कात्रीमध्ये सापडलेले पाकिस्तान
पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर असलेला उत्तर वझिरीस्तान एजन्सी हा विभाग या देशाच्या केंद्रशासित आदिवासी विभागांमध्ये मोडणारा एक भाग आहे. या भागातील प्रमुख शहर मिरानशाह यापासून सुमारे 5 किमी अंतरावर उत्तरेला असलेल्या डंडे डरपा खेल या उपनगरामध्ये एक अत्यंत आलिशान असे एक फार्महाऊस आहे. सफरचंदे, संत्री, द्राक्षे आणि पपनस यांच्या बागा आणि आसमंतात पसरलेली नयनमनोहर हिरवळ यांच्या मध्ये 8 कक्ष व संपूर्ण संगमरवरी फ्लोअरिंग असलेल्या या फार्महाऊस लगत एक मिनार बांधलेला आहे. ही मालमत्ता या उपनगरामध्ये रहाणार्या एका अत्यंत श्रीमंत अशा जमिनदाराच्या मालकीची 2/ 3 वर्षांपूर्वीपर्यंत होती. नोव्हेंबर 2013 महिन्याच्या सुरुवाती पर्यंत या आलिशान मालमत्तेकडे नुसती नजर टाकली तरी येथे सुबत्ता, आणि नीरव शांतता सतत नांदते आहे हे कोणाच्याही लगेच लक्षात येऊ शकले असते.
मात्र ही नीरव शांतता संपूर्णपणे फसवी असून डंडे डरपा खेल हे गाव आणि हा सर्वच विभाग, अत्यंत धोकादायक भाग म्हणून पाकिस्तानामध्ये कुप्रसिद्ध आहे. अफगाणिस्तान मध्ये गेल्या काही वर्षात मोठे समजले जाणारे जे काही अतिरेकी हल्ले झाले आहेत त्यापैकी बहुतेक हल्ल्यांच्या मागे असलेल्या हकानी चळवळीचे, हे गाव म्हणजे सर्वात महत्त्वाचे केंद्र किंवा प्रमुख अड्डा समजला जातो. अफगाणिस्तान मधील तालिबान राजवटीच्या कालात या भागात वास्तव्य करणारे अनेक पाकिस्तानी नागरिक हा भाग सोडून दूर निघून गेले होते. 9 नोव्हेंबर 2001 मधे अमेरिकेत झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर अमेरिकेच्या मदतीने अफगाणिस्तानमधील तालिबान राजवट उलथून टाकण्यात आल्यानंतर हे नागरिक परत येथे आले. मात्र या सगळ्या अशांततेच्या कालातही वर उल्लेख केलेले फार्महाऊस उत्तर वझिरीस्तान मधील पाकिस्तानी पायदळाच्या तुकड्यांच्या मुख्यालयापासून फक्त 1 किमी अंतरावर असल्याने अत्यंत सुरक्षित असे मानले जात होते. स्थानिक गावकर्यांना या फार्महाऊस मधून काळ्या काचा लावलेल्या आलिशान एस.यू.व्हींचा एक ताफा रोज सकाळी या फार्महाउसच्या कांपाउंडच्या गेटमधून बाहेर पडताना दिसत असे व सूर्यास्तानंतर हाच ताफा परत आलेला दृष्टीस येत असे. स्थानिकांची या फार्महाउसमध्ये कोणीतरी बडी किंवा महत्त्वाची व्हीआयपी असामी रहात असावी अशी समजूत स्वाभाविकपणेच झालेली होती. गावात अशीही वदंता होती की नव्या मालकांनी हे फार्महाउस या फार्महाउसच्या मूळ मालकाकडून 1 लाख 20 हजार अमेरिकन डॉलर्सना विकत घेतले होते.
नोव्हेंबर महिन्यातल्या पहिल्या शुक्रवारच्या संध्याकाळी स्थानिक खेडूतांनी एक एस यू व्ही गाडी त्या फार्महाऊसच्या कांपाउंडच्या गेटपाशी उभी राहिलेली बघितली. परंतु काही सेकंदातच अशी एक घटना घडली की तेथे कृत्रिम का होईना पण नांदत असलेली नीरवता व शांतता क्षणार्धात भंग पावली व एकच हलकल्लोळ माजला. आकस्मिक रितीने आकाशात एक अमेरिकन ड्रोन विमान कोठून तरी उगवले व त्या विमानाने दोन रॉकेट्स कोणालाही काही कल्पना येण्याआधी त्या एस यू व्ही कडे सोडली. पुढच्या क्षणाला त्या एस यू व्ही गाडीमध्ये स्फोट झाला व गाडीमध्ये बसलेले सर्वजण मृत्यूमुखी पडले. काही मिनिटातच तालिबान सैनिक त्या ठिकाणी अचानक आले आणि त्यांनी त्या सर्व भागाची नाकेबंदी केली.
बर्याच नंतर हे विदित झाले की त्या एस यू व्ही मध्ये मरण पावलेल्या लोकांमध्ये लोकांना ज्याची अत्यंत दहशत वाटत होती तो पाकिस्तानी तालिबानचा मुख्य नेता हकिमुल्ल्हा मेहसुद हाही होता. मेहसुदच्या मरणाची बातमी जेंव्हा प्रसृत झाली तेंव्हा पाकिस्तानमधील राजकीय पुढार्यांनी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांच्या मताने पाकिस्तान सरकार मेहसुद याच्याबरोबर शांततेसाठी वाटाघाटी सुरु करण्याच्या मागे होते व या साठी सरकार त्याच्याशी संधान बांधण्याचा प्रयत्नात होते व त्याचा मृत्यू झाल्याने या वाटाघाटीच्या प्रक्रियेलाच सुरूंग लागला होता. पाकिस्तानी माध्यमांनी या घटनेला अमेरिकन सरकारचे विश्वासघातकी कृत्य असे संबोधून त्यावर बरीच टीका केली होती. पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा पूर्वीचा कप्तान इम्रान खान याने तर खैबर खिंडीतून नाटो संघटनेच्या अफगाणिस्थान मधील सैनिकांना रसद पोचवणार्या ट्रक्सना आपली संघटना अडवणार असल्याचे जाहीर करून टाकले होते.
पाकिस्तान मधील या जहाल प्रतिक्रियेचे अमेरिकन सरकारला बरेच आश्चर्य वाटल्यासारखे दिसले. वास्तविक पाहता मेहसुद हा दहशतवादी, हजारो पाकिस्तानी नागरिकांच्या हत्येला जबाबदार असलेली अशी व्यक्ती होता. त्यामुळे अमेरिकन सरकारने लगेचच जाहीर करून टाकले की तालिबान बरोबरच्या वाटाघाटी ही पाकिस्तानमधील अंतर्गत बाब असून अमेरिकन सरकारचा त्याच्याशी कोणताही संबंध नसल्यामुळे ड्रोन विमानांचे हल्ले चालूच राहतील.
या मधल्या काळात पाकिस्तानी तालिबान संघटनेने मुल्ल्हा फझलुल्ल्हा याची हकिमुल्ल्हा मेहसुद याचा उत्तराधिकारी म्हणून नेमणूक करून टाकली आहे. तालिबानचा नवीन मुख्य मुल्ल्हा फझलुल्ल्हा हा अनेक अतिरेकी हल्ल्यांसाठी जबाबदार व्यक्ती म्हणून कुप्रसिद्ध आहे. 2012 मध्ये बालिकांना शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून झगडणारी प्रसिद्ध शालेय विद्यार्थिनी मलाला युसुफझाई हिच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामागे हाच अतिरेकी होता. त्याचप्रमाणे या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानमधील एक वरिष्ठ सेनाधिकारी सानाउल्ल्हा निआझी याच्या हत्येची जबाबदारी आपली असल्याचे त्याने मान्य केले होते.
पाकिस्तान मधील या नवीन तालिबान नेतृत्वाने, पाकिस्तान सरकार बरोबर कोणत्याही शांतता वाटाघाटी करण्याच्या शक्यतेला पूर्णपणे नकार तर दिला आहेच पण हकिमुल्ल्हा मेहसुद याच्या हत्येचा आपण योग्य तो सूड उगवणार असल्याचेही घोषित करून टाकले आहे. ड्रोन विमांनाकडून होणार्या हल्ल्यांना पाकिस्तान सरकार मान्यता देत असल्याने, तालिबान संघटना त्यांना दोषी व जबाबदार मानते व यामुळे मेहसुद्च्या हत्येचा सूड पाकिस्तानवर घेण्याच्या शपथा त्यांनी घेतल्या आहेत असे वृत्त पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध झाल्याने तालिबान परत हल्ले चालू करण्याची भीती पाकिस्तानला वाटते आहे.
या सर्व घटना क्रमामुळे पाकिस्तान, एका बाजूला दमदाटी करणारे तालिबानी तर दुसर्या बाजूला अमेरिकन सरकारचा ड्रोन हल्ले थांबवण्यास नकार, अशा कात्रीमध्ये सापडले आहे. ही घटना घडल्यानंतर पाकिस्तान सरकारने आवाज उठवण्याचा बराच प्रयत्न करून बघितला. पाकिस्तानचे गृह मंत्री चौधरी निसार अली खान यांनी तर राष्ट्र सुरक्षा या विषयाबाबत नेमलेली मंत्रीमंडळाची उपसमिती पाकिस्तान- अमेरिका यांमधील संपूर्ण संबंधांचा आढावा आणि पातळी यासंबंधी विचार करेल असे जाहीर करून टाकले. ही समिती पाकिस्तान-अमेरिका सहकार्यातील प्रत्येक अंगाचा आढावा घेऊन त्याबद्दल चर्चा करेल असेही त्यांनी सांगितले होते. पाकिस्तान सरकारने अमेरिकन राजदूताकडे ड्रोन हल्ल्यांबाबत तीव्र निषेधही व्यक्त केला होता.
परंतु थोड्याच कालात या सर्व प्रतिक्रिया फक्त पाकिस्तानी जनतेला खुष करण्यासाठी म्हणून सरकारने केल्या होत्या याचे प्रत्यंतर आल्यावाचून राहिले नाही. मंत्रीमंडळाच्या उपसमितीची सभाच घेतली गेली नाही आणि या विषयावर पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याबरोबर साधी चर्चा सुद्धा कोणी केली नाही. अमेरिकेबरोबरचे आपले संबंध स्नेहपूर्ण आणि नेहमीप्रमाणेच असल्याचे आणि या संबंधांचा कोणताही आढावा घेतला जाण्याची शक्यता नसल्याचे पाकिस्तानी अधिकारी आता परत सांगत आहेत
एका बाजूला आग ओकणारे तालिबानी आणि दुसर्या बाजूला अमेरिकेचे अतिरेक्यांवर चालू राहिलेले ड्रोन विमानांचे हल्ले यांच्यामध्ये पाकिस्तान सरकार सापडले आहे. या परिस्थितीतून कोणताही मार्ग निघण्याची आशा मात्र दिसत नाही.
26 नोव्हेंबर 2013
प्रतिक्रिया
छान माहिती
छान माहिती
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
स्रोत?
लेख भाषांतरित आहे का?
स्रोत काय आहे?
.
.
बाकी, अस्थिर पाकिस्तान, पाकिस्तान फुटाण्याच्या वाटेवर वगैरे वगैरे वाचून मागच्या काही वर्षात कंटाळा आलाय.
पाकिस्तान अस्थिर असो वा नसो, भारतभर होणारे बॉम्बस्फोट(अगदि बेंगलोर-हैद्राबादपासून काश्मीर पर्यंत,
अहमदाबादपासून गुवाहाटीपर्यंत सर्वत्र) व हल्ले कायम राहिलेले आहेत.
शिवाय त्यांच्यात अंतर्गत भांडणे असली, तरी भारताची वाजवण्यात वाजवण्यात त्यांच्यात काँग्रेस - भाजपप्रमाणेच अगदि चढाओढ असते.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
भाषांतरित
हा लेख येथे टाकलेल्या माझ्या बहुतेक लेखांप्रमाणे भाषांतरितच आहे. लेखाचा मूळ स्त्रोत येथे बघता येईल.
http://www.akshardhool.com/2013/11/pakistan-in-nutcracker-situation.html
अतिअवांतर
"पाकिस्तान फुटाण्याच्या वाटेवर वगैरे वगैरे वाचून" खरे तर मी क्षणभरासाठी फुटलो.
(फुटाणेप्रेमी, खरे तर फुटाणेफोलपटप्रेमी आणि कडक-तसेच-हिरवे-व-लाल-वाटाणियांचा अतिशय प्रेमी) बॅटमॅन.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
इंटरेस्टिँग बातमी!
इंटरेस्टिँग बातमी!
उसकी कमीज
चांगली माहिती आहे.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
दहशतवाद
दहशतवाद, हा पाकिस्तानने स्वतःवर ओढवून घेतला आहे. भारताचा सतत द्वेष करत राहिल्याने त्यांची प्रगती होऊ शकली नाही. त्याउलट इतके हल्ले व त्रास पचवून सुद्धा भारताची खूपच प्रगती झाली आहे. भारतातले काही घरभेदी त्यांना साथ देत आहेत. पण त्याचाही काही विशेष परिणाम आपल्या प्रगतीवर होणे शक्य वाटत नाही.
चांगल्या माहितीबद्दल आभार.
+
सहमत आहे.
शिवाय पाकिस्तानने काढलेल्या प्रत्येक कुरापतीला उत्तर म्हणून प्रतिहल्ले वगैरे करून वेळ, शक्ती आणि पैसासुद्धा भारताने व्यर्थ दवडला नाही हे ही उत्तमच झाले आहे.
अतिअवांतरः अधूनमधून बॉम्बस्फोट इत्यादि प्रकार चालू राहिल्याने मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही, बॅगेज स्कॅनर्स, बुलेटप्रूफ जॅकेटे वगैरेंना मागणी वाढली. त्याच्या व्यापारातून जीडीपीत भर पडली तसेच या तपासण्या करण्यासाठी रोजगार निर्माण झाले. या सगळ्याचा ट्रिकल डाऊन फायदा सुद्धा झाला असेल.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
भूकंप- त्सुनामी
प्रतिसाद तिमांना नाही.
थत्त्यांना उद्देशून आहे.
उद्या भूकंप , त्सुनामी अशी नैसर्गिक संकटे उद्भवली तर
"बरे झाले लोकसंख्यावाढीच्या संकटात झाली तर थोडी मदतच होइल" असा सूर लावणे शक्य आहे.
हा तार्किकदृष्ट्या चूक आणि त्याहून वाईट म्हणजे अमानवीय आहे.
.
.
बलात्कार झाल्यावर वैद्यकिय चाचणी केली जाते. त्यानंतर त्या घटनेनंतर एखादी स्त्री आपण गरोदर आहोत की नाहित हे तपासते.
काउन्सिलिंग मध्ये डॉक्टर स्वतःची काळजी कशी घ्यावी वगैरे साम्गतात. गर्भनिरोधक वगैरे वेळीच वापरण्याचे फायदे सांगतात.
(पूर्वी माला - डी, हर गोली एक रात अशी जाहिरात येत असे.) ही त्या स्त्रीच्या दृष्टीने ज्ञानप्राप्तीच होय.
पण तरीही "बलात्कार झाला ते चांगलेच झाले" असे म्हणवत नाही.
.
.
असे का होते?
कारण कुठल्याही वाईट गोष्टीची सिल्वर लायनिंग शोधणे ठीकच. पण त्याच्या मुख्य निकाल्, परिणाम आणि घटनेमागचा उद्देश ह्यात गल्लत होउ नये असे वाटते.
सिल्वर लायनिंग ही ह्या निकालांपेक्षा वेगळी असते.
स्फोट, २६/११ हत्याकांड वगैरेबद्दल असे चेष्टेच्या सुरात बोलणे क्रूर वाटते. लोकांच्या मृत्यूची थट्टा वाटते.
(बटबटीत फिल्मी उदाहरण द्यायचे तर अमर अकबर अॅन्थनी मधील व्हिलन जीवन आठवावा.
प्राणची पत्नी आजारी आहे. तो आर्थिक मदतीसाठी गयावाया करीत आहे असा प्रसंग आहे. त्यात जीवन अशा वाईट
स्थितीतील माणसाची खिल्ली उडवत त्याला बुटपॉलिश करायला लावतो. वर सर्वांसमोर अजूनच चेष्ट करतो.)
एखाद्या तिरडीसमोर उभे राहून "ढोल्यानं कमी खाल्लं असतं तर उचलायला वजन सोपं पडलं असतं" असं म्हणणं हे क्रौर्य आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
?
अवांतरातील उपरोध नीट मांडू न शकल्याबद्दल क्षमस्व.
ते अवांतर ट्रिकल डाउनी मार्केट वाद्यांवरची टिपण्णी होती. माझे व्यक्तिगत मत अनडिझायरेबल गोष्टींनी रोजगार निर्माण होतो म्हणून त्या चालू द्याव्या याच्या विरुद्धच आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
(आता जजमेंटल व्हायचेच ठरवले आहे, तर...)
...हे माझेही एक जजमेंट:
थत्तेचाचांची दिलगिरी अस्थानी आहे. उलटपक्षी, त्यांचा (सूर्यप्रकाशाहूनही लख्ख) उपरोध न समजल्याबद्दल मनोबाच थत्तेचाचांना एक अपॉलॉजी देणे लागतात.
केस डिस्मिस्ड.
ठीक.
ठीक.
सॉरी चाचा.
तुम्ही तीच गोष्ट म्हणत आहात, हे ध्यानात आले नाही.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
-
जीडीपीवाढ, ट्रिकलडाऊनफायदा वगैरे म्हणायला ठीकच आहे, परंतु हे परिमाण योग्य नाही. 'पर क्यापिटा' जीडीपीवाढ/ट्रिकलडाउनफायदा किती, हे (आता जळीस्थळीकाष्ठीपाषाणी-'पर क्यापिटा'वाद एवीतेवी घट्ट कवटाळलाच आहे, तर) तपासले पाहिजे. त्याकरिता बॉम्बस्फोट वगैरे प्रकरणांच्या पीडितांची नेमकी संख्या किती, ते शोधून काढून तिने जीडीपी/ट्रिकलडाऊनफायदा वगैरेंना भाग दिला पाहिजे.
अवान्तर - हे पहा.
CNN फरीद झकेरिया ह्यांच्या GPS कार्यक्रमात आत्ताच हा पाकिस्तानी-भारतीय मैत्रीबद्दलचा हा युटयूब विडिओ पाहिला. आत्तापर्यंत ह्याला ८५ लाखाहून अधिक 'हिट्स' मिळाल्याचे दिसते.
त्यावरून काही महिन्यांपूर्वी मराठी वृत्तपत्रात वाचलेली पुण्याची गोष्ट आठवली. ती काहीशी पुढे दिल्याप्रमाणे होती आणि माझ्या आठवणीप्रमाणे पुण्यातील परमार कुटुंबाच्या व्यवसायाशी संबंधित होती. (ह्या कुटुंबापैकी पी. सी. परमार हे पुण्यातील ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि माझा आणि त्यांचा चांगला परिचय आहे.):
फाळणीपूर्वी परमार कुटुंबाच्या व्यवसायाला एका मुस्लिम मालकीच्या एका पुण्यातील व्यवसायाकडून बरेच येणे होते. मुस्लिम व्यावसायिक कुटुंब फाळणीच्या वेळी पुण्यातील धंदा बंद करून पाकिस्तानात निघून गेले आणि आपले पैसे बुडले असे मानून परमारांनी ती रक्कम बुडीत खात्यात टाकली. पाकिस्तानी कुटुंबातील एक वृद्ध गृहस्थ २०१३ साली परत पुण्यात आले आणि ते जुने देणे त्यांनी सव्याज परत केले.
शोध घेऊनहि ही गोष्ट मला पुनः सापडली नाही. कोणास वाचल्याचे आठवत आहे काय?
(धाग्याच्या प्रमुख विषयाबाबत इतकेच लिहितो की फाळणी ही मला तरी इष्टापत्ति वाटते. जर हिंदुस्तान तसाच एकत्र राहिला असता तर इथलेच नागरिक असलेल्या जिहाद्यांनी येथे काय गोंधळ घातला असता ह्याची कल्पना करवत नाही.)
परमारकथा
वाचल्याची नक्कीच आठवते.
बहुधा 'मुक्तपीठा'वर वाचली आहे, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)
हो.
मला वाचल्याचे पक्के आठवत आहे. आणि बहुतेक मुक्तपीठावरच वाचले आहे. पण त्यात नावे भौतेक नव्हती. मुस्लिम अन मारवाडी इतकेच दिलेले आठवते आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
+१
वाचले आहे. आठवते आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
'इष्टापत्ती'बद्दल...
भावनेशी अजिबातच असहमत आहे, असे म्हणवत नाही, परंतु तरीही,
(१) आत्याबाईस मिशा असत्या, तरी तिला 'काका' म्हणता आले असतेच (किंवा म्हणता आले असते, तरी म्हटले गेले असतेच), असे नाही.
(२) Hindsight is 20-20.
(३) 'का न सदन बांधावे, की मग पुढे त्यात बिळे करिल घूस?'१
=========================================================================================
१ या शेवटच्या उद्धरणातील२ काव्यपंक्ती नेमकी कोणाची आहे, याबद्दल कोणी काही खुलासेवजा विवेचन करू शकेल काय, प्लीज? तसेच, उद्धरणदोष सुधारल्यासही आवडेल. आगाऊ आभार.
२ 'जरि उद्धरणीं व्यय न तिचा हो साचा', वगैरे वगैरे. (मूळ कर्त्याची [सावरकरांची? चूभूद्याघ्या.] क्षमा मागून.)
मोरोपंत
माझ्या समजुतीनुसार मोरोपंतांच्या पुढील आर्येचा हा भाग आहे:
काव्य करावे म्या नच वचकावे दूषितो परी लघुस|
का न सदन बांधावे की त्यात पुढे बिळे करिल घूस||
मी काव्य करीत राहावे, वचकू नये, (दूषितो परी लघुस म्हणजे काय?) पुढेमागे घूस बिळे करील म्हणून मी आज घर बांधू नये काय?
धन्यवाद
.
इष्टापत्ती
http://www.misalpav.com/node/23802 या धाग्यावर मी खालिल प्रतिसाद टाकला होता. मुसलमानांचा टक्का, सत्तेचा तोल आणि फाळणी असा काहीसा रंग चर्चेला आला होता. 'इष्टापत्ती' शब्दावर मला नक्की काय म्हणायचे आहे ते बोल्ड केलेल्या वाक्यात आहे.
अशा आठवणी आठवून उजव्या किंवा कशा मताचे लोक कसे असतात याची कल्पना इतरांना देणे याला कुमार्केतकरी विचारसरणी म्हणतात. कुमार्केतकर जेव्हा टीव्हीवर मोदी-आडवाणी द्वंद्वाच्या वेळी 'संघाचे आडवाणींबद्दल काय मत आहे?' वर बोलतात तेव्हा ते 'अहो काय सांगू मला ते शब्द बोलवत नाही, अगदी प्रायवेटमधे बोलवत नाहीत इतके घाण आहेत' असे उत्तर देतात. आमच्या दिल्लीतले प्रेक्षक जाम खूश! एकतर मोदींच्या समर्थनाचा जोर आणि वर मराठी गोरागोमटा बामन बोलतोय म्हणल्यावर नक्कीच खरं असणार! राजकीय तत्त्वज्ञान , कोणते का असेना, पचवायला फार जड असते म्हणून ते जेव्हा हस्तिदंती मनोर्यातून खाली आणतात तेव्हा त्यात चिकार भेसळ झालेली असते.
जे लोक आयुष्यभर एकच राजकीय तत्त्वज्ञान घेऊन चालतात त्यांचे ठीक, पण जे 'अधिक अनुभवांनंतर उदार' होतात तेव्हा त्यांना त्या भेसळीचा काँट्रास्ट फारच प्रकर्षाने जाणवायला लागतो. लेखकाच्या बाबतीतही तेच झाले आहे. कारण अशा काँट्रस्टवर भूतकाळातल्या व्हिलनचे चरित्रण चालू झाले कि त्यात टिका करायला जागा उरत नाही, जे न व्हावे.
मलाही असे विचार सुचतात का पाहतो. हे केवळ विचार आहेत, सत्य नाही. केवळ साधर्म्य साधायचा प्रयत्न. ---> एकेकाळी ऐश्वर्या आपली सून व्हावी म्हणून तीव्र इच्छा असणारे सलिम खान, आज जेव्हा ऐश्वर्याच्या मुलीला त्यांची नात, फुकटात, आपल्या संपत्तीचा केवळ ५% भाग देऊ जात आहे तेव्हा कोकलत आहेत ...हा एक विनोदच आहे!!!
या खंडीत भारताच्या समर्थनाचा फंडामेंटल क्रायटेरिया आहे वाटते. यामधे लेखकाने बरीच लै मोठी विधाने केली आहेत -
१. सर्वात जास्त ओब्जेक्शनेबल - अखंड भारताचा निवडून आलेला उमेदवार (पी एम) जर मुसलमान राहिला असता तर तो हमेशाच हिंदूप्रती हरामखोर राहिला असता असे का? मध्ययुगात काही मुसलमान राजे (वाईट) असणे वेगळे आणि स्वतंत्र भारताचा डेमोक्रॅटिक मुस्लिम लीगचा मुस्लिम पी एम तसा असणे वगळे.
२. १२% मुस्लिम असताना भारतात राज्य करणारी काँग्रेस हिंदुच नाही म्हणणे हे ही धाडसच. सगळीकडे काय भगवा रंग मारला पाहिजे का? दोन मल्लांच्या फायटीत तिसरा (एकगठ्ठा मुस्लिम) शिट्ट्या मारू लागला म्हणजे शिट्ट्या मारणारा कुस्तीत कोणाचा विजय व्हावा हे ठरवतोय. (आपण शिवाजी पार्क ला वाढलेले म्हणून एक गोष्ट सांगतो. कधी लातूरला या. एखाद्या रँडम म्हातार्याला कमळावर शिक्का मारायला सांगा. 'नगं बाबा, रजाकार येतील पुना' असं उत्तर येण्याची शक्यता आजही बरीच आहे.) २००२ चा दंगा इतका प्रसिद्ध असताना, माध्यमांनी मोदींना वाइट झापले असताना आज तो सर्वात फेमस पी एम उमेदवार आहे.
३. मुस्लिम खरोखरच चांगले सत्ताधारी असले, कुण्या का पक्षाचे असेना, तर त्यांना पुढे जाऊ देण्यात काय वाईट आहे? चांगले सत्ताधारी जाऊ द्या, केवळ मुसलमान चांगले (शब्द चुकला वाटतं) मतदान करतात म्हणून त्यांचे उमेदवार निवडून आले तर काय वाईट आहे? इतकी भिती का? नेहमी पाकिस्तानकडे का पाहता? मलेशियाकडे का नाही?
४. भारतीय दंगलींचं प्रमाण (१९४६-४७-४८ सोडून) स्वातंत्र्यानंतर जास्त आहे. भीषणता देखिल जास्त आहे. फाळणी नावाच्या वेळी जी कटूता निर्माण झाली ती अभूतपूर्व आहे.
५. फाळणी झाली नसती तर ३-४ युद्धं झाली नसती.
६. आणि मुसलमानांचे असे टक्के का मोजता? जास्त % मंजे जास्त डेंजर?
जाऊ द्या, मी स्पष्ट म्हणतो, मुस्लिमांचं भय असणे किंबा त्यांच्यावर (सहदेशी म्हणून हो) प्रेम नसणे या दोन गोष्टी फाळणीचे समर्थन करणारांची मूळ मानसिकता दाखवतात.
आता एकदा फाळणी झालीच आहे तर -
१. ज्यांना एकत्र राहायचे होते त्यांना ते मिळाले, ज्या मुस्लिमांना सवते (आपल्या धर्माच्या नावाने, राजधर्माने, इ) राहायचे होते त्यांना ते मिळाले. पण ज्या हिंदूंना सवते राहायचे होते त्यांना ते मिळाले नाही. सवते राहू इच्छिणारे हिंदू कमी आहेत म्हणून त्याचा अर्थ त्यांची मागणी गैर आहे असा होत नाही. एखादेवेळी 'आज' ती असंभव आहे म्हणा, पण अशी 'शुद्ध' इच्छा असणेच अनैतिक्/बेकायदेशीर्/घटनाविरोधी/नॉन्-सेक्यूलर/भांडखोर्/भेदभावी/इ इ आहे म्हणणे अन्याय्य, एकतर्फी आणि अनैतिक आहे.
गांधीजींची हत्या आणि त्यांचा वैचारिक विरोध एकत्र चर्चू नये. नथूरामाशी डिसअलाइनमेंट करण्यातच विरोधकांची ९०% उर्जा जाते. माझ्या विचारांचा स्रोत नथूरामचे पुस्तक वा शिवाजी पार्क वरचा कॅरमचा अड्डा नसताना सुद्धा मी त्यांच्या राजकीय निर्णयांवर घणाघाती टिका करू शकतो, and it may hold some water. आणि हो अखंड भारत काही नागपूरच्या लोकांचा कॉपीराईट नाही, it may make a great social, economic and political sense to some, which should be taken with due regard.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
+१
हाय क्लास.
मला हेच कित्येक दिवसात म्हणायचे होते. ते इतके नेमके , अचूक मांडलेत की बस.
३. मुस्लिम खरोखरच चांगले सत्ताधारी असले, कुण्या का पक्षाचे असेना, तर त्यांना पुढे जाऊ देण्यात काय वाईट आहे? चांगले सत्ताधारी जाऊ द्या, केवळ मुसलमान चांगले (शब्द चुकला वाटतं) मतदान करतात म्हणून त्यांचे उमेदवार निवडून आले तर काय वाईट आहे? इतकी भिती का? नेहमी पाकिस्तानकडे का पाहता? मलेशियाकडे का नाही?
ह्यास +१
एकीकडे सरकारी संस्था लोकसंख्येच्या ढासळणार्या संतुलनाबद्दल बोलतात.
इंडिया टुडे मध्ये मागे एकदाअ मुघलीस्तान हा कॉरिडॉर कसा देव्हलप होत्य ते लिहिले होते.
पाकिस्तानपासून ते बांग्लादेश पर्यंत(पूर्वीचा ग्रँड ट्रंक रोड) भारताचा जो काही भूभाग आहे, पंजाब, हरयाणा, युपी, बिहार्,बंगाल ही राज्ये.
ह्यात एक्सलग असे प्रत्येक जिल्ह्यात मुस्लिमांचे प्रमाण वाढते आहे म्हणून गंभीर चिंता जाहिर केली आहे.
म्हणजे अरे चिंता वाटते ना तुम्हाला? म्हणजे "मुस्लिम ह्या देशासातेहे धोकादायक आहेत" असे मानणार्यांपैकी आहात ना तुम्ही?
मग मुळात "१९४७ला फाळणी अर्धवट झाली, मुस्लिमांना स्वतंत्र देश मिळालाच. पण राहिलेल्या भूभागाचे निश्चित काय होइल ते धड ठरले नाही.
तो उरलेला भूभाग संपूर्ण गैरमुस्लिमांना तरी द्यायचा होतात. म्हणजे पुढील प्रश्न उरले नसते." असे कुणी म्हटले की सरकारी माणसे आणि विचारवंत
डोळे वटारुन पाहतात. म्हणजेच "मुस्लिमांपासून भारताला धोका नाही. मंत्रीमंडळ बहुसंख्य मुस्लिम झाले, पंतप्रधानंसहित तरी हरकत नाही. " अशी ती भूमिका अहे असे मानतो आपण.
मलाही हरकत नाही, असेच मी म्हणेन.
पण मग हीच सरकारी मंडळी आय बी, रॉ ह्या संघटनांचे असे रिपोर्ट पाहून चिंतित का होतात???
काहीच कळत नाही.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
पाहुण्याच्या हातून साप
लेखन आवडले. पाकिस्तान कात्रीत आहे पण त्यामागची कारणे व विश्लेषण ठराविक साच्यातले वाटले.
पाकिस्तान अमेरिकेविरूद्ध थेट भुमिका घेत नाहिये ते अमेरिका मित्र आहे म्हणून तव्हे तर २०१४मध्ये अमेरिका निघाल्यावर अफगाणिस्तानला आपलण कंट्रोल करू असे पाकिस्तानला वाटत होते -वाटते. परंतू आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. अफगाणिस्तान आर्मी आधीच अमेरिकन आर्मीच्यासोबत तालिबान्यांशी लढून पूर्वीपेक्षा चांगली झाली आहेच, त्यात आता भारतही अफगाण आर्मीला ट्रेनिंग देणार असल्याने आपल्या भुमिकेबद्दल पाकिस्तान धास्तावले आहे. त्यासाठी त्यांनी "सॉफ्ट तालिबान"चे पिल्लु सोडले व एकदा का त्या तालिबान्यांना शुद्ध करून घेतले की भारताला आपोआपच बाजुला सारता येईल अशी अटकळ होती.
मात्र ओबामांच्या फेरनिवडणूकीनंतर हळूहळू व गेल्या २-३ महिन्यात जोमाने, उलट वारे वाहू लागले; आणि अमेरिकेने तथाकथित "सॉफ्ट" तालिबानच्या महत्त्वाच्या म्होरक्यालाच उडवले. आता हा खेळ संपल्याने - पत्ते उघड झाल्याने - तालिबानने त्याच्या जागी नवा भिडू दिला आहे तो कट्टरच आहे.
शिवाय आता तालिबान्यांच्या मदतीने अफगाणिस्तानवर नियंत्रण ठेवण्याचे पत्ते उघड झाल्यावर तालिबान्यांचा पाकिस्तानला फारसा उपयोग उरलेला नाही. ड्रोन हल्ले पाकिस्तानी सरकारला हवेच आहेत कारण त्यामुळे पाकिस्तानमधील कित्येक भांडवलशहांना कोणत्याही खर्चाविना थेट पाहुण्याकरवी संरक्षण देणे जमत आहे. पाकिस्तानात जनसामान्यांनी केवळ आंदोलने वगैरे करावीत मात्र सत्ता भांडवलदार धार्मिक नेत्यांना हाताशी धरून चालवत असतात. तालिबानने लोकल धार्मिक नेते आणि भांडवलदार दोघांवरही हल्ले सुरू केल्यावर पाकिस्तान पाहुण्याच्या हातून साप मारू पाहत आहे.
दुसरीकडे ड्रोन हल्ल्यांविरूद्ध बोलत रहाणे नुसते जनतेची मागणी असती तर ती कितपत पूर्ण झाली असती शंकाच आहे. माझ्यामते समजा उद्या अमेरिका निघून गेल्यावर येनकेनप्रकारेण तलिबान्यांनी अफगाणिस्तान पुन्हा कब्जावले तर आपली पोळी भाजून घेता येईल म्हणून पाकिस्तान ड्रोन हल्ल्यांविरूद्ध मैखिक निषेध व्यक्त करत राहणारच
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!