माझी बडोदा डेट
सूचना : शीर्षकात 'डेट' असली तरी व्हॅलेंटाईन स्पर्धेसाठी ह्या धाग्याचा विचार करू नये.
नुकताच काही दिवसांसाठी बडोद्याला जाण्याचा योग आला. त्या भेटीदरम्यानच्या ह्या काही नोंदी. त्या नोंदीच असल्यामुळे त्यात विस्कळीतपणा आहे आणि सुरुवात, मध्य, शेवट वगैरे काही रचनासूत्र नाही. तरीही त्यात काही समान आशयसूत्रं वगैरे सापडली तर तो निव्वळ योगायोग समजावा.
बडोदा विमानतळावर पोहोचताच समोर प्रवासी माहिती केंद्र दिसलं. ‘लिकर लायसन्स मिळेल’ अशी ठळक पाटी केंद्रावर लावलेली होती. ‘ड्राय स्टेट’मध्ये आलेल्या प्रवाशांच्या नशापाण्याची गुजरात शासनाला किती चिंता आहे हे पाहून उर भरून आला, पण गांधीबाबांचं स्मरण करून तो मोह टाळला. शहराचा नकाशा वगैरे मिळाला तर भटकंतीला मदत होईल म्हणून त्या दिशेनं गेलो. दोन बाया तत्परतेनं मदतीला आल्या. त्यांनी नकाशा आणि ठळक टूरिस्टी ठिकाणांचं माहितीपत्रक दिलं. तेवढ्यापुरता मी खूश झालो, पण त्या दोन्ही गोष्टी शून्य उपयोगाच्या होत्या हे नंतर कळलं. तो नकाशा वापरून कुठलंही ठिकाण सापडणं अशक्य होतं. Bird’s Eye view म्हणतात त्या स्केलचा तो नकाशा होता; आणि शिवाय प्रेक्षणीय स्थळांचे इतके मोठे फोटो त्यावर होते की ते ठिकाण सुमारे १० किलोमीटरच्या परिघात कुठेही असू शकलं असतं. शिवाय तेवढा एरिया नकाशावर व्यापल्यामुळे नकाशाची युजेबिलिटी खतरे में आली होती ते वेगळंच.
तर आता एक रिक्षा घेऊन मी इच्छित स्थळी रवाना झालो. बडोद्यातल्या रिक्षा म्हणजे एक वेगळंच प्रकरण आहे. विमानतळावर रिक्षा घेतली की रिक्षावाल्यांची टोळी आपली गटबाजी वापरून अवाच्या सवा भाडं आकारणार, हे गृहीतच होतं. योग्य म्हणून मला सांगण्यात आलेल्या भाड्याच्या तिप्पट भाडं तर द्यायला लागलंच; शिवाय इच्छित स्थळ चांगलंच फेमस असूनही नेमकं ठिकाण गाठण्यासाठी ज्ञानकण टिपण्यासाठीच्या सदैव उत्सुकतेतून केलेली माझी पूर्वतयारी कामी आली. असा अनुभव इतर वेळीही आला. पुष्कळशा रिक्षांचा अवतार इतका टूटाफूटा आणि दयनीय होता, की पुण्यात असली रिक्षा ‘पास’ करायला खूप पैसे चारावे लागत असतील असं वाटून गेलं.
रिक्षातून शहराचं प्रथमदर्शन होऊ लागलं. ते भारतातल्या कोणत्याही ‘स्मॉल टाऊन’इतकंच विद्रूप होतं. जागोजागी खणलेले रस्ते, फूटपाथवरची अतिक्रमणं, वाटेल तसं धावणारं ट्रॅफिक आणि ते आटोक्यात आणायला धडपडणारे ट्रॅफिक पोलीस, चकचकीत होर्डिंग्ज आणि काचेचा दर्शनी भाग असलेल्या इमारती वगैरे. नंतर स्थानिकांशी बोलता असंही कळलं की रस्तेदुरुस्तीची कामं रात्री करण्याची इथे पद्धत नाही, तर भर ट्रॅफिकच्या वेळेतच सगळी कामं केली जातात आणि बिचारे बडोदेकर त्यातूनच आपल्या वाटा शोधतात. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या जुन्या झाडांची फूटपाथच्या कॉन्क्रीटीकरणासाठी आहुती दिल्याची चिन्हं अगदी ताजी होती. त्यामुळे नंतर दुपारी पायी फिरताना उन्हाच्या झळा सहन करत करत जुनं बडोदा कसं असावं ह्याचा शीतळ अंदाज तेवढा करता येत होता.
बडोदा बस स्थानक ही एक (भय)स्वप्नवत जागा होती. हे चकाचक स्थानक एका भव्य पण उदास शॉपिंग सेंटरसारखंच आहे. तिथले दुकानांचे रिकामे भकास गाळे आर्थिक मंदी आहे की काय, अशी शंका उत्पन्न करत होते. तिथे करण्यासारखं फारसं काही नसतानादेखील संध्याकाळी गर्दीगर्दीनं फिरायला येणारे लोक बाहेरच्या ट्रॅफिकपासून आणि गोंगाटा-गोंधळापासून दूर जाण्यासाठी म्हणून तिथे येत असावेत असा अंदाज केला. ढॅणढॅण आवाज करणारा एक बेसुरा बॅन्ड स्थानकात इतका जोरानं वाजत होता की बाहेरचा स्टेशनापासचा ट्रॅफिकचा कलकलाटही त्यापुढे सुसह्य होता. एकंदरीत काय, तर आधुनिक भारतात संध्याकाळची वेळ जरा शांतपणे घालवायची तर सामान्य जनतेला उपलब्ध असणारे पर्याय संकोचतानाच दिसतात. बडोदा त्याही बाबतीत वेगळं वाटलं नाही. (काही सन्माननीय अपवाद वगळता; खाली पाहा.)
इथलं तारुण्य कात्रिन शिर्मानोव्हा नावाच्या रशियन तरुणीसोबत व्हॅलेंटाईनला थिरकायला उत्सुक आहे हेदेखील बडोद्यात पायी फिरून कळलं. इथला व्हॅलेंटाईन एकंदरीत जोरदार असावा असं जागोजागची होर्डिंग्ज पाहता लक्षात आलं. उदा : डीजे शेमलेस मनी, Supersonic Club Nights featuring जोशी (हो जोशीच ते! ऐसीचे जोशी लोकहो - पाहा कुठे चाललेत गुजरातचे जोशी!) वगैरे पाहून इथलं सळसळतं तारुण्य प्रतिगामी लोकांना जुमानत नाही हे जाणवून ऐसीकरांच्या पुरोगामी मनाला सद्गदित वगैरे व्हायला होईल.
सरकारी होर्डिंग्ज चौकाचौकाला विद्रूप करण्यातला आपला वाटा समर्थपणे उचलत होती. शहरभर दिसणाऱ्या स्वाइन फ्लूविषयीच्या होर्डिंगवर एक मुख्यमंत्रीबेन सोडता इतर सगळे चेहरे परदेशी होते. कुणा सरकारी कर्मचाऱ्यानं गूगल इमेज सर्चमधून मिळवलेले कमी रेझोल्यूशनचे डॉक्टर-रुग्ण वगैरेंचे परदेशी चेहरे वापरून ते पिक्सेलाइज्ड भयाण होर्डिंग ‘डिझाइन’ केलं होतं हे उघड होतं. रस्त्यावरच्या अतिक्रमणांमध्ये ‘स्ट्रॉन्ग सोडा’, ‘टकीला’, ‘द्राक्ष बीअर’, ‘फ्रूट बीअर’ विक्रीला असलेलं पाहून कोरड्या राज्यातल्या लोकांची कल्पनाशक्ती मात्र कोरडी नाही हेदेखील जाणवलं.
सयाजीराव गायकवाड विद्यापीठाचं आवार छान आहे. इंडो-सारसेनिक शैलीतल्या जुन्या इमारती देखण्या आहेत. झाडंही पुष्कळ आहेत. त्यामुळे भर दुपारीही वाऱ्याच्या सुखद झुळकी येत होत्या आणि फिरायला मस्त वाटत होतं. रात्री तर सारा परिसर शांत आणि बाहेरच्या शहरी कोलाहलापेक्षा खूपच सुखावह वाटतो. अर्थात, नव्या इमारती मात्र एकजात कुरूप आणि उदासवाण्या आहेत (शेवटी जुनं ते सोनंच - इति प्रतिगामी जंतू). ह्याला अपवाद फाइन आर्ट फॅकल्टीचा. ‘बडोदा ग्रुप’ म्हणून गाजलेले अनेक आधुनिक महत्त्वाचे कलाकार ह्या कलामहाविद्यालयाशी संबंधित होते. गेली काही वर्षं सरकारी हस्तक्षेप आणि इतर भलभलत्या कारणांसाठी ते बातमीचा विषय होत आहे हे खरं, पण आजही नियमित स्वरूपात काही ना काही उपक्रम तिथे चालू असतात. मी गेलो तेव्हा काही समकालीन कलाकारांच्या कोलाजचं एक चांगलं प्रदर्शन चालू होतं. शिवाय, विद्यार्थ्यांचा महोत्सव चालू होता त्यातही अनेक रोचक साइट-स्पेसिफिक इस्टॉलेशन्स वगैरे होती.
बडोदा म्यूझियम ही आणखी एक गंमतीदार जागा आहे. गायकवाडांच्या हौसेनुसार गोळा केलेल्या अनेक वस्तू तिथे मांडलेल्या आहेत. एका व्हेलच्या अजस्र सांगाड्यापासून भैरवाच्या सांगाडारूपी पुराण्या मूर्तीपर्यंत काहीही तिथे पाहायला मिळतं. युरोपातल्या सुप्रसिद्ध चित्रांच्या आणि शिल्पांच्या काही प्रतिकृतीसुद्धा ‘पिक्चर गॅलरी’त पाहायला मिळाल्या. सरकारी अनास्था मात्र सगळीकडे जाणवते. संग्रहालयातली ‘आधुनिक भारतीय कला’, ‘युरोपियन कला’ आणि ‘इस्लामी कला’ दालनं मनुष्यबळाअभावी बंद होती. बहुधा त्यामुळे टर्नर आणि कॉन्स्टेबलसारख्या प्रख्यात ब्रिटिश चित्रकारांची मूळ चित्रं पाहायला मिळाली नाहीत. पाहायला मिळालेल्या चित्रांचं दर्शन अजिबातच सुखद नव्हतं. बऱ्याचशा चित्रांना स्वच्छता आणि रेस्टोरेशनची नितांत गरज आहे. काळपट पडलेली चित्रं आणि दालनातला अंधार ह्यामुळे फारसं काही दिसतच नव्हतं. धुरंधर, सॉलोमन वगैरे ‘बॉम्बे स्कूल’च्या काही सुप्रसिद्ध चित्रकारांची चित्रं संग्रहात आहेत, पण कोणतं चित्र महत्त्वाचं आणि कोणतं नाही, ह्याबद्दल संग्रहालयाच्या व्यवस्थापनाला काहीही माहीत नसावं. त्यामुळे कुठे तरी अंधाऱ्या कोपऱ्यात ती खितपत आहेत.
गायकवाडांच्या लक्ष्मी विलास राजवाड्याच्या आवारातल्या फतेहसिंग संग्रहालयातही असाच काहीसा अनुभव आला. आम्हाला परस्परांमध्ये मराठीत बोलताना ऐकून प्रवेशद्वारापाशी सामान गोळा करणारी गोरी-घारी ठेंगणीठुसकी स्त्री ‘कॅमेरा आणि मोबाईलसुद्धा इथेच ठेवा’ असं मराठीत ठणकावून सांगून गेली. गायकवाडांनी राजा रविवर्म्याला काही मोठी कमिशन्स दिली होती. राजघराण्यातल्या व्यक्तींची व्यक्तिचित्रं आणि काही पौराणिक चित्रं असा हा मोठा खजिना ह्या संग्रहालयात पाहायला मिळतो. त्याचे फोटो बाहेर जाऊ नयेत ह्याची काळजी घेण्यासाठी ही तजवीज असावी. रविवर्म्याची चित्रं सुस्थितीत होती, पण इतर चित्रांची अवस्था वाईट होती. देऊसकर, त्रिंदाद वगैरे प्रख्यात चित्रकारांची चित्रं कुठे तरी सांदीकोपऱ्यांत लावली होती. सर्वात धक्कादायक भाग म्हणजे अनेक चित्रदालनांच्या खिडक्या सताड उघड्या टाकलेल्या होत्या आणि प्रखर सूर्यप्रकाश आत येत होता. चित्रं अंधाऱ्या कोपऱ्यात डांबलेली नसली, तरीही हा मोलाचा ठेवा सूर्यप्रकाशामुळे नक्कीच खराब होत असणार.
वरच्या चित्रानं काही आंबटशौकीनांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं असेल, पण पुरोगामी परंपरेनुसार उर्वरित इतरांचं फिटण्यासाठी हा घ्या आणखी एक दिलखेचक नमुना -
गायकवाडांचा रसिकपणा पाहून अशी खंत मात्र वाटली की असे कलासंग्रह, किंवा विद्यापीठ आणि सयाजीबागेसारखी (स्थानिक नाव : कामाटीबाग) भव्यदिव्य कामं पेशव्यांनी केली असती, तर कदाचित आज पुण्यात शनिवारवाड्याच्या भग्न अवशेषांशिवाय आणखीही काही पाहायला शिल्लक राहिलं असतं. पेशवाईचा काळ मराठेशाहीसाठी अधिक धामधुमीचा होता हे खरं; पण नाटकशाळा आणि तमाशे ह्यांपेक्षा काही इतर छंद पेशव्यांनी करायला हवे होते असं वाटत राहिलं. असा विचार बोलून दाखवताच एका पुरोगामी बडोदेकरानं मला तत्परतेनं ‘तुमच्या आंबेडकरांना बडोद्यात किती त्रास सोसावा लागला’ ह्याची आठवण करून दिली आणि जमिनीवर आणलं (शिंचे पुरोगामी!)
बाकी विद्यापीठातल्या सरकारी कारभाराचे नमुने सांगायचे झाले, तर आणखी एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल. त्यापेक्षा ह्या पुरोगामी टोचणीवरच ही रोजनिशी संपवतो.
प्रतिक्रिया
(No subject)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
वा! आठवड्याभराचा खवचटपणाचा
वा! आठवड्याभराचा खवचटपणाचा कोटा पुरा झाला. विशेषकरून ’पुरोगामी’ या विशेषणाच्या चपखल आणि सढळ हस्ते केलेल्या वापरानं भलतीच मज्जा आणलेली आहे. जंतूंचं असलं(ही) लिखाण वाचायला मजा येते. कृपा करून अधिक लिहीत जाणे, ही विनंती.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
शंका
गायकवाडांचा रसिकपणा पाहून अशी खंत मात्र वाटली की असे कलासंग्रह, किंवा विद्यापीठ आणि सयाजीबागेसारखी (स्थानिक नाव : कामाटीबाग) भव्यदिव्य कामं पेशव्यांनी केली असती, तर कदाचित आज पुण्यात शनिवारवाड्याच्या भग्न अवशेषांशिवाय आणखीही काही पाहायला शिल्लक राहिलं असतं. पेशवाईचा काळ मराठेशाहीसाठी अधिक धामधुमीचा होता हे खरं; पण नाटकशाळा आणि तमाशे ह्यांपेक्षा काही इतर छंद पेशव्यांनी करायला हवे होते असं वाटत राहिलं
ह्यामागच्या भावना समजू शकतो; रास्तही आहेत.
पण बडोद्याचे जे काही कला व इतर क्षेत्रात नाव झालं, ते ब्रिटिश अमलाखाली असताना झालं अशी माझी समजूत आहे.
पुण्याबाहेरच्या संस्थानांशी काही प्रकारे संबंधित असलेले इतर त्रावणकोरचे रविवर्मा काय , किंवा शीख साम्राज्याच्या वारसदारांशी संबंधित, बाम्बा सुदरलॅण्डमुळं भारतात असलेली
अमृता शेरगिल काय ही अगदि मोठ्ठी नावं आहेत; मान्य.
पण हे रुढार्थानं "पेशवाई"चा काळ जो म्हणतो, त्यानंतरच्या काळातले आहेत. ब्रिटिश अमलाखालील आहेत.
"पेशवाई"ला समकालीन गायकवाडांच्या पूर्वजांनीही(दमाजी गायकवाड वगैरे) लढाईत पराक्रम आजवला असेल, पण कलोपासना-कलाश्रय, किंवा अगदि विज्ञान-खगोल- गणित वगैरेचा अभ्यास त्यांच्या स्वतःच्याच भावी पिढ्यांइतकी केला का ?
मला वाटतं तसं नसावं.
अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकातल्या मराठा कॉन्फिडेरसी मधल्या लोकांनी इतकं काही केलं नाही. (अर्थात हे माझ्या अल्प स्वल्प ज्ञानानुसार मह्णण्याचं धाडस करतो आहे; चु भू द्या घ्या.)
पण त्यातील शिल्लक राहिलेल्या संस्थानांमधील काहींनी मात्र बरीच चांगली कामं केली.
(फक्त कलाश्रय दिला इतकच नाही, काही गरजू, होतकरु व केपेबल तरुणांना शिक्षणासाठी साह्य वगैरे. किंवा आरक्षण ही कल्पना छ. शाहूंनी राबवणेसुद्धा त्यातच आले.
निजामानेही उस्मानिया युनिव्हर्सिटीसाठी चांगले काम केले आहे; असे ऐकले.
)
पेशव्यांचे किंवा टिपूचे संस्थान हे सारे करायला शिल्लकच राहिले नाही.
ओडियार घराणे शिल्लक राहिले (टिपुला तिपल्यावर ब्रिटिशांनी पुनर्स्थापना केली.) बडोद्याचे गायकवाड राहिले.
आणि त्यांनी जमेल तितपत हे केले.
.
.
.
म्हणून पेशव्यांनी दुर्लक्ष केले; हे सत्य लपत नाहिच.
पेशव्यांच्याच समकालीन राजपूत जयसिंग जंतर मंतर वगैरे वेधशाळा बांधली.
केवळ लढाई-खंडणी ह्यात अडकून न राहता.
पण तुलना करता समकालीनांशी केली तर बरे राहिल; असे सुचवू इच्छितो.
.
.
.
(हे सर्व शुद्ध ऐकिव माहितीवर आहे; चुका असण्याचा संभव आहे. असल्यास दुरुस्त केल्यास आभारी असेन.
चुकांबद्दल आगाउ माफी मागत आहे.
)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
.
.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
समकालीन
खरं पाहता मुघल काळातही उत्तरेकडे कलाश्रयातून उत्पन्न झालेली लघुचित्रं वगैरे प्रख्यात आहेत. त्यामुळे कोणत्याही काळात राजा आपल्या संपत्तीचा व्यय कशामध्ये करतो असं पाहता यावं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
यप्स
मुघलांची एकूण लिगसी प्रचंड शिल्लक आहे, खानपानापासून ते स्थापत्यशैलीपर्यंत.
त्याबाबतीत ते चॅम्प होते.समकालीन मराठा/पेशवाईतील कोणी तितकी झेप घेतली नाही.
(मराठे राज्पुतांना "रांगडे" म्हणत. पण " मराठे रांगड्या राजपुतांहूनही रांगडे होते" असं म्हणूनच शेजवलकर म्हणतात.)
पण तेच म्हणत आहे.
तुलना समकालीनांशी केल्यावर मर्यादा अधिक स्पश्ट होतील ना.
अगदि युरोपीय किंवा मुघलही चालतील. (त्या काळात युरोपात तर सर्वच क्षेत्रात प्रचंड प्रगती-उलथापालथ सगळच एकसाथ होत होतं. भारत खूपशा बाबतीत निद्रिस्त होता(असा माझा समज आहे).)
दोन वेगळ्या काळातल्यांची तुलना करणं कर्मकठीण.
(त्यातही एकूण समाजरचना, समाजव्यवस्था , प्रशासन व्यवस्था व एकूणच मानवाचं सृष्टीविषयक आकलन - जाणीव ह्यात त्या एकोणीसाव्या शतकात मोठाच बदल होत होता.
त्यामुळे तुलना करणं कठीण होतं, असं मला वाटतं. )
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
निद्रिस्त
रविवर्मा आणि एकंदरीत चित्रकलेला मिळालेला राजाश्रय ही माझी त्या मतापुरती चौकट आहे. कलानिर्मितीचा मुद्दा घेतला तर उर्वरित भारत पेशवेकाळात खूपच सुस्थितीत होता. मेणवलीचा नाना फडणविसांचा वाडा वगैरे पाहिला, किंवा अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले घाट वगैरे पाहिले, तरी सुंदर गोष्टी निर्माण करण्याची क्षमता आणि इच्छा काही प्रमाणात जाणवते. तशी ती काही पेशवेकालीन मंदिरांतही दिसते. पण चित्रकलेपुरतं पाहायचं, तर पेशवाई उर्वरित भारतात काही नावाजलेली वगैरे नव्हती.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
या विषयाशी संबंधित एक रोचक
या विषयाशी संबंधित एक रोचक पुस्तक.
मराठा वॉल पेंटिंग्स.
https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Maratha%20Wall%20paintings.pdf
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मुघल काळातही उत्तरेकडे
तेंव्हा ते रजपुत राजे मुघलांचे मांडलीक होते त्यामुळे युद्ध, लढाया वगैरे करायला लागत नव्हत्या.
आणि पेशवे कुठले राजे हो, राजे सातारकर छत्रपती.
माहिती बद्दल धन्यवाद.
माहिती बद्दल धन्यवाद. मोदी-लाटेमुळे बडोदा काय आणि एकंदरीत गुजरात काय, गुजरात बद्दल सगळं कसं गुडी-गूडी च ऐकायला मिळतं, त्यात अशी ही दुसरी बाजू वाचायला मिळाल्याने 'घरो घरी ...' चा फिल आल्याने बरं वाटलं (अघोरी आनंद, दुसरं काय).
मागच्या ऑगस्टात बडोद्याला जाण्याचा योग आला पण केवळ एका दिवसाची ट्रिप असल्याने फार काही पहावयास मिळाले नाही. त्यातही ते तलावात मोठ्ठा शंकर असलेलं ठिकाण आणि त्याच्या बाजूला असलेला बाजार् आणि कोर्ट हे पहायला मिळालं (साखरपुड्या साठी ज्या कार्यालयात गेलो होतो ते तिथून जवळ होतं म्हणून). थोडसं जून्या पुण्यात फिरतोय असं वाटलं. तो जो बाजार होता त्याच्या बोळींमधुन फिरतांना तर निव्वळ तुळशी बाग-लक्ष्मीरोड फिरतोय असंच वाट्लं. पण उन्ह, तोबा-तोबा, मुंबई च उन्ह/गर्मास बरं असं वाटायला लागलं. त्वचेला फाडून किरणं आत घुसताहेत असं वाटत होतं नी दमट पणा होताच सोबतीला. १-२ किमी अंतर चालतानाही अशक्य थकायला झालं. ऑगस्ट मधे हे तर ऐन उन्हाळ्यात काय होत असेल तिथे? विचारही नकोच ब्वा.
लेखाचा सारांश जर काढायचा
लेखाचा सारांश जर काढायचा तर
१. मोदीने गुजरात ला गाळात घातला आहे. १९९७ पर्यंत बडोदा म्हणजे आमच्या मेलबॉर्न किंवा माँट्रीअल च्या तोडीचे शहर होते.
२. मोदींनी मुद्दाम उपहास करण्यासाठी "लिकर मिळेल" अशी ठळक पाटी लावली. मोदींना साधा मॅप पण तयार करता येत नाहीत तर ते देश काय चालवणार?
३. मोदींनी बडोदा अगदी बिहार मधल्या गया किंवा झारखंड मधल्या धनबाद च्या लेव्हल ला नेवुन ठेवले आहे.
४. बडोद्याला जर पुन्हा मेलबॉर्न किंवा माँट्रीअल च्या तोडीचे बनवायचे असेल तर मुलायम समाजवादी पक्षाला तिथे सरकार करायला सांगायला पाहीजे. जमलेच तर कुमार सप्तर्षींना* मुख्यमंत्री केले पाहीजे आणि केतकर साहेबांना अर्थ मंत्री.
* : समहाऊ मला जीवंत असलेल्या सेक्युलर समाजवाद्यांची नावे आठवे ना. सर्व मार्क्स कडे पोचले की काय?
-----------
पण हेच सांगायला इतक्या मोठ्या आणि फोटो असलेल्या लेखाचा प्रपंच कशाला ते मात्र कळले नाही.
लेखाचा प्रपंच कशाला ते मात्र
काकू, गेल्या काही दिवसांतील तुमचे प्रतिसाद याच सुरातील आहेत.
तेव्हा तुमची ही शंका याच धाग्याबद्दल आहे की एकुणच लेखनाचा प्रपंच लोकं का करतात याबद्दल तुमच्या मनात असमंजस आहे?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
खरे आहे. बर्याच लेखांकडे
खरे आहे. बर्याच लेखांकडे बघुन हे लेख का लिहीले आहेत हा मनापासुन प्रश्न पडतो. ( हा प्रश्न बडोदा पुराणाबद्दल पडला नाही कारण तो जाणुन बुजुन खवचटपणाचा प्रकार आहे आणि त्यामुळे आनंददायी आहे). पण काही लेख बघुन कींवा वाचुन अभिव्यक्तीची इतकी उबळ ( खोकल्याची उबळ ह्या धर्तीवर ) का यावी हा प्रश्न पडतो.
असा प्रश्न पडलेले सध्याचे लेख म्हणजे घासु गुर्जीचा ग्राफ देवुन उत्तर काढा अश्या टाईपचा लेख. नंदा खरेंचा लेख. वीणा प्रकरणावरचे पहील्या २ लेखानंतरचे लेख.
पण तुमच्या हे लक्षात येत नाही की असे बरेच लेख आहे ज्यांच्या बद्दल कसलीच तक्रार नाही. उदा. वाघमार्यांचे २ लेख, तुषारची छोटी पण मस्त कविता. तुमचा स्वताचा भारतीय राजकारणाचा लेख असे अनेक. त्यामुळे मी प्रत्येकच लेखा कडे अश्या नजरेने बघते असे नाही. हे तुम्ही लक्षात घेतले तर माझ्या हेतू बद्दल शंका येणार नाही.
घासु गुर्जींचा नविन धागा आला आहे सेल फोनच्या आकड्याबद्दल. ( http://www.aisiakshare.com/node/3789 )तो बघुन मला माझीच ही प्रतिक्रीया आठवली.
मी जेव्हा आत्मपरिक्षण केलं
मी जेव्हा आत्मपरिक्षण केलं तेव्हा असं निदर्शनास आलं कि वाढलेलं खवचटपण हे वाढलेल्या फ्रस्टेशनचं इंडीकेटर असतं.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बकाल
जरा बर्यापैकी सांस्कृतीक वारसा (ब्रिटीशपूर्व काळात) असलेल्या किंवा पुर्वी संस्थान असणार्या शहरांची/निम-शहरांची अवस्था इतर निम-शहरांच्यामानाने जास्तच बकाल वाटते.
बाकी, लेखाच्या आधीच दोन डिसक्लेमर्स हे लेखकाच्या डिफेन्सीव्ह आणि वाचकांच्या छिद्रान्वेशी वृत्तीचे लक्षण आहे काय?
दोन डिस्क्लेमर्सच कशाला,
दोन डिस्क्लेमर्सच कशाला, लेखात पेरलेली अनेक वाक्यं ही खाजवून खरूज काढण्याची उदाहरणेच आहेत.
(आता नुस्त्या वाय्झेड श्रेण्यांच्याच नव्हे, तर तितक्याच वायझेड प्रतिसादरूपी प्रवचनांच्याही प्रतीक्षेत.)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
फीत पाहिली. बडोद्याच्या
फीत पाहिली. बडोद्याच्या सयाजीरावांनी आंबेडकरांना मदत केली असूनही सामान्य लोकांनी धर्म सांभाळण्याच्या नावाखाली किती कद्रूपणा केला ते पाहता, पेशव्यांनी चित्रांना राजाश्रय दिला असता तर काय मोठे दिवे लावले असते असा प्रश्न पडला.
बडोद्याच्या निमित्ताने एकंदर पेशवाई, भारतातली दृश्यकलांबद्दल असणारी सद्यस्थिती याबद्दल केलेलं आत्मपरीक्षण महत्त्वाचं वाटलं. (त्या सुतावरून मोदीद्वेषाचा स्वर्ग गाठणं विनोदी म्हणावं का करुण?)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पेशव्यांनी चित्रांना राजाश्रय
१. चित्रांना राजाश्रय देणे फार खास नाही
२. चित्रांना राजाश्रय दिलाच नाही
पैकी नक्की काय म्हणायचं आहे ते कळालं नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
नवनीत
लेखात वेगवेगळ्या चित्रकारांचा आणि त्यांच्या चित्रांचा उल्लेख आहे. याशिवाय मूळ लेखातली वाक्यं -
मला या सगळ्याचा एकत्रितपणे लागलेला अर्थ - पेशव्यांनी चित्रकलेला राजाश्रय दिला नाही (दिलाच असेल तर तो अगदी तुटपुंजा होता, ही लेगसी टिकण्याएवढी मोठी नव्हती). बडोद्यात राजघराण्याने ही लेगसी ठेवली.
(बहुदा) 'आहे मनोहर तरी'मध्ये सुनीताबाईंनी शि. द. फडणीस (या चित्रकाराने) केलेली तक्रार लिहिलेली आहे की मराठी लोकांना चित्रभाषा वाचता येत नाही, चित्रकलेबद्दल पुरेशी जाणीव नाही. बडोद्याच्या सयाजीरावांनी आंबेडकरांना मदत केली तरीही जनतेने त्यांना धर्माचा बागुलबुवा दाखवून स्वीकारलं नाही. तशीच समांतर तुलना पेशवे-चित्रकला-मराठी जनता-दृश्यभाषेबद्दल उदासीनता अशी केली.
---
जंतूंच्या पुढच्या प्रतिसादावरून असं समजतं की जातिपाती मोडून काढण्यासाठी आणि प्रत्यक्ष आंबेडकर या कर्तबगार व्यक्तीसाठीही सयाजीरावांनी पुरेसं धैर्य दाखवलं नाही. त्यामुळे माझा प्रश्नच काहीसा अस्थानी ठरतो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
धन्यवाद
.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अभ्यास नसताना कोणत्याही
ही अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी आहे. देवानं ज्याला जितकी बुद्धी, क्षमता दिली आहे त्यापेक्षा जास्त सार्थ, गंभीर नि रोचक कोणी कसे बोलू शकेल?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
''देवाने बुद्धी दिलेली आहे''
''देवाने बुद्धी दिलेली आहे'' असं म्हणून तुम्ही माझ्या नास्तिक भावना दुखावल्या आहेत. तरीही हा तुमचा प्रतिगामीपणा अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर असणार्या विश्वासापोटीच खपवून घेतला जातोय.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
काय राव, दोन दिवसापूर्वीच
काय राव, दोन दिवसापूर्वीच तुम्ही एका धाग्यावर "अरे देवा" म्हणालात. अस्तिकांचा कमंडलू नास्तिकांनी केवळ पाणी पिण्यासाठी वापरावा तसं त्या शब्दाचं उपयोजन आहे असं मी तुमच्यावतीनं जनतेला समजावत होतो. आमचं धर्मांतर झालं आहे नि आम्ही स्वतःस 'ऐसी कंपॅटिबल पुरोगामी' म्हणून उद्घोषित केलं आहे. ऐसीमधे राहून मेघनाशी वैर परवडत नाही. देव वैगेरे शब्द केवल प्लेसहोल्डर्स आहेत इथे.
आमच्या बुद्धीच्या पल्याडलं आम्ही कसं काय लिहू शकतो अशी साधी रास्त विचारणा केली इतकंच.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
का-ही-ही
उदाहरणार्थ, विनोदाने वापरलेलं "अरे देवा" आणि कोणीतरी बुद्धी दिलेली आहे यातला देव हा कर्ता* यांतला फरक तुम्हाला समजला नाही म्हणून तो लिहू नका असा मी आग्रह धरलेला नाही. ज्यांना जे लिहायचं आहे त्यांनी ते लिहावं, मला महारटाळ वाटलं तर मी तसं म्हणेन किंवा म्हणणारही नाही, यात कोणाच्याही अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा प्रश्न येतच नाही; आणि ही गोष्ट तुम्हाला समजली नाही, म्हणून तुम्ही ते लिहू नका असाही आग्रह धरलेला नाही. ते तुम्ही लिहिलेलं आहेच.
*इथे कोणी(ही) कर्ता आहे अशी वाक्यरचनाच माझ्या नास्तिक, विज्ञानवादी भावना दुखावणारी आहे. पण काये ना, मी माझ्या उदारमतवादातून आलेल्या अभिव्यक्तीस्वातंत्र्य या मूल्यानुसार ते खपवून घेते.
माझा उल्लेख 'राव' असा करणं ही गोष्ट माझ्या स्त्रीवादी भावना दुखावणारी आहे, पण पुन्हा उदारमतवाद, अभिव्यक्तीस्वातंत्र्य, इ. इ.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तुमच्या स्त्रीवादाचा,
तुमच्या स्त्रीवादाचा, अभिव्यक्तिस्वातंत्र्यवादाचा आणि इतर अनेक मतवादांचा नितांत आदर करत विनंती करतो कि सर्वनामांचा वापर करणे मलाही शिकवा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
माझा उल्लेख 'राव' असा करणं ही
ठीके रे अदिती. किती ते मनाला लावून घेतोस?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मदत पुरेशी नव्हती
माझ्या पुरोगामी बडोदेकर हितचिंतकाच्या मते सयाजीराव सद्यकालीन जातिवास्तवाच्या बाबतीत फारच अपॉलॉजेटिक निघाले. राजानं मनात आणलं असतं, तर राहण्याची जागा सहज मिळाली असती. राजानं मनात आणलं असतं, तर त्याच्या सेवकांना आंबेडकरांची मानहानी करण्याचं धैर्य झालंच नसतं. पण राजानं हा ठामपणा दाखवला नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
यप्स
त्यापेक्षा शाहू...वेदोक्त....
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
बडोदा
लेख वाचला. तो पूर्वग्रहदूषित आहे असे जाणवण्याइतका एकांगी वाटला. मी बडोद्यांत ७९-८० मधेही राहिलो आहे आणि गेली कित्येक वर्षे कामानिमित्त तिथे जाऊन रहात आहे.जुने बडोदे सोडले(रावपुरा, दांडियाबाजार, वाडी) तर बाकीच्या ठिकाणी एवढी गर्दी नाही. अलकापुरी,अकोटा भागांत सुंदर ईमारती, बागा वगैरे सगळे काही आहे. एकंदरीत शांततेने रहायचे असल्यास, हे शहर अजूनही मुंबई-पुण्यापेक्षा कमी गर्दीचे आहे.
आता रिक्शावाल्यांनी लुटणे, बॅनर्स लावलेली असणे, रस्त्यांत दुरुस्ती कामे असणे वा मिरवणुका निघणे हे प्रकार भारतातल्या कुठल्या शहरांत नाहीत ?
रात्री अपरात्री प्रवास करायलाही स्त्रियांना हे शहर नक्कीच जास्त सुरक्षित आहे. मी मोदींचा समर्थक नाही, पण बडोदा शहराविषयी इतरांचा गैरसमज होऊ नये, म्हणून ही प्रतिक्रिया.
हूँ:! तुमच्यासारख्या
हूँ:! तुमच्यासारख्या प्रतिगाम्यांकडे ती विचारजंती नजरच नाहीये.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ओ भौ, काहीही नका बोलू. एक
ओ भौ, काहीही नका बोलू. एक विंटर डीप्रेशन म्हणून प्रकार असतो. लागले जिथे तिथे पुरोगामी प्रतिगामी करायला.
http://en.wikipedia.org/wiki/Seasonal_affective_disorder
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
धन्यवाद
.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
???
वाचनात अंमळ गोंधळ होतो आहे का? मी 'स्मॉल टाऊन'शी तुलना करून हेच तर म्हणतो आहे की भारतातल्या छोट्या शहरांसारखंच हे एक शहर आहे. हे म्हणणं पूर्वग्रहदूषित आणि एकांगी आहे का?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ती तलावात शंकराची मोठी मूर्ती
ती तलावात शंकराची मोठी मूर्ती असलेला भाग कोणता हो बडोद्यातला?
शंकराची मूर्ति
त्या तलावाला 'सूर सागर' का असंच काही नांव आहे. त्याच्या आसपासच्या भागाला 'न्यायमंदिर' असे म्हणतात. लोकल लोक पूर्वी 'न्यावमंदिर' असा अशुद्ध उच्चार करायचे.
ओह, धन्यवाद माहिती बद्दल.
ओह, धन्यवाद माहिती बद्दल.
लेख आवडला. तरुणाई च्या जागी
लेख आवडला. तरुणाई च्या जागी तारुण्य शब्द वापरल्याबद्दल आभार.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
आता पुढच्या निवडणूकीत
आता पुढच्या निवडणूकीत गुजरातेत आप चे सरकार यायला हवे. भारतीय शहरांत त्याशिवाय बदल होण्याची आशा नाही. ते नाही आले तर काँग्रेसचे यावे म्हणजे किमान एका गलिच्छ जागेची स्वच्छ जागा म्हणून पुण्यकिर्ती होणार नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
तेवढ्यापुरता मी खूश झालो, पण
आयुष्यात पहिल्यांदा नकाशा घेतला असावा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
नम्र नकार
नम्र नकार देऊ इच्छितो. परदेशातली उदाहरणं देण्यात अर्थ नाही, पण गंमत म्हणजे तुमच्या दिल्लीतच विमानतळावर अतिशय उपयुक्त नकाशा मिळाला होता.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ओके ओके. पहिल्यांदी नकाशा
ओके ओके. पहिल्यांदी नकाशा घेतला आणि काही वेळानं उघडून बघितला, असं? मग ओके.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बडोदा बस स्थानक ही एक
शिवाय या स्थानकाला पुण्यातल्या शिवाजीनगर आणि स्वारगेट स्थानकांप्रमाणेच घट्ट झालेल्या मुताचा भयंकर दर्प सर्वत्र येत असावा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
+१स्वारगेट आणि शिवाजीनगर,
+१
स्वारगेट आणि शिवाजीनगर, अशक्य घाणेरडे बस-स्थानक आहेत. स्वारगेट म्हणजे तर अग्गाग्गा .... जगातल्या गलिच्छ बसस्थानकांपैकी एक म्हणावं असं सोबतीला तिथलं ट्राफी़क आणि सतत चालू असलेले बांधकामं (तरीही सुधारणा शुन्य) ह्या मुळे अशक्य गैरसोय... तो पुण्यातला भागच घाणेरडा आहे.
बादवे, हे "घट्ट झालेली मूत" म्हणजे नेमकं काय हो?
पण त्याच्यापुढे अभद्र
पण त्याच्यापुढे अभद्र अस्वस्थ गोंगाटी बडोद्याच्या स्थानकाचा काय पाड?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बादवे, हे "घट्ट झालेली मूत"
समुद्रकिनारा मीठाच्या स्फटिकांनी जसा माखलेला असतो तसे स्थानक युरीयाच्या पिवळसर स्फटिकांत वेष्टिलेले असणे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
ओह, तसं होय...
ओह, तसं होय...
शहरभर दिसणाऱ्या स्वाइन
या वाक्याचा मतितार्थ काय असावा?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अजो - ह्या एका वाक्याचा का?
अजो - ह्या एका वाक्याचा का? पूर्ण लेखाचाच मतितार्थ वर लिहीला आहे.
चिंजंना असं काही म्हणायचं
चिंजंना असं काही म्हणायचं असतं तर त्यांनी तो खवचटपणा अधिक स्पष्टपणे केला असता. ते सत्शील* मोदीविरोधक पुरोगामी आहेत हे खरे पण या लेखात त्याचा काही संबंध नाही.
------------------
* सत्शील हे विशेषण पुरोगामी शब्दासाठी आहे. उगाच तिसरा अर्थ नको. भाषांची सौंदर्ये आणि आम्हाला त्रास.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
शहरभर दिसणाऱ्या स्वाइन
लेखाचा एकूण खवचट टोन लक्षात घेता या वाक्याचा प्राथमिक अर्थ देखिल कळला नाही म्हणून पृच्छा केली. नक्की काय म्हणायचे आहे ते कळेना -
१. होर्डिंग्ज प्रमाणाबाहेर लावू नयेत, मग त्या कशाचा का असेना.
२. स्वाईन फ्लू शिवाय अन्य आजारांची सामाजिक जाणिव महत्त्वाची आहे.
३. गुजरातचे मुख्यमंत्री परदेशी का नाहीत बरे?
४. मुख्यमंत्री इतर मंत्र्यांना (किमान आरोग्य मंत्र्यांना तरी), स्थानिकांना फाट्यावर* मारत आहेत.
५. जगात भारतात गुजरातच्या मुख्यंत्र्यालाच तेवढा स्वाईन फ्लू झाला आहे, अन्य केसेस परदेशी आहेत.
६. परदेशी चेहरे वाईट असतात, होर्डिंगवर नसावेत.
-------------
* शब्दसौजन्य - मेभू.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
शहरभर दिसणाऱ्या स्वाइन
एक ऐसीचा जोशी म्हणून -
आम्ही करतो हो डिजे. फक्त त्याची समीक्षा होऊ नये अशी व्यवस्थित काळजी घेतो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
लेख
लेखातला नर्मविनोद आवडला. एखाद्या गावाला भेट दिल्यानंतर काय काय इंप्रेशन्स पडतात त्याची नोंद - अशा प्रकारचा नमुना वाटला. तो आवडला.
बाकी एखाद्या शहराचा, राज्याचा विकास किती झाला आहे किंवा नाही या गोष्टीचा निर्णय या अशा एका फेरफटक्यात लागू शकत नाहीच. "अरे जा त्या गुजराथमधे. तिकडे स्वर्ग अवतरलाय स्वर्ग" अशा स्वरूपाची विधानं आणि "इथे काहीच विशेष बरं घडलेलं नाही" ही आणि अशी विधानं निव्वळ एकाच ट्रिपमधून आणि ठराविक ठिकाणांच्या टुरिझमवरून काढणं बरोबर नाही. (असा कुठला सूर या लेखात निघाला आहे असं म्हणणं नाही. काही लोक प्रत्यक्ष आयुष्यात तसं बोलले होते त्याची आठवण झाली इतकंच. )
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
ह्या !त्यात काय एवढ ?
ह्या !त्यात काय एवढ ? आमच्या पिंपरी चिंचवड च infrastructure भारी आहे गुजरात पेक्षा . अजित दादा जिंदाबाद .
दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम