संपण्याआधी
आता शब्दांच्या पदराशी खेळता येत नाही.
ते पारदर्शी, सुती जुनं सुख हरवून गेलंय.
कृत्रिम फुलांच्या नक्षीने हिसडून त्या सुखाच्या चिंध्या केल्यात.
आजवर लपवत आणलेली नदी हिरवीगार होत आहे, संपृक्त रसायनांनी भरत चालली आहे.
तिने वाहणे विसरायच्या काळात मी तिच्या काठावर नाक धरून जातोय.
तिचा दोष नाही, तिला वळणं क्रमप्राप्त आहेत,
तिचे काठ तिला तासता येतात पण तिला गुदमरून टाकणाऱ्या पसाऱ्याला तिला रोखता येत नाही.
ती जमेल तसे संस्कृतींचा मैला पचवत वाहत आहे.
कधीतरी या गंजलेल्या स्टेनलेस स्टीलच्या शहरातून वाट काढत पिवळ्याशार कल्हईच्या हव्याश्या विषाकडे मी सरकत जातो.
तेव्हा काहीतरी किणकन पाझरून जाते, पितळीचा काठ गुणसूत्रं वाजवताना जो हलकासा आवाज होईल, ज्याला अंधाऱ्या जातेघराचा सुवास आहे,
पहाटे जमिनीतून आलेल्या गरम पाण्याचा वंश घेऊन ते पाझरून जाते.
ते उचलून शब्दात मांडता येईल. सौन्याच्या कलत्या उन्हाच्या प्रवाहात नितळपणे ते पाहता येईल,
अपेक्षांच्या स्वरात ते गाता येईल,
पण ते तसंच राहू दे, नदीला दोबाजूंनी बांधत नेऊन तिची महानगरी गटार झाल्याचे शिक्कामोर्तब करण्याचा गुन्हा मला सोसवणार नाही.
ती इथेच जमिनीत मुरेल. सुखलोलुप अवलादिंचे पाप नसांत खेळवत ती इथेच स्मशानभूमीजवळ साठत ती झिरपत जाईल.
कुठेतरी तिच्यातली रसायने फ़ुलांची स्वप्ने घेऊन उत्क्रांत होतील.
इथे इतकं घडलं, इतक्या शक्यतेला अजून थोडी जागा असू दे.
माझ्या लपवलेल्या नदीला नामशेष व्हायला जागा असू दे. हक्काची.
माझ्या लाडक्या भांड्यांना, वस्तूंना, कापडांना, सुरुकुतायला जागा असू दे, एखादी लाकडी फळी आणि चार दोन खुंट्या.
त्यांची अडगळ वागवताना हे सरू दे अंतिमवेळा.
प्रतिक्रिया
सॉरी, कवितेवर काही न बोलता,
सॉरी, कवितेवर काही न बोलता, अवांतर प्रश्न आहे.
जातेघर म्हणजे कोणती खोली?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
जातेघर
नावाप्रमाणेच. जाते असलेली खोली.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
जलस्रोत
कविता आवडली. नैसर्गिक जलस्रोत माझ्या सेंटीमेंटचा विषय आहे.
-----------------------------------------------------------------
लहानपणी आई कृष्ण राधा नि यमुनेचा डोह यांच्या कथा सांगायची. काय सुरम्य कल्पना होती तिच्याबद्दल. पण ... कालाय तस्मै नमः ...दिल्लीचे ते भिकार गटार भारताची तिसरी मोठी नदी? प्रचंड दु:ख झालेलं पहिल्यांदा यमुना पाहताना. अगदी आग्र्यात देखिल यमुना घाण आहे. सुंदर राजकुमारी चेटकिणीच्या आरशात कुरुप राक्षसी दिसावी तसं ताजमहलाचं प्रतिरुप त्या गटारात दिसतं.
पुण्यात अगदी १९९४ मधे कॉलेजात बोटक्लबात कधीही पाण्याच्या (मुळा किंवा मुठा किंवा त्यांचा संगम झालेली नदी किंवा प्रत्यक्ष संगमच) जवळ जायला नको वाटलं नाही. बरेच दोष काढता येतील, पण वास नावाचा प्रकार नव्हता. १८५४ ला कॉलेज स्थापन झालं होतं तेव्हा विद्यार्थी नदीत उतरून पाणी पीत असतील असे कल्पून त्यांचा हेवा वाटे. परवा १-२ वर्षाखाली फेरफटका मारला, प्रवाहाच्या जवळ जावेना. भयंकर वास. किनार्याला आलेली पाहू न वाटावी अशी घाण. पुन्हा मन कष्टी झालं.
मुंबईत नोकरी आणि नवी मुंबईत राहणं असा प्रकार करीत असताना वाशीची खाडी आली कि मी लोकलच्या दरवाज्याला थांबे. विलक्षण छान वाटे. छान शुद्ध हवा येई. पण दुरुनच. वाशीमधे कोणतीतरी लाँच बोट फेरफटका मारून आणायची. तिच्यातून गेल्यावर पुन्हा रसायनांचा वास. चौपाटीवर समुद्रकिनार्याचा घाण वास. गेट वे ऑफ इंडियाजवळ समुद्राचे काळे दिसणारे पाणी.
नवी मुंबईतून येताना कुर्ला ते सांताक्रुझ असा प्रवास करायला लागे. २००० च्या आसपास, 'मुंबईजवळचे जलदेह' विषय निघाला असताना कोणीतरी म्हणालं कि रस्त्यात एक नदी (मिठी?) आहे. मी त्या दिवशी उत्साहाने नदी कुठे बरे आहे म्हणून बाहेर पाहत होतो. तर त्यांना अभिप्रेत असलेली नदी म्हणजे एक काळीकूट्ट तेलगंगा होती जिथे मी नेहमी नाक दाबून आणि डोळे बंद करून ठेवे. नद्यांना नमस्कार करणे, नाणी टाकणे या सवयी त्या दिवसापासून सुटल्या.
गावाकडचे बरेच मित्र इथे तिथे भेटतात, किमान फोनवर बोलणं होतं. मी आवर्जून ओढ्यांबद्दल, तळ्यांबद्दल विचारतो. उत्तर विषण्ण करून जाते. सगळीकडे प्लास्टीक. रसायने. डुक्करे. प्रवाह थांबलेला. वास. पॉलिथिनच्या बॅगा. डास.
=======================================================================================
जिथे लोक वॉटर बॉडीजना स्वच्छ राखतात त्यांचेबद्दल मला प्रचंड आदर आहे. २००६ च्या आसपास एकदा ठाण्याला गेलेलो. आठवत नाही पण मुख्य स्टेशनजवळ असावं. एक तळं आहे. मी अगदीच काठाला गेलो नाही, पण ते अत्यंत स्वच्छ आणि सुंदर दिसत होतं. ठाणेकरांनी गावाच्या इतक्या मधात असलेल्या तळ्याला हैद्राबादकरांसारखे नासवले नाही हे पाहून त्यांचेबद्दल आदर वाटला. वाशी ते ठाणे सायन न जाता गेले तर आय आय टी जवळ जे तळे आहे ते देखिल स्वच्छ दिसते. पवईच्या तळ्याचा तो लूक फार आनंद देऊन गेलेला. आत्ता मी दरवर्षी इंफाळला जातो तेव्हा शहराच्या सार्या बाजूंनी असलेल्या (शहरात इंफाळ नदी हे गटार आहे हा भाग वेगळा.)ओढ्यांत सहकुटुंब मनसोक्त नाहतो. ते स्फटीकासमान स्वच्छ पाणी लहानपणीची आठवण ताजी करून देतं. मन भरलं कि कुठेतरी हे प्रवाह देखिल १५-२० वर्षांनी त्याच गतीला पोचणार आहेत याची हुरहुर लागते. बिलासपूर ते मंडीपर्यंत शेजारून जाणारी सतलज आज तरी सुंदर आहे. नंतर मंडी ते मनाली जाणारी व्यास नदी सुद्धा नितांत सुंदर आहे. तिच्या शेजारून ड्राइव करणं हा एक फॉरेन एक्सपेरियन्स आहे.
पण सगळ्यात कडक सलाम ठोकावा तो अमेरिकन (आणि कॅनेडीयन) लोकांना. त्यांची पंचमहातळी प्रदूषित करायला खूपच मोठी आहे (too big to pollute म्हणायचं आहे) असं मानलं तरी त्यांनी घेतलेली काळजी विलक्षण आहे. विमानातून तळ्याचा तळ दिसणे (तो ही ५०-६० फूट नव्हे तर चांगलाच ५००-१००० मी च्या आसपास)*,
तिथे बुडालेलं जहाज दिसणे म्हणजे अतिशुद्धता झाली. त्या तळ्यांना तितकं शुद्ध राहू दिलं आहे (or for that matter उभ्या देशात सगळ्याच अमेरिकन निसर्गाला तितकं सुद्ध राहू दिलं आहे) म्हणून तिथल्या लोकांच कौतुक, आदर आणि अनुनय करावा तितका कमी आहे. अशी तळी असावीत अशी त्यांचीच लायकी आहे.
-------------------------
* आकडे अंदाजे आहेत.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
प्रांजळ अशी श्रेणी देतो! छान
प्रांजळ अशी श्रेणी देतो! छान मुक्तक!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
+११११११११११११११११११११११११
अगदी असेच, आणि एकूण संकल्पना व नंतरचा भ्रमनिरासही अगदी सेम टु सेम अनुभवलेला आहे. कोलकात्याच्या आमच्या कॉलेजात तीन तळी होती आणि स्वच्छ राखलेली होती. होस्टेल कँपसमध्येही दोन तळी होती. (सुदैवाने अजूनही आहेत, अन होपफुली तशीच राहतील.) खूप प्रसन्न वाटायचे तिकडे नुसते बघत रहायलाही.
कोलकात्यात बाकी लाख घाण असेल (आहेच), पण तिथली तळी मात्र जाम आवडतात आपल्याला. मिरजेतले एक गणेश तळे सोडले तर बाकी तळी आता आटलीत, एक ओढा आहे तो अॅज़ यूज्वल मरणपंथाला लागलेला आहे. विहिरी तेवढ्या आहेत, आणि नदी तर आहेच. पण हे सगळे गावाबाहेर. पुण्यातही वॉटर बॉडीज़ खास म्हणाव्या अशा आजिबात नाहीत. एक मोठं गटार आहे म्हणा, त्याला नदीबिदी वगैरे म्हणतात. पण बाकी आनंदच आहे.
त्या पार्श्वभूमीवर कोलकात्यात तळी चांगलीच आढळली. नॉर्थ कोलकात्यासारख्या अनफ्याशनेबल भागातही किती तळी असावीत! कॉलेज-होस्टेल सोडून समोरच्या त्या गल्ल्यांतून फिरताना बॉनहुगली नामक एक अजस्र तळे लागायचे. पुढे जाता अजूनही काही लागत. तिकडे बोटिंग करायची काही सोय मात्र नव्हती, नाहीतर तासन्तास तिथेच पडीक राहिलो असतो. त्या अर्थाने आय अॅम अ वॉटर अॅनिमल (पोहता येत नसूनही).
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
@अरुणजोशी : तुमचा प्रतिसाद
@अरुणजोशी :
तुमचा प्रतिसाद खूप आवडला.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
अभिप्राय आवडला.
अगदी! मलाही ताजमहालाच्या पाठची यमुना नदी बघतांना तसंच वाटलं होतं. पण मी उन्हाळ्यात भेट दिल्यामुळे तसं असेल, पावसाळ्या-हिवाळ्यात पात्र भरलेलं आणि स्वच्छ असेल असं माझ्या मनाचं समाधान करून घेतलं होतं!!
खरं आहे. तसंच पूर्वी ठाण्याहून स्लो लोकल निघाल्यावर, एकदा कॉलेजजवळची ठाण्याची खाडी ओलांडली की थेट डोंबिवली येईपर्यंत गाडी नदीच्या काठाकाठाने गाडी जातांना तोच अनुभव येई. कळवा, मुंब्रा आणि दिवा ही अगदी लहान खेडी होती त्या काळी. अणि त्या भागात झोपडपट्टी अजिबात नव्हती....
माझ्या अमेरिकेतल्या पहिल्या युनिव्हर्सिटीच्या बरोबर मध्यातून एक संथ वहाणारी छोटिशी नदी जाते. युनिव्हर्सिटीची हद्द संपली की लोकांची नदीकिनार्यावर टुमदार घरं आहेत. तो सगळा परिसर युनिव्हर्सिटीने आणि एकंदर त्या गावानेही विलक्षण स्वच्छ आणि सुंदर ठेवला आहे. युनिव्हर्सिटीने किनार्यावर एका ठिकाणी छोट्या होड्या (कनु) आणि वल्ही ठेवलेली आहेत. कुणीही विद्यार्थी/ स्टाफने जावं, आपलं आयडी दाखवावं आणि होडी-वल्ही घेऊन आणि त्यांनीच दिलेलं लाईफ जॅकेट घालून कनुइंग करावं! कितीही तास! तेसुद्धा मोफत, नो चार्ज!! मुंबईतून आलेल्या मी आणि हिने तिथे तासंतास नदीत कनुईंग करत घालवले आहेत. आता तुमच्या लिखाणाच्या निमित्ताने ती आठवण आली....
कुणीही विद्यार्थी/ स्टाफने
चौर्यांशी लक्ष वेळा जळून खाक झालो आहे. सीओईपीत हा चान्स होता पण कधी केलं नाही. नदीपात्र विलक्षण स्वच्छ असल्यामुळे तिकडे जाण्याची हिंमत होत नसे- यद्यपि काठावरून मजा बघायला प्रचंडच मजा यायची.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हीच प्रतिक्रिया माझीही!
हीच प्रतिक्रिया माझीही!
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
कविता आवडली आणि अजोंच
कविता आवडली आणि अजोंच मुक्तकही.
कविता आवडली. प्रभावी प्रतिमा
कविता आवडली. प्रभावी प्रतिमा वापरल्या आहेत. पितळेच्या भांड्याच्या कडेवर गुणसूत्रांच्या साखळ्या किणकिणवण्याची विशेष आवडली.
जगण्याच्या प्रवाहाला एक साचलेपण येतं, नदीवर तटांनी आक्रमण करून तिला घुसमटून जायला होतं... या प्रकारची व्यक्त करायला कठीण भावना मांडण्याचा प्रयत्न चांगला जमलेला आहे.
काय आवडलं नाही हे सांगण्याचा प्रयत्न करतो - अर्थात हा वैयक्तिक आवडीनिवडीचा भाग आहे हेही लक्षात ठेवायला हवं.
प्रभावी प्रतिमांची रेलचेल झाली की मग त्यांमध्ये संगती राहीलच असं नाही. या कवितेत कापड आणि भांड्यांच्या प्रतिमा नदीच्या अस्तित्वाशी विसंगत वाटल्या. एकाच जातकुळीतली रूपकं वापरून मांडणी केली असती तर त्यांची वीण अधिक घट्ट झाली असती.
सुंदर कविता
प्रतिमा आवडल्या, प्रभावी वाटल्या. विषय नदीपासून सुरू होतो पण त्यापुरता न रहाता कल्हई, जातेघराचा सुवास, लाकडी फळी, खुंट्या या चित्रदर्शी शब्दांतून अधिक व्यापक पट जाणवतो असे मला वाटले.
आवडली.
आजवर लपवत आणलेली नदी नदी हे कवीमनाचे किंवा Muse हे रुपक आहे का?
की सुती, पारदर्शी शब्दांच्या पदराशी खेळण्याचे सुख = सघन व उत्कट, उस्फूर्त कवितानिर्मीतेच सुख हरवत चालले आहे.
.
कधीतरी या गंजलेल्या स्टेनलेस स्टीलच्या शहरातून वाट काढत पिवळ्याशार कल्हईच्या हव्याश्या विषाकडे मी सरकत जातो. - म्हणजे कधीतरी एक स्फूर्तिमय विषय सापडतो जो की काव्यरुपाने कवि, मांडू शकतो.
.
.
अर्थात, हृदयातील कविता नामशेष होणार तर आहे हा निराशावाद आहेच. पण लाडकी भांडी, वस्तू, खुंट्या या आनंदमय अशा स्मृतींचे रुपक आहे का?
होय. माझ्या मनातलं
होय. माझ्या मनातलं बोललीस/बोललास!
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
धन्यवाद नील. एकदम परीक्षेत
धन्यवाद नील. एकदम परीक्षेत पास झाल्याचा आनंद झाला मला खरच
आज भी खरे हैं तालाब
कविता आणि तिच्यातल्या आगळ्या प्रतिमा आवडल्या. अजोंचा प्रतिसादही खासच!
अवांतर - या विषयाच्या संदर्भात अनुपम मिश्र यांचे 'आज भी खरे हैं तालाब' हे पुस्तक आठवले. (पीडीएफ दुवा. अधिकृततेबद्दल कल्पना नाही.)
होय, हे पुस्तक मी वाचलंय.
होय, हे पुस्तक मी वाचलंय. म्हणजे असं झालं की, सहज चाळता चाळता मागच्या वर्षी शेती-विषयक या कॅटेगरीखाली बुकगंगावर याचा अनुवाद दिसला. "तलावांची भारतीय परंपरा" असा! नदी, तळी अशांवर आधारित पुस्तकांचा मायमराठीत आधीच उल्हास असल्याने पटकन घेऊन टाकले. यानिमित्ताने अशी अजुन कोणती पुस्तके कुणाच्या झोळीत असतील, तर यु आर जस्ट अ प्रतिसाद अवे!
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
तळी हा माझ्याही अतिशय
तळी हा माझ्याही अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. पुस्तकाच्या लिंकबद्दल धन्यवाद.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं