बाप

बाप

बी. कॉमला असताना चारही वर्ष तो माझ्या वर्गात होता. नाव जय प्रकाश साबळे. पाच सव्वा पाच फूट उंची. कुरळे पण मानेपर्यंत लांव केस. थोडे पांढरे झालेले. मोठा पण निबरट आणि कोरडा चेहरा. जाड भुवया, मोठे डोळे. बोलताना उपरोधिकपणे हासण्याची सवय. खांदे वाकलेले. वय तेवीस चोवीस. आम्ही सगळेच नोकरी करणारे विद्यार्थी. सकाळच कॉलेज. कॉलेज व्हीटीला होत. तो गिरगावात राहायचा. म्हणून लवकर यायचा. तो इंकम टॅक्स मघे, मी सेल्स टॅक्स मध्ये, दुसरा एक बी. पी. टी. त तिसरा रेल्वेत. असा आमचा चार जणांचा ग्रुप होता. आम्ही जेथे काम करायचो त्या नावाने एकमेकांना हाक मारायचो. अर्थातच, तो आय. टी. मी एस. टी. तिसरा बी. पी. टी, चौथ्याचा शॉर्ट फॉर्म होत नव्हता म्हणून नावाने हाक मारायचो. तासाला दांडी मारून बाहेर फिरणं हे नॉर्मल होत.
एकदा मी सगळ्यांचीच संपूर्ण नाव विचारीत होतो. तस ते साबळेलाही विचारल. तो म्हणाला जय प्रकाश साबळे. मी म्हंटल, 'तुझं नाव जय आणि वडलांच नाव प्रकाश का? ' तो म्हणाला, 'बापाच नाव मी लावीत नाही' वडलांचा बाप झाला तेव्हाच मी ओळखलं, काहीतरी गोम आहे. थोडी तुच्छता त्याच्या तोंडावर होती. मी म्हंटलं. 'अस का? ' तो वडलांना एक सणसणीत शिवी देऊन म्हणाला, "..... लहानपणीच आम्हाला सर्वाना सोडून दुसऱ्या बाईबरोबर पळून गेला. जाऊ दे. सांगीन केव्हातरी. " मी विषय जास्त ताणला नाही. त्याचा चेहरा आक्रसलेला दिसला. अशीच तीन वर्ष गेली. शेवटच वर्ष चालू झालं. मला फार हौस म्हणून मीच पार्टीचा प्रस्ताव तिघांपुढे ठेवला. साबळे थोडा गंभीर स्वभावाचा म्हणून कोणत्याही प्रस्तावास लगेच हो म्हणत नसे. बाकीच्यांनी ताबडतोब होकार दिला. येणाऱ्या शनिवारी इराण्याच्या हॉटेलमध्ये बसण्याच ठरलं. दुसरे दोघे म्हणाले, 'अरे, आम्हाला शनीवारी कामावर जाव लागत. तुझ्यासारखी सुटी नाही. '. मी जरा चिडून म्हंटले, एखाद दिवस दांडी मारा की. अशी वेळ काय परत परत येणार आहे? ' दोघांनी होकार दिला. मी प्लानिंग करणारा म्हणून प्रत्येकाने माझ्या जवळ शंभर रुपये दिले. मग मी प्रोग्राम ठरवला. बीयर, नॉन व्हेज जेवण आणि जमल तर पिक्चर.
त्या दिवशी शनिवार होता. पहिल्या तासाला बसून पुढील तासांना दांडी मारून आम्ही जायच ठरवल. मी आणि आय टी. बाहेर आलो. दुसरे दोघे बाहेर येऊन म्हणाले, ' अरे आम्हाला नाही जमणार रे, ऑफिसला जाव लागेल. ' मी चिडून म्हंटलं. ' अरे काय रडता रे तुम्ही. छाः याला काही अर्थ आहे का? ' मी त्यांचे पै से परत देऊ लागलो. तेव्हा ते मनापासून म्हणाले, ' अरे पैसे राहू दे. पुन्हा केव्हा तरी बसू. '. पण साबळेला आवडलं नाही. तो म्हणाला, "ए, आज नही, तो कभी नहीं. नखरे करू नका. हे पैसे परत घ्या. " त्यांना फारस आवडल नाही. पण त्यांनी पैसे परत घेतले. शेद्वटी मी आणि आय. टी असे दोघेच कॉलेजबाहेर पडलॉ. तो थोडासा अबोलच होता. मी काही तरी विचारायच म्हणून विचारलं. ' तू बी. कॉम नंतर काय करणार आहेस? सी. ए.? तो म्हणाला, " नाही, मी लॉ करणार आहे. मला प्रमोशनच्या द्रुष्टीने आवश्यक आहे. पण मी प्रॅक्टीस करणार नाही. " लवकरच एका इराण्याच्या हॉ टेल मध्ये आम्ही बसलो. मी बियर आणि इतर खाणं ऑर्डर केलं. अजूनही तो मख्ख चेहरा घेऊन बसला होता. मला वाटल याच काहीतरी बिनसल असाव. परंतु मला बिचारण्याच धाडस झाल नाही. बियर आली. आम्ही प्यायला सुरुवात केली. पुन्हा काही वेळ असाच गेला. त्याला कसलातरी ताण असावा.
मग तो अचानक म्हणाला, "रविवारी...... बाप आला होता. साला कशाला आला कोण जाणे. मी अक्षरही बोललो नाही. जवळ जवळ सात आठ वर्षानी तो अचानक उगवला होता. माझी चौकशी केली. अर्थातच आईकडे. बहीण आणि भाऊ अभ्यास करीत होते. त्याच्याशी फक्त आई बोलत होती. मी मधल्या दाराशी उभा होतो. आईच मला आश्चर्य वाटल. तिला इतका आनंद झाला होता की त्याची ती अगदी ऊठबस करीत होती. त्याला सारखी विचारीत होती. काय बनवू, तुमच्यासाठी? तो तो माझा राग उफाळून येत होता. आईनी चहा केला आणि त्याच्यापुढे धरला. तो हातात धरून तोंडाला लावणार तेवढ्यात माझा तोल सुटला. कधी नव्हे ती मी माझी प्रतिक्रिया व्यक्त करीत होतो. मी झटकन पुढे होऊन, एका हाताने त्याच्या थोबाडीत मारली. त्याच्या हातातील कप बशी चहासहीत फाटकन उडाली आणि फुटली. मी त्याचा हात धरून म्हंटले, " चल ऊठ, तुझी इथे काही गरज नाही " माझा लाल चेहरा पाहून तो घाबरला असावा. त्याने काही बोलण्याचा प्रयत्न केला. पण मी त्याचे दोन्ही हात धरून त्याला बाहेर काढला. माझ्या अनपेक्षित हल्ल्याने तो धडपडून पडला. आणि घाईघाईने बाहेर निघून गेला. मी दरवाजा लावून परत आत आलो. आई भेदरली होती. ति म्हणाली, " अरे हे काय केलस? ते वडील आहेत तुझे ते. " तिच्या डोळ्यात पाणी होत. मी म्हंटल, " होते. आता नाहीत. जेव्हा गरज होती तेव्हा कुठे गेले होते? लोकांच्या दारी काम केलीस तेव्हा कुठे गेले होते.? सरिकाला हॉस्पिटल मध्ये ठेवली होती तेव्हा कुठे गेले होते? मला कॉ लेजात अडमिशन घ्यायची होती तेव्हा कुठे होता हा...... बाप? तू त्याची एवढी बडदास्त ठेवतेस? तुझा चेहरा पाहून कधी त्याला दया नाही आली? " मग आई कडे बोट दाखवून मी म्हंटले, " परत कधीही हा माणूस आपल्या दारी आला नाही पाहिजे".
" माझी बहीण पण आता मोठी झालेली आहे. काही वर्षात तिच्या लग्नाचं बघायला हवं. हे प्रयत्न कोण करणार? सांग. मी काही अनुभवी नाही. तू विचारलस ना, बी. कॉम नंतर काय करणार? मी काहीच करू शकत नाही. खरं म्हणजेमला लहानपणापासून जज्ज व्हावसं वाटायच. पण त्यासाठी नोकरी सोडून काही वर्ष वकिली करावी लागेल. ते कसं जमेल? पण मला न्याय करण फार आवडत. "
'अस आहे ना? मग तू आईला का समजून घेत नाहीस? तिच्याबरोबर पण न्याय करायला हवास. एकटीने बाहेरील जगाचे हल्ले पचवून तुम्हा मुलांना वाढवण तिला किती त्रासदायक झालं असेल, नाही? तिची किती घुसमट झाली असेल. कितितरी वेळा तिलाही भीती वाटली असेल. तिनी कोणाला सांगायचं? तुटपुंज्या पैशात संसार कसा रेटला असेल? अरे एक लहान मूल वाढवायचं म्हणजे काय कमी त्रास होतो का? तुम्ही तर तिघे होतात. ' मी उत्तेजित होऊन म्हंटले. जसा काही मी एका मुलाचा बाप होतो. बियर संपली . खिमा पाव आला. मग परत बियर मागवली. तो अधून मधून खात होता आणि विचारात गढत होता. काहीतरी विचारायच म्हणून मी विचारलं, 'तुझ्या वडलांनी सोडलं तेव्हा तू किती लहान होतास.? '
"चल, आता सगळच सांगतो तुला. त्याच काय आहे की माझा बाप एम. ए वुइथ इकॉनॉमिक्स होता. लग्नानंतर त्याला संजय कॉलेजमध्ये प्रोफेसरशिप मिळाली. कदाचित ती आम्हाला सोडल्यावर मिळाली असेल. तसे आमच्याकडे येणारे जाणारे त्याच्यामुळे बरेच लोक होते. त्यातलेच दिवेकर काका. ते आमच्या समोराच राहतात. माझी आई जेमतेम मॅट्रीक असावी. ती घरातच असायची. बाप साला तिला नेहेमीच कमी शिकलेली, म्हणून घालून पाडून बोलायचा. ती भोळसट, म्हणून तिला वाटेल त्या थापा मारायचा. एक एक रात्र तो घराबाहेर राहायचा. मी लहान होतो. तरी तिसरी चौथीत असेन. अशावेळी घरातल वातावरण वेगळ असल्याचा मला अंदाज यायचा. सुरुवाती सुरुवातीला हा प्रकार कमी व्हायचा. मग तो आठवड्यातले तीन तीन चार चार दिवस येइनासा झाला. पैशाची फार चणचण नसली तरी खूप सुबत्ता होती असही नव्हत. साधारणपणे मागीतलेली वस्तू मिळत असे. बाप अधून मधून प्यायचा किंवा पिऊन यायचा. आणि साला आमच्यावर आणि आईवर राग काढायचा. तरीही आई त्याचे सगळे चोचले पुरवायची. तो जेवायला बसला की त्याला ती वारा घालायची. काय हव नको ते डोळ्यात तेल घालून पाहायची, आग्रह कर करून ति त्याला खायला घालायची. पण भड्व्याला कधी तिच्याशी नीट बोलायची इच्छा होत नसे.
एक दिवस रात्री आम्ही मुलं आणि आई झोपलो होतो. एक दीडचा सुमार असेल. काय झाल काही कळल नाही. फाटकन दरवाजा उघडला आणि बाप आत आला. तो आज जाम रागात असावा. मला वाटलं प्यायला असेल. पण प्यायला नव्हता. माझी झोप थोडी चाळवली होती. पण मी अर्धवट झोपेत होतो. बाहेरची खोली आणि आतली खोली यात लाकडाचं पार्टीशन होत. त्याला लहान लहान फटी होत्या. बापाने आईला हाताने खेचून आतल्या खोलीत नेले. दरवाजा बंद केला. तिला दोन चार थोबाडीत मारून म्हणाला, " च्यायला, तुझ्यामुळे माझं नशीब अजून उजळत नाही. चांगली नोकरी अजून मिळत नाही. " आई खोलीतल्या कोपऱ्यात दुःखाने आणि निराशेने कोलमडून पडली होती. ती हळू आवाजात विव्हळत होती. तो दात ओठ खात पुन्हा ओरडला, " लोकांच्या बायका कशा नीट नेटक्या आणि अट्रॅक्टिव्ह राहतात. तु जन्म्जात दरिद्री. साली चांगली कधी दिसत नाहीस. अपशकुनी साली. तुझ्या बापानी हे दरिद्र माझ्या गळ्यात घातलं. हे बघ आत्ताच्या आत्ता मी घर सोडून जाणार आहे. ज सा आ हे त सा . (प्रत्येक शब्दावर जोर देत) मला इथलं काहीही नको आहे. तुझी ही सगळी पिलावळ सांभाळायची, मला आता कंटाळा आलेला आहे. " तरी पण आईने त्याचे पाय धरले. मी आता चांगलाच जागा झालोहोतो. पार्टीशनच्या फटींतून जेवढे पाहाता येत होत तेवढ पाहात होतो. अधून मधून भीतीने मी थरथरत ही होतो. आता बाबा गेले तर आपली आई काय करेल? ती आपल्याला काय खायला घालेल? असे विचार तेव्हाही माझ्या मनात आले. मला एकदम असुरक्षित वाटू लागलं. मग आई कळवळून म्हणाली, " तुम्ही सांगाल तशी वागेन हो मी. मी.., मी नीट राहीन. मी सगळ करीन. तुम्ही मला आणि मुलांना टाकून जाऊ नका हो. मी तुमच्यासाठी उपासतापास सगळ करीन. बघा लवकरच फरक पडेल. ". रडत रडत आईने त्याच्या पायांना मिठी मारली. मग माझे हुंदके ऐकू आल्याने आईला लाथेने उडवून बापाने मधले दात उघडले. आईच्या आर्जवांकडजे दुर्लक्ष करीत तो निघून गेला. मी आईला बिलगून रडत राहिलो, मला झोप कधी लागली कळल नाही. रात्रभर आई जागी असावी. मी जागा झालो. कालच द्रुश्य माझ्या डोइळ्यासमोरून हालत नव्हत. सकाळ झाली होती. आई पण शेजारीच झोपली असावी अस वाटल. पण छे, आई अतिशय कष्टाळू होती. नळ पण असा होता की सात वाजताच जायचा. ती केव्हाच उठून पाणी भरीत असावी.
तिने मला आणि माझ्या इतर भावंडाना उठवलं. नेहेंमीप्रमाणे चहा नाश्ता केला. तिच्या तोंडावर कालच्या रात्रीचे थोडे देखिल अवशेष दिसले नाहीत. उलट तिने मला आणि दुसऱ्या दोघांना उत्साहाने तयार केले व अभ्यासाला बसवले. तिला फारस शिकवता येत नसे. पण जे पायच ते ती अगदी प्रेमाने शिकवायची. त्यामुळे आम्हाला ती फारच आवडायची. असेच दिवस गेले, आठवडे गेले, महीने गेले, वर्ष पण गेली. तू म्हणशील हे तर नॉर्मल आहे. सुरुवातीला अधून मधून काही महिने बापाकडून पैसे यायचे. नंतर नंतर मात्र ते सहासात माहिन्यानी बंद झाले. आईने वास्तव स्विकारलं असाव. पैसे येण्याचे बंद झाल्या वर आईने शेजाऱ्यापाजाऱ्यांना कमासाठी विचारल. पण तोंडावर हात थेऊन कुत्सितपणे हासत त्यांनी नकार दिला. तिची भांडी घासण्याची, स्वयंपाक करण्याची तयारी होती. पण तिला कोणी काम दिले नाही. एक दिवस आई काम शोधायला बाहेर गेली होती. आम्ही मुलं शाळेच्या तयारीत होतो. तो एक माणूस दाराशी आला. वाण्याचा नोकर असावा. तो म्हणाला, "ए तुझी आय कुठे आहे? साला तुमा लोक्ला हमेशा उधार कसा देल? आजपासून उधार बंद. मागचा एकसो छे रुपिया ने बारा आना बाकी हाय. वो जल्दी लाव, और उधारकी भीक मांगने कही और जाव. "
लवकरच आईला धुणी भांडी स्वयंपाक आणि कपडे शिवायची कामं मिळाली. पण सकाळी आमचा नाश्ता झाल्यापासून ते अगदी संध्याकाळी सात साडेसात पर्यंत कामात गुंतली. रविवार, सुटीचे दिवस तर तिला जास्तिची कामं असायची. काही लोक जास्त पैसे देत, तर काही त्याच पैशात जास्त काम कायला सांगत. पण कामं सोडण शक्य नव्हत. मध्ये मध्ये मलाही काम करावस वाटायच. पण प्रयत्न करूनही मला कोणी काम देईना. खुप वाईट वाटायच. मग मी नाद सोडला. आता मी मॅट्रिकच्या वर्गात आलो. इतर मुल क्लासेस लावीत. मला तर पुतक घेणंही मोठ मुष्किल होत. इंग्रजी, गणित विज्ञान माझ मीच केल. अधून मधून दिवेकर काका चोरून चोरून यायचे आणि दोन दोन तास शिकवायचे. ते रेल्वेमधून निव्रुत्त झालेले होते. आम्च्याशी चाळितले लोक संबंध ठेवित नसत. शिवाय आईबद्दल वाटेल ते ऐकायला यायच. त्यांच्यामते ती सकाळ पासून बाहेर जायची ते गाव भटकायला. ते तिला गावभावानी म्हणत. कळल कातुला "गावभवानी "म्हणजे काय ते? तोंडावर कोणीही बोलत नसे. नाहीतर मी त्याला मारूनच काढला असत्गा.
अकरावीच्या वर्गाची फी भरायलाही माझ्याजवळ पैसे नव्हते. एक दिवस शाळेत नोटिस आली की ज्यांनी शाळेची फी भरली नाही त्यांनी एक तारखेपासून शाळे त बसायच नाही. अर्थातच माझ नाव त्यात होतच. शालेचही बरोबर होत. तीन चार महिने झाले तरी शाळेची फी भरली गेली नव्हती. आईला मिळणारे पैसे इतकेच असायचे की आमचा घरचा खर्च जेमतेम भागायचा. कपडेलक्ते तर दुरच होते. मग एकदा दिवेकर काका घरी आले तेचा मला म्हणाले, "काय रे तुझा चेहरा असा पडलेला का? कोणी काही बोललं का? " त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. मला भरून आलं. मी काकांना माझी अडचण सांगीतली. ते म्हणाले, "हे बघ, सबंध वर्षाची फी आणि परीक्षेची फी मिळून अडीचशे रुपये होतात. मी तुला तिनशे रुपये देतो. तेवढे भरून टाक. आणि आता अगदी जोमाने तयारीला लाग., "मी त्यांना वाकून नमस्कार केला. ते म्हणाले, ":अरे मी विशेष काही करतोय का? मला आणखीन एक मुलगा आहे अस समजेन. " मी म्हंटले "पण काका काकूंना आवडणार नाही ना? " ते म्हणाले, " अरे काकूला कोण सांगणार आहे? ते सगळ सोड आणि तू अभ्यासाला लाग. "त्यांनी दुसऱ्या दिवशी पैसे दिले. मी फी भरून एक दोन पुस्तक घेतली. त्या रात्री काय झालं कोण जाणे दिवेकर काकूंचा दणदणीत आवाज येत होता. "त्या सटवीच्या मुलासाठी तुमचा इव तुटतो. पण आपल्या मुलांना कधी शिकवलत, दोन दोन तास काढून? " काका समजवायच काम करीत होते. पण काकू बोलतच राहिल्या. "आख्ख्या चाळीने झीडकारलेली माणस, पण तुम्हाला त्यांचाच पुळका. "काकाच्या समजावण्याचा काही उपय्होग होत नव्हता. मला मात्र आपण ते पैसे उगाचच घेतले अस वाटल. मी त्यांना एकद म्हंटल ही तस. तर्फ ते म्हणाले, " एकदा म्हंटलयस पुन्हा अस म्हणू नकोस. मी नक्की सांगतो एक दिवस असा येईल, आज जे लोक तुझ्याशी बोलतही नाहीत, ते तुझ्या मेहेरबानीसाठी तुझ्याच मागेपुढे फिरतील.
मग परीक्षेच्या तयारीत मी गर्क होतो. असेच काही महिने गेले. आई आजकाल वेळ काढून भजनाला जात असे. या गोष्टीचा मी कधीच गांभिर्याने विचार केला नाही, असे वाटते. असो, मी मॅट्रिक झालो. आईलाही आनंद झाला. तिने कसे का असेना, पण स्वस्तातले पेढे आणले. देवापुढे ठेवले आणि आजूबाजूच्या लोकांना वाटले. अर्थातच शेजाऱ्यांनी ते घेतले, पण किती मार्क मिळाले किंवा पुढे काय करणार वगैरे काहीही न विचारता जमतील तेवढे टोमणे मारले. अर्थातच बापावरून. तरी ही आईने हासरा चेहरा ठेवला. काही काही कुत्सित लोकांनी "खरं तर, वडलांनी पेढे द्यायला पाहिजेत नाही? किंवा "हल्ली जयचे बाबा दिसत नाहीत नाही? येतच नाहीत का? " वगैरे अडून अडून विचारलेही. विचारणारे सगळे आपलेच लोक होते, मराठी. म्हणजे ग्रांट रोडच्या शास्त्री हॉल मध्ये राहतात तसे. आई आनंदात होती. तिनी जेवायला खीर केली होती, आणि जशी बापाला जेवायला घालत होती ना तसाच तिनी मला एकट्याला जेवायला घातला. मग ती आणि इतर भावंड बसली. मला ते आवडलं नाही. अशी तिची माझ्यावर माया होती. ती कधी आम्हा मुलांना ओरडल्याचे आठवत नाही, किंवा कोणतेही बंधन आमच्या वागण्यावर ठेवले नाही. आम्हाला ती पाहिजे तसं वागू द्यायची. मोठा झाल्यावर मीच पुढेपुढे घरात शिस्त निर्माण केली. तसे आम्ही कोणीही बेशिस्त नव्हतो. पण मला नेहेमी भीती वाटायची. पैसा कमी असल्याने किंवा इतर मोहांमुळे आम्ही बिघडू की काय? मग मला आई म्हणायची, "अरे असं निर्दयपणानं वागू नये. ज्याला बिघडायचं असतं ना, तो तुम्ही कितीही नियम लावा नाही तर प्रेमानं समजावून सांगा, तो बिघडतोच. " आपल्याशी कोणी कसही वागो, आपण चांगलच वागलं पाहिजे. अशी ती भोळसट होती. त्याचं फळ तिला काय मिळालं हे पाहिलचं मी.
मॅट्रिक तर झालो. कॉलेजचं काय? भाऊ बहीणही शिकत होते. परवडत नव्हत म्हणून बहिणीला नववीतच शाळा सोडावी लागली. ती घरचं काम आणि सगळा खर्च इकडे लक्ष देई. मी खूप प्रयत्न केला, पण मला काम मिळेना. मी सध्या कॉलेज शिक्षण न घेण्याचे ठरवले. नाहीतरी मी पैसे कुठून आणणार होतो? आईकडे काही दागिने होते. पण अगदीच कमी. ते मोडायला ती तयार होती. पण मीच नाही म्हंटलं̮ दिवेकर काका काहीतरी सोय करतो म्हणाले, पण मीच नाही म्हंटलं. उलट त्यापेक्षा त्यांनी मला नोकरी बघावी असं मी त्यांना सुचवलं. मी म्हंटलं, "मी ऑफिस बॉयच, किंवा पॅकरच किंवा एखादं हलकं काम मिळाल तरी मला चालेल. " पण ते म्हणाले, "अरे मॅट्रिक झालेल्या आणि अठरा वर्ष पूर्ण न झालेल्या मुलाला अशी कामं कशी मिळतील?, तरी पण मी बघतो. " मग मी मध्यंतरी, स्टेशनावर हमालाचं कामही काही दिवस केलं. पण त्यांचीही युनियन असते की काय कोण जाणे. सात आठ दिवस ठिक चाललं. मग स्टेशनावरचे हमाल लोक मला हाक्लू लागले. पुढे पुढे तेही काम बंद झाल.
मग एक दिवस एक गृहस्थ भेटले. मी व्ही टी स्टेशनवर उभा होतो. कुठलीशी लांबची गाडी आली. ते हमाल पाहात होते. त्यांनी मला हात केला. त्यांचे सामान उचलून मी स्टेशना बाहेर आलो. ते चांगले सूट्वूट वाले होते. पायात चकचकणारे बूट, पांढरा कोट पांढरी पँट. डोक्यावर लहानशी हॅट. हातात सिगारेट, तोंडात पान. असा उंच आणि सडसडीत बांध्याचा तो स्मार्ट माणूस होता. मी पैसे मागायच्या आतच त्यांनी मला पन्नास रुपये दिले. मला आश्चर्य वाटलं, की ह्या कामाचे एवढे पैसे? पण मला गरज होती. मी त्यांना थँक्स म्हंटले. शर्टाला घाम पुसून मी निघालो. तेव्हा ते मला बोलावून म्हणाले. "अरे तू तर चांगला शिकलेला दिसतोस, आणि ही काम का करतोस? "मग मी नुकताच मॅट्रिक झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, " हे बघ, उद्या सकाळी मीरा मॅन्शन मध्ये येऊन मला भेट. काळजी करू नकोस. मी तुला नक्कीच चांगलं काम देईन. "त्यांनी मग मला त्यांचं कार्ड दिल. माझ्या आयुष्यात मला मिळालेलं हे पहिल कार्ड. मी त्या दिवशी आनंदात घरी आलो. देवाला मी प्रथमच नमस्कार केला. मी कार्ड पाहिल. त्यावर लिहिलं होतं. "रोहिणी पॅकर्स, एक्झिक्युटिव्ह मॅनेजर, मीरा मॅन्शन, दुसरा माळा, जयकर मार्ग, गिरगाव, मुंवई. फोन नंवरही होता. त्यांचं नाव होतं, मि. ए. टी. रघुवीर. "
दुसऱ्या दिवशी मी साडेदहाच्या सुमारास त्यातल्या त्यात बरे कपडे घालून त्यांच्या ऑफिसमध्ये
गेलो. बाहेर एका टेबलापाशी दोन तीन माणसं नुसतीच बसली होती. समोर फोन होते. पण ऑ फिस असल्यासारखे मला वाटले नाही. कोणतेही पेपर्स किंवा फाइली दिसल्या नाहीत. तेबलाशी बसलेली माणसंही चांगली दणकटग वाटली. त्यांच्यापैकी एकानं मला काय काम आहे विचारलं. मी त्याला माझ्याजवळचे कार्ड दाखवलं. त्याने केबिनकडे बोट केल. मी दारावर हळूच टकटक करून उभा राहिलो. आतून काहीच उत्तर न आल्याने मी घाबरतच पुन्हा दार वाजवले. मग आतून आवाज आला, "येस, कम इन. " मी दार उघडून आत गेलो. केबीन कसली मला ती जागा गोडाऊन सारखी वाटली. बरीचशी खोकी, रिकामी असावीत, तिथे आजूबाजूला पडली होती. एका भिंतीवर एक दात तुटका
ए. सी. होता. (म्हणजे एअर विंडोच्या पट्ट्या तुटलेल्या असतात. तेव्हा दिसतो तसा)टेबल मात्र अतिशय उत्तम होत. एका फिरत्या खुर्चिवर कालचे ते स्मार्ट गृहस्थ बसले होते. मी त्यांना माझं नाव सांगितल व पत्ताही. आपले पुढचेच दोन सोनेरी दात आणि हातातल्या अंगठ्या चमकावीत ते म्हणाले. "बस. जय, मला लोकल माणूसच पाहिजे होता. कामाचा माणूस मी चांगलाच ओळखतो. तुला काम दिलं यात आश्चर्य वाटण्यासारख काहीच नाही. "मी घाबरत घाबरत तिथल्याच एका खुर्चीवर बसलो..
ते म्हणाले, " हे बघ जय, कंपनी तशी नवीन आहे. ऑफिस काढून दोन तींनच महिने झालेले आहेत. सुरुवातीला मी तुला महिन्याला पाचशे रुपये देईन. नंतर काम पाहून वाढवीनही. शिवाय बाहेरचा सगळा जाण्या येण्याचा, खाण्या पिण्या चा खर्च मी वेगळा देईन. अगदी कायमचा जॉब आहे बघ हा. काम काही फार नाही. ही लहान लहान रसायनांच्या पावडरीची पार्सलं आहेत. ती सांगितलेल्या पत्त्यावर देऊन यायची. त्यांच्या कडून आपल्याला पावतीही नको आहे. तुझं काम फक्त डिलिव्हरीच आहे. अडीचशे ग्रॅम पासून ते एक किलो पर्यंतची ही पॅक्स आहेत. घाबरू नकोस तुला ती हमालासारखी उचलावी लागणार नाहीत. तुला मी ब्रीफकेस मध्ये भरून देईन. ती ब्रीफकेसहीत डिलीव्हर करायची. जिथे देशील तिथे फक्त त्यांना आतल्या मालाच वजन सांगायच. बॅगेचा कोड नंबर मी त्यांना सांगीन. आणि हो, हे पाचशे रुपये मी तुला आगाऊ देतोय. ते पगारातून कापून घेणार नाही. तुला कपडे व इतर घरखर्चही असेलच. कपडे कोणतेही चालतील, फक्त हिरोसारखे नकोत. मग केव्हा चालू करतोस काम? उद्यापासूनच ये. शुभस्य शीघ्रम काय? काही अडचण आली तर सांग. "
माझा विश्वासच बसेना. मी शंभराच्या पाच नोटा खिशात घालून थँक्स म्हंटले. आणि बाहेर आलो. बाहेर ती दणकट माणसं बसूनच होती. पण त्यांनी मला एका अक्षरानेही विचारलं नाही. जणू मी अस्तित्वातच नव्हतो. मला कोणत्याही प्रकारचा संशय आला नाही. आपल्या गरीब आईचे कष्ट कमी होतील हा एकच विचार त्यावेळी मनात होता. मी तडक घरी आलो. रस्त्याने जातानाही आपल्याला पार्ट टाईम कॉलेज करता येईल व आईला पण एखाद दोन कामं, निदान रविवारची जास्तीची कामं तरी बंद करता येतील, असे वाटत होते̱. घरात शिरता शिरता दिवेकर काकांनी खुणेनीच विचारलं काय रे आज खुषीत दिसतोस? मी उद्या सांगतो असे खुणेनेच सांगितले. घरात शिरलो. बहिणीला मी नोकरी लागल्याचे सांगितले. आई यायला वेळ होता. तो दिवस अगदी छान गेला. आई आली. तिला फारच आनंद झाला. तिला इतकं बरं वाटलं, की तिला एकदम हुंदकाच फुटला. ती रात्रपण मी विसरणार नाही. मला जेमतेमच झोप लागली.
सकाळी उत्साहातच त्यातल्या त्यात बरे कपडे घालून दहाच्या सुमारास मी ऑफिसला पोहोचलो. कालची दणकट माणसं आज नव्हती. मला जरा बरं वाटलं. ऑफिस उघडं होतं म्हणजे ते स्मार्ट गृहस्थ होतेच. मी केबीन वर टकटक करून आत शिरलो. ते गृहस्थ काहीतरी वाचीत होते. बहुतेक ते पत्रव्यवहाराचे कागद असावेत. त्यांनी नजर वर केली. मी त्यांना म्हणण्याऐवजी तेच मला "गुड मॉर्निंग "म्हणाले. प्रसन्न हसले. आज तर ते अधिकच स्मार्ट दिसत होते. त्यांच्या उजव्या हाताच्या सर्व बोटांमध्ये अंगट्या होत्या. त्याती, वेगवेगळ्या रंगांचे खडे चमकत होते. गळ्यात सोन्याची साखळी होती. हाताला अतिशय किमती घड्याळ होते. आपण हल्ली जे "ओमेगा" चं घड्याळ पाहातो ना तसं. त्यानी मला एक ब्रीफकेस तयार असल्याचे सांगितले. ती काळबादेवी रोडवरच्या पत्यावर पोचवायची होती. "वजन ३किलो ५०० ग्राम आहे. ठीक आहे? आलास म्हणजे दुसरीकडे जायला सांगीन. साधारणपणे, दिवसाला पाच तरी डिलीव्हरीज व्हायला पाहिजेत. आणि टॅक्सीनेच जात जा. " मी हो म्हंटले. त्यानी मला आणखी शंभर रुपये देऊन म्हंटलं, " हे ठेव. तुला जायला लागतील. तुला तासाभरात परत या यला हरकत नाही. मग दुसरी डिलीव्हरी घेऊन जा. काही अडचण आलीच तर मला पीसीओ वरून फोन कर. मी ऑफिसमध्येच आहे. "
मी काळबादेवी सांगून टॅक्सी केली. आणि मेनरोडला उतरलो. पहिल्याच डिलीव्हरीसाठी त्यांनी नाव दिलं होतं "हिम्मतभाई". एका अरुंद आणि अत्यंत घाणेरड्या गल्लीमध्ये हिम्मतभाईंच ऑफिस होतं. ऑफिस कसलं खुराडच ते. हिम्मतभाई एक पन्नाशीला आलेला माणूस होता. जाडजूड, काळपटलेला चेहरा, तोंडावर देवीचे वण. दोन्ही हातांवर कोडाचे डाग. मळकट, कळकट कपडे घातलेला. मी त्याला रघुवीरांच नाव सागितलं. जास्त काही न बोलता त्यानी ब्रीफकेस ठेउन घेतली. मी वजन सांगितले. "नो रिसिट, नो मनी, नथिंग. " मी तडक निघालो. मला जॉब आवडला. लगेच ऑफिसला जाऊन पुढच्या डिलीव्हरीजही केल्या. पहिला दिवस फार छान पार पडला. मलाही जॉब आवडला. अशा रोजच्या डिलिव्हरीज चालू झाल्या. रघुवीर माझ्या कामावर खूष होते. जास्त प्रश्न न विचारणारा मी त्यांनी दिलेल्या पैशांवर खूष होतो. दिवस चालले होते. महिना झाला. पहिला पगार मिळाला. मी जाताना आईसाठी साडी, भावा बहिणी साठी कपडे आणि थोडी मिठाई खरेदी केली. आईला कटाक्षाने घरी राहायला सांगितलं होतं. कित्येक वर्षात फारसे पैसे पाहाण्याची तिला सवय नव्हती. तिला भरून आलं. मी तिच्या पाठीवरून हात फिरवीत म्हंटलं, " दिवस बदलतील आता". रात्र फारच चांगली गेली. नेहेमी तणावाखाली लागणारी झोप आता सुखानी लागू लागली. दिवेकर काकांना कामाबद्दल थोडक्यात सांगितलं. ते म्हणाले, " नशिबवान आहेस. पण शिक्षणाला विसरू नकोस. तुला मोठं व्हायचय ना? शिकल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. आम्हाला शिक्षण कमी रे. म्हणून तर खालच्या लेव्हल वर रिटायर झालो. अनुभवाच ज्ञान भरपूर, त्याला बाहेर कुत्रा विचारीत नाही. " माझ्या मनात आलं, खरच शिक्षणाने माणूस मोठा होतो का? पण मी त्यांच्याशी वाद घालणार नव्हतो. मला ते वडलांच्या (बापाच्या नाही) स्यानी होते.
माझी नोकरी अशा रितीने बरी चालली होती. ऑफिस कुंभारवाड्यात होतं. मी रोज बसने जायचो. असे चार पाच महिने गेले. पगार वेळेवर मिळत होता. रघुवीर खूष होते. ते म्हणत. "तू आलास आणि घंदा चांगलाच वाढला. " मला कधीही हा माल कुठून येतो, कोण आणतो हे जाणून घ्यावेसे वाटले नाही. पण मनात काटया सारखी टोचणी लागलीच होती. काहीतरी या सगळ्यात वेगळं वाटत होतं. पण मी रघुविरना विचारणार कसं? कितिक वेळेला शब्द तोंडावर यायचे पण धैर्य होत नसे. त्यांना नाही आवडलं तर? नोकरी जाईल. आईची ससेहोलपट परत वाढेल. मी सध्या गप्प बसण्याचे ठरवले. या गोष्टीला आपोआप तोंड फुटलं तर बर होईल असे मला वाटे. पुढे तेच झालं. आश्चर्य म्हणजे, मी ज्यांना माल पुरवला ते सगळे असे घाणेरड्या जागांमध्येच का होते, कोण जाणे. माझ्या डोक्यात कॉलेज शिक्षणाने परत थैमान घालायला सुरुवात केली.
आता मला ऑफिसमध्ये दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम आदल्या दिवशीच मिळू लागला. अधून मधून ती दणकट माणसं मी नसताना येऊन जात असावीत, तीच माल आणून देत असावीत असा मला दाट संशय होता. असो. एक दिवस डिलीव्हरी देताना माला संध्याकाळ होत आली. मी नुकताच दिवसाच काम संपवून ऑफिस मधून बाहेर पडणार, तोच मला रघुवीरांनी बोलावले आणि म्हणाले. '"जय, आज जरा एक अर्जंट डिलीव्हरी आहे ती आत्ताच कर. म्हणजे उद्या उशीर होणार नाही. प्रथमच आपला माल "एक्स्पोर्ट " होणार आहे. तू ही ब्रीफ्केस घे आणि जीवनलालच्या ऑफिस मध्ये नेऊन दे. " मग मला वजन सांगितलं. पुढे म्हणाले, "जरा उशीर होईल तुला, पण आत्ता आठ वाजेपर्यंत ही ब्रीफकेस पोचलीच पाहिजे. " संध्याकाळचे सात सव्वा सात वाजत होते. ह्यांच्याकडे काम करण्यामुळे मला गिरगावातले व जवळपासचे बरेचसे भाग पाहायला मिळाले. नाहीतर आम्ही काय, चौपाटी, घर आणि चर्निरोड स्टेशन एवढचं पाहिलेलं. असो, मी कपडे नीट केले. बॅग उचलली. रघुवीर मी जाऊन येईपर्यंत नेहेमीप्रमाणे बसणार होते.
आताचा पत्ता होता, लॅमिंग्टन रोडचा. मी टॅक्सी केली आणि निघालो. हातातली बॅग नेहेमीपेक्षा जड वाटली. इतक्या डिलीव्हरीज केल्या पण कोड नंवर माहित नसल्याने आत काय माल आहे हे कधी पाहिले नाही. जरी नंवर माहेत असता तरी मला केमिकल मधलं काय कळत होत? मी बॅग डीलीव्हर केल्यावर तिथे थांवत नसे. एकतर सगळ्या जागा अतिशय घाणेरड्या असायच्या, म्हणूनही असेल. जूनचा महिना होता. हल्ली अधून मधून पाउसही यायचा. उन्हाळा नुकताच संपला होता. पावसाचा शिडकावा फार सुखद वाटायचा. आजही पावसाला एकदम सुरुवात झाली. मी टॅक्सितच होतो म्हणा. पण छत्री किंवा रनकोट जवळ नव्हता. वीसेक मिनिटांनी मी एका जुन्या पुराण्या चाळ्वजा इमारतीजवळ पोचलो. टॅक्सी सोडली. बहुतेक सर्व खोल्या बंद होत्या. मला तिसऱ्या मजल्यावरच्या १७ नंबरच्या खोलीत जायचे होते. टेकू दिलेली ती इमारत पाहून मला खरंतर जाण्याची शिसारी आली होती. इमारतीच्या प्रवेशदाराशीच कचऱ्याचे ढीग पडले होते. मी जिने चढायला सुरुवात केली. तिथेही अधून मधून कित्येक वर्षांचा कचरा, भिंतीचे प्लास्टर पडले होते. जिन्याचे लोखं डी कठडे काही ठिकाणी तुटले होते, तर काही ठीकाणी गंजले होते. मी धावतच तिसरा मजला गाठला. रस्यावरच्या दिव्यांमुळे अंधुक दिसत होतं. त्या काळात माझ्या अंगात भयंकर उत्साह असायचा. डाव्या बाजूच्या सर्व खोल्या बंदच होत्या. वर आणखी एक मजला असावा किंवा गच्ची असेल. उजव्या बाजुला एक दोन खोल्या सोडून पाहिलं तर एकच खोली उघडी होती. सगळिकडे त्या मजल्यावरही भिंतीचे प्लास्टर पडले होते. खोलीचं दार अर्धवट उघडंहोतं. आतमधून लाईटचा पिवळा उजे ड येत होता. मी दार वाजवलं. आतून गुजरथीतून उत्तर आलं. " आव जो डिक्रा. " मी आत प्रवेश केला. एका जुनाट बेडवर एक गुजराथी म्हातारा बसलेला होता. त्याच्या अंगात मलमलचा सदरा आणि गुजराथी पद्धतीचे धोतर होते. मी त्याला ब्रीफकेस दिली आणि वजन सांगितले. माझे कोणाशीही बोलणे होतच नसे, तशी माझ्या कडून अपेक्षाही नव्हती किंबहुना माझं ते कामच नव्हतं. तरीपण तो म्हातारा म्हणाला, ": माल चोकस छे ना? ". मला काही कळलच नाही. मी त्याच्याकडे आवासून पाहात राहिलो. मला गुजराथी कळत नसल्याचे वाटून तो हिंदीत म्हणाला, " माल सही है ना? " मी हो म्हंटले. आणि निघालो. बाहेर येऊन जिना उतरणार, तो च कोणीतरी दाणदाण पावले टाकीत वर ये त होते. मी पटकन वरच्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्यावर जाऊन लपलो. खाली वाकून चोरून पाहताना दोन पोलिस हवालदार आणि इन्स्पेक्टर मी ज्या खोलीतून बाहेर आलो तिकडे धावत जाताना दिसले. ते बोलत होते. " बघा सावंत खबर पक्की आहे. पकडा त्या म्हाताऱ्याला, आणि एक मुलगा पण आहे. " सावंत की कोण होता त्याने जीवनलालला बीफ्केस सहीत धरला असावा. मी पुढचं पाहायला थांवलोच नाही. धडाधड उड्या मारीत मी जिन्यावरून निघालो. वरून आवाज येत होता. "सावंत तुम्ही दोघे धावा आणि त्या पोराला पकडा. जा लवकर. मी ह्याला घेऊन येतो....... "
सावंत की कोण होता तो आणि दुसरा एक जण असे दोघे माझ्या मागे धावत सुटले. मी रस्या वरून वाट फुटेल तिकडे पळत होतो. पावसाची रिपरिप चालूच होती. मी जाम घाबरलो होतो. रात्रीचे साडे आठ वाजून गेले असावेत. दुकानं बंद होत होती. हळुहळू रस्त्यावरच्या एक दोघांनीही माझ्या मागे धावायचा प्रयत्न केला. पण मी थांबायला तयार नव्हतो. लोकांनी लवकरच माझा नाद सोडला. पण दोधेही पोलीस मात्र माझ्यामागे पळत होते. जीव घेऊन पळणं म्हणतात ना, ते मला त्यावेळी समजलं. माझं सर्व अंग घामानी आणि पावसानी भिजलं होतं. शर्ट पाठीला आणि पँट पायांना चिकटली होती. धावण्यात अडचणी येत होत्या. मी मग की प लेफ्ट मंत्र ठेवून धावत होतो. माझा श्वास रस्त्यावरच्या लोकांना ऐकू जातोय की काय याची मला भीती वाटली. थोड्या वेळाने मी एका बोळ्वंडीत शिरलो. तिथे रस्त्यावर लाईट नव्हते. आणि गुडुप अंधारही होता. सगळ्याच इमारती जुन्या, चाळ्वजा. मला कळेना मी कुठे जात होतो. माझ्या मागून येणारे दाणदाण पावलं टाकीत येतच होते. आता माझ्या तोंडातून आणि नाकातून शिट्ट्या मारल्यासारखा श्वासाचा आवाज येत होता. ते दोघेही गल्लीच्या तोंडाशी थांबले असावेत. माझा अंदाज घेत असावेत. मी समोर पाहिलं, मला हा भाग थोडा ओळखीचा वाटला. मग लक्षात आलं की आमच्या वाण्याचं दुकान ज्या गल्लीत आहे तिथेच मी आहे. एका इमारतीच्या भिंतीला चिकटून सरकत सरकत लहानसा बोळ होता तिथे जाऊन थांवलो. हवालदार आता गल्लीत शिरले होते. मी त्यांना दिसू नये म्हणून, बोळात अत्यंत घाण येत असुनही आत शिरलो. बोळ ओलांडून ते पुढे गेले आणि परत आले. मग आवाज आला, " सावंत तो पळाला असावा. साले ही चरस गांजावाली पोरं पळण्यात वस्ताद असतात. आपण असं करू. बाजूच्या गल्लीतही बघू आणि प्रत्येक इमारतीत जाऊन बघू. " ते बोळ ओलांडून गल्लीच्या तोंडाशी मेन रोडला आले. मी पुन्हा धावायला सुरुवात केली. आता मला भीती नव्हती. तरीही मी धावतच चाळ गाठली. तसाच मी पहिल्या मजल्यावरच्या माझ्या खोलीशी आलो. घामाने आणि पावसाने माझे केस विस्क्टलेले होते. खोचलेला शर्ट कसतरी बाहेर आला होता. बू ट चिखलाने माखले होते. मी जोरजोरात दरवाजा वाजवला. आईने दरवाजा उघडताच मी तिच्या अंगावरच पडलो. तिला दरवाजा लावायला सांगितला. मी तिला मिठी मारली. आणि प्रथमच मी पूर्ण श्वास घेतला. तिला काही कळेना. रात्र्रीचे दहा वाजत आले होते. थोडावेळ कोणीच काही बोलले नाही.
मग दारावर थाप पडली. मी स्वयंपाक घरात जाऊन, कसेतरी कपडे भिरकावून टेबलाखाली लपलो. आई म्हणाली, " अरे एवढा घाबरतोस काय? बघते मी. आईला काहीच माहिती नव्हतं. आता सगळं सांगणंही कठीण होतं. तेवढा वेळ ही नव्हता. कदाचित ती घाबरली असती. आई दरवाजापाशी गेली. तिने दार उघडलं. दारात पोलिस हवालदार.... "बाई, एक सोळा सतरा वर्षाचा मुलगा गुन्हा करून पळालाय, त्याचा आम्ही शोध घेतोय. तुमच्याकडे तर नाही आला? किंवा नुम्ही पाह्यलाय का इथून पळताना.? "दोन हवालदारां पैकी एक जण म्हणाला. मी आवाज ओळखला. मग आईचा आवाज आला, " नाही हो इथे कोण येणार? आनी आम्ही कोणाला पाहणार? मी स्वयंपाक घरातच होते. पाहिजे तर आत येऊन पाहा. " मला वाटलं आईला वेडबीड लागलं की काय? त्यांनी घरात यावं म्हणून आई दारातून बाजूला झाली.. पण त्यांनी नुसतीच आतमध्ये नजर टाकली, आणि आईला म्हणाले, " ठीक आहे. इथे कोणी नाही आहे. अंधारात त्या मुलाचा नक्की चेहरा किंवा कपडे वगैरे नीट दिसले नाहीत, म्हणून आम्ही आता काही सांगू शकत नाही. पण बघा, लक्ष ठेवा. तसं चाळित शिरताना कोणी दिसलं तर पोलिस स्टेशनला येऊन सांगा. " आणि ते गेले.
आईने ते पूर्णपणे गेल्याचे पाहून दार लावले. मग मला म्हाणाली , " काय रे काय आहे हे? तुझा काही संबंध आहे का ? " मी थोडक्यात जे आवश्यक आहे ते सांगितलं. तशी ती म्हाणाली, " अरे तू थोडाच गुन्हा केलायस? तो त्या रघुवीरनी केलाय. तू नोकर माणूस . तुला काय माहित कसली पार्सलं होती ती. जाऊ दे, जास्त विचार करू नकोस आणि कामावरही जाऊ नकोस. " रात्र टेन्शन मध्येच गेली. घरी बसायचं म्हणजे पैशाचा प्रश्न होताच. ह्या सगळ्याचं पुढे काय होणार? याचीही काळजी होतीच. जेवणावरची वासनाच गेली. सकाळी उठलो. पेपर नेहेमी बाहेरुनच आणायचो. पण बाहेर गेलोच नाही. सकाळचे दहा वाजायला आले. मध्येच काकूंचा डोळा चुकवून दिवेकर काका घरी आले. म्हणाले, " काय रे, काल असा घाबरत घाबरत आणि धावतसा घरी आलास? " मी त्यांना सगळी हकीकत सांगितली. ते म्हणाले, "तू सध्या दोन तीन दिवस घराबाहेर पडू नकोस. कदाचित त्या रघुवीरची माणसं आणि पोलीस तुझ्या मागावर असण्याची शक्यता आहे. आणि हो, आज पेपरला काहीतरी आहे खरं. मी फारसं नीट वाचलेलं नाही. मी पेपर आणून देतो, तो वाचून काढ. " असं म्हणून त्यांनी मला पेपर आणून दिला.
मी पेपर पाहिला. पहिल्याच पानावर रघुवीरांचा फोटो होता. मोठा मथळाही होता. " गेली काही वर्ष अव्याहतपणे अमली पदार्थांचा व्यापार करणारा तस्कर मुंबईत सापडला. " त्यात रघुवीर आणि जीवनलाल हे पोलिसांच्या ताब्यात असल्याचे लिहिले होते. तसेच रघुवीरांच्या ऑफिसवर धाड घालून पोलीसांनी काही लाखांची रोकडही हस्तगत केली होती. पण मालाचा साठा सापडलेला नव्हता. नुसतीच रिकामी खोकी सापडल्याचे म्हंटले होते. पण त्यांची कार्यपद्धती दिली होती. दुसरे पण दोन तीन इसम त्यांनी पकडले असल्याचे त्यांनी लिहिले होते. हे वाचून मला जरा बरं वाटलं. पण पुढील ओळ वाचून मला घाम फुटला. पोलीस एका सोळा सतरा वर्षाच्या मुलाच्या मागावर असल्याचे लिहिले होते. जो रघुवीरांचा जुना सहकारी आहे (मी तर पाच सहा महिन्यांपूर्वीच लागलो होतो. हा पोलीसांचा गुगली असावा). पुढे वर्णन होते. हा मुलगा मध्यम बांध्याचा , लांव केस वाढवलेला पांढरा शर्ट आणि गडद रगाची पँट घातलेला, स्थानिक मुलगा असावा, असे लिहिले होते. पण माझा शर्ट आकाशी रंगाचा होता. असो , तो मुलगा पोलीसांना हवा असल्याचे लिहिले होते. " मला काही सुचेना. मी पुढील दरवाजा किलकिला करून बाहेर पाहिले. माझी अवस्था घाबरलेल्या मांजरीसारखी झाली होती. बाहेर नेहेमीप्रमाणे मुलं खेळत होती. नेहेमीसारखी भांडणं चालू होती. समोरच वसणारा स्टोव्ह रिपेअर करणारा नेहेमी प्रमाणे पानवाल्याबरोवर जुगार खेळत होता. दिवेकर काकू बोंबाबोंब करित होत्या . म्हणजे सर्व काही नॉर्मल होतं. मला बाहेर जायचा धीर होईना. माझ्याकडे लोक कसे पाहतील काय माहित. मी दार लावून घेतले. आई संध्याकाळशिवाय येणार नव्हती. मी कसतरी बहिणी बरोबर जेऊन घेतल. कोठेही जायचे नव्हते. पण वेळही जात नव्हता. तो दिवस असाच गेला. आणखी दोन दिवस असेच काढले. नंतर बाहेर पडायचो , पण काळोख पडल्यावर. मेन रोडला पोलीस स्टेशन होतं. ते दिसलं की छाती धडधडायची. कोणी आपल्याला थांववणार तर नाही, किंवा कोणी ओळखणार तर नाही . मला आणखी एक भीती होती. रघुवीर , तो जीवनलाल, आणि रघुवीरांचे ते लोंबते, माझ्याबद्दल पोलीसांना काही बोलले तर ? त्या दडपणात मी चार पाच दिवस घालवले.
रोज दोन दोन तीन तीन पेपर मी घेऊन यायचो. वाचून काढायचो. पण कसलीच बातमी नव्हती. आई म्हणायची, " काय करायच्येत एवढे पेपर ? उगाचच रद्दी वाढवतोयस. आतापर्यंत पेपर घेतला नाही , काही अडलं का आपलं? मग मी तिला समजावून सांगितलं , ती म्हणाली, " अरे तसं काही होत नाही. तुझी माहिती पकडलेले लोक कशाला सांगतील ? तू काही एवढा महत्त्वाचा दुवा नाहीस. पोलीसही फार लक्ष देणार नाहीत. कारण त्यांना महत्त्वाचे लोक सापडले आहेत. काही होणार नाही." पण मी दुसरं काम शोधाव असं काही ती म्हणाली नाही. तिचा हिशो ब सरळ होता. आपल्याला काम केलच पाहिजे. मुलांना पोसण्याची जबाबदारी आपली आहे. अशी ती साधी होती. आठवडाभरा नंतर दिवेकर काकांनी मला एक चिठ्ठी दिली . आ णि त्यांनी मुबई सेंट्रल स्टेशनात एक नायर नावाच्या माणसाला भेटायला सांगितले. "हे बघ तू नववी नापास आहेस असं सांग म्हणजे तुला हेल्पर म्हणून लावून घेतील. " त्यांच्या म्हणण्या प्रमाणे मी नायरला भेटलो. तो म्हणाला, " ठीक है, दिवेकर साबने भेजा है , इसलिये रखता है. लेकीन कभी भी निकाल सकता है.मग माझी त्या कामाला सुरुवात झाली. पगार बरा होता जवळ जवळ आठशे ते हजार रुपये हातात पडत. क्लास फोरची सगळी कामं मी करीत होतो. नायर्ची केबीन झाडण्या पासून ते चहा, कॉफी , नाश्ता आणणं . माझी तक्रात काहीच नसल्याने मी लवकरच आवडता झालो. असं वर्ष गेलं. रघुवीर आणि कंपनी यांना मी विसरून गेलो. पण कोणी पॉश माणूस दिसला की मी त्याची तुलना रघुवीरांशी करीत असे. ते तसे स्मार्ट होतेच. आता मी मोकळेपणाने जाऊ येऊ लागलो. रस्त्यानी जाताना भीती वाटेनाशी झाली. माझी कॅजुअल लेबर म्हणून नेमणुक असल्याने दर महिन्याला ब्रेक देत असत. त्याचीही सवय झाली. घराच स्वरूप पालटू लागलं. आईला जरा बऱ्या साड्या नेसायला मिळत होत्या. ती अधून मधून भजनाला जात असे. भजनाला जातान मात्र तिचे कपडे जरा बरे असत. अजूनही तिला कामं करावी लागत होतीच. आता थोडफार सेव्हींगही होऊ लागलं. दिवस बरे चालले होते.
एक दिवस काय माहिती काय झालं . कुठलसं इस्पेक्शन निघालं. नायरचा बॉस उन्नीकृष्णन सकाळी सकाळी आला.मी नायरची केबीन आवरत होतो. नायर यायला उशीर होता. त्या उन्नी बरोबर एक खटखटे नावाचा माणूसही होता. उन्नी तापट असला तरी बोलायला जरा बरा होता. मी त्यांच्या कडे दुर्लक्ष केलं. पण खटखटे मला भांडखोर आणि तक्रारखोर वाटला. तो तापून म्हणाला, " देखो उन्नी साब, मै बोलता है, ये आपका नायरने पैसा खाके , जो आदमी पहिलेसे निकाला गया था , और जो युनियन का मेंवर है, उनको छोडके बाहर्वाले आदमीको कामपे रखताहै. आपको अभी तक कोई मिला नही लेकीन मेरे को पक्का डाउट है , देखो. " "तुम जरा चुप करो ना, मैने पूछा क्या ? " उन्नी म्हणाला. मग त्याने एन. एम . आर मागवला. त्याने मस्टर्वर नाव असलेल्या प्रत्येकाला बोलावून घेतले. सगळ्यांजवळ युनियनचा पास होता. मग तो खटखटेला म्हणाला, " देखा, सब युनियन का आदमी है. " तरीही खटखटेला डाउट होता. तो म्हणाला, " आपने ये लडके को पूछा? मग माझ्याकडे वळून म्हणाला, " ए, तुझा पास दाखव रे. " मी म्हंटलं. " कोणता पास ? , तुम्ही नायर साहेबांना येऊ द्या, ते सांगतील काय ते. "मग घामाघूम झालेला नायर आला. खटखटेला पाहून तो म्हणाला , " काय कू चिल्लाता है रे ? मै अभी एक दो दिनमे इसका पास निकालनेवालाही था . ये देख , फॉर्म भी है. " त्याने कुठलासा फॉर्म दाखवला. खटखटे चिडून म्हणाला, " अरे इस आदमी को एक बरस रखा है तुमने हमारे पर्मिशन के बगैर. वो कुछ नही, तुम इसको पहले बाहर निकालो. या तो तुम उसको सफाईके काम मे लगाओ. "
" अरे यार खटखटे , जरा सोचो इतना अच्छा आदमीको सफाईमे भेजनेका? नायरने माझी बाजू घेतली . उन्नी म्हणाला, "इसको या तो सफाईमे भेजो , या तो निकाल दो.. ये लडका मेरेकू कलसे यहापे दिखना नही चाहिये , समझे. " मग कसलासा लाल रिमार्क मस्टरवर मारून तो निघून गेला. खटखटे बडबडत गेला, " मैने बोला ना आपको ये लोग साला पैसा खाके......... " नायर मला म्हणाला, " देख बेटा मै अब कुछ नही कर सकता. तु कल लच्छी से जाके मिलना , यहा मत आना. " मी विचारलं , " लेकीन मेरेको पगार कौन देगा? पण नायरने लक्ष दिले नाही. मी घरी आलो. आईला काही बोललो नाही. मला फारसं काही समजलं नव्हतं. तिला एकच गोष्ट माहित होती, काम आहे , काम नाही. काय काम आहे, किती पैसे मिळणार, याच्याशी तिला काहीही मतलब नव्हता. मला वाटतं तिच्या स्वभावामुळे , लोक तिला फार कमी पैसे देत असणार. असो. या महिन्याचा पगार अजून मिळाला नव्हता. नोकरी टिकते की राहते कोण जाणे. दिवेकर काकांना सारखं काय सांगायचं. काम मिळवून देण्याच काम त्यांनी केलं होतं .मी दुसऱ्या दिवशी ऑफिसकामासारखे कपडे घालून गेलो. गेटवर नायर भेटला. मी त्याला लच्छी कुठे बसतो ते विचारले. तो म्हणाला, " वो आठ नंबर फलाटके आखरी कोनेमे बैठता है. त्याने माझी विचारपूस केली नाही. त्याला बहुतेक उन्नीसाहेबानी नंतर झापला असावा.
मी आठ नंबर प्लॅटफॉर्मच्या एंडला गेलो. तिथे एक रेल्वे स्लीपर्स वापरून केबीन बनवलेली होती. आत एका टेबलापाशी एक चॉकलेटी कलरचा माणूस भुस्कारलेले केस घेऊन खाकी कपड्यात बसलेला होता. तो काडीने दात कोरत बसला होता. मी विचारलं , " लच्छी कौन है ? " त्याने मला तुच्छतेने आपादमस्तक न्याहाळले. माझा बऱ्या पैकी कपडे आणि बूट त्याला आवडले नसावे. काडीने निघालेली दातातली घाण थुंकून , करवादून म्हणाला, " क्या रे , लच्छी का बाप है क्या तू ? साला. " माझ्या लक्षात आलं की त्याला भाव दिला पाहिजे. मी म्हंटले, " अरे माफ कीजिये लच्छी साब , मुझे नायर साबने आपके पास सफाईकाकाम करने भेजा है. " त्याला जरा बरं वाटलं असावं. मग तो विडीने काळे पडलेले दात विचकून म्हणाला, " ठीक है, ठिक है. चल सब कपडा उतार. जांगिया है ना अंदर? " मी पाहात राहिलो.तो पुढे म्हणाला, " इन कपडोमे सफाईका काम क्या खाक करेगा ? आया बडा लाट साब, सफाईका काम करने. " मी शर्ट पँट काढली . तसाही मी नायरकडे असताना शर्ट काढीतच होतो. मी शर्ट पँट काढली. जांग्यावर उभा राहिलो. तो म्हणाला, " अब चल मेरे साथ, इधर अपना राज चलता है. " त्याने एक दो न रेल्वे ट्रॅक ओलांडून एका गटारापाशी नेले. तिथे माझ्यासारखीच चार पाच माणसं एका गटाराची सफाई करण्यासाठी उभी होती. माणसं कसली आयुष्यातल्या लाचारीचे बळीच म्हणायचे. मीही त्यातलाच एक , फक्त इतर काही पर्याय शोधण्याची जाणीव झालेला, असं म्हणता येईल फार तर. त्यांना सुद्धा असलं वाईट काम करण्याची इच्छा नसणार. लच्छी मला म्हणाला. "देख ये संडास का टंकी है, जादा गहरा पानी नही है, जादासे जादा घुटनेतक आयेगा.ये वायर ले, अंदर उतरके चोक निकालना पडेगा. .. ‌ समझा ? चल कूद अंदर. " मी बघतच राहिलो, मला मळमळू लागलं̱. घाण एवढी भयानक होती , की अगदी जिवंतपणी नरकवास्च तो.... मग मला बापाची आठवण झाली. या ...... मुळेच मला ही कामं करायची वेळ आली. लच्छी माझ्याकडे पाहून म्हणाला, " इधर ऐसाच काम है. ये कोई अफसरका काम नही, समझा ? मंगता है तो कर. वर्ना निकल जा. अरे लोग साला, पाच पाच हजार रुपीया देकर ये काम करता है. हमने सिर्फ नायर साबके कहनेपर तेरेको ये काम दिया. वो भी मोफतमे.
मी तिथून तसाच वळलो. तो बडबडतच होता. त्याच्या कडे लक्ष न देता मी धावत जाऊन प्रथम कपडे घातले. आणि मागे वळून नबघता गेट बाहेर आलो. विषण्ण मनस्थीतीतच घरी पोचलो. घरी आई नव्हती. सरूनी काही विचारलं पण मी मोघम उत्तर देऊन गप्प बसवली. समोर काकांच सिंहासन पण रिकाम होत. (काका , गुंडाळलेल्या दोन गाद्या व त्यावर ठेवलेली उशी या रचनेला सिंहासन म्हणायचे. ) दिवस अतिशय वाईत गेला. या महिन्याचा पगार नव्हता आणि मी आता तो घ्यायलाही जाणार नव्हतो.
दुसऱ्याच दिवशी मी काकांना भेटलो. सगळं सांगितल्यावर ते म्हणाले, " अरे बघतोच मी त्या नायरला. मी म्हंटलं. " जाऊ द्या, काका. माझ्या नशिबात जर अशीच कामं असतील तर मी तरी काय करणार? त्यावर ते भडकून म्हणाले, " मग जातोस उद्यापासून लच्छी कडे? तुला काही वाटतं की नाही.? सध्या जरा थांब, कुठे चांगला जॉब आहे का बघतो किंवा क्लेरिकल मध्ये आहे पाहातो. मी घरी आलो. आईला सांगितलं. पण तिची काहीच प्रतिक्रिया नव्हती. तिनी मला नुसता बसू नकोस वगैरे असही काही म्हं टलं नाही. मग मात्र मी सहा सात महिने असेच काढले. साबू, वॉशिंग पावडरी वगैरे कमिशन वर विकण्याची लहान सहान कामे मी करित होतो. पण आवक एवढी कमी की कामावर जाणं आणि घरी बसणं सारखचं वाटायचं. फक्त दिसायला, मी कामावर जात होतो असे दिसे. आई ही तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी होती. त्यामुळे आमच्याकडे कोणी नातेवाईक असा येतच नसे. बापाशीच संबंध नसल्याने त्याच्या नातेवाईकांचा प्रश्नच नव्हता. नाहीतर लोकांकडे आज काय मामा आला, उद्या काय मावशी मग कधी लोकं काकांकडे जात. आम्ही बारा महिने तेरा काळ घरीच असायचो. आम्ही कोणत्याही वस्तूसाठी हट्ट करीत नव्हतो. करमणूक हा प्रकार नव्हताच. करमणुकीसाठी आधी थकावं लागतं. पण आम्ही अगदीच निष्काम कर्मयोगी होतो. एक गोष्ट मात्र आईने कटाक्षाने पाळली होती. ति म्हणजे, पैसे कितीही कमी मिळोत दूध मात्र चांगलचं आणायचं. जेवायलाही वरण भाताशिवाय काही नसायचं. कधी कधी आई गोड म्हणून भाताची खीर करायची. ती मात्र अप्रतीम लागायची. कधी कधी आई जिथे कामं करायची तिथे मिठाई वगैरे मिळायची. आंब्याचे दिवस असले की आई कुठून तरी लागलेले आंवे घेऊन यायची. त्यांचा चांगला भाग वापरून ति आमरस करायची. पण आम्हाला आमरस खायला घालायची.
मला आता अठरा वर्ष पूर्ण झाली होती. एक दिवस दिवेकर काकांनी मला एक कार्ड दिलं. ते एका वाधवा नावाच्या सी. ए. चं होतं. ते म्हणाले, " तू त्याला भेट. तो तुला आयकर ऑफिसमध्ये क्लेरिकल्ची भरती आहे तिथे लावून देईल. तुझं नशिब चांगलं असेल तर लागशील. सगळी सर्टिफिकेटस घेऊन जा. मी वाधवा ऍंड कंपनीच्या चर्चगेट मधीलऑफिसमध्ये गेलो. मी काकांकडून आल्याचे सांगितले. ज्याला भेटायचं होतं त्याचं नाव "मितेश वाधवा" होतं. मला बसायला सांगितलं. मीसकाळी दहा वाजल्या पासून बसून होतो. लंच टाईम झाला. तरीही मला कोणी बोलवेना. शेवटी रिसेपशनिस्टला दया आली. तिनी मितेशला फोन केला. "अरे, एक आदमी सुबेसे बैठा है उसको या तो बुलाव या तो जानेको कहो ना. "मध्येच कंपनी तर्फे चहा आला. मी नाही म्हंटल तर रिसेपशनिस्ट म्हणाली, "लेलो, व्हिजिटर्स के लिये हि बनाते है. ये फ्री ऑफ चार्ज है. " पैसे द्यायला माझ्याजवळ होतेच कुठे?. मग मितेश भाईनी मला बोलावले. साध्या कपड्यातले मितेश भाई मला सभ्य वाटले. पण मला भीतिही वाटली. हाही रघुवीरांसारखा निघतो की काय?. मग तो म्हणाला, " चल आपण निघू या. " त्यांनी जाताना बऱ्याच चौकशा केल्या. एकूण तो माणूस निगर्वी वाटला. त्याच्या गाडीतून आम्ही नानाचौकातल्या आयकर ऑफिस मध्ये गोलो. त्याने तिथल्या एडीएम ऑफिसरशी ओळख करून दिली. जाताना मला म्हणाअले, " काम झालं नाही किंवा कामात जर काही अडचण आली तर उद्या मला भेट. " त्यांचं मराठी इतकं चांगलं होतं की ते गुजराथी वाटलेच नाहीत. मी तसं त्यांना सांगितलंही. त्यावर ते म्हणाले, " अरे, माझा जन्मच मुंबईतला. एवढी वर्ष इथे राहिल्यावर मराठी बोलायलाच पाहिजे., नाही का? " मला असा दृष्टिकोन सगळ्यांनीच ठेवला तर भाषिक वादच नष्ट होतील. माझी प्रमाणपत्र वगैरे पाहिल्यावर एल. डी. सी म्हणून लावून घेतो असे म्हंटले. पण थोडं थांबावं लागेल. त्यावेळी अशा नोकऱ्या मिळत असत. आत्ता या सगळ्या परीक्षा वगैरे आल्या. माझा सबंध दिवस गेला. पण मला नियुक्ती पत्र मिळालं. मी खुषीत घरी आलो. पण जरा सांशकच होतो. ही नोकरी किती टिकणार?आणि इथे काय काम सांगणार?आयकर ऑफिसमधील माझी नोकरी व्यवस्थित चालू होतं. पगार चांगला होता. मी जाम मनापासून काम करायचो. एक दिवस एक सहकारी म्हणाला, " अरे अशी कामं करशील तर आपल्या नोकऱ्या नसलेल्या बंधूंचं काय होईल? सगळी कामं संपतील की. कामं थोडी पेंडिंग ठेवायला शीक. "अर्थातच मी लक्ष दिलं नाही. त्याचा परिणाम म्हणजे माझ्या डोक्यावर बरीचशी कामं येऊन पडली. पण मला एवढी माहिती झाली की एक दोन वर्षात मी त्या वॉर्ड ऑफिसमध्ये प्रसिद्ध झालो. अधून मधून मितेश भाई यायचे मी त्यांचे मनोमन आभार तर कधीचेच मानले होते. मला म्हणायचे, " इथे काही त्रास असेल तर सांग, बरं का. आपण दुसरं काम शोधू. " असं कोण म्हणणार आहे? ". दिवस चांगले चालले होते.. घराचं स्वरूप मी पालटलं. जुजबी फर्निचर घरी आणलं. सेव्हिंग बऱ्यापैकी होत होतं. आईनं कामं सोडावीत असं मी म्हंटलं. पण घरी वसून काय करणार असं ती म्हणाली. काही कामं तिनी बंद केली. रविवारी पण ती घरी राहू लागली. आमच्या आर्थिक स्थितीत चांगलीच सुधारणा झाली. कपडे बरे वापरू लागलो. मग ही ब्रीफकेस घेतली. एवढी जुनी आहे ही. "
थोडं थांबून तो म्हणाला, " तुला मी बोअर तर करीत नाही?. " मी म्हटलं, " छे छे, अजिवात नाही. फक्त दोन तीन बीयर झाल्यावर जी चढायची ती चढत नाही. " मग आम्ही आणखी एकेक बियर आणि खिमा मागवला. बियरचे घुटके घेत तो म्हणाला, " आई दर गुरुवारी भजनाला जायची. पण घरात रोजची देव पूजा असं काही रुटीन नव्हतं. ती सकाळी उठल्यावर काय करीत असेल तेवढच. माझा विश्वास देवावर यथातथाच होता.
एक दिवस एक पत्र आलं. अर्थातच निनावी. सोमवार होता. मला थोडा ताप असल्याने मी घरी होतो.आई आणि बहीण बाहेर गेली होती. भाऊ शाळेत गेला होता. ते एक बंद पाकीट होतं. मी ते उघडलं. आम्हाला पत्र लिहीणारे नातेवाईकच नव्हते. मग हे पत्र कसं आलं कोण जाणे. आत एक चिठ्ठी वजा कागद होता. त्यात "श्री नाही, मायना नाही". मला वाटलं कोणी खपला की काय?. पण या पत्रानी माझं आयुष्य चांगलच बदललं. त्यात एकच ओळ होती. " त झी आ ई भ ल ती च भ ज नं क र ते. सांभाळ. "खाली सही नाही काही नाही. निनावी पत्रावर सही नसतेच. पोस्टाचा शिक्का पाहिला. गिरगावातलाच होता. चिठ्ठी उलटी सुलटी करून पाहिली ,कोणत्याही प्रकारच्या खुणा अथवा लिखाण नव्हतं. मला त्या वाक्याचा अर्थ लागेना. मी ते पत्र बॅगेत टाकलं. कोणालाच सध्या काहीही न बोलण्याच ठरवलं. पोस्टात चौकशी करून काही उपयोग नव्हता. मग नेहेमीप्रमाणे गुरुवार आला. आई भजनाला जाणारच. मी ऑफिसला असल्याने मला काहीही करणं शक्य नव्हतं. मग पुढच्या गुरुवारी दांडी मारण्याचे ठरवले.
त्या गुरुवारी मी सकाळी दहा वाजत आले तरी उठलो नाही. हे पाहून आईने आज जायचं नाही का अस विचारलं. त्यावर मी आज जायचा कंटाळा आलाय म्हणून म्हंटलं. पण ती म्हणाली, " ठिक आहे, मला आज दुपारी भजनाला चारलाच जायचय. ", असं म्हणून ती जिकडे कामं करायला जायची तिकडे गेली. मग मी परत पडून राहायचा प्रयत्न केला. पण माझ्या डोक्यातून ती ओळ जाईना. " भ ल त च भ ज न ". म्हणजे काय? लिहीणारा पागल असला पाहिजे आणि ओळखणाराही. चाळीतलं कोण असेल? मला डोकं भणभणू लागलं. मला अंदाय येईना. आईचं नक्की काय चालू आहे?. झोपही येईना. म्हणून अंघोळ, जेवण वगैरे उरकून घेतलं. एक वाजायला आला. मी लोळत पडलो होतो. अडीचच्या सुमारास आई आली. मी झोपलेला आहे असे पाहून ती भजनाला जाण्याच्या तयारीला लागली. मी हळूच डोळे उघडून पाहिलं. ती चांगली साडी नेसून, गजरा वगैरे माळून तयार झाली. मग मला तिने उठवलं. म; ई खरं तर जागाच होतो. पण उठल्या सारखं केलं. बहीणही नुकतीच सगळं आवरून झोपली होती. आई म्हणाली, " मी जाऊन येते. " मी न राहवून विचारलं. " भजनाला एवढी अगदी तयार होऊन चालल्येस? कमाल आहे. ती म्हणाली, " अरे. आज ग्रुप मधल्या बायकांनीच आग्रह केला. त्या सगळ्या साठीच्या पुढच्या आहेत आणि विधवाही. " मी मध्येच म्हणालो, " तशी तूही काही विधवे पेक्षा कमी थोडीच आहेस?. "माझ्या बोलण्याचा रोख तिला आवडला नाही. पण स्वतःचा मूड ठिक ठेवीत ती म्हणाली, " मीच लहान आहे म्हणून त्यानीच मला आग्रह केला, की मला चांगली साडी नेसून यायला काहीच हरकत नाही. आज बुवा निरूपण पण करणार आहेत. म्हणून जरा लवकर. मला यायला जरा उशीर होईल. म्हणजे सात साडे सात. सरू करील जेवणाचं. " न राहवू न मी विचारलं, " असं कोणतं मंदीर आहे गं, जिथे तू जातेस. " " हे कोपऱ्या वरचं रामाचं नाही का? " ती घाईघाईने म्हणाली. आणि चपला घालून ती निघाली देखील.
खरं तर माझ्या मनात पाठलाग करण्याचं नव्हतं. आपल्याच आईवर संशय घेणं बरोबर नव्हतं . पण मी पडलो आता सरकारी नोकर. सरकारी नोकरीत माणुस काहीही शिकला नाही , तरी दोन गोष्टी शिकतो. एक टाळाटाळ आणि दुसरी संशय घेणं. पैकी संशय घेणं माझ्या अंगात भिनलं होतं. मी जाडकन उठलो. साधारण कपडा घातला. पायात चपला सारकवल्या. जवळ जवळ घावतच निघालो. ती दिंडी दरवाजातून बाहेर पडत होती. मी फार भराभर चालत होतो. ती मेन रोडपाशी पोचली होती. तीन साडेतीन म्हणजे काही फार रहदारीची वेळ नव्हती. तरी गर्दीत कधी कधी आई दिसेनाशी होई. ती सरळ चालत कुंभारवाड्याकडे वळली. रघुवीरांचं ऑफिसची बिल्डिंग दिसली. माझी नजर वर गेली. दुसऱ्या मजल्यावरील ती खोली सील केलेली दिसत होती. आता मला भीतीही नव्हती आणि जरूरही.
आईच्या एवढ्या भराभर चालण्याचं आश्चर्य वाटलं. तिला गाठणं मला कठीण जाऊ लागलं. चालता चालता ती गोल देवळाजवळ आली. तेही ओलांडून ती एका मुस्लीम मोहल्ल्यत शिरली. मला क्ळेना, या ठिकाणी कोणतं रामाचं देऊळ आहे ? तरीही मी चालतच होतो. नंतर ती डाव्या बाजूला एक बोळ लागला तिथे थांवली. तिने मागे वळून पाहिले आणि बोळात शिरली. मी दिसणार नाही अशा रितिने थांवलो. मग धावत जाऊन बोळाचं तोंड गाठलं. आई डाव्या बाजूच्या एका चाळीत शिरली. पाहिलं तर सगळिच मुसलमान वस्ती. ही चाळीची मागची बाजू असावी. बोळात नेहेमीप्रमाणे सांडपाण्याचे पाईप वाहत होते. त्यांचा शॉवर चुकवीत लाकडी जिन्याने वर निघालो. जिन्यावरून लहान लहान मुले धावत होती. माझ्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. आई नक्की कोणत्या मजल्यावर गेली, कळणं कठीण होतं. पण माझं नशीब जोरावर होतं. मी प्रत्येक दरवाजापुढच्या चपला पाहात होतो. पहिला मजला सोडला. दुसऱ्या मजल्या वरच्या उजव्या हाताला एक खोली होती. तिचं कुलुप थोडसं हालत होतं. म्हणजे आई नुकतीच आत गेली होती तर. जवळच तिच्या चपलाही दिसल्या. दारावर नाव होतं.
"एस. डी . मिर्झा. " मी आतला कानोसा घेण्याचा प्रतत्न केला. पण काही दबक्या आवाजातील बोलणं आणि हालचालींचे आवाज येत होते. असं दुसऱ्या च्या दाराशी किती वेळ उभं राहणार होतो मी ? पण मला दार वाजवण्याचं धाडस झालं नाही. दुसऱ्या खोल्यांकडे पाहिलं. सर्वांचीच दार लोटलेली होती. धड्याळात चार वाजत होते. त्याच खोलीला जिन्या जवळ असलेल्या खिडकीशी मी आलो. लोटल्यावर जी उभी फट राहते त्यातून आतलं दृश्ञ अंधुक दिसत होत.
आत थोडासा उजेड होता. आणि माझी आई माझ्या (इलाज नाही) हरामखोर बापाच्या मिठीत होती. तो तिच्या अंगावरून हात फिरवीत होता.म्हणजे हे आहे तर " भलतच भजन" माझ्या मनात आलं.मला आता उलगडा झाला.हेच ते निरूपण करणारे बुवा तर. माझा बाप अधून मधून बोलत होता. " किती दिवसानी येत्येस ? " आई भेदरल्या सारखी म्हणाली, " मला नाही आता यायला‍ जमणार . मुलं मोठी झालेली आहेत. जयला संशय आला तर काय करणार ? त्याला आता नोकरी लागलेली आहे. "बापानं तिला धरून ठेवली होती. तो म्हणत होता, " आता तर तुला मोकळीक आहे.; तुला गुरुवारच्या भजनाचं निमित्त नको. एरवी पण तू येऊ शकतेस.नाहीतर मला यावं लागेल. तसही घरी कोणी नसतच. "मी आजुबाजूला सारखा पाहात होतो. कोणी आलं तर? तेवढ्यात . आतल्या एका खोलीचं दार दाणकन उघडलं. एक मुसलमान बाई बाहेर येऊन ओरडली, "अरे, तुम्हारी रंग रलिया कभी खतम नही
होगी. इतनाही प्यार था तो मेरे पास क्यूं आया ? आज दस बरसके बाद भी तुम छुप छुपके ये धंदा करते हो ? आई कडे वळून तिरसटली, "
बेशरम कहीकी. मुसलमान क्या तू तो काफिर भी नही हो सकती. जानवर हो तुम दोनो. " आईने पटकन बाहेरचा दरवाजा उघडला. ती बाहेर
येणार तेवढ्यात मी धडपडत कसातरी जिन्यावरून खाली आलो. आता पाच वाजत होते. मधून मधून तिथे राहणारे लोक येऊ लागले. ते माझ्याकडे डोळे विस्फारून पाहात होते. मी त्यांच्याकडे लक्ष दिलें नाही. मी धावतच मेन रोडला आलो. आता आई घरीच येणार हे मला माहीत
होतं. जे पाहिलं ते इतकं धक्कादायक होतं. , की माझं डोकं भणभणू लागलं. एकीकडे मला रागही आला आणि आईनी फसवल्या सारखं वाटलं.
जिला आपण एवढं मानलं तिला आपला अजिबात भरवसा कसा नाही ? घरी गेल्यावर आईला मी जाब विचारायचं ठरवलं . अर्ध्या तासात घरी आलो. सरू म्हणाली , " तु या वेळेला कुठे गेला होतास ? " मी तिला थातुर मातुर उत्तर देऊन गप्प बसवली. आईची वाट पाहू लागलो. अस्वस्थ्तेने मी येरझारा घालीत होतो. मी जाम चार्ज झालो होतो. पण आई सांगितल्या प्रमाणे सात साडे सात लाच आली. मला आश्चर्य वाटलं.
मी तिथून निघाल्यावर ती कुठे गायब झाली .
ती आत आली. तिच्या कपाळावर हळद कुंकू लावलेलं दिसत होतं. तिनी साडी बदले पर्यंत मी वाट
पाहिलि. मग न राहवून म्हणालो, " काय , झालं का बुवांचं निरूपण ? माझ्या बोलण्यातला खंवचटपणा तिला जाणवला नसावा किंवा ती तसं
दाख्वित असावी. ती म्हणाली , " हो .... झालं की . अरे आज भजन असं रंगलं की भानच राहिलं नाही. तिच्या प्रत्येक शब्दाला माझ्या दृष्टीने
वेगळाच अर्थ होता. पण ती आनंदात होती. तसे ती दाखवीत होती की काय कोण जाणे.
मग मी सरळच विचारलं, " किती दिवसांपासून हे निरूपण चालू आहे? की काही वर्ष ? तिला माझ्या
बोलण्यातली खोच कळली असावी. तिचे तोंड आश्चर्याने उघडे पडले. चेहरा पांढरा पडला. ती म्हणाली, " काय बोलतोयस काय तू? कळतय का
तुला ? " मी चिडून म्हणालो , " चांगलच. " ती म्ह्यणाली, " म्हणजे तू आला होतास तर. पाठलाग केलास माझा. आईवर संशय घेतोस? माझ्या नजरेला नजर न देता ती कातर स्वरात म्हणाली, " अरे , ते खरं नाही रे. " मी म्हंटलं. " काय खरं नाही?, तुझं जाणं ? त्या हरामजाद्याशी जे काही केलस ते ? " मी तिचे दोन्ही खांदे धरले रागाने हालवून म्हणालो, " तुला खोटं बोलायला लाज नाही वाटत ? " तिचे डोळे पाझरत होते. ओठ थरथर्त होते. चोरी करताना पकडलं गेल्याचे भाव तिच्या तोंडावर होते. मी तिला सोडली. थोड्या वेळानी भानावर आल्यावर म्हणाली, " तुला सगळं सांगावच लागेल. तुला काय माहीत हे गेल्यानंतर मी पाच्सहा महिने कसे काढले ते ? काही लोकांनी तर काम देतो सांगून नको ते उद्योग करण्याचा प्रयत्न केला. सगळं सांगणं फार कठीण आहे. ( माझ्या मनात आलं लोक आईला गावभवानी म्हणत) मी कशी तरी पळून आले . नंतर जी कामं मिळाली त्या पैशांतून तुमच्या फिया, कपडे रोजचं खाणंपिणं झालं असतं का? हे अधून मधून पैसे देत असत म्हणून तर सगळं चाललं. त्या बदल्यात त्यांना भेटावं लागायचं. तु आता सगळं पाहिलंच आहेस्. मी तरी कोणाकडे मन
मोकळं करणार? मलाही भावना आहेत. हे तूही लक्षात घेत नाहीस . मला आई, वडील , भाऊ , बहीण कोणी नाही. मला तुझी फार भीती वाटते रे. मी ... काय करू? " बोलता बोलता ती खाली बसली. हुंदके देऊन रडू लागली. तरीही मला दया आली नाही. माझ्या डोक्यावर भूत
सवार झालं होतं.
मी दात खात म्हंटलं., " म्हणजे त्या.......... बापाचंच अन्न मी खाल्लं तर. हा सोडून गेला तो त्या मुसलमान बाईबरोबर ? धर्मसुद्धा बदलेल याच्यासारखा हलकट माणूस . जिवंतपणी गाडला पाहिजे साल्याला. ती रात्र अशीच गेली‌. सरू तर घाबरून झोपून गेली. आई आणि मी रात्रभर बिछान्यावर बसून होतो. सकाळ झाली. डोळे जागरणानी जळत होते. मी तसाच ऑफिससाठी
तयार झालो. आईनी चहा वगैरे तयार केला. पण मी त्याला हात सुद्धा लावला नाही. उलट मी म्हणालॉ, " हे बघ, मी आता अंधेरीत फ्लॅट बुक केलाय., चार सहा महिन्यात ताबाही मिळेल. पण तू इथेच राहायचं. तुला मी नेणार नाही. (इथेच मी चूक केली. नंतर जाणवलं. )मग तो ..... बाप आणि तू घाला गोंधळ. पैसे पाठवीनच मी. असं म्हणून मी ऑफिसला गेलो. दोन चार दिवस घरी न जेवताच मी ऑफिसला गेलो. मग हळू हळू घरी जेवायला मी सुरुवात केली. आता आई घरातून हालेनाशी झाली. मी तिच्याशी पूर्णपणे बोलणं टाकलं. लागलो. ऑफिसच्या परीक्षेत मी पहिला आलो . मला आता इन्स्पेक्टरचं प्रमोशन लवकरच मिळेल.
खाणं पिणं संपलं होतं. माझा पिक्चरचा मूडच गेला.मी त्याचा निरोप घेतला. मणामणाची जड कथा घेऊन घरी आलो. मग महिनाभर असाच
गेला.
एक दिवस सकाळीच त्याचा फोन आला. सहा साडेसहा वाजत होते. तसा मी उठण्यात सूर्यवंशी होतो. मी जरा अनिछेनेच फोन घेतला. तो म्हणाला, "तू लगेच घरी येऊ शकशील का ? " त्यानी मला त्याची आई गेल्याचं सांगितलं. त्यानी त्याचा पत्ता दिला. तरी मला ठाण्याहून त्याच्याकडे जायला साडे आठ नऊ वाजले. चाळीच्या बाहेर मला गर्दी दिसलीच नाही. मी त्याच्या रूमशी पोचलो. दोन खोल्यांची जुनाट जागा. खरी तर एकच रूम . पण लाकडी पार्टीशन घालू न दोन खोल्या तयार केल्या होत्या. आत एक वृद्ध
गृहस्थ होते. ते दिवेकर काका असावेत. त्याच्या आईला अंगावर चादर घालून झाकून ठेवलेली होती. वातावरण भकास होते.मृत्यूची कळा जाणवत होती. जय आईचं डोकं मांडीवर घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवीत बसला होता. त्याचे डोळे खोळ आणि काळवंडलेले दिसले. तो रडत होता. मला म्हणाला, " माझी आई गेली रे. गरीब बिचारी परत कधिच येणार नाही. " तो उठू लागला. मी त्याला न उठण्याची खूण केली. त्याच्या आईला मी प्रथमच पाहात होतो. ती आता सगळ्याच्या पलीकडे गेली होती. माझ्या डोळ्यात पाणी आलं . मला माझ्या वडलांच्या जाण्याचा दिवस आठवला. ते तर अपघातात गेले होते. बाहेरून पॅक करून बॉडी घरी आणली होती. मी दिवेकर काकांना पुढील तयारी
बाबत विचारले. चाळीतले कोणीही ढुंकायला ही आले नाहीत.मरणही त्यांचा तिरस्कार संपवू शकले नसावे. समोरचा पानवाला आणि स्टोव्ह
रिपेअर वाला (शेवटी साधारण् अमराठी माणसंच कामाला आली. ) धावत आले. म्हणाले, " काका तुम्ही बसा. आम्ही करतो सगळं. " मग आम्ही तिघांनी मिळून तयारी केली. आम्ही सर्व मिळून पाचजण झालो . आजूबाजूचे लोक एवढे संवेदनाहीन होते. मला मात्र माझ्या मित्राला मदत करायचीच आहे. त्याची बहीण सरस्वती आणि भाऊ भास्कर यांनाही मी प्रथमच पाहिले. मग दिवेकर काकू मात्र आल्या .त्यांनी सवाशीण गेली म्हणून जयच्या आईची ओटी भरली आणि नवीन साडी पण नेसवली. त्याही रडत होत्या. मग आम्ही तिला उचलली. त्या म्हणाल्या, " जय फार वाईट वागले रे मी तिच्याशी. मला क्षमा कर. मी काय मिळवलं राग करून कोणास ठाऊक ?. "
आम्ही यथाविधि चंदनवाडीत जाऊन तिचा अंत्यसंस्कार केला. मग परत जय च्या घरी आलो त्याला थोडं समजावलं. "टेक केअर. काही लागलं तर कळव. " तो म्हणाला, "तुला एवढ्या लांवून येण्याचा त्रास दिला. ". अरे , असं म्हणू
नकोस. आपण खरोखरीचे मित्र आहोत, म्हणून तर तुला मला एवढं सांगावसं वाटल. " मी मनापासून म्हंटले. मी जड अंत; करणाने घरी आलो. आईला थोडक्यात सांगितलं. जवळ जवळ पंधरा दिवसांनी तो कॉलेजला आला. केस कापलेले. डोळे खोल. मला थोडा जास्तच वाकल्या
सारखा वाटला.आता कॉलेज सुटल्यावर तो कधी कधी घरी बोलावीत असे. दोन तीन वेळा मी जाऊन आलो. माझी सरू , भास्कर यांच्याशी चांगलीच मैत्री जमली. माझा गप्पा मारण्याचा स्वभाव असल्याने त्यांना मी आवडू लागलो. फक्त मला काय हाक मारायची त्यांना समजत नसे.एकदा मी त्यांच्या घरी पेपर वाचीत बसलो होतो. तर एक वृद्ध गृहस्थ दरवाजा उघडा असून ही वाजवीत असताना दिसले. ते साठीचे असावेत. दाढी वाढलेली. डोक्यावर टक्कल. तोंड पानानी रंगलेले. अंगात कुर्ता आणि पायजमा. जय आत काहीतरी करीत होता. मी विचारल्यावर ते जयला भेटायचय म्हणाले. मी त्यांना आत यायला सांगणार होतो तेवढ्यात जय आला. आणि त्या माणसाला पाहून त्याच्या अंगावर धावला. मला म्हणाला, " हाच माझा ........ बाप. माझा म्हणायला लाज वाटते. साल्यानी माझ्या आईचा जीव घेतला. "त्याने त्याचे
बकोट धरले. आणि मारण्यासाठी हात उगारला. मी जयला कसातरी बाजूला केलं. तो बडबडत होता. "साल्या तू आलासच कसा ? तिचा जीव घेऊन समाधान झालं नाही का.? त्या वृद्ध माणसाचे डोळे मोठे झाले. जयची बडबड चालूच होती. " साल्या , धर्मसुद्धा बदललास तू .? मिर्झा चल पळ इथून , नाहीतर चपलेनी मारीन. " असं म्हणून तो चप्पल पाहू लागला. त्याला एक बूट मिळाला, तो त्याने फेकला. तो त्या माणसाच्या डोक्याला लागला. तो निराशेने जवळ जवळ धावतच गेला. मग जयनी दार लावून घेतलं. आणि तापुन म्हणाला, " स्साला हा असा. किती प्रॉ ब्लेम येईल माहित आहे?बहिणीशी लग्न करणार कोण? त्यातून आपला समाज हा असा. हलकट. दुसऱ्याच्या कमीपणावर हसणारा." तो चांगलाच डिस्टर्ब झला होता. त्याला मी कसातरी शांत केला आणि गेलो.
नंतर यथावकाश आम्ही बी. कॉम झालो. जय" इन्स्पेक्टर" म्हणून प्रमोट झाला. मला "क्लास टु "चं प्रमोशन मिळालं. त्याने लॉ जॉइन केला. मग काही महिने आमच्या भेटी होणं कमी झालं . फोन वरून मात्र आम्ही नियमीत
बोलत असु. आता तो अंधेरीच्या फ्लॅट मध्ये राहायला गेला. एक दोन वेळा माझ्या घरी येऊन गेला. असाच एका रविवारी मी त्याच्या घरी गेलो
होतो. फ्लॅट पाहण्यासाठी बोलावलं होतं. मग जेवणही तिथेच झालं. अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मी सहज भिंतीवर पाहिलं , तर दिवेकर काकांचा फोटो. मी विचारल्यावर तो म्हणाला, " अरे ते चाळ सोडल्या नंतर गेले. मी गेलो होतो. चाळीतले काही जण होते. पण मी त्यांना ओळखही दाखवली नाही. ते माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होते. आता माझी पाळी होती . त्यांना झटकण्याची. तुला सांगतो , काका गेल्यावर मला चार दिवस झोप लागली नाही. त्यांचे आणि माझे संबंध काय होते , कोण जाणे . पण मुलासारखे प्रेम करायचे माझ्यावर. " मी म्हंटल, "हो. पण आता सगळं स्थिरस्थावर झालय ना ? " तो म्हणाला, " रे. "
मी म्हंटलं. "अरे , एखाद्या विवाहसंस्थेत नाव का नोंदवत नाहीस तिचं. म्हणजे आपोआप स्थळं येतील. " तो म्हणाला, " अरे तिथे तर सगळी माहिती द्यावी लागते. बापकाय करतो ? काय लिहू ? मुसलमान आहे लिहू ? एक तर ती
मॅट्रिकही नाही. आता ती बाहेरून परीक्षा द्यायची म्हणते.. " मी म्हंटलं. " मी पण पाहीन स्थळं. तिच्या अपेक्षा काय आहेत ते सांगून ठेव. "
त्यावर तो म्हणाला, " अरे, तिच्या कसल्या आल्या अपेक्षा . तिला ना नोकरी ना काही. काय करावं समजत नाही. " मग मी थोडा विचार केला. किंवहुना , हा विचार माझ्या मनात पूर्वी पासून असावा. तो बोलतच होता. स्थळं काय अशी वाटेवर पडल्येत ? वगैरे. , मध्येच सरूने चहा करून आणला. आम्ही चहा घेत होतो. मी म्हंटलं., " होय स्थळं वाटे वरच पडल्येत. तुला पाहिजे तसं स्थळ तुझ्या समोरच बसलय. त्याच्या हातातला कप डचमळला. तो म्हणाला, " वाटेल ते काय बोलतोयस.? .... थोडा वेळ शांततेत गेला. मग तो म्हणाला, " जरा विचार कर. तुझी आई वगैरे काय म्हणतील ? मुलीचे वडील काय करतात असं विचारलं तर तू काय सांगणार आहेस ? तूच विचार कर. हे सगळं सिरीयल मध्ये वगैरे ठीक आहे रे. तुला शिकलेली आणि चांगली मुलगी सहज मिळू शकते. तुझ्या आईच्याही काही अपेक्षा असतीलच. आम्हाला एक नातेवाईक नाहीत. पण तुला भरपूर नातेवाईक आहेत. त्यांचं काय? "
मी म्हंटलं. " नाही जय, मी माझ्या विचारावर ठाम आहे. शिक्षणाचं म्हणशील तर ती मॅट्रिक झाली की लग्न करु. पण तिनी पुढे ग्रॅजुएशन करावं अशी माझी अट आहे. फक्त तिला मान्य आहे का ते विचार. " तिला काय विचारायचं ती नाही म्हणणार नाही. तू हे खरच बोलतोयस ? " तो गदगदला, आणि म्हणाला, "तू दोस्ती खातर तर हे करीत नाहीस ना? तिचं जर काही चुकलं तर सांभाळून घेशील ना? (त्याच्या डोळयात पाणी होतं) आम्हाला कसलेच अनुभव नाहीत रे. त्याने मला भावनातिरेकाने मिठी मारली. आईला मी पटवून दिलं , सगळ्या गोष्टींची जाणीव असलेली मुलगी आहे. मग वर्षभर थांबायचं ठ्ररवलं. ती मॅट्रिक झाली. तिच्या आणि माझ्या भेटी गाठी होतच होत्या. माझ्या अपेक्षेपेक्षा ती जास्तच चांगली निघाली. लवकरच मुहूर्त पाहून लग्न झालं. या सगळ्याला आता सात आठ वर्ष झाली. सरू पण नोकरी करते.
मध्यंतरीच्या काळात जयचं एका दाक्षिणात्य मुलीशी प्रेम विवाह झाला. ती सी . ए. होति.
तिचा प्रोफेशन असल्याने जयच्या आणि तिच्या भेटी होत असत. मागचं सगळं आयुष्य आता एक स्वप्न म्हणून पाहातो. दिवेकर काकां बद्दल
मात्र तो फार पझेसिव्ह आहे. तो म्हणतो, " ते नुसते वडील नव्हते रे. (बाप नाही) देवदूत होते. मला सगळ्यातून बाहेर काढणारे. त्याचा तो ".....बाप" (त्याच्याच शब्दात)पुन्हा कधी त्याच्या आयुष्यात डोकावला नाही. एक खंत मात्र त्यालावाटते कि आईला त्याने दिलेली वागणूक चुकीचीच होति. नाहीतर आज ती हे सगळं बघू शकली असती.
पण त्याला अजूनही रुबाबदार आणि स्मार्ट माणूस म्हंटलं की आठवतात
"ए. टी र घु वी र

(संपूर्ण)

१०४ ऑलिव्हिया सोसायटी, उन्नती‌ गार्डन

पोखरण रोड नं. १.ठाणे ४००६०६

मो.नं. ९००४८०८४८६

Show quoted text

कृपया कथा पोहोचली असल्यास कळवावे, ही विनंती.

आपला नम्र

अरुण कोर्डे
९००४८०८४८६
Show quoted text

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet