दलित चळवळ आजची
दिव्यमराठी या दैनिकात आज प्रकाशीत झालेला , 'दलित
नेतृत्वाचा झुगाड' हा माझा लेख.
6 डिसेंबर, 14 एप्रिल वा 14 ऑक्टोबर आणि कार्यकर्त्यांनी याद दिलवलाच, तर संविधान दिन किंवा पुणे करार दिवस! या दिवशी आंबेडकरी जनतेला आंबेडकरी जनतेच्या नेतृत्वाकडून (?) डरकाळ्या ऐकण्याची सवय झाली आहेच. लेटेस्ट डरकाळी रामदास आठवलेंनी नुकतीच फोडली आहे. हो, तेच रामदासभाई जे दाक्षिणात्य चित्रपटातल्या नायक-खलनायकाप्रमाणे तडक-भडक कपडे घालतात. गचाळ शायरी ऐकवतात. निव्वळ आंबेडकरी जनतेला नॉन आंबेडकरी जनतेसमोर तोंड दाखवता येऊ नये, अशी जहरी लाज आणतात. आता याच आठवलेंनी अलीकडेच ठाणे येथे ऑस्ट्रेलियन बालांचा नाच ठेवून सेनेच्या मायकल जॅक्सन नाच प्रकरणाला अनैतिक मूक आणि लज्जास्पद सहमती दर्शवली आहे. जातीसाठी माती खाणार्या समाजाची भावनिक नाडी धरून, आठवले वा प्रकाशराव आंबेडकर वा जोगेंद्र कवाडे-गंगाधर गाडे, अजून पटापट नावे याद येऊ नये, एवढे गटधारी नेते आंबेडकरी जनतेच्या भावनेशी 'गंमत बहादूर' खेळ खेळत आहेत आणि भाजप-शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या खेळाचा मनमुराद आनंद घेताहेत. या सर्व परिस्थितीला जबाबदार ठरणारे घटक तपासणे फार महत्त्वाचे आहे. रिपब्लिकन पक्षाच्या र्हासाची कारणे ही नुसतीच नेतृत्वातील फाटाफूट आणि गटबाजी यात नाहीत. पक्षातील फूट, गटबाजी हे प्रकार इथे बर्याच वेळा झालेले आहेत; पण त्या पक्षाचा र्हास झालेला नाही. सत्ताधारी काँग्रेस पक्ष, जनसंघ, भाजप, कम्युनिस्ट, समाजवादी सर्व पक्ष याला अपवाद ठरलेले नाहीत. स्वातंत्र्यानंतर पं. नेहरूंच्या नेतृत्वाला अनेक ज्येष्ठ नेत्यांनी विरोध केल्याची उदाहरणे आहेत. 1951मध्ये आचार्य कृपलानी, एन. जी. रंगा यांनी स्वत:चे पक्ष स्थापन केले. 1956मध्ये चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला. इंदिरा गांधींना विरोध करून कामराज, बिजू पटनाईक, चेन्ना रेड्डी, जगजीवन राम, शरद पवार यांनी पक्ष स्थापन केल्याची उदाहरणे आहेत. राजीव गांधींना विरोध करून प्रणव मुखर्जी, व्ही. पी. सिंग यांनी पक्ष स्थापन केले. प्रादेशिक पक्षांत चिक्कार फाटाफुटी झाल्या; पण हे पक्ष संपले नाहीत. आरपीआय का संपल्यासारखा झाला? एक नगरसेवक निवडून येण्याची मारामार का झाली? याला बर्याच प्रमाणात जबाबदार ठरलेय, ते आंबेडकरी नेत्यांचं वर्तन आणि पक्षाचा बेस असलेले 'आंबेडकरी तत्त्वज्ञान' जनतेमध्ये रुजविण्यास या दिव्य नेत्यांना आलेले अपयश. अवघी आंबेडकरी जनता म्हणजेच, फक्त अकोला या धारणेतले प्रकाश आंबेडकर जेव्हा 'आंबेडकरी चळवळ संपली आहे', अशी कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची करणारी गचाळ पुस्तिका लिहितात, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून त्यांच्याविषयी जनतेने बाळगलेल्या आदरभावनेची क्रूर चेष्टा केल्यासारखे वाटते. एरवी, आपापसातील ऐक्याबाबत थेट 'मै बडा की तू बडा? बाबासाहब बाद में बडे!' हे धडधडीत चित्र आंबेडकरी जनतेसमोर ठेवण्यास या नेत्यांना काहीच वाटत नाही. मुळातच 'बुडत्याचा पाय खोलात' असलेल्या शिवसेनेच्या आडोशाला गेलेले आठवले राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे संबंध तपासून पाहण्याची तसदी घेत नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वैरदाव्यात एकमेकांना चेचायला शिवसेनेचा वापर दोन्ही काँग्रेस पुरातन काळापासून करत आलेल्या आहेत. यातच दोघांचं भांडण, तिसर्याचा लाभ, या नेमाने लाभार्थी ठरणारी शिवसेना आपले अस्तित्व (?) टिकवून आहे. आणि त्याच्यात रामदास आठवलेंची उपस्थिती, म्हणजे आयजीच्या जिवावर बायजी उदार! दुसर्या फळीतल्या नेत्यांबरोबर चर्चा करण्याची वेळ रामदासभाईंवर यावी, यातच सगळे आले. शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षाचा मतदार समूह हा थेट बौद्धविरोधी असल्याचे आजवर दिसून आलेले आहे. बौद्धविरोध या नकारात्मक मूल्यांवर भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष (जादा प्रमाणात) एक आहेत. अशातल्या प्रखर जातीयवादी पक्षात समग्र आंबेडकरी जनतेच्या नेतृत्वाचा दावा करणारे आठवले खासदारकीचा जुगाड जमतोय का, ते आजमावत आहेत. याकडे भयानक होकारात्मक (?) नजरेने बघणारे सेना-भाजप त्यांचे काही मुलाखती घेण्यात भलतेच चतुर मुरब्बी पत्रकार संपादक दोस्त, दोनेक मंत्रिपदे, पाच-पंचवीस लाल दिवे आणि ढिगाने नगरसेवक सहजच आंबेडकरी चळवळीच्या दिमतीला बांधून देऊ, असे लालभडक गाजर आरपीआय कार्यकर्त्यांना दाखवत आहेत; परंतु आठवले व इतर युतीइच्छुक गटधारी नेतेमंडळ इथला जुना इतिहास लक्षात घेत नाहीत, आंबेडकरी चळवळ/ पक्ष संपवण्यासाठी बौद्ध विरुद्ध इतर मागासवर्गीय यांच्यात कायम संभ्रम, संशयाचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न इथे फार पूर्वीपासून राजकारणातल्या जाणत्या राजासह अनेकांनी केलेले आहेत. बौद्ध विरुद्ध मातंग, बौद्ध विरुद्ध चर्मकार, बौद्ध विरुद्ध इतर मागासवर्गीय या संघर्षाला इथे खूप पूर्वीपासून खतपाणी घातले गेले आहे. लक्ष्मण ढोबळे, लक्ष्मण माने व रामदास आठवले यांचे व थोरल्या साहेबांच्या जवळिकीचे अंतर तपासले, तर अगदी सहज हा फरक लक्षात येतो. राखीव जागांवर बौद्ध उमेदवार पराभूत व्हावा म्हणून बौद्धेतर उमेदवाराला मतदान करणे, या गोष्टी इथे नव्या नाहीत. आंबेडकरी जात समूहाला एकटे पाडून दडपण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना जोरकसपणे करताना दिसतात.
आंबेडकरी नेतृत्वाने इतर जातीतील कार्यकर्ते-जनता यांच्यापर्यंत अधिक ताकदीने पोहोचून भूमिका मांडणे आवश्यक आहे. पण, दुर्दैवाने दलित नेतृत्व सुखवस्तू जगण्यात मश्गुल आहे. प्रकाश आंबेडकर यांचं फार ठळक उदाहरण इथे देता येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून राष्ट्रीय ओळख असलेले प्रकाश आंबेडकर फक्त अकोल्यातल्या अकोल्यात पोहतात आणि आंबेडकरी चळवळीची काळजी वाहतात. सुरुवातीच्या काळात त्यांच्याबरोबर असलेल्या दशरथ भांडे, नीलम गोºहे यांसारख्या बौद्धेतर सहकार्यांना टिकवून ठेवण्यात त्यांना यश आले नाही. तशी कुठलीच उत्सुकताही त्यांनी दाखवलेली नाही. डॉ. बाबासाहेबांच्या राजकारणाचा वारसा चालविण्याचा दावा करणारे विविध गटधारी नेते, ‘राजकीय सत्ता ही सर्व समस्यांची गुरुकिल्ली आहे’,
असली बाबासाहेबांची निवडक वाक्ये वापरून अभद्र युतीचे लज्जास्पद समर्थन करत आहेत. आंबेडकरी राजकारणाचा बेस ठरणारे सामाजिक कार्य करताना, आज कुठला दलित नेता दिसत नाही. समाजोपयोगी किती संस्थांची निर्मिती. आजच्या नेतृत्वाने केलेली आहे? शिक्षणाचे खासगीकरण करून तांत्रिक, व्यावसायिक उच्चशिक्षणापासून मागासवर्गीयांना दूर ठेवण्याचे प्रयत्न होत असताना डॉ. आंबेडकरांनंतर त्यांच्या वारसासहित इतर कुणाला (मंत्रिपद मिळूनसुद्धा) एक महाविद्यालय काढता आलेले नाही. कंत्राटीकरण, खासगीकरण यातून रोजगाराच्या संधीला मुकत चाललेला. मागासवर्गीय तरुण आजच्या नेत्यांचा विषय होत नाही. हे भयानक कटू वास्तव आहे. खेड्यापाड्यांत दलितांवर होणारे अत्याचार, रोजगार, शिक्षण आणि इतर मूलभूत प्रश्न वगळून सध्याचे दलित नेतृत्व. खासदारकीचे शेखचिल्ली ख्वाब बघण्यात, तर. दुसरीकडे आपल्याच आखीव-रेखीव गढीत चळवळीची काळजी वाहण्याच्या ढोंगात अजगरी स्वस्थता अनुभवत आहे... आता 6 डिसेंबरला खडबडून जागे होऊन थोड्या आशावादी घोषणा, डरकाळ्या ऐकायला येतीलच. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची तोंडाला पाने पुसायची प्राथमिक फेरी 14 एप्रिलला पार पडली आहे. आता निव्वळ दुसरा राऊंड!
sbwaghmare03@gmail.com
दिव्यमराठी 1/12/2013
अत्यंत निआशाजनक चित्र आहे.
अत्यंत निआशाजनक चित्र आहे. नेत्यांना दूषणं देऊन दोष कुणावर तरी थापता येतो. मुळात शिकून सवरून "शहाणे" झालेल्यांचा रोल काय यावर कधीतरी मंथन व्हायला पाहीजे. रस्त्यावर उअतरणारी जनता ही अडाणी, अशिक्षित, झोपडपट्टीत राहणारी असते. तिच्यामुळेच चळवळ जिवंत आहे.. चटकेही याच जनतेला बसतात. या जनतेचं प्रबोधन करू शकतील अशांनी काय केलंय हा संशोधनाचा विषय आहे.
http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/
राजकारण
राजकारणातून स्वर्ग साधता येतो असं गृहितक ह्यामागे दिसतं.
सत्ता उद्या दलित नेत्यांच्या हाती गेली म्हणून/गेली तर दलित जनतेचं भलं होइल ह्यावर माझा विश्वास नाही.
जगात एका मर्यादेपलीकडे कुणीच कुणाचं भलं करु शकत नाही.
प्राप्त परिस्थितीत अधिकाधिक शिकणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे, स्वतःची प्रगती पाहणे व
स्वतःचा स्वार्थ साधणे(इथे स्वार्थ हा शब्द +ve कनोटेशनमध्ये, चांगल्या अर्थाने , "उन्नती" ह्या अर्थच्छटेने वापरला आहे)
हा अनुकरणीय व प्रॅक्टिकल मार्ग वाटतो.
सत्ता मिळेपर्यंत किंवा राजकीय एकीकरण होइपर्यंत एखाद्या दलित व्यक्तीनं स्वतःची उन्नती होण्याची वाट पाहू नये.
सध्या ज्या काही शासकीय योजना आहेत, फायदे आहेत त्यांची माहिती करुन घ्यावी. व रास्त मार्गाने आपला प्रभाव वाढवावा.
दलित चेंबर ऑफ कॉमर्स बद्दल परवाच ऐकलं की ह्यांची वार्षिक उलाढाल कैक शे कोटी रुपयांच्या पलीकडे पोचली आहे.
ह्यातील बहुतांश लोक त्यांच्या घरातील्/खान्दानातील पहिलेच उद्योजक आहेत; first generation enterprenuers.
अत्यंत आनंदाची बाब आहे. अवघड परिस्थितीतील सर्वांनीच आदर्श समोर ठेवावा असे हे उदाहरण आहे.
सरकारी,प्रशासकीय बाबतीतलही माहिती कोणाकडे असेल तर त्याने इथे मांडावी.
एकूण वाईट परिस्थिती भोगणार्यांनी बौद्ध- बौद्ध्देतर विचार का करावा हे समजत नाही.
सगळ्यांची एकत्रित वज्रमूठ अधिक जोरकस असणार नाही का.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
समकालीन विश्लेषण आवडले पण..
समकालीन विश्लेषण आवडले
पण.. एक शंका काँग्रेसला का वगळलेय हे ही समजून घ्यायला आवडेल? (हा प्रश्न प्रामाणिक आहे. इतर पक्षांप्रमाणेच काँग्रेसनेही आंबेडकरी चळवळीला पूरक असे फार काही केल्याचे (किमान मला) दिसलेले नाही.)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
शिक्षणाचे खासगीकरण करून
या विद्यालयात मागासवर्गीयांना दूर ठेवले जाते का? की जातीसंबंधीत रिझर्वेशन नसते फक्त गुणवत्ता हा निकष असतो? नक्की काय म्हणायचे आहे ते कळले नाही.
गुणवत्ता?
>>जातीसंबंधीत रिझर्वेशन नसते फक्त गुणवत्ता हा निकष असतो?
गुणवत्ता हा निकष नसतो*. त्यांची फी भरता येण्याची ऐपत असणे हा निकष असतो.
* असे म्हणण्याचे कारण गेल्या काही वर्षांपासून या महाविद्यालयांतून जागा रिकाम्या रहात आहेत. तेव्हा कटऑफ पेक्षा कमी मार्क मिळाले म्हणून अॅडमिशन मिळाली नाही अशी परिस्थिती नसते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
जर "ऐपत" हा निकष असेल तर फक्त
जर "ऐपत" हा निकष असेल तर फक्त मागासवर्गीय तरुण संधीला मुकतात असे म्हणता येत नाही. एकंदर समाजाअतील सर्वच आर्थिकदृष्ट्या निम्नवर्गीय घटक मुकतात. मग हा मुद्दा फक्त दलीत चळवळीपुरता रहात नाही.
(लेख प्रसिद्ध केला होता
(लेख प्रसिद्ध केला होता तेव्हा वृत्तपत्राच्या कॉलमप्रमाणे उभट दिसत होता, ते सुधारून संस्थळावर अधिक वाचनीय दिसेल अशा फॉर्मॅटमध्ये बदलला आहे.)
दलित चळवळीविषयी सतीश वाघमारे यांच्याकडून लेखन येईल याची बराच काळ वाट बघत होतो. सुरूवात तर छान झालेली आहे. चळवळीचं नेतृत्व करणारा आरपीआय हा पक्ष एक पक्ष म्हणून का संपला याचं थोडक्यात विवरण या लेखात केलेलं आहे.
'नेतृत्वाची चळवळीशी असलेली नाळ तुटली आणि नेतृत्व केवळ भूतकाळाच्या वारशावर, आणि मर्यादित अवकाशात जगतं आहे. चळवळ यशस्वी होण्यासाठी लागणारा तळागाळातल्या पाठिंब्यापेक्षा एके काळी असलेल्या प्रतिष्ठेवर आत्ता राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. ग्रासरूट पातळीवर जे चालू आहे त्याच्याशी संबंध नसल्यामुळे अर्थातच हा फायदा काही मिळत नाही' हा संदेश मिळतो.
पुढचे प्रश्न येतात ते म्हणजे दलित चळवळ आजच्या काळात आवश्यक आहे का? असल्यास तीस वर्षांपूर्वी, सत्तर वर्षांपूर्वी जी ध्येयं होती त्यापेक्षा वेगळी काय ध्येयं असायला हवी? किंवा आजच्या काळासाठी तिचं स्वरूप कशा पद्धतीने बदलायला हवं? या विषयांवरही वाचायला आवडेल.
फाटाफूट होऊनही कॉंग्रेस,
फाटाफूट होऊनही कॉंग्रेस, शिवसेना, इत्यादी आणि त्यांचे तुकडे हे का टिकले असावेत याबद्दल एक तर्क आहे. या सगळ्यांकडे काही प्रमाणात सत्ता आली. या पक्षांना स्थैर्य मिळवण्यात या सत्तास्थानांचा बराच फायदा झाला. रिपब्लिकन पक्षाला असं काहीच कधी मिळालं नाही. तुम्ही लिहील्याप्रमाणेच आठवलेंना खासदारकीसाठीही मिन्नतवारी करावी लागते. असं असताना बाकीचे लोक, कार्यकर्ते टिकून रहाणं कठीण वाटतं. विशेषतः १९९१ नंतर बदलती आर्थिक व्यवस्था, मूल्य यानंतर पुढे आलेली पिढी.
वाघमारे दलित चळवळीशी संबंधित असल्यामुळे त्यांच्याकडून सद्यस्थितीबद्दल वाचणं रंजक आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सतीशजीसविस्तर
सतीशजी
सविस्तर लिहीतोय.
आपल्या कार्याबद्दल मला आदर आहे. आपल्याविषयी आणि आपण ज्या कळकळीने लिखाण केलं आहे त्याबद्दलही आदर आहे.
दलित चळवळ ही फक्त डॉ बाबासाहेबांच्या नावाभोवती फिरते असं म्हटलं जायचं. पण आज ती नेमकी कुणाभोवती फिरते हा नवा प्रश्न आहे. कारण एकखांबी नेतृत्व तयार झालं नाही. डॉ बाबासाहेबांच्या नेतृत्वाची उंची उत्तुंग अशीच होती. ज्या समाजासाठी ते लढत होते तो अंधःकारातून आलेला. साहजिकच चळवळ जिवंत ठेवण्यासाठी पुढं काय हा प्रश्न त्यांना पडला असेल. त्यांच्यासमोर कुठलं नाव होतं का ?
अशी परिस्थिती जवळजवळ सर्वच आंदोलनांमध्ये येते. शिवसेनेत देखील घडणा-या घडामोडी आपण पाहतोय. पण एक फरक लक्षात ठेवायला हवा कि किमान स्वार्थ सर्वांना कळतो. इतर कुठल्याही आंदोलनात लोक भावनेच्या लाटेवर स्वार होत नाहीत जे दलित चळवळीत होतं. इथं नेत्यांचीही पंचाईत होते. एकमेकांचे पत्ते कट करायला भाषणांमधे सर्वच जण आदर्शवादाचे दाखले देतात त्यामुळे जनता त्यातच अडकून पडते. साहजिकच दाखले देणारा नंतर कधीही व्यवहारी भूमिका घेऊ शकत नाही. एकेकाळी रिपब्लिकन पक्षाचे उत्तर प्रदेशातून उमेदवार निवडून आले होते. तसंच महाराष्ट्रातही मतांची टक्केवारी भरघोस होती. पण आता असं सांगितल जातं कि आरपीआयच्या नेत्यांनी ही चळवळ काँग्रेसच्या दावणीला बांधली. इथून पुढे आरपीआयच्या जनतेला काँग्रेसला मत द्यायची सवय लावली गेली. काँग्रेसचं राजकारण सरळ आहे. ज्यांना ते गृहीत धरतात त्यांना लग्नाच्या बायकोसारखं वागवतात. पण कितीही नालाञक नवरा असेल तरी बायकोला दिवाळीला का होईना साडी चोळी केली जाते. इथं काँग्रेस लोक्सभेला ४८ जागांवर दलित जनतेची मतं घेते. पण एका जागेवर त्या बदल्यात एक खासदार निवडून आणण्याची जबाबदारी घेत नसेल तर त्यांच्याशी आघाडी करण्यात तरी काय अर्थ आहे ? शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या प्र्यत्नातून रिपब्लिकन ऐक्य झालं तेव्हां काँग्रेसला ४८ पकी ४० जागा मिळाल्या आणि आरपीआयचे चार पैकी चारही उमेदवार निवडून आले. हे ऐक्य पवारांना हवं म्हणून झालं. ते बाहेर पडले कि फाटाफूट झाली. काँग्रेसच्या जागाही ४० वरून २४ वर आल्या. दलित मतांचं काँग्रेसच्या विजयात इतकं महत्व असताना दलित उमेदवारांना त्या प्रमाणात प्रतिनिधित्व तर सोडाच पण ते कसे पडतील याकडे ल़क्ष दिलं जातं.
आगरकरांनी सामाजिक सुधारणा झाल्याशिवाय स्वातंत्र्य नको म्हटलं होतं ते यासाठीच. आरपीआयची ओळख ही "त्यांची" पार्टी अशी असल्याने त्यांचं मत चालतं पण त्यांच्या उमेदवाराल मत दिलं जात नाही. सामाजिक सुधारणा या स्वातंत्र्यानंतर होणं अवघड आहे. कारण स्वातंत्र्यापूर्वी दबलेले सर्वच घटक एकमेकांचं ऐकून घेऊन शकत होते. आता इतरांना बाजूला सारून पुढे जाण्याच्या स्पर्धेत काही शक्तींचं एकत्रीकरण होण्यासाठी आणि काही गटांना बाहेर फेकण्यासाठी जात या शस्त्राचा टोकदार वापर होतोय. आता सामाजिक सुधारणांची निकड कुणाला जाणवत नाही आणि तशी इच्छाशक्तीही दिसत नाही. आदर्श वातावरण संपून स्वार्थाला अनन्यसाधारण महत्व येत असताना दलितांना आणखी "वेगळी" वागणूक मिळत जाईल. जसं स्त्री चे प्रश्न समजण्यासाठी स्त्री असावं लागतं तसंच दलितांच्या बाबतीतही आहे. समाजासमोर हे मांडणारं सामाजिक नेतृत्व आज ना चळवळीत दिसतं ना दलितेतर समाजामधे. एक सुप्त संघर्षाची बारीकशी धार आहे, जिला हवा मिळू नये याची काळजी घेणं गरजेचं आहे.
आता प्रश्न राहतो तो कोंग्रेसच्या दारातून निघून दुसरीकडे गेलं तरी काय फरक पडणार आहे ? इथेही ठेंगाच मिळणार आहे.
निवडून येण्यासाठी विस्कळीत दलित जनतेने आपले मतदारसंघ बनवावेत असा तोडगा यावर आहे. पण लोकशाहीवर विश्वास ठेवायचा तर अशी पाळी कधीही येऊ नये. एक देश म्हणून ते इतरांनाही लज्जास्पद असेल. अॅड प्रकाश आंबेडकर यांच्यासारखा महाराष्ट्राच्या जनतेचं सूक्ष्म ज्ञान असणारा आणि सुसंस्कृत नेता उद्या पुण्यातूनही निवडून आला पाहीजे. पण असं होणार नाही हे वास्तव आहे. हे वास्तव पचवणं आणि यावर विचार विनिमय करणं यासाठी जनतेचं प्रबोधन करायला नेते कशाला हवेत ? राजकारणबाह्य फोरम उभा राहीला तर राकजारण्यांवर तो अंकुश राहणार नाही का ? नेमक्या याच अंकुशाचा अभाव असल्याने निर्माण झालेल्या पोकळीत कुणीही नेतृत्व देऊ पाहतो. तिथे लायक लोक कसे येतील हे पाहण्याची आज काय यंत्रणा आहे दलित समाजाकडे ? दलितांबरोबरच इतरांनाही आवश्यकता वाटल्यास यावर चिंतन करता येऊ शकेल.
पुणे कराराचा उल्लेख झालाच आहे तर गेल्या काही वर्षात यावर तुफान उलटसुलत चर्चा चालू आहे. यावर सुरुवातीला जी मतं होती ती जाणिवपूर्वक पसरवल्या गेलेल्या चुकीच्या माहीतीच्या आधारे होती असं लक्षात येतं. ज्या बाबासाहेबांनी काळजीने इंगलंडला जाऊन जिवाचं रान करून दलितांसाठी विशेष हक्क मिळवले त्यांचं त्याबाबतीत काहीच मंथन नसेल का ? हे हक्क सोडावेत म्हणून गांधीजींनी उपोषण का केलं ? बाबासाहेबांना पुणे करार करावा लागला. यावर काँग्रेसदार्जिण्या दलितांचं म्हणणं पटत नाही. आजच्या परिस्थितीत बाबासाहेबांचे विचार हेच दूर दृष्टीचे होते. स्वतंत्र मतदारसंघाशिवाय निव्वळ दलितांच्या प्रश्नावर उमेदवार निवडून येणे शक्य नाही हे त्यांना त्यावेळी वाटलेलं आजही खरं आहे. त्याच वेळी राजकिय राखीव जागांचा दलितांना काहीही फायदा होणार नाही हे ओळखून बाबासाहेबांनी त्या दहा वर्षांनी बंद कराव्यात असं सुचवलं होतं. त्यावर काँग्रेसने दर दहा वर्षांनी आढावा घेण्यात यावा अशी दुरुस्ती केली. या जागांचा फायदा काँग्रेसलाच झाला. कारण राखीव जागेवरच्या उमेदवाराला इतर उमेदवारही मतदान करीत असल्याने फक्त दलितांचे प्रश्न घेऊन तो निवडणूक लढऊ शकत नाही.
दलित जनतेला करायचंच असेल तर राखीव जागंच्या ऐवजी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करता येईल. तसंच ही मागणी हे एकच ध्येय न ठेवता छोट्या छोट्या निवडणूक विजयांकडे ल़क्ष द्यायला हवे. जिथे नगरसेवक निवडून येतात तिथून त्यांची म्दत घेऊन सकारात्मक काम उभं करता येईल. बरंच काही करता येण्यासारखं आहे. पण त्यासाठी मुळात राजकारणापलिकडे जाऊन विचार करणारी एकजिनसी यंत्रणा किंवा थिंक टँक नको का ? हे काम करू शकणारे कोण आहेत हे आपण जाणतोच. लेखात त्याकडे दुर्लक्ष झाल्यासारखे वाटल्याने हा प्रपंच.
http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/
लेखातली बाकी सारे मते
लेखातली बाकी सारे मते वैयक्तिक मते म्हणून ठिक आहेत. तरीही दलित नेत्यांनी सुखवस्तू जीवन का जगू नये हे कळले नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
+
ऐला. चक्क अरुणजोशींशी सहमत व्हायला लागतंय.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
माझ्या प्रत्येक वाक्याला एका
माझ्या प्रत्येक वाक्याला एका नव्या माणसाले म्हटले आहे असे समजून माझे लेखन वाचा असा सल्ला. मला कोण्या साच्यात घालाल आणि 'असे म्हणणारे लोक साधारणतः असेही म्हणतात '* अशी अप्रोक्ष्झिमेशन्स करू लागलात तर कल्याण झालं समजा.
* हे विकत घेणारांनी हे ही घेतलं अशा जाहिराती असतात तसं
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
माझ्या प्रत्येक वाक्याला एका
सल्ल्याबद्दल (मला दिलेला नसला तरी) आभार!
मात्र आपले इतके प्रतिसाद वाचल्यानंतर - विशेषतः सम्यक धाग्यानंतर - मला (खरंतर कोणालाही) अश्या सल्ल्याची खरेच गरज होती का? असे स्वतःलाच विचारून पाहत आहे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
:)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
पाईक
या धाग्यावर हे अवांतर ठरेल. पण मी (एका आर्थिक धाग्यावर) म्हणालो कि मी साम्यवादी टाईप आहे तर लगेच मी धर्मसंस्थेच्या विरोधात आहे असा अर्थ काढू नये. संपत्ती समान वाटून तत्त्वतः धार्मिक स्वातंत्र्य राज्यसत्ता देऊ शकते. तसे. मी कोणत्याही तत्त्वज्ञानाचा पाईक नाही असे काय ते मला म्हनायचे आहे.
नितिनजींनी महाभारत 'अनुकरणीय' तत्त्व म्हणून काही गोष्टी सांगत नाही असे म्हटले. त्याला मी आक्षेप घेतला व त्यांनी तिथे (सम्यकतेच्या धाग्यात) भाग घ्यायचे सोडून दिले. मला असे म्हणायचे होते महाभारतात मुलाला 'आयुष्यमान भव' असे म्हणतात. नवीबाजूंप्रमाणे ग्रंथात कुठेही तळटीप देऊन असे म्हटले नाही कि फक्त गोष्ट आहे, वास्तविक मुलगा नमस्कारासाठी वाकला कि त्याच्या पाठीत रपाटा घाला. असो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
तरीही दलित नेत्यांनी सुखवस्तू
सुखवस्तु जगले कि चळवळीतील विद्रोह कमी होत असावा म्हणून.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
मश्गुल शब्द विसरलात
अरुण जोशी तुम्ही नेमका मश्गुल शब्द विसरलात. सुखवस्तू जीवन जगणे आणि त्या जगण्यात मश्गुल होणे या भीन्न गोष्टी आहेत.
मान्य.
मान्य.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
लेख आवडला, आणि अनिल
लेख आवडला, आणि अनिल सोनावणेंचा प्रतिसादही. मुळात सध्या दलितांचे प्रश्न दलितांपुरते अडकून पडल्यासारखे वाटतात. त्यातही आम्बेडकरांच्या नावाने भावनिक आवाहन करायची चढाओढ दिसते. पण राजकीय चळवळींनाही छेदून वरती जाऊ शकणारं समाजसुधारणेचं काम किंवा तसा ठोस अजेन्डा घेऊन काम करणारे नेते जवळजवळ दिसतच नाहीत असं का? (मला या विषयातली फारशी माहिती नाही. एक सामान्य वर्तमानपत्रीय वाचक एवढ्याच पातळीवरून बोलते आहे). दलितांच्या अनेक प्रश्नांना दलितेतर समाजाचाही पाठिंबा मिळू शकणारच नाही असं नाही. शिवाय दलितांमधूनही जातीनिहाय सामाजिक जाणीव अजून पूर्ण पुसली गेली नाहीये - अजूनही आपापसात उच्चनीचता पाळतात हे जवळच्या सहकार्यांमधे, मित्रमैत्रिणींमधे अनुभवलं आहे. आगरकरांचंच तत्व (स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा) पुढे ओढून म्हणायचं तर जोपर्यंत समाजाच्या या घटकांमधे अंतर्गत सुधारणा होणार नाहीत तोपर्यंत राजकीय नेतृत्व मिळूनही कितपत फायदा होणार?
सुखवस्तू जीवन जगणे आणि त्या जगण्यात मश्गुल होणे या भीन्न गोष्टी आहेत>> हे वाक्य अगदीच मनापासून पटलं.
या विषयावर आणखीही अशाच उहापोह करणार्या लेखांच्या प्रतीक्षेत!
प्रश्न
आज दलित जनतेच्या आकांक्षा ह्या इतर सर्वसामान्यांसारख्याच आहेत असं म्हणता येईल का? म्हणजे खाजगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरणाचा जो फायदा मराठी मध्यमवर्गानं घेतला आणि आपल्या आयुष्यात जशी भौतिक समृद्धी आणली तशीच ती दलितांनाही हवी आहे असं म्हणता येईल का? आणि त्यासाठी सरकारी कल्याणकारी योजनांचा कसा फायदा मिळेल ह्याचं मार्गदर्शन आणि त्यासाठी मदत ह्यांची त्यांना गरज आहे असं म्हणता येईल का? जर तसं असेल तर दलित नेतृत्व जनतेच्या आकांक्षांपासून तुटलेलं आहे असं म्हणता येईल का? की सवर्णांकडून केले जाणारे अत्याचार आणि नाकारल्या जाणाऱ्या संधी ही दलित समाजाची प्रगती न होण्यामागचं खरं किंवा मुख्य कारण आहे? आणि त्यापासून त्यांचं संरक्षण करण्यात दलित नेतृत्वाची काहीच मदत होत नाही ही खरी समस्या आहे?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
खूप व्यवस्थित हे दोन पक्ष
खूप व्यवस्थित हे दोन पक्ष (सर्वणांचा अन्याय, सरकारी योजनांचा लाभ न मिळणे) मांडले आहेत.
दोन्ही समस्या एकत्र आहेत. दलितांना मध्यमवर्गीय बनायचे असेल तर विरोध नसावा पण जिथे सरकारचा टेकू नसतो तिथे त्यापेक्षा वर चढणे (राजकारण सोडून ) फार अवघड असावे. सवर्णांना आता अन्याय करणे अवघड ही आहे आणि गरजेचेही नसावे. त्यांना लुटण्यासाठी वेगळी कुरणे चिकार मिळाली, दलितांना वेगळे काढून लुटायची गरज नाही.
बाकी दलितांचे हे दोन प्रश्न किती प्रमाणात आहेत याचं उत्तर अवघड आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
पक्षाचा बेस असलेले 'आंबेडकरी तत्त्वज्ञान' जनतेमध्ये रुजविण्यास
प्रणाम, वाघमारे साहेब.
पक्षाचा बेस असलेले 'आंबेडकरी तत्त्वज्ञान' जनतेमध्ये रुजविण्यास या दिव्य नेत्यांना आलेले अपयश
या वा़क्याचा काँटेक्स्ट जरी विचारात घेतला तरी हे वाक्य चूक आहे. 'आंबेडकरी तत्त्वज्ञान' हे गेली अनेक वर्षे रुजवण्यात आलेले आहे. ते जनतेत रुजलेलेच नाही असा विचार मांडणे वस्तुस्थितीस धरून आहे का ? किमान आंबेडकरी जनतेत ते तत्वज्ञान रुजलेले नाही असे म्हणणे (किंवा ध्वनीत करणे) हे मला न पटण्याजोगे आहे.
----
तुम्ही केवळ नेत्यांनाच दोष देत आहात. नेते हे त्याच जनतेमधून निर्माण होतात ज्या जनतेचे ते नेतृत्व करू इच्छितात. जनता परफेक्ट आहे व नेतेच दोषी आहेत असे ध्वनित होतेय तुमच्या लेखामधून.
----
तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा या सगळ्यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे केलेत. सिस्टिम च्या समस्यांसाठी नेहमीच सिस्टीम बाहेरचे जबाबदार असतात का ?
'आंबेडकरी तत्त्वज्ञान' हे
या वाक्याच्या अनुषंगाने मलाही एक प्रश्न आहे. आंबेडकरी तत्त्वज्ञान म्हणजे 'आजवरच्या दलितांना इतर समाजाच्या बरोबरीस येण्यासाठी अधिक प्रामुख्याने संधी देणं गरजेचं आहे' असं मी समजतो. मग खुद्द आंबेडकरांच्याच हातून लिहिलेल्या घटनेत याचा अंतर्भाव आहे. इतकंच नव्हे, तर राखीव जागांतून या बाबतीत विशेष प्रयत्न झालेले आहेत. म्हणजे विचारच नाही, तर आचारही रुजला असं म्हणता येणार नाही का? आणि त्या रुजण्यातून काही गोमटी फळं निर्माण झालेली नाहीत का? माझी समजण्यात चूक झाली असेल तर जरूर सांगा.
वस्तूस्थितीशी सहमत पण काही प्रश्न
मला तुमचा लेखन नेहमीच आवडत…. कांशीराम च्या बसप /बामसेफ आणि मायावतीच्या BSP बद्दल तुमच्याकडून जाणून घ्याची इच्छा आहे
बौद्ध विरुद्ध मातंग, बौद्ध विरुद्ध चर्मकार, बौद्ध विरुद्ध इतर मागासवर्गीय या संघर्षाला इथे खूप पूर्वीपासून खतपाणी घातले गेले आहे.
राखीव जागांवर बौद्ध उमेदवार पराभूत व्हावा म्हणून बौद्धेतर उमेदवाराला मतदान करणे, या गोष्टी इथे नव्या नाहीत.
१०० टक्के सहमत,
पण बौद्धसमाज सुद्धा याला तितकाच जवाबदार नसावा का? सर्वसामावेशकतेच अभाव दिसत नाही का?
मी बघितलेल्या बौद्ध समजातल्या लोकांकडे एकाच प्रकारची पुस्तके बघितली जातात त्या पुस्तकांमध्ये आगरकर , कर्वे, साने गुरुजी, अगदी पु ल देशपांडे यांना सुद्धा (फक्त देशपांडे आडनाव असल्यामुळेच) मनुवादी वैगेरे संबोधल्या जात. द्वेष पेरून त्याच राजकारण केल्या जात?
महात्मा फुले बामन नव्हते नशीब…बौद्ध म्हणवून घेणार्यांनी प्रज्ञा-प्रेम-समता यांचे अर्थ तरी समजावून घ्यावेत असे वाटते. बऱ्याचदा कुठल्या विषयावर discussion केल् असता बाबासाहेबांनी असंच म्हटलेलं आहे इथवर येउन थांबतं?
…खंत वाटते पण मला वाटतं कि अजून अजून किमान दोन तरी पिढ्या तरी जाऊ द्याव्या लागतील…
कांशीराम च्या बसप /बामसेफ आणि
या विषयाची माहिती सर्वांनाच असते. पण सगळे अनुल्लेख करतात असं निरीक्षण आहे. मला रिपब्लिकन पक्षाचं हत्ती हे चिन्ह गायब होऊन उगवता सूर्य मिळाल्याची आठवण आहे. ते का झालं याचं उत्तर कुणीच देऊ शकलं नाही. पुढे अनेक वर्षांनी बहुजन समाज पार्टीची माहीती मिळाली आणि हत्ती हे चिन्ह का गायब झालं याचीही. महाराष्ट्रात दलितांमधे महार हा मोठा समाज आहे. त्याने बसपाला कधीच आपले मानलेले नाही. मला तर वाटतं ज्या पद्धतीने महारांची फसवणूक होते ते पाहता स्वतः लीडरशिप करायच्या भानगडीत न पडता बसपा ला शरण जाणे हे उत्तम असेल. बसपाचा बेस विस्तृत आहे. तसंच जात तोडायची असेल तर स्वतःच्या मनातून जात घालवा हा त्यांचा विचार व्यापक आहे. पण काँग्रेसकडून पैसे घेऊन बसपाला मत म्हणजे भाजपाला मत असा प्रचार केला जात असेल तर बसपा आणि महाराष्ट्रातले दलित यांचं बिनसलेलंच राहणार. उद्या बसपाला सत्ता मिळालीच तर महाराष्ट्रातल्या जनतेची ही कामगिरी त्यांच्या लक्षात राहणार. बसपा काही वाईट पक्ष नाही आणि पुतळे उभारणं हे हास्स्यास्पद असलं तरी इतर पक्ष म्हणजे साधू संत नव्हेत हे लक्षात घ्यायला हवं.
बामसेफ आणि बसपा वेगवेगळं आहे हे त्यानंतर कळालं. दलितांच्या कुठल्याच नेत्यावर बामसेफने जहाल टीका करायची सोडली नाही. त्यामुळं तो वेगळाच प्रकार झालेला आहे. तसंच ज्या कारणांसाठी रिपाई वर टीका केली जाते त्या फुटीपासून ही संघटना पण अस्पृश्य नाही. सध्या बामसेफचेसुद्धा अनेक गट आहेत. सगळेच गट एकमेकांशी कोर्टात भांडतात. बसपा हा मात्र व्यवहारी पक्ष आहे. सुरुवातीच्या जहाल घोषणांचा परिणाम काय होतो हे पाहून, तावून सुलाखून निघालेला आहे. पण दणक्यात वाढदिवस साजरा करणे आणि निधी गोळा करणे या हास्यास्पद गोष्टी असल्याने महाराष्ट्रात जरा कठीणच दिसतंय. सध्या तरी महाराष्ट्रात दलितांचं हित बघेल असा पक्ष दिसत नाही.
स्पष्टच सांगायचं झालं तर जनरलायझेशन कशामुळे होतं हे सांगण्याची आवश्यकता नसावी. परवा चैत्यभूमीवर चार कोटी पुस्तके खपली अशी बातमी आहे. पुल देशपांडे दलितांना माहीत नाहीत हे निरीक्षण अनाकलनीय आहे. पुस्तकाची किंमत हा घटक लक्षात घ्यावा. चळवळीची माहीती प्रत्येक दलिताला असते हा देखील एक गैरसमज आहे. म्हणून अशी माहीतीपर पुस्तकं स्वस्त दरात विकली जातात. इतर अनेक विषयांवरची पुस्तकं वाचनालय किंवा उपलब्ध होतील तिथून वाचली जातात. ही पुस्तकं विकत घेऊन वाचणारे तुलनेने कमी असतील.
पुल देशपांडेंचं नाव निघालंच आहे तर या प्रकारच्या विनोदाच्या शैलीला सरावलेल्या वाचकाला पुलंचे विनोद काहींना आवडू शकत नाहीत हेच झेपणार नाही. बहुजन समाज किंवा दलित समाजातही मोकळं ढाकळं बोलणं रूढ आहे. श्लेष, उपहास पेक्षा थेट बोलणं रूढ आहे. त्यामुळे या समाजात तसेच विनोद जास्त प्रिय आहेत, ज्याला उच्चभ्रू वर्गात असभ्य समजलं जातं. दमा मिरासदार, व्यंकटेश माड्गूळकर, शंकर पाटलांच्या कथाकथनाला गडाबडा लो़ळणारा मनुष्य गच्चीसह झालीच पाहीजेला दाद देईलच असं नाही. दलित समाजात ललित, कादंब-या असं लिखाण क्षमता असूनही कमी होतं याचं कारण म्हणजे समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी लेखनाचा वेळ खर्ची पडतो. ज्यांच्यासमोर इतर कुठलेच प्रश्न नाहीत त्यांचे विषय वेगळे असणार आणि जगणे हीच लढाई असलेल्यांचे विषय वेगळे असणार. महाकवी वामनदादा कर्डक यांना मराठी सिनेमा मधे पुष्कळ ऑफर्स आल्या होत्या. पण काही सिनेमांसाठी गीतलेखन केल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्याचं कारण त्यांच्या लक्षात आलं आणि ते म्हणाले माझी गरज जिथे आहे तिथे माझी लेखणी चालली पाहीजे. स्वतःसाठी, पैसा, प्रसिद्धी यासाठी लेखणी चालली तर माझा आत्मा मला कधीच माफ करणार नाही. त्यानंतर शेवटपर्यंत ते आंबेडकरी जलसे करीत राहीले. त्यांची मुख्य मेडीयाने पुढे कधीच दखल घेतली नाही. अशा प्रकारे आपण देखील मुख्य प्रवाहाच्या नावाखाली समजून उमजून न घेता आपले समाधान होईल अशी वेगळी चूल मांडतोच ना ?
शंकर पाटलांचं नाव आलं म्हणून. हे एक महत्वाचे लेखक होते. पुल, गदिमा, कुस्माग्रज गेले तेव्हां तीन तीन दिवस वर्तमानपत्रांमधे बातम्या, प्रतिक्रिया आलेल्या मी वाचलेल्या आहेत. तसंच पुरवण्या निघाल्या. हे सगळं त्यांच्या लेखनसेवेला साजेसंच होतं. पण शंकर पाटील गेले तेव्हां फक्त द्न कॉमलची बातमी होती. तुम्ही या घटनेकडे कसं पहाल ? अशी तुलना देखील करू नये असंच कुणीही म्हणेल.
दलित समाजाने भोगलेलं आहे त्याची कटुता त्यांच्या मनात आहे. ज्यांना ते भोगायला लागलेलं नाही त्यांनी कटुता शोधण्यात वेळ घालवणे आणि विद्रोहाला उत्तरासाठी उत्तर देणं हे मनोरंजक आहे. या कटुतेसहीत समजावून घेणारे लोक असतात त्यांच्यामुळे ती कमी होते. झालेली आहे.
इतर मुद्यांशी सहमत आहे.
http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/
प्रतिसादाबद्दल धन्यवाद …
धन्यवाद
हा प्रतिसाद संपादीत करता येत
हा प्रतिसाद संपादीत करता येत नाहीये. इतर ठिकाणी असं होत नाहीये. तरी कृपया प्रतिसाद काढून काढण्यात यावा ही नम्र विनंती.
http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/
माहितीपूर्ण + मार्मिक +
माहितीपूर्ण + मार्मिक + प्रगल्भ अशी श्रेणी देता येत नाही म्हणून हा प्रतिसाद. या प्रतिसादाबद्दल आभार.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
अतिशय माहितीपूर्ण, प्रगल्भ
अतिशय माहितीपूर्ण, प्रगल्भ आणि तर्कशुद्ध प्रतिसाद. अनेक आभार
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!