Skip to main content

तुमचे मित्र कुठल्या भाषेत बोलतात?

मित्र हा शब्द इथे मित्र आणि/किंवा मैत्रिण(णी) असा सर्व लिंगांना सामावून घेणारा म्हणून वापरला आहे.
***

आपल्या बर्‍याचशा धारणा, मतं, विचारपद्धती, भाषा, टाइमपासच्या कल्पना आणि क्वचित ध्येयंही मित्रांमुळे ठरतात. अगदी थेट, एकास एक लावून दाखवता येईल असा संबंध दर वेळी असतोच असं नाही; पण मित्रांचा प्रभाव मोठा असतो. पूर्वी हे मित्रमंडळ मर्यादित असे. शाळेतले मित्र म्हणजे प्रचंड जवळचे, जुने मित्र असं काहीतरी समजण्याची एक पद्धत होती. (याच पद्धतीमुळे माझ्या मैत्रिणीची ओळख कुणाला 'माझी शाळेतली मैत्रीण' अशी करून दिली, की लोक आमच्याकडे उगाच 'वा वा!' अशा माना डोलावून पाहतात. आता यात काय आहे मोठं? वास्तविक शाळेतले मित्र हे जवळचे असतीलच याची काय खातरी? फक्त आपण एकमेकांना शेंबूड पुसण्याच्या आणि 'बाई, शूला जाऊ'च्या वयात पाहिलेलं असल्यामुळे काही अकारण संकोच टळतात. एक लिंगातीत मोकळेपणा आपोआपच असतो. पुढे मैत्री किती घट्ट वा पातळ ते सहवास आणि आपल्या निवडी यांवरूनच ठरतं. पण - असो.) सहवास प्रदीर्घ असल्यामुळे कदाचित तशी समजूत होत असेल.

जालपूर्व काळात मित्र मिळतही आजूबाजूच्या परिसरातलेच. निवड मर्यादित असे. आवडीनिवडींच्या अर्थानंही मर्यादित; आणि भाषा, आर्थिक परिस्थिती, जात, वय अशा सगळ्याच अर्थांनी. (पूर्वी काही शाळांमध्ये तरी सगळ्या आर्थिक परिस्थितीमधले लोक असत. हल्ली 'मोलकरणींची मुलं ज्या शाळेत जातात, तिथे आपलं मूल? बॉबॉबॉ!' असं म्हणण्याची प्रथा आहे. पुन्हा - असो. )

आता या मर्यादा बव्हंशी अस्तित्वात नाहीत. आता - आणि पूर्वीही - आपल्या मित्रांमध्ये कोण लोक आहेत वा होते? त्यांची जात आपल्यासारखी आहे का? नाही? मग 'खालची' आहे की 'वरची' आहे? त्यानं काय घडलं? वय? लिंग? पुरुष मित्र अधिक आहेत आपल्याला की स्त्री मित्र? त्यानं काय होतं? ते कोणत्या भाषेत बोलतात? ते कोणत्या प्रांतात राहतात? ते राजकारणाच्या पटावर कोणत्या बाजूला झुकलेले असतात? त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे? ते पोटापाण्यासाठी काम करतात की नाही? त्यांच्याशी आपण लिहून बोलतो की नुसते बोलतो? प्रत्यक्ष भेटतो की नाही? कितींदा?

गेल्या काही दिवसांत नाना कारणांनी हे प्रश्न वारंवार सामोरे आले. त्यांची उत्तरं शोधताना माझी मलाच गंमतीदार माहिती दिसत गेली. उदाहरणार्थ, माझे शाळेत झालेले मित्र माझ्या जातीतले नव्हते. काही जातच नसणारे होते. काही माझ्याहून गरीब होते. त्यांतल्या काहींशी मैत्री इतकी टिकली आणि वाढली - की त्याला 'शाळेतले मित्र' असं लेबल डकवणं आता अर्थहीन आहे. पण तरी बाकीच्यांशी अजूनही बर्‍यापैकी संपर्क आहे. ही विविधता मला चिक्कार गोष्टी देऊन गेली. मतांबाबतचे विविधरंगी पर्याय हा त्यांतला सर्वात मोठा फायदा. ही विविधता मी कॉलेजात अनुभवली नाही. तिथे मला भेटलेल्या लोकांमध्ये तरी 'ध्येयप्रेरित' लोकांचा भरणा होता आणि आमचं काही फार जुळलं नाही. अपवाद होते. पण ते अपवादच. अशी विविधता पुन्हा मिळाली, ती पहिल्या नोकरीत. तिथे समवयस्क आणि वयस्कर अशा दोन्ही प्रकारच्या लोकांशी, अमराठी लोकांशी, गरीब आणि श्रीमंत, मुंबईकर आणि बाहेरून मुंबईत आलेले, माझ्यासारखे सवर्ण पार्श्वभूमीचे आणि तथाकथित 'खालच्या' जातींचे असे अनेक जवळचे मित्र झाले. त्यांनी मला खूप शिकवलं. तिथे केलेली भांडणं, वाद, चर्चा, प्रेमं - हे सगळं विलक्षण आणि सघन होतं. पुन्हा नोकरीच्या ठिकाणी अशा मैत्र्या झाल्या नाहीत. मग काही रूममेट्स.

नंतर 'मेरे लाइफमें ऐश्वर्या आयी!'

नाही कळलं? अर्थात - इंटरनेट! तो एक निराळाच किस्सा आहे. त्यातून वय आणि शिक्षण आणि आर्थिक परिस्थिती आणि राष्ट्रसीमा या मर्यादा पारच झोपल्या. इथे भाषा हा कळीचा मुद्दा ठरला. प्रत्यक्ष भेट हा किती कमी महत्त्वाचा मुद्दा असतो ते लक्षात आलं.

ते असोच. मुद्दा असा आहे की, तुमचे काय टप्पे? त्यांनी काय फरक पडला? तुमचे काय अनुभव? सांगा बघू...

बिटकॉइनजी बाळा Wed, 02/09/2015 - 14:54

सहवासी मित्रांत बहुतांश मित्र मराठी बोलतात. काही कन्नड आणि काही तेलुगु. लाईफ मध्ये सुदैवाने ऐश्वर्या आलेली नाही. टिंडर इत्यादी फक्त लिमिटेड 'गोष्टीं'साठीच मर्यादित ठेवल्याने निभाषिक इन्स्टंटोत्कट मैत्र्या झालेल्या आहेत. स्टॅकओवरफ्लो, गिटहब आणि तत्सम तांत्रिक सायटींवरून मात्र अतिशय चांगल्या नेटमैत्र्या झालेल्या आहेत. मराठी संकेतस्थळं मात्र मला बहुतांशी तुसडी, कवचाधीन, बोअरिंग वाटलेली आहेत.

मिलिंद Wed, 02/09/2015 - 18:15

मराठी मित्र साहजिकच मराठीत बोलतात. (आजकाल हे तितकेसे साहजिक राहिलेले नाही हे ओळ टंकून झाल्यावर आठवले, आणि जड अंतःकरणाने स्ट्राईकथ्रू वापरले. :( ) अमराठी मित्र मिंदी (हिंदीशी दूरचे नाते सांगणारी मुंबईची स्वतंत्र व नवनवोन्मेषशालिनी बोलीभाषा), किंवा इंग्रजी, किंवा हिंग्रजी बोलतात.

.शुचि. Wed, 02/09/2015 - 18:40

एक मित्र होता प्रचंड हुषार होता. त्याच्याकडे नव्या रॅडिकल कन्सेप्टस असत व समुद्राएवढी सहनशीलता असे. आता तितकासा संबंध राहीला नाही.
.
मैत्रिणी म्हणाल तर एक आहे जी बर्‍यापैकी स्त्रीमुक्तीवादी व मला सांभाळून घेणारी आहे.
.
बस्स.
.
बाकी कोणाशीच मैत्र नसल्याकारणाने आम्ही भणंग भिक्कारडे, दरिद्री, लेपरर आहोत. मैत्री होत नाही, झाली तर टिकत नाही. समोरच्याबरोबर पर्सनल बाऊंड्रीज राखता येत नाही असे एक ना दोन अनेक तिढे आहेत, dysfunctionalities आहेत.

अस्वल Wed, 02/09/2015 - 23:20

मराठी मित्र मराठीतून बोलतात, बाकी बहुतेक सगळे हिंदीतून बोलतात, त्यांची भाषा कन्नड, तामिळ, तुळू असली तरी.
@वैविध्य - मुंबईतले मराठी मित्र मराठीतूनच बोलतात. बाकी कॉलेजमधला ग्रूप्/नंतरचे मित्र बहुतांशी मराठी नसल्याने हिंदीतून.
गप्पा मारणार्‍यांचा ल.सा.वि जर मराठी नसेल (आणि तो नसतोच!) तर आपोआप हिंदीतून चर्चा सुरू होतेच.
आणि दारू चढल्याशिवाय सहसा कुणीच इंग्रजीतून सुरूवात करत नाही :ड

पिवळा डांबिस Thu, 03/09/2015 - 00:47

चिनी, हिस्पॅनिक, कॉकेशियन, आफ्रिकन मित्र इंग्रजीतून बोलतात.
मराठी मित्र मराठीतून आणि कोकणी मित्र कोकणीतून बोलतात.
अमराठी भारतीय मित्र इंग्रजीतून बोलतात.
पाकिस्तानी मित्र हमखास हिंदी/उर्दूतून बोलतात!

ऋषिकेश Thu, 03/09/2015 - 09:00

शाळेतले माध्यम मराठी असले तरी "प्राज्ञ" मराठी वातावरण शाळेत नव्हते. आमच्या उपनगरात इन-मीन तीन शाळा असल्याने फार चॉईसही नव्हता. त्यामुळे हल्ली उगवलेले "शी बै इथे नको, इथे कशी कशी मुलं येतात" असे फाजिल चोचले नेव्हा नव्हते. विविध सामाजिक वर्गातील, आर्थिक स्तरावरील अठरापगड मुले, मुली शाळेत होती. तसेही मुंबईत असल्याने जात हा प्रकार फक्त फॉर्मवर लिहिण्यापूरता होता. कोणाच्याही घरी (ब्लॉक, बंगल्यापासून ते बैठ्या खोपटांपर्यंत) जाऊन त्या त्या पोरांना हाकारत आम्ही शाळेत पोचत असु. शाळेत डबा खाणे वगैरे एखाद्या झाडाखाली किंवा अधिक मोठे झाल्यावर 'कट्ट्या'वर / सायकलींवर चाले.

पुढे कॉलेजपासून ते ३-४ वर्षापूर्वीपर्यंत माझे मराठी मित्र अगदीच एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके होते. मराठीच असे नाही कोणत्याही एका भाषिक गटाचे आमच्या टोळक्यात वर्चस्व नव्हते. अनेक मुलगे, मुली भारतातील वेगवेगळ्या भागांत मूळ असलेले, पालक मुंबईत स्थायिक वगैरे असेच होते. बोलायची भाषा बंबैय्या - मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजी यांचे बेमालूम मिश्रण. सर्व स्वभावविशेषांची जाती-धर्मांची मुलं-मुली. नाईट आउट वगैरे प्रकाराचाही शिरकाव झालेला त्यामुळे मित्र-मैत्रिणींच्या (विशेषतः मैत्रीणीच्या) घरी जाऊन रहाण्याचं (रात्र काढण्याचं) अप्रूप हळूहळू ओसरलं. पुढे परदेशांत गेल्यावर वेगवेळ्या राष्ट्रीयत्त्वाचीही मित्रमंडळी झाली. काही इतकी की थँक्स गिव्हिंगला फॅमिली अँड फ्रेण्ड्स मध्ये अस्मादिकांना गणले जाऊ लागले.

पुण्यात आल्यावर इथले मित्र मला झाले नाहीत - (कपडे झाले नाहित त्या धर्तीवर) कदाचित पुण्यात सुरूवातीला रहात होतो त्या भागातील सानुनासिक, कवचधारी, काहिशा स्नॉबिश आनि मुख्यम्हणजे एकभाषिय, एकवृत्तीय वातावरणाची अजिबातच सवय नसल्याचा परिणाम असेल. त्यामुळे अशा संकेतस्थळावर जेव्हा समानशील मिळाले तेव्हा पुन्हा एकवार युरेका! मोमेंट आली!

आताशा पूर्ण मराठी बोलणार्‍या घोळक्यात असण्याचे अप्रूप, नवलाई हळुहळू उतरू लागली आहे. बघायचं पुढे कोणते टप्पे येतात..

मेघना भुस्कुटे Thu, 03/09/2015 - 14:18

भाषा हा शब्द फारच सिर्यसली घेतला की तुम्ही. भाषा मराठी की हिंदी की इंग्रजी यानं फरक पडतोच. पण जातीनं फरक पडतो. आर्थिक गटानं फरक पडतो. राजकीय कल काय आहे, त्यानंही फरक पडतो. त्या बाबतीत काय अनुभव?

अनुप ढेरे Thu, 03/09/2015 - 14:27

शाळेत आजूबाजूला विविध जातीय मित्र होते. पण पुणेरी. सो भाषा सिमिलर. हपिसात काही गावाकडचे लोक आहेत विदर्भ, धुळे, सोलापूरभागातले. सो भाषेचे फ्लेवर ऐकायला मिळतात बरेच. गावकडचे लोक बिन्दिक्कत कोणती जात हे विचारतात असं दिसलय. अगदी एखादा मराठी शब्द 'हा शब्द अमुक जातीतला आहे मी नाही वापरत' असही सुनावतात. हपिसातले मराठी लोक एकमेकांशी, गृपमध्ये सगळे मराठी लोक असून, हिंदीत बोलतात खूप वेळा असही दिसलय.

मेघना भुस्कुटे Thu, 03/09/2015 - 15:27

In reply to by आदूबाळ

माझं (मर्यादित) निरीक्षण असं की स्त्रीवृंद सहसा जातिवाचक उल्लेख टाळतो (वर्तनातून दर्शवण्याच्या अनेक बारीक तर्‍हा वापरल्या जातातच). पण पुरुष बिनदिक्कतपणे जात काढून स्वच्छ मनानं काय ते बोलून मोकळे होतात. शिष्ट समाज - अनागर समाज, शिक्षित समाज - अशिक्षित समाज... असाही फरक वर्तनातून दिसतो.

बॅटमॅन Thu, 03/09/2015 - 17:26

मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, तेलुगु, तमिऴ, बंगाली.

विशेष क्लोजवाले म्ह. तमिऴ सोडून बाकी सर्वभाषिक.

वैचारिक वगैरे बोलणारे शक्यतो मराठी आणि इंग्लिश, कधी कधी बंगाली.

मयुरा Thu, 03/09/2015 - 20:37

मराठी मित्रपरिवार- मिंग्लिश (भारताबाहेरचा)
भारता मधला मराठी मित्रपरिवार -हिंदी,मराठी,इंग्रजीची सरमिसळ
हिंदी भाषिक (दिल्ली,हरयाणा,राजस्थान, चंदीगढ,युपी,बिहार्,पंजाब) हे सगळे त्यांचे त्यांचे काही शब्द त्यांच्या खास लकबीत बोलतात पण बरेच वेळा -हिंग्लिश.

गोरे,काळे,मॅक्सिकन- पूर्णपणे इंग्लिश... परत पिढ्यान पिढ्या राहिलेले ईस्ट कोस्ट वाले, मुळचे टेक्सन, किंवा मुळचे जॉर्जियन,अलाबामा,मिसिसिपी वाले ह्यांच्या काही काही शब्द उच्चारायच्या लकबी लक्षात राहतात.

चायनिज, कोरीयन्,आणि तत्सम- अर्धवट तुटक तुटक इंग्लिश.. त्यांचं बोलणं समजण्यासाठी त्यांच्या ओठांच्या हालचाली कडे नीट बघावं लागतं.

--मयुरा.

अतिशहाणा Thu, 03/09/2015 - 21:13

मराठी मित्र मराठीत, इतर भारतीय मित्र हिंदी-इंग्रजीत, ऑफिसातले भारतीय-अभारतीय कलीग्ज इंग्रजीत.

पण जातीनं फरक पडतो. आर्थिक गटानं फरक पडतो. राजकीय कल काय आहे, त्यानंही फरक पडतो. त्या बाबतीत काय अनुभव?

यानं थोडा फरक पडतो. अगदी बारावी होईपर्यंत आमच्या शाळेत एकही ब्राम्हण मुलगा/मुलगी असल्याचे आठवत नाही. मराठे आणि मराठेतर असंच होतं. अभ्यास, मुली वगैरे कॉमन विषय सोडले तर मराठ्यांच्या मुलांचे शाळेतले बोलण्यात अनेकदा येणारे विषय पेरणी, जमीन, बियाणे, तिथली कामं या अनुषंगाने येत असत. मराठेतरांमध्ये स्वयंरोजगार करणाऱ्यांना दुकानाच्या वेळा वगैरे पाळून शाळा-खेळ अशी अॅडजस्टमेंट करावी लागे आणि नोकरी वगैरे करणाऱ्यांची मुलांना तशी बंधनं नव्हती. साधारण गटही अशा ब्याकग्राऊंडनुसार झाले होते. तोपर्यंत आर्थिक परिस्थितीनुसार विभागणी होऊन गट नव्हते.

कॉलेजात आल्यावर हॉस्टेल आणि स्थानिक असे गट होते. त्यातही आर्थिक परिस्थितीनुसार विभागणी व्हायला दोन-तीन वर्षं जायला लागली. सध्या जवळचे - संपर्कात राहिलेले - म्हणता येतील असे कॉलेजातले बहुतेक सगळे मित्र प्रो-रिझर्वेशन, पुरोगामी असेच राहिले आहेत. वेगळा राजकीय कल असलेले सध्या तरी संपर्कात राहिले नाहीत. हा योगायोग असू शकेल.

मेघना भुस्कुटे Thu, 03/09/2015 - 22:15

In reply to by अतिशहाणा

राजकीय कल निराळा असताना मैत्री झाली असा अनुभव मला आहे. ती जसजशी पक्की होत गेली तसतसे वादही वाढत गेले, एकमेकांना काही गोष्टी पटवून देण्याचा - घेण्याचाही - मनापासून आणि प्रामाणिक प्रयत्न झाला, त्यातून कडाक्याची भांडणं झाली आणि मिटलीही. ती मिटताना जेव्हा हेतूंबद्दल नि:शंका झाली, तेव्हाच मैत्रीवर शिक्कामोर्तब झालं असं वाटतं. आणि हा अनुभवही अपवादात्मक. एरवी - मतस्वातंत्र्य-लोकशाही-माणूस नि मतं निराळी असं कितीही पटवून घेतलं, तरीही राजकीय कल (आणि विचारधारा) कोणत्या दिशेनं झुकलेला आहे, त्यावर मैत्री किती जवळची होऊ शकते ते काही प्रमाणात तरी अवलंबून राहतंच.

पिवळा डांबिस Thu, 03/09/2015 - 22:42

भाषा हा शब्द फारच सिर्यसली घेतला की तुम्ही. भाषा मराठी की हिंदी की इंग्रजी यानं फरक पडतोच. पण जातीनं फरक पडतो. आर्थिक गटानं फरक पडतो. राजकीय कल काय आहे, त्यानंही फरक पडतो. त्या बाबतीत काय अनुभव?

मैत्री करतांना पहिल्यापासून (म्हणजे लहानपणापसून) जात, धर्म, आर्थिक पातळी, राजकीय विचार (आणि देश, लैंगिक कल वगैरे) यांना फाट्यावर मारलं. त्यानं काही नुकसान/फरक तर पडला नाहीच, उलट माझं आयुष्य जास्त समृद्ध झालं असं वाटतं!
याला कारण म्हणजे मुख्यतः आई-वडिलांनी लहानपणापासून दिलेली शिकवण आणि मुंबईसारख्या अवाढव्य आणि अठरापगड शहरातलं वास्तव्य!

ऋषिकेश Fri, 04/09/2015 - 08:34

In reply to by पिवळा डांबिस

याला कारण म्हणजे मुख्यतः आई-वडिलांनी लहानपणापासून दिलेली शिकवण आणि मुंबईसारख्या अवाढव्य आणि अठरापगड शहरातलं वास्तव्य!

अधोरेखिताशी जोर्दार सहमती!
अशा महानगरात लहानाची मोठी झालेल्या माणसांना विविधता, आपल्याहून वेगळा विचार/आचार करणार्‍या व्यक्ती यांचा अधिक सहजपणे (किंवा अधिक जलद) स्वीकार करता येतो असे मला अनेकदा जाणवले आहे. अर्थात हा काही नियम नाही. लहान शहरांतून आलेल्यांनाही हे जमु शकतेच पण त्यांना अनेकदा अधिक अंतर्गत (स्वतःशीच, आंतरीक) द्वंद्वाला सामोरे जावे लागते असे बाहेरून वाटते

पिवळा डांबिस Fri, 04/09/2015 - 10:54

In reply to by ऋषिकेश

महानगरात लहानाची मोठी झालेल्या माणसांना विविधता, आपल्याहून वेगळा विचार/आचार करणार्‍या व्यक्ती यांचा सहजपणे स्वीकार करता येतो

मुंबईत दहावीनंतर गावातल्या गावात जर कॉलेज नसेल तर सायन्सच्या मुला-मुलींना तरी प्रॅक्टिकल्स असल्यामुळे एक जेवण/खाणं घराबाहेर घ्यावं लागत असे.
ते नक्की कुणी बनवलंय हे शोधणं बहुतेक वेळा शक्य नसायचं...
मग कसली जात/पातळी/भाषा आणि धर्म?
आणि आई-वडिलांनीही कधी अमक्याशीच मैत्री कर तमक्याशी करू नको असं प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे शिकवलं नाही...
त्यामुळे मैत्री सोडाच पण नंतर आंतरजातीय प्रेमविवाह करतांनाही आपण काही मोठा पराक्रम (किंवा कूळबुडवेपणा!) करतोय असं वाटलं नाही.
मैत्री टू प्रेम टू विवाह; द प्रोसेस वॉज नॅचरल....

अतिशहाणा Fri, 04/09/2015 - 18:03

In reply to by ऋषिकेश

माझा अनुभव थोडा उलट आहे. मुंबईचा मराठी माणूस हा प्रचंड प्रो-शिवसेनाईट वाटलाय. 'आपण' आणि 'ते' अशी सोयीस्कर विभागणी करण्यातही त्याला ताबडतोब आवडते. आता ही 'ते'ची व्याख्या स्थलकालपरत्वे बदलत जात आहे. शिवाय मुंबईत जातीभेद दाखवला जात नाही(!) त्यामुळे त्याचा फर्स्ट हँड अनुभव नाही. जे काही जातीभेदाविषयी माहिती आहे ते पुस्तकं-पेपरात वाचूनच. आता तिथंही ठणठणाट असल्यामुळं जातीभेद असा कुठं अस्तित्वातच नसतो (आणि सरकारी जावयांचे उगाच लाड होतात) असंही माझ्या ओळखीतल्या एकदोघांचं मत दिसलंय.

अर्थात मला आलेले अनुभव अपवादात्मक आणि इतरांचे अधिक सामान्य असू शकतील.

राही Fri, 04/09/2015 - 12:10

In reply to by पिवळा डांबिस

मुंबईचं आजन्म ऋणको असणं हा आयुष्यातला मोठा आनंदाचा भाग आहे.

रुची Fri, 04/09/2015 - 01:04

ओळखीचे लोक, घरगुती आपलेपणाने जवळीक वाटणारे परिचित, एखादा सामायिक छंद-आवड असणारे मित्र, ज्यांच्याशी सगळं मन मोकळं करू शकू असं वाटणारी घट्ट जवळची माणसं, ज्यांचा सहवास हवासा वाटतो अशी समान विचारसरणी असणारी मंडळी असे मैत्रीचे किती पदर आहेत. सगळ्यांना एकात कसं कोंबायचं?

लहानपण खेड्यात अठरापगड जातीच्या लोकांत आणि पुरोगामी विचारांच्या माणसांत गेलं. आडनावाचा जातीधारीत व्यवसायाशी प्रत्यक्ष संबंध असल्याखेरीज, किंवा कोणी टिर्र्या बडवून सांगितल्याखेरीज जाती फारश्या ओळखता आल्या नाहीत (अजूनही येत नाहीत) त्यामुळे त्याआधारे मैत्री करण्याचा संबंधच नव्हता. शाळेतली एकमेव आणि अजूनही घट्ट जवळची असलेली मैत्रिण माझ्या जातीची नाही पण एकाच सामाजिक स्तरावरची नक्कीच आहे. मैत्री करताना सामाजिक स्तर वगैरे बघून कोणी करत नाही पण थोडं मोठं झाल्यावर सामायिक आवडीनिवडी, वाचन, नेहमीचं कौटुंबिक आयुष्य यात काही सारखेपणा असेल तर संभाषण सोपं होतं. शाळेत खूप गरीब घरांतून आलेल्या मुलामुलींशी जवळून संबंध आला पण आता जाणवतं की त्यांच्याशी प्राथमिक शाळेत असताना जी घसट होती ती पुढे-पुढे कमी होत गेली. त्यामुळे शाळकरी आयुष्यातले बहुसंख्य (खरं तर सगळेच) मित्रमैत्रिणी माझ्याहून वेगळ्या जातीचे पण साधारण सारख्या सामाजिक स्थरातले आणि मराठीच होते. भाषा-गावरान मराठी, ज्याची पुण्यामुंबईकडचे नातेवाईक येथेच्छ थट्टा करायचे.

पुढे कॉलेजात अजून बरेच मित्रमैत्रिणी मिळाले जे वेगवेगळ्या जातींचे आणि काही अमराठी होते, एका घोळक्यात असल्याने मराठी-हिंदी-इंग्लिश अशी सरमिसळ भाषा वापरायची सवय लागली. त्यातल्या फार कमी जणांशी आता संबंध आहेत, बरेच पाणी पुलाखालून गेलंय.
परदेशी आल्यावर सुरुवातीला फक्त काही भारतीय लोकांशी ओळखी झाल्या पण इतर काहीही समान धागा नसताना फक्त आपण एकाच भूभागातून आलोय म्हणून मैत्री होणे पोरकट वाटायचे. तरीही सुरवातीला बरोबर काम करणार्या मंडळींशिवाय इतर लोक भेटणं कठीण असतं शिवाय भारतीय लोकांचं नेटवर्किंग खूप असतं त्यामुळे एका ओळखीतून अनेक लोक भेटतात.

पुढे मात्र काही खेळ, छंद वगैरे धाग्याने इतरही मित्र मिळाले आणि आपण पुढाकार घेऊन संबंध प्रस्थापित केले तर मैत्रीची शक्यता तयार होते हे लक्षात आलं. संभाषणातलं वैविध्य, एकमेकांच्या संस्कृतीचा क्रॅश कोर्स वगैरे आकर्षणाने अनेक नवीन संबंध जोडले गेले. नंतर-नंतर मात्र हे ही आकर्षण ओसरलं आणि स्वतःलाच एका विशिष्ट समाजाचा प्रतिनिधी म्हणून समजण्यातून पूर्ण सुटका झाल्यावर समान विचारसरणीचे लोक अतिशय स्वाभाविकपणे भेटायला लागले. अनेक देशी-परदेशी मित्र मिळाले ज्यांच्याशी खोलवर जिव्हाळा तयार झाला.

नोकरी अशा ठिकाणी करत होते जिथे जगाच्या कानाकोपर्यातून स्थलांतरित झालेले लोक होते, समविचारी लोकांना मैत्रीची पोकळी सारखीच जाणवत असल्याने बरीच जवळची नाती जोडली गेली. आज विचार करताना लक्षात आलं की भारत सोडून जगाच्या पाठीवर, सर्व खंडात ज्यांच्याकडे दोन दिवस रहायला गेलो तर त्यांना आनंद होईल असे निदान पन्नास तरी मित्र आहेत आणि त्यात अनेक परदेशी प्रथम भाषा असणारे लोक आहेत. पूर्व युरोपातून आलेल्या काही मित्रांशी जरा जास्त जवळीक तयार झाली याला काही समाजशास्त्रीय कारण असावं असं वाटतं. त्यांच्या संस्कृती जरी आपल्यापेक्षा पूर्ण वेगळ्या असल्या तरी समाजवादाकडून भांडवलशाहीकडे झालेला प्रवास काहीसा सामाईक वाटतो, भाषेचा अडसर थोडा जास्त असला तरी ते जुळवून घेतलं जातं. साऊथ अफ्रिकन, इंग्लिश आणि आयरिश हे आपले क्लोनियल कझिन्स तर आहेतच! इटालियन आणि फ्रेंच लोकांच्या आढ्यतापूर्ण खाद्यसंस्कृतीमुळे त्यांच्याशीही समान दुवा सापडतो.

हे सगळं सांगूनही प्रामाणिकपणे हे ही सांगावसं वाटतं की जवळच्या मैत्रीत जो भारतीय अघळपघळपणा अपेक्षित असतो तो परदेशी मित्रांबरोबर नसतो. कोठेतरी मैत्रीचे सामाजिक संकेत प्रदेशाप्रमाणे वेगळे असतातच आणि आपणही ते नकळत पाळतच असतो. विशेषतः शेजारी-पाजार्यांशी भारतातल्या खेड्यात असलेले आपुलकीचे, प्रेमाचे आणि अनौपचारिक संबंध इथे तितक्या सहज तयार होत नाहीत (हे लिहितानाच त्याचा अपवादही लक्षात आला :-))

मराठी आणि एकूणच आंतरजालीय संबंध माझ्यासाठी तसे अगदीच नवीन आहेत पण एवढ्यातच त्यातून तयार झालेले बंध कलाजाणिवांसाठी, वैचारिक स्पष्टतेसाठी, वेगळ्या दृष्टीकोनासाठी (परिपेक्ष्य हा नावडता शब्द जाणूनबुजून टाळतेय) आणि थट्टामस्करी या सगळ्या गरजांतून तयार झालेल्या संवादाच्या प्रचंड ओढीपायी फार-फार महत्वाचे झाले आहेत. ही नाती फसवी आहेत हे मला अजिबात मंजूर नाही, ती फसवी असतील तर मग प्रत्यक्ष भेटीतून झालेली नातीही तितकीच फसवी असतील.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 04/09/2015 - 01:25

ठराविक विषयाचा अभ्यास करणाऱ्या मित्रमंडळाशी बोलण्याची भाषाही वेगळी असते. "डझ नॉट कंप्यूट" किंवा "सेग फॉल्ट आला" असे वाक्‌प्रचार शैक्षणिक मित्रमंडळात नित्यनेमाने वापरले जातात. आजच एका मित्राशी गप्पा मारताना त्याने एका मुलीच्या टोपणनावाची आठवण करून दिली. J1745. ती संध्याकाळी पावणेसहाला ऑफिसातून निघत असे.

राजेश घासकडवी Fri, 04/09/2015 - 05:56

लहानपणापासून वेगवेगळ्या 'भाषे'त बोलणारे मित्र मिळाले.

जन्म दादरच्या एका चाळीत झाला. तिथे बहुतांश मराठी पण अनेक गुजराथी मित्र होते. मराठी मित्र आमच्याच शाळेतले, आणि गुजराथी मित्र इतर शाळांमधले. मराठी अभ्यासू तर गुजराथी 'फुल पास' झाल्यावर आनंद मानणारे. मराठी क्रिकेट, कॅरम वगैरेमध्ये ठीकठाक, पण गुजराथी मित्रांबरोबर व्यापार खेळताना आपल्याला हा खेळ कळलेलाच नाही हे जाणवून देणारे.

शाळा संपली आणि अकरावी बारावीची ट्रांझिशनल वर्षं सुरू झाली तेव्हा मग मुली की मुलं असा भेदभाव व्हायला लागला. आमची कीर्ती कॉलेजची टेक्निकलची बॅच असल्यामुळे पुन्हा मुलांचा प्रादूर्भाव सुरू झाला. मध्ये एक वर्ष एफवायबीएससी केलं. आयायटीत जायच्या आधी एकदा वर्षासाठी बऱ्याचशा मुली पुन्हा आसपास दिसल्या. पण रुपारेल कॉलेजच्या वातावरणात फक्त एका वर्षात नवीन मित्रमैत्रिणी जमवायची तितकी संधी मिळाली नाही. संधी मिळाली नाही, की मी घेतली नाही असाही प्रश्न विचारता येईल. पण वर्षभरात ते सगळं सोडून आयायटीत दाखल झालो तेव्हा तिथले लागेबांधे सुटले.

आयायटीत खऱ्या अर्थाने मित्र मिळाले. हॉस्टेलचं वास्तव्य, तिथल्या निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये - नाटकं, गिर्यारोहण, मराठी वाङमय मंडळ, फोटोग्राफी आणि आर्ट्स वगैरेमध्ये - खूप वेगवेगळ्या लोकांशी संबंध आला. धमाल दिवस होते ते. अभ्यासापेक्षा असल्या इतर उद्योगधंद्यांमध्येच जास्त मजा यायची. अर्थातच मुलींच्या अनुपलब्धतेमुळे असल्या उद्योगांत भाग घ्यायला भरपूर वेळ असायचा.

आयायटी सोडून अमेरिकेत आलो. आयाटीतल्या काही मित्रांबरोबरच एकत्र राहिलो - निदान काही काळ तरी. त्यानंतरची बरीचशी वर्षं डोळ्यासमोरून झर्रकन जाणाऱ्या चित्राप्रमाणे ब्लर आहेत. मित्रपट हलता राहिलेला आहे. आयायटीते जे अगदी जवळचे जानी दोस्त होते त्यांची आता फेसबुकावरून पुन्हा ओळख करून घेत - यांच्याविषयी काहीतरी आठवतंय खरं - असं म्हणत प्रवास चालू आहे.

गेल्या पाचेक वर्षांत मराठी आंतरजाल आणि फेसबुक यांमधून काही ओळखी झाल्या. त्यांची भाषा, किंवा वागण्याची पद्धत, किंवा जगण्यासाठीच्या ऊर्मी... या कुठेतरी मला अपील झाल्या. त्यातून काही ओळखी झाल्या. त्यातल्या काही जवळच्या झाल्या, काही दूरच्या पण टिकवण्याजोग्या झाल्या... ऐसी अक्षरेच्या जन्म अशाच ओळखींमधून झाला.

मी काहीसा वाहावतो आहे हे मला जाणवतं आहे. पण एखाद्या चित्रपटाप्रमाणे इतक्या वर्षांचा मित्रपट उलगडून दाखवताना हे असंच काहीसं व्हायचं... हे अपेक्षितच आहे.

मला वाटतं माझे मित्र कोणती भाषा बोलतात, यापेक्षा मी कुठच्या काळात कुठची भाषा बोलत होतो, आणि आत्ता कुठची बोलतो आहे - ती आत्ता कोण समजून घेऊ शकतो - हा कळीचा मुद्दा आहे.

शहराजाद Fri, 04/09/2015 - 08:05

In reply to by राजेश घासकडवी

मला वाटतं माझे मित्र कोणती भाषा बोलतात, यापेक्षा मी कुठच्या काळात कुठची भाषा बोलत होतो, आणि आत्ता कुठची बोलतो आहे - ती आत्ता कोण समजून घेऊ शकतो - हा कळीचा मुद्दा आहे.

रोचक

शहराजाद Fri, 04/09/2015 - 08:26

In reply to by राजेश घासकडवी

मला वाटतं माझे मित्र कोणती भाषा बोलतात, यापेक्षा मी कुठच्या काळात कुठची भाषा बोलत होतो, आणि आत्ता कुठची बोलतो आहे - ती आत्ता कोण समजून घेऊ शकतो - हा कळीचा मुद्दा आहे.

रोचक

घनु Fri, 04/09/2015 - 12:24

२००२ मधे पुण्यात आलो तेव्हा बहुतांश मराठी मित्रच झाले, अमराठी ही होते पण तुरळक. हे पुण्यातले मित्र आणि नशिकचा मी, भाषा एकच असूनही बोलीभाषेत मात्र फरक होता. पुण्याला येण्यापुर्वी "करेल, भरेल, ठेवेल" असं म्हणायची सवय होती ती ह्या मित्रांमुळे अता "करेन, भरेन, ठेवेन" ने बदलली, त्यातही काही पेठी महाभाग होतेच, "करेन काय, करीन जास्त योग्य वाटतं" वगैरे सुचवायचे अश्यांना फाट्यावर मारलं. बाकीही काही शब्द होते जसं, सोडायला-सोडवायला, पिलो-प्यायलो, लाईट गेली-लाईट गेले वगैरे वगैरे. तर असे हे माझ्या चुका काढणारे माझे मराठी मित्र. कैक वर्षात अश्या चुका काढल्या नाहीत त्यांनी, एकतर माझी भाषा सुधारली असेल किंवा अता मैत्री इतकी घट्ट झाली आहे की भाषा केवळ संवादाचं साधन आहे, त्याचीही गरज पडत नाही कधी.
***
पहिल्यांदा अमेरिकेत गेलो होतो तेव्हा एका अमेरिकन कलिगच्या घरी जाण्याचा योग आला. ही कलिग म्हणजे माझी मॅनेजर होती, आम्ही प्रत्यक्षात पहिल्यांदाच भेटत असलो तरीही वर्च्युअली आमची चांगली मैत्री झाली होती. तिला आणि तिच्या नवर्‍याला भारतीय खाद्य-संस्कृतीचं विशेष कौतूक आणि मलाही पाक-कलेची भारी हौस. मग काय तिच्या घरी जाऊन मी खिचडी, कोशिंबीर, पापड आणि तिच्या नवर्‍याच्या आग्रहाखातर कॉलीफ्लॉवर चं करी-मसाला बनवलं, ह्याबरोबरच भरपूर गप्पा, गाणे, खेळ आणि भटकणं होतंच. नंतर बाबांशी फोनवर बोलताना गेलेल्या झकास दिवसांबद्दल सांगितलं आणि बाबांनी साधा प्रश्न विचारला "एक संपूर्ण दिवस त्यांच्या बरोबर घालवला म्हणतोस, पण तुला एवढं इंग्रजी येतं का अता बोलता?" :P तो प्रश्न साहाजिकच होता, माझं मराठी माध्यमातलं शिक्षण (ते ही टुकार शाळेतून) नंतर ही कधी कॉन्व्हेंट काय पण इंग्रजी माध्यमाचे साधे मित्र ही नव्हते मला, शिवाय कॉलेज संपून नुकताच जॉब सुरू केला होता सो त्यांना तसा प्रश्न पडणं साहजिक होतं. पण मग मलाही वाटलं, अरे हो खरंच की, एवढी मजा आली आज- धमाल केली पण हा जो एक संपूर्ण दिवस घालवला त्यात एकदाही आपण ना मराठी बोललो ना हिंदी. इंग्रजी बोलताना जे सतर्क/दक्ष रहावं लागतं, मराठीचं इंग्रजीत भाषांतर करता करता जे डोक्याचं दही होतं आपलं नेहमी ते ही आज झालं नाही. तेव्हा पुन्हा प्रत्यय आला, मैत्रित कसली आली भाषा, ते केवळ एक साधनच.