उद्दिष्टपूर्ती
वृथा प्रयत्न करणे सोडण्याची योग्य वेळ कोणती?
गेली कित्येक वर्षे आपण Ph D साठी म्हणून संशोधन करत आहात. संशोधन अजूनही पूर्ण न झाल्यामुळे तुमचा गाइड तुमच्यावर भरपूर वैतागला आहे. घरचे सर्व शिव्या देत आहेत. तुम्ही स्वत: इतर कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊ शकत नाही. मौज मजा करू शकत नाही. हे अती झालं म्हणून गाशा गुंडाळण्याचा विचार मनात हजारो वेळा आला असेल. तरीसुद्धा तुम्ही आशा सोडली नाही. इतका वेळ, परिश्रम (व पैसा) यात ओतलात व शेवटच्या क्षणी अशा प्रकारे हार खाणे नामुष्कीचे ठरेल याची तुम्हाला जाणीव आहे. परंतु एके दिवशी Ph D मिळवूनच दाखवीन ही जिद्द तुम्हाला स्वस्थही बसू देत नाही.
जिद्द असणे हे एक चांगले जीवनमूल्य आहे यात शंका नाही. परंतु या मूल्याला नको तितके महत्व दिले जाते हेही तितकेच खरे. जिद्दीने हाती घेतलेले काम काही काळातच कालबाह्य झाले आहे हे लक्षातच येत नाही. त्यामुळे अट्टहासापायी चुकीच्या गोष्टीमागे लागून वेळ व परिश्रम वाया घालवले जातात.
अशा प्रकारच्या तिढ्यातून बाहेर पडण्यासाठी आपण आपल्या उद्धिष्टसाध्यतेसाठी केलेल्या आर्थिक गुंतवणूकीच्या आधारे निर्णय घेणे टाळावे. तुमच्या Ph Dच्या संदर्भातच बोलायचे ठरविल्यास आपण किती फी भरली, किती पुस्तकं विकत घेतली वा या काळात मी किती कमवू शकलो असतो इ.इ. प्रश्न अप्रस्तुत ठरतील. प्रश्नच विचारायचा असल्यास तुमच्या प्राधान्यक्रमांच्या यादीत आजही Ph D मिळवणे सर्वात वर आहे की नाही हा प्रश्न विचारायला हवा. (जेव्हा तुम्ही संशोधनास सुरुवात केली त्यावेळी कुठला अग्रक्रम होता याचाही आता विचार करण्याची गरज नाही.)
दृढनिश्चयाच्या मागे लागणे कितपत योग्य आहे याबद्दल मानसतज्ञ विचार करत आहेत. भिंतीवर डोके आपटण्याचे प्रयत्न वेळीच न सोडल्यास तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता बळावते. अनेक तरुण- तरुणींनी आपली चूक सुधारून वेगळ्या मार्गाने जाण्याचे ठरवल्यानंतर त्यांच्यातील ताणतणाव नाहिश्या झाल्या. एक मात्र खरे की उद्दिष्टपूर्ती अशक्यातली गोष्ट आहे हे कळल्यानंतर त्याची कास सोडण्याचा निर्णय पटकन घेता येऊ शकते. परंतु अशक्यातली की आवाक्यातली हेच कळत नसल्यामुळे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागते. उशीरा निर्णय घेतल्यामुळे मानसिक व शारीरीक दुष्परिणाम भोगावे लागतात. नाते संबंध दुरावतात. आयुष्य नीरस वाटू लागते. अर्ध्या वाटेवरून परतीचा निर्णय घेतला याचा अर्थ तुम्ही loser आहात असे कधीच होत नाही.
अरिस्टॉटलच्या मते कुठलीही गोष्टीचे अती होणे (अती जास्त वा अती कमी असणे) आपल्याला हानिकारक ठरू शकते. दृढनिश्चय हीसुद्धा अशीच गोष्ट आहे. फारच कमी असल्यास तुम्ही कमकुवत ठरवले जाता. जास्त असल्यास दुराग्रहीचा शिक्का बसतो. त्यामुळे जास्तही नको व कमीही नको अशा प्रकारचे संतुलन साधणे गरजेचे ठरते. जुगार खेळताना हातात कुठपर्यंत पानं धरून ठेवावीत व केव्हा ती पानं फेकून द्यावीत यातच खरा शहाणपणा असतो. जुगार खेळणारा नेहमीच आपल्या हातातील पानांचा आढावा घेत असतो. हातातील पानं व जिंकण्यासाठीची रक्कम यांचा मेळ तो घालत असतो. परंतु हेसुद्धा तो सुरुवातीला करत नाही. काही हात खेळल्यानंतर त्याचे विचारचक्र चालू होतात. व त्यानुसार तो निर्णय घेतो. परिस्थितीनुसार त्याची strategy बदलते. नवीन माहिती मिळाली की तो पुनर्विचार करू लागतो. धोका पत्करताना तो किती रक्कम जिंकणार आहे, समोरच्या भिडूच्या हातात कुठली पानं असावीत याचा अंदाज घेत तो खेळात भाग घेतो. आयुष्यातील अनेक प्रश्नांसाठीसुद्धा वर उल्लेख केलेल्या जुगाऱ्याचे उदाहरण तंतोतंत लागू होऊ शकते.
जेव्हा आपण एखादी गोष्ट करण्याचे ठरवतो तेव्हा ती गोष्ट आवाक्यातली असून ती पूर्ण करणे शक्य आहे या भरवश्यावरच ते काम आपण हाती घेतो. परंतु एकदा काम हाती घेतल्यानंतर वास्तव वेगळेच असते. आपले अंदाज चुकीचे ठरतात. काही अडचणी येतात. नेमके काय करावे सुचत नाही. ना धरवत नाही, ना सोडवत नाही अशी वेळ येते. मग आपण कुढत मन मारत काही तरी अघटित घडेल याची प्रतीक्षा करत बसतो. ज्याच्या मागे आपण लागलो आहोत त्यासाठीचे परिश्रम व अपेक्षा वाढतच आहेत याची जाणीव होऊ लागते. योग्य संधी न मिळाल्यामुळे आपण निश्चयापासून डळमळीत होऊ लागतो. हे सर्व करत बसण्यापेक्षा कुटुंबाबरोबर थोडासा वेळ घालवला असता तर बरे झाले असते असे म्हणण्याची पाळी येते.
त्यामुळे वेळीच आढावा घेत, नवीन माहितीचा अंदाज घेत उद्दिष्टपूर्तीसाठी पुनर्विचार करणे गरजेचे ठरते.
मस्त आहे लेख. जुगार्याचं
मस्त आहे लेख. जुगार्याचं उदाहरण तर अगदी पटलं.
संतुलन साधणं कठीण आहे खरं. पण अत्यावश्यकही. धरसोड करण्यात अर्थ नाही, तसाच फायद्यातोट्याचा (फायदा-तोटा केवळ ऐहिक बाबींसाठी लागू होतो असं नाही) विचार बंद करून एकाच ठिकाणी बसून राहण्यातही नाही.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
उद्दिष्ट
जर उद्दिष्ट ही अपेक्षा आहे असे गृहित धरल्यास उद्दिष्ट पुर्ती साठी दृढ निश्चय हा अपेक्षापूर्तीसाठी केलेले प्रयत्न म्हणुन देखील पहाता येईल.
आता कसं मुद्याच बोल्लात.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
संतुलित
संतुलित जगण्याचा विचार मांडणारा संतुलित लेख. अतिशय सोप्या, सरळ भाषेत मुद्द्याला हात घालणारा. उद्दिष्टं म्हणजे नक्की काय? कधीकधी एकच मर्यादित आणि कठीण ध्येय डोळ्यासमोर ठेवलं तर पदरी निराशा पडण्याची शक्यता असते. त्यासाठी व्यापक दृष्टी बाळगून शेवटी आपल्याला जीवनात काय करायचं आहे हा प्रश्न विचारावा लागतो. हे चांगलं सांगितलेलं आहे.
मात्र याच नाण्याची दुसरी बाजू अशी की दगडावरती कपाळ आपटत रहाण्याचं काहीतरी वेड असल्याशिवाय माणसाच्या आयुष्याला तितका अर्थ रहात नाही. जेव्हा लाखो मुलं अनेक वर्षं क्रिकेटचं वेड घेऊन कित्येक महिने त्यात घालवतात तेव्हा एखादा सचिन तेंडुलकर त्यातून निपजतो. त्या वेडापायी, त्या हट्टापायी, त्या ईर्षेपायी जे कष्ट घेतले जातात त्यांची किंमत पैशात करता येत नाही. इज इट बेटर टू हॅव लव्ह्ड ऍंड लॉस्ट दॅन टू नेव्हर हॅव लव्ह्ड... या प्रश्नाचं उत्तर बहुतेक जण होकारार्थी देतील असं वाटतं.
+१
सहमत. विशेषतः दुसर्या परिच्छेदाशी अधिकच.
लोकांनी असे झपाटले जाणे वगैरे खरे तर होउ नये असे वाटते, पण असे होतच असते, होतच राहील असेही वाटते.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
विचार पटले.
माझे आणि लेखातील विचार सारखेच असल्याने पटले. बहुतेक मी फारसा भावनाप्रधान नसल्याने असेल, पण माझे जवळजवळ सगळे महत्त्वाचे निर्णय फायद्या-तोट्याचा विचार करूनच मी घेतो.
घासकडवी म्हणतात तसे वेडापायी मी निर्णय घेतले नाहीतच असं नाही, पण ते निर्णय लेखात म्हणल्याप्रमाणे PhD, भवितव्य इतके महत्त्वाचे नव्हते. (किमान मला तरी असं वाटतं!)
-Nile
योग्य वेळी माघार घेणं यात
योग्य वेळी माघार घेणं यात शहाणपण असतं - फक्त प्रश्न एवढाच आहे की 'योग्य वेळ' कोणती याबाबत कधीच एकमत होत नाही संबधितांच!!
***
अब्द शब्द
अति सर्वत्र वर्जयेत
अति सर्वत्र वर्जयेत! हे तत्त्व साध्या सोप्या उदा.तून नीट सांगितलंय!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!