बुशरा अन्सारी - पाकिस्तानी कलाकार

आधी हिंदू-मुस्लिम एकतेचे मोठे समर्थक
असलेले बॅ. मोहंमद अली जिना यांनी २० मार्च १९४० रोजी लाहोरमध्ये झालेल्या मुस्लिम लीगच्या राष्ट्रीय अधिवेशनात जे अध्यक्षीय भाषण केले, त्यात त्यांनी हिंदू आणि मुस्लिम ही दोन स्वतंत्र राष्ट्रे आहेत, आणि ते एकत्र, एकाच छताखाली कधीच नांदू शकणार नाहीत असे सांगितले. २३ मार्च १९४० रोजी स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीचा प्रस्ताव मंजूर झाला. पुढे भारतीय उपखंडाचे दोन तुकडे झाले. कोट्यवधी लोकांना प्रचंड हिंसाचारात मायभूमी सोडावी लागली. दोन्ही देशांच्या आरपार घुसलेला फाळणीचा भाला अजूनही कायम आहे. अगदी मागच्या महिन्यात इमरान खान यांनी भारताने देऊ केलेली साखर नाकारून भारत द्वेषाचा नमुना दाखवून दिला.

या फाळणीने कधीच भरून निघणार नाही एवढे नुकसान कलेच्या प्रांतात झाले. पाकिस्तानातील अत्यंत प्रतिभावान कलावंत,सिनेमा,नाटक,टीव्ही वर व्यस्त असणाऱ्या गायिका-लेखिका असलेल्या बुशरा अन्सारी यांनी काल १५ मे रोजी ६६ व्या वर्षात पदार्पण केले. चाळीसपेक्षा अधिक सिनेमे, सहा टीव्ही मालिका, दहा नाटकांमधून त्यांनी
स्वतःचा स्वतंत्र रसिकवर्ग निर्माण केलाय. पण त्या
केवळ कलावंतच नाहीत तर सामाजिकदृष्ट्याही अत्यंत
जागृत आहेत. पाकिस्तानातील कट्टरपंथीयांना खडे
बोल सुनावण्यास त्या कचरत नाहीत. इतिहासात जे घडले
ते घडले. कुटुंबे वेगळी झाली म्हणून मुलांमध्ये कटुता
कशासाठी? असा त्यांचा सवाल आहे. दोन वर्षांपूर्वी भारत
पाकिस्तानात तणाव वाढला. मीडिया वाल्यांनी तर असे वातावरण तयार केले की अणुयुद्ध होणार की काय असे वाटू लागले. तेव्हा बुशरा यांनी 'हमसाये माँ जायी' या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली. मीडियावाले, राजकारण्यांना बाजूला सारत आता भारत पाकिस्तानातील गृहिणींनाच दोन्ही देशांची काळजी घ्यावी लागणार आहे, युद्धाचे वातावरण थांबवून मुलांमध्ये प्रेमभावनेची पेरणी करावी लागेल, असा संदेश देणारे हे गीत बुशरा यांची बहीण नीलम अहमद बाशेर यांनी लिहिले. त्यात बुशरांनी हिंदू तर त्यांची दुसरी बहीण अस्मा अब्बास यांनी पाकिस्तानी मुस्लिम गृहिणीची भूमिका केली. अगदी शंभर चौरस फुटाच्या सेटवर चित्रित झालेल्या या गाण्याने लाखो पाकिस्तानी रसिकांनाही अंतर्मुख केले. त्यामुळे बुशरांचे बळ वाढले. पण केवळ व्हिडिओ करून त्या
थांबल्या नाहीत तर प्रत्येक मंचावर हा विचारही ठणकावून
मांडला.

'बुशरा' नावाचा अर्थ अचूकता. हा अर्थ त्यांनी सा्थ
केलाय.अर्थात, कलावंत होण्याचे, व्यक्तिस्वातंत्र्याच्या कट्टर समर्थक असण्याचेबीज त्यांच्यात वडिलांकडून
पेरले गेले. त्यांचे वडील अहमद बाशी प्रख्यात व्यावसायिक लेखक होते. बुशरांना खरी ओळख मिळाली १९७८ मध्ये पीटीव्हीवरच्या'फिफ्टी-फिफ्टी' विनोदी मालिकेतून. १९८३
मध्ये त्यांच्या 'आंगन टेढ़ा ' मालिकेने खळबळ उडवून दिली. कारण त्यात त्यांनी पाकिस्तानची कायम मुस्कटदाबी करणाऱ्या लष्करी राजवटीवर टीका केली होती. त्यामुळे त्या काही काळ अडचणीत आल्या. पण त्यांनी माघार घेतली नाही. अन्वर मकसूद यांची 'लूज टॉक' मालिका प्रचंड
लोकप्रिय होती. त्यात ते आणि मोईन अख्तर समाजातील
दांभिक लोकांच्या चिंधड्या उडवत. या मालिकेतील काही
भागांमध्ये बुशराही होत्या. त्यात भूमिका साकारताना बुशरा
यांनी जी वेगवेगळी रूपे धारण केली आहेत ती त्यांच्यातील
समर्थ, बहुगुणी अभिनेत्रीची साक्ष देतात. त्यांची बहीण अस्मा अब्बास ह्याही उच्च दर्जाचा अभिनय करतात. 'कोई चांद रख' आणि 'दिल लगी' या टीव्ही मालिकेतील मेहविश हयात या अभिनेत्रीची( दाऊद इब्राहिमची तथाकथित मैत्रीण) आई, ' दलदल ' या मालिकेतील खाष्ट सासू, असा त्यांचा अभिनय उत्कृष्ट दर्जाचा आहे.

इमरान यांनी भारत द्वेष दाखवून दिला तरीही पाकिस्तानातील कलावंत, टीव्ही मालिकेत काम करणारे कलाकार यांचे मात्र भारतीय कलावंत, टीव्ही कलाकार, हिंदी सिनेमा याच्यावर प्रेम आहे हे नक्की. पाकिस्तानातील कुठलीही टीव्ही मालिका पहिली तर त्याच्यात हिंदी सिनेमाचा आणि कलाकारांचा उल्लेख असतोच. हुमायून सईद या टीव्ही कलाकाराची स्वतः निर्मिलेली कुठलीही टीव्ही सिरियल पाहिली तर हिंदी सिनेमातील गाण्यांचा सढळ वापर केलेला दिसतो. बुशरा यांच्या वर उल्लेख केलेल्या ' हमसाये माँ जायी' या व्हिडिओ मध्ये पण विश्वजित यांच्या किस्मत चित्रपटातील "कजरा मोहब्बतवाला" या गाण्यातल्या ओळी वापरल्या आहेत. सत्तर ऐंशीच्या दशकात ' धूप किनारे ' आणि ' परछाईयां ' हया पाकिस्तानी मालिका भारतात पण आवडीने पाहिल्या जायच्या.

बुशरा यांचा विचार केला तर त्यांच्यातील
प्रतिभेला तेवढा वाव मिळाला नाही. त्यांचा चाहता वर्ग,
भूमिकांमधील वैविध्य पाकपुरतेच मर्यादित राहिले.
फाळणीच झाली नसती तर त्यांच्यातील अभिनयाचा
आणखी कस लागला असता. भारतात आणखी एका
रूपवान, परिपूर्णतेचा ध्यास असलेल्या अभिनेत्रीची भर
पडली असती.

......

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet