मी आणि माझा मित्र जगन
एक गाव होत. इतर गावासारखच बाहेरून सुबक दिसणार पण आतून अस्तव्यस्थ. प्रत्येक गावाला एक चेहरा असतो अस म्हणतात पण मला तो चेहरा कधी जाणवलाच नाही. हि कहाणी आहे माझ्या गावाची, गावाचे नाव अमुक, तमुक गाव काहीतरी समजू. नाही तरी नावात काय असते फक्त एक ओळख.माझ गाव शंभर एक उंबरयाच असाव इतर गावात असतो तसा एक पिंपळाचा पार माझ्या गावात होता, लाईट होती, ग्रामपंचायतीचे ऑफिस होते, शाळाही होती नि चित्रपटात असतात तसे सरपंच नि पाटीलही होते. गावाभोवती वरमाईचा काळा तलाव होता.
ह्या तलावात तीन महिन्यापूर्वी पाटलाचा जगन नि गावातली मैना ह्या दोघांनी जीव दिला होता. दोघांचे प्रेम होते. जगन माझा खास मित्र. माझ्यामुळेच त्याचे नि मैनेचे जुळले होते पण जातीपातीच्या प्रश्नामुळे लग्नाला होकार काही मिळाला नाही. वादावादीला कंटाळून जीव दिला बिचार्यांनी. 'च्यामायला काय देशात जन्माला आलोय. मनाप्रमाणे लग्न करायचेही वांधे' जगन मला नेहमी म्हणायचा.चला जावू द्या मी माझ्या मित्राला मुकलो. संसार सुरु करण्या अगोदरच माझ्या मित्राचा संसार संपला. त्या दोघांनी जीव दिला हि बातमी माझ्यासाठी धक्कादायक होती जीवनावर प्रेम करणारी जगन नि मैना आत्महत्या करू शकतात ह्यावर माझा तरी विश्वासच बसत नव्हता.
परंतु जगरहाटीप्रमाणे मी हि दुखः विसरून आपापल्या कामाला लागलो. मी तीन महिन्यांपूर्वीच जिल्हापरिषदेत नोकरीला लागलो . माझे लग्नही जुळले होते सहा महिन्यांनी माझे लग्न होते. लग्न जसजसे जवळ येवू लागले जगन माझ्या स्वप्नात सारखा येवू लागला. मला शक्यतो स्वप्न पडत नसत नि जरी काही पडली तरी ती लक्षात राहत नसत. परंतु सध्या सतत जगन माझ्या स्वप्नात येवू लागला.मी घाबरलो पण नंतर शांत डोक्याने विचार केला कि जगन माझ्या स्वप्नात येतोय ह्यात नवल कसले आम्ही दोघ जानी दोस्त होतो. पण हि स्वप्न आत्ताच का पडू लागली ह्या विचाराने मला भीती वाटू लागली. लग्नाला अवघे तीन दिवस बाकी होते त्या रात्री मला स्वप्न पडले जगन काकुळतीने म्हणत होता 'सदा मला तलावाच्या पलीकडे भेटायला ये तुझ्या मित्राला तुझी गरज आहे रे. मी स्वप्नातून खडबडून उठलो. माझा भूतयोनीवर विश्वास नव्हता. पण आता जे काही घडतेय ते काय होते. अखेर माझ्या भीतीवर उत्सुकतेने मात मिळवली. मी तलावाच्या पलीकडे जाण्याचा निर्णय घेतला.
तलावाच्या पलीकडे जाण्यासाठी एक छोटासा पूल बांधला होता त्या पुलावरून मी पलीकडे पोहोचलो. पलीकडे सारे जंगल पसरलेले होते.दूर एका वडाच्या झाडा खाली मला एक धुसर आकृती दिसली त्या आकृतीचे डोळे मात्र चमकत होते. मला पाहून ती आकृती वळाली मीही झपाटल्यासारखा त्या आकृतीच्या मागे जावू लागलो किती वेळ चाललो असेल कुणास ठावूक अचानक भानावर आलो नि पाहिले मी घनदाट जंगलात पोहोचलो होतो तिथे निरव शांतता पसरली होती. माझ्या कपाळावर घर्मबिंदू जमा होवू लागले. तेथून दूर पळून जावेसे वाटत होते पण पाय जमिनीला घट्ट चिकटल्यासारखे झाले होते. इतक्यात ओळखीचा आवाज कानी पडला 'सदा, माझ्या मित्रा कसा आहेस'? तो नक्कीच जगनचा आवाज होता मी ओरडलो 'जगन, कुठे आहेस तू'? तितक्यात जगनचि आकृती समोर आली. तो अत्यंत धुसर दिसत होता.त्याची आकृती अस्पष्ट दिसत असली तरी त्याचे डोळे चमकत होते.शरीराचे जागोजागचे मास झडलेले होते.तो म्हणाला 'सदा, घाबरू नकोस. मी आता भूत योनीत आहे असाच दिसणार'. मी एका भूताशी प्रत्यक्ष बोलत होतो ते भूत माझे जिवंत असताना मित्र होते सारे अजब होते.
मी विचारले 'जगन, जीव का रे दिलास'?. जगन म्हणाला, 'जावू दे रे त्या आठवणी.साधी स्वप्न होती रे माझी. लग्न करावे संसार करावा. पण ती काय पूर्ण झाली नाही'. 'मैना, कुठे आहे'? मी विचारले. 'अरे, ती काय तुझ्यामागे उभी आहे'. मी मागे वळून पहिले माझ्यामागे मैनेची धुसर आकृती होती तिचे डोळे मात्र निर्जीव वाटत होते.ती त्या निर्जीव वाटणाऱ्या डोळ्यांनी माझेच निरीक्षण करत होती मी शहारलो..दोन भुतांच्या मध्ये मी उभा होतो.
खर तर जेव्हा मला हा स्वप्नांचा त्रास झाला तेव्हा मी शहरात जावून मानसोपचार तज्ञांना भेटलो होतो. तेव्हा त्यांनी असे सांगितले होते कि तुमचा जवळचा मित्र मेला आहे तो हि अनैसर्गिक अवस्थेत त्याचाच तुम्हाला धक्का बसलाय. तुमच्या मनात भीती बसलीय, भीतीवर उपाय म्हणजे त्या भीतीला सामोरे जाणे त्यामुळे खर तर मी इथे आलो होतो.भुताखेतांवर माझा विश्वास नव्हता इथे येवून भूत दिसेल हि माझी मुळीच अपेक्षा नव्हती पण ह्या अपेक्षेला तडा गेला होता . इथे जगन नि मैनाचे भूत खरेच दिसले होते.
मी जगनला विचारले 'तू इथे दिवस कसा घालवतोस'? तेव्हा तो म्हणाला, 'अरे, भूतयोनीत कसला आलाय दिवस नि कसली रात्र! नुसते भटकत राहायचे निरुद्देश'. तुझ्या लग्नाची बोलणी चालू होती तेव्हा मी नि मैना दोघेही तेथे हजर होतो आता बोल'. हे एकूण मी चपापलोच . जगन म्हणाला 'आम्ही भूत सगळ्यांना दिसत नाही पण आम्हाला जेव्हा मनापासून वाटल एखाद्याला दिसावं तेव्हा मात्र आम्ही दिसतो'.मी जगनला म्हटल, 'जगन, तू हल्ली माझ्या स्वप्नात रोज येतोस असे का'? जगन म्हणाला, सदा तू माझा बालमित्र आपण सुखदुखाचे साथी. तू माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे मी नि मैना पळून जावून लग्न करणार शहरात राहणार, हे तुला माहित होत. तो दिवसही तुला ठावूक होता. मग हे माझ्या वडिलांना कस कळल? तूच सांगितल ना'.
'नाही, जगन तुला कोणी सांगितल हे. तुझा काहीतरी गैरसमज होतोय'. मी चाचरत म्हणालो.
'गैरसमज, नाही अजिबात नाही सदा मला पक्क ठावूक आहे कि ते तूच सांगितलेस. आता मला हे कोणी सांगितले ते काही मी तुला सांगणार नाही. पण तुझ्या ह्या मुर्खपणामुळे माझी नि मैनेची हत्या झाली आम्हाला मारून तलावात टाकण्यात आले .
'काय, मी जवळ जवळ किंचाळलोच .अरे, जगन पण तुला मारल कुणी? मी तर फक्त तुझ्या वडिलांना सांगितले होत'.
'हो ,माझ्या बापानी नि त्याच्या गुंडानीच माझी नि मैनेची हत्या केली तेही तुझ्यामुळे' .
'अरे, पण जगन मला काय माहित कि तुझा बाप तुझा जीव घेईल. अरे तोच माझ्याकडे आला होता नि म्हणाला, 'तू आमच्या जगनचा चांगला मित्र तो त्या पोरीच्या नादी लागून कुळ बुडवायला निघालाय त्याच्यावर लक्ष ठेव. महत्वाची बातमी दिलीस तर तुला जिल्हापरिषदेत नोकरी लावीन .नोकरी लागण्याच्या आमिषा पोटी मी तुझी बातमी त्यांना दिली. मला वाटले जस्तीत जास्त तुझे लग्न मोडेल पण वडील आपल्या मुलाची हत्या करतील असे मला वाटले नव्हते रे'.
काळोख पडत चालला होता जगन फिकुटसा हसला. ते हसणे भयाण वाटत होते मी जरा मागे सरकलो तर एक गिळगिळीत स्पर्श झाला. मागे पहिले तर मैना निर्जीव डोळ्यांनी माझ्याकडेच पाहत होती.
जगन म्हणाला 'सदा, अरे कुळाच्या इज्जातीपायी माझ्या बापाने मारले रे मला नि माझ्या मैनेला.आम्हाला संसार करायचा होता रे, ते राहील बाजूला नि भूत बनून निरुद्देश भटकत राहाण आल नशिबी'. मी शरमेने मान खाली घातली नि म्हणालो, 'जगन, मला माफ कर,. जगन म्हणाला, 'अरे, सदा आपली दोस्ती बघ किती पक्की आहे मेलो तरी तुला भेटायला आलो. आम्ही भूत झालो नि तू सुखाने संसार करणार हे बरोबर वाटते का तुला'?. "म्हणजे तुझा विचार काय आहे जगन?' मी थरथरत म्हणालो .जगन गडगडाटी हसला नि म्हणाला, 'सदा, हे वडाच झाड पाहिलस इथे आही दिवसभर बसून असतो. कंटाळा येतो रे फार. विचार आहे हि मोकळी फांदी दिसतेयना ती तुझ्यासाठी ठेवावी'.
'नको, जगन मला माफ कर, मला माफ कर, असे बोलून मी ताडकन उठलो नि पळत सुटलो पण माझ्या लक्षात आले कि माझ्या पायावर माझे नियंत्रण नव्हते कुठली तरी अज्ञात शक्ती मला पळवत होती मी तलावाच्या दिशेनेच पळत होतो पळत पळत मी तलावात शिरलो तलावाचे काळेशार पाणी माझ्या नाका तोंडात जावू लागले मी झपाट्याने हातपाय मारू लागलो पण असहाय अवस्थेत मला तळाशी जावेच लागले.
दुसर्या दिवशी सकाळी मी वडाच्या फांदीवर बसून जगनला शिव्या घालत होतो 'जगन्या, साल्या चांगल लग्न जमल होत, नोकरी लागली होती. सार काही गेल नि भूत बनून उकिरडे फुंकणे नशिबात आल तुझ्यामुळे . अरे भूताळ्या काल रात्रीपासून विचारतोय आता तरी सांग. ती खबर तुझ्या बापाला मी दिली ते तुला कोणी सांगितले त्याचे नाव.
"अरे पण त्याचे नाव एकून आता तू करणार तरी काय? जगन म्हणाला .
' ती फांदी दिसतेय ना चौथी तिच्यावर त्या साल्यासाठी जागा बनवणार'.
प्रतिक्रिया
जमलीय !
जमलीय ! लिहित रहा !
गंमतशीर कथा.
गंमतशीर कथा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
झकास!!!
झकास!!!
आयला लईच ब्येक्कार भूत
आयला लईच ब्येक्कार भूत म्हणायचं
भूतांनी कोपच्यात घेतलं म्हणा की राव
मस्त गोष्ट आहे
मस्त गोष्ट आहे. पट्कन वाचून चट्कन संपली… पण मजा आली!
शेवटच्या वाक्याला फिस्सकन हसु
शेवटच्या वाक्याला फिस्सकन हसु आल.
?!
भुते उकिरडा फुंकतात???
हा हा हा. आवडली.
हा हा हा. आवडली.
:)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
छान गोष्ट
आवडली.
छान आहे कथा. आता चौथ्या
छान आहे कथा.
आता चौथ्या फांदीवर कोण येतय याची उत्सुकता आहे .
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||