द लोलॅंड- झुंपा लाहिरि
"मी का वाचते?" या प्रश्नाचं उत्तर नेमकं देता येणं अशक्य आहे. वाचन ही गोष्ट माझ्यात मुरलेली आहे. आज वाचायला वेळ नाही. आधाश्यासारखी घेऊन ठेवलेल्या, घ्यायच्या यादीतल्या पुस्तकांची संख्या फक्त वाढतेय. मध्यंतरी कथा-कादंबर्या वाचणं कमी झालं होतं. आपणं नक्की का वाचतो? याचं उत्तर सापडत नव्हतं. (कामाचा ढीग पडलाय आणि फक्त खिचडी करून मी पुस्तक वाचत बसल्येय किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांमुळे वाचन अर्धवट राहिल्याने " न कळवता कसे काय येतात?" हया माझ्या त्राग्याला सामोरं जाताना माझ्या नवर्याच्या चेहेर्यावर हा प्रश्न उमटलेला मी पाहिलायं .) अनेक स्मार्ट लोकांनी "माझा सगळा गुंता हा माझ्या वाचनाच्या आवडीमुळे आहे. त्यामुळे मी फक्त सेल्फ-हेल्प बुक्स वाचली पाहीजेत" या विचारांचं कलम माझ्या आवडीवर बेमालूमपणे केलं होतं. त्यामुळे "द लोलॅंड" हातात घेतलं तेव्हा ते पुर्ण करेन असं वाटलं नव्ह्तं. त्यातून "सुटेबल बॉय" न आवडल्याने, "गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज" च्या चित्रमय शैलीची भुरळ पडूनही ते पुर्ण न केल्याने , परदेशस्थ भारतीयांच्या पुस्तकाबद्द्ल थोडी अढी मनात बाळगूनच हे पुस्तक वाचायला घेतलं. पण हे पुस्तक मला आवडलं.
नक्षलवादाच्या पार्श्वभूमीवरची , नात्यातले गुंते सांगणारी ही कादंबरी. कादंबरीत पात्रांची अवाजवी भरती नाही. लांबलचक भाषणं, स्वभाव उलगडणारी निवेदनं नाहीत. एक प्रकारची अलिप्त निवेदनशैली ह्या कादंबरिच्या पात्रांना उठाव देते. कलकत्यातील तोलिगंज हे उपनगर. नुकतचं स्वातंत्र्य मिळालयं. पण ते म्हणजे फक्त सत्तांतर आहे , असं मानणारी आणि शेतकरी, मजूर आणि गरिब वर्गांच्या उठावानेच भारताचं स्वातंत्र्य सुफळ संपूर्ण होईल अश्या विचारांची नक्षलवादी चळवळ पाय रोवतेय. ’प्रत्येक भावनाशील तरूण हा मार्क्सवादी असतो’ असं म्हटलं जातं. मग मुळातच भावनाशील असणारया वंग विद्यार्थ्यांना या नक्षलवादाने सहजपणे आपलसं केलं. त्यातलेच दोघं भाउ म्हणजे सुभाष आणि उदय. मात्र सुभाष नेमस्त स्वभावाचा. सर्वहारा वर्गाबद्द्ल सहानुभुती असली तरी शिकून-सवरून आई-वडिलांचं स्वप्न पुर्ण करणं हे मुख्य कर्तव्य मानणारा. तो अमेरिकेत शिकायला गेलाय . त्याच्या या निर्णयावर उदयचा रोष असला तरी भावाबद्द्ल, दोघांनी एकत्र घालवलेल्या दिवसांबद्द्ल त्याच्याही मनात हळवा कोपरा आहे. चळवळीत सक्रिय आहे असं वाटत असतानाच, उदय मित्राच्या बहिणीबरोबर लग्न करून चारचौघांसारखं आयुष्य जगायला लागलाय.
आणि अचानक त्याच्या मृत्यूच्या बातमीमुळे सुभाष परत येतो.
गौरी, सुभाषला फक्त फोटोतून कळलेली सुभाषची बायको. ही आपल्या आईवडिलांना नकोय हे ही त्याला कळतं. अमेरिकेतल्या स्वतंत्र जगण्याची ओळख झालेल्या सुभाषला तिची अवस्था हलवून सोडते. ती गरोदर असल्याने तिला या जाचातून सोडवण्याचा एकमात्र अपाय त्याला दिसतो. तो तिच्याशी लग्न करून तिला अमेरिकेला घेऊन जातो. तिच्या मुलीचं, बेलाचं वडिलपण नुसतचं स्वीकारत नाहे तर मनपासून निभावतो. पण या तडजोडीत गौरि सुखी नाहीय. बेलाला सत्य सांगण्यासाठी सुभाषने दिलेला नकार, जुन्या दिवसांच्या आठवणी या सगळ्यांपासून पळ काढत ती अमेरिकेतच दुसर्या राज्यात नोकरि स्वीकारते. सुभाष मात्र एकट्यावर बेलाची पडलेली जबाबदरी पुर्वीसारखीच निभावत रहातो. आपले आईवडील हे एक नसून दोन अगदी वेगळी व्यक्तीमत्व आहेत हे सत्य फार लहानपणीच उमगलेली बेलाही ह्या सत्याशी जमेल तशी जुळवून घेते. पण याचा परिणाम म्हणून ना ती लग्नबंधनात अडकत की नाही दोघांसारखी चमकदार करियर करत. या तिघांची समजूतदार अबोल नाती, त्यांनी स्वीकारलेल्या जीवनवाटा संमांतर् जात रहातात. त्यावर पडलेली उदयची सावली त्यांच्या निर्णयांना धारदार करतं रहाते.
कादंबरिचा लांब पसारा, तरिही मोजकी पात्र, त्यांच्या स्वभावावर त्रयस्थपणे टाकलेला प्रकाश, कुणालाही नायक, खलनायक ( अगदी नियतीलाही) न ठरवणारं संयत लिखाण हा या कादंबरिचं मला जाणवलेलं वैशिष्ट्य. भाषा नेमकं आणि तेवढंच सांगणारी. कसला आव न आणता सांगण्याची शैली. एखादं लिखाण का आवडावं याचं विश्लेषण करता येईलचं असं नाही. पण विद्याधर पुंड्लीकांच्या कथेतला कर्ण एक वरदान मागतो ते म्हणजे भूतकाळ भविष्यकाळ यांचं ओझं नसलेला एखादा क्षण. कधी कधी वाचनात हरवून जाताना हे असे क्षण भेटतात आणि मग ते लिखाण मला आवडतं. ही कादंबरि आवडण्याचं दुसरं कारण म्हणजे, यातल्या पात्रांना त्यांचे त्यांचे स्वभाव आहेत पण त्यांचे निर्णय , निर्णयाचे परिणाम या सगळ्यांचं जस्टीफिकेशन नाही. उदयच्या सर्व समान असावेत या तत्वाने गौरीला जी समानता , स्वातंत्र्य दिलं नाही ते या कुठल्याही विचारधारेच्या घोळात न अडकलेल्या मात्र अमेरिकन जीवनपद्धतीप्रमाणे दुसर्याच्या निर्णयाचॆ स्वातंत्र्य मानणार्या सुभाषने दिलयं. तरिही हे स्वातंत्र्य तिला सुखी करत नाही, तो मात्र घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ठामपणॆ निभावतो. ही सगळीचं पात्र न बोलता बरचं काही व्यक्त करतात. प्रत्यक पात्राला केंद्रस्थानी ठेवून केलेलं तृतीयपुरुषी निवेदन , प्रत्येक पात्राची बाजू दाखवतं पण कोणाचीही बाजू घेत नाही. नियती आहे पण तिचा अंगावर येणारा खेळही , संयत चित्रणामुळे भडक वाटत नाही.
एकंदरीत कादंबरि वाचून झाल्यावरही मनात रेंगाळत रहाणार्या या लिखाणामुळे झुंपा लाहिरिच्या इतर लिखाणाबद्द्लही माझ्या मनात उत्सुकता जागी झालीय.
प्रतिक्रिया
एका सुंदर पुस्तकाची छान ओळख करून दिलीत....
धन्यवाद
जिथे व्यक्तीपेक्षा विचारांना प्राधान्य तिथेच रहावे.व्यक्तीस्तोम माजले की नाश हा ठरलेलाच.
`आतून' आलेला ...
अंतराआनंद,
`आतून' आलेला हा पुस्तक-परिचय आवडला. आपल्या मनःस्थितीवर बरंच काही अवलंबून असतं हे वाचनालाही लागू होतंच ना! आणि ते छानच व्यक्त झालं आहे सुरुवातीच्याच परिच्छेदातून.
पुस्तकांचे ढीग आजूबाजूला असूनही ती वाचता न येण्याचे दु:ख काय असतं हे स्वानुभवामुळे मी चांगलंच जाणून आहे.
शिवाय तू लिहिलेलं हेही --- "विद्याधर पुंड्लीकांच्या कथेतला कर्ण एक वरदान मागतो ते म्हणजे भूतकाळ भविष्यकाळ यांचं ओझं नसलेला एखादा क्षण. कधी कधी वाचनात हरवून जाताना हे असे क्षण भेटतात आणि मग ते लिखाण मला आवडतं."
अपरिचित व्यक्तीशी नाळ जुळण्यास पुस्तक-प्रेम सहाय्यभूत ठरतं हे पुन्हा एकदा नव्याने अनुभवलं!
परिचय
आवडला. 'द लोलँड' मलाही आवडलं वाचताना - कथानकात काही ठिकाणी किंचित फिल्मीपणा आला आणि अपेक्षेइतपत दोन भावांच्या तत्त्वज्ञानातला फरक रंगवला नाही तरीही.
नेमकं विश्लेषण.
सहमत
असेच म्हणते. लाहिरींच्या शैलीचे अगदी नेमके निरीक्षण आणि वर्णन.
मी अजून ही कादंबरी वाचली नाही. लाहिरींचं "नेमसेक" मला आवडलं होतं, पण "अन् अकस्टम्ड अर्थ" कथासंग्रह वाचल्यावर अमेरिकेका-स्थित कलकत्तेकरांबद्दल वाचून वाचून जाम कंटाळा आला. आता त्याच फॉर्म्युला मधे नक्षलवाद्याचा मसाला मिसळला आहे की काय असा या कादंबरीबद्दल ऐकल्यावर वाटलं होतं. ही ओळख वाचल्यावर वाचायला घेईन असं वाटतं.
(अजून असेच लेख, पुस्तक-ओळखी येऊ द्यात!)
छान. पुस्तक परिचय आवडला.
छान. पुस्तक परिचय आवडला.
धन्यवाद.
प्रतिक्रियांबद्द्ल धन्यवाद.
पुस्तक परिचय आवडला. मूळ
पुस्तक परिचय आवडला.
मूळ पुस्तक वाचले नसल्याने आणखी काही लिहीत नाही.
चांगला परिचय आहे. पुस्तक
चांगला परिचय आहे. पुस्तक वाचावेसे वाटू लागले आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
फक्त पहिला परिच्छेद वाचला
फक्त पहिला परिच्छेद वाचला कारण पुस्तक वाचावे वाटले म्हणून पुढचे वाचायचे टाळले, मूळ पुस्तकातच बाकिचं वाचायची इच्छा आहे
अति अति अवांतर - आणि सध्या माझंही अगदी असंच चाललं आहे, पुस्तकांचा ढीग पडलाय पण वाचन काही केल्या म्हणावं तसं होत नाहीये. मागच्या वर्षाअखेर बर्याच 'ऑफर्स' असल्यामुळे मी ऑनलाईन पुस्तकं घेतली (खालिद हुसैन चं मोउन्ट्न एकोड, काईट रनर) आणि काही दुकानातही जाऊन घेतली, जसं अच्यूत गोडबोलेंच्या गणीती च्या प्रि-ऑर्डर च्या वेळेस अजुन त्यांची दोन पुस्तकं मुसाफिर आणि मनात निम्म्या किमतीत मिळत होती. उचलली मग. पण मुसाफिर चे चार पानं वाचले आणि पुस्तकं तशीच्या तशी पडून आहेत अता. खालिद हुसैन चे दोन्ही पुस्तकं ऑफिस च्या ड्रॉवर मधे तशीच पडून आहेत.... कधी वाचणार मी हे सगळं
घनु, खलिद हुसैनी जरूर वाच.
घनु,
खलिद हुसैनी जरूर वाच. मला "द काइट रनर" आवडले. "थाउजंड स्प्लेन्डीड सन्स" सुद्धा. माझं इंग्लीश वाचन कमी आहे. एखादं पुस्तक मध्येच वाचायचं सोडूनही देते. पण ही पुस्तकं शेवटपर्यंत आवडीने वाचली गेली.
धन्यवाद अंतराआनंद खलिद हुसैनी
धन्यवाद अंतराआनंद खलिद हुसैनी च्या पुस्तकांबद्दल अभिप्राय दिल्या बद्दल! त्याचं काईट रनर तर प्रसिद्ध आहेच त्यामुळे ते वाचायचंच होतं आणि मागे ऐसीवरच कोणीतरी 'माऊन्ट्न एकोड' बद्दल चांगलं लिहीलं होतं. मी नक्कीच लवकर सुरुवात करणार आहे हातातलं मुसाफीर संपलं की
अंतराआनंद,फार छान परिचय.
अंतराआनंद,फार छान परिचय. वाचायच्या यादीत घातले आहे.
तुम्हाला अमिताव घोषचं लेखन आवडेल असं वाटतंय. वाचलं नसेल तर नक्की वाचा.
(जरा वेलांट्यांचं प्रूफरीडिंग केलंत तर अशा छान लेखनाला गालबोट लागणार नाही.)
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
हो. मी आता लेख परत वाचला तर
हो. मी आता लेख परत वाचला तर चुका दिसल्या. बरहाची सवय असल्याने मी barahapad वर लिहून इथे पेस्ट करते .( हे मात्र इथेचं लिहिलयं हे ही सोपय.) यापुढे लक्ष देइन.