चक्रात सापडलेले लोक
रस्त्यावर शुकशुकाट होता आणि बहुतेक योग्यच होता कारण रात्रीचे तीन वाजले होते आणि ही काही बाहेर पडण्याची वेळ नव्हती . दिवाकर घाईघाईत रस्ता पार करून घरी म्हणजे लॉजमधल्या पलंगाला पोचण्याच्या प्रयत्नात होता. हा रस्ता रोजचाच होता आणि त्यावरून झपाझप चालत जाणारे पायही तेच होत पण आज काहीतरी वेगळं होत आहे असं वाटत होतं. वेगळं वाटल्याने तो आणखीच झपाझप पुढे जात होता.
त्याला वाटलं हे रस्त्याकाठचे जुनाट लायटांचे खांब पाडून टाकले पाहिजेत म्हणजे त्यांना सुटका मिळेल, मुक्ती म्हणा हवंतर. या जुनाट इमारतींना कुणीतरी पाडून टाकलं पाहिजे एकदा. इथे बहुधा आपल्यासारखे चक्रात सापडलेले लोक राहत असावेत.
या सर्वांची चक्रे आपण तोडून टाकली पाहिजेत. कालोअस्मिन होऊन लोकांचा क्षय केला पाहिजे. किंवा हे की जर ही चक्रे तुटणारी नसतील तर किमान आपण तरी तुटलं पाहिजे.
पण ते योग्य नाही. चक्रात सापडलेल्या लोकांना कुणीतरी सोडवल्याशिवाय ते सुटणार नाहीत.
मग त्याला सुनिता आठवली आणि तिला आपण चक्रातून सोडवू शकलो नाहीत याचे वारंवार वाईट वाटले. आपण तिला सोडवायला हवं होतं. तेव्हा आपली हिंमत झाली नाही. ती खुरडत खुरडत जगली आणि खुरपाटून मेली.
रात्र कणाकणाने निथळत होती आणि रस्ता संपत नव्हता. न संपणार्या रस्त्यासारखी हयात आपण घालवितो आहोत की काय असे त्याला क्षणभर वाटले.
पुढे एका वळणावर काही लोक रस्ता अंगाभोवती दुमडून झोपले होते. ना घर ना दार, ना छत. त्याला क्षणभर लॉजमधला पलंग आठवला. त्या पलंगाभोवती एक जुनाट वास दरळून राहायचा. तो वास पाठलाग करत इथवर पोचला आहे असं त्याला वाटला आणि त्याची घालमेल झाली.
या जुनाटपणातून सुटका झाली पाहिजे. मुक्ती. अपार समुद्रांचा शेवट. हे वळणावळणावर दुमडून पडलेले लोक . हातांमध्ये त्या प्रचंड मुक्ततेची अपार शक्ती एकवटून येते आहे असे त्याला वाटले.
कुणी तरी या लोकांना चक्रातून सोडवलं पाहिजे. मग मीच का नको-
प्रतिक्रिया
चक्रावलो आहे.
सिरियल किलरचे विचार आहेत का?
रामन राघव!!
रामन राघव!!
http://shilpasview.blogspot.com
कथा
ती मानसिकता कशी असू शकते या मागचा विचार करणारी लहानगी कथा...
स्वागत!
ऐसी अक्षरेवर स्वागत!
कथाबीज चांगले आहे.. अधिक फुलवता आली असती असे वाटून गेले (म्हणजे अधिक शब्दांत असे नव्हे अधिक परिणामकारक शब्दांत)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
असंच म्हणतो
उत्तम कथाबीज. मात्र अधिक फुलवण्याची आवश्यकता होती. शब्दांबाबत ऋषिकेशशी असहमत. शब्द व वाक्यं परिणामकारक आहेत. मात्र अनेक गोष्टी सांगायच्या राहून जातात. मुक्ती आणि बांधलेपणा यावरच्या मनातल्या काही मिनिटांच्या चिंतनातून कुठचा अतिरेकी निर्णय होईल यावर विश्वास बसत नाही. या चक्रांतून फिरणाऱ्या विचारांमागे ती चक्रं बनवणारी परिस्थिती दाखवली तर अपरिहार्यता स्पष्ट होते.
ही कथा मोठी करून ते लॉज, तो रस्ता, ती खुरडत मेलेली बाई या सगळ्यांच्या गोष्टी सांगाव्या ही विनंती.
+१
+१
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
छान.. पण रस्ता दुमडून झोपणे
छान..
पण रस्ता दुमडून झोपणे वगैरे जास्तच साहित्यिक वाटले. स्पष्ट मत.. राग नसावा
अवसाद आणि उन्माद
घासकडवींची प्रतिक्रिया वाचूण पथोलोजिकल ट्रान्स असा शद्बप्रयोग आठवला..मला वाटतं अत्यंत परस्परविरोधी भावकल्लोळांमधून अवसाद आणि उन्माद दोन्ही संभवतात...
अतिलघुकथा
अतिलघुकथा रोचक वाटली. एखाद्याला अशा गोष्टींवर क्राईम अँड पनिशमेंट लिहावी वाटते. एखाद्याला अतिलघुकथा सुचते
राजेश घासकडवीच्या मताशी सहमत आहे. आणखी असाच थोडा मोठा प्रयत्न करावा.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
प्रथमपुरुषी (उदा. मग मीच का
प्रथमपुरुषी (उदा. मग मीच का नको?) आणि तृतीयपुरुषी (दिवाकर घाईघाईने रस्ता ...) निवेदनाची सरमिसळ झालीय. यातला कोणताही एकच प्रकार वापरला तर कथा अधिक परिणामकारक होईल का? माहिती नाही, प्रयोग करून बघायला पाहिजे.
***
अब्द शब्द
निवेदन
त्याला वाटलं- येथून निवेदनात बदल होतो...शिवाय 'मग त्याला'- हा देखील एक दुवा आहेच..