कश्मिरीयत – एका संकल्पनेचा अस्त
कश्मिरीयत – एका संकल्पनेचा अस्त
मूळ लेखिका - चित्रलेखा झुत्शी
भाषांतर – डॉ. अजेय हर्डीकर
कश्मिरीयत ही संकल्पना आता अस्तित्त्वात नाही हे निश्चित. इतकंच नाही तर तिच्या बरोबरीनं आंतरधर्मीय सुसंवाद, धर्मनिरपेक्षता, आणि काश्मीर आणि भारत यांच्या दरम्यान असलेलं विशिष्ट नातं – या सगळ्या गोष्टींचाही अंत झाला आहे. अर्थात कश्मिरीयत गेली काही दशकं स्वतःच्या अस्तित्त्वासाठी प्राणपणानं झगडत होती, पण भारत सरकारनं अलीकडे ३७० आणि ३५ अ ही कलमं रद्द करून ही संकल्पना पूर्णपणे मारून टाकली आहे. संविधानाच्या दृष्टीनं आणि प्रत्यक्षातही काश्मीर आता विशेष राहिलेलं नाही.
पार्श्वभूमी
कश्मिरीयत ही संकल्पना भारतीय उपखंडात असलेलं काश्मिरचं अद्वितीय स्थान अधोरेखित करण्यावर आधारित होती. काही प्रमाणात तरी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात काश्मिरी राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रवाद यांमध्ये असलेल्या जवळच्या नात्यातून ही संकल्पना पुढे आली. गेली अनेक शतकं चालत आलेल्या काश्मीरमधल्या संस्कृत आणि पर्शियन परंपरेला काश्मिरचं हे वेगळेपण नवीन नाही. या परस्परपूरक परंपरेनं काश्मीरच्या प्रदेशाचं पावित्र्य, त्याचा इतिहास, आणि एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत ज्या विविध लोकांनी ह्या संचिताला आपलं घर मानलं, अशा सर्व गोष्टींचा आदर केला आहे; त्यांचा गौरव केला आहे. शतकानुशतकं काश्मिरचं हे वेगळेपण आग्रहानं मांडल्यामुळे काश्मीरला आजूबाजूच्या बलाढ्य साम्राज्यांच्या बरोबरीनं किंवा त्यांच्या अंतर्गतही स्वतःचं असं वेगळं स्थान टिकवता आलं.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला काश्मिरी मुस्लीम समाज एकत्र आला. नव्यानं जन्माला आलेल्या संस्थानच्या महाराजांबद्दल त्यांची काही विशिष्ट गाऱ्हाणी होती. हे सर्व घडत असताना काश्मीरच्या वेगळेपणाचं कथासूत्र (नरेटिव्ह) हळूहळू मागे पडत गेलं. १९२०च्या दशकाच्या उत्तरार्धापासून १९३०च्या दशकाचा पूर्वार्ध ह्या दरम्यान मुस्लिम अस्मिता आणि इस्लामला धोका, ह्या मुद्द्यांभोवती महाराजांविरोधात चळवळ उभी राहिली. काश्मिरी मुस्लिमांना सरकारी नोकऱ्यांत पुरेशा संधी नसल्याच्या मुद्द्यावर उपाययोजना करावी, ही चळवळीची मुख्य मागणी होती. (एका बेरोजगार, मुस्लिम पदवीधरानं याला "नौकरी पॉलिटिक्स" असं नाव दिलं.) गरीब कामगार, शेतकरी, किंवा अल्पसंख्याकांचे प्रश्न अशासारखे मुद्दे सुरुवातीच्या चर्चांमध्ये तितकेसे मांडले गेले नाहीत.
१९३०च्या दशकाच्या मध्याच्या सुमारास वारे पुन्हा वेगळ्या दिशेनं वाहू लागले. चळवळ मुस्लिमांवरच अधिक केंद्रित आहे, किंवा मुस्लिमांच्या मागण्यांना पुरेसं महत्त्व देत नाहीये, अशा दोन्ही प्रकारच्या टीकेचा जोर वाढायला लागला. तेव्हा किमान काही नेत्यांच्या तरी लक्षात आलं, की चळवळीने धर्माचं महत्त्व कमी करून वंचित आणि अल्पसंख्याकांच्या समस्यांवर भर द्यायला हवा. याच सुमारास भारतीय काँग्रेसनं संस्थानांकडे लक्ष वळवायला सुरुवात केली होती. शिवाय मुस्लिम समाजाला आपलेसं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांच्याशी संपर्क साधण्याचं अभियान सुरू केलं होतं. जम्मू-काश्मीरसारखं बहुसंख्याक मुस्लिम असलेलं संस्थान काँग्रेसशी संलग्न असणं चळवळीच्या दृष्टीनं आकर्षक होतं.
पुढे ज्याला अधिकृतपणे 'कश्मिरीयत' असं म्हणलं गेलं, त्याची रूपरेषा ही अशी, ह्या संदर्भांत आखली गेली. शेख मोहम्मद अब्दुल्ला यांचं नेतृत्त्व असणाऱ्या ऑल जे. अँड के. मुस्लिम कॉन्फरन्सचं रूपांतर ऑल जे. अँड के. नॅशनल कॉन्फरन्समध्ये करण्याची प्रक्रिया सुरू झाली. निदान सांण्यापुरतं तरी धर्मापासून दूर, आणि वंचित, अल्पसंख्याकांच्या दिशेनं झालेलं हा बदल होता. आपल्या नावातल्या 'मुस्लिम' या शब्दाऐवजी 'नॅशनल' हा शब्द आणणं, म्हणजे काँग्रेसशी युती केल्याची जणू पावतीच होती. २८ मार्च १९३८ रोजी एका भाषणात शेख अब्दुल्ला असं म्हणाले, की मुस्लिमांप्रमाणे, हिंदू आणि शीख समाजाचंही शोषण बेजबाबदार सरकारकडून झालेलं आहे, आणि सर्व गट शत्रूविरुद्ध एकत्र आले तरच जबाबदार सरकार असणं शक्य आहे.
ह्या प्रकल्पासाठी काश्मीर 'देश' केंद्रस्थानी होता. त्यासाठी त्याची स्वतःची एक व्याख्या आणि इतिहास असणं गरजेचं होतं. जरी नेमक्या शब्दात मांडलं गेलं नसलं, तरी इथे काश्मीर देश म्हणजे 'व्हॅली'. या चळवळीने नव्या राजकीय हेतूसाठी काश्मीर 'अद्वितीय' असण्याचा मुद्दा पुढे आणला. काश्मीर म्हणजे जिथे शतकानुशतकं विविध धर्माचे लोक एकत्र नांदत आले आहेत असं नंदनवन. इथे इस्लामनं अहिंसक मार्गानं जम बसवला होता, बळजबरीनं नव्हे. मुघलांपासून सुरुवात झाली आणि परकीय राज्यकर्त्यांनी काश्मीरच्या शांततेचा भंग केला; कोणत्याही धर्माचा मुलाहिजा न ठेवता तिथल्या जनतेला अज्ञानाच्या अंधारात ढकलून दिलं. यामुळे दोन-राष्ट्र संकल्पनेपासून लांब जात, नॅशनल कॉन्फरन्स स्वतःला 'ऑल इंडिया मुस्लीम लीग'पासून दूर असल्याचे दाखवू शकली.
या गोष्टी काही पूर्णपणे कपोलकल्पित नव्हत्या. काश्मीरची परंपरा 'मुल्क' ह्या संकल्पनेशी मिळतीजुळती होती – ही संकल्पना धर्मातीत होती, तसंच कोणत्याही अन्य चौकटींच्या पलीकडे जाणारी होती. पण काश्मीरच्या इतिहासात धर्म, पंथ, आणि सामाजिक वर्गांच्या आधारावर प्रखर विद्वेषाची उदाहरणंसुद्धा आहेत. आणि अर्वाचीन काळातल्या काश्मिरी राष्ट्रवादाप्रमाणेच पूर्वेतिहासाच्या कथानकाची मुळं संस्थात्मक (इन्स्टिटयूशनल) पातळीवर खोलवर रुजली होती. हे ऐतिहासिक कथानक विशिष्ट राजकीय प्रकल्पांतून निर्माण झालं होतं, आणि या प्रकल्पांवर आपला प्रभावही टाकत होतं.
काश्मिरी राष्ट्रवादाला विरोध झाला नाही असं अजिबात नाही. काश्मिरातल्या आणि सगळ्याच भारतभरातल्या मुस्लिम समाजाच्या दृष्टीनं ह्यात मुस्लिमांचं भलं होणार नव्हतं. मुस्लिमांचं हित जपणं आणि त्याचा पुरस्कार याच मुद्द्यांवर तर महाराजांविरुद्ध चालवलेल्या चळवळीचा पाया होता. अनेकांना नॅशनल कॉन्फरन्स (एन. सी.) आणि काँग्रेस यांच्यातले घनिष्ठ संबंध मान्य नव्हते कारण ब्रिटिश राजवटीखाली असलेल्या भारतात ही युती मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करत नव्हती. तथापि, काही अंशी शेख अब्दुल्ला यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे, बहुसंख्य काश्मिरी मुस्लिमांनी राष्ट्रवादी संकल्पनेचा स्वीकार केला.
१९४७ नंतरचा काळ
स्वातंत्र्यप्राप्ती, आणि फाळणीनंतर 'कश्मिरीयत' असं म्हणल्या गेलेल्या कल्पनेचं नव्यानं पुनरुज्जीवन झालं. १९४७च्या शेवटी शेवटी शेख अब्दुल्ला यांच्या नेतृत्त्वाखाली एन. सी.नं नव्यानं भारताचं राज्य झालेल्या जम्मू-काश्मीरचा कारभार हाती घेतला. त्याच वेळी दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान दरम्यान ह्या माजी संस्थानावरून लढाई सुरू होती – जम्मू आणि काश्मीरचं भारतात विलीनीकरण कायद्याच्या चौकटीत बसवणं अत्यावश्यक झालं होतं. असं असण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काश्मीरच्या महाराजांनी बंडाळी आणि युद्धाच्या छायेखाली विलीनीकरणाला संमती दिली होती. काश्मीरच्या अनेक प्रांतांचा विलीनीकरणाला विरोध होता. याशिवाय फाळणीदरम्यानचा हिंसाचार पंजाबातून काश्मिरात शिरला होता. दिवसागणिक हिंदू आणि शीख निर्वासितांचे जत्थे राज्यात शिरत होते.
ज्या विचारांतून नॅशनल कॉन्फरन्सचा जन्म झाला होता, त्यांचा आधार घेऊन राज्यकर्त्यांनी नवीन, 'स्वतंत्र' काश्मीर देशाचं आणि त्याच्या सरकारचं प्रतिनिधित्व करण्याकरता धार्मिक सुसंवादाचं नवं कथानक रचायला सुरुवात केली. हे कथानक म्हणजे भारताच्या धर्मनिरपेक्ष कथानकाचंच प्रतिबिंब होतं, आणि त्याच्यासारखीच त्याची व्याख्या संदिग्ध होती. कायद्याच्या दृष्टीनं सर्वधर्मसमभाव, आणि अल्पसंख्याकांना बाधा न आणण्याचं जुजबी आवाहन वगळता, त्याला फार अर्थ नव्हता. विशेषतः कश्मिरीयतच्या चौकटीत बहुसंख्याक समाजाचं हित अल्पसंख्याकांच्या हितसंबंधांना बाधा न आणता कसं साधायचं, तेही बहुसंख्याक समाज सत्तेवर असताना, याचं भान ठेवलं गेलं नव्हतं. हिंदू, मुस्लिम, शीख कसे एकोप्याने नांदताहेत हे दाखवणारी नाटकं सदर करणं ठीक आहे, पण जमीन मालकीचे फेरफार, आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांना प्राधान्य देण्याच्या जम्मू-काश्मीर सरकारच्या धोरणांमुळे अल्पसंख्याक हिंदूंसमोरच्या ठोस प्रश्नांना हात घातला गेला नाही.
नेमक्या ह्याच मुद्द्यांवरून १९५३मध्ये अब्दुल्लांचं सरकार पडलं. पण केवळ जम्मू-काश्मीरमध्ये कश्मिरीयत फसली म्हणून नव्हे, तर भारतातही धर्मनिरपेक्षता अपयशी ठरली असल्यामुळे. १९४९मध्ये भारतीय संविधानाच्या ३७० कलमाद्वारे राज्याला विशेष दर्जा मिळवून घेणं जम्मू-काश्मीर सरकारला शक्य झालं, ते कश्मिरीयत आणि भारतीय धर्मनिरपेक्षतेचं धोरण यांच्या हातमिळवणीमुळे. जम्मू-काश्मीरमधील बहुसंख्याक आणि अल्पसंख्याकांचं हित एकाच वेळी साधणं अशक्य होत आहे, हे जसंजसं पुढच्या काही वर्षांमध्ये स्पष्ट होऊ लागलं, तसे मतभेद वाढत गेले. भारतातला बहुसंख्याक समाज जम्मू-काश्मीरमध्ये अल्पसंख्याक असलेल्या आपल्या बांधवांच्या बाजूनं उभा राहिला. सध्याच्या भारतीय जनता पार्टीचा पूर्वीचा अवतार, म्हणजे भारतीय जनसंघानं ३७० कलम रद्द करण्यासाठी, आणि काश्मीर पूर्णपणे भारतात सामावून घेण्यासाठीच्या जम्मूस्थित अंतर्गत चळवळीला पाठिंबा दिला.
आपण भारताशी एकनिष्ठ आहोत हे दाखविण्याकरता, अब्दुल्ला राजवटीचा पाडाव झाल्यानंतर आलेले नॅशनल कॉन्फरन्सचे राज्यकर्तेही कश्मिरीयतचा पुरस्कार करत राहिले. त्याच्या जोडीला ३७० कलम शक्य तितकं कमकुवत करण्यासाठी त्यांनी केंद्र सरकारला साथ दिली. ज्या पार्श्वभूमीवर काश्मीरला विशेष दर्जा उपलब्ध झाला होता, त्याचाच वापर आता त्या दर्जाचा अवमान करण्याकरता केला जायला लागला. काश्मिरी मुस्लिम भारतापासून दूर जायला लागले आणि या सर्वांची परिणीती म्हणजे १९८०च्या उत्तरार्धात झालेला बंडखोरीचा (इन्सर्जन्सी) उद्रेक.
बंडखोरी आणि त्यापलीकडे
काश्मीरमधल्या बंडखोरीच्या चळवळीत 'कश्मिरीयत'ची संकल्पना मागे पडली कारण ती भारतधार्जिणी मानली गेली - बळजबरीनं आणखी एक प्रांत भारतात सामावून घेण्यासाठी भारतानंच निर्माण केलेला एक प्रयत्न. काश्मीर देशाचा इतिहास पुन्हा एकदा लिहिला गेला, ज्यामध्ये भारतीय उपखंडाशी कोणताही संबंध नसल्याचं उद्धृत केलं गेलं. उलट काश्मीर आणि मध्य आशिया हेच कसे एकमेकांच्या जवळचे आहेत याचा उद्घोष करण्यात आला. चळवळीची ओळख इस्लामच्या आधारावर केली गेली. चळवळीनं घेतलेला विरोधाचा पवित्रा इस्लामच्या आधारावर रचलेला होता, आणि हळूहळू, चळवळीच्या अगोदरचा इतिहास पुसला गेला.
कश्मिरीयत ही संकल्पना किमान काही अंशी अल्पसंख्याकांना सामावून घेण्यासाठी निर्माण केली होती, आणि हा समाज जसाजसा स्वेच्छेनं प्रदेश सोडून जायला लागला, किंवा जबरदस्तीनं त्यांची हकालपट्टी झाली, तशी कश्मिरीयत मागे पडत गेली. हिंसाचाराच्या आणि भारतीय सैन्याच्या दबावाखाली वाढलेल्या मुस्लिमांच्या नव्या पिढीला कश्मिरीयतिशी किमान काही देणंघेणं नाही, किंवा त्यांना तिच्याविषयी काहीच माहिती नाही. याचं एक कारण म्हणजे आता कश्मिरीयतला काही महत्त्व राहिलेलं नाही. जिथे बुद्धिवाद्यांच्या वर्तुळांत हा विषय निघू शकतो, तिथे तो त्वेषानं झिडकारला जातो, कारण त्याचा भारताशी संबंध आहे.
पण कश्मिरीयतचा अंत भारतातही समांतरपणे लोप पावलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भात विचारात घेतला पाहिजे. काश्मीरमधली बंडखोरी आणि भाजपाचा आणि हिंदू बहुसंख्याकवादाचा चढता आलेख, या साधारण एकाच वेळी घडू लागलेल्या गोष्टी आहेत. ज्या धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर भारताची उभारणी केली गेली होती, तो आदर्श भारत देश उचलून धरू शकला नसल्याचं ते लक्षण होतं. गेल्या तीस वर्षांत काश्मीरमधली बंडखोरी (ज्यात वेगळ्या प्रकारचा बहुसंख्याकवादच आहे) आणि भाजपाचा प्रभाव भरती-ओहोटीप्रमाणे कमी-जास्त होत आला आहे. असं असलं तरी दोन्ही बाजूंचा बहुसंख्याकवाद आता इथे कायमस्वरूपी राहील असं चित्र दिसतं. ही अतिशय दुःखद गोष्ट आहे. याचं महत्त्वाचे कारण म्हणजे काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी यात काही जागाच नाहीये – ताकदीच्या जोराखेरीज काही मार्ग नाही असं भाजपाला वाटत असावं असंच चित्र दिसत आहे.
कश्मिरीयत आता इतिहासजमा झाली आहे. काही उदारमतवादी मंडळींच्या दिवाणखान्यात किंवा कॉलेजच्या एखाद्या वर्गात दबक्या आवाजात तिच्या शोकगीताचे सूर कदाचित ऐकू येतील. जेव्हा शांतता आणि सद्भाव हयात होते, अशा दिवसांचं स्मरणरंजन त्या शोकगीतासोबत केलं जाईल. काश, भूतकाळ इतका साधा, सरळ असता!
विशेषांक प्रकार
कश्मिरीयत ही संकल्पना आता
कश्मिरीयत ही संकल्पना आता अस्तित्त्वात नाही हे निश्चित. इतकंच नाही तर तिच्या बरोबरीनं आंतरधर्मीय सुसंवाद, धर्मनिरपेक्षता, आणि काश्मीर आणि भारत यांच्या दरम्यान असलेलं विशिष्ट नातं – या सगळ्या गोष्टींचाही अंत झाला आहे.>>> ३७० किन्व ३५ अ नस्तनाहि मराठीयत, तामिळीयत, वगैरे टिकून आहे. काश्मीरच्या नावाने सबंध देशाला वेठीला धरण्याची वृत्ती पुढच वाचलं नाही
अगदी
अगदी
आणि इतर काही देशांत मात्र अशी कोणतीही "यत" नाही याचंच कौतुक असतं.. मूळ लोकल संस्कृती किंवा तिचं ठराविक प्रमाणात मिश्रण किंवा खास वैशिष्ट्य वगैरे टिकवून धरण्याचा अट्टाहास न करता सर्व देशांतून, प्रांतांतून येणाऱ्या विविध कल्चरना सामावून घेणारे मेलटिंग पॉटस वगैरे देश / शहरं कौतुकास पात्र (प्रगत) ठरताना दिसतात. तिथे वेगळा दर्जा बिर्जा नसणं स्वागतार्ह ठरतं. तिथे पोचण्यासाठी प्रयत्न होतात. एनिवे.
ता.क. आत्ताच गुगलून पाहिलं, मूळ लेखिका अपेक्षेप्रमाणे अमेरिकीयत न मानणाऱ्या देशात आहेत.
अस्मिता दुखावली.
मला लेख तरी समजलेला नाही किंवा तुमचा प्रतिसाद तरी!
मला लेख समजला तो दोन वाक्यांत असा - काश्मिरीयत ही संज्ञा बरेचदा इकडेतिकडे वापरलेली दिसते. ती नक्की काय, कुठून आली ह्याचा धांडोळा ह्या लेखात आहे. जर लेख तसा असेल तर कोण, कुठले मेल्टिंग पॉट्स आणि लेखिका कुठे राहतात ह्याचा काय संबंध, काही समजेना!
त्यातून मराठीतला लेख आणि मराठीतले प्रतिसाद काही समजेना म्हणून माझी मराठी अस्मिताही लगे हाथ दुखावली.
???
काश्मीर आणि भारत यांच्या दरम्यान असलेलं विशिष्ट नातं
संघराज्यामध्ये राज्य आणि केंद्र यांच्या दरम्यान काही नाते असू शकते काय? त्या नात्याचा जिक्र हा टुकडे-टुकडे गँगचे सदस्यत्व आपोआप प्राप्त करून देतो काय?
मग त्यात एखादे राज्य आणि केंद्र यांच्या दरम्यान असलेल्या (स्पेसिफिकली ते राज्य आणि केंद्र यांच्या दरम्यान असलेले, म्हणून विशिष्ट, आणि इतर राज्ये आणि केंद्र यांच्या दरम्यान असलेल्या नात्यापेक्षा किञ्चित वेगळे, म्हणूनही विशिष्ट) नात्याच्या निव्वळ उल्लेखाला ही विशिष्ट ट्रीटमेंट का मिळावी ब्वॉ?
(कश्मीरमधील दहशतवाद, तथा दहशतवादी-कश्मीरी जनता-भारतीय सैन्य या त्रिकूटाच्या दरम्यान असलेले विशिष्ट नाते (किंवा पाकिस्तान-दहशतवादी-कश्मीरी जनता याही त्रिकूटाच्या दरम्यान असलेले विशिष्ट नाते) हे मुद्दे पूर्णपणे वेगळे आहेत.)
राजकारण्यांनी आणि काश्मिरी
राजकारण्यांनी आणि काश्मिरी जनतेने ज्याचा एवढा बाऊ केला आहे त्या कश्मिरीयतचा स्पष्ट उलगडा काही झाला नाही.
इथे इस्लामनं अहिंसक मार्गानं जम बसवला होता, बळजबरीनं नव्हे. मुघलांपासून सुरुवात झाली आणि परकीय राज्यकर्त्यांनी काश्मीरच्या शांततेचा भंग केला;
'खोटं बोल पण रेटून बोल' टाईपचं विधान आहे.
केवळ थोर
वरच्या प्रतिक्रिया फारच गमतीशीर आहेत. लेखिका म्हणते आहे की काश्मीर केवळ मुसलमानांचा असं होऊ नये म्हणून कश्मीरियत ही संकल्पना पुढे आणली गेली, पण मुळात संस्कृत-पर्शियन मिश्र संस्कृती हा काश्मीरचा स्थायीभाव होता. थोडक्यात, जे पुढे आणलं गेलं ते एकोप्याचा आणि सुसंवादाचा सूर आळवत होतं आणि त्यासाठी इतिहासाचाच आधार घेत होतं.
ह्याउलट जेव्हा इस्लामी दहशतवाद बोकाळला तेव्हा ही संकल्पना मागे पडू लागली, कारण दोन धर्मांमधला एकोपा भारतधार्जिणा मानला गेला आणि त्यामुळे फुटीरतावाद्यांच्या गैरसोयीचा होता.
तर, प्रतिक्रियांमध्ये काही लोकांना हे भारतविरोधी वाटतंय. हे आकलन महान आहे. म्हणजे कसंय ना, की काश्मीर भारतात तर हवं, पण तिकडच्या लोकांना काय वाटतं आणि त्याला इतिहास कसा जबाबदार आहे वगैरे कुणी सांगायला गेलं तर ते देशद्रोही.
केवळ थोर. हा हा हा.
ह्याउलट जेव्हा इस्लामी
ह्याउलट जेव्हा इस्लामी दहशतवाद बोकाळला तेव्हा ही संकल्पना मागे पडू लागली
पण भारत सरकारनं अलीकडे ३७० आणि ३५ अ ही कलमं रद्द करून ही संकल्पना पूर्णपणे मारून टाकली आहे. संविधानाच्या दृष्टीनं आणि प्रत्यक्षातही काश्मीर आता विशेष राहिलेलं नाही.
हेही आहे.
किमान अदिती म्हणते तसं काश्मीरियत संकल्पना कुठून कशी काय अशी ओळख करून देणारा हा लेख नक्की वाटत नाही.
उमज आणि ओळख
किमान अदिती म्हणते तसं काश्मीरियत संकल्पना कुठून कशी काय अशी ओळख करून देणारा हा लेख नक्की वाटत नाही.
संस्कृत-पर्शियन मिश्र संस्कृतीच्या इतिहासाचा मान राखून दोन धर्मांमध्ये एकोप्याचा आणि सुसंवादाचा सूर आळवणारे कश्मीरियत बळकट करतात, हा मुद्दा उमजून घेतला तर फुटीरतावादी काय, किंवा ३७० कलम रद्द झाल्याचा जल्लोष करणारे काय, ते कश्मीरियतच्या बाजूने आहेत का, ते तपासून पाहता यावं. आणि ते करता आलं तर कश्मीरियतची ओळख अधिक नीट होईल कदाचित.
काय दिवस आलेत!
जंतूंशी सहमत व्हावे लागेल, अशी स्वप्नातसुद्धा कल्पना केली नव्हती. असो. आलिया भोगासी...
गंमत म्हणजे, 'झुत्शी' बोले तो कश्मीरी पंडित (पक्षी: हिंदू) ना? (चूभूद्याघ्या.) किंवा, फॉर्दॅट्मॅटर, 'नेहरू'सुद्धा? नाही म्हणजे, एक कश्मीरी पंडित टुकडे टुकडे गँगवाली, नि दुसरा कश्मीरी पंडित कश्मीर पाकिस्तानच्या घशात घालणारा, असल्या निष्कर्षांवर लोक इतक्या झपाट्याने कशी उडी मारू शकतात, याची गंमत वाटते.
की कश्मीरी पंडितांनी इतःपर आपापली वैयक्तिक पर्स्पेक्टिवे ही पुण्यातल्या नि गुजरातेतल्या हिंदूंच्या (त्यातही शक्य तोवर उजव्या हिंदूंच्या) अनुमतीने, समन्वयाने नि बायसानुसार ठरविणे अपेक्षित आहे?
बरे, बाई लेखात कोठेही काय करायला वा व्हायला हवे (उदा., टुकडे टुकडे) याबद्दल कोणतेही रेकमेंडेशन देत नाही. केवळ, काय घडले याबद्दल आपल्या मगदुराप्रमाणे नि पर्स्पेक्टिवानुसार ॲनालिसिस मांडते. तो बरोबर की चूक, त्यात तथ्यांश किती, याबद्दल मतांतरे असू शकतीलही. परंतु, 'असेही एक पर्स्पेक्टिव असू शकते' असा विदाबिंदू म्हणून दखल घेण्यात नक्की काय पाप (किंवा, वर्स स्टिल, देशद्रोह) आहे? लगेच 'टुकडे टुकडे' नि 'जावा की पाकिस्तानात'-छाप नीजर्कपणा कशासाठी?
(असो चालायचेच.)
खरोखरच ...
.... कश्मिरीयत म्हणजे काश्मिरातल्या लोकांची संस्कृती, असं गोलमोल काहीसं मला समजत असे. ते नक्की काय, कुठून, कसं ह्याचा विचार मी कधीही केला नव्हता. गरजही नव्हती.
लेखिका कोणत्या कॉलेजात वा विद्यापीठात शिकवते हेही मला माहीत नाही. मात्र अंकात ज्यांनी लेख आणले ती रोचना मला माहीत आहे; तिच्या आकलन, अभ्यास, आणि क्षमतेवर माझा विश्वास आहे. तिनं तिच्या विषयासंदर्भातला एखादा लेख चांगला म्हणून सांगितला तर मी तो माझी सगळी मतं बाजूला ठेवून वाचते. कारण ती तो विषय गेली काही दशकं शिकत आहे; मी त्या विषयातला एखादा चुकार लेख वाचला असेल इतपतच.
'तमिळनेट'चा लेख ज्या तटस्थतेबद्दल बोलतो, त्या तटस्थतेनं मी हा लेख वाचला आणि तशाच तटस्थपणे हा लेख लिहिला आहे, अशी माझी खात्री पटली. लेखिकेचा हेतू अभ्यासातून आपल्याला जे काही आकलन झालं आहे ते सोप्या शब्दांत लोकांसमोर मांडणं असा असावा, असं मला वाटलं, वाटतं.
त्यापुढे 'खोटं बोला पण रेटून बोला' वगैरे बिनबुडाच्या आरोपांबद्दल तर हसावं का रडावं, असा प्रश्न पडतो. लोकांवर आरोप करताना किमान त्याला काही बूड देण्याचा प्रयत्न करावा ... तेही नाही.
कश्मिरीयत असो वा मराठी अस्मिता (तज्जन्य शिवसेना आणि मनसे) ह्या गोष्टी सरधोपट नसतात; त्यांचं आकलन, विशेषतः काही काळ गेल्यानंतर गुंतागुंतीचं होत जातं. माझ्या अनुभावांमुळे किंवा पुरेसं वय झाल्यामुळे ही गुंतागुंत सगळीकडे असतेच, असं मी आता गृहीत धरते. काश्मिरीयतची ही गुंतागुंत, किमान त्याबद्दल एक आकलन मला ह्या लेखामुळे समजलं. ते संपूर्ण असेल, वा मला १००% पटेल का ह्याबद्दल मी मतप्रदर्शन करणं योग्य नाही. कारण पुन्हा तेच, मला ह्या विषयाबद्दल पुरेसं माहीतच नाही; मी इतिहासाचा अभ्यास करत नाही.
लेख कळला नाही; किंवा ही दोन-चार वाक्यं एकत्र का आलीत हे समजत नाही; किंवा 'मला ह्या वाक्यांतून हे-हे समजलं, ते तसंच आहे का', अशा प्रकारच्या प्रतिक्रिया मला आवडतात. त्यातून कोणी तरी लेख समजावून देण्याचा प्रयत्न करतात. आपसांत चर्चा होते, काही तरी नवीन समजतं, निदान तशी शक्यता निर्माण होते.
आता एवढं करून माझ्या नावावरच घसरायचं असेल तर माझं आडनाव जोशी; झुत्शी-जोशी बहना-बहना असा आरोप सहज करता येईल!
टेड टॉक
लेखिकेच्या नावाने गुगललून हा टेड टॉक पाहिला. मूळ लेखाची लिंक मिळाली नाही. कृपया असली तर शेअर करा. (मूळ लेख)
https://www.youtube.com/watch?v=Q1PzLGYQ3UU&t=12s
पॉलिटीकल अजेंडासाठी ऐतिहासिक घटनाक्रम विशिष्ठ पद्धतीने मांडून इतिहासाचे नरेटीव्ह वेगवेगळ्या पद्धतीने मांडले जाते. जेव्हा आपले एखादे राजकीय मत वेगळे पडते खास करून इतिहासा संबधी आणि आजच्या संदर्भात(हेही तितकेच महत्वाचे), तेव्हा हिस्ट्ररी रिसर्च करणे अधिक माहिती घेणे उत्तम. असे काहीसे तीचे म्हणणे आहे.
इतिहास पाहता - हिंदू
इतिहास पाहता - हिंदू राज्यसत्ता- मुसलमान सत्ता - मुघल - ब्रिटिश - भारत सरकार जुना हिंदुस्तान वगळून झालेला. असं शाळेत शिकलो. नंतर पाक युद्ध आणि काही कश्मीर भाग जाऊन लाईन ओफ कंट्रोल हे शाळेत नव्हतं.
तर यानंतर लोकशाही मार्गाने अंमल सुरू झाला. त्यात काय मिळवले गमावले हे वाचायला हवे.
शस्त्राच्या जोरावर आणि लोकशाही स्वरुपातली अंमलबजावणी यात खूप फरक आहे.
पर्शियामध्ये ( इराण) जो
पर्शियामध्ये ( इराण) जो जरतृष्ट धर्म होता तो पैगंबरप्रेरित मुस्लिम धर्म आल्यावर कसा बाहेर डोंगरांतल्या गुहांत जेमतेम घाबरून तग धरून आहे हे युट्युब विडिओत ( हिस्ट्री चानेलच्या) आहेच.
तरवारीच्या ( शस्त्राच्या) जोरावर सर्व गोष्टी दाबून टाकण्यात येतात. धाक दाखवणाऱ्यांच्या बाजूचंच फक्त समोर ठेवलं जातं.
त्याचे गुणगान गाण्याशिवाय पर्याय ठेवय नाहीत.
त्यामुळे नक्की काय चाललं आहे समजत नाही.
यथायोग्य, मुद्देसूद खंडन केल्याखेरीज, त्या रडगाण्यात नि या रुदनात नक्की फरक तो काय?
तर ते कसं काय जमवायचं?
.
.