आकाशगंगेच्या मध्यभागी असणारा मॅग्नेटार
मुख्य बातमीआधी काही संज्ञांचं स्पष्टीकरणः
न्यूट्रॉन तारा: तार्यांच्या केंद्रात हायड्रोजन वायूचं हेलियममधे रूपांतर होतं; यात ०.७% वस्तूमान उर्जेत रूपांतरीत होतं. म्हणजे १००० किलो हायड्रोजनचं हेलियममधे रूपांतर झालं तर हेलियमचं वजन ९९३ किलो भरेल. ७ किलो वस्तुमानाची ऊर्जा बनेल. (आठवा: E = mc2.) तार्याच्या केंद्रातला हायड्रोजन संपतो, इतर अण्विक इंधनही संपतं (८ शब्दांत गुंडाळलेल्या या प्रक्रियेमागचं भौतिकशास्त्र फार गुंतागुंतीचं आहे; ते इथे लिहीत नाही.) तेव्हा तारा मरतो. तार्याच्या मरणाचे तीन प्रकार समजले जातात. हलक्या तार्यांचं मरण श्वेतबटू रूपात होतं. अणूंमधल्या इलेक्ट्रॉन्समुळे गुरुत्वाकर्षण तोललं जातं. त्यापेक्षा जड तार्यांचं रूपांतर न्यूट्रॉन तार्यामधे होतं. अणूकेंद्रकामधल्या न्यूट्रॉन्समुळे गुरुत्वाकर्षण तोललं जातं. त्यापेक्षा जड तार्यांचं कृष्णविवर, अर्थात black hole बनतं.
पल्सारः काही न्यूट्रॉन तार्यांच्या चुंबकीय ध्रुवांमधून विद्युतचुंबकीय प्रारणं (क्ष-किरण, रेडीओ लहरी आणि इतर प्रकारचीही प्रारणं) बाहेर पडतात. या प्रक्रियेत पल्सारची चुंबकीय ऊर्जा नष्ट होते. हे तारेही स्वतःभोवती फिरतात. या दोन्हींचा एकत्र परिणाम म्हणून आपल्याला दर ठराविक काळानंतर, या तार्यांमधून प्रकाशझोत येताना दिसतो. पल्सार, त्याचं साधारण पट्टीचुंबकासारखं दिसणारं चुंबकीय क्षेत्र आणि स्वतःभोवती फिरणं, त्यामुळे दिसणारे नियमित प्रकाशझोत यांचं हे अॅनिमेशनः
(व्हीडीओला आवाज नाही, कार्यालयातूनही बघता येईल.)
हा झोत जेव्हा आपल्या दिशेला येतो, तेव्हा आपल्याला पल्सार दिसतो. ज्या तार्यातून पल्स बाहेर पडताना दिसतात, तो पल्सार.
मॅग्नेटार: प्रचंड जास्त चुंबकीय क्षेत्र असणारे न्यूट्रॉन तारे म्हणजे मॅग्नेटार. मॅग्नेटारचं चुंबकीय क्षेत्र साधारण १०८ टेस्ला (न्यूट्रॉन तार्याच्या १००० पट, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रापेक्षा १०१४ पट शक्तीशाली) असतं. हे मॅग्नेटार्स पल्सार्सही असतात.
आपल्या दीर्घिकेच्या, आकाशगंगेच्या केंद्राशी अतिप्रचंड वस्तुमानाचं कृष्णविवर आहे. कृष्णविवर थेट बघणं शक्य नाही (कारण कृष्णविवरातून कोणत्याही प्रकारचं प्रारण, कण बाहेर पडू शकत नाहीत). या कृष्णविवराचा अभ्यास करायचा असल्यास त्याच्या भोवती फिरणारे तारे, ढग, धूलिकण यांचा अभ्यास करावा लागतो. या अभ्यासातला एक मोठा मैलाचा दगड पार केला गेला आहे, तो म्हणजे या कृष्णविवराभोवती फिरणारा मॅग्नेटार शोधला आहे. खरंतर हा मॅग्नेटार नासाच्या NuSTAR या क्ष-किरण दुर्बिणीने आधीच शोधला होता. आता यात नवीन भर पडली आहे ती अचूक विदा, आकड्यांची. या मॅग्नेटारचा रेडीओ दुर्बिणीतून पाठपुरावा करून, केंद्राशी असणार्या कृष्णविवराचं (याला Sgr A* असं नाव आहे) चुंबकीय क्षेत्र आणि चुंबकीय क्षेत्रामुळे कृष्णविवराच्या वस्तुमानात पडणारी भर यांचा अभ्यास केला गेला आहे. कृष्णविवरात वस्तुमान शिरताना क्ष-किरण बाहेर पडतात, याचं स्पष्टीकरण या मॅग्नेटारच्या रेडीओ अभ्यासातून मिळालेलं आहे.
डाव्या बाजूच्या चित्रात, या संशोधकांमधला मुख्य, रेफ ईटॉफ. (अवांतर: १,२)
पल्सार्सचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे त्यांच्या स्वतःभोवती फिरण्याच्या वेळातली अचूकता. आणि आपल्याला ती मोजता येण्यातलीही अचूकता. पल्सार्स स्वतःभोवती फिरतात, आणि त्यांचा परिवलनकाळ (स्वतःभोवती एक गिरकी मारायला लागणारा वेग) मोजता येतो, तो चुंबकीय ध्रुवांमधून बाहेर पडणार्या प्रारणांमुळे. हा परिवलनकाळ, रेडीओ दुर्बिणी वापरून काही नॅनोसेकंद इतपत अचूक मोजता येतो. (एक नॅनोसेकंद = १०-९ से = ०.०००००००००१ से.)
दुसरा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे पल्सार्समधून बाहेर पडणारं प्रारण पोलराईज्ड असतं. विद्युतचुंबकीय लहरींचा विचार करताना सध्या त्यांचं कणरूप ऑप्शनला सोडून देऊ आणि विद्युतचुंबकीय लहरींचं स्वरूप कसं असतं हे पाहू या. प्रारणाची प्रवासाची एक दिशा असते. या संदर्भात असं म्हणू या की पल्सारपासून आपल्याकडे येणारी ही ती दिशा. या रेषेला दोन लंब प्रतलांमधे विद्युतक्षेत्र आणि चुंबकीय क्षेत्र हेलकावत असतात. (खालचं चित्र पहा.) यात पल्सार चित्राच्या डाव्या बाजूला वर आहे. आपण उजव्या बाजूला मध्याच्या थोडे खाली आहोत. म्हणजे मध्याच्या वरून खाली आणि डावीकडून उजवीकडे प्रारणाच्या प्रवासाची दिशा आहे. लाल रंगात विद्युतक्षेत्र हेलकावतं आहे आणि निळ्या रंगात चुंबकीय क्षेत्र. यातलं जे विद्युतक्षेत्राचं प्रतल आहे ते या लहरीचं पोलरायझेशनचं प्रतल.
ही झाली एक लहर. आणि एक शक्यता. लहान मुलांचं कागदी भिरभिरं किंवा हेलिकॉप्टरची पाती आठवा. ही पाती एकमेकांना लंब असतातच. (हेलिकॉप्टरची असतातच असं नाही; पण सोयीसाठी असतात असं मानू या.) आणि मधल्या अक्षाच्या भोवती ती फिरत असतात. समजा प्रकाशाच्या प्रवासाची रेषा या मधल्या अक्षातून गेली तर ही दोन पाती म्हणजे विद्युतक्षेत्र आणि चुंबकीयक्षेत्र. आणि पाती फिरताना कोणत्याही ठिकाणी असली तरीही एकमेकांना लंब असणं, काटकोन करणं तसंच रहातं. थोडक्यात प्रकाशाच्या प्रवासाची एकच दिशा असेल तरीही पोलरायझेशनचं प्रतल वेगवेगळं असू शकतं.
समजा ठराविक पल्सारकडून येणार्या सगळ्या प्रारणाचं पोलरायझेशनचं प्रतल एकसमानच असेल तर हा प्रकाश आणि पर्यायाने पल्सार १००% पोलराईज्ड आहे. जर ५०% प्रकाशाचं पोलरायझेशनचं प्रतल एक आहे आणि उरलेला अर्ध्याचं विद्युतप्रतल इतर कोणत्याही प्रतलात हेलकावतं आहे तर हा पल्सार ५०% पोलराईज्ड आहे. अशा प्रकारे एका दिशेला/प्रतलाला अनुकूल असणारं प्रारण असण्याचं कारण म्हणजे पल्सारचं तगडं चुंबकीय क्षेत्र. पल्सार्समधे निदान १०% पोलरायझेशन सापडतं. पण यापेक्षा अधिक पोलरायझेशन असणारे पल्सार्स आहेत. या लेखात ज्या मॅग्नेटारबद्दल चर्चा आहे, तो मॅग्नेटार जवळजवळ संपूर्ण पोलराईज्ड आहे.

या दोन गुणधर्मांचा वापर करून पल्सारच्या आणि आपल्या मधे असणार्या अनेक गोष्टींचा वेध घेता येतो. रेडीओ लहरी उत्सर्जित करणार्या पल्सार्सचा घड्याळासारखा उत्तम उपयोग करता येतो. या विशिष्ट मॅग्नेटारचा स्वतःभोवती एक गिरकी मारण्याचा काळ आहे, पावणेचार (३.७६) सेकंद. त्यातून आईनस्टाईनच्या सापेक्षतावादाला पुरावे गोळा करता येतात. आणि पोलरायझेशनचा आणखी एक गुणधर्म वापरून पल्सारच्या वातावरणात काय काय सुरू आहे याचा (काही प्रमाणात) थांगपत्ता लावता येतो. हा आणखी एक गुणधर्म कोणता?
एका ठराविक तरंगलांबी/वारंवारिता (wavelength/frequency) ला पाहिलं तर पोलरायझेशनचं एक ठराविक प्रतल दिसतं. दुसर्या वारंवारितेला पाहिलं तर हे प्रतल बदललेलं दिसतं. या चक्रगतीचं (rotation measure) कारण असतं ते म्हणजे पल्सार आणि आपल्या मधला वायू, धुलीकण आणि त्यांच्यावर कार्यरत असणारं चुंबकीय क्षेत्र. निरीक्षण करताना दोन जवळच्या वारंवारितांना निरीक्षण करून मधल्या भागातल्या चुंबकीय क्षेत्राची माहिती मिळते. आपल्या आकाशगंगेच्या चुंबकीय क्षेत्राची, बाहेरच्या दीर्घिकांच्या चुंबकीय क्षेत्राची माहिती अशा प्रकारे मिळवली जाते. या मॅग्नेटारची आकाशगंगेतली जागा पाहिली तर या गुणधर्माचं महत्त्व लक्षात येईल.
हा मॅग्नेटार आहे आकाशगंगेच्या केंद्राजवळ, अगदी शेजारी. त्यामुळे या मॅग्नेटारच्या पोलरायझेशनच्या चक्रागतीमुळे केंद्रापाशी असणार्या महाप्रचंड कृष्णविवराचं, Sgr A* याचं चुंबकीय क्षेत्र कसं आहे याचा अभ्यास करता आला. अपेक्षेनुसार, त्या भागातली चक्रगती आकाशगंगेच्या इतर कोणत्याही भागापेक्षा खूपच जास्त आहे. याचं कारण आहे ते म्हणजे चुंबकत्त्व असणारा तप्त वायूचा खांब सातत्याने Sgr A* या कृष्णविवरात ओतला, ओढला जातो आहे.
न्यूस्टार या क्ष-किरणाच्या दुर्बिणीने या मॅग्नेटारचा शोध लावल्यानंतर इटॉफ आणि इतरांनी जर्मनीतली एफेल्सबर्ग ही १०० मी व्यासाची रेडीओ दुर्बिण याच दिशेला रोखली. आत्तापर्यंत शास्त्रज्ञांना पडलेला प्रश्न, Sgr A* या कृष्णविवराचं 'खाणं', वायू ओढून घेण्याचं प्रमाण एवढं कमी का, हा प्रश्न सोडवला आहे. तिथलं तगडं चुंबकीय क्षेत्र या कृष्णविवराला उपाशी रहायला भाग पाडत आहे. या मॅग्नेटारच्या अधिक निरीक्षणांमधून आकाशगंगेच्या केंद्राचा तपशीलवार नकाशा बनवण्यात आणि Sgr A* कृष्णविवराबद्दल अधिक माहिती जाणून घेता येईल.
---
संदर्भः
- 'नेचर'मधला मूळ पेपर इथे
- ज्या एफेल्सबर्ग दुर्बिणीतून निरीक्षण झालं ती दुर्बिण बॉनची मॅक्स प्लँक संस्था चालवते. त्यांच्याकडून आलेला प्रेस रिलीज.
- बाकी गूगलल्यास बर्याच बातम्या दिसतील. (त्यातल्या एकीचं शीर्षक विनोदी वाटलं म्हणून मुद्दाम ही लिंक)
अवांतरः
१. Ralph Eatough त्याच्या नावाच्या उच्चाराबद्दल आग्रही असतो. त्याशिवाय अशा उच्चारासंबंधात अलिकडे नंदनशी खरडचर्चाही झाली होती. म्हणून मुद्दामच त्याच्या नावाचा उच्चार रेफ ईटॉफ असल्याचं लिहीलं आहे.
२. फोनसंवादात राजेशने, कलाकारांना मिळतं तसं महत्त्व संशोधकांना मिळत नाही, अशी तक्रार केली होती. म्हणून मुद्दामच रेफचा फोटोही डकवला आहे.
धाग्याचा प्रकार निवडा:
>>आकाशगंगेतले पदार्थ
>>आकाशगंगेतले पदार्थ बाहेरच्या दिशेने विस्तारत का चालले आहेत?
माझ्या माहितीप्रमाणे* आकाशगंगेतले पदार्थ विस्तारत नाहीत. आकाशगंगा एकमेकापासून दूर जातात.
आपली सूर्यमाला आकाशगंगेच्या केंद्रापासून १०००० प्रकाशवर्षे दूर आहे. त्यामुळे त्या कृष्णविवराचा परिणाम आपल्यावर फारसा होत नसावा.
*डिसक्लेमर: माझी माहिती तुटपुंजी आणि आउटडेटेड असण्याची शक्यता आहे.
अ. कितपत वस्तुमान आत
अ. कितपत वस्तुमान आत खेचल्यावर ते शांत होण्याची शक्यता आहे?
उलट, वस्तुमान आत खेचलं गेलं की कृष्णविवराची पावर वाढते. गुरुत्वाकर्षण ही कृष्णविवराची शक्ती; आणि गुरुत्वाकर्षण वस्तुमानावर अवलंबून असतं. कृष्णविवर आणि खेचली जाणारी वस्तू या दोन्हींचं वस्तुमान खरंतर महत्त्वाचं असतं, पण कृष्णविवरासमोर खेचल्या जाणार्या वस्तूंचं वस्तुमान नगण्य असतं. त्यामुळे ते सोडून देऊ या.
ब. जर आत खेचणारा भयंकर फोर्स केंद्रस्थानी आहे तर मग आकाशगंगेतले पदार्थ बाहेरच्या दिशेने विस्तारत का चालले आहेत?
इथे दोन शक्यता आहेत. एक नितिनने स्पष्टीकरण दिलेली आहे ती! विश्व प्रसरण पावत आहे, त्यात दीर्घिका एकमेकींपासून लांब जात आहेत. समजा एक फुगा आहे, ज्यावर खरोखरचे ठिपके आहेत, एक बिंदू एवढाच त्याचा विस्तार. किंवा एक अणू एवढाच मोठा ठिपका. जर हा फुगा फुगवला तर हा ठिपका किंवा अणू प्रसरण पावणार नाही; त्याचा आकार होता तेवढा राहिल. विश्वाच्या प्रसरणाचा विचार केला, तर सगळ्या दीर्घिका म्हणजे एक ठिपका आहेत. त्या आहेत तशाच रहाणार.
(यातही एक खोच आहे. ती अशी की देवयानी, ही आपली शेजारीण, आपल्या दिशेने येत आहे. देवयानी आणि आपली आकाशगंगा या एकाच बिल्डींगचा भाग आहेत, ज्याला दीर्घिकांचा स्थानिक समूह (local cluster) म्हणतात. या समूहावर विश्वाच्या प्रसरणापेक्षा, आपासांतल्या गुरुत्वाकर्षणाची जादू जास्त चालते. त्यामुळे गुरुत्वाकर्षणाचा परिणाम म्हणून या देवयानी आणि आकाशगंगा एकमेकींच्या दिशेने प्रवास करत आहेत. पण बाकीच्या सगळ्या दीर्घिका एकमेकींपासून लांब जात आहेत.)
प्रश्नातली दुसरी शक्यता अशी की आपल्या आकाशगंगेच्या दिशेला, कडेने पाहिलं तर डावीकडचं चित्र आहे तसं काहीसं दिसेल. यातून मध्यातून बाहेर पडणारा वायू प्रथमदर्शनी विचित्र वाटेल. आकाशगंगेच्या मध्यभागी जर कृष्णविवर आहे आणि ते सगळ्या गोष्टी आत ओढून घेतं तर मग हा वायू कसा बाहेर पडतो आहे?
याचं उत्तर असं की, वायू, वस्तुमान आत शोषलं, ओढलं जातं ते दीर्घिकेच्या प्रतलातून. जिथे तारे, वायू यांची घनता खूप जास्त आहे तिथून. हे गुरूत्वाकर्षणामुळे होतं. पण त्याच्याबरोबर तिथे केंद्रापाशी आहे प्रचंड ताकदवान चुंबकीय क्षेत्र. या चुंबकीय क्षेत्रामुळे वस्तुमान आत ओढलं जात असताना, प्रचंड वेगाने प्लाझ्मा (भारित कण), वस्तुमान ओढलं जाण्याच्या लंब दिशेत फेकले जातात. त्यातून अशी जेट्स तयार होतात. आणि प्रत्येक दीर्घिकेत, प्रत्येक कृष्णविवराच्या भोवती ओढल्या जाणार्या वस्तुमानाची चकती तयार होते. या चकतीला लंब दिशेत अशा प्रकारची जेट्स, प्लाझ्माचे फवारे, कारंजी तयार होतात.
क. त्या शिंच्या कृष्णविवराचे आपल्याला कितपत ड्यामेज आहे?
नो वरीज गवि. खुश्शाल पुढच्या ५ अब्ज वर्षांची पैज लावा. सूर्य खपला की पृथ्वी खपणार, पण आपण 'सुरक्षित अंतर ठेवू'न आहोत.
समजा आकाशगंगेची त्रिज्जा १०० एकक आहे, तर सूर्य त्या शिंच्या कृष्णविवरापासून ६० एकक अंतरावर आहे. तर मधला गोळा फारतर १० एकक व्यासाचा अहे. आणि त्या कृष्णविवराचे हाथ फार लंबे नाहीयेत, मधला पूर्ण गोळा हडप करण्याआधी सूर्यसुद्धा खपलेला असेल. तेव्हा खुशाल शुक्रवार संध्याकाळची पार्टी सुरू करा.
तो मॅग्नेस्टार कृष्णविवराच्या इतका जवळ आहे तरी आंत का खेचला जात नाही ?
तुमच्या प्रश्नाचं सोप्या शब्दांत उत्तर असं की हे कृष्णविवर वाटतं तेवढं शक्तीशाली नाही.
कृष्णविवराचं गुरूत्वाकर्षण फार ताकदवान असलं तरीही एका विशिष्ट त्रिज्येच्या बाहेर त्याचं काही चालत नाही. प्रत्येक कृष्णविवरासाठी एक श्वार्झशाईल्ड त्रिज्या असते. याच्या आत कृष्णविवराचा इलाका असतो, बाहेर नॉर्मल भौतिकशास्त्राचे नियम चालतात. सूर्याचं कृष्णविवर बनलं तर ही त्रिज्या तीन किलोमीटरच्या आसपास असेल. आकाशगंगेच्या केंद्राशी जे कृष्णविवर आहे, त्याची श्वार्झशाईल्ड त्रिज्या काही हजार किलोमीटरपेक्षा जास्त नसावी. मॅग्नेटार या त्रिज्येच्या बाहेर असेल तर सुटला. पण नसेल तर तो गुंडाळीसारखी फेरी मारत या त्रिज्येच्या आत जाईल. आत गेला तर कृष्णविवराची ताकद आणखी वाढेल आणि ही त्रिज्या आणखी थोडी वाढेल.
विश्वरुपदर्शन
न बधणारास नतमस्तक करायचे असेल तर प्रत्येक शाखेकडे एक मास्टरस्ट्रोक असतो. गीतेमधे तत्त्वज्ञान सांगून कृष्ण थकला पण अर्जून काही वाद घालायचे थांबवेना. विश्वरुपदर्शनाने मात्र त्याची ततपप झाली आणि त्याने कृष्णाला लाइटली घ्यायचे थांबवले. धर्मसंस्थेकडे अशी बरीच शस्त्रे आहेत ज्याने सामान्य माणूस घाबरून शेवटी त्याला मानायला चालू करतो.
धर्मसंस्थेची ही 'डायरेक्ट अंतिम सत्याला हात' घालायची हातोटी पाहून शास्त्रसंस्थेची बरीच जळजळ झाली. अशी शस्त्रे आपल्याकडे असल्याशिवाय लोक आपल्याला अनुसरणार नाहीत हे त्याने ओळखले. मग आपल्याकडे 'संपूर्ण ब्रह्मांडाचे सुसूत्र स्पष्टीकरण' असा दावा केला आणि तसे प्रमेय मांडले. पण (साला) कितीही गृहितके केली तरी सुसूत्रता काही येईना! मग जे लटकं अंग आहे त्याबद्दल आणा नवीन शोध. पाहतो सामान्य माणूस कसा मति कुंठीत होऊन शरण येत नाही ते!
या विषयावर कुतुहलाने बरेच काही वाचले आहे, आणि दुर्दैवाने असे मत विकसित झाले आहे. तरीही शरणांगतांत मीही आहे हे नम्रपणे नोंदवू इच्छितो.
(टीप - दुधगंगा आणि देवयानी या दोन आकाशगंगा आहेत.)
विश्वरूप दर्शन, कृष्ण, अर्जून इत्यादी..
माझी एक पेट्ट आठवण आहे.
आक्खी गीता सांगून झाली.
हिक्डं कौरव, तिक्डं पांडव १८ औक्षोहिणी प्लस जे काय ते सग्ळे सैनिक, रथ, सारथी, हत्ती, घोडे, उंट, जे काय अस्तील ते जांभया देत आइकत होते.
संजय बोलूबोलू थकला होता. धृतराष्ट्र ४ वेळा बीआरबी करून आला होता.
त्यांच्या बरोबर मधोमध,
सगळे योग नियोग सांगून झाले, धर्माधर्मांची चर्चा चर्वणे झाली, तरी ते अर्जूनराव काय उठून गांडीव हातात धरीना.
शेवटी भगवंतानी त्यान्ला विश्वरूप दर्शन दिले.
अर्थात,
सणसणीत एक कानाखाली काढली.
या भाऊंच्या डोळ्यासमोर चंद्र तारे आकशगंगा चमकू लागल्या!
मग भगवंत म्हणाले,
भो अर्जुना,
हे माझे विश्व रूप.
याच्यावर विश्वास ठेव, अन युद्ध कर.
नै तर आणखी एक दुसर्या कानाखाली देईन :)
तेव्हा कुठे धर्माचा अर्थ लागून हे अर्जुनराव मनुस्मरयुध्यंच का काय ते करीत गांडीवाचा टणत्कार करते झाले!
(टीपः मी शेजारच्याच ढिगार्यावर बसून ही सग्ळी गम्मत पहात होतो. म्हणून हे सगळे सुसूत्र आहे याची १००% ग्वाही देतो.)
या विद्या सा विमुक्तये।
न बधणारास नतमस्तक करायचे असेल तर प्रत्येक शाखेकडे एक मास्टरस्ट्रोक असतो.
विज्ञानाकडे असं काही असं मलातरी वाटत नाही. प्रसिद्ध संशोधक मेरी क्यूरी म्हणत असे, "Nothing in life is to be feared, it is only to be understood. Now is the time to understand more, so that we may fear less."
बाकी दोन-चार-सहा हजार वर्षांपूर्वी अणूची रचना माहित नसताना, प्रचंड मोठ्या दुर्बिणी, शक्तीशाली पार्टीकल अॅक्सिलरेटर्स, उपग्रह, स्कॅनिंग मायक्रोस्कोप्स वगैरे उपलब्ध नसताना तेव्हाच्या लोकांनी विज्ञान समजून घेण्याचे प्रयत्न केले त्याचं कौतुक वाटतं. पण ते तेवढंच काय ते खरं, ही स्वतःची फसवणूक आहे. सध्या होणारं पॉप्युलर विज्ञानलिखाण पाहिलं तरीही त्यात बरंच जास्त तपशीलवार लिखाण असतं.
(टीप - दुधगंगा आणि देवयानी या दोन आकाशगंगा आहेत.)
आकाशगंगा हे आपल्या दीर्घिकेचं नाव आहे. दूधगंगा हे नाव मी आत्ताच पहिल्यांदा ऐकलं, Milky way या नावाचं भाषांतर वाटलं. आकाशगंगा, देवयानी या प्रकारच्या खगोलीय वस्तूंना दीर्घिका असं नाव आहे.
आडकित्ता, लौकिकाला साजेलसा प्रतिसाद आहे तुमचा. :-)
एक उदाहरण
पण ते तेवढंच काय ते खरं, ही स्वतःची फसवणूक आहे.
सर्वप्रथम मी काय खरं ते कशाबद्दलच बोललो नाही. काहीच खरं नाही असा माझा सुर होता. असो.
आता मला काय म्हणायचं होतं याचं एक उदाहरण. यातल्या उपहासात्मक स्वराबद्दल क्षमस्व. -
विश्वाचं सुसूत्र स्पष्टीकरण देताना विज्ञानाने वेगवेगळी मॉडेल्स मांडली. यातले कोणते मॉडेल फार प्रमेये मोडकळीत न काढता विकता येईल असा विचार झाला. शेवटी एक मॉडेल चांगले निघाले. बिग बँग, आइन्सस्टाइनच्या थेरीज, इ इ अबाधित राखून विश्वाचे एक मॉडेल मांडला आले नि सर्वांनी हुश्श असा निस्वास टाकला. त्याचे छान पैकी मार्केटींग केले गेले. मग अचानक लक्षात आले कि या मॉडेलप्रमाणे आकाशगंगा एकमेकांपासून दूर नाही जायला पाहिजेत. आता काय करा? मग एक भारी आयडिया लावली गेली. आकाशगंगा एकमेकांपासून अशा दूर जातात याचे कारण डार्क मॅटर! हे डार्क मॅटर असल्याचा पुरावा? अहो, त्या मॅटरचे नावच डार्क मॅटर आहे. त्याच्या असण्याचा पुरावा देता नाही! आकाशगंगा दूर जात आहेत हाच पूरावा! मग, इतक्या (साध्या मॅटरच्या कितीतरी पट)डार्क मॅटरचे मॉडेलवर इतरही बरेच परिणाम होतात त्याचे काय? Your model again loses its sanctity त्याचे काय? पुन्हा तेच - डार्क मॅटरच्या प्रॉपर्टीज तशा हो. कसंही करून शेवटी मॉडेल बॅलँस करायचं! मग त्याच्यासाठी काही का गृहित धरावे (ठोकावे) लागेना.
हे जग ब्रह्म नावाच्या तत्त्वाने बनलेले आहे हे सांगणाराला ब्रह्म दाखवायला सांगीतले तर तो खूप बोलून बोलून शेवटी काही दिशाभूल करेल.
हे दोन्ही प्रकार चीड आणणारे आहेत.
क्युरी इफेक्टने ८०० डीग्रीनंतर लोखंडाचे चुंबकत्व जाते. पृथ्वीचेच (जिच्या पोटात तप्त लाव्हा आहे) चुंबकीय क्षेत्र (का आहे, इतके का आहे, इ) हे सांगताना आजही विज्ञान खूप कोलांट्या उड्या खाते. मग इतकी प्रकाशवर्षे दूर असणार्या तार्यांचे चुंबकीय क्षेत्र इ वाचताना मनात संशयच जास्त उत्पन्न होतो. रॉकेट अवकाशात जाते म्हणून लोक इतके इंप्रेस होतात कि अवकाशा बद्दल विज्ञानाचे प्रत्येकच मत खरे मानायला चालू करतात. लोक ऐकतात म्हणून विज्ञानही jumping the gun प्रकार करून वास्तविक प्रगतीच्या बरीच पुढची विधाने अधिकाधिक उत्साहाने करते.
म्हणून एक निरीक्षणामागची गृहितके, ते निरीक्षण, त्याचा काढलेला अर्थ आणि त्या अर्थावरून केलेली गृहितके या सगळ्यात फरक आहे. डार्क मॅटर, बिग बँग हे असेच बिना कोणत्या पुराव्याची अश्शीच विधाने आहेत पण जनमानसात फार पॉप्युलर आहेत.
आकाशगंगा एकमेकांपासून अशा दूर
आकाशगंगा एकमेकांपासून अशा दूर जातात याचे कारण डार्क मॅटर! हे डार्क मॅटर असल्याचा पुरावा? अहो, त्या मॅटरचे नावच डार्क मॅटर आहे. त्याच्या असण्याचा पुरावा देता नाही! आकाशगंगा दूर जात आहेत हाच पूरावा!
नाही, नाही. कार्यकारणभाव सगळाच हुकलाय इथे. दीर्घिका एकमेकांपासून लांब जात आहेत याचा अर्थ गुरुत्वाकर्षण, पर्यायाने डार्क मॅटर कमी पडतंय.
सध्या इथे तपशीलात लिहीत नाही. मागे थोडं लिहीलेलं आहे त्याचा हा दुवा. कृष्णपदार्थ आणि कृष्णविवर या दोन्ही पूर्णतया वेगळ्या गोष्टी आहेत.
क्युरी इफेक्टने ८०० डीग्रीनंतर लोखंडाचे चुंबकत्व जाते. पृथ्वीचेच (जिच्या पोटात तप्त लाव्हा आहे) चुंबकीय क्षेत्र (का आहे, इतके का आहे, इ) हे सांगताना आजही विज्ञान खूप कोलांट्या उड्या खाते. मग इतकी प्रकाशवर्षे दूर असणार्या तार्यांचे चुंबकीय क्षेत्र इ वाचताना मनात संशयच जास्त उत्पन्न होतो.
तारे, मृत तारे, दीर्घिका यांचं चुंबकत्त्व फक्त लोखंडामुळेच असेल असं नाही. शिवाय तिथे, मृत तार्यांच्या गाभ्यात किती तापमान असेल, तिथे पदार्थांची अवस्था काय असेल याबद्दल पूर्ण माहिती नाही. संशय उत्पन्न होणं आणि त्यामुळे प्रश्न विचारणं ही चांगली गोष्ट आहे. संशोधक तेच करतात. प्रश्न विचारतात आणि उत्तरं शोधायचा प्रयत्न करतात. कधी उत्तरं मिळतात, कधी नाहीत. कधी जुनी उत्तरं चुकीची आहेत असं लक्षात येतं, तिथे दृष्टीकोन, सिद्धांत बदलले जातात. या कोलांट्याउड्या नाहीत. कोलांट्याउड्या म्हणजे एपिसायकल्स. एकच काय ते सत्य मानायचं आणि त्याला छेद देणारे पुरावे मिळाले तरी वाटेल त्या कसरती करून तेच खरं ठरवण्याचा आटापिटा करायचा.
काहीच खरं नाही, म्हणजे नक्की काय खरं नाही?
अवांतरः या क्यूरी परिणामातले क्यूरी म्हणजे पियार आणि त्याचा भाऊ; पियार म्हणजे मेरीचा नवरा. मेरीने या विषयावर संशोधन केलं नाही. पियारने मेरीच्या संशोधनाचं महत्त्व, त्यांच्याकडे असणारी पैशाची कमतरता, मेरीला असणारी सहाय्यकाची आवश्यकता यामुळे स्वतःचं हे चुंबकांवरचं संशोधन सोडून किरणोत्साराच्या संशोधनात मेरीला मदत करायला सुरूवात केली.
रच्याकने
असिमोव्ह यांचे 'हिची' जमातिबद्दलचे लिखाण आठवले.
हे हिची लोक आकाशगंगेच्या मध्यावरील कृष्णविवरात दडून बसले आहेत कारण त्यांच्यापेक्षा अधिक प्रगत व अती दुष्ट जीव आकाशगंगेवर चाल करून येत असतो. दरम्यानच्या काळात मानवजात विकसित होते, अन त्यांना हिचींच्या प्रगत संस्कृतीचे अवशेष आजूबाचूच्या सूर्यमालांत सापडतात अशी ती सायफाय आहे.
कोणाला या कथेचे नाव माहिती असल्यास सांगावे...
आईन्स्टाईनने थिअरी ऑफ रिलेटिव्हीमध्ये कृष्णविवराचा विचार पहिल्यांदा दिला. कृष्णविवरातून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही. तेथे काळ थांबलेला असतो, असे हा सिद्धांत सांगतो. या विषयावर जयंत नारळीकरांची एक कथा आहे. या कथेचे नाव आता आठवत नाही. कथानक मात्र थोडे थोडे आठवते. ते थोडक्यात असे :
एक तरुण अंतराळवीर अवकाश यात्रेवर जातो. त्याचे लग्न ठरलेले असते. अवकाश यात्रेवरून परत आल्यानंतर तो लग्न करणार असतो. अवकाशात गेल्यावर त्याचे यान कृष्णविवरात सापडते. २० वर्षे तो कृष्णविवरातच अडकतो. २० वर्षांनी मोठ्या शिताफीने तो आपले यान कृष्णविवरातून बाहेर काढतो. तो पृथ्वीवर परत येतो. या २० वर्षांच्या काळात कृष्णविवरात काळ थांबलेला असल्यामुळे तो अंतराळवीर आजही तरुणच असतो. इकडे पृथ्वीवर त्याच्या प्रेयसीने त्याच्या मित्राशी लग्न केलेले असते. तिने आता चाळीशी ओलांडलेली असते.तिला आता एक मुलगी असते. ही मुलगी त्या अंतराळवीराच्या वयाची असते. मग तो आपल्या प्रेयसी ऐवजी तिच्या मुलीशी लग्न करतो.
कोणाला या कथेचे नाव माहिती असल्यास सांगावे.
सुंदर व सोप्या शब्दांत माहिती
सुंदर व सोप्या शब्दांत माहिती दिलीस आदिती.
या दुव्यावर थोडी रोचक माहिती मिळाली.
थोडी ताजी माहिती असल्यामुळे तुझ्या लेखाचे वजन जास्त जाणवले.
या माहितीकडे बघण्याचा तुझा दृष्टीकोन कसा आहे हे माहिती करुन घ्यायला आवडेल.
येथील माहितीप्रमाणे एका विचित्र पल्सार तार्यामुळे आपल्या आकाशगंगेच्या हृदयस्थानी असलेल्या राक्षसी कृष्णविवराचे एक शक्तीशाली चुंबकीय क्षेत्र उघड झालेले आहे. या चुंबकीय क्षेत्राची शक्ती खूप आहे.
का मी अर्थ समजण्यात गल्लत केली आहे हे कळत नाहीये. पण तुझा लेख व प्रतिसादांमधून दिलेल्या कृष्णविवराच्या चुंबकीय क्षेत्राला एक मर्यादा आहे हे मुद्देसूद असल्याने ठामपणे पटते आहे. माझेही तेच मत आहे. पण या नव्या माहितीच्या तळाशी संशोधनाचा बेस असल्यामुळे त्यांचा डाटा बघायला हवा. आणि कृष्णविवर शक्तीशाली असेलच तर जसजसा तो वस्तू गिळत जाईल तसतशी त्याची शक्ती व आवाकाही वाढत जाईल का? अशा वाढत्या वेगाने आपल्या सूर्यमालेला त्याची झळ पोहोचायला किती हजार वर्षे लागू शकतील?
बरेच दिवस अभ्यासापासून थोडा दूर असल्यामुळे काही आठवत असलेली मते वा (अर्धवट)ज्ञान स्वतःकडेच ठेवतोय. तुझ्या प्रतिसादाने हा गुंता सुटेल याची खात्री आहे. :)
सागरजी, अदितीजींनी वर मला
सागरजी,
अदितीजींनी वर मला दिलेल्या प्रतिसादात एक दुवा दिला आहे. त्यात विश्वरुपदर्शन अशी तीन लेखांची मलिका आहे. विज्ञानाचं अगदी तोकडं ज्ञान असलेल्या माणसाला देखिल विश्वाचे शास्त्रज्ञांच्या मते काय रुप आहे ते फार सोप्या शब्दांत सांगितले आहे. आपल्या प्रश्नांची उत्तरे देखिल तिथे आहेत. एकदा वाचावीच अशी ती लेखमाला आहे.
मॅक्स प्लँक संस्थेच्या प्रेस
मॅक्स प्लँक संस्थेच्या प्रेस रिलीजपेक्षा वेगळं काही या बातमीत दिसलं नाही. (शब्दसुद्धा स्वतःचे वापरल्यासारखं वाटलं नाही.)
आकाशगंगेच्या केंद्राशी असणार्या कृष्णविवराचं, Sgr A*, याचं चुंबकीय क्षेत्र किती शक्तीशाली आहे, ते कसं पसरलेलं आहे हे या मॅग्नेटारमुळे समजतं आहे. या चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव, आधीच्या अपेक्षेपेक्षा अधिक आहे. आधीची अपेक्षा होती, त्यापेक्षा हे कृष्णविवर कमी वस्तुमान खातंय आणि याचं कारण हे चुंबकीय क्षेत्र. कोणात्याही दीर्घिकेच्या केंद्राशी असणार्या कृष्णविवराने एवढ्या लांबवर असणारा तारा गिळल्याचे पुरावे आत्तापर्यंत सापडलेले नाहीत. सैद्धांतिकदृष्ट्याही हे अशक्यच दिसतं आहे. (असं होण्याच्या अनेक अब्ज वर्ष आधीच सूर्य मेलेला असेल.)
सध्याची रेडीओ निरीक्षणांवरून काढलेली अनुमानं नेचरच्या पेपरमधे आहेत; त्याचा विदा त्यांनी ग्राफरूपात मांडला आहे. प्रत्यक्ष विदा बहुदा मॅक्स प्लँक, जॉड्रल बॅंक किंवा ए.टी.एन.एफ.च्या संस्थळांवर मिळू शकेल.
वाटलेच होते की काहीतरी
वाटलेच होते की काहीतरी गौडबंगाल असेल यात याची. तुझ्या खुलाशाने त्यावर शिक्कामोर्तब झाले. वेळेअभावी अशा संस्थळांवरचे वाचन माझ्याकडून होत नाही. पण तुझे वाचन चतुरस्त्र आहे आणि हा तुझा प्रांतही आहे. त्यामुळे तुझी माहिती जास्त अधिकृत असणार याची खात्री असल्यामुळेच तुला विचारले होते. स्पेस.कॉम ची माहिती कॉपी पेस्ट अशा पद्धतीची दिसते आहे. यापुढे तू वर सुचवलेल्या संस्थळांवरुनच अधिकृत माहिती तपासेन. संस्थळे सुचवल्याबद्दल धन्यवाद
बाकी मी त्या कृष्णविवराच्या आवाक्यात आपल्या सूर्य येण्याच्या शक्यतेबद्दल थिअरीच्या दृष्टीकोनातून बोलत होतो. कृष्णविवराची कक्षा एका मर्यादेपलिकडे वाढू शकत नाही असे एकंदरीत दिसतेय. पण थिरॉटिकली असे होऊ शकेल का? शक्य असेल तर त्याचे गणित काय असू शकेल.. याचा शोध घ्यायचा होता. हा थोडा जास्त खोलाचा विषय असेन, कदाचित येथे अप्रस्तुतही.
बरोबर आहे नितिन, अंतर हा खूप
बरोबर आहे नितिन,
अंतर हा खूप मोठा फॅक्टर आहे. पण समजा कृष्णविवराला गिळायसाठी नित्यनेमाने तार्यांचा खुराक मिळत गेला तर कृष्णविवराचा आकार आणि त्याचे प्रभाव क्षेत्र वाढत जाते का? याचा मला शोध घ्यायचा होता.
अर्थात आदितीने सांगितल्याप्रमाणे आपल्या सूर्याचा क्रमांक बराच शेवटी शेवटी आहे. त्याअगोदर आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असलेल्या कृष्णविवराला तो आणि सूर्य यांच्यामधे असलेले अब्जावधी तारे गिळावे लागतील. आपला सूर्य आकाशगंगेच्या कडेला असल्यामुळे ती झळ पोहोचायला कैक हजार वा लाखो वर्षे जावी लागतील.
आटापिटा
बिग बँग थेरीच्या तशा बर्याच उणिवा आहेत. पण त्यातल्या काही महत्त्वाच्या त्या अशा -
१. ते पार्टीकल फुटले कशाने?
२. विश्व का प्रसारण पावत आहे?
३. विश्वाचे तापमान संतुलित कसे?
एक स्पष्ट करायला जावे तर दुसरे गृहितक खोटे ठरणार , मग शेवटी करायचे काय. अलिकडे या पूर्ण थेरीलाच काडीमोड द्यायचा प्रयत्न बळावला आहे.
http://www.indianexpress.com/news/is-big-bang-a-myth-/1170824/
शास्त्रज्ञ म्हणत आहेत कि विश्व निर्माण झाले इ इ जे आपण म्हणत आहोत ते केवळ एका ब्लॅकहोलचा स्फोट होते. चला, मजेशीर आहे.
.
मला फारसे कळत नाही पण विश्व प्रसरण पावत आहे या फॅक्टमुळेच बिग बँग थिअरीला पुष्टी मिळते. विश्व प्रसरण पावत आहे ही बिग बँग थिअरीतली उणीव नाही.
विश्वाचे तापमान संतुलित नाही. लोकल व्हेरिएशन्स आहेत.
ते पार्टिकल फुटले कशाने हा प्रश्नच गैरलागू आहे. "बिगबँगच्या पूर्वी" अशी संकल्पनाच नाही. त्यामुळे बिगबँगच्या "आधी" पार्टिकल होते की नव्हते हे कळू शकत नाही.
पूर्ण थिअरीला काडीमोड देण्याचा प्रयत्न कायमच चालू असणार. बिगबँग तिअरी हे एक हायपोथिसिस आहे. त्यातून येणारी प्रेडिक्शन्स चुकीची ठरली तर थिअरी बाद होईलच.
सोस
१. विश्व प्रसरण पावते हे ठीक आहे, थेरीप्रमाणे आहे. परंतु ते घटत्या त्वरणाने/संवेगाने प्रसरण पावायला हवे. पण होते आहे ते उलटे.
२. विश्वातील तापमानाचा एकजात होऊन जे शेवटी तापमान यावयास आहे त्याच्या एका टप्प्यावर आपण आहोत. या टप्प्यावर जे तापमान आहे ते पोहोचायला जितका वेळ लागतो तितके विश्वाचे आयुष्यच/वयच अजून झालेले नाही.
३. पार्टीकलाचा स्रोत, आरंभ, कारण, स्थान, सगळं महत्त्वाचं आहे. किमान ते का विस्तारले हे नक्कीच महत्त्वाचं आहे.
...तर थिअरी बाद होईलच असे आपण म्हणताय, किती थेर्या सोसायच्या असं मला म्हणायचं आहे.
हिणकस प्रवृत्ती
मला एक कळत नाही, विज्ञानावर नेहमी काही टीका करायला जावी तेव्हा लोक अध्यात्म आणि धर्माची पांगळी उदाहरणे का देतात? देव कितीही आणि कसाही बदलला तरी 'लोका सांगे विज्ञान' हा प्रकार केवळ लावलेल्या शोधाच्या संपूर्ण, सुसूत्र स्पष्टीकरणानंतरच झाला पाहिजे. उगाच कच्ची खिचडी उभ्या जगाला खाऊ घालण्याचा प्रयत्न नको. धर्मसंस्थेने शेण* खाल्ले म्हणजे वैज्ञानिकांनी खावे असे होत नाही. विज्ञानावर standalone टिका करताच येत नाही यामुळे! विज्ञानाचे सर्मथक लगेच -पहा तुमच्या (बळेच) देवाने तर काय सांगून ठेवले आहे, आम्ही तरी कितीतरी बरेच.
विज्ञानाला मोजण्याचा, मापण्याचा, मानण्याचा मानक फार भिन्न आहे. तेव्हा नेहमी नेहमी धर्माशी तुलना करून पांगळे समर्थन नको.
सबब सेंटहेअरजींचा त्रिवार णिशेढ!!!
* काळ्या मठ्ठ बैलांचे, त्यांच्याशी भावनिक संबंधितांचे सोडून
पण विज्ञान अचूक आहे असा
पण विज्ञान अचूक आहे असा विज्ञानाचाच दावा नाही आणि ते अचुक मानावे असा हट्टही नाही!
त्यामुळे एखादा शोध "संपूर्ण" आहे किंवा अर्धेमुर्धे सांगु नका, पूर्ण शोध लागल्यावर काय ते बोला वगैरे मागणी करणेच किंवा ही मानसिकता बाळगणे अवैज्ञानिक आहे (मात्र असे संपूर्णत्त्वाचे दावे धार्मिक बाजु करत असल्याने त्यांचा उल्लेख आपोआप होतो)
माझ्यापुरते बोलायचे, विज्ञान म्हणजे सध्या ठाऊक असलेले ज्ञान व देव म्हणजे सध्या ठाऊक न झालेल्या गोष्टी अर्थात अज्ञान असे मी मानतो. दोन्ही बदलते आहे फक्त एकाची वाढ ही दुसर्याचा क्षय आहे. त्यामुळे जेव्हा विज्ञानाला सगळे ठाऊक होईल तेव्हा देवाची गरजच संपली असेल किंवा विज्ञान हेच देवाची जागा घेईल
महागडे विज्ञान
थोडे गांभीर्याने सांगतो.
विज्ञान आणि अध्यात्म/धर्म/देव परस्परसंपूरक नाहीत, ते पूर्णतः असंबंधित आहेत. लोक त्यांचा का संबंध लावतात ते कळत नाही. भौतिक जगाचे ज्ञान आणि जीवनविषयक ऐच्छिक तत्त्वज्ञान यांचा अर्थाअर्थी संबंध नाही. दोहोंमधे झालेला ओव्हरलॅप नगण्य आहे. आणि असा नगण्य ओव्हरलॅप त्यांना नेहमी एकमेकांशी भिडवायला कारण म्हणून पर्याप्त नाही.
विज्ञान म्हणजे जगातल्या सर्व वैज्ञानिक संस्थांचे जाळे, त्यांचे कार्य, त्यांचे म्हणणे. त्याची प्रचंड अशी आर्थिक किंमत आहे, आता आपण म्हणाल कि अशा गुंतवणूकीचे रीटर्न्स पण भारी आहेत, म्हणूनच ती होते आहे. मान्य. पण तरीही त्यात optimization हवे.
असहमत
विज्ञान आणि अध्यात्म/धर्म/देव परस्परसंपूरक नाहीत, ते पूर्णतः असंबंधित आहेत.
मी वैयक्तीकरित्या असहमत आहे. माणसाला ज्या ज्या गोष्टींचे ज्ञान नाही त्या त्या गोष्टी अजूनही विज्ञानाबाहेर आहेत. त्या गोष्टींना माणूस देव, निसर्ग वगैरे काल्पनिक गोष्टींच्या अखत्यारित सोडतो. विज्ञानाचे कामच निसर्गनियमांना समजून घेणे आहे. मेंदू, मेंदूचे कार्य, डीएनए, मॅटर आणि अॅन्टी मॅटरची निर्मिती, टाईम ट्रॅव्हल (ही केवळ वानगीदाखल) अश्या कित्येक गोष्टी एकेकाळी फक्त देवालाच जमत, त्या माणसाच्या कह्यात येतील असे वाटु लागले आहे.
माणूस आता शारिरिक संबंधांशिवाय दुसरा माणूस सर्रास जन्माला घालतोच, काही काळात तो त्या 'तयार केलेल्या' माणसांचे रंग, रूप, स्वभाव ठरवू लागलेल. त्याचा पुढचा टप्पा विज्ञान निती-अनीतीच्या कल्पनाही विज्ञान रोपण करू लागेल/शकेल. जेव्हा माणूस स्वभाव, विचार, निती-अनीतीच्या कल्पना सवयी इत्यादींवर विजय मिळवू शकेल तेव्हा पारंपारिक देवाच्या अस्तित्त्वावर आधारीत धर्म टिकण्याची शक्यता वाढेल का घटेल?
(अर्थात असे होणे हे माणसालाच उपकारक आहे का अपायकारक हा वेगळा विवाद्य प्रश्न हे कबूल पण विज्ञान हे देवाशी असंबंधित नाही हे स्पष्ट व्हावे. विज्ञानाचा हल्ला सरळ धर्म/देव या संकल्पनांच्या मुळावर आहे. काही वर्षांनी 'देवाने माणसाला का जन्माला घातले असेल?' हा प्रश्न निरर्थक होईल कारण जन्म देण्याचा निर्णय मेंदुमध्ये फिड झालेल्या अल्गोरिदमनुसार एखाद्या लॅबमध्ये झाला असेल त्यात देवाचा सहभाग (लुडबुड?) नसेल.)
बाकी विज्ञान महाग आहे आणि धर्म/देव/अध्यात्मही तितकेच महाग आहे मात्र सध्यातरी दोन्हीही समाजाला आवश्यक आहेत (आणि म्हणूनच टिकून आहेत)
-/+
>>उगाच कच्ची खिचडी उभ्या जगाला खाऊ घालण्याचा प्रयत्न नको. धर्मसंस्थेने शेण* खाल्ले म्हणजे वैज्ञानिकांनी खावे असे होत नाही.
कच्ची अर्धीमुर्धी खिचडी "खायला" कोण कुठे घालत आहे? खिचडी अर्धीकच्ची आहे हे तर स्वैपाकीच सांगताहेत ना? "बिग बँगने विश्व निर्माण झाले असावे" अशी थिअरी आहे. विश्व बिग बँगने निर्माण झाले आहे असे ठोस विधान अजून केलेले नाही. काही काळापूर्वी स्टेडी स्टेट आणि पल्सेटिंग युनिव्हर्सच्याही थिअर्या "मांडल्या" गेल्या होत्या. पण पुराव्या अभावी त्या रद्द झाल्या. बिग बँग टिकून राहिली आहे.कारण त्यातून निघणार्या भाकीतांना आजवर पुराव्याने समर्थन मिळाले आहे.
विश्व बिग बँगने निर्माण झाले अशी थिअरी असो की आणखी कोणती असो. आपल्या रोजच्या आयुष्यावर त्याचा थेट परिणाम होत नाही. (झालाच तर ते देवाने निर्माण केले नसावे या विधानाचा होतो).
>>विज्ञानाला मोजण्याचा, मापण्याचा, मानण्याचा मानक फार भिन्न आहे. तेव्हा नेहमी नेहमी धर्माशी तुलना करून पांगळे समर्थन नको.
सहमत आहे.
ठोस
वर ऋषिकेशजी म्हणतात कि विज्ञान कोणतेही विधान फायनल आहे असे म्हणत नाही. आपण म्हणताय एक विशिष्ट विधान विज्ञानाने फायनल म्हटलेले नाहीय. म्हणजे काय, सगळीच विधाने फ्लोटींग! आता तुम्हाला बाजू घ्यायचीच नसली तर मी ती खोडू शकतच नाही! पण शेवटी विज्ञानाचा पावित्रा असा असतो कि आम्ही उपांतिम म्हणून जरी काही म्हणालो तरी ते effective working solution असते. तेव्हा स्वीकारा.
"बिग बँगने विश्व निर्माण झाले असावे"
अशी थेरी नाही. 'आहे' अशी थेरी आहे.
कारण त्यातून निघणार्या भाकीतांना आजवर पुराव्याने समर्थन मिळाले आहे.
साफ असत्य. हे थेरी स्क्रॅप करण्याचा हा आदर्श वेळ आहे. हा प्रकार आता रेल्वे मंत्र्यांना पंतप्रधानांनी पाठीआड घातल्याइतका अवजड होतोय.
विश्व बिग बँगने निर्माण झाले अशी थिअरी असो की आणखी कोणती असो. आपल्या रोजच्या आयुष्यावर त्याचा थेट परिणाम होत नाही.
उद्या माझ्या नाकासमोर अशी अजून एक बिग बँग झाली तर? उरेल का माझे नाक?
"पण शेवटी विज्ञानाचा पावित्रा
"पण शेवटी विज्ञानाचा पावित्रा असा असतो कि आम्ही उपांतिम म्हणून जरी काही म्हणालो तरी ते effective working solution असते. तेव्हा स्वीकारा. "
हे 'तेव्हा स्वीकारा' असे अस्ले तरी 'पटलं तर स्वीकारा' असंच असतं. विज्ञान तर्काच्या कसोटीला नेहमीच तयार असतं- किंबहूना त्याच कसोटीवर ते उभं असतं. बिग बँग थिसरी कुणी तुम्हाला बळजबरीने मानाच असे सांगत नाहिये.
(अवांतरः प्रो. नारळीकरांच्या आयुकातल्या खोलीच्या दारावर 'बिंग बँग इज अॅन एक्सप्लोडिंग मिथ' असे लिहिलेले आहे.)
वैज्ञानिक थिअरीज एक हायपॉथिसिस म्हणून धरलेल्या असतात- त्यांनी तर्क लावून केलेली भाकितं पडताळून पाहिली जातात. ती खरी ठरत गेली तर ती थिअरी -म्हणजे तो हायपॉथिसिस रिजेक्ट करणं अधिकाधिक कठीण होतं.
अतिअवांतर
(अवांतरः प्रो. नारळीकरांच्या आयुकातल्या खोलीच्या दारावर 'बिंग बँग इज अॅन एक्सप्लोडिंग मिथ' असे लिहिलेले आहे.)
लिहिणारच की ते. विश्व प्रसरणशील नसून आहे तसेच होते असे सांगणार्या स्टेडी स्टेट थिअरीचे ते पुरस्कर्ते असल्याने त्यांनी तसे लिहिणे अपेक्षितच आहे.
प्रो.साहेब तसे लिहिणार हे
प्रो.साहेब तसे लिहिणार हे योग्य मात्र त्यांनी विश्व प्रसरण पावते आहे हे नंतर मान्य करून क्वासी स्टेडी स्टेट अर्थात स्थिरवत् स्थितीचा सिद्धांत मांडला. त्यानुसार विश्व कधीच जन्माला आले नाही व कधीच नष्ट होणार नाही (असे काहिसे ;) ). अर्थात त्यातील काही बाबी अजून सिद्ध व्हायच्या असल्याने हा सिद्धांतही बुडीत खात्यात धरतात ;)
अतिअवांतर
"लिहिणारच की ते. विश्व प्रसरणशील नसून आहे तसेच होते असे सांगणार्या स्टेडी स्टेट थिअरीचे ते पुरस्कर्ते असल्याने त्यांनी तसे लिहिणे अपेक्षितच आहे."
हो हो...नसतं लिहिलं त्यांनी दारावर तर जाऊन विचारणारच होतात वाटतं की का नाही लिहिलं दारावर म्हणून.
(विशेष सूचना: माझा प्रतिसाद हलकेच घेणे.)
पटलं तर
वैज्ञानिक थिअरीज एक हायपॉथिसिस म्हणून धरलेल्या असतात- त्यांनी तर्क लावून केलेली भाकितं पडताळून पाहिली जातात. ती खरी ठरत गेली तर ती थिअरी -म्हणजे तो हायपॉथिसिस रिजेक्ट करणं अधिकाधिक कठीण होतं.
शब्दशः घेतलं तर (आणि तसंच अपेक्षित असेल) हे अतिशय सूक्ष्म, मार्मिक, रोचक आणि सत्य निरीक्षण आहे. इतकी स्तुतिवाचक विशेषणं वापरण्याचं कारण असं कि कोणी 'कट्टर' वैज्ञानिक यातल्या हायपोथेसिस शब्दावर फार दुखावला जाऊ शकतो.
बाकी (विज्ञानेतर) जगात देखिल 'पटलं तर स्वीकारा' हेच सूत्र आहे. म्हणजे मला संतूर आवडते असे पटले तर ती ऐका अन्यथा तबला ऐका असेच म्हणतात. तबलाच ऐका असे म्हणत नाहीत. (देवाधर्माचे उदाहरण टाळायचे म्हणून इतके सप्पक उदाहरण घेतले आहे.).
संस्थागत बलप्रयोग विज्ञानाकडून इतर संस्थांपेक्षा कमी होतो (असे असलेच तर) म्हणून ते श्रेष्ठ आहे असे मानण्याचे कारण नाही. उदाहरण म्हणून मायेलिनच्या आवरणाचे सांगता येईल. या आवरणाने मज्जासंस्थेचे विदद्युतप्रवाह गतीने, वेगळे (insulated) वाहतात. पण मानवी शरीरात मज्जासंस्थेचे सोडून इतर हजारो विद्युतप्रवाह असतात आणि मानवी देह तर वीजेचा अर्धवट वाहक आहे. मग हे बाकीचे प्रवाह इंसुलेटेड करायला काही नसताना व्यवस्थित एका जागेहून दुसर्या जागी कसे जातात? ते असो, कपडे काढून मातीत जीभ लावून (अर्थिंग करून) बसल्याने मज्जासंस्थेचा, किमान तोंडाचा performance कमी/जास्त्/विचित्र व्हायला हवा. पण असे होत नाही. मायेलिन खेरीज शरीरात दुसरे insulating material नाही.
अशा निरीक्षणाने मी जर ''विद्यतवाही मांसाची खिचडी असलेल्या देहात अनंत विद्यतप्रवाह वेगवेगळे वाहतात' हे एक टू मच विधान आहे' असे म्हणालो
तर 'सामान्यतः' बहुतांश तथाकथित विज्ञानवादी मला अनेक निरर्थक श्रेण्या देतील. सबब 'पटलं तर स्वीकारा' हा प्रकार विज्ञानात आहे असे नव्हे, 'प्रवाहात सामिल व्हा' असा सामान्य मनुष्यसुलभ आग्रह तेथे देखिल आढळेल.
@गवि - धन्यवाद . गरज होती.
विज्ञान-विज्ञानेतर तुलना:१.
विज्ञान-विज्ञानेतर तुलना:
१. पटले तर स्वीकारा हे दोन्हीकडे समान सूत्र आहे.
२. पटण्याची व्याख्या कदाचित सारखी असेलही- पण प्रक्रिया नक्कीच वेगळी आहे.
३. पटण्यासाठी विज्ञानाकडून सब्जेक्टिव्ह गोष्टींचा कमीतकमी वापर केला जातो. त्यात सब्जेक्टिव्हिटी असलीच तर ती अखिल मानवजातीसाठी एकच आहे. कदाचित कुत्र्यामांजरांना किंवा अजून कुणा एलियन्सना हे तसे पर्सीव्ह होणार नाही-पण माणसाला होणार म्हंजे होणारच. मग तो माणूस स्त्रीपुरुष, लहानमोठा, हिंदू-बिगर हिंदू, रसिक-अरसिक कोणी असला तरी चालते. अन्य ठिकाणी बहुतेकवेळा तसे होत नाही. सब्जेक्टिव्हिटी ही विज्ञानात पञ्च संवेदनांच्या पातळीवरची असल्याने आपल्यासाठी ती ऑब्जेक्टिव्हिटीच असायला हरकत नसावी. इतर सिस्टिम्समध्ये अजून एक लेयर मध्ये असतो-रसिकता, भक्ती, इ. चा. तो इथे नसतो. हां आता तार्किक विचारपद्धतीचा एक लेयर मध्ये असतो असे अर्ग्युमेंट कदाचित करता येईलही. पण मग त्यातही "रिडक्शिओ अॅड पंचसंवेदनम" हेच येते शेवटी.
४. सब्जेक्टिव्हिटीचा निकष विज्ञानात अन्य सिस्टिम्सपेक्षा व्यापक असल्याने एखाद्या गोष्टीच्या खरेखोटेपणाबद्दल ग्वाही द्यायला विज्ञान जास्त लायक असे म्हणता यावे.
हायपोथेसिस आणि 'कट्टर' वैज्ञानिक
>> कोणी 'कट्टर' वैज्ञानिक यातल्या हायपोथेसिस शब्दावर फार दुखावला जाऊ शकतो.
पुष्कळ कट्टर वैज्ञानिक बघितले आहेत. ते अजिबात दुखावले जात नाहीत. उलट 'मी सांगतो ते अंतिम सत्य' किंवा तत्सम काही तरी आग्रही म्हणण्यापेक्षा 'आजमितीला जेवढं ज्ञात आहे त्याच्या आधारानं हा हायपोथिसिस सर्वात ग्राह्य वाटतो' वगैरे अटीघालू विधानं मांडणारेच अधिक भेटले. त्यामुळे तुमच्या उद्धृताशी माझी निरीक्षणं अजिबात जुळत नाहीत. तद्वत मला उपलब्ध सॅम्पलनुसार आपलं विधान ग्राह्य वाटत नाही एवढं म्हणतो. बाकी चालू द्या.
विज्ञानाचा पवित्रा आणि तुमचा पवित्रा
>> माझ्या प्रतिसादात सुज्ञ वैज्ञानिकांचे कौतुक आणि 'कट्टर' वैज्ञानिकांची टिका अभिप्रेत आहे.
असेलही कदाचित, पण खाली दिलेल्या विधानाच्या परिप्रेक्ष्यात पाहता तुम्ही सुज्ञ वैज्ञानिकांच्या बाबतीतही हेच म्हणू इच्छिता असा संशय प्रबळ होतो.
एक विशिष्ट विधान विज्ञानाने फायनल म्हटलेले नाहीय. म्हणजे काय, सगळीच विधाने फ्लोटींग! आता तुम्हाला बाजू घ्यायचीच नसली तर मी ती खोडू शकतच नाही! पण शेवटी विज्ञानाचा पावित्रा असा असतो कि आम्ही उपांतिम म्हणून जरी काही म्हणालो तरी ते effective working solution असते. तेव्हा स्वीकारा.
बॅटमॅननी नेमक्या शब्दात मुख्य
बॅटमॅननी नेमक्या शब्दात मुख्य प्रतिसाद दिलाच आहे.
पटणे हा शब्द कंव्हिन्स होणे अशा अर्थाने वापरला आहे (त्याचा तोच अर्थ असावा- मराठी शब्दकोश वापरण्याची सवय नाही, लावून घ्यावी असे मनात आहे.). संगीताची आवड, एखादा रंग आवडणे-नावडणे हे 'आवडणे' -'अपील' होणे या अर्थाचे आहेत.त्यामुळे दोन्हीत फरक आहे.
बाकी मज्जासंस्था वगैरे जे लिहिलय त्याबद्दल मला काहीच माहित नाहिये-सगळीच मज्जा वाटते आहे.असो.
भौतिकशास्त्रीय समाधान
संस्थागत बलप्रयोग विज्ञानाकडून इतर संस्थांपेक्षा कमी होतो (असे असलेच तर) म्हणून ते श्रेष्ठ आहे असे मानण्याचे कारण नाही. उदाहरण म्हणून मायेलिनच्या आवरणाचे सांगता येईल. या आवरणाने मज्जासंस्थेचे विदद्युतप्रवाह गतीने, वेगळे (insulated) वाहतात. पण मानवी शरीरात मज्जासंस्थेचे सोडून इतर हजारो विद्युतप्रवाह असतात आणि मानवी देह तर वीजेचा अर्धवट वाहक आहे. मग हे बाकीचे प्रवाह इंसुलेटेड करायला काही नसताना व्यवस्थित एका जागेहून दुसर्या जागी कसे जातात? ते असो, कपडे काढून मातीत जीभ लावून (अर्थिंग करून) बसल्याने मज्जासंस्थेचा, किमान तोंडाचा performance कमी/जास्त्/विचित्र व्हायला हवा. पण असे होत नाही. मायेलिन खेरीज शरीरात दुसरे insulating material नाही.
जीवशास्त्राचा अभ्यास नसूनही या प्रश्नाचं, तर्काचं उत्तर देण्याचा प्रयत्न करते.
Current follows the path of least resistance. ठराविक प्रकारचा संदेशवहन करण्यासाठी असलेला विद्युतप्रवाह वाहून नेणार्या पेशींच्या शेजारी अधिक विद्युत-अवरोध असणार्या पेशी आजूबाजूला असल्या तरीही काम व्यवस्थित पार पडणार. विद्युतप्रवाह वाहून नेणार्या पेशी आणि इन्सुलेशन करणार्या पेशींची, या कामात १००% एफिशियन्सी असण्याची आवश्यकता नाही. तसंही प्रयोगशाळेत सुपरकंडक्टर बनवणं अजूनही फार सोपं काम नाही; शरीराततर अनेक गोष्टी मल्टीपर्पज आहेत.
१. १००% कार्यक्षमता असावी असे
१. १००% कार्यक्षमता असावी असे कुठे म्हटले नाही. शरीर प्रसंवाहक असावे असेही म्हटलेले नाही. तो विषय नाही.
२. प्रतिरोधक पेशी नावाचा प्रकार नसतो. मायेलिन हे तंतू पेशींचे केवळ तंतू भागावरचे आवरण आहे. तिथेही नीट एका बिंदूपासून दुसर्या बिंदूपर्यंत नीट विद्यतप्रवाह का व्हावा असा प्रश्न येतो पण केवळ मायेलिन असल्यामुळे तो नाही असे मानले आहे.
३. शरीरातले इतर विद्यत प्रवाह सुद्धा 'तीच भौतिक रचना असताना' 'कोणत्याही दोन बिंदूंमधे'(म्हणजे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या बिंदूंच्या जोड्यांमधे) व्यवस्थित होतात. खारट पाण्यात विद्युत प्रवाह सर्वत्र पसरेल, तसे शरीरातही (मज्जासंस्था सोडून इतर संस्थांच्या) विद्युत प्रवाहांचे व्हायला हवे. पण असे होत नाही.
४. आता जीवशास्त्र शरीरातील कितीतरी घडामोडींचे स्पष्टीकरण या विद्युतप्रवाहांच्या आधारे करते, ज्याचा मूळ पायाच बर्यापैकी कच्चा आहे. उदा. स्पंज, ज्याला मज्जासंस्थाच नसते त्याच्यात कसे सिग्नल्स पाठवतात? माणसाच्या हृदयाच्या स्नायुंना स्वयंस्फूर्त (मज्जासंस्थेबाहेरचा) विद्यत प्रवाह मिळतो आणि तो नीट वाहतो, ते कसे काय?
५. सबब असे म्हटले आहे कि Communication of human body based on electrical impulse theory जर मी मानली नाही तर इतरांनी थोडे 'आदराने' घ्यावे. बरेच घेतील पण बव्हंशी घेणार नाहीत. कारण हा प्रकार गुरुत्वाकर्षण न मानण्याइतका रॅडीकल वाटेल.
उत्तरं
१. ते पार्टीकल फुटले कशाने?
महास्फोटाच्या वेळी ज्या कणात सर्व वस्तुमान, ऊर्जा सामावले गेले होते त्याची नक्की अवस्था काय होती हे आजचं ज्ञात भौतिकशास्त्र सांगू शकत नाही. ज्ञात भौतिकशास्त्र हे सगळं समजून घेण्यासाठी फार अप्रगत आहे. या कणाचं प्रसरण सुरू झालं, ज्याला स्फोट असंही हिणवलं/म्हटलं जातं, तेव्हा काळाची सुरूवात झाली. काळ = ० सेकंद. या घटनेआधी काय झालं, म्हणजेच काळ उणे असणं, हे भौतिकशास्त्राच्या दृष्टीने शक्य नाही. या दोन कारणांमुळे प्रसरण सुरू होण्याचं कारण भौतिकशास्त्र देऊ शकत नाही. ती विज्ञानाची मर्यादा आहे.
२. विश्व का प्रसारण पावत आहे?
एकदा प्रसरण सुरू झाल्यावर ते थांबवण्यासाठी गुरुत्वाकर्षणाचा जोर पुरेसा पडला नाही तर ते थांबणार कसं? प्रसरण सुरू झाल्यावर, एखादी गती सुरू झाल्यावर थांबवणारं बल नसेल किंवा बल पुरेसं नसेल तर प्रसरण किंवा ती गती थांबणार नाही. (न्यूटनचा पहिला नियम)
३. विश्वाचे तापमान संतुलित कसे?
विश्वाचं तापमान संतुलित नाही.
१. नितिनने आधीच लिहिलेलं आहे, विश्वात गार-गरम असे भाग असे स्थानिक बदल आहेत.
२. प्रसरणामुळे विश्व सातत्याने थंड होत आहे. यदाकदाचित विश्वाचं आकुंचन सुरू झालं तर विश्वाचं तापमान वाढेल.
महास्फोटाच्या सिद्धांतामधे इतर गंभीर उणीवा आहेत. प्लँकच्या निमित्ताने लिहीलेल्या लेखांमधे लिहील्याप्रमाणे, बॅरीऑनजेनेसिसचं कारण काय, खरोखरच इन्फ्लेशन झालं का हे दोन मोठे प्रश्न आहेत. त्याशिवाय दोन दीर्घिकांमधे असणारं चुंबकीय क्षेत्र हा आणखी एक सतावणारा प्रश्न आहे (याबद्दल लेखांमधे उल्लेख नाही).
हे अफाट आहे सगळं. बाय द वे..
हे अफाट आहे सगळं.
बाय द वे.. हे जे आ.गं.च्या मध्यभागी कृष्णविवर आहे ते आसपासच्या गोष्टी आत खेचून घेत असेल तरः
अ. कितपत वस्तुमान आत खेचल्यावर ते शांत होण्याची शक्यता आहे?
ब. जर आत खेचणारा भयंकर फोर्स केंद्रस्थानी आहे तर मग आकाशगंगेतले पदार्थ बाहेरच्या दिशेने विस्तारत का चालले आहेत?
क. त्या शिंच्या कृष्णविवराचे आपल्याला कितपत ड्यामेज आहे?
धन्यवाद.