Skip to main content

बाई

4 minutes

भर उन्हाळी दिवशी डोक्यावर फॅन लावुन, कनक पसारा घालून बसली होती. नानाविध जुने फोटो, पुस्तके, डायऱ्या, वह्या, कागदाचे कपटे आसपास विखुरलेले होते. मधेच गॅलरीमधुन येणाऱ्या, वाऱ्याच्या झुळकीने कागदाचे कपटे अस्ताव्यस्त उडत होते. ते सावरताना तिची तारांबळ उडत होती खरी पण चेहऱ्यावरती व्यग्र भाव ठेवुन काहीतरी वाचत होती ती. काही काही डायऱ्या, कागद वाचताना, तिच्या चेहऱ्यावरती पुसट स्मितरेषा उमटत होती. तर काही फोटो पहाताना, डोळ्यांच्या कडा ओलावत होत्या. कनक होतीच तशी हळवी, मूडी आणि पटकन बोल अंगाला लावुन घेणारी. खरे तर पावसकर बाई तिला नेहमी सांगत -"नाण्याच्या २ बाजू असतात कनक. जर बाह्य घटनांचे पडसाद , एका विशिष्ठ तीव्रतेने तुझ्या अंतर्मनात उमटत असतील तर दर वेळेला ते त्रासदायकच असतीलच असेदेखील तर नाही ना. आनंदाच्या क्षणांमध्येही तर तुला अधिक टोक गाठता येत असेल. आनंद काय किंवा दु:ख काय, तू अशा प्रत्येक समयी तुझे विचार लेखणीने झरझरा उतरवुन ठेवलेस, तर लेखन समृध्द होणारच. खात्री बाळग." 'क्रिएटिव रायटिंगच्या" पहील्या तासालाच बाईंनी 'सीड जर्नलचे" महत्व विषद केलेले होते. बसमध्ये, ग्रंथालयात, घरी, मित्रमैत्रिणीं बरोबर कुठल्या स्थळी चमकदार कल्पनेचा चंदेरी राजवर्खी मासा ,मनाच्या अथांग डोहात सूर मारुन जाईल, सांगता थोडेच येते! मग ती कल्पना अशीच वाया जाऊ द्यायची का? तर नाही कागदाच्या कपट्यावरती नोट करुन ठेवायची. दिवसा-अखेरी सीड जर्नलमध्ये नोट करुन ठेवायचा आळस अजिबात न करता, अगदी कटाक्षाने, रिलिजसली." कनक गालात हसली. किती योग्य सूचना होती, याच सीड जर्नलचा, कनकला वेळोवेळी उपयोग झालेला होता.थेरापेटिकली तर झालाच परंतु, एका हौशी , ॲमेच्यर लेखिकेपासून ते वृत्तपत्रात सदर लिहीणाऱ्या सीझन्ड लेखिकेपर्यंतचा प्रवास याच सीड जर्नलच्या आधारे होत गेला होता. बाईंच्या मदर्तीने तिने स्वतःच्या उदरनिर्वाहाचे एक कायमचे कौशल्य पदरात पाडून घेतलेले होते.

बाई सांगत - "कल्पना करा तुम्ही तुमच्या गावातल्या जुन्यापुराण्या मंदीरास भेट दिली. मग अन्य सर्व पर्यटकांप्रमाणे तुम्ही ते देऊळ फक्त डोळेभर साठवुन येणार का? तर नाही ते तुम्ही कागदावरती उतरवा, दगडी भिंती, अतिशय शांत गाभारा, गाभाऱ्यात, जाणवणारी पवित्रता व शांतता, तेथील साखरफुटाण्यांवरती चढलेली मुंग्यांची रांग, दगडी भस्माचे पात्र, फुले साऱ्या सारे तुमच्या शब्दचित्राने परत जिवंत करा. एकदा प्रत्यक्षात अनुभवताना, एकदा मनातून, वही-डायरीत मांडताना." "पहीला, ड्राफ्ट संपादित करताना, सुयोग्य शब्द, विशेषणे वापरण्यावर भर द्या. लेखकाने शब्दप्रभू असले पाहीजे. तिचे प्रभुत्व पाहीजे भाषेवर. एकच वाक्य किती प्रकारे लिहीता येते ते मोजा, ते उतरवा आणि त्यातून बावनकशी जमलेले वाक्य निवडा" या सूचनेवरती कनकने, बाईंना विचारलेले होते "बाई पण मग लिखाणात उस्फूर्तता कुठे राहीली? उस्फूर्तता महत्वाची नाही का?" यावरती बाई हसल्या होत्या "उत्तम प्रश्न. पहा हं मी सांगण्याचा प्रयत्न करते - तुम्ही जसजसे लेखनातील कौशल्य साध्य करत जाल, तसतशी उस्फूर्तता ही पुढेपुढे परवडत जाईल. मात्र प्रथम प्रथम सरावाला दुसरा पर्याय नाही. लहान मुले चालायला शिकतात तेव्हा परत परत अडखळतात, पडतात, रडतात तसेच हेही." यावरती कनकचे समाधान झाले होते असे नाही पण पुढे प्रत्यक्ष लेख, कविता, निबंध, ललित, प्रवासवर्णने लिहीताना तिला बाईंच्या विधानातील सार्थकता कळत गेलेली होती.

बाईंचे व्यक्तीमत्व प्रसन्न होतेच पण त्याहीपेक्षा तिला महत्वाचे वाटे ते हे की - त्यांच्याशी बोलून उभारी मिळे. पुन: नवीन जोमाने प्रयत्न करण्याची ओढ , तिच्या मनात जागी होत असे. बाई सांगत "तुमच्या आयुष्यात येणारी व्यक्ती मैत्रीनी, मित्र, सवंगडी, आई, वडील, गुरु साऱ्यांना ईश्वराने निर्मिलेले एक चित्र समजा. अनेक मितींमध्ये परावर्तित होणारे, क्लिष्ट पण सुंदर चित्र. त्यांच्या स्वभावाचे पैलू तपासा, अभ्यासा, ॲप्रिशिएट करा. पुढे तुमच्या कथा - कादंबरीतील पात्रांमधुन तुमच्याही नकळत, कोणता पैलू डोकावेल, तुम्हालाच कळणार नाही. व्यक्तीचे मन हे घनदाट अरण्यासारखे असते. तुम्हाला एखाद्या पायवाटेवर जे सापडेल ते अन्य कोणास तसेच सापडेल हे एक्स्पेक्टेशनच चूकीचे आहे. एकच प्रसंग किती विविध दृष्टीकोनांतून चाचपता येतो. लेखकाने एक उत्तम अभिनेता असलेच पाहीजे". अनेक भूमिका तिला लीलया वठवता आल्या पाहीजेत. एक तत्वज्ञ,एखादा गुन्हेगार,एक आई, एक तरुणी, एक वृद्ध स्त्री - अशा अनेक भूमिकांत, लेखकालाप्रवेश करता आला पाहीजे." खरच बाईंचे लेक्चर, त्यांचा क्लास नेहमीच मंत्रमुग्ध करणारा असे. तरीही, कनकला पहीले काही महीने म्हणजे अनेक महीने हा क्रिएटिव्ह रायटिंगचा क्लास जडच गेला. कितीदा तरी तो सोडून द्यावा, कशाला सुखी जीव धोक्यात घाला, असे वाटुन तिने निश्चयही केला परंतु दर वेळेस, पावसकर बाईंनी तो निश्चय मोडीत काढाला. त्या असा काही मुद्दा मांडत, धीर देत की परत कनक, त्या विषयात यश मिळवण्यास तरीही,उद्युक्त होत असे. शिवाय त्यांचे रसाळ लेक्चर ऐकणे हा एक इन्सेन्टिव होताच की

आज मात्र कनकला हे सारे आठवुन तिच्या डोळ्यांच्या कडा ओलावत होत्या. फेसबुकवरती मैत्रिणींकडुन तिला पावसकर बाईच्या निधनाची बातमी कळली होती. शिवाय त्यांच्या डिमेन्शिया या आजाराबद्दल ऐकून तर तिच्या हृदयाला कोणीतरी मुठीत धरुन, धुण्याचा पिळा पिरगळावा तसे वाटले होते. बाई शेवटच्या दिवसात अतिशय थकत गेल्या होत्या, शारीरीक दृष्टीने तर हो च परंतु मानसिक खचल्या होत्या. त्या कृश होत गेल्या होत्या, त्यांची खाण्यापिण्यावरची वासना नुसती उडालीच नव्हती तर 'गिळण्याची" क्रियाही विस्मरणात जाऊ येऊ लागल्याने, अतिशय अवघड होउन बसले होते. विद्यार्थ्यांना शब्दप्रभुत्वाचे धडे देणाऱ्या बाई शेवटी शेवटी साधे रोजच्या जीवनातील शब्द विसरत गेल्या होत्या. कुरुप मूड स्विंग्स, कधी भूतकाळातील वाईट भावनांचा कल्लोळ त्या परत अनुभवत होत्या, तर कधी आपण भूतकाळातच आहोत असे वाटून त्या वावरत होत्या. शेवटीशेवटी तर त्या कोमातच गेल्या. एकंदर म्हातारपणी निसर्गाने केलेली विटंबना त्यांच्या नशीबी आलेली होती. हां पण अवहेलना नाही- हीच काय ती जमेची बाब होती.त्यांच्या लेकीसूनांनी, मुलांनी आपापले कर्तव्य शेवटपर्यंत चोख पार पाडलेले होते. बाईंची शुश्रूषा केलेली होती.

आज, कनकने बाईच्या फोटोस नमस्कार केला व मनोमन तिने प्रार्थना केली. बाई तुमचे व्यक्तीचित्र रेखाटण्याचा प्रयत्न मी करते. जिथे कुठे असाल, तिथून मला आशीर्वाद द्या. एका गुरुपोर्णिमेला , कनक बाईंकडे पेढे व गुलाबाचे फुल घेउन गेलेली होती. तिला पाया पडल्यानंतर, त्यावेळी आशीर्वाद तर मिळालेच होते पण निघताना, बाईंनी तिला एक छानशी डायरी व पेन दिलेले होते. कनकने त्याच डायरीचे पान उघडले, व तिने, बाईंचे व्यक्तीचित्र रेखाटण्यास, लिहीण्यास सुरुवात केली.

Node read time
4 minutes

ललित लेखनाचा प्रकार

मिसळपाव Mon, 26/07/2021 - 19:23

वास्तवातल्या पावसकर बाईंबद्दल हे लिखाण असलं तर you have had fortune to have a great tutor.

हे काल्पनिक असलं तर you have done a great job! लिखाणाबद्दलचे / लेखकाच्या भुमिकेबद्दलचे विचार खरोखरंच अगदी योग्य आहेत.

सामो Mon, 26/07/2021 - 19:38

In reply to by मिसळपाव

प्रतिसादाबद्दल, धन्यवाद मिसळपाव. हे ललित काल्पनिक आहे. खूपदा 'क्रिएटिव्ह रायटिंगचा' कोर्स करावा असे वाटते. कधी केलेला नाही.

मिसळपाव Wed, 25/08/2021 - 16:20

In reply to by सामो

या संबंधित आत्ताच हे वाचनात आलं. हे म्हणे विंदांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिलंय. "म्हणे" लिहायचं कारण की हे व्हॉट्सॅप फॉर्वर्ड या अतिशय खात्रीशीर सूत्राकडून मिळालेलं आहे!!

...तेव्हा सांगायचं हे की, संगीतात काय किंवा वाङ्मयात काय, निसर्गदत्त अंगभूत गुण आणि व्यक्तिगत प्रतिभेची किमया ही देता घेता येत नाही. म्हणूनच कलाशिक्षण हा वदतोव्याघात आहे. आपण शिकवतो किंवा शिकतो ती कला नव्हे, ते कसब. माहिती, ज्ञान, कसब ही देता-घेता येतात. आपण पुष्कळदा कसबालाच कला समजतो. प्रत्येक कलाकृतीमध्ये उत्स्फूर्त कला आणि कमावलेलं कसब यांचा संगम झालेला असतो. म्हणून शिक्षण हे कलावस्तूच्या निर्मितीला पूरक ठरतं. आणि काही कलांच्या बाबतीत ते आवश्यकही असतं. पण इथेही, शिकवण्यासारखं कमी अन् शिकण्यासारखं खूप. देणाऱ्याच्या कुवतीपेक्षा घेणाऱ्याची ताकद अधिक महत्त्वाची!”...

दोन ओळी मी ठसठशीत केल्या आहेत.

आणि तुला कोर्स करायचा आहे म्हणत्येस पण यानुसार 'क्रिएटिव्ह रायटिंग' हेही वदतोव्याघात आहे :-)

सामो Wed, 25/08/2021 - 16:34

In reply to by मिसळपाव

:)
परंतु मी नावे न घेता सांगते मी काही एक टेक्निक काही आय डींच्या लेखनात पाहीलेले आहे. उदाहरणार्थ - अत्यंत अत्यंत अलंकारीक व खरे तर दवणीय शब्द गोळा करायचे व वाक्यात सढळहस्ते पेरत जायचे. आता ते खरे तर जाते डोक्यात परंतु दॅट हिंटस की कदाचित एखादे 'पुअरली इम्प्लिमेन्टेड टेक्निक' असावे की काय.
काही आय डींच्या लेखनात 'डिलेय ऑफ प्लॉट' लक्षात आलेला आहे. पठारावरुन भुरळ घालत , मन रमवत एखाद्या नयनरम्य झऱ्याकडे घेउन जाणे,. म्हणजे मुख्य हेतू झऱ्याकडे जाणे असतो पण खूप वेळ पठारवरती आपण रमून जातो. याला पाल्हाळ लावणे असे काहीजण म्हणतील. परंतु पाल्हाळापेक्षा ते एक टेक्निक म्हणुन पहाता येइल.
>>>>>आपण पुष्कळदा कसबालाच कला समजतो.
टेक्निकली चांगला लेख समजतो. याउलट गाय दी मोपासाच्या गोष्टी वाचल्या आहेत का मिसळपाव? इवलसं म्हणजे अक्षरक्ष: खसखशीच्या दाण्याएवढा गाभा असतो. पण असा काही फुलवुन लिहीलेला असतो. खरी कला. कुंथुन कुंथुन न येणारी.

मिसळपाव Wed, 25/08/2021 - 17:04

In reply to by सामो

गाय दी मोपासाच्या गोष्टी : जालावर आहे का? एखादी लिंक देऊ शकशील?

इवलसं म्हणजे अक्षरक्ष: खसखशीच्या दाण्याएवढा गाभा असतो. पण असा काही फुलवुन लिहीलेला असतो. खरी कला.

पुलंचं अगदी आधीचं काही लिखाण - "बरं आहे" या वर, "मी नाही विसरलो" हे विस्मरणात गेलेल्या शब्दांबद्दलचं - या अशाच स्वरूपाचं आहे. प्लॉट नाही, भावना ओतलेल्या नाहीत, साहित्यिक मूल्य, दवणीय शब्द तर विसरंच! But man, it is so evergreen!