खरे स्वातंत्र्य हा गुलाम कधी उपभोगणार?
यावज्जीव मनुष्य प्रयत्न करत असतो तो आहे या स्थितीपासून स्वातंत्र्य मिळवत अधिकाधिक मानसिक/आर्थिक आणि सत्तेचे अधिकाधिक अवकाश प्राप्त करण्यासाठी. आहे ती स्थिती सुखावह न वाटणे हे मानवी मनाचे एक व्यवछेदक लक्षण आहे. मग ती स्थीती कोणतीही असो. एकपट धन असणारा दुप्पट धनाची अपेक्षा बाळगत असतो हे पुरातन औपनिषदिक विधान या परिप्रेक्षात ध्यानात घ्यावे लागते. याला "हाव" हा शब्द पुरेसा नसून तो मानवी मनोभुमिकेवर अन्याय करणारा आहे. खरे तर आपले स्वातंत्र्य, आपले अवकाश सीमित न राहण्यासाठी, किमान ती टिकुन राहण्यासाठी रक्षणात्मक अशी जी आर्थिक/सत्तात्मक/ धर्माधारीत तरतुद मनुष्यमात्र करत असतो, वा स्व-वाच्छित व्यवस्था बनवण्याच्या नादाला लागलेला असतो त्यालाच आपण मानवी स्वातंत्र्याचा अविरत चालत असलेला संघर्ष म्हणतो. परकीय सत्तांशीचा स्वातंत्र्य संघर्षही खरे तर याच मुलभुत भावनांच्या विकारांवर आधारीत असतो. परंतू वैश्विक परिप्रेक्षात स्वकीय आणि परकीय अशी मुळात तरतुदच नसते. जे स्वकीयांच्या म्हणुन स्वातंत्र्याच्या बंडात असतात तेच आपापल्या व्यवस्थेतीलही पारतंत्र्याच्या भावना देणा-या कथित परकियांच्या विरुद्ध पवित्र्यात उभे राहायला सज्ज होतांना दिसतात. त्यामुळे स्वकीय आणि परकीय या शब्दांना जरा तारतम्यानेच घ्यावे लागते.
भारतावर शक, हुण, कुशाणांनी अनेक शतके राज्ये केली. ते तसे परकीयच होते. ग्रीकांनीही काही काळ सीमावर्ती प्रदेशांवर शासन केले. ते येथे असे मिसळुन गेले कि आज त्यांचे स्वतंत्र आस्तित्व दाखवता येणे अशक्यच आहे. मुस्लिमांनी (यात अनेक वंशीय मुस्लीम होते...तुर्क, पर्शियन ते मोगल) भारतावर अनेक शतके सत्ता गाजवली. ते परकीय आहेत, अन्यायकर्ते आहेत म्हणुन राजपुतादिंनी त्या सम्राटांना आपल्या कन्या देण्यात अनमान केल्याचे दिसत नाही. किंबहुना मोगल साम्राज्य टिकण्यात राजपुतांचा मोठाच वाटा होता हे अमान्य करता येत नाही. याची सांस्क्रुतीक परिणती अशी झाली कि मोगल हे रक्ताने जवळपास ७५% भारतीय बनले. याची खंत शाह वलीउल्लाह सारख्या धर्मांध व्यक्तीला एवढी पडली होती कि १७३६ ते पुढेही त्याने भारतातील मुसलमान अजलाफ (हीण) काफिर झाले असुन शुद्ध इस्लाम आणायचा असेल तर जिहाद करायला हवा आणि हा जिहाद शुद्ध इस्लामी रक्ताचाच मनुष्य करु शकतो असा प्रचार करत त्याने भारतावर आक्रमण करण्यासाठी नादिरशहा ते नंतर अब्दालीला प्रेरीत केले. किंबहुना १८५७ च्या बंडाची प्रेरणाही शाह वलीउल्लाहच्या तत्वद्न्यानात होती हे शेषराव मोरेंनी सिद्ध करुन दाखवलेच आहे.
थोडक्यात शाह वलीउल्लाहलाही भारतीय मुसलमान आपले नाहीत, स्वकीय नाहीत म्हणुन भौगोलिकद्रुष्ट्या परकीय पण धार्मिक द्रुष्ट्या स्वकीय वाटल्या अशा मुस्लिम सत्तांना आक्रमणाचे निमंत्रण द्यावे वाटले. त्यातून जो इतिहास घडला तो आपणा सर्वांना माहितच आहे. नाझी हिटलर जर द्वितीय महायुद्धात जिंकला असता आणि सुभाषबाबुंनी भारत जिंकला असता तर आजचा आपला वर्तमान खुप वेगळा असता...किंबहूना हे लिहायला मी एक्तर जन्माला तरी आलो नसतो वा कधीच मारला गेलो असतो. अर्थात इतिहासात जर-तरला विशेष स्थान नसते हे खरे आहे. परंतु या "जर-तर" वर आधारीत वैचारिक सिद्धांत मांडणा-यांची कमतरता नसते. -अगा जे झालेची नाही त्याची वार्ता कशाला- हे या मंडळींना बहुदा माहित नसते. गांधीजींना नथुरामने ठार मारले नसते तर....असे बावळट सिद्धांत मांडत त्यांच्या हत्येची भलामन करणारे नथुरामी या देशात आजही खुप आहेत. हिटलर मेला असला तरी त्याची मानसिक गुलामी करणारे कथित आर्यवादी या देशात कमी नाहीत.
स्वकीय आणि परकीय या तर्तुदी परिस्थितीसापेक्ष बनत जातात त्या अशा. हिटलर परकीय असला तरी तो स्वत:ला व जर्मनांना आर्यवंशीय मानत असल्याने तो येथील आर्यवाद्यांना आपला वाटतो तो असा. पण हा तीढा दिसतो तसा सोपा नाही. मानवी प्रेरणा याच मुळात कोणत्या ना कोणत्या गुलामीत राहण्याच्या असतात कि काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. या सर्व तरतुदींमागे मानवी स्वार्थांच्या अविरत मशाली तेवत असतात...भडकत असतात. स्वातंत्र्यात असणारेही कोणत्यातरी पारतंत्र्याच्या भावनेत असतात...कोणी धार्मिक पारतंत्र्याच्या भावनेत असतो तर कोणी राजकीय. कोणी प्रांतीय सापत्नभावाच्या भावनेत असतो तर कोणी आर्थिक... कोणी जातीय...परस्पर संघर्ष एवढा तीव्र होत असतो कि शेवटी कोणीच स्वकीय नाही हा साक्षात्कार घेत मानसिक नैराश्याचे बळी होतांना दिसतात.
पण मुळात स्वातंत्र्याचा अर्थच कळालेला नसल्याचे हे लक्षण आहे. मुळात निसर्गाने प्रत्येक मानवाला एक स्वतंत्र असे व्यक्तित्व बहाल केले आहे ते विसरत कोणत्या तरी विचारसमुहाचा गुलाम होण्यात मानवाला धन्यता वाटत असते हे आपण सहज निरिक्षण केले तरी पाहु शकतो. या सर्व दबावांपासुन दुर रहात आपले स्वतंत्र अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करणारे नसतात असे नाही...पण ते कितपत यशस्वी होत असतात?
मुळात मानवी जीवनधारणांचा नेटका अर्थ न समजल्याचे लक्षण म्ह्णजे कोनत्या ना कोणत्या विचार व्युहाची वा सत्तेची (मग ती र्थसत्ता असो कि धर्मसत्ता, संस्कृतीसत्ता असो कि राजसत्ता...) मानसिक गुलामी. या गुलामीमुळे मानव अनेक न पटणा-या गोष्टीही एक तडजोड म्हणुन करत जात गाळात रुतत जातो. किंबहुना तसे केले नाही तर आपल्याच अस्तित्वावर गदा तर येणार नाही ना असा प्रश्नही त्याला छळत असतो. एकार्थाने प्रत्येक व्यक्ती एक दुभंग जीवन जगत असतो. खाजगीत तो जे बोलु शकतो ते जाहीरपणे व्यक्त करायला त्याला एक तर जमत नाही वा खोटी नांवे घेत त्याला स्वता:ला वाचवण्यासाठी अभिव्यक्त व्हावे लागते. पण मग ती अभिव्यक्ती खरी कशी? त्याचे अस्तित्व खरे कसे? "को अहम", मी कोण आहे? हा प्रश्न त्याला तरीही छळत असेल तर मग प्रतिप्रश्न असा आहे कि त्याने खरेच स्वत:ला समजुन घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे काय? इतरांनी लिहिलेली तत्वद्न्याने वाचुन वा ध्यानधारणादी करुन "मी कोण आहे?" या प्रश्नाचे उत्तर जर मिळाले असते तर आजवर यच्चयावत विश्वातील लोकांना ते सत्य समजलेही असते. ते समजत नाही याचे कारण म्हणजे मुळात तत्वद्न्याने हीच मानसिक गुलामी निर्माण करण्यासाठी निर्माण होत असतात याचे आपले भान सुटलेले असते.
मनुष्य जन्मता:च एक संघर्षरत प्राणी आहे. निसर्गाने त्याला असंख्य जीवनावश्यक व स्वसंरक्षक साधने जी अन्य प्राणिजातीला बहाल केली आहेत ती नाकारलेली आहेत. त्यामुळेच डोनिकेनसारखा अभ्यासक मनुष्य हा मुळचा या भुतलावरील नाहीच अशी साहसी विधाने करत असतो. मनुष्याला आहे ती अपार बुद्धी आणि तीचेही वितरण सर्वच मानवप्राण्यात समान नाही. तिची मुक्त-स्वतंत्र वाढ होवू नये याचीही तरतुद माणसानेच धर्म/राज/अर्थसत्तेच्या रुपाने प्राचीन काळापासून करुन ठेवली आहे. "प्रश्न विचारु नका" अशी तंबी धर्मसत्ता देते तर कायद्याचा सन्मान करा असे कायदा बनवणारे धमकावतात. अर्थसत्ता तर शोषणासाठीच असते.
मग माणसाच्या संघर्षाचे परिमाण केवळ निसर्ग वा नियतीशीच्या संघर्षाशी मर्यादित रहात नाही तर तो संघर्ष मानवनिर्मित पारतंत्र्याशी येवून ठेपतो. असंख्य लोक यालाच नियती मानत तिचा निमुट स्वीकार करत जातात आणि आहे त्या बंदिस्त स्वातंत्र्यालाच मन:पूत स्वातंत्र्य समजतात तर असंतुष्ट लोक याहीपेक्षा अधिक चांगली स्थीति आणण्यासाठी बंडे पुकारतात. अव्यवस्थेत नवी अव्यवस्था आणु पहाणा-या या स्थित्या मानवाला दिल्या गेलेल्या बुद्धी नामक एकमेव हत्त्याराचे असे वाटोळे करत जातात. पण नैसर्गिक व्यवस्थेचे आपणच हत्या केली आहे याची जाण व भान मानवी समुदायाला रहात नाही. आपण बुद्धीचे विकसन करत चाललो आहोत कि अध:पतन यावर आपण कधी विचार करतो? आपण सुखकर जीवनासाठी संघर्ष करत, सतत संघर्षरत रहात अंतत: कोणत्या श्रेयाच्प्रत पोहोचत आहोत? थोडक्यात मानवजात सुखी नसेल, पण किमान समाधानी तरी आहे काय? कि आता हा प्रश्नच कालबाह्य झाला आहे? उदा. कल्यानकारी राज्याची संकल्पना आपण सोडुन दिली आहे. आपणच नवनवे कायदे आनण्याची मागणी करु लागलो आहोत. याचा अर्थ आपल्याला स्वत:चे स्वातंत्र्य जखडुन टाकणा-या यंत्रणेचीच कास धरावी वाटु लागलेली नाही कि काय?
आजचा माणुस हा मुळात मानवी व्यवस्थेचा अपरिहार्य गुलाम आहे. स्वकीय आणि परकीय ही त्याची टोळी काळातील आदिम भावना आजही पुरेपूर जीवंत आहे. किंबहूना छपुन राहुनही अभिव्यक्तिचे असंख्य मार्ग आज उपलब्ध झाल्याने ती बळावतच चालली आहे असे दिसते. या परिप्रेक्षात मानवी स्वातंत्र्य हे जसे विस्तारीत व्हायला हवे होते तसे न होता ते मात्र उलटपक्षी अधिकाधिक संकोचायला लागले आहे आणि याची समाजशास्त्रीय काळजी वाटणे स्वाभाविक आहे.
संघटनांचे म्हणावे तर त्या मानवी स्वातंत्र्याचा विस्तार घडवून आणण्याचा अविरत प्रयत्न करणा-या विविध परिप्रेक्षातील मानवी समुदायाच्या संस्था असाव्यात असाच मुळात "संघटना" या शब्दाचा अर्थ आहे. जे आहे त्या जातीय/वंशीय/धर्मीय/आर्थिक/राजकीय आणि सामाजिक अवकाशापेक्षा व्यापक अवकाश मिळावे यासाठी प्रयत्न करण्यासाठी असतात/असाव्यात. अंतिम उद्देश्य हा अवकाशांचे विस्तारीकरण करत एकूनातीलच मानवी समाजासाठी ते उपयुक्त व्हावे आणि इतरांची अवकाशेही स्वीकारत जात एकजीव अवकाश निर्मान व्हावे हा असावा.
परंतू प्रत्यक्षात मात्र संघटना या प्राय: स्वता:चे, स्वता:च्या अनुयायांचे अवकाश नुसते सीमितच नव्हे तर संकोचत नेण्यात धन्यता मानत जातात हे एक वास्तव आहे. ही एक वंचना असते. या वंचनाखोरांच्या बहुलतेमूळे आजच्या सर्वच जागतीक समाजाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. पारतंत्र्य हे फक्त राजकीय नसते. त्याची परिमाणे असंख्य असतात. पण आपापल्या अनुयायांना या सर्वच संघटना (यात राजकीय पक्ष ते अगदी एन.जी.ओ. ही आले) या पारतंत्रातून बाहेर काढण्यास राजी नसतात कारण त्यांना अनुयायांना पारतंत्र्यात ठेवत थोडके का होईना स्वताचे स्वतंत्र अवकाश हवे असते. त्यासाठीच सारा आटापीटा चालू असतो. विचारांच्या कोलांटउड्या कराव्या लागतात...भागही पडते...कारण ती त्यांची त्यांच्या पारतंत्र्याची एक अपरिहार्य गरज असते...आणि म्हणुन भावनीक लाटेवर स्वार झालेल्या अनुयायांचीही.
पण अनुयायांचाही कधी ना कधी भ्रमनिरास होतो...संघटना फुटत जातात...राजकीय पक्ष फुटत जातात...आर्थिक संस्थाही फूटत जातात...
पण ज्यासाठी मुळात हा सारा मानवी संघर्ष सुरू असतो...ते म्हणजे स्वातंत्र्य...ते कोठे असते?
स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय आहे? कशासाठी आहे? मनुष्याचे एकमेव हत्यार, जे निसर्गाने त्याला दिले, ती म्हणजे बुद्धी, तीच जर बंदिस्त व्युहात गेली असेल...आम्ही म्हणतो तसाच विचार करा अशी धर्माद्न्या/राजाद्न्या/अर्थाद्न्या असेल आणि ती अगणित गुलाम स्वेछेने पाळत असतील तर माणसाला बुद्धी नावाचे हत्त्यार/साधन आहे हे कसे मानायचे? आणि नव्य विचार करतात असे म्हननारेही जर नवे बंदिस्त अवकाश (मग ते जातीचे असो कि धर्माचे, राजकीय व्यवस्थेचे असो कि अर्थव्यवस्थेचे) निर्माण करण्याच्या नादी लागणार असतील तर खरे स्वातंत्र्य हा गुलाम कधी उपभोगणार?
----------------------------------------
विस्कळित
लेख काहीसा विस्कळित वाटला. मानसिक गुलामगिरीबद्दलची तुमची कळकळ पोचते. पण नक्की तुम्हाला असं का वाटतं ते कळत नाही.
गेल्या दोन हजार वर्षांचा इतिहास बघितला तर विविध प्रकारची स्वातंत्र्यं हळूहळू वाढतच गेलेली आहेत. तुम्ही ज्या वैचारिक स्वातंत्र्याबद्दल काळजी व्यक्त करत आहात ते गेल्या शंभर वर्षात भरपूर वाढलेलं आहे. उदाहरणार्थ, तुमचा हा लेख ९९% मराठी लोकांना वाचताही येणार नाही अशी परिस्थिती विसाव्या शतकाच्या सुरूवातीला होती. कारण जेमतेम पाच टक्के साक्षर होते. त्यातले इतका गंभीर लेख वाचू शकणारे एक पंचमांश म्हणजे डोक्यावरून पाणी. आता सुमारे ८०% मराठी लोक साक्षर आहेत. तेव्हा इतकं गंभीर वाचू शकतील, समजू शकतील अशांची संख्या अनेक पटींनी वाढलेली आहे. याला तुम्ही समाजाचं विचार करण्याचं, विचारांची देवाणघेवाण करण्याचं स्वातंत्र्य वाढलं असं म्हणणार नाही का?
नक्की कधी माणूस वैचारिकदृष्ट्या आजपेक्षा अधिक स्वतंत्र होता? मी तर म्हणेन की पूर्वीच्या काळात तो व्यवस्थेचा अधिक गुलाम होता.
या लेखात अनेक विधानं स्वयंस्पष्ट असल्याप्रमाणे येतात. तुमच्यासाठी ती उघड सत्यं असतील, पण लोकांसाठी असतीलच असं नाही. तेव्हा खुलासा करणारी उदाहरणं आली तर लेख अधिक पटण्यासारखा होईल.
.
.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
राजेशजी, मनजी,
राजेशजी, मनजी, प्रतिक्रियांबद्दल आभार.
राजेशजी, शिक्षण आणि स्वातंत्र्याची जाणीव व अभिव्यक्ती यात फरक करायला हवा असे मला वाटते. मनजी म्हणाले त्याप्रमाणे आपल्या पुर्वसुरींनी जे स्वातंत्र्य उपभोगले व स्वत:च्या स्वातंत्र्याच्या जाणीवांसाठी त्यांनी जो लढा दिला त्यापुढे आपले आजचे कथित स्वातंत्र्य हे पोकळ ठरते. आपल्या संतांचे उदाहरण घेतले तरी पुरेसे ठरावे. आज अण्णांसारखे नव्या स्वातंत्र्यासाठी लढनारेही आपल्याच अनुयायांच्या विचारव्युहाचे बंदिस्त कैदी होतात हे एक वास्तवच नाही काय? युरोपात जी रेनेसांची लाट उसळली तशी आज आपण अपेक्षा तरी करतो काय? प्रस्थापित विचारव्युह उधळुन देण्याची कोणती बौद्धीक क्षमता (व ती समजा असली तरी हिम्मत) आज आमच्यात आहे? जोवर मनुष्य विशिष्ट विचारसरणीचा गुलाम होतो तोवर त्याच्याकडुन स्वतंत्र आणि निरपेक्ष कृतीची अपेक्षा करता येत नाही. आज आपल्याला अभिव्यक्तीची अनंत साधने उपलब्ध झाली आहेत हे खरेच आहे, पण अभिव्यक्ती करणारे कितपत स्वतंत्र वृत्तीचे आहेत हाही एक प्रश्नच आहे. स्वातंत्र्य हे "स्वतंत्र आहोत" अशा भावना देना-या साधनांवर अवलंबुन नसुन तशी खरोखर अभिव्यक्तशील कृती करण्यावर अवलंबुन असते असे मला वाटते.
लेख विस्कळीत आहे हे खरे आहे. ते केवळ हे मुक्त चिंतन असल्याने झाले आहे. त्याबद्दल क्षमस्व.
आपल्या पुर्वसुरींनी जे
कोण हे आपले पूर्वसुरी जे आपल्यापेक्षा अधिक स्वतंत्र होते? काळ सांगा. स्वातंत्र्याच्या जाणीवांसाठी लढे आत्ताही जागोजाग चालू आहेत. माहितीच्या अधिकाराचा वापर केल्याबद्दल अनेकांचे बळी पडलेले आहेत.
अहो, आसपास पहा जरा. तुम्ही त्यापेक्षा प्रचंड इंटरनेट/मोबाइल रेनेसांच्या प्रचंड त्सुनामीवर आरुढ आहात.
नुसत्या साधनांचं बोलत नाहीये मी. वाचता येण्याचं स्वातंत्र्य म्हणतो आहे. तुम्ही संतांची उदाहरणं देता, पण ज्ञानेश्वरांना जे मराठीत काव्य करावं लागलं ते सामान्यजनांना वाचता येत नव्हतं, आणि दलितांना संस्कृत शिकायला बंदी होती म्हणूनच ना? अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे पण हे सगळे अभिव्यक्ती करणारे नुसतेच पुचाट आहेत, पूर्वी कसं छान होतं, वगैरे कवीकल्पना आहेत. सत्य हे आहे की कुठल्याही महत्त्वाच्या बाबतीत आजचा काळ हा अधिक संपन्न आहे.
तुम्ही विचारलेला प्रश्न हा अनुत्तरणीय आहे. कारण त्याबाबत काहीच विदा नाही. किंबहुना लेखातली बहुतेक विधानं 'संजय सोनवणींचा आतला आवाज काय सांगतो' याचं वर्णन करतात. त्यामुळे माझे विचार परिवर्तन करण्यास ते उपयोगी ठरत नाहीत.
मित्रवर्य, मी आपल्या
मित्रवर्य, मी आपल्या विचारांचे स्वागत करतो. फक्त मी त्यांच्याशी सहमत नसल्याचे स्वातंत्र्य वापरतो. ज्ञानेश्वरांबद्दल आपण म्हणता हा एक आपला द्रुष्टीकॉन आहे...त्या कालात वाचताही येत होत आणि पारायनेही होत होती हे बहुदा आपल्याला माहित नाही. वाचता येणे म्हणजे स्वातंत्र्य असते हे एक पाया म्हणुन कदाचित ठीक असेल्...पण म्हणुन स्वातंत्र्य आले असे आपण मानत असाल तर आपनही एका बंदिस्त विचारव्युहात आहात असेच म्हणावे लागेल. वाचता आले म्हणजे अर्थ समजत नाही,. अर्थ समजला म्हनजे विचार बनत नाहीत्...आणि विचार बनले म्हणजे अर्थ समजला असेही होत नाही.
ज्ञानेश्वरांच्व्हे काव्य समजले नसते तर ज्ञानेश्वर कधीच विस्म्रुतीत गेले असते. किंबहुना आर्यभटाने गोलाध्यायातील ९ व १० श्लोकात इ.स.५ व्या शतकात जे लिहिले ते १३ व्या शतकातील ज्ञानेश्वरांच्या ग्रंथात (सुर्यकेंद्रित सिधांत) आजही महत्वाचा ठरतो. ते स्वतंत्र होते.
वाचता आले म्हणजे अक्कल येते असे नव्हे. दलित वगैरे आपण जे शब्द वापरता याला काहीएक अर्थ नाही. दलित संत झालेच कि! कोणी अडवले त्यांना? ते स्वतंत्र होते. आपण स्वतंत्र नाही. आपण स्वतंत्र नाहे हेच वास्तव आहे.
पुर्वी कसे छान छान होते,....या कविकल्पनेत मे रममान नाही, पण आम्ही कोणअते नवे दिवे लावलेत याबद्दलही बोलुयात. इंटरनेट क्रांती बोलायला सोपी आहे, पण ख-या मानवे जीवनात या क्रांतीने काय बदल घडवला हेही जरा तपासुन पहायला हवे. मुय्ख्य प्[रश्न आहे आम्ही या क्रांतीने स्वतंत्र झालोत काय?
राहिले दलितांचे...मित्रा, सांगली जिल्ह्यात, जो बुद्धिष्ट झाला नाही असा माझा महार मित्र आणि संशोधक, त्याला मंदिर प्रवेश करु दिला गेला नाही. आपण कोणत्या स्वातंत्र्याच्या वल्गला करत आहोत बरे?
धन्यवाद
याबद्दल मी एक लेखमाला लिहीत आहे. त्याच्या चौथ्या भागाचा दुवा वर दिलेलाच आहे. त्यात आधीच्या भागांचेही दुवे आहेत. ते तपासून पहावे.
एकंदरीत या लेखात व प्रतिसादात तुम्ही तपासून बघता येण्याजोगी सर्वसाधारण विधानं करण्याऐवजी वैयक्तिक अनुभव व मतं मांडलेली आहेत. मला तसं लेखन विशेष भावत नाही. कारण मला जे वाटतं त्याच्यापेक्षा तुम्हाला वेगळं वाटतं इतकं समजण्यापलिकडे हाती काही गवसत नाही. माझ्या कल्पनेपेक्षा सत्य काही वेगळं आहे हे त्यातून मला पटू शकत नाही. तेव्हा चर्चा इथेच थांबवतो.
राजेश जी, आपली लेखमालिका
राजेश जी, आपली लेखमालिका वाचली. आपली शैली वेगळी आहे. विचारही अर्थात वेगळे आहेत. परंतु माझ्या लेखाचा विषय व आपल्या लेखमालिकेचा विषय वेगळा आहे. मानवी स्वातंत्र्य व तिच्या सापेक्ष मर्यादा दर्शवणे एवढाच माझ्या लेखाचा विषय आहे. त्या आहेत कि नाहीत यावर प्रत्येकाचे स्वतंत्र मत असु शकते. प्रत्येकजण आपापल्या अनुभवाप्रमाने ते पडताळुन पाहु शकतो. उदा. भारत खरोखर स्वतंत्र आहे काय? याची अनेक उत्तरे असु शकतात. प्रत्येक पक्षाल प्रतिपक्ष हा असतोच, त्यामुळे काही उदाहरणे देत आपला मुद्दा ठसवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा प्रत्येकाने स्वतंत्र विचार करावा असे मला वाटते. किंबहुना असे स्वातंत्र्य असु देणे मला मला महत्वाचे वाटते. शिवाय हे मुक्त चिंतन आहे हे मी नमुद केलेले आहेच. या लेखातुन आपल्या हाती काही गवसले नाही याचा मला नक्कीच खेद आहे. तरीही आपण आवर्जुन प्रतिक्रिया दिलीत याबद्दल मी आपला आभारी आहे.
मालक होणे टाळा
याआधी अनेक प्रतिक्रीयात दिले आहे ते लिंकन साहेबांचे माझे अत्यंत आवडते वाक्य इथे पुन्हा देतो.
"मला गुलामगिरी आवडत नाही. म्हणून मी मालक होणे नाकारतो"
तेव्हा मालक न होणे, न व्हावेसे प्रत्येकाला वाटेल तेव्हा गुलामगिरीचा शेवट होईल
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सरसकट विधानं आणि त्यांतून उत्पन्न होणारे प्रश्न
सरसकट विधानं असली की ते विधान कुठे लागू होतं आणि कुठे नाही याविषयी लेखकाला काय म्हणायचं आहे याविषयीच कधीकधी गोंधळ निर्माण होतो. उदाहरणार्थ :
माणूस विचारसमूहाचा गुलाम कधी होतो, आणि केव्हा एखादा विचार पटतो म्हणून तो अंगिकारतो हा प्रश्न हे प्रकटन वाचून मनात उभा राहिला. उदाहरणार्थ, मी अठराव्या शतकातला पुरुष असतो, तर 'पत्नीची जागा घरात आणि पतीच्या पायाशी' या विचारसमूहाचा मी गुलाम असतो असं म्हणता येईल कदाचित, पण मी एकविसाव्या शतकातला पुरुष असेन, तर 'पत्नीची जागा पतीच्या बरोबरीची' या विचारसमूहाचा मी गुलाम आहे असं म्हणावं का? (कारण आज असा विचार एक विचारसमूह म्हणण्याच्या लायकीचा असावा असं वाटतं.) जर तसं (म्हणजे 'स्त्री-पुरुष समानतेच्या बाजूच्या विचारसमूहाचा मी गुलाम आहे' असं) म्हणता येत नसेल तर मग मी दबावापासून आपलं स्वतंत्र अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करतो (किमान स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीत) असं म्हणता येईल का? आणि तसं असेल तर मग असे लोक पुष्कळदा अयशस्वीच होतात असा धागालेखकाचा दावा आहे का?
प्रस्तुत धागा वाचून असे प्रश्न मनात उभे राहतात. त्यामुळे धागालेखकाला नक्की काय म्हणायचं आहे ते कळेनासं होतं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
चिंतातुरजी आपण म्हणता:
चिंतातुरजी आपण म्हणता: --------माणूस विचारसमूहाचा गुलाम कधी होतो, आणि केव्हा एखादा विचार पटतो म्हणून तो अंगिकारतो हा प्रश्न हे प्रकटन वाचून मनात उभा राहिला. उदाहरणार्थ, मी अठराव्या शतकातला पुरुष असतो, तर 'पत्नीची जागा घरात आणि पतीच्या पायाशी' या विचारसमूहाचा मी गुलाम असतो असं म्हणता येईल कदाचित, पण मी एकविसाव्या शतकातला पुरुष असेन, तर 'पत्नीची जागा पतीच्या बरोबरीची' या विचारसमूहाचा मी गुलाम आहे असं म्हणावं का? (कारण आज असा विचार एक विचारसमूह म्हणण्याच्या लायकीचा असावा असं वाटतं.) जर तसं (म्हणजे 'स्त्री-पुरुष समानतेच्या बाजूच्या विचारसमूहाचा मी गुलाम आहे' असं) म्हणता येत नसेल तर मग मी दबावापासून आपलं स्वतंत्र अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करतो (किमान स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीत) असं म्हणता येईल का? आणि तसं असेल तर मग असे लोक पुष्कळदा अयशस्वीच होतात असा धागालेखकाचा दावा आहे का?-------------
विचार पटले म्हणुनच अंगिकारले असे आपण म्हणता तशा उदाहणांबाबत सहसा होत नाही. शक्यतो ज्यातुन सुरक्षितता लाभेल, लाभ होतील असे विचार मनुष्य स्वीकारतो...पण ते त्याचे स्वतंत्र विचार असतात असे नाही. "पत्नीची जागा पतीच्या बरोबरची" वा स्त्री-पुरुष समानता या विचारव्युहातही नेमकी तीच बाब दडलेली आहे. स्त्रीयांना समान दर्जा मिळावा यासाठी पार कायदेही करावे लागतात आणि तरीही जवळपास जगभर ही असमानता प्रत्यक्ष वा मानसीक पातळीवर अस्तित्वात असते. माझे वर्तन नेमके कसे असावे याबाबत मला बाह्य वैचारिक व्युहांवर अवलंबुन लागत असेल तर ती गुलामीच आहे. प्रत्येक व्यक्ती ही जन्म होतो तेंव्हा स्वतंत्र असते पण समाजात प्रवेशताच त्याच्या गुलामगिरीचा प्रवास सुरु होतो असे एका पास्चात्य विचारवंताने (बहुदा कांट) म्हटले होते. कोणत्याही बाह्य विचारव्युहांची स्वतंत्र विचार न करता केलेली अंध अनुसरणे ही गुलामीचीच लक्षणे आहेत.
प्रश्न निर्माण होण्यासाठीच धागा आहे त्यामुळे जर आपल्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले असतील तर आनंद आहे. कोणताही विचार लादण्यासाठी मुळात हा लेख नाही. धन्यवाद.
पुन्हा एकदा सरसकटीकरण
अशा सरसकटीकरणांमुळेच मूलभूत शंका उपस्थित होतात. हेच विचार पुढे नेले तर असं म्हणता येईल की जगातल्या कोणत्याही माणसानं अवलंबलेला कोणताही विचार हा त्याच्या गुलामगिरीचंच लक्षण आहे. 'मी स्वतंत्र विचार करून अशा निष्कर्षाप्रत पोहोचलो की अमुक विचारव्यूह अनुसरणं तमुक विचारव्यूहाला अनुसरण्यापेक्षा अधिक चांगलं आहे आणि म्हणून मी तो अनुसरतो' असं कुणीही कितीही ओरडून सांगितलं तरी ते खरं आहे की नाही हे शोधून काढणं सध्या तरी अवघड (किंवा अशक्यच) आहे कारण त्यासाठी समोरच्या माणसाचं मनच वाचावं लागेल.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
पण कोणाला खरे वाटते आणि
पण कोणाला खरे वाटते आणि कोणाला नाही हे जाणुन घेण्याची आवश्यकता तरी काय? "मला असे वाटले म्हणुन मी असे केले" एवढे पुरेसे आहे. मी याला उत्स्फुर्ततावाद म्हणतो. कोणाला काय वाटेल असे वाटुन केलेले वा न केलेले वर्तन हेही स्वातंत्र्य आक्रसणारी बाब आहे. त्या अर्थाने आपण बव्हंशी सगळे गुलाम असतो. चौकटीत बंदिस्त स्वातंत्र्य (ते थोडेफार सैल असले तरी) हे स्वातंत्र्य नसुन तडजोडीचे स्वातंत्र्य आहे असे म्हणण्यास वाव आहे. पण त्याला निखळ स्वातंत्र्य कसे म्हनता येईल?
उत्स्फूर्त विधाने
मग त्याच नात्याने 'मला वाटते म्हणून हे सर्व जग गुलामांनी भरलेले आहे' असे तुमचे विधान निव्वळ उत्स्फूर्त आहे; त्याला वास्तवाचा आधार नाही असे म्हणता येईल का?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
---------मग त्याच नात्याने
---------मग त्याच नात्याने 'मला वाटते म्हणून हे सर्व जग गुलामांनी भरलेले आहे' असे तुमचे विधान निव्वळ उत्स्फूर्त आहे; त्याला वास्तवाचा आधार नाही असे म्हणता येईल का?-----------
पहिली बाब म्हणजे मला वाटते म्हणुन हे जग गुलामांनी भरलेले आहे असे विधान मी केलेले नाही.
काहीही "वाटण्या"चा उत्स्फुर्तपणा वास्तवाच्याच पातळीवर जातो. ते व्यक्तिगत अनुभव्/निरिक्षण व विचारांचे वास्तव असते. मी आपल्या "इतरांना खरे कसे वाटेल? या आपल्या विधानासंदर्भात मी उत्स्फुर्तपणा नोंदवला आहे. एखाद्या वर्तनाचे स्पष्टीकरण वा त्यातील सत्यता कोणाला कंठशोष करुन पटवण्याची आवश्यकता नाही, "मला वाटले म्हणुन एखादा विचारव्युह निर्माण केला वा स्वीकारला" एवढ्यापुरते उत्स्फुर्ततावादाबबतचे विधान आहे. अनेक विचार अनेक लोक कोणाला काय वाटेल वा काय संभाव्य परिणाम असतील याचा "विचार" करुन दडपतात वा ते काही प्रमाणात बदलुन मांडतात. ते योग्य कि अयोग्य हा वेगळा मुद्दा झाला. प्रश्न मनुष्यजात स्वतंत्र आहे कि नाही हा आहे. ते प्रत्येकाने आपापल्या स्वतंत्र मतांनी ठरवायचे आहे. आपल्या कोनत्याही वाटण्यावर बाह्य दबावघटक अंमल गाजवत नाहीत ना हेही बघावे लागते. आजही असंख्य लोक आपापली मते वृत्तपत्रे वाचुन, वाहिण्यांवरील कार्यक्रम पाहुन वा व्याख्याने-भाषणे ऐकुन बनवत असतात. आपल्याला अनुकुल जनमत तयार व्हावे यासाठी नेते (धर्मनेतेही) आपापल्या मतांचा प्रचार करत जनमत अनुकुल करुन घेत असतात. माणसे अनुकुल वा प्रतिकुल होत जातात कारण त्यांनी स्वतःचे मत बनवण्याचे कष्ट घेतलेले नसतात. लोकानुययी लिहिणे/बोलणे हेही स्वतःला बंदिस्त करणारे घटक नव्हेत काय?
चर्चा पुढे नेल्याबद्दल धन्यवाद.
सरसकटीकरण आणि सत्याधार
प्रकटनात खूप सरसकटीकरण आहे आणि केलेल्या विधानांच्या सत्यासत्यतेसाठी कसला आधार दिलेला दिसत नाही. त्यामुळे ते प्रकटन 'मला वाटते ते असे' या पातळीवर राहते.
एकीकडे असं म्हणत असताना तुम्ही 'जगणारा जवळपास प्रत्येकजण विचारव्यूहांचा गुलाम असतो' वगैरे विधानं करता. एखाद्यानं एखादा विचारव्यूह स्वीकारला तर ते त्याचं व्यक्तिगत वास्तव म्हणून मान्य करण्यापेक्षा त्याला त्या विचारव्यूहाचा गुलाम मानणं हे मग त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत वास्तवाला नाकारतं. यात विरोधाभास आहे.
प्रचार अनेक बाजूंनी होतो - उदाहरणार्थ डावी/उजवी विचारसरणी वगैरे. व्यक्ती त्यातली एक बाजू स्वीकारते तरीही तिला गुलामच म्हणणं फार सरसकट वाटतं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
चिंतातुरजी, मला जे म्हणायचेय
चिंतातुरजी, मला जे म्हणायचेय तेच तुम्ही वेगळ्या पद्धतेने म्हणताय. विचार डावा असो कि उजवा वा मध्यम, शेवटी असतो एक विचारव्युह जो आपापले अनुयायी/समर्थक वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. माझी स्वातंत्र्याची कल्पना त्या अर्थाने मुक्त स्वातंत्र्याचे कल्पना आहे हे खरे तर लेखातुनच मांडली आहे. मनुष्य जेंव्हा कोनत्याही विचारव्युहात बंदिस्त होतो तेंव्हा तो आपले स्वातंत्र्य संकुचित करत असतो, एवढेच मी म्हटले आहे. ती गुलामी असते कारण एखाद्या विचारव्युहात गेलेल्या माणसाला सहजी तो सोडण्याचे स्वातंत्र्य नसते...असले तरी ते अत्यंत मर्यादित असते. अशी गुलामी वरकरणी जाणवत नाही, कारण मुळात आपण गुलाम आहोत हे कबुल करण्याची मानसिक तयारी नसते. बंधनयुक्त जीवन वरकरणी आदर्शभुत वाटु शकते..नीतितिमानही वाटु शकते, परंतु जेंव्हा नीतिशास्त्रेच नैतिक बंधनांची व्यर्थता तत्वज्ञानाच्या पातळीवर सिद्ध करतात तेंव्हा मग नीतितत्वे आणि मानवी वर्तनातही एक संघर्ष निर्माण होतो. आदर्श स्वातंत्र्याची अवस्था एक कविकल्पना, कधीही अस्तित्वात न येवू शकणारी स्थिती आहे असे मानले तरी स्वातंत्र्याचा विकास व्हावा, होवु द्यावा यासाठी आपलेच विविध विचारव्युह अडथळे बनत असतात. मग ते कायद्यांचे असोत, अर्थव्यवस्थांचे असोत कि धर्म्/जाती/पंथांचे. येथे आपण म्हणता त्यासाठी सत्यासत्यतेसाठी आधार दिलेले नाहीत हे खरेच आहे. पण मी म्हणतो म्हणुन खरेच माना असाही अट्टाग्रह नाही. आकडेवा-या वा उद्घ्रुतांनी सर्वच मुद्दे सिद्ध होतात वा सत्य वाटु शकतात असेही नाही. पुन्हा एकच्...आपण स्वतंत्र आहोत असे आपल्याला खरेच वाटते काय? वरकरणी तसे वाटु शकते व त्यासाठी अनेक उदाहरणे देता येतील. पण आपण परतंत्र आहोत काय तर त्यासाठीही असंख्य उदाहरणे देता येतील. "प्रत्येकजण आपापल्या स्थितीचा गुलाम असतो व गुलामीतील मर्यादित स्वातंत्र्य उपभोगत असतो" हे विधान उभयपक्षी उदाहरणांना लागु करुन दाखवता येईल. विचारव्युहानिशी मुळात स्वातंत्र्याचीच व्याख्या बदलत असेल तर काय, हाही एक प्रश्नच नव्हे काय? येथे "स्व" दुर्लक्षीत राहतो आणि नेमके मला हेच म्हणायचे आहे.
धन्यवाद.
मानसिक गुलामी कशाला म्हणावं
मानसिक गुलामी कशाला म्हणावं आणि (भारतीय + जागतिक) समाज आत्तापर्यंत प्रगतीच करतो आहे हे मलाही मान्य आहे. त्याशिवायः
१. उत्क्रांतीमधे कळप मानसिकता नसणारे मेले. जगण्यासाठी, टिकून रहाण्यासाठी कळप मानसिकता आवश्यकच आहे. तिचा १००% त्याग करणं शक्य नाही.
१अ. व्हॅन डॅनिकेनचं काही लिखाण वाचलेलं आहे, काही रूपांतरीत लिखाण वाचलेलं आहे, त्याचे काही टीव्ही-कार्यक्रम पाहिले आहेत. त्याच्या सिद्धांतात फार काही तथ्य असावं असं मला वाटत नाही. व्हॅन डॅनिकेन उत्क्रांतीसाठी पुरावे मानले जाणार्या कोणत्याही अवशेषांचं स्पष्टीकरण देताना दिसत नाही. माणूस ही जमात आकाशातून पडलेली आहे यावरही माझा विश्वास नाही. (किंवा माझा उत्क्रांतीवर असणारा विश्वास गुलाम/कळप मानसिकतेचा परिपाक आहे. )
मनुष्य इतर प्राण्यांपेक्षा एवढा वेगळाच आहे हे काही पटत नाही. हत्ती, गेंडे, बायसन हे प्राणी आकाराने प्रचंड आहेत म्हणून ते वेगळे समजावेत का? संभोग सुरू असतानाच नराला खाणारी मादी (Sexual cannibalism) हे प्राणी इतरांपेक्षा वेगळे समजायचे का? मनुष्यांचं बचाव साधन आणि पोट भरण्याचंही साधन आहे बुद्धी. इतर प्राण्यांमधे इतर काहीबाही असतं. इतर प्राण्यांमधे या क्षमता (कम्युनिझमप्रमाणे) समप्रमाणात वाटलेल्या नसतातच. प्राण्यांमधेही आपसात मारामार्या चालतात, दुर्बळ प्राणी पुनरूत्पादनाच्या वयापर्यंत पोहोचत नाहीतच. मनुष्यांमधे बुद्धी हे साधन असल्यामुळे मारामार्या होत नाहीत, पण कमी बुद्धीच्या लोकांना सुंदर, हुशार पार्टनर मिळाल्याची किती उदाहरणं आसपासतरी दिसतात? विशेषतः अलिकडे! (याचा संबंध पुन्हा आज आपण आधीच्या कोणत्याही काळापेक्षा अधिक प्रगत आहोत याच्याशी लावता येईल.)
२. प्रत्येक वेळेस, प्रत्येकाने चाकाचा शोध लावण्याची गरज नसते. समूहाच्या शहाणपणावर विश्वास टाकून अनेक गोष्टी शिकता येतात.
३. प्रत्येकाला, प्रत्येक विषयात गती असणे अशक्य आहे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीची सत्यासत्यता शोधणंही अशक्य आहे. माणूस चंद्रावर गेला का नाही याची शहानिशा अमर्त्य सेन आणि भीमसेन जोशींनीही करावी अशी अपेक्षा नसते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अदितीजी, टिकुन राहण्यसाठी कळप
अदितीजी, टिकुन राहण्यसाठी कळप मानसिकता आवश्यक असते जसे अन्य अनेक प्राणी/पक्षीही कळपाने/थव्यांनी राहतात. त्यात सुरक्षिततेचा एक भाग असतोच. मनुष्य समाज करुन राहतो ते यासाठीच. गरजांच्या वाढीमुळे त्याचे परस्परावलंबित्व वाढले आहे हेही खरेच आहे. प्रत्येकजण आपल्या गरजा भागवू शकेल अशी स्थिती आज उरलेले नाही. हे अवलंबित्व किती मर्यादेपर्यंत असावे? ते वाढत चालले आहे हे तर आपण पहातच आहोत आणि त्याला आपण प्रगती समजतो.
डानिकेनचे म्हणने मी फक्त उल्लेखले. मलाही ते मुळीच मान्य नाही. सनसनाटी निर्माण करण्यासाठी वा आपला तर्क रेटण्यासाठी त्याने त्याचे लेखन केले एवढेच. प्रत्येक प्राण्याला जशी वैशिष्ट्ये आहेत तशीच माणसालाही मिळाली आहेत याशे मी आपणाशी सहमत आहे. फक्त जी वैशिष्ट्ये त्याला मिळालेली आहेत त्याचा कितपत वापर तो करतो...करू इच्छितो वा तसा प्रयत्न करतो हाही एक प्रश्नच आहे. प्रत्येकाला प्रत्येक विषयात गती असु शकत नाही हेही खरेच आहे. पण तो प्रश्न नसुन प्रश्न हा आहे कि ज्यात गती आहे त्यात मुक्त वाव देण्यासाठी तसे वातावरण असते काय? एक उदाहरणच द्यायचे झाले तर आपल्या पाल्याने काय शिकावे याचा निर्णय त्याचा कल बघुन न घेता त्याच्यावर बव्हंशी पालक आपली मते लादत असतात. म्हणजे पाल्याच्या नैसर्गिक स्वातंत्र्याचा संकोच केला जातो असे नाही काय? असे आपण अनेक बाबींत घडतांना बघत असतो. म्हणजेच समुह व्यक्तीचे स्वातंत्र्य अनेक मार्गांनी संकोचित करत असतो.
एकदम पटले.
ह्यालाच कंपू असाही एक समानार्थी शब्द आहे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
हे अवलंबित्व किती
प्रगतीमुळे एकमेकांवर अवलंबून असणं वाढणार हे विधान मला ठराविक साच्यात मान्य आहे. औद्योगिक क्रांतीनंतर हळूहळू आवश्यकता असणार्यांतली एखादी गोष्ट आपण बनवायची आणि ती विकून इतर सर्व गोष्टी विकत आणायच्या अशी व्यवस्था आहे. या व्यवस्थेमधे एकमेकांवर अवलंबून असणं जेवढं अधिक तेवढी भौतिक प्रगती अधिक असं ढोबळ विधान करता येईल. त्या अर्थाने आज सर्व देश एकमेकांवर अवलंबून आहे, सर्व व्यक्ती एकमेकांवर अवलंबून आहेत, इ.इ.
पण विचारांच्या बाबतीत लादलेपण आणि अवलंबित्त्व कमी होत आहे. आज पालक मुलांवर काय शिकावं हे लादत असतील तर शंभर वर्षांपूर्वी मुलांना शिक्षणच मुळात उपलब्ध नव्हतं (किंवा अत्यल्प प्रमाणात होतं) हे पहावं लागेल. किंवा पंचवीस वर्षांपूर्वी जेवढे पालक मुलांवर आपले विचार लादत असत त्यापेक्षा आज कमी प्रमाणात पालक मुलांवर विचार लादतात असं दिसेल. एकेकाळी पालकांचं उत्पन्न कितीही कमी असेल, आर्थिक विपन्नता असेल तरीही मुलांना पालकांचाच व्यवसाय स्वीकारावा लागत असे - जातीव्यवस्था. आज किती प्रमाणात जातीव्यवस्था अशा प्रकारे राबवली जाते? आणि आज पालक मुलांना, मुलांच्या भल्याच्या नावाखाली का होईना, पण भरपूर पैसे मिळतील अशा प्रकारचं शिक्षण घेण्यास भाग पाडतात.
मुलांना मारू नये वगैरे गोष्टीही भारतात गेल्या दहा-एक वर्षांत आलेल्या असतील.
आत्ताच बोर्डावर 'आईची जात' नावाचा धागा आहे; पंचवीस वर्षांपूर्वी किती प्रमाणात आंतरजातीय विवाह होत होते? आंतरजातीय किंवा सगोत्र विवाह करू नये या प्रथा किंवा समज किती प्रमाणात टिकले आहेत?
"बाबा, तुम्हाला यातलं काही कळत नाही!" अशी वाक्य पन्नास वर्षांपूर्वी फिक्शन्समधे होती का? (माझं कथा-कादंबर्यांचं वाचन कमीच आहे, त्यामुळे तपशीलात चूक असू शकते. 'असा मी असामी'मधे शंकर्याही वडलांना सरळच असं म्हणत नाही.) तुलनेने नवीन असणार्या 'गंगाधर टिपरे' किंवा 'बोक्या सातबंडे' प्रकारच्या फिक्शन्समधे अशी वाक्य सर्रास येतात आणि बाप-लेकांना त्यात काही आश्चर्य वाटत नाही.
हे तत्त्वतः मान्य आहे. पण त्याचा विरोध करण्याचं स्वातंत्र्य अल्पसंख्यांकांना आज आहे का नाही याचा विचार करावा लागेल. एकेकाळच्या कायद्यात समलैंगिकता हा कायद्याने गुन्हा होता, समलैंगिकता विकृत समजली जात असे. आज 'प्रगत' समाजात समलैंगिकता सहज स्वीकारली जाते. किमान समलैंगिकांना वेगळं समजणं पोलीटीकली करेक्ट समजलं जात नाही.
एकेकाळी वर्तमानपत्र, थोडक्यात प्रसिद्धीसाधनं मोजक्या धनिक किंवा राजकारणी लोकांच्या हातात होती. आज प्रसिद्धीसाधनं सामान्य माणसांच्या आवाक्यात आलेली आहेत. कोणताही राजकीय संपर्क नसणारी माझ्यासारखी मध्यमवर्गीय व्यक्ती आपले विचार, बसल्याजागी जगापर्यंत पोहोचवू शकते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
स्वातंत्र्य आणि त्याचं संकुचित होणं
तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे हे अजूनही बर्यापैकी धूसर आहे. उदाहरणार्थ, भारतात जाती-पोटजाती पाहून लग्न केलं जातं म्हणून बहुतांश भारतीयांचं हव्या त्या व्यक्तीशी विवाह करण्याचं स्वातंत्र्य संकुचित होतं असं आपण आतापुरतं मानूया. पाश्चिमात्य देशांत हव्या त्या व्यक्तीशी विवाह करण्याचं अथवा विवाह न करता एकत्र राहण्याचं स्वातंत्र्य असेल असंही आतापुरतं मानूया. या दोन्ही बाबी जर वादापुरत्या खर्या मानल्या, तर तुमच्या प्रकटनावरून आणि आतापर्यंतच्या प्रतिसादावरून असं वाटतं की पाश्चिमात्यांची संस्कृतीदेखील त्यांच्यावर हव्या त्या व्यक्तीशी विवाह करणं अथवा न करणं लादते आणि तिथल्या व्यक्तींचं स्वातंत्र्य संकुचित करते असं तुम्ही म्हणाल. म्हणजे माणूस कसाही वागला तरी तो कोणत्या ना कोणत्या विचारव्यूहाचा गुलामच असणार असं तुम्ही ठरवूनच टाकलं आहे असं वाटतं. तसं ते नसेल तर मग तुम्हाला काय अभिप्रेत आहे ते सांगा.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
तर तुमच्या प्रकटनावरून आणि
तर तुमच्या प्रकटनावरून आणि आतापर्यंतच्या प्रतिसादावरून असं वाटतं की पाश्चिमात्यांची संस्कृतीदेखील त्यांच्यावर हव्या त्या व्यक्तीशी विवाह करणं अथवा न करणं लादते आणि तिथल्या व्यक्तींचं स्वातंत्र्य संकुचित करते असं तुम्ही म्हणाल
-नाही. मी असे नक्कीच म्हणनार नाही. कोणी कोनाशे विवाह करावा, न करावा, न करता एकत्र रहावं... याचे स्वातंत्र्य त्या त्या व्यक्तीला असले पाहिजे असेच मी म्हणेन. माणुस "कसाही" वागला तरी तो कोणत्या ना कोनत्या विचारव्युहाचा गुलामच असणार" असे मी ठरवून टाकले नसून माणसाचे स्वातंत्र्य संकुचित करत नेणा-या अर्थ-राज्य-धर्म-सामाजिक इ. व्यवस्थांतील अविरत प्रक्रिया-प्रतिक्रियांमुळे मनुष्य गुलाम होत जातो असे माझे मुळ म्हणणे आहे.
"मुळात मानवी जीवनधारणांचा नेटका अर्थ न समजल्याचे लक्षण म्ह्णजे कोनत्या ना कोणत्या विचार व्युहाची वा सत्तेची (मग ती अर्थसत्ता असो कि धर्मसत्ता, संस्कृतीसत्ता असो कि राजसत्ता...) मानसिक गुलामी. या गुलामीमुळे मानव अनेक न पटणा-या गोष्टीही एक तडजोड म्हणुन करत जात गाळात रुतत जातो. किंबहुना तसे केले नाही तर आपल्याच अस्तित्वावर गदा तर येणार नाही ना असा प्रश्नही त्याला छळत असतो. एकार्थाने प्रत्येक व्यक्ती एक दुभंग जीवन जगत असतो.".......असे लेखात मी म्हटले आहे. हा दुभंग नाकारणे यालाच मी स्वातंत्र्य म्हणतो.