शिक्षणाच्या कक्षा रुंदावणारी काटेमुंढरीची शाळा
“I have never let my school interfere with my education!”- मी आणि माझं शिक्षण यात मी शाळेला ढवळाढवळ करु दिली नाही ! सुप्रसिध्द विचारवंत मार्क व्टेन याचे हे वाक्य. मार्क व्टेन याचे हे वाक्य पारंपरिक शिक्षणपध्दत अवलंबणा-या चार भिंतीत कोंदटलेल्या शाळांसाठी मार्मिक आहे;पण शाळाच बिनभिंतीची असेल तर…!
गो.ना.मुनघाटे यांनी “माझी काटेमुंढरीची शाळा” या आत्मचरित्रात्मक कादंबरीतून अशा एका बिनभिंतीच्या शाळेची भेट घडवली आहे. गो.ना मुनघाटे हे स्वतः गडचिरोली जिल्ह्यातल्या प्राथमिक शाळेतील शिक्षक. आयुष्यभर अदिवासी गावातील मुलांना शिकवण्याचे प्रामाणिकपणे काम करणा-या या शिक्षकाची त्याच्या अनुभवांवरील ही कादंबरी. काटेमुंढरी हे एक अदिवासी गाव. या शाळेत एक ध्येयवेडा शिक्षक रुजू होतो. औपचारिक शिक्षणाविषयीची अदिवासींची अनास्था शिक्षकाला अस्वस्थ करते. मुलांनी शाळेत यावे म्हणून त्याचे प्रयत्न सुरु होतात. रोजीरोटीसाठी रानावनात काम करणा-या अदिवासींना शिक्षणासाठी,शाळेसाठी वेळ देणे शक्य नसते. अशा परिस्थितीत ध्येयवेडा,आदर्शवादी शिक्षक वेगवेगळे प्रयोग सुरु करतो आणि मुलांच्या मनात शाळेविषयी ओढ निर्माण करतो. शाळा जेव्हा झाडाखाली, नदीकिनारी भरु लागते तेव्हा मुलांना ती आपलीशी वाटू लागते. खरे शिक्षण असे निसर्गात घडत असते.रुसो म्हणतो त्याप्रमाणे निसर्ग हाच आपला खरा शिक्षक आहे. हे वाचताना गिजूभाई बधेकांचे “दिवास्वप्न” हे पुस्तक आठवते. मुलांना इतिहास-भूगोल विज्ञान हे विषय शाळेत शिकवण्याऐवजी निसर्गाच्या मोठ्या पाठशाळेत शिकवणा-या दिवास्वप्नमधील गुरुजींची आठवण होते आणि टागोरांच्या शांतिनिकेतनचे प्रयोग डोळ्यासमोर तरळतात. गांधींच्या नई तालीमचे प्रयोग अजून सुरु आहेत यामुळे एक दिलासा मिळतो. लहान भावाला सांभाळायची जबाबदारी पडल्याने शाळेत येऊ न शकणा-या शिदूने शाळेत यावे म्हणून धडपडणारे काटेमुंढरीचे मास्तर आपल्या मनात जागा मिळवतात. हा मास्तर केवळ मुलांचा शिक्षक नाही तर तो सबंध गावाचा शिक्षक आहे. गावातली कोणाची भांडणं असो वा कोणाच्या घराचं लग्नकार्य, यात मास्तरांचा सल्ला महत्वाचा. गावातल्या अदिवासींकडून मास्तरांचे शिक्षण आणि गावाला मास्तरांकडून मिळणारे शिक्षण असा तो दुहेरी शिक्षणाचा मार्ग आहे. शिक्षक हा सर्वप्रथम विद्यार्थी असतो याची सार्थ जाणीव या मास्तरांना आहे आणि म्हणूनच हे मा्स्तर आजूबाजूच्या घटनांकडे डोळसपणे पाहतात. त्यातून शिकत शिकवत राहतात. विद्यार्थी-पालक-शिक्षक अशा त्रिकोणी शिक्षणव्यवहारात पालकाची जबाबदारी महत्वाची आहे यात शंका नाही;पण शिक्षकाची जबाबदारी त्याहून मोठी आहे. विद्यार्थ्याच्या समग्र विकासासाठी शिक्षकाने कल्पकपणे शिकवायला हवे. विद्यार्थ्यांनी शाळेत यावे, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी काटेमुंढरीच्या मास्तरांनी केलेले प्रयोग म्हणजे यासाठीचा वस्तुपाठच ठरावा. अदिवासींचे एकूण जगणे हेच आनंददायी शिक्षण आहे. निसर्गासोबत जोडला गेलेला त्यांचा जीवनक्रम अचंबित करणारा आहे. नागरीकरणाने ज्या तथाकथित आधुनिक मूल्यांची पेरणी केली त्याने खरोखरच नक्की काय साधले, समूहाधिष्ठीत असणारी समाजसंस्कृती सोडून आत्यंतिक व्यक्तिवादी वातावरणात व्यक्ती आणि समष्टी यांच्या समायोजनातील समस्या कशा सोडवाव्यात, बंद दारांची फ्लॅट संस्कृती जन्माला घालताना तिचा मानवी चेहरा हरवतो आहे का,…असे प्रश्नोपनिषद अदिवासींच्या जगण्यातून आपल्यापुढे उभे राहते. कादंबरीतील माडिया गोंड अदिवासींच्या जगण्याचे वर्णन आपल्याला अंतर्मुख बनवते. या संदर्भाने गिरीश सहस्त्रबुध्दे यांनी तयार केलेले मुखपृष्ठ पुरेसे बोलके आहे.
गो.ना मुनघाटे यांच्या कादंबरीची प्रेरणा बाराव्या प्रकरणात दिसते. मडगू पाटलांशी बोलताना मास्तर म्हणतात-
“ पाटील, इंग्रजी राजवटीत म.जोतिबा फुले आणि सावित्रीबाई यांच्यासारखे आदर्श समाजसेवक होऊन गेले. त्यांनी गोरगरीब समाजाला शिक्षण देण्यासाठी स्वतःच्या घरादाराची पर्वा केली नाही. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना शिकून संघटित होण्याचा मंत्र दिला. देशाला स्वातंत्र्य मिळाले;पण प्राथमिक शिक्षणाचे काय ? आज पोटार्थी शिक्षकांची फौज निर्माण झाली आहे. आता शंभरात चार-दोन निष्ठांवत शिक्षक दिसतात. नाही असे नाही,पण शिक्षकी पेशाला काळिमा फासणारे नमुनेच जास्त. कोणी मॅट्रिक पास तर कोणी इंटर फेल. एखाद दुसरा बी ए फेल. कुणाची इ्च्छा मनापासून शिक्षक बनण्याची नाही. पण दुसरी नोकरी मिळवण्याची अक्कल नाही. आणि थोडेफार शिक्षण घेतल्यामुळे घरच्या शेतीत काम करायची लाज वाटते. डोळ्यावरचा गॉगल आणि टाइट फुलपॅण्ट घालून कास्तकारी करता येत नाही. म्हणून मिळेल त्या वशिल्याने मार्गाने शिक्षकाच्या पेशात सामील झालेले,सिनेमाच्या वेडाने जीवनाचा तमाशा करणारे हे तरुण शिक्षक वाटतच नाहीत.शिक्षकाचा शुभ्र पांढरा पोषाख मागे पडला. तालुका कचेरीतील कारकुनासारखे छिटाचे पोलकेसदृश मनिले, छाताडावर गुंड्या नाहीत,नाटक कंपनीतल्या सोंगाड्यासारखी विचित्र चर्या असे बहाद्दर शिक्षक म्हणून ग्रामीण अदिवासी भागात पोटासाठी नोकरी करत आहेत.”
या अस्वस्थतेतून ही कादंबरी जन्माला आली आहे. तिच्यामागे प्राथमिक शिक्षणाविषयीची विलक्षण तळमळ आहे. आजची प्राथमिक शिक्षणाची विदारक अवस्था पाहून,अनुभवून सुचलेली ही कादंबरी आहे. हेरंब कुलकर्णी, किशोर दरक यांसारख्या तज्ञांनी आजच्या प्राथमिक शिक्षणाच्या अवस्थेवर प्रकाश टाकलेला आहे.कादंबरीच्या प्रस्तावनेत देखील हेरंब कुलकर्णींनी निष्ठावंत शिक्षकांच्या –हासाबाबत चिंता व्यक्त केली आहे.
या कादंबरीची भाषा साधी सरळ आहे. ती थेट भाष्य करते. स्वानुभवाच्या पायावर उभी असणारी ही कादंबरी कलाकृती म्हणून वेगळे स्वातंत्र्य उपभोगत नाही. अनुभवांच्या मर्यादाकक्षेतच ती वावरते. “जे अनुभवले ते सांगितले” इतकी साधी सरळ थेट भूमिका लेखकाची आहे त्यामुळे रुढ अर्थाच्या कादंबरीच्या वाटेवरची ही वेगळी कादंबरी आहे. मुळातच कादंबरी या ललितकृतीच्या अंगाने या पुस्तकावर भाष्य करणे हेच कादंबरीच्या आशय आणि प्रेरणा यांवर अन्याय करण्यासारखे आहे कारण मुनघाटेंनी हे प्रयोग खरोखर केले आहेत. जीवन-शिक्षणाचा रसरशीत अनुभव देणा-या या पुस्तकाला कोणत्याही आकृतिबंधात वर्गीकृत करणे चुकीचे ठरेल. ही कादंबरी शब्दबंबाळ नाही. पात्रांचा तिला सोस नाही. जे घडले ते थोंडक्यात नेमकेपणाने सांगितले आहे. या अर्थाने हेरंब कुलकर्णींनी म्हटल्याप्रमाणे “माझी काटेमुंढरीची शाळा” म्हणजे एका ध्येयवादी शिक्षकाचे शैक्षणिक आत्मचरित्र आहे. म्हणूनच स्वतः अनुभवलेल्या गोष्टींचे वर्णन अस्सल आहे. निखळ प्रामाणिकता हा त्याचा विशेष आहे. काटेमुंढरीच्या या शाळेतून शिक्षकी पेशाविषयी निरतिशय प्रेम आणि समाजबदलाची प्रचंड आस दिसून येते.
नक्षलग्रस्त भागात विकासकामे शक्य नाहीत, शिक्षण देणे शक्य नाही असे म्हणणा-या सर्वांना उत्तर देण्याचे महत्वाचे काम या पुस्तकाने केले आहे. लोकाभिमुख शिक्षकाला सारे काही शक्य आहे पण त्यासाठी विद्यार्थ्यांप्रती तळमळ हवी. मुनघाटे यांची ही तळमळ केवळ या पुस्तकामागे नाही तर ती त्यांच्या जगण्याचा भाग आहे. काटेमुंढरीची शाळा हा एक प्रेरणांचा स्रोत आहे. अदिवासींच्या अनुभवी पारंपरिक शहाणपणाचे ते संचित आहे. झपाट्याने बदलणा-या समाजाला अदिवासी भागातील, ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या अवस्थेविषयीचा रिमाइन्डर आहे. सारेच अंधारमय नाही तर प्रकाशाचा कवडसा अजून शिल्लक आहे अशी दिलासादायक वार्ता देणारे पुस्तक म्हणजे “माझी काटेमुंढरीची शाळा” हे पुस्तक होय ! आपणाला पुन्हा शाळेत घेऊन जाणारे आणि आपल्या शिक्षणाच्या कक्षा रुंदावणारे हे पुस्तक म्हणूनच महत्वपूर्ण आहे कारण काटेमुंढरीची शाळा सूर्यफुलासारखे प्रकाशोन्मुख होण्याची प्रेरणा देते.
पुस्तकाचे नाव-“ माझी काटेमुंढरीची शाळा”
लेखक- गो.ना.मुनघाटे
साधना प्रकाशन / पाने १३६/ मूल्य १०० रु.
( सदर लेख 'शिक्षणवेध' एप्रिल २०१४ या मासिकात प्रसिध्द )
प्रतिक्रिया
इतक्या नेटक्या ओळखीअद्दल
इतक्या नेटक्या ओळखीअद्दल आभार!
पुस्तक नक्की वाचेन!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
छान लिहिलं आहे!
छान लिहिलं आहे!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
माहिती बद्दल धन्यवाद. गिजूभाई
माहिती बद्दल धन्यवाद.
गिजूभाई बधेकांचे “दिवास्वप्न” वाचलेलं आहे, "माझी काटेमुंढरीची शाळा" पण नक्की वाचेल.
शिक्षण क्षेत्रात 'एकलव्य' आणि 'नॅशनल बुक ट्रस्ट' ही दोन प्रकाशनं स्वस्त, वाचनीय आणि थोर आहेत.
'नीलची शाळा' (ए. एस. समरहिल -
'नीलची शाळा' (ए. एस. समरहिल - राजहंस), 'तोतोचान' (नॅबुट्र), न पेटलेले दिवे (राजा शिरगुप्पे - साधना)... हीपण रोचक आहेत.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
थॅन्क्स
तोत्तोचान वाचले आहे. इतरही वाचेन.
थॅन्क्स
नक्कीच.
गिजूभाईंचे पुस्तकही छान.
"माझी काटेमुंढरीची शाळा" पण
कोण?
बार्र वाचेन
बार्र वाचेन
पुस्तकओळख रोचक आहे.
पुस्तकओळख रोचक आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आज पोटार्थी शिक्षकांची फौज
आज पोटार्थी शिक्षकांची फौज निर्माण झाली आहे. आता शंभरात चार-दोन निष्ठांवत शिक्षक दिसतात. नाही असे नाही,पण शिक्षकी पेशाला काळिमा फासणारे नमुनेच जास्त. कोणी मॅट्रिक पास तर कोणी इंटर फेल. एखाद दुसरा बी ए फेल. कुणाची इ्च्छा मनापासून शिक्षक बनण्याची नाही. पण दुसरी नोकरी मिळवण्याची अक्कल नाही. आणि थोडेफार शिक्षण घेतल्यामुळे घरच्या शेतीत काम करायची लाज वाटते. डोळ्यावरचा गॉगल आणि टाइट फुलपॅण्ट घालून कास्तकारी करता येत नाही. म्हणून मिळेल त्या वशिल्याने मार्गाने शिक्षकाच्या पेशात सामील झालेले,सिनेमाच्या वेडाने जीवनाचा तमाशा करणारे हे तरुण शिक्षक वाटतच नाहीत.शिक्षकाचा शुभ्र पांढरा पोषाख मागे पडला. तालुका कचेरीतील कारकुनासारखे छिटाचे पोलकेसदृश मनिले, छाताडावर गुंड्या नाहीत,नाटक कंपनीतल्या सोंगाड्यासारखी विचित्र चर्या असे बहाद्दर शिक्षक म्हणून ग्रामीण अदिवासी भागात पोटासाठी नोकरी करत आहेत.”
.
१) पुढची पिढी घडवण्याचे काम शिक्षक करतो असे म्हणतात. हे जर खरे असेल तर ...... आज च्या पिढीत जे तथाकथित निष्ठाहीन व पेशास काळीमा लावणारे शिक्षक दिसतात ते मागच्या पिढीच्या निष्ठावंत शिक्षकांनीच घडवले ना ?
२) अवांतर - मला या मागच्या पिढीच्या लोकांची नेहमीच मजा वाटते. पुढच्या पिढीवर संस्कार करायचे पण पुढची पिढी जरा कुठे चुकली की दोष त्यांना द्यायचा. संस्कारांना दोष कधीही द्यायचा नाही. संस्कारांचा व संस्कार करणार्यांचा दोष असूच शकत नाही असे गृहीत धरूनच पुढे जायचे. इतर वेळी (व पुढची पिढी यशस्वी झाली की) मात्र - आमचे संस्कारच तसे होते - चा जयघोष करायचा.
पिढीचा मुद्दा
१) आपले म्हणणे मला अंशतः मान्य आहे;पण आजची पिढी पूर्णपणे मागची पिढी घडवते असे कसे म्हणता येईल ?
२) हा ऑपॉर्च्युनिस्ट दुटप्पीपण आहे हे मला मान्य आहे.
१) कमीतकमी तसे लिहा ना
१) कमीतकमी तसे लिहा ना पुस्तकात - की मागच्या पिढीने जबाबदारी स्वीकारली पाहिजे. की आजच्या पिढीत ज्या समस्या दिसतात त्या किमान काही प्रमाणावर तरी मागच्या पिढीच्यामुळे निर्माण झालेल्या आहेत.
२) मला या दुटप्पीपणाबद्दल फक्त मजा वाटते. गुस्सा येत नाही. It is difficult to live/run life without hypocrisy.
उमाळे
समाजकार्य करणारांचे दोन प्रकार असतात.
१. ज्यांना आपले कार्य केल्याचा थकवा घालवण्यासाठी कुणावर टिका करण्याची गरज नसते.
२. ज्यांना अशी गरज असते.
जो पावेतो असे लोक समाजासाठी चांगले काम करतात तोपर्यंत ते टिका करत सुटले आहेत कि नाही वा ते नक्की काय टिका करत आहे ह्याकडे दुर्लक्ष केलेले बरे. जे लोक अशा समाजसेवींना जवळून पाहतात, त्यांना त्यांच्या कामाचे महत्त्व, विस्तार प्रभावित करून टाकतो नि ते ही अशा टिकेत सामील होतात.
वर कोणत्या परिस्थितीत लोक शिक्षक बनतात, ते कसे कपडे घालतात, इ इ लिहिले आहे. मूळात 'काही लोक' काम ठिक करत नाहीयेत इतकाच त्याचा अर्थ घ्यावा. अक्षरशः घेतले तर त्यातल्या बर्याच आक्षेपांवर प्रश्नचिन्ह उभे राहिल.
शिवाय एका विशिष्ट प्रकारची टिका केल्याने एक कॉज हायलाईट होते. त्याचा परिणाम चांगला होतो. 'नव्या पिढिच्या कशाशा वागण्याचे कारण कोनती पिढी किती आहे' हे चर्चित असताना भांडवलवादी गब्बरना गडचिरोलीच्या आदिवास्यांचे उमाळे दाटून आले हे कमी आहे का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
'नव्या पिढिच्या कशाशा
'नव्या पिढिच्या कशाशा वागण्याचे कारण कोनती पिढी किती आहे' हे चर्चित असताना भांडवलवादी गब्बरना गडचिरोलीच्या आदिवास्यांचे उमाळे दाटून आले हे कमी आहे का?
नाय ओ.
मी - निष्ठावान असणे - या मूल्यावर (आपल्या संस्कृतीने) दिलेल्या ओव्हर एम्फॅसिस वर veiled टीका करत होतो.
भांडवलशाहीतही केवळ कराराच्या
भांडवलशाहीतही केवळ कराराच्या सहीच्या शाईसाठी निष्ठा पाळाव्या लागतातच. तिथेही निष्ठांवर 'जोर' तितकाच असतो.
संस्कृतीत नि भांडवलशाहीत समोरासमोर असताना निष्ठांचा बोलाबाला करणे नि मग आपल्या वर्तुळात असताना त्यांना तिलांजली देणे तितक्याच जोरकसपणे चालते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
पुस्तकओळख आवडली. आणि गब्बरचा
पुस्तकओळख आवडली.
आणि गब्बरचा प्रतिसादही आवडला.