ज्विलसारख्या लोकांनी तंत्रज्ञान हा उत्क्रांतीचा नवा आणि वेगवान मार्ग आहे असे जाहीर करणे. मग जेनेटिकली इंजिनिअर्ड प्राणी, वनस्पती आणि माणसेही समर्थनीय होतात आणि उत्क्रांतीवाद्यांची वाटचाल नकळत नव्या निर्मितीवादाकडे होऊ लागते.
राईट. थोडेफार असे मला जाणवत
राईट. थोडेफार असे मला जाणवत होते, पण मुद्देसूद शब्दांत मांडल्याबद्दल तुमचे बहुत बहुत आभार मानतो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अभिवादन आणि अभिनंदन
डार्विनच्या स्मृतीला अभिवादन आणि दिनमहात्म्यान्वये ऐसी अक्षरेचा लोगो डिझाईन केल्याबद्दल अभिनंदन.
लेखमालेच्या पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत.
(क्रिएशनिस्टांची मांदियाळी पाहता यूएसएतील सर्व क्रेडिट कार्डांवरही 'इन गॉड वी ट्रस्ट' असे छापायची सक्ती करणारा कायदा होईल असे दिसते.)
पोप सोळावे बेनेडिक्ट यांनी कालच राजीनामा देण्यामागे डार्विनचा हात असावा अशी शंका येते. चंमत ग केली.
पहिला तीन चर्तुथांश भाग
पहिला तीन चर्तुथांश भाग डार्विनप्रेमाने ओथंबलेला वाटला
असा की शाळेतले वैद्यसरच डार्विनसिध्दांत समजावून सांगतायेत अस वाटलं
ओल्ड मेमरीज डाय हार्ड यू नो
शेवटच्या परिच्छेदात गाडी वळणावर आली
आता लेन्स्की काय करतोय हे पाहण्याची ऊत्सुकता आहे
बाकी विसुनानानी लिहीलेली शंका मनात येऊन गेलीच;)
.
चित्रातल्या त्रुटी
डार्विनच्या आधीपासूनच उत्क्रांतीवादावर व्यापक चर्चा सुरू असावी असे दिसते. लॅमार्क, डार्विनचा आजोबा एरॅझ्मस या लोकांनी जीव उत्क्रांत होतात अशा स्वरूपाचे तत्त्व मांडले होते पण 'नैसर्गिक निवड' (Natural selection) आणि उत्क्रांती अशी आधुनिक सांगड चार्ल्स डार्विननेच प्रथम घातली असावी. तेव्हा चित्रातल्या त्रुटी डार्विनपुर्वीही बर्यापैकी स्पष्ट असाव्यात असे वाटते.
लॅमार्क, डार्विनचा आजोबा
बरोबर. याच्यावरून मला थोडीशी कॉंटिनेंटल ड्रिफ्ट ची आठवण येते. जगाचा नकाशा बघणाऱ्या सातवीतल्या पोरालाही या सर्व खंडांचे किनारे मिळतेजुळते दिसतात. त्यावरून ती कधीतरी चिकटलेली असावीत असा अंदाज बांधता येतो. पण ती खंडं एकमेकांपासून विलग कशी झाली हे सांगणारी प्लेट टेक्टॉनिक्सची थिअरी येईपर्यंत ते एक 'आश्चर्यकारक निरीक्षण' म्हणून सोडून देता येतं. डार्विनच्या नैसर्गिक-निवडीवर-आधारित-उत्क्रांतीवादाने हेच साध्य केलं. यात आधीचे उत्क्रांतीबाबतचे विचार मांडणाऱ्यांना कमी लेखण्याचा हेतू नाही, अशी निरीक्षणं एक वातावरण निर्माण करतात, ज्यात अधिक लोकांपर्यंत हा प्रश्न पडतो. अंतिम उत्तर शोधण्याच्या दृष्टीने ही मूळ निरीक्षणं, विचार हे अत्यावश्यक असतात.
प्रखर धक्का
सातवीतल्या कल्पक मुलाला जे निरीक्षणातून सहजपणे दिसू शकतं ते स्पष्ट केल्याबद्दल समाजाला 'प्रखर धक्का' बसणे शक्य असावे.
वर निर्देश केलेला परिच्छेद वाचून डार्विनपुर्वी जीवनिर्मिती देवांनी केली हे सर्वमान्य होते असा समज होऊ नये यामुळे आधीच्या प्रयत्नांची नोंद केली होती. डार्विनचे संशोधन या प्रयत्नांअभावी अशक्य होते असे अजिबातच सूचवायचे नव्हते.
इथे उदाहरणांची किंचित गल्लत
इथे उदाहरणांची किंचित गल्लत होते आहे. कॉंटिनेंटल ड्रिफ्टच्या बाबतीत सातवीच्या मुलाचं उदाहरण लागू होतं. मात्र तिथे प्रखर धक्का नाही. उत्क्रांतीच्या बाबतीत प्रत्यक्षातला सातवीतला मुलगा अपेक्षित नव्हता. अठराव्या शतकातला एखादा जंटलमन साइंटिस्टला 'प्रजाती बदलतात' हे उमगू शकतं. त्या का बदलतात याचं पहिलं उत्तर डार्विनने दिलं इतकंच. त्या उत्तरासकट असलेला उत्क्रांतीवाद हा समाजातल्या तत्कालीन समजुतींना धक्का लावण्याइतका प्रबळ होता.
सर्वमान्य मधला सर्व हा शब्द थोडा गमतीदार आहे. एखादा शोध लागून तो शास्त्रज्ञांमध्ये सर्वमान्य होणं हे त्या मानाने लवकर होतं. जनसामान्यांपर्यंत ते ज्ञान ट्रिकल डाउन व्हायला खूपच वेळ लागतो. त्या अर्थाने, हो, 'प्रजाती बदलतात' या स्वरूपाचा उत्क्रांतीवाद डार्विनच्या आधीपासून प्रचलित होता. विवाद्य असला तरी मांडला तरी गेला होता. कारणं बरोबर नसल्यामुळे तो पटला नव्हता, शास्त्रज्ञांतही सर्वमान्य नव्हता.
गल्लत | सहमत
जीव उत्क्रांत होतात, हे एक तसे सामान्य पण आश्चर्यकार निरीक्षण होते असे थोडेफार त्या उदाहरणावरून वाटले होते. आता तुम्ही खुलासा केल्यानंतर तुलना स्पष्ट झाली. लेखात व प्रतिसादांत मांडलेल्या इतर मुद्द्यांशी अर्थातच सहमत आहे.
वाक्य
पण या सगळ्या पलिकडे असलेली जीवसृष्टी तर देवाचीच किमया आहे. डार्विनने जेव्हा या चित्रातल्या त्रुटी दाखवायला सुरूवात केली तेव्हा हा सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात मजबूत खांब डळमळीत व्हायला लागला.
ह्या वाक्यामुळं angels and demons ह्या चित्रपटाच्या क्लायमॅक्स्ची आठवण झाली.ती कादंबरी वाचणं काही अजून जमलं नाही.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
उत्क्रांतीवाद
डार्विनः विजयते आउर आंदो जी
डार्विनः विजयते आउर आंदो जी जल्दीच. पुढे काय झालं हे वाचण्याची उत्सुकता आहे.
अवांतरः या ग्रीकांच्या साच्यातून बाहेर पडायला युरोपला लैच वेळ लागला बाकी. टॉलेमीचा आल्माजेस्त असो नैतर स्क्वेअरिंग द सर्कल असो, ग्रीक प्रभाव लैच पर्व्हेझिव्ह होता टोटल युरोपवरती.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं