पुस्तक परीक्षणांत सुसूत्रता
पुस्तक परीक्षण / आस्वाद / समीक्षा याबाबतीत काही सुसूत्रता असावी अशी सूचना करावीशी वाटते. परीक्षण कुणी लिहावे यावर अर्थातच बंधन नाही. पण एखादे परीक्षण लिहिल्यावर ते पुस्तक वाचलेल्या मंडळींनी त्या परीक्षणावर आपले मत (मान्य / थोडेसे मान्य / अमान्य) असे व्यक्त करावे, आणि काही एक विशिष्ट संख्येने वाचकांनी असे केल्यावर त्या मतांचा एक छोटा अहवाल (तिन्ही प्रकारांत किती किती लोकांनी आपले मत घातले आहे) त्या परीक्षणासोबत ठेवावा. तसेच त्या परीक्षणावर परीक्षण कुणी लिहिल्यास तेही त्यासोबत जोडावे. याने त्या परीक्षणाला जास्त वस्तुनिष्ठता येईल असे वाटते.
हे सुचवण्यामागे दोन उद्देश आहेत.
एक म्हणजे परीक्षण लिहिणारी व्यक्ती ही जरी 'निरपेक्ष' भूमिकेतून ते परीक्षण करण्याचा आव आणत असली तरी ते परीक्षण बऱ्याचदा 'सापेक्ष' भूमिकेतूनच होते असे वाटते. त्यावर "२ मान्य, ३ थोडेसे मान्य, ५ अमान्य" असा किंवा तत्सम शिक्का बसल्यास ते अधिक निरपेक्ष होण्याच्या दिशेने जाऊ शकेल.
दुसरे, कुठल्याही पुस्तकावर एकच परीक्षण लिहायला हवे असा अलिखित दंडक बऱ्याच वेळेला अजाणता पडलेला दिसतो. तो जर मोडता आला, दुसऱ्या कुणी अजून चार जागा टिपल्या, वा ते परीक्षण वेगळ्या दृष्टीकोनातून केले तर वाचनानंद अधिक डोळस होऊ शकेल असे वाटते.
अर्थात यात प्रतिक्रियेसाठी 'मान्य', 'थोडेसे मान्य' आणि 'अमान्य' या तीनच श्रेणी असाव्यात असे अजिबात नाही. कुठेतरी सुरुवात करायची म्हणून हे सुचवले. फक्त ते 'मान्य/अमान्य' असे तुकडापाड नसावे असे मात्र नक्की वाटते.
एकंदरीत पुस्तक-परीक्षण जितके निरपेक्ष करता येईल तेवढे करावे, म्हणजे 'बसवलेल्या' गणपतींचा धोका टळेल अशी सदिच्छा आहे.
सर्वांचे अभिप्राय अर्थातच या सूचनेला अधिक अर्थपूर्ण करतील.
ता.क.:
हा प्रस्ताव पाच वर्षांपूवी 'मनोगत'वर सादर केला होता. त्यावर सहा प्रतिक्रिया आल्या आणि सगळे थंड झाले.
इथे आठवड्याभरापूर्वीच दाखल झालो. इथला वाचक-वावर आश्वासक वाटला, म्हणून शिळ्या कढीला परत ऊत आणला.
प्रतिक्रिया
सूचनांबद्दल धन्यवाद
सूचनांबद्दल धन्यवाद. थोडी माहिती : इथल्या धाग्यांना तारे आणि प्रतिसादांना श्रेणी देण्याची सुविधा पुष्कळशा सदस्यांना उपलब्ध आहे. तिचा वापर करून सदस्यांना मतप्रदर्शन करता येतं. मिळालेले सरासरी तारे अथवा श्रेणी किती/काय ते सर्व सदस्यांना दिसतं. अधिक माहिती 'संस्थळाची माहिती' इथे मिळू शकेल.
बाकी एकाच कलाकृतीवर किती जणांनी लिहावं यावर काही बंधन नाही. सदस्यांना स्वतंत्र परीक्षण लिहावंसं वाटलं तर ते लिहू शकतात.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ठोस टेम्प्लेट ?
सर्वप्रथम चौकस यांचे ऐसीअक्षरेवर स्वागत!
परिक्षणाला वस्तुनिष्ठता येण्यासाठी परिक्षणांची एक ठोस टेम्प्लेट असावी असे काहीसे सुचवायचे आहे का? याचे फायदे तोटे दोन्ही आहेत.
जर असे काही सुचवायचे असेल तर माझे सध्यातरी मत याच्याविरूध जाते कारण यामुळे ठोकळेबाज (एकासारखीच दुसरी) परिक्षणे येतील असे सकृतदर्शनी वाटते. यावर इतरांच्या मतांचे अर्थातच स्वागत आहे.
बाकी सदस्यांच्या मतप्रदर्शनाबद्द्ल वर चिंतातूर जंतू यांनी माहिती दिली आहेच. तार्यांचा वापर करून आपले मत देता येईल - येते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आवडले
मांडलेले मुद्दे पटले आणि आवडले.
राधिका
धोका आहे अशा पद्धतीत......जरी
धोका आहे अशा पद्धतीत......जरी चौकसरावांना 'तुकडा पाड' छापाचे प्रतिसाद अपेक्षित नसले तरी.
म्हणजे असे की, परीक्षण करणार्याने ते करताना जे वाचनकष्ट, लिखाणकष्ट घेतलेले असतात त्याचा विचार वाचकाने केवळ 'मान्य/अमान्य' ची त्रोटक फसवी पीसे लावण्यात केला तर त्यापासून परीक्षणकर्त्याला कसले समाधान प्राप्त होईल ? प्रतिसादकाने 'मान्य/अमान्य' मागील योग्य ती कारणमीमांसा सुयोग्य स्वरूपात देवू केली [दिलीच पाहिजे] तरच त्याच्या 'थोडक्यात...' मताला काही तरी वजन प्राप्त होईल, अन्यथा एखादा लेख वाचला की त्यावर ठरलेल्या जिलेबीच्या चकत्या "छान....आवडले....अजून येऊ दे....पुलेशू" इथल्या सदस्यांना नव्या नाहीत [असे होत असलेले काही ठिकाणी मी पाहिले आहे म्हणूनच सविस्तर लिहित आहे...."मायबोली" वर साजिरा नावाचे एक सदस्य आहेत, त्यानी शंकर पाटलांच्या "टारफुला" तसेच भाऊ पाध्ये यांच्या 'वैतागवाडी' व 'राडा' वर प्रदीर्घ असे अप्रतिम परीक्षण केले आहे, त्यावरील बहुतांशी प्रतिक्रिया ह्या अशाच "छान....आवडले" संपले, धाटणीच्या. त्या वाचल्यावर साजिरा याना कसला आनंद झाला असेल ? असे चित्र समोर येतेच येते]. अशा टीआरपी टिकल्यापासून धागा जरी सुजलेला दिसला तरी त्यामुळे धागा-लेखकाला कसले समाधान प्राप्त होईल हे त्यालाच ठावे.
चांगल्या लेखनाला तितक्याच चांगल्या परीक्षणाची पावती मिळाल्याचे पाहिल्यावर चांगला वाचकही त्यापासून निर्माण होतो हे जितके सत्य तितकेच त्या वाचकानेही "....मला अमुक एक पुस्तक वाचण्यास तुमच्या परीक्षणाने प्रवृत्त केले....' इतपत जरी म्हटले तरी त्या परीक्षणकर्त्याला किमान काही पातळीपर्यंत लेखनसमाधान मिळते. केवळ 'मान्य/अमान्य' ने उभयपक्षी काही साधणार नाही.
"२ मान्य, ३ थोडेसे मान्य, ५ अमान्य" ~ अशा चाळणीमुळे 'मत प्रदर्शित' जरूर होईल, पण त्यामुळे पुढील परीक्षण हे 'निरपेक्षवृत्तीने' होईल हे कसे ठरविता येईल ? शिवाय मराठी वाचक नावाची जमातही तशी लबाडच असते. त्याला 'पु.ल.देशपांडे' यांच्या पुस्तकावरील परीक्षण कसेही येवो, तो ते पुस्तक 'पुलंचं' आहे म्हणून वाचणारच, पण 'चौकस' नावाच्या परीक्षणकर्त्याने पु.शि.रेग्यांच्या 'दुसरा पक्षी' वर भरभरून लिहिले तर तो ते पुस्तक मिळवून वाचेल असेही नसते. मग अशावेळी त्याने त्या "पक्षी" परीक्षणाला पुस्तक न वाचताच 'मान्य/अमान्य' शेरा दिला तर त्यामुळे वाचनपरंपरेत कसलीही भर पडणार नाही.
अशोक पाटील
कलानुभूती आणि साधारणीकरण
ऐसीवर स्वागत. या लेखात परीक्षणाबाबतीत किंवा खरं तर एकंदरीतच कलानुभूती आणि त्या अनुभूतीच्या अभिव्यक्तीबाबत एक विशिष्ट पातळी येण्यासाठी काही ना काही साधारणीकरणाची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. एक विशिष्ट दर्जा राखण्यासाठी तुम्ही म्हणता त्याप्रकारच्या फीडबॅक सिस्टिममुळे फायदा होतो हे निश्चित. निव्वळ +१, आवडलं, अशा चान चान प्रतिसादांनी मूळ लेखात काही विशेष भर पडत नाही.
आंतरजालीय माध्यमाचा फायदा हाच आहे. फक्त लेखकाने लेखन करून वाचकाने ते वाचलं इथेच ते नातं संपत नाही. त्यातून येणाऱ्या प्रतिसादांतून आणि चर्चेतून लेखनविषय़ाचे, शैलीचे, शब्दप्रयोगांचे नवीन पैलू अधोरेखित होतात. एखादा हिरा नुसता बघण्याऐवजी वेगवेगळ्या प्रकाशात गोल फिरवून पहावा तसंच.
हे मात्र अमान्य. परीक्षण लिहिणाऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन हे एक महत्त्वाचं अंग आहे. एखाद्या कलाकृतीतून सांगितलेलं सत्य वेगवेगळ्या डोळ्यांना वेगवेगळं दिसतं. त्यामुळे निरपेक्षतेचा चष्मा लावून (तसा चष्मा आहे हे गृहीतकच...) दिसणारं, सर्वांसाठी समान चित्र दाखवण्याचा प्रयत्न झाला तर त्यातली गंमत नाहीशी होईल असं वाटतं.
ऐसीवर तरी आम्ही श्रेणी देऊन लेखनाच्या साधारण दर्जाविषयी लेखकाला फीडबॅक देण्याचा प्रयत्न करतो. वाचकांनी जर +१, आवडलं, अशा चान चान प्रतिक्रियांपलिकडे जाऊन चर्चा केली तर जालीय माध्यमाची शक्ती पूर्णपणे वापरली जाईल.
.
.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
.
.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
थोडेसे सविस्तर
प्रतिक्रिया वाचून आनंद वाटला. गाडे पुढे सरकते आहे तर...
एका पुस्तकावर (आणि पुढे जाऊन एका नाटकावर, एका सिनेमावर, एका गाण्याच्या मैफलीवर) एकानेच परीक्षण लिहावे असा नियम नाही हे खरे. पण जालावरील माझ्या त्रोटक वावरात मला तरी एका कलाकृतीवर एकच परीक्षण आणि त्याखालचे एकशब्दी/एकवाक्यी/एकआकडी खुळखुळे ('वा', 'छान', 'असेच म्हणतो', 'जबरा', 'पु ले शु', 'पु ले प्र', '+१', '+२' आदि) असेच सगळीकडे आढळले.
वृत्तपत्र / मासिकांमधले परीक्षण तर बहुधा एकांगी असतेच असते. कारण तिथले 'समीक्षक' बहुतेक वेळेस जडजंबाल (आणि/किंवा 'काय वाटेल ते') लिहिण्याचे पैसे वाजवून घेत असतात आणि 'वाचकांचा पत्रव्यवहार' वापरून त्यांचा प्रतिवाद करण्याची इच्छा आणि चिकाटी असणारी मंडळी विरळा.
पण जालावर असलेल्या अंगभूत प्रकटीकरण स्वातंत्र्याचा फायदा फारसा कुणी घेताना दिसत नाही.
दुसर्या शब्दांत मांडायचे झाले तर एखादे लेखन करणार्याला त्याच्या बर्या-वाईट परिणामांना तोंड द्यायला तयार रहावे लागते. पण 'परीक्षण' लिहिणारे स्वयंघोषित दलम कमांडर असल्याच्या थाटात फैरी झाडत हिंडत असतात.
माझ्या नजरेसमोरचे (स्वप्न)चित्र काहीसे असे आहे:
(१) एखादे परीक्षण (इथले वा वृत्तपत्रामधले) जर का 'ठरवून पाडलेले' वाटले तर त्याचा लोकशाही पद्धतीने प्रतिवाद केला जावा. त्यासाठी संख्यावापराची सूचना.
त्यामागची पूर्वपीठिका अशी. वृत्तपत्रांमधून गोग्गोड परीक्षणे येऊनसुद्धा बरीचशी नाटके नि चित्रपट प्रेक्षकांच्या प्रतिसादाअभावी रपाक्कन आपटलेली दिसतात. आणि परीक्षकांनी झोडपून काढूनसुद्धा काही चित्रपट धोधो चालतात. 'मी इतका थोर की जे मला कळते ते जनतेला कळत नाही. त्यामुळे जे जनतेला आवडते ते वाईट' अशी प्राध्यापकी भूमिका म्हणजेच परीक्षण असे जे समीकरण गेली बरीच दशके रुजलेले दिसते आहे ते उखडून काढायला हवे.
त्यामुळे असल्या 'पाडलेल्या' परीक्षणावर "१ मान्य, ३ थोडेसे मान्य, १३७ अमान्य" असा डाग दिला तर झकास. आणि अजून श्रेणी वाढवता आल्या तर उत्तमच.
आता 'लोकसत्ता' वा 'महाराष्ट्र टाईम्स'मधल्या परीक्षणाला इथे का झोडपावे/गोंजारावे? तर तिथे काय छापावे नि छापू नये (यातले दुसरेच जास्त!) हे ठरवणारे कुणीतरी असते. इथे खर्या अर्थाने प्रकटीकरणाचे स्वातंत्र्य आहे.
(२) परीक्षण लिहिण्यासाठी शिंग-शेपूट असले काही लागत नाही, जे भावले/वाटले ते लिहिले की त्यालाच 'परीक्षण' म्हणतात हा संदेश जास्तीतजास्त वाचकांपर्यंत जावा आणि परीक्षणे लिहिणार्यांच्या संख्येत भरघोस वाढ व्हावी. शंभर वाचकांमागे दहा लेखक आणि एक परीक्षक हे समीकरण बदलावे. लेखकांपेक्षा परीक्षकांची संख्या जास्त व्हावी. स्वैपाक करता आला नाही तरी 'गूळपोळीला कड आली आहे' किंवा 'थालिपीठ सपक झाले आहे' हे सरळपणे सांगण्याची कसली भीती?
असो.
लोकमान्यता आणि रसिकमान्यता
'मी इतका थोर की जे मला कळते ते जनतेला कळत नाही. त्यामुळे जे जनतेला आवडते ते वाईट' अशी प्राध्यापकी भूमिका म्हणजेच परीक्षण असे जे समीकरण गेली बरीच दशके रुजलेले दिसते आहे ते उखडून काढायला हवे.
असे जाहीरपणे म्हटलेले ('सत्यकथे'च्या संपादकांप्रमाणे ज्यांच्या भिवया इतक्या उंचावलेल्या आहेत की त्या भिवया आणि टाळू यांच्यांत फारसा फरक राहिलेला नाही अशा) स्वयंघोषित चिकित्सक/ गुणग्राही/रसिकाग्रणी लोकांना आवडत नाही. (मग ते प्राध्यापक असोत वा नसोत ;-)) जनतेचा लोंढा एका दिशेला जाताना दिसला आणि तुम्ही तुमचे खेचर जर भलत्याच दिशेला वळवले नाही तर तुम्ही कसले डोंबलाचे समीक्षक?
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
सुसूत्रता
पुस्तक परीक्षणच नव्हे तर एकूण लिखाण अशा काही वृत्तामध्ये बंदिस्त करुन लिहिले जावे हे मनाला पटत नाही. प्रतिसाद ठोकळेबाज असणार, पण त्यामुळे लेखकाने चौकटीत राहून लिहावे हे अयोग्य आहे. प्रतिसादांना तारे किंवा श्रेणी देण्याची कल्पना स्पृहणीय असली तरी ती शेवटी चिकित्सा आणि विश्लेषण या अंगानेच जाते. माझ्या मते लिखाणाला मनमोकाट फुलू द्यावे. काटछाट करुन कुठे त्याचा मोरच कर, कुठे हत्तीच कर असले काही केले तर ते बागेत केलेलेया झाडांच्या प्राणीआकारांइतकेच केविलवाणे वाटेल.
बाकी मतांतराचा आदर व्हायलाच हवा. 'काकस्पर्श' या चित्रपटाच्या परीक्षणाचे उदाहरण घ्या. मी त्या चित्रपटाला 'अतिभिकार' म्हणून टाकले होते. रमताराम यांनी त्याच चित्रपटाची प्रशंसा केली आहे. या दोन्ही मतांशी सहमत असणारे आणि नसणारेही प्रतिसाद आले आहेत. ठीक. विषय संपला.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
लोकमान्य की रसिकमान्य?
एकूण मुद्दे विचार करण्यासारखे आहेत, पण -
याच्याशी असहमत. लोकमान्यता आणि रसिकमान्यता यांत नेहमीच द्वंद्वात्मक मांडणी करणे किंवा तिची अपेक्षा ठेवणे हे काहीसे अवाजवी आणि एकंदर परस्परसंवादाला हानिकारक वाटते. तुम्ही म्हटले आहे त्याच्या उलट बाजूनेदेखील उदाहरणे देता येतात -
उदाहरणार्थ, प्रदर्शित झाले तेव्हा गुरुदत्तच्या गंभीर चित्रपटांना लोकाश्रय मिळाला नाही, पण ते आज महत्त्वाचे मानले जातात; त्याउलट त्याच काळात 'ज्युबिली कुमार' म्हणून गाजलेल्या राजेंद्रकुमारच्या चित्रपटांना आज फारशी प्रतिष्ठा नाही.
असो. मुद्दा हा की अशी द्वंद्वात्मकता कल्पून, त्यात एक कोणतीतरी बाजू सरसकट घेऊन आणि दुसरी बाजू उखडून टाकून फार काही साधत नाही. त्यापेक्षा निव्वळ गुणात्मक शेरे देणे आणि दीर्घ पण मौल्यवान प्रतिसाद देणे या दोन्ही साधनांचा वापर योग्य वाटेल तसा करता यावा.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||