हक्क
वस्त्तीतल्या दोघा भावांची भांडणं लैच गाजली. जोसेफ अंकल वारले.
ब्याऎंशी वर्षाचे होऊन.
आयुष्यातल्या एका नाजुक क्षणी चिल्या पिल्यांची भुक
पाहुन येशूबाप्पाला शरण गेले. आयुष्यभर बाप्पाशी प्रमाणिक राहिले.
बाहत्तरच्या दुष्काळात शहरात जगायला आलेलं हे कुटुंब . खेड्यातलं ठीक होतं.
पण पुण्यात येऊन मुलं वैतागली. थोरला जास्तच ! त्याच्या मुलांना अडचणी येऊ लागल्या ओपन म्हणुन. थोरला जोसेफ अंकलला शिव्या घालु लागला धर्म बदलला म्हणुन. अंकल हताश झाले. पोरांना लहानपणच्या भुकेची आठवण करुन देणं त्यांना काही जमेना एक दिवस थोरला कागदपत्राची भेंडोळी घेऊन माझ्याकडे आला.
जातीचा दाखला पायजेल. ह्या कागदानं काय जमतय का बघ नायतं गावाकडं जाऊन पुरावं आणतो म्हटला. त्याला जातीचा दाखला काढुन दिला
त्याची अडचण दुर झाली.धाकट्याच्या बायकोन धाकट्यामागं टुमनं लावलं. दाखला पायजेल म्हणजे पायजेल बास्स !
धाकटा बाप्पाच्या मार्गावरचा, त्याने सपशेल नकार दिला.
विथ गालीगलोच ! खटके उडु लागले. घरातलं वातावरण पार
बदललं. बिघडलं ! घरातल्या एकाच भिँतीवर बाबासाहेब आन् येशू
बिनातक्रार राहु लागले,घरातली भांडणं मुकाट पाहू लागले.
अंबाबाई आत कोपर्यात निवांत बसलेली होतीच. ती कुणाच्या अध्यात
ना मध्यात.म्हातारीच्या हळदी कुंकवापरतीच धनीन ती !
मध्ये म्हाडाने घरे बांधुन दिली.अंकलनी गृहप्रवेशाचा कार्यक्रम ठेवला.
पहिली उघड चकमक वस्तीसमोर त्या दिवशी. झडली
भन्ते अन् फादर दोघंबी घरात. दोघं गपचिप !
दोघांच्या विधीशिवायच गृहप्रवेश पार पडला. दोघं (भन्ते न् फादर ) न
कुरकुरता जेवनं खावनं करुन गेले. हे असं नंतर चालुच
राह्यलं. वंदना आणि प्रे घरात धुरळा उडवीतच राह्यल्या.पोरांची मातर चंगळ झाली. आंबेडकर जयंती अन् नाताळ दोन्हीत पोरांचा सुकाळ !
असेच दिवस सरत गेले. अन् एक दिवस अंकलनी हेच चित्र डोळ्यात साठवुन डोळे कायमचे बंद केले.
वस्तीतला मुकुंदा, म्हणजे मोके कि तलाश मधला डेंजर व्हाँलिंटर !
(वस्तीत मयत म्हणजे ह्याजसाठी समाजसेवेचा दांडगा मोकाच !)
म्हणजे वस्तीत माणुस मेला कि. ह्याच्या अंगात चैतन्यच सळसळतं आजारी माणसाच्या,
(जायच्या मार्गावरल्या)
खोलीत ह्यानं दोन चकरा टाकल्या की आठ दिवसानी खपणारं माणुस चारच दिवसात निरोप घेतं अशी ह्या गड्याची दांडगी ख्याती. स्टाईल जबरा ! मृताच्या कुटुंबातील एखाद्या बाप्याला गळ्यात घेतो. अन् रडणार्या बाप्याला डायरेक्ट मुद्द्यावर येऊन प्रश्न विचारतो , किती मण लाकडं ? गाडी आणाय कोण गेलय ?
राकेल लवकर आणुन ठिवावं काय ? नंतर चारभुजा दुकान बंद करतो . कसं करावं ?
यासदृष चिक्कार प्रश्नांचा भडीमार ! मुकुंदाने जोसेफ
अंकलच्या थोरल्याला गळ्यात घेतलं अन् विचारलं भन्ते
का फादर ? झटक्यात दुःखावेगातुन बाहेर येत थोरला म्हणाला भन्ते !
धाकटा ठामपणे म्हणाला फादर.
अंकल खाटावर निवांत निपचीत खुडूक . बाहेर घंगराघोळ चर्चा. तिढा वाढतच चालला.
तेवढायात नगरसेवक आला. त्याचा गळ्यात घेऊन रडायचा कार्यक्रम झाला. भन्ते, फादर, काँफीन,काचेची गाडी नेमकं काय ? या वितंडवादात आपल्या उपस्थितीची योग्य दखल घेतली जात म्हणुन वैतागला.
जाळायचं का पुरायचं हे ठरलं की.
फ़ोन कर. असं कार्यकर्त्याला बजावुन तो निघुन गेला. वस्ती वैतागली,अंकल वैतागले.
जाणत्यांनी पोरांना शिव्या घातल्या. जोसेफ अंकलचा धर्म शेवटी महत्त्वाचा यावरच शिक्कामोर्तब झालं. फादरना मान मिळाला.मुकुंदा लगबगीने काँफीनसाठी धावला.
अंकलचा मृतदेह गापकन् सैल झाला.
येशूच्या फैलावल्या हाताकडे बंद डोळ्यांनीच पाहू लागला. मिठीत जाण्यासाठी आतुर झाला.आणि मंग आत्ता कुठे वस्तीने जना म्हातारीचा हुंदका ऎकला !
आता वस्तीने नुकतंच पुण्यानुमोदनाचं जेवन केलंय.चाळीसाव्याला पुन्हा जेवन आहेच. मग येता काय वस्तीत ?
प्रतिक्रिया
शैली आवडली.
मांडण्याची शैली आवडली.
हे जग प्रत्यक्षात कधी बघितलेलंच नाही. सतीश लिहीत रहा. लिखाण आवडलं असं म्हणवत नाही, पण न वाचणं म्हणजे परिस्थिती नाकारणं आहे.
अवांतरः एकेकाळी, टिळकांच्या मागून गांधीजींचा नेता म्हणून उदय झाला तेव्हा अनेक घरांमधे अशीच फूट पडली होती. दादासाहेब खापर्डे हे नाव ऐकून माहित असेल, त्यांचं घरही तसंच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अवांतराबद्दल: ?
?
?
शैली मस्त आहे एकदम.
शैली मस्त आहे एकदम. अपॉलोजेटिक किंवा दीनवाणे किंवा धीरगंभीर यांपैकी कुठलीही शैली न वापरता मिस्किलपणामुळे कथा अजूनच भेदक झालीये.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हे जग!
हे जग जवळून पाहिलंय. पण तुमच्या पाहुण्याच्या पोरीसारखं काठावरून.
अप्रतिम उतरलंय. खासकरून नगरकडच्या नातेवाईकांत जीझस की बाबासाहेब हा प्रश्न उठताना पाहिलंय.
यथार्थ चित्रण.
आज बर्याच दिवसांनी ऐसी अक्षरे वर आल्याचं सार्थक झालं.
१+
जबरदस्त लेखन.
लेखकाचे अभिनंदन
साती अनंत ढवळे
साती , अनंत ढवळे मनःपूर्वक आभार !