मेनोपॉज (menopause) 'सोसणाऱ्या ' स्त्रिया .
मेनोपॉज (menopause) 'सोसणाऱ्या ' स्त्रिया .... फक्त एक छोटी अपेक्षा ……………………………………………
मेनोपॉज (menopause) 'सोसणाऱ्या ' स्त्रिया हा समाजातील एक अति दुर्लक्षित गट आहे .या गटाकडे लक्ष द्या , असे सांगणे हा या लेखाचा हेतू आहे .मुळातच स्त्रीला,मग ती स्त्री गृहिणी, आई, बहिण,आजी कोणीही असो, गृहीत धरण्याची आपली 'थोर परंपरा' च आहे. काही नाटक सिनेमांमधून या विषयाला स्पर्श करण्याचा प्रयत्न झालाही आहे परंतु त्यात स्त्रीचा ' एक व्यक्ती' म्हणून विचार करा असा संदेश होता , इथे उपरोल्लेखित विषय अभिप्रेत आहे . एका नाजूक आणि अस्पर्शित विषयावर थोडी चर्चा व्हावी हा हेतू आहे....
.या गटातील स्त्री पंचेचाळीस-पन्नासच्या आसपास आहे. वयात आलेली मुलं बरेचदा आपापल्या व्यापात गुंतलेली असतात ...पूर्वी 'आई' म्हणून वेळोवेळी तिच्याकडून केल्या जाणाऱ्या मागण्याही कमी झालेल्या असतात, यात मुलांचे 'वाढणे ' होत असले तरी 'आईची ' गरज कुठेतरी कमी होत आहे अशी जाणीव तिला भेडसावू लागते . हीच गोष्ट इतरांना 'खुळेपणा ' वाटते . ही स्त्री एका विचित्र मनोवस्थेतून जात असते.साधारणतः लग्नाला २०-२५-३० वर्षे झालेली असतात. या सरलेल्या काळातही तिला गृहीत धरलेलेच असते पण तेंव्हा ते सहन करण्याची शक्ती तिच्यात असते, परंतु आपण विचार करत असलेल्या भावावस्थेत तिचे संतुलन क्वचित ढळू पण शकते.आपले म्हणणे ऐकले जावे, आपल्याला कोणीतरी समजून घ्यावे, आपल्या मनाचा विचार व्हावा-सांभाळ व्हावा अशा नाजूक अवस्थेप्रत ती पोहोचलेली असते.
...एरव्ही स्वतःला सुशिक्षित, उच्चविद्याविभूषित वगैरे म्हणवून घेणारे घरातील सदस्य सुध्धा स्त्रीच्या या अवस्थेबाबत तद्दन गाफील, अनभिद्न्य असतात.मेनोपोझ मधून जाणारी ही स्त्री अचानक चिडते,कधी अचानक रडू लागते व हे रडणे ती आवरूच शकत नाही ,बरे रडायला सबळ असे कारणही असतेच असे नाही..अगदी क्षुल्लक गोष्टीवरूनही ती पटकन disturb होऊन जाते , सारे जग आपल्या विरुध्ध आहे किंवा आपली कोणालाच गरज च नाही असा भाव तिच्या बोलण्यातून डोकावतो किंवा बोलताना भलताच मुद्दा ती भलतीकडे घेऊन जाते . क्वचित तिला वाटते कि साऱ्या शरीरभर गरम लाटा वाहत आहेत , कधी गरगरल्या सारखे वाटते , कधी हातपाय किंवा सर्व अंगाला दरदरून घाम फुटतो. मध्येच ती बोलायची बंद होते तर क्वचित असम्बध्ध बोलत राहते . अधून मधून ओटीपोट दुखणे वगेरे या शारीरिक तक्रारी जोडीला असतात त्या वेगळ्याच . अर्थात प्रत्येकच स्त्री या सगळ्याच लक्षणांना सामोरी जाते असे नव्हे , शेवटी प्रत्येकीचा अनुभव निराळा असतो.परंतु तिच्या या तऱ्हेवाईक वागण्याने घरातील सदस्य मात्र हैराण होतात ,त्यांना त्या मागचा कार्यकारणभावच जाणता येत नाही , आणि स्त्रीच्या या mood swings मुळे साऱ्या घरातील वातावरणच ढवळून निघते .या संदर्भात अनेक प्रश्न घरातल्याना पडू लागत्तात, परंतु या प्रश्नांचा मेनोपॉजबरोबर संबंध कोणीच जोडत नाही ( relate करत नाही ) , जोडू इच्छित नाही , कारण कधीतरी , कुठेतरी या बद्दल काही वाचले असेल, नसेल , व्यवहारात ते कुठेच उतरत नाही . बरेचदा तर खुद्द स्त्री सुध्धा स्वतःच्या या अशा विचित्र अवस्थे बाबत पूर्णतः अज्ञानी असते .किंवा आपली ही अवस्था स्वीकारायला ती मनाने तयार नसते .
........ खूप मोठे आवाज , गर्दी, गोंगाट, ताणतणाव किंवा दिवसाचे काही विशिष्ठ प्रहर असे अनेक घटक या स्त्रीला विचलित करून जातात. क्वचित अशा वेळी अगदी एकटे शांत बसावे एवढीच तिची माफक अपेक्षा असते किंवा क्वचित रडून ही तिला ,मोकळे हलके वाटू शकते. परंतु तिची हीच अवस्था घरात थट्टेचा किंवा वाद-चर्चेचा विषय होऊन बसते. खरेतर तिच्या शारीरिक बदलांवर , ग्रंथीच्या कार्यावर तिचा कोणताच ताबा नसतो , अशा अवस्थेत थोडासा भावनिक आधारही तिच्यासाठी अत्यंत मोलाचा ठरतो.अशात तिची केविलवाणी थट्टा केली जाऊ नये किंवा " हिला ना हल्ली उठसूट रडायची सवयच लागलीये " अशी निर्भत्सनाही होऊ नये.तिच्या या अवस्थेचा विचार तिच्या दृष्टीकोनातून केला जावा .प्रत्येक समस्येला काही न काही उत्तर असते हे खरेच आहे . स्त्रीच्या या सर्व प्रश्नांना योग हे एक फार मोठे उत्तर आहे . मुळात स्त्रीने स्वतः ही परिस्थिती जाणून , अभ्यासून घेतली व तिचा स्वीकार सकारात्मक दृष्टीने करण्याचे ठरवले तर सारे गणित सोपे होऊ शकते . जी परिस्थिती मी टाळू शकत नाही ती सुसह्य्य तरी करू शकते हे तिचे तीच मनाशी ठरवू शकते . स्वतःच्या आहाराचे ती नियोजन करू शकते , स्वतःला लाभतील अशा योगक्रिया , आसने ,नियमित चालणे अंगिकारू शकते . घरातील व्यक्तींना जर आपली ही अवस्था लक्षात येत नसेल तर स्पष्टपणे बोलून ती त्यांच्या निदर्शनास आणून देऊ शकते , स्त्रीरोग तज्ञांशी मोकळेपणी सविस्तर चर्चा करू शकते , गरज पडल्यास थेट मानसोपचारतज्ञाकडून समुपदेशन करून घेत साऱ्या संकल्पना अधिक स्पष्ट करून घेऊ शकते ,स्वतः ला एखाद्या छंदामध्ये , कलेमध्ये हेतूतः गुंतवू शकते आणि अर्थातच उपलब्ध औषधे वेळच्या वेळी घेऊन परिस्थितीला खंबीरपणे सामोरी जाऊ शकते .परंतु या साऱ्या भौतिक गोष्टींसोबत तिला एक मन ही असते आणि याच नाजूक मनाचा कुटुंबीयांनी विचार करणे अपेक्षित असते .शेवटी कुटुंबाचे सौहार्दपूर्ण वर्तन या सर्व उपायांमध्ये खूप वरच्या स्थानावर असते .
.......
"गेली अनेक वर्षे तू आमच्यासाठी बरेच काही केले आहेस , खरेतर आम्हीहि तुझ्यासाठी काही करायला हवे" ही भावना केवळ शब्दातून किंवा फक्त भेटवस्तूंमधून न दर्शविता प्रत्यक्ष कृतीतून दाखवता येते,नव्हे हे कुटुंबियांचे कर्तव्यच आहे. घरातील फक्त स्त्रीनेच अन्य सदस्यांच्या मनाचे , वेळेचे, पैशाचे , नातेसंबंधांचे, ताणतणावांचे एकतर्फी नियोजन, निराकरण करत राहणेच अपेक्षित आहे काय ? आणि जरी केले , तरी त्या पश्चात काही क्षण स्वतःसाठी अपेक्षिले तर ते चूक आहे काय? इतरांनी आपले म्हणणे ऐकून घ्यावे , भावना समजून घ्याव्या , आपली नाजूक व आपल्या कह्य्याबाहेरची मानसिक स्थिती जपावी एवढी अपेक्षा करणे गैर आहे काय? हे केवळ एक रडगाणे नसून खरोखर एक गंभीर आणि उपेक्षित मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा पर्यंत आहे . केवळ महिला दिनी , स्त्रीचा दिखाऊ उदो उदो न करता किंवा तिला अबला सिद्ध करत 'आधार देण्याचा' दांभिक फार्स न करता,उपकार केल्याची भावना न दर्शविता,एकूणच एक व्यक्ती म्हणून तिला समजून घेतले तर रोजचाच दिवस महिला दिन विशेष होऊ शकेल.यात कोठेही , कोणालाही जास्तीचे पैसे , जास्तीचे श्रम , जास्तीचा वेळ किंवा ज्यादा प्रयत्न मुद्दाम खर्चण्याची गरजच नाही.जर या मुद्दयांचा मनाच्या खोल आतून खऱ्या दिलाने व गांभीर्याने विचार केला गेला तर सकारात्मक पाठिंब्याची , नातेसंबंध जपण्याची जाणीवपूर्वक कृती आपोआपच घडून येईल आणि येणारा प्रत्येक दिवस 'कुटुंब दिवस ' म्हणून साजरा होईल
.....
जाता जाता एक छोटीशी टिप्पणी करावीशी वाटते , ती म्हणजे स्त्रियांप्रमाणेच पुरुषही या प्रकारच्या त्रासाला काही काळ सामोरे जात असतात ,कदाचित काही लक्षणे वेगळी असू शकतात , किंवा स्त्री आणि पुरुष यांचे कुटुंबातील,समाजातील,कार्यालयातील स्थान, कामाचे स्वरूप वेगळे असू शकते.तसेच शारीरिक व मानसिक अंगाने एखाद्या गोष्टीला सामोरे जाण्याच्या वृत्ती (attitude)मध्ये फरक असल्यामुळे दोघे त्या त्या स्थितीला कसे सामोरे जातात हाही एक अभ्यासाचा विषय ठरावा वास्तविक यावरही चर्चा होणे तेवढेच गरजेचे ठरते.
या विषयावर चर्चा सुरू केल्याबद्द्ल धन्यवाद.
वेळेअभावी थोडक्यात लिहीते, पण या प्रकारच्या मानसिक हळवेपणाला स्त्री वेगवेगळ्या टप्प्यांवर सामोरी जात असते. मासिकपाळी, गर्भारपण, बाळंतपणानंतरचे काही महिने, मेनॉपॉज ह्या सर्व प्रसंगात, हळवेपण, क्षुल्लक कारणांनी, कारणांशिवाय रडू येणे, हॉट फ्लॅशेस(अंगातून गरम लाटा येत आहेत असे वाटणे) ही लक्षणे दिसतात. अर्थात, वयाच्या पंचेचाळीशीनंतर, शरीर जास्त विकल असते, आपल्यावर कोणी अवलंबून नाही, ही जाणीव जास्त टोचत असते(मुळात 'आपल्यावर कोणी अवलंबून असावेच का' हा मुद्द वेगळा).
आपल्या शरीरात होणार्या बदलांबद्द्ल माहिती(हे बदल प्रत्यक्षात घडायच्या आधीच) असणे, त्याबद्दल बोलता येणे आणि हे सारे नैसर्गीक आहे, यात आपला काही दोष नाही हे मनाला सतत बजावणे, ही अत्यंत महत्वाची बाब आहे.
धन्यवाद सानिया .
धन्यवाद सानिया .
धागा
धागा महत्त्वाचा आहे. चर्चेकडे लक्ष लागले आहे.
या गोष्टी केवळ मानसीक असतात का, आणि असतील तर भावना वगैरे झूट असे म्हणणाऱ्यांचे (स्त्रिया आणि पुरूष) याविषयी काय मत असावे याविषयी कुतूहल आहे.
सहमत
श्रामोंशी सहमत.
या गोष्टी अर्थातच फक्त मानसिक
या गोष्टी अर्थातच फक्त मानसिक या सदरात मोडत नाहीत श्रावण नक्कीच.
मी स्वतःला फारच प्रेक्टीकल समजते , परंतु जेव्हा मला हि कधी कधी " स्वतःला हे काय होत आहे , कसे होत आहे , आणि याला कसे आवरावे " या प्रश्नांची उत्तरे मिळवणे अवघड गेले तेव्हा मात्र यात दिखावा कमी आणि वास्तव अधिक आहे हे उमगले. अर्थातच त्यानंतर माझ्या मित्र डॉक्टरांशी यावर चर्चा केली आणि कुठेतरी स्वतःला सावरण्याचा प्रयत्नही .
तरी सध्या मी मस्त आहे , इतरांनी ही राहावे एवढीच अपेक्षा .
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद .
महत्त्वाच्या आणि माझ्यासाठी
महत्त्वाच्या आणि माझ्यासाठी जिव्हाळ्याच्या असणार्या विषयाबद्दल लिहीण्याबद्दल आभार. सानिया आणि आतिवासचा प्रतिसाद आवडला. लेखात आणि या दोन प्रतिसादांत न आलेल्या पण मला महत्त्वाच्या वाटणार्या गोष्टीसंदर्भात लिहीते.
मेनॉपॉजमधे येणारे प्रश्न हे अचानक काही दिवसांत झालेल्या अंतस्रावांच्या बदलांमुळेच होणारे नसतात. आपण का आहोत, या प्रश्नाचं उत्तर मेनोपॉजचा विचार करतानाही स्वतःला विचारणं सुसंबद्ध ठरेल. गेल्या ५०-१०० वर्षांत स्त्रियांना घराबाहेरही काही आयुष्य हे दिसायला सुरूवात झालेली आहे. पण अजूनही अनेक स्त्रियांची आपल्यामुळे सर्व कुटुंब सुरळीत आहे ही भावना गेलेली दिसत नाही. स्वतःवरही प्रेम करावं, स्वतःचेही चोचले पुरवावेत, घरातल्या इतर व्यक्तींएवढंच आपलंही एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून अस्तित्त्व आहेत याचा विचार ज्या स्त्रिया करणार नाहीत त्यांना बाहेरून, घरच्या माणसांकडून कितीही प्रेम, पाठींबा मिळाला तरीही आतून पोकळपणा जाणवतच राहिल. स्त्रीमधली पुनरूत्पादनाची क्षमता म्हणजेच तिचं मनुष्य आणि स्त्री असणं नव्हे. पुनरूत्पादनाची क्षमता ही असेल किंवा नसेल पण स्वतंत्र अस्तित्त्व त्याहीपलिकडे असतंच. या अस्तित्त्वाचं आपण काय करायचं याचा विचार सुरू असेपर्यंत तात्पुरत्या त्रासांचं आणि शारीरिक बदलांचं महत्त्व वाटू नये.
चाळीशीत चष्मा येतो (आमच्यासारख्यांना त्याहीआधीही चष्म्याशिवाय फोकस्ड रहाता येत नाहीच), चयापचयाचा वेग त्याच सुमारास मंदावायला लागतो, त्याचसारखा एक मेनोपॉज अशा प्रकारे जोपर्यंत स्त्रिया मेनोपॉजकडे पहात नाहीत तोपर्यंत हा त्रास होत रहाणार. उत्क्रांतीच्या संदर्भात याकडे पाहिलं तर आपले गुणधर्म पुढच्या पिढीकडे देण्याचं शरीराचं काम आता संपलेलं आहे. नजर, चयापचय मंदावणे, हे ही त्याच प्रकारचे शरीरावर दिसणारे परिणाम. बालसंगोपनाची मोठी जबाबदारीतून मोकळं झाल्यानंतर पुन्हा स्वतःसाठी वेळ मिळतो आहे.
Red meat सातत्याने आहारात घेणार्या एका मैत्रिणीला प्रश्न पडला होता, हॉट फ्लॅशेसचा त्रास शाकाहारी आणि GM अन्न कमी घेणार्या भारतीय स्त्रियांनाही होतो का? मेनॉपॉजच्या काळात तिची तक्रार फक्त हॉट फ्लॅशेससंदर्भातच होती. मला या प्रश्नाचं उत्तर माहित नाही; पण या संदर्भात काही संशोधन इत्यादी आहे का? पाळीच्या काळात होणारा शारीरिक त्रास आणि मेनोपॉजमधे होणारा त्रास यांच्यात काही संबंध आहे का?
श्रावणचा प्रश्न, या गोष्टी मानसिक असतात का? हॉर्मोन्समधल्या बदलामुळे होणारे त्रास प्रत्येकीला वेगवेगळे होऊ शकतात. एकीला होत नाहीत म्हणून सगळ्यांना होतच नाहीत असंही नाही. शिवाय वयाप्रमाणेही शरीराकडून होणार्या परिणामांमधे बदल होतात असं काही मैत्रिणींशी बोलून लक्षात आलं आहे. पोषण आणि व्यायाम यांनीही बराच फरक पडतो. शिवाय आजच्या काळात असणार्या स्ट्रेसचा शरीरावर कसा परिणाम होईल हे ही नीट सांगता येत नाही. अगदी 'कूल' स्त्रियांच्या शरीरावरही स्ट्रेसमुळे हॉर्मोन संदर्भात परिणाम होतात. मुळात शरीर, तब्येत 'डाऊन' असताना कोणाचीही चिडचिड वाढणारच, नाही का?
मेनोपॉजला मराठीत काय म्हणतात?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
+
चांगला प्रतिसाद. विशेषतः चष्मा लागतो, डायबिटिस होतो तसाच हा प्रकार असा विचार करणे हे आवडले.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
रजोनिवृत्ती.
रजोनिवृत्ती.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
स्मिता, एक महत्त्वाचा विषय
स्मिता, एक महत्त्वाचा विषय तुम्ही मांडला आहे.
निसर्गचक्रानुसार घडणा-या या गोष्टीला प्रत्येक स्त्रीचे शरीर आणि मन वेगवेगळ्या पद्धतीने सामोरे जाण्याची शक्यता जास्त हे तुम्ही 'सगळ्याच स्त्रियांना असा त्रास होतो असे नाही' यातून सांगितले आहेच.
मला एक वाटतं की या विषयाची माहिती करून घेण्याकडे आपला कल फार कमी असतो. 'वेळ येईल तेव्हा काय ते बघू' या विचारामुळे शरीर - मनाची पुरेशी तयारी (नियमित व्यायाम, स्वतःचे छंद, स्वतःचा वेगळा वेळ, योग्य आहार...) अनेकदा ज्यांना शक्य असते त्या स्त्रियाही करत नाहीत. अनेक स्त्रियांना विविध कारणांस्तव हे सगळे करता येणे व्यवहारात अशक्य असते - पण निदान ज्यांना शक्य असते त्याही करत नाहीत. माहिती असेल तर विविध लक्षणांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि एकदम कोणी 'पॅनिक मोड' मध्ये जात नाही.
दुसरं म्हणजे स्त्रियांनी 'दुखणं अंगावर काढायची' आपल्याकडे पद्धत आहे (काही स्त्रिया, काही कुटुंबं याला अपवाद असतील, आहेत). त्यामुळे हार्मोन्सच्या बदलामुळे शरीराचे अनेक त्रास या टप्प्यात निर्माण होण्याची शक्यता असते. चाळीशीनंतर प्रत्येक स्त्रीने किमान दीड दोन वर्षांनी तज्ज्ञांकडून स्वतःची तपासणी करून घेतली पाहिजे - घरातल्या पुरुषांनीही तसा आग्रह धरला पाहिजे. यातून अनेक गोष्टींचे निदान वेळेवर होऊन पुढचा त्रास कमी होऊ शकतो. उगीच पैसे वाचवण्याचा आग्रह सोडला पाहिजे.
तिसरं म्हणजे आपण एकंदर कसे जगलो, याचा बराच परिणाम या स्थितीत आपल्यावर होतो. त्यामुळे एकंदर जीवनशैलीबाबत सातत्याने विचार करून आपल्या सोयीची जीवनशैली स्वीकारणे गरजेचे असते. बरेचदा जुन्यात अडकून बसण्याची सवय घातक असते. शरीराला निसर्गनियमानुसार चालावे लागते हे एकदा स्वीकारले की अनेक गोष्टी सोप्या होतात.
***
अब्द शब्द
धन्यवाद मित्र .बरोबर आहे आपले
धन्यवाद मित्र .बरोबर आहे आपले म्हणणे .
सर्व मित्रांना धन्यवाद . फेस
सर्व मित्रांना धन्यवाद .
फेस बुक वर हीच नोट टाकल्यानंतर अगदी साध्या गृहिणी पासून लंडन स्थित एका डॉक्टर मैत्रिणीसकट अनेक डॉक्टर्स आणि , चं प्र , वीजय मुकुंद तांबे,मुकुंद टांकसाळे पर्यंत अनेकांनी उत्तम अशा पंचेचाळीस कॉमेंट्स दिल्या त्या इथे टाकणे शक्य नाही .
परंतु यावर मुळातून आणि प्रत्येक संबंधित घरात बोलले जाणे अत्यावश्यक आहे असे वाटत राहते .
स्मिताताई, त्या
स्मिताताई, त्या प्रतिक्रियांचा सारांश किंवा excerpts देता येतील का? विशेषतः डॉक्टरांना या संदर्भात बरेच वेगवेगळे अनुभव असणार.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नाहीतर त्यांना ऐसीअक्षरेच्या
नाहीतर त्यांना ऐसीअक्षरेच्या या धाग्याचा दुवा द्या. ती मंडळी इथेही येऊन टंकतील..
तेवढेच आपल्याला विस्ताराने वाचायला मिळावे असा विचार
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
रजोनिवृत्ती
मेनॉपॉजला मराठीत 'रजोनिवृत्ती' असा सुरेख (?) / समर्पक शब्द आहे.
बाकी सवडीने लिहितो. असेच काहीसे पुरुषांच्या बाबतीतही घडते असेही ऐकून आहे. अॅन्ड्रोपॉज. (आता याला काय शुक्रोनिवृत्ती म्हणावे काय?) यावरही जाणकारांनी याच धाग्यात लिहावे.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
उत्तम चर्चा
चांगला चर्चाविषय व चांगल्या प्रतिसादामुळे उत्तम चर्चा घडत आहे.
'एम्टी नेस्ट सिंड्रोम' हा मेनोपॉजपेक्षा या काळात स्त्रीयांना भेडसावणारा अधिक मोठा प्रश्न असावा की मेनोपॉजदरम्यान होणार्या शारीरिक-जनुकीय बदलांमुळे हा सिंड्रोम तयार होत असावा? असा प्रश्न पडतो.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
माहितीपूर्ण चर्चा, गंभीर विषय
या चर्चेसाठी सर्वांचे आभार
बरीच माहिती मिळत आहे
एक शंका - ग्रामीण विभागात अधिक शारिरीक कष्ट करणार्या स्त्रियांना हा त्रास तुलनेने कमी जाणवत असेल का?
धन्यवाद
अतिवास म्हणतात त्याप्रमाणे
अतिवास म्हणतात त्याप्रमाणे दुसरं म्हणजे स्त्रियांनी 'दुखणं अंगावर काढायची' आपल्याकडे पद्धत आहे
त्यामुळेच खेड्यापाड्यातल्या स्त्रियांचे असे प्रश्न बाहेर कळत नसतील असे वाटते.
या विषयावर संदर्भाकरिता अधिक माहिती
या विषयावर इथे काही मांडलंय त्याचा काही उपयोग होईल का ते पाहावं.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
खरेतर तिच्या शारीरिक बदलांवर
२००% सहमत. हे स्वत: डोळ्यांनी पाहिले आहे, आणि त्याने प्रॉब्लेम न सुटता अधिक ताण-तणाव निर्माण होतात.
"उठसूट रडण्या" बद्दल तक्रार आणि प्रत्येक मानसिक-भावनिक वेदनेला "हॉर्मोनल" ठरवून गोळ्यांद्वारे उपचार हे दोन्ही टोकाचे पर्याय आज सर्वत्र दिसतात. रजोनिवृत्तीत कमी होत जाणार्या हॉर्मोन्स ची हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी एकेकाळी या काळातल्या शारिरिक-मानसिक परिणामांवर चांगला उपचार समजला जात असे, पण अलिकडे त्याचा कँसर रिस्क शी संबंध लावला गेला आहे. (या बद्दल धनंजय अधिक खुलासा करू शकतील...) घरच्यांनी मिळून या वेळेस आधार दिल्यास कितपत मानसिक, पारिवारिक आधाराची गरज आहे आणि कितपत खरोखर "केमिकल सपोर्ट" ची हे प्रत्येक बाईला डॉक्टर बरोबर चर्चा करून ठरवता येईल.
मेनोपॉज बरोबरच अजून एक निर्णय अनेक महिलांना याच वेळी घ्यावा लागतो तो म्हणजे गर्भाशय काढून टाकायचा (हिस्टरेक्टमी). स्वत:च्याच घरातल्या उदाहरणावरून माहित आहे की या बद्दलही अगदी टोकाचे पर्याय दिसतात - एकतर ज्या शारिरिक कारणांमुळे याची गरज भासू लागते (सतत महिनोन्महिने रक्तस्त्राव, वेदना, फाइब्रॉइड्स, अनीमिया (मराठी?)) याबद्दल घरात स्पष्ट बोलणं होत नाही. पण डॉक्टरांकडे गेल्यावर बर्याचदा "ऑपरेशनच करावे लागेल" असे एकदम सांगितले जाते. बाकी औषधी किंवा किरकोळ सर्जिकल पर्याय सगळे डॉक्टर सुचवतातच असं नाही. "आता झालं नं त्याचं काम, मग काढूनच टाकूया की!" असं डॉक्टरांनी माझ्या एका बहिणीला सांगितलेलं आठवतं. गर्भाशय काढून टाकल्यावरही रजोनिवृत्तीसारखेच शारिरिक-मानसिक परिणाम बायकांना जाणवू शकतात. त्याबद्दल डॉक्टर बायकांना किंवा घरच्यांना सावधान करतातच असं नाही. शेवटी दुसर्या डॉक्टरांकडे जाऊन, दोनदा फाइब्रॉइड्स साठी उपचार घेऊन, क्युरेटिन करून घेऊन ताईला हिस्टरेक्टमी करावी लागलीच. पण प्रत्येक पदाला नेमके काय पर्याय आहेत याबद्दल स्पष्ट माहिती आणि घरच्यांचा पूर्ण आधार लाभल्यामुळे तिला नंतर तेवढा त्रास झाला नाही - काय अपेक्षित आहे हे ती जाणून होती. आधीच्या पिढीतल्या बायकांचा अनुभव एवढा चांगला नव्हता, हे तिच्या आजाराच्या वेळेसच आम्हा बहिणींना ऐकायला मिळाला - तोवर त्यांनी कोणाला सांगितलं नव्हतं, आणि आम्हीही विचारलं नव्हतं!
अदितीशी सहमत.
अनिमिया
अनिमिया= पंडुरोग?
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
मला तरी पटत नाही.
मेनोपॉज बरोबरच अजून एक निर्णय अनेक महिलांना याच वेळी घ्यावा लागतो तो म्हणजे गर्भाशय काढून टाकायचा <<<
हे असले उपचार कोण अन का सांगत आहे ते कुणी मला सांगेल काय?
'फॅमिली' कंप्लीट झाली म्हणजे गर्भाशयाचे काम फक्त डॉक्टरला पैसे देणे इतकेच उरते काय?
५ 'सेकंड' ओपिनियन्स घ्या.
नुसती हिस्टरेक्टॉमी आहे की ऊफोरेक्टॉमी देखिल करणार आहेत हे बघा.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
महत्वाचा विषय आणि उत्तम
महत्वाचा विषय आणि उत्तम चर्चा.
बिपिन कार्यकर्ते
चर्चा वाचतेय. सध्या सविस्तर
चर्चा वाचतेय. सध्या सविस्तर प्रतिसाद द्यायला वेळ नाही पण हा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे विकांताला नक्कीच.....
ऊत्तम चर्चा वाचतेय
ऊत्तम चर्चा
वाचतेय
.
विषय महत्वाचा
चर्चा वाचतोय, अनुभव कळले, भावनिक संदर्भ पण लक्षात आला, पण एका डॉक्टरच्या भुमिकेतून ह्याचे थोडे शास्त्रीय विश्लेषण अधिक माहितीपूर्ण ठरु शकेल,अर्थात इतर अनुभवपण महत्वाचेच.
ह्यासंदर्भातच आजीच्या सिद्धांतानुसार, उत्क्रांतीच्या गरजेनुसार स्त्रीमधे हा बदल झाल्याचा अभ्युपगम जी.सी.विल्यम्स ह्या जीवशास्त्रज्ञाने मांडला आहे, या अभ्युपगमात, नविन अपत्य न प्रसवता(आईची भुमिका) अधिच प्रसवलेल्या अपत्याची देखभाल(आज्जीची भुमिका) नीट होण्यासाठी हे जनूकीय बदल स्त्रीच्या शरीरात कालपरत्वे घडले असावेत असे नोंदविले आहे, अभ्युपगमाच्या बाजूने व विरुद्ध अनेक मते आहेत, पण ही शक्यता रोचक वाटते.