पाऊसगाणी
सूर्य बुडे पायथ्याशी
रंग ओंजळ भरुन
गाव जाता अंधारुनी
येतो सावल्या घेऊन
एका अंगणी पावसाची
होती धून घनधुंद
कुण्या बाहुलीचा होता
वेड्या सुखाचा प्रपंच
त्याने पापांच्या पायाने
तिचे उष्टावले फूल
उंबर्यात अनाथ झाले
भोळ्या तुळशीचे मूळ
धुक्यात हरवले घर
पात्रात अडकली नाव
लाज सावराया आला
उभा आंधळाच गाव
उभा काठावर जीव
येई डोहातुनी हाक
एका ईवल्या डोळ्यांची
हले पापणीही मूक
रडुनिया निजे पाखरु
भ्रमित उत्तरांची मिठी
ती शरिर घेऊनी येता
निघे फकिर भरल्या पोटी
दुःख कोवळे पुरताना
ती सोडुन देते वेणी
का स्पर्श कुणाचे येतील
घेऊन भरली पाऊसगाणी?
प्रतिक्रिया
कविता आवडली
प्रतिमांचा वापर चांगला झाला आहे.
कवितेच्या वृत्ताबाबतीत थोडी धरसोड झालेली दिसते. सुरूवात अष्टाक्षरीने झालेली आहे. पण मधूनच वेगळ्या घाटाच्या ओळी येतात. त्याने रसभंग होतो.
आभार
बरोबर आहे तुमचं म्हणणं. पुढच्या वेळी या सुचनेचा नीट विचार करुनच लिहेन. धन्यवाद
“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre
ग्रेस?
ग्रेसचा मोठा प्रभाव जाणवतो.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
आवडली.
वरील दोघांशीही सहमत आहे. इतकी छान सुरूवात वाचून "अरे वा, आणखी एक छंदबद्द कवितेची मेजवानी!" म्हणून सरसावून बसता ताल लागतो न लागतो तोच दुसर्याच क्षणाला दाताखाली खडा आल्यासारखं झालं. पुढल्या तीन ओळी पुन्हा मस्त लयीत गेल्यानं म्हटलं चला एखादा डाग चंद्रावरही असायचा, चालायचंच. पुढे खडेच खडे लागत गेल्याने रसच गेला. कंटाळा आला. मग पुढं वाचवलं नाही.
मग छंद-वृत्ताबद्दलच्या अपेक्षा बाजूस ठेवून वाचली. ग्रेस आठवले. पुन्हा पुन्हा वाचली. लाज सावरायला आलेला आंधळा गाव, तुळशीच अनाथ मूळ पासून सगळ्या प्रतिमा आवडल्या! वृत्ताची सांगड बसली असती तर अजून भिडली असती कविता असे वाटून गेले.
पुलेशु. असंच अजून सुंदर काव्य येऊ दे (वृत्ताची घडी नीट बसलेलं)