एका गुलमोहराची गोष्ट ....

आळसावलेली दुपार, सूर्याच्या भेदक किरणांनी अजूनच काळा पडत जाणारा डांबराचा रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजूला 'टुमदार' बंगल्यांची रांग, ही वस्ती माणसांची कि निव्वळ बंगल्यांची असा प्रश्न पडावा इतकी शांतता. सरळ सरळ आसमंतात गेलेला तो डांबराचा रस्ता आणि त्याच्या शेवटच्या टोकाला उभा असलेला तो… गुलमोहर. एकटाच. ही वस्ती तयार होत होती तेव्हापासून तो तिथेच होता. त्याला आठवतात एकेक गोष्टी. कच्चा रस्ता, पक्की घरं; मग डांबरी रस्ता मग टुमदार बंगले; मग एकदा कुणीतरी त्याच्या अंगाखाली चार बाकडी टाकली. संध्याकाळी त्या बाकड्यांवर चार ज्येष्ठ मंडळी येउन "आमच्यावेळेस असं नव्हतं बुवा" या पालूपदाचे काही राग आवळू लागली. गुलमोहराला याचे काय सोयरसुतक नाही तो आपल्यातच मग्न. पूर्वी त्याच्याशी बोलायला बरेच जण असायचे पण जसजशी बंगल्यांची ओळ वाढत गेली तसतशी ह्याच्या मित्रांची ओळ छोटी होत गेली. आता त्या टुमदार बंगल्यांच्या छोटेखानी गार्डन्समध्ये काही मित्रांना ठेवलंय त्याच्या, बोन्साय करून.

त्याला आठवत राहतात स्थित्यंतरं स्वतःची. ऋतुगणिक बदलत जाणारी रूपं. ग्रीष्मातला फुलून आलेला लालबुंद बहर, वर्षेतली उत्फुल्ल सर आणि मग शेवटी शिशिरातली पानगळ. एक वर्ष, सहा ऋतू, सहा स्थित्यंतरं आणि अविरत फिरणारं एक चक्र. त्याला आठवत राहते फार पूर्वी रस्त्याच्या त्या टोकाला असलेली पांढरीशुभ्र बकुळी. ह्याची लालबुंद बेफाम जवानी आणि तिचं संयत पांढऱंशुभ्रं तारुण्य एकमेकांच्या नकळत एकमेकांकडे ओढलं गेलं. ते दोन ऋतू मनापासून जगलेला तो. त्याच्या बहाराला आगळीच लाली होती दोन वर्षं. वाऱ्यासंग येणाऱ्या तिच्या गंधाने बेफाम व्हायचा तो. त्याच वाऱ्याला कवेत घेऊन आपल्या फांद्यांवरून खेळवायचा. दूरच्या एका टोकावरून बकुळी हे सारं पाहात असायची आणि लाजायची. तो आठवत राहतो असेच काही क्षण…. ती असतानाच्या ऋतूंमधील. आणि मग एका दिवशी रस्त्याच्या त्या टोकाशी चार लोक जमले. त्यांनी हातातल्या कुह्राडिंनी त्याच्या आवडत्या बकुळीवर घाव घातले. तो चवताळला. त्याच्या फांद्यान फांद्या जणू एल्गार करू लागल्या. अर्थातच त्याची तगमग व्यर्थ ठरली. त्याच्या डोळ्यांदेखत त्याची बकुळी नाहीशी झाली. तिच्या अंगावर टोलेजंग बंगला उभा राहिला 'बकुळ निवास' नावाचा. त्या ऋतूमधील त्याची पानगळ सुगंधी होती म्हणतात.

तो आठवत राहतो जगण्यातले असेच काही क्षण ज्यांनी त्याच्या जगण्याची असोशी खेचून नेली. ऋतूचक्र सुरूच राहतं. त्याला स्वतःला संपवता येत नाही. म्हणून तो आजकाल स्वतःतच मग्न असतो. बकुळी गेली तेव्हा त्याला वाटलेलं त्या चार माणसांनी येउन आपलाही जीव घ्यावा. पण त्यांनी तसं केलं नाही. आजूबाजूच्या छोट्या मोठ्या गुलमोहर आणि बकुळींचा जीव घेतला पण ह्याला तसंच ठेवलं. ह्याच्या अंगाखाली चार बाकडी टाकून ह्याचं "उद्यान" केलं.

त्यातल्याच एका बंगल्याच्या गॅलऱीत; एक आजोबा, घड्याळाच्या लंबकासारख्या मागेपुढे होणाऱ्या खुर्चीत बसून दररोज दुपारभर गुलमोहराची गोष्ट ऐकत राहतात. तुम्ही शेजारी बसलात तर क्षणभर तुम्हालाही कळत नाही, आजोबा गोष्ट ऐकतायेत कि सांगतायेत.

-अभिषेक राऊत

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

खुप छान आहे.

त्या टोकाला असलेली पांढरीशुभ्र बकुळी. ह्याची लालबुंद बेफाम जवानी आणि तिचं संयत पांढऱंशुभ्रं तारुण्य एकमेकांच्या नकळत एकमेकांकडे ओढलं गेलं. ते दोन ऋतू मनापासून जगलेला तो. त्याच्या बहाराला आगळीच लाली होती दोन वर्षं. वाऱ्यासंग येणाऱ्या तिच्या गंधाने बेफाम व्हायचा तो. त्याच वाऱ्याला कवेत घेऊन आपल्या फांद्यांवरून खेळवायचा. दूरच्या एका टोकावरून बकुळी हे सारं पाहात असायची आणि लाजायची. तो आठवत राहतो असेच काही क्षण…

त्या ऋतूमधील त्याची पानगळ सुगंधी होती म्हणतात.

सुंदर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवर स्वागत आहे.
छान लेखन. अजून येऊ द्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!