आईचं घर ( वाडा म्हणजे संस्कारांची खाण )
खरंच ! आईच्या घराशी माझं फार जवळचं भावनिक नातं आहे. माझा जन्मच मुळी शनिवार पेठेतला, १९५६ सालचा , माझ्या मोठया भावाचा , विनोद रावांचा ( आता रिटायर्ड कंपनी सेक्रेटरी ) माझ्या आधी दोन वर्ष, माझी धाकटी बहिण, वीणा ( पेंडसे - फडके ) माझ्यापेक्षा २ वर्षांनी लहान, जी सध्या ' आई रिटायर होतेय ' मधे आईची भूमिका करत असते. शनिवार पेठेत म्हणजे ३७३, शनिवार : कन्याशाळा ते सुयोग मंगल कार्यालय यांना जोडणाऱ्या गल्लीत . सुयोगच्या पलिकडे अहिल्यादेवी. आमच्या गल्लीच्या महत्त्वाच्या खुणा म्हणजे कन्याशाळेच्या बाजूला टांगा स्टॅण्ड जिथे २ -३ तरी टांगे उभे असायचे ( आजच्या पिढीतल्या मुलांना म्हणून सांगतो, टांगा म्हणजे प्रवासी घोडा - गाडी किंवा बग्गी ) मधेच पुरंदरे वाडा, नातूंची चाळ, आमच्या खिंवसर वाड्यालगतच कन्याशाळेचं ग्राउंड , मग बोधे कल्हईवाला, मुरलीधर मंगल कार्यालय ( जिथे नाटकाच्या प्रॅक्टिस चालत, ज्या आम्ही चोरुन बघायला जायचो) , समोरची कोळशाची वखार.
तसं बघितलं तर आमची गल्ली खूपच मध्यवर्ती होती , जी आता पेपर गल्ली म्हणून ओळखली जाते. मध्यवर्ती अशासाठी की गल्लीच्या एका बाजूला मेहुणपुरा , अप्पा बळवंत चौक जवळ , दुसऱ्या बाजूला रमण बाग , वीराची तालिम , खालच्या बाजूला शनिवार मारुती, , नदीकाठचे आपटे , नेने घाट जवळच .
हे सगळं ह्यासाठी सांगतो की ह्या सर्व परिसरात चोर -शिपाई , लपाछपी खेळण्यात , सायकल शिकण्यात - चालवण्यात माझे बालपण गेले .
आमचा वाडा म्हणजे एकदम लांबलचक बोगीसारखा होता, मधे १५ ते २० फुटी रस्ता आणि दुतर्फा दुमजली किंवा एकमजली घरं.
माझे वडिल म.न .पा मधे कामाला , खरं तर त्यांचा मंडईत नारळाचा गाळा होता. RSS चे / शाखेचे कार्यकर्ते, त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता. त्यामुळे त्यांचा मंडईतला नारळाचा धंदा खूप जोरात चालायचा , इतका की शेजारच्या गाळेवाल्याचा धंदा बंद पडायची वेळ आली , त्याने वडिलांना , त्याची , त्याच्या फॅमिलीची उपासमार व्हायला लागल्याची दर्दभरी कहाणी ऐकवली आणि वडिल पडले साधे भोळे , आपल्यामुळे त्याची ही दुरावस्था होतेय असं वाटून त्यांनी, त्यांचा नारळाचा तेजीतला धंदाच बंद केला आणि म.न .पा मधे सरळ नोकरी धरली .
वडिलांना तेव्हा महिना २० रू पगार होता , पण त्यातही माझी गृहकृत्यदक्ष आई काटकसर करून महिन्याला १ ग्रॅम सोनं विकत घ्यायची .
माझ्या वाड्यानं मला खूप काही आयुष्याचं तत्वज्ञान दिलं की जे एखादी प्रोफेशनल मॅनॅजमेन्ट इन्स्टिट्यूटपण देवू शकणार नाही .
ह्या वाड्याने मला शेजारधर्म शिकविला की जो आजकालच्या बंद फ्लॅट संस्कृतीमधे अभावाचेच आढळतो . आजकाल आपण पेपरमधे बातम्या वाचतो की फ्लॅटमधे एकटी म्हातारी बघून चोरटयांनी नजर ठेवून तिला मारहाण करून लुटली, पण ते शेजारपाजारच्या फ्लॅट मधल्यांना कळालेपण नाही .
आमच्या वाड्यात एकट्या एका खोलीत राहणाऱ्या पार्वतीबाई सगळ्यांचा काळजी घेण्याचा विषय होता . त्यांचं जेवण , त्यांचे औषधपाणी ह्याची काळजी अनाहूतपणे सर्व बिऱ्हाडांकडून घेतली जायची . त्याचवेळी वाड्यातल्या सर्व चिल्लापिल्लांवर, त्यांचा, स्वतःच्या नातवंडांपेक्षा अधिक जीवापाड मायेचं नातं होतं . त्यांच्यासाठी बेदाणे , मनुका , खारका त्यांनी डब्यात खाऊ म्हणून ठेवलेले असत . हे मायेचे/प्रेमाचे धागे मला खूप काही शिकवून गेले.
आमच्या समोरच्या साखराबेन , आडनाव जैन गुजराथी , माझ्या आईचं आणि त्यांचं फार जमायचं . त्यांच्या मिस्टरांचं लक्ष्मी रोडवर कापडाचं दुकान , लग्नाला अनेक वर्ष होऊनसुद्धा त्यांना मूलबाळ नव्हतं . आपल्या दुकानातल्या एका स्त्रीवर त्यांचं प्रेम जडलेलं. अशा अवघड परिस्थितीत सुद्धा साखराबेन सतत हसतमुख असत . देवावर त्यांची श्रद्धा होती . त्याच श्रद्धेनं त्यांचं आयुष्य नव्यानं खुलताना मी माझ्या डोळ्यांनी बघितले आहे . माझ्या आयुष्यात आलेल्या कठीणप्रसंगांना सामना देताना साखराबेन मला कायम स्फुर्तिस्थान राहिल्या आहेत .
आमच्या एक घर पलिकडे, शेजारी गुगळे नावाचे मारवाडी कुटुंब . त्यांची एकच खोली पण आठजण रहायचे . पती ,पत्नी , चार मुले , शिवाय निधन झालेल्या भावाची दोन मुले असे कुटुंबं . माझ्या आईतला आणि आमचा भावंडांमधला काटकसरीचा गुण ह्या मारवाडी कुटुंबामुळेच आलं असे मला वाटते . आजघडीला त्या कुटुंबातील बहुतेकजण विविध क्षेत्रात मोठे व्यापारी / धंदेवाले म्हणून आढळतात .
चाळ म्हणलं की कॉमन संडास आलेच. एवढ्या सगळ्या बिऱ्हाडात मिळून चारच संडास होते . त्यामुळे प्रत्येक संडासासमोर सकाळच्या वेळी एक –एक, दोन -दोन नंबर असायचेच. नंबर लावलेल्याने स्वतः तिथं जातीनं उभं असणं गरजेचं होतं . नुसतंच कुणी टमरेल ठेवून गेलो होतो आणि ‘ नंबर लावला होता ’ म्हणलं तर त्यावरनं भांडणं व्हायची . तुम्ही कदाचित हसाल पण घाईगडबड असली तरी मनावर संयम कसा ठेवायचा हे मला चाळीतल्या कॉमन संडासांनीच शिकवलं.
जाता जाता शेवटचं सांगतो , मला इंजिनिरिंग कॉलेज, शिवाजीनगर (COEP) मधे असताना , कॉलेजच्या लघुकथास्पर्धेमधे पहिलं बक्षिस मिळाले, ते ह्या ‘ आईच्या घरां ‘तील अनुभवांवर आधारलेल्या कथेमुळेच .
आज भले मी बंगल्यात रहात असेन , पण माझं बालपण , उमलतं तारुण्य माझ्या चाळीतल्या आईच्या घरांनच फुलवले , घडवले : वय वर्ष २८ पर्यंत . माझ्यावर अनेक चांगले संस्कार केले , की जे मला आयुष्याभराला , आत्ता ६३ व्या वर्षीपण पुरत आहेत आणि माझ्या मुलं-नातवंडांपर्यंत पोचत आहेत .
आईचं घर ( वाडा म्हणजे संस्कारांची खाण ) लेख, महाराष्ट्र टाइम्स : ११ फेब्रुवारी २०२० ला छापून आला.
प्रतिक्रिया
आठवणी मस्त!
आठवणी मस्त!
विणा फडकेंशी माझी ओळख आहे,
'आई रिटायर होतेय' चा प्रयोग बघितला आहे.
लेख फारच त्रोटक वाटला. मीही
लेख फारच त्रोटक वाटला. मीही तुमच्याच पिढीचा, त्यामुळे लेखाचा अधिक विस्तार करणे शक्य होते असे माझे मत आहे. आभार.