‘फायनल ड्राफ्ट’
खास “एका लग्नाची दुसरी गोष्ट” फेम मुक्ता बर्वेच नाटक पाहायला गेले.....वाटलं होत, आता एक अप्रतिम नाट्याविष्कार पाहायला मिळणार.
सुरवातीला कलाकारांची ओळख म्हणून दोन शब्द बोलायला मुक्ता बर्वे आणि गिरीश (आडनाव आठवत नाही.) यांना बाहेर बोलावले तेव्हा त्यांच्या बोलण्यावरून वाटलं कि धमाकेदार परफॉर्मन्स होणार...पण नाटक सुरु झाल तस जाणवलं कि सगळ संवादांवरच निभावून नेत आहेत.
तसे संवाद हसवायला लावतात...क्षणभर भावूक बनवतात. पण कोणताही शिक्षक विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय कसा काय त्यांना क्लास मध्ये घेऊ शकतो...बर, जरी घेतलं तरी एकाच विद्यार्थ्यावर इतकी मेहनत का घेतो, हे जरा समजायला अवघड जात.
नाटकात मुक्ता अभिनय पूर्ण जीव ओतून करते. कधी वेडेपणाची, कधी रागाची छटा तिने छान रंगवली आहे. कथेचा धागा अगदीच छोटा आहे आणि ३ तास नाटक सदर करण्याकरिता त्यात संवादांच पाणी घातलेलं आहे. तरी नाटक जास्त पाणचट होऊ नये, याची खबरदारी घेतलेली आहे.
‘जरी आपल्या जवळच्या लोकांनी आपल्याला कितीही ‘ट्रेंडी’ बनवायचा प्रयत्न केला, तरी आपण आपला ‘वेगळा’ दृष्टीकोन जपावा. कुणाला ना कुणाला, कधी ना कधी तो पटतो आणि तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे काम करता येतच.’ असा संदेश आपल्याला मिळतो...आणि नाटक संपत.
नाटक संपल्यावर ‘नव काय पाहिलंय?’.. असा प्रश्न पडण साहजिकच आहे. कारण आपण समाधानी होत नाही.
तरी काही विनोद खूप छान जमले आहेत...त्या विनोदांमागची कथा मात्र आपल्याला इमोशनल बनवते....ते गूढ खूप रंजक पद्धतीने दाखवले आहे.
थोडक्यात काय, कि फक्त मुक्ता बर्वे आणि तिच्या अभिनयासाठी पाहणार असाल तर उत्तम.
रेटिंग: **
प्रतिक्रिया
हे राम
<<गिरीश (आडनाव आठवत नाही.)>> लोल.
<<नाटक सुरु झाल तस जाणवलं कि सगळ संवादांवरच निभावून नेत आहेत. >> ह.ह.पु.वा. ठार मेलो.
<<३ तास नाटक सदर करण्याकरिता त्यात संवादांच पाणी घातलेलं आहे. तरी नाटक जास्त पाणचट होऊ नये, याची खबरदारी घेतलेली आहे.>> सॉल्लिड समीक्षा! झाडून सार्या समीक्षकांनी अल्पाक्षरी समीक्षेचा हा नमूना अभ्यासावा असं फार फार वाटतंय.
इथे कपाळावर हात मारून घेणारी स्मायली कशी आणायची?
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
सदरहु प्रतिसादातील चेष्टेचा
सदरहु प्रतिसादातील कुचेष्टेचा निषेध... आम्हाला शब्द्बंबाळ समीक्षेपेक्षा मोजक्या शब्दातली समीक्षा जास्त उपयोगी पडते.
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
अवघड आहे. असो.
अवघड आहे. असो.
-मस्त कलंदर
उदरभरण नोहे
परीक्षणात ए टू झेड पूर्ण कथा
परीक्षणात ए टू झेड पूर्ण कथा सांगून टाकणं हे एक टोक, ते अयोग्यच.
आणि दुसरं टोक म्हणजे अजिबातच माहिती न देता गोदामातल्या पोत्यात सॅम्पलर खुपसून काढल्यासारखी एकदोनच नमुना माहितीवजा वाक्यं देऊन त्यावरुन फक्त संकीर्ण मतं देणं.
फक्त नाटक खास वाटलं नाही इतकी माहिती सोडून नाटकाविषयी बाकी विशेष काहीच माहिती अजिबातच कळत नाही.
तसं काहीसं इथे झालंय असं वाटतं.
मुळात मुक्ता बर्वे ही 'एका
मुळात मुक्ता बर्वे ही 'एका लग्नाची दुसरी गोष्ट फेम' असण्याच्या खूप आधीपासून अतिशय चांगल्या व्यावसायीक आणि समांतर नाटक / चित्रपटांमधे फार पूर्वीपासून काम करतेय.. त्यामुळे तिच्यावर एखाद्या प्रसिद्ध सिरीयल चा शिक्का मारणं चुकीचं आहे असं वाटतं. आणि तुमच्या माहीती साठी म्हणून- गिरीश जोशी हे एक उत्तम लेखक आणि दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत.. थोडं शोधल्यास त्यांच्या कामाबद्दलची माहिती सहज मिळू शकेल.
नाटकाबद्दल सांगायचं झाल्यास, एक पटकथाकार आणि त्यांच्याकडे शिकायला येणारी मुलगी, एवढीच कथा नसून, त्यात एकमेकांवर दोषारोप करताना हळूहळू होत गेलेलं आत्मपरीक्षण, आपल्याला काय हवं होतं आयुष्यात, आणि आपण आत्ता काय करतोय याची जाणीव होणं.. आपल्या स्वत:च्या आयुष्याकडे एका दुसर्या चष्म्यातून पाहताना अजूनही आपल्याला हव्या त्या मार्गावर चालता येईल, चुका अजूनही सुधारता येतील असा आशावाद निर्माण होणं हे सगळं अतिशय समर्थपणे फक्त आणि फक्त संवादातून सादर केलंय... आणि अर्थातच दोघांच्याही अभिनयातून सुद्धा.
नाटक जुना (६-७ वर्षांपूर्वीचा) आहे आणि मी पुर्वी ते फक्त सुदर्शन रंगमंचावर सादर व्हायचं तेव्हा आणि त्यानंतर २ वेळा पाहीलंय. इतकी वर्ष अजूनही सुरू असलेले प्रयोग, आणि मिळालेली अनेक बक्षिसे, याअर्थी नाटकाने व्यावसायीक यश नक्कीच मिळवलंय असं मानता येईल.
मला स्वत:ला वरील परीक्षण अगदीच पटलं नाहीये, कारण माझ्या मते जे निगेटीव्ह मुद्दे सांगितले आहेत, तेच या नाटकाचे पोझिटिव्ह मुद्दे आहेत असं मला वाटतं.
तुमचं नाट्य परीक्षण आणि
तुमचं नाट्य परीक्षण आणि मतांशी सहमत. तुम्ही आत्ताच आलेला 'यमला पगला दिवना -२' पाहिला असेल तर त्याचेही परीक्षण द्या ना 'प्लीज'...हवं तर आग्रहाची विनंती समजा!
....तर आवडले असते
ऐसीअक्षरेवर स्वागत आहे
अधिक विस्ताराने परिक्षण आले असते तर आवडले असते. असो. पु.धा.शु!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
चालायचंच... ज्याचे त्याचे
चालायचंच...
ज्याचे त्याचे विचार...
मझा जालावर पूर्वप्रसिद्ध ( जुलै २००८) केलेला याच नाटकावरचा एक धागा पुन्हा चोप्य पस्ते करत आहे.( ते संस्थळ सध्या दिसत नाही .. अन्यथा दुवा देणार होतो...)
___________________________________________________________________________
नाटक : फ़ायनल ड्राफ़्ट
लेखक आणि दिग्दर्शक : गिरीश जोशी
कलाकार : मुक्ता बर्वे
गिरीश जोशी
निर्मिती : महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे
जसे नाट्यलेखनाच्या मूलभूत नियमांबद्दल लिहिले, तसेच लेखनाच्या ठराविक आडाख्यांपासून दूर जाणारे, नियमांच्या साचेबद्ध चौकटी तोडणारे नाट्यलेखन यावरही लिहित आहेच..... चाहूल, साठेचं काय करायचं, लूज कंट्रोल यावर पूर्वी लिहिलं आहेच... तसंच थोडंसं वेगळं हे दोन अंकी नाटक ...
कथासार :
पूर्वी सिनेमा नाटक किंवा टीव्ही या माध्यमासाठी अभिनय आणि इतर तांत्रिक प्रशिक्षण देणार्या संस्था कमी होत्या..आता जसे जसे टीव्ही चॆनल वाढले आहेत, तशी त्या संस्थांची गरज वाढतेय आणि आपण अशा अनेक संस्था आजूबाजूला पाहत आहोत.त्यातून नवनवीन अभिनेते, लेखक , दिग्दर्शक घडत आहेत.ही गोष्ट आहे, अशाच एका संस्थेत लेखन शिकवणार्या प्राध्यापकाची आणि त्याच्या विद्यार्थिनीची... ती ऎकेडमीमध्ये लेखन शिकायला आलीय खरी पण तिचं अभ्यासात लक्ष नाही, शिकवलेलं कळत नही म्हणून सर तिला शिकवणीसाठी घरी बोलावतात...त्यात सर सुरुवातीला तिला एक संपूर्णपणे कल्पनेतली गोष्ट लिहून आणायला सांगतात. पण ती स्वत:च्या आयुष्यातल्या गोष्टीच त्यात फ़िरवून फ़िरवून लिहून आणत राहते...मग सर तिच्यावर वैतागतात , दोघांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी समोर येतात.
मुलगी एका छोट्या गावातून आलेली आहे, ती गोंधळलेली आहे आणि ध्येयहीन आयुष्य जगत आहे, तिला लेखक व्हायचंय पण ती त्यासाठी तितके कष्ट घेत नाहीये कारण कदाचित तिने स्वत:च सरांचे ऎकेडमीमध्ये येण्यापूर्वीचे लेखन वाचलेले आहे, आणि तिला त्यांचे पूर्वीचे लेखन खूप आवडले आहे, मात्र ती ऎकेडमीमध्ये त्यांच्या पहिल्या तासाला ते जे सांगतात त्याने प्रचंड व्यथित झालेली आहे, तिला जाणवलेले आहे की आता लोकांना आवडतं तेच मोजून मापून लिहायला सांगणारा हा पूर्वीचा आपला आवडता लेखक नव्हे... या विरोधाभासाने ती खचलेली आहे.आणि ती सरांना विचारते की तुम्ही असं का केलंत सर? या साध्या प्रश्नाचं उत्तर सर देऊ शकत नाहीत आणि त्यांचा स्वाभिमान दुखावतो....
पंधरा वर्षांपूर्वी सरांनी थोडेफ़ार नाव कमावलेले आहे आणि आता ते एक नाटक लिहू पाहत आहेत पण गेली तीन वर्षे त्यांना ते जमत नाहीये... वैयक्तिक आयुष्यात त्यांचे बायकोबरोबरचे संबंध दुरावलेले आहेत.. एक दोन फ़ोनमधून ते उत्तम व्यक्त होतात...
सर आणि विद्यार्थिनी दोन्ही पात्रे दुखावलेली आहेत आणि आतून घाबरलेलीसुद्धा....दोघे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात.... लेखन राहते बाजूला आणि ते एकमेकांची वैयक्तिक आयुष्यातली उणीदुणी काढत राहतात. स्व टिकवण्यासाठी दुसर्याला दुखवण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही जणू त्यांच्याकडे....पण यातून काहीतरी चांगलं घडतं.. या सार्यातून ते आपापल्या चुका शोधतात, उणीवा सुधारायचा प्रयत्न करतात......त्याचे अडलेले नाट्यलेखन पूर्ण होते, तिला एक मोठी सीरियल मिळते. पण त्यांच्यात काही नाजूक बंध निर्माण व्हायची जी काही थोडी शक्यता असते तीही बारगळते आणि ते दोघे समंजसपणे दूर होतात.
या संपूर्ण नाटकाचे बलस्थान आहे, संवाद....या नाटकाचे नुसते मोठ्याने वाचन करायलासुद्धा फ़ार मजा येते असा माझा अनुभव आहे.......(याची मॆजेस्टिकने छापलेली संहितासुद्धा उपलब्ध आहे.).
गिरीशने लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता अशी मोठी जबाबदारी पेलेली आहे... तो स्वत: एका संस्थेमध्ये लेखन शिकवत असल्याने अशा स्वत:च्या आयुष्यातल्या घटनावर लिहिणार्या विद्यार्थ्यांचा अनुभव त्याला नेहमी येत असे असे त्याने एका मुलाखतीत सांगितल्याचे आठवते...शिक्षकाच्या भूमिकेतला लेखन शिकवतानाचा बराचसा तांत्रिक भाग मी त्याच्या कार्यशाळेतसुद्धा त्याच्याच तोंडून जसाच्या तसा ऐकला आहे..रंगमंचावरच्या त्याच्या हालचाली, विद्यार्थिनीच्या चमत्कारिक वागण्याने गोंधळलेला, तिच्यात कळत नकळत पणे थोडासा गुंतत जाणारा पण वेळीच दूर जाणारा शिक्षक त्याने चांगला दाखवलेला आहे...मुक्ता बर्वेने सुरुवातीला अभ्यासात लक्ष नसणारी, मठ्ठ वाटणारी पण नंतरची दुखावलेली विद्यार्थिनी उत्तम सादर केली आहे...
दोनच पात्रांचे दोन अंकी व्यावसायिक नाटक पण यात नाट्यपूर्ण घटना नाहीत, प्रेमकथा नाही, रूढ खलनायक नाही,मेलोड्रामा नाही, विषय आहे नाट्यलेखनासारखा रूक्ष ( यावर काय नाटक लिहिणार ?असेही काहींना वाटू शकते ).रंगमंचावर काहीही विशेष घडत नसताना प्रेक्षकाला बंधून ठेवणे अवघडच.... पण हे नाटक ते लीलया करते..
या नाटकाचे अजून एक विशेष म्हणजे हे नाटक सुदर्शनच्या प्रायोगिक रंगमंचावर जितके रंगते तसेच ते व्यावसायिक मंचावरही प्रेक्षकांनी उचलून धरले..
( मी हे नाटक दोन्ही मंचावर पाहिले आहे आणि ते दोन्हीकडे तसेच रंगते असे मला वाटते).
प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांच्या (तथाकथित) रूढ सीमारेषा या नाटकाने अजून धूसर केल्या...
या नाटकाने २००७ मध्ये अमेरिका दौराही केला तेव्हा काही तिकडल्या सदस्यांनीही हे नाटक पहिले असेल...
त्यांनीही त्या अनुभवावर जरूर लिहावे ...
धन्यवाद
(याची मॆजेस्टिकने छापलेली संहितासुद्धा उपलब्ध आहे.)
- धन्यवाद या माहिती बद्दल.. शोधेन संहिता नक्कीच!!
मनोबाने थोडक्यात याच
मनोबाने याच नाटकाबद्दल "अलिकडे काय पाह्यलंत" धाग्यावर अगदी त्रोटक प्रशंसात्मक लिहीलं होतं.
अशात गिरिश जोशी-मुक्ता बर्वे ह्यांचं "फायनल ड्राफ्ट" पाहून आलो. आवडलं. मांडाणी छान; कंटाळवानी न होणारी; तरीही हल्ली बोअर होउ नये म्हणून विनोदाच्या नावाखाली नाटकात जो थिल्लरपणा चालतो; ते टाळणारी मांडणी.
सर्वांनी अवश्य पहावं असं सुचवू इच्छितो.
हा दुवा
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
राइट्ट...
मला आवदलाच होता प्रयोग. वरती भडकमकर मास्तरांनी अगदि तपशीलवार सांगितलय नाटकाबद्दल. त्याहून अधिक काही सांगण्यासारखे नाही.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
पूर्वी
हे नाटक प्रायोगिक असताना पाहिले होते आणि भारुन गेलो होतो. आता इतक्या वर्षांनी परीक्षण वाचून डोले अम्मळ पाणावले आहेत.
आता, व्हाईट लिली, साठेचं काय करायचं , या आम्हाला आवडलेल्या नाटकांचेही परीक्षण लिहावे.म्हणजे 'आपण यांना(या नाटकांना) का पाहिलंत' हा प्रश्न आम्हाला पडू शकेल.
"लेटन्सी"
>> व्हाईट लिली, साठेचं काय करायचं , या आम्हाला आवडलेल्या नाटकांचेही परीक्षण लिहावे.म्हणजे 'आपण यांना(या नाटकांना) का पाहिलंत' हा प्रश्न आम्हाला पडू शकेल. <<<
साधारण सातेक वर्षांनी अशी परीक्षणं येतील असा एक प्राथमिक अंदाज आहे.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
नाटक
प्रस्तुत नाटक पाहिलेले नाही, परंतु त्याच्या संहितेचं वाचन केलेलं आहे. प्रत्यक्ष प्रयोग, आशयसूत्र इत्यादि गोष्टींबद्दल भडकमकरांनी जे लिहिलं आहे ते न्याय देणारं आहेच. सुबोध जावडेकरांचा एक अभिप्राय संहितेच्या पुस्तकरूपाच्या मागील ब्लर्बवर छापला आहे तो मला आवडला : "निर्मितीप्रक्रिया कशी घडते, त्याचं स्वरूप कसं असतं हाच जणू या नाटकाचा गाभा आहे" अशा अर्थाची ती कमेंट आहे. ती नक्कीच मला अर्थपूर्ण वाटली.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
बडबड नाटक
फायनल ड्राफ्ट हे नाटक मी दोनदा पहिले आणि मला ते अजिब्बात आवडले नाही.
नाटकाची संहिता मला अतिशय विस्कळीत वाटली. नाटकात दोनच पात्रे लेखक सर आणि विध्यार्थिनी. पण या दोन्ही पात्रांचे character graph पूर्णपणे प्रेक्षकांसमोर येत नाहीत. याच एक कारण म्हणजे संवादाचा अतिरेक आणि नाटकाचे structure.
१. संपूर्ण संवादावर आधारलेले नाटक असेल तर बर्याच वेळा नाटकातल्या पात्राची जडणघडण , त्याचे पूर्वायुष्य, किंवा त्यांच्या सद्य परिस्थितीवरच्या प्रतिक्रिया संवादातून प्रतीत होते. शिवाय नाटकाची भाषा, पात्राला अनुसरून असणारी भाषेची लय लहेजा आणि वाचिक अभिनय याने ते पात्र एका वेगळ्याच उंचीवर जाते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे लागूंचे सूर्य पाहिलेला माणूस किंवा नटसम्राट.
पण या नाटकमधील अतिरेकी व द्विरुक्तीपूर्ण संवाद नाटकाची लय हरवून टाकतात आणि या नाटकावचे “बडबड नाटक ” होते. गिरीश जोशी यांचा एकसुरी अभिनय. स्तोत्र म्हटल्यासारखे एकाच लयीतले संवाद , शिवाय तेच तेच संवाद त्याच त्याच pauses सकट म्हणून आपल्याला नाटक rewind झाल्याचा अनुभव देतात. आणि याच गोष्टीमुळे नाटक पुढे सरकत नाही. मग या पात्रांच पुढ काय झाल , ते आता असे का वागतात वगैरे प्रश्न अनुउत्तरीत राहून रंगमंचावरचा वैचारिक गोंधळ आपण फक्त पाहत राहतो.
खर म्हणजे आता मला उगाच एक वाक्य आठवलं.. “तेंडूलकरांच्या नाटकात स्वल्पविराम, अर्धविराम सुद्धा खूप काही बोलून जायचे” .. सखाराम, शांतता ...किंवा त्यांचे कुठलेही नाटक पाहताना हे वाक्य शब्दश: पटते... असो
२.दुसर म्हणजे नाटकाचा विषय पाहता या नाटकात फारस काही “घडत” नाही. अर्थात त्यावर माझा आक्षेप नाही. पण जे काही घडत (इतर पात्राचे प्रवेश, संवाद, संगीत) किंवा जे subtly घडत (एकमेकांबरोबरचे नात, ताण तणाव इत्यादी इत्यादी) ते पदर उलगडल्यासारखे बाहेर यायला हवेत. नाटकाच्या लॉजिक मध्ये पात्रांची समीकरणे सोडवली गेली पाहिजेत. आणि हे सगळ नाटकाचे structure ठरवत.
आणि याचा इथे पूर्णपणे अभाव आहे.
बाकी हे नाटक मी सुदर्शन रंगमचावर आणि यशवंतराव नाट्यगृहात पाहिले. आणि या दोन्ही नात्यानुभावामध्ये साहजिक असणारा फरक जाणवला. सुदर्शन रंगमंचावरचा प्रयोग हा near theater चा अनुभव देणारा होता. पण तरीही हे नाटक मला भावले नाही.
समीक्षा, परीक्षण हे प्रत्येक
समीक्षा, परीक्षण हे प्रत्येक व्यक्तीची स्वतःची अशी मत असतात. त्याच्याशी सहमत असायलाच हव अशी अट नसतेच मुळात.
प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो...आणि असायलाच हवा.....त्यामुळे ज्यांना आवडल, पटल त्यांना धन्यवाद...आणि ज्यांना नाही आवडलं त्यांनी सोडून द्या...
मी फक्त माझ त्या नाटका बद्दलचं 'माझं' मत मांडलं आहे.
:bigsmile: