बीफचे चविष्ट पदार्थ - भाग एक - चप्पली कबाब
सामान्यतः खाणेपिणे, स्वयंपाक करणे आणि त्याबद्दल लिहिणे ही माझ्यासाठी अतिशय आनंददायी, स्वांतसुखाय प्रक्रिया असते. सण-समारंभ आणि त्यानिमित्ताने माध्यमांतून होणार्या चर्चांचा, मी काय बनविते यावर अप्रत्यक्ष परिणाम होतोही पण कधी कोणत्या कटू अनुभवांतून अथवा कोणत्या वाईट घटनेवर प्रतिक्रिया म्हणून खाद्यप्रक्रियेबद्दल लिहावेसे वाटले नव्हते. महंमद अखलखच्या हत्येने मात्र मी हबकले, आपल्या तथाकथित श्रद्धा इतरांवर लादण्याच्या बेलगाम, निर्बुद्ध दहशतवादातून एखाद्याची हत्या होणे अस्वस्थ करणारे आहेच आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या समूहाच्या वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतींकडे नाक मुरडून पहाण्याचा अहंकारही संतापजनक आहे. या घटनेवर प्रतिक्रिया म्हणून आणि महाराष्ट्रातल्या (इतरही भारतीय राज्यांतल्या) बीफबंदीवर प्रतिक्रिया म्हणून मी हा धागा सुरू करत आहे. मधूर जाफ्रींच्या 'करी बायबल' पुस्तकात असलेल्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण मुस्लिम पाककृती करून पहाण्याची प्रेरणा या निमित्ताने मिळाली आहे आणि त्याचबरोबर माझ्या आवडीच्या काही बीफ पाककृती पुन्हा बनवून पहायच्या आहेत. पहिला भाग मी लिहीला असला तरी इतरांनीही आपापल्या आवडीच्या पाककृती इथे लावल्यास आनंद होईल.
चप्पली कबाब
खरंतर चप्पली कबाबांच्या चपट्या गोल आकारामुळे त्यांचं नाव मिळालंय पण मी हे बनवताना त्यांना काठ्यांवर लावून लांबूडका आकार देते त्यामुळे हे खरे, 'अस्सल' चप्पली कबाब नव्हेत. शिवाय चप्पली कबाबांच्या असंख्य पाककृती आहेत, त्यातली ही मला आवडणारी कृती मधूर जाफ्रींच्या पुस्तकातल्या पाककृतीवर बेतलेली आहे, त्यात मी माझ्या आवडीने थोडे बदल केलेयत.
साहित्यः
बीफ खीमा
आले-लसूण वाटण २ चमचे*
हिरवी मिरची (हवी असल्यास चवीप्रमाणे)
तिखट १ चमचा* (किंवा चवीप्रमाणे)
मीठ (चवीप्रमाणे)
हळद १/२ चमचा*
एक मध्यम आकाराचा कांदा (बारीक चिरलेला)
धने पूड २ चमचे*
जिरे पूड १ चमचा*
गरम मसाला १ चमचा*
अनारदाणा पूड १ चमचा*
बारीक चिरलेली कोथिंबीर २ मोठे चमचे**
बारीक चिरलेला पुदिना १ मोठा चमचा**
बेसन २ मोठे चमचे**
एक अंडे
तेल
* टीस्पून
**टेबलस्पून
अनेकजण या कबाबांत टोमॅटोही घालतात, घालायचा असल्यास एक बारीक चिरलेला टोमॅटो घालावा.
१) प्रथम आले-लसूण वाटण करून घ्यावे. जरा तिखट हवे असतील आणि हिरवी मिरची वापरत असल्यास तीही आले लसणाबरोबर वाटून घ्यावी.
२) अंडे फेटून घ्यावे, बीफच्या खिम्यात बेसन सोडून इतर सर्व जिन्नस घालावेत.
३) बेसन बारीक आचेवर थोडे भाजून घ्यावे आणि गार झाल्यावर तेही खिम्यात मिसळावे.
अनारदाना (डाळिंबाचे बी) पूड ही बर्याच मुस्लिम पदार्थांत मांस मऊ करण्यासाठी वापरतात, इथे वापरायलाच हवी असे नाही पण वापरली तर कबाब मुलायम होतील.
५) खिमा व्यवस्थित मळून घ्यावा, मळण्याचा प्रक्रियेने सर्व मसाले मांसात व्यवस्थित मुरतील आणि मांस थोडे मऊ होईल.
अंडे घातल्याने गोळा थोडा पातळ होईल पण बेसनाने तो मिळून येईल, जरा जास्त पातळ वाटल्यास बेसनाचे प्रमाण थोडेसे वाढवावे.
७) खिमा झाकून कमीत कमी अर्धा तास फ्रीजमधे ठेऊन द्यावा, हा खिमा असाच रात्रभर ठेवला तर अधिकच चांगले.
८) बनवायच्या वेळी अर्धा एंच जाडीचे कबाब थापून घ्यावेत आणि एका तव्यावर कमी तेलात तळावेत (शॅलो फ्राय) ही मूळ पद्धत.
९) माझी थापायची पद्धत थोडी वेगळी आहे , मी कबाब काठ्यांवर (वेताच्या खास भाजण्यासाठी वनविलेल्या काड्या - बांबू स्टिक्स) लांबूडक्या आकारचे लावून घेते आणि तव्यावर किंचित तेलावर परतते. साधारण सहा-सात मिनिटांत ते भाजले जातात आणि असे काठ्यांवर लावलेले कबाब समारंभाच्या वेळी काटेचमच्यांशिवाय पाहुण्यांना देता येतात आणि गप्पा मारत खायला सोईचे वाटतात.
१०) कबाबांबरोबर रायता किंवा नुसता दही-कांदा खायला देता येईल.
मस्तच. धाग्याचं नाव
मस्तच. धाग्याचं नाव वाचताक्षणी डोक्यात मालिका सुरू झाली आणि उघडल्यावर तिच्यावर शिक्कामोर्तब झालं याचा कधी नव्हे तो आनंद झाला नाही. हबकणे हाच शब्द. असो. मस्तच आहे निषेधाचा मार्ग. इथे बीफ मिळवणं मुश्किल आहे. त्यामुळे करून पाहता येणार नाही. निदान बीफ खाण्याची चळवळ सुरू होईपर्यन्त तरी.
+१
बीफ खाण्याचा प्रयत्न केलाय पण खाताना फारसा आनंद वाटला नाही. यापुढे खाईन असे वाटत नाही. बीफसारखेच टेक्चर-रंग-ज्यूस असणारे नॉन मीट सुडोबीफ स्टाईल सोया बर्गर मात्र खायला आवडतात. मात्र बीफ खाणाऱ्यांना खाण्याचे स्वातंत्र्य अवश्य असावे.
(चांगदेव पाटील शेख सरांकडे बीफ खायला जातो तो प्रसंग आठवला)
द पर्सनल इज द पॉलिटिकल
पाककृती मस्त आहे. चप्पली कबाब मुस्लिम मित्रांच्या घरी अनेकदा चापले आहेत. (ह्या आकारात केल्याचा एक फायदा म्हणजे पोळीच्या रोलमध्ये घालून खाता येतात.)
सस्तन प्राण्यांचं मांस शिजवताना विशेषतः भारतीयांना ते कच्चं लागणार नाही ह्याची विशेष काळजी घ्यावी लागते. (नाही तर चपला पडतात!) रात्रभर ठेवल्यामुळे खिमा लवकर शिजतो असं काही आहे का? सहा-सात मिनिटांत शिजायला आच मंद पुरते की तीव्र लागते?
शीर्षक आवडले.
प्रतिसादाचे शीर्षक आवडले :-)
होय, रात्रभर मुरत ठेवल्याने आणि अनारदाना वापरल्याने हे शिजायला खूप कमी वेळ लागतो, मलाही पहिल्यांदा आश्चर्य वाटले होते. तवा चांगला जाड बुडाचा असावा आणि थोड्या तीव्र आचेवर भाजावेत. पहिला साधारण कबाब झाल्यासारखे वाटल्यावर मी तो मधून चिरून खात्री करून घेते म्हणजे त्याप्रमाणे पुढचे कबाब भाजता येतात.
आकाराचा पोळीत रोल करून खाण्याचा फायदाही बरोबर आहे. रात्रीचे कबाब जर शिल्लक राहिले असतील तर अनेकदा आम्ही पोळी, नान अथवा पीटा ब्रेडमधे थोडे सॅलड आणि रायता किंवा हमस घालून डब्यात नेतो.
दंडावर काळे फडके बांधणे,
दंडावर काळे फडके बांधणे, मोर्चे काढणे, संस्थळांवर किंवा इतर माध्यमांत शाब्दीक निषेध करणे याने जे साध्य होणे अपेक्षित आहे तेच इथे करायचा प्रयत्न आहे. निदान यातून आपल्यापेक्षा इतर समाजातल्या लोकांच्या वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीबद्दल अधिक माहिती मिळाल्याने त्याविषयीची घृणा (असल्यास) दूर झाली आणि ते खाण्याच्या इतरांच्या स्वातंत्र्याची जाणीव जरी काही जणांस झाली तरी बक्कळ झाले! एरवी मूक राहिल्याने सोयिस्करपणे अनिष्ट गोष्टीस आपली संमती गृहित धरली जाऊ शकते म्हणून व्यक्त होण्याचा खटाटोप.
शिजवण्याची पद्धत?
अनेकदा जास्त शिजवल्याने मांस कोरडे आणि चिवट होते, व्यवस्थित मुरलेले मांस, जास्त उष्णतेवर कमी वेळ भाजले तर लुसलुशीत होते. तंदूरमधे शिजवलेल्या टिक्का अथवा कबाबांची सर इतर पद्धतीने शिजवलेल्याना येत नाही त्याचे कारण तेच. कदाचित त्या ठिकाणी चांगले केले नसतील, कोणी घरी बनविलेले खाल्ले किंवा स्वतः बनवून पाहिले तर मत बदलू शकते. :-)
आपले वेदोक्त प्रकरण
>> गायीचे मांस खाणे ऐकायला कसेतरी वाटते. बाकीचे खातात म्हणून आपण खावे हे बरोबर नाही.
बाकीचे करतात ह्या कारणापोटी काही करू नये हे योग्य, पण मग वेद-उपनिषदांत सांगितलं म्हणून तरी खावं का?
What The Hindu Scriptures Really Say About Cow Worship
The Brhadaranyaka Upanishad (700 BCE) advocates that parents should eat rice cooked with beef or veal if they want a learned son who is a knower of the Vedas.
In the Dharmaśāstra, Vasistha states that a host may offer hospitality to a Brahman priest by cooking a full-grown ox, while Gautama notes that if an ascetic invited to eat at a sacrifice rejects meat then he shall go to hell for as many years as the slaughtered beast has hairs.
म्हैस
म्हशीचं मांस गायीसारखच लागत का?
"अर्थात! जर गाय रुचकर लागते तर म्हशीनेच काय घोडें मारलेंनीत?
स्वच्छ धूवून घेतलं म्हणजे झालं,काय मास्तर?"
:)
सिरियसली, बफेलो मीट हे बीफपेक्षा थोडंस उग्र लागतं. जसा बकर्याच्या आणि मेंढ्याच्या मटणाच्या स्वादात एक सटल फरक असतो, त्याप्रमाणेच!
केरळ
तिथे उलटा प्रॉब्लेम आहे.
Social activist and author Rahul Easwar’s car was on Thursday damaged and his path blocked by some students after he refused to lend support to a ‘beef festival’ being organised in various colleges in Kerala to protest against the Dadri lynching incident.
- See more at: http://indianexpress.com/article/india/india-news-india/students-damage…
कुणी काय खावे ?
कुणी काय खावे ही सर्वस्वी वैयक्तिक बाब आहे. तथापि स्थळ , काळ आणि वेळेचे भान असू ध्यावे. एकदा आणीबाणी येवून गेली आणि अभिव्यक्ती स्वतंत्र्याचा पुरस्कार करणारे महान आत्मे थंड पडलेले होते. एकंदर सोय आणि 'सहिष्णुता' पाहून असे धारिष्ट करत राहावे एवढेच.
अवांतर - पाक्रु उत्तम असेल ही आणि ती प्रकाशित करण्याचा जसा अधिकार आहे तसाच अधिकार वापरून ह्या कृती चा - विनम्र निषेध !
एकदा आणीबाणी येवून गेली आणि
एकदा आणीबाणी येवून गेली आणि अभिव्यक्ती स्वतंत्र्याचा पुरस्कार करणारे महान आत्मे थंड पडलेले होते.
हे तुम्हाला कुणी व कुठे सांगितले? आणीबाणीदरम्यान हेच संघिष्ट माफिनामे देऊन तुरुंगातून बाहेर येत होते, अन तुरुंगातले व बाहेरचे फरार पुरोगामीच चळवळी चालवत होते. आणीबाणी उलथून टाकणारे जनसंघी होते की दुसरे कुणी?
मुळातून अभ्यास वाढवा, अशी नम्र विनंती. मिसइन्फर्मेशन फीडिंग भयंकर जोरात आहे आजकाल.
चुकीची माहिती पसरवणं हा एक
चुकीची माहिती पसरवणं हा एक भाग झाला. पण मुळात तेव्हा तुम्ही असं का केलं नाहीत हा मुद्दाच गैरलागू आहे.
आणीबाणीचा काळ म्हणजे १९७० चं दशक. आज त्याला ३५+ वर्षं उलटून गेली आहेत. म्हणजे आज जे वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध लोक पुरस्कार परत करत आहेत ते तेव्हा तरुण होते. त्यांच्या पुरस्कार परत करण्याला तेव्हा किंमत नसेल, बहुतेकांना तेव्हा पुरस्कारच मिळालेले नव्हतेच. त्यांनी कदाचित कुठेतरी खाजगी अवकाशात आणीबाणीचा निषेध केला असेल किंवा नसेल. तेव्हा काही संस्थळं, ट्विटर आणि फेसबुक नव्हते की जाहीर निषेध नोंदवला आणि त्याची कुठेतरी नोंद राहिली. तेव्हा ३०-३५ वयाचे जे लोक होते, जे आजचे पुरोगामी, साहित्यिक वगैरे आहेत तेव्हाची त्यांची मतं काय होती हे नक्की कोणी तपासून बघितलेलं आहे का? का उगाच त्यांच्या नावाने शंख सुरू आहे?
आणि दुसरा मुद्दा. तेव्हा त्यांना तेवढी बुद्धी नसेलही. आज त्यांना जी बुद्धी, शहाणपण आलेलं आहे ते तेव्हा त्यांच्याकडे नसेल. आज सत्तरीचा माणूस जेवढा शहाणा दिसतो तो माणूस पस्तिशीचा असतानाही तेवढाच शहाणा असेल असा आग्रह धरणं हेच मुळात मानवी स्वभाव, मर्यादेबद्दल अज्ञान आहे.
तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं. नाही तेव्हा त्यांना आणीबाणी किंवा इतर काही गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या. म्हणून आत्ता लोकांचे गुंडशाहीमुळे खून पडत आहेत आणि सरकार, लाटेस्वार पंप्र मोदी त्यावर मूग गिळून गप्प बसून आहेत हा प्रकार निषेधार्ह वाटू नये असा काही कायदा, किंवा नीतीनियम आहे का? हा तर्कहीन* विचार आहे आणि त्याचा मुळातूनच विरोध केला पाहिजे.
*तर्कहीनच. तर्ककर्कश असा काही प्रकार नसतो. तर्क असतो किंवा नसतो. (किंवा एखादा विचार तर्काच्या क्षेत्राबाहेरचा असतो.) तर्क सहृदय असतोच असंही नाही. तर्काला भावभावना नसतात.
हे तुम्हाला कुणी व कुठे
हे तुम्हाला कुणी व कुठे सांगितले?
कोणीही सांगायची गरज नाही मला. स्वत: अनुभवलेले आहे. अनुभवी माणसाला अभ्यास करा असा अनाहूत सल्ला देण्याचे हे अजाणतेपणे होवू शकते सो नो वरी !
२ उदाहरणे शेपूट रॉयल पुरोगामी शेपूट घातल्याची ;-
१.विनोभा भावे यांच्यासारख्या म.गांधी यांचा प्रथम सत्याग्रहीने आणीबाणीचे 'अनुशाशन पर्व'म्हणून स्वागत केले .
२.त्याकाळचे प्रख्यात संपादक महाबळेश्वरचे हवामान ह्या विषयी अग्रलेख लिहित राहिले होते ,आणीबाणी उठली आणि पुढे ते जगाला शहाणपण शिकवू लागले.
आणीबाणीदरम्यान हेच संघिष्ट माफिनामे देऊन तुरुंगातून बाहेर येत होते
मिसा खाली अनेक स्वयंसेवकांची धरपकड झाली त्यांचा काहीही अपराध नव्हता. सगळ्यांनाच हे अग्नी दिव्य जमले नाही आणि म्हणून काही स्वयंसेवक माफी मागून बाहेर आले हे सत्य आहे. पण जनसंघ आणि संघाचा एकही पदाधिकारी वा प्रचारक माफी मागून बाहेर आला नाही. सर्वश्री अटलजी , अडवाणीजी , कुशाभावू , के.आर . मालकांनी , सुंदरसिंग भंडारी , भैरोसिंग शेखावत , हशू अडवानी आणि जगन्नाथ राव जोशी इत्यादी नेते पूर्ण १८ महिने तुरुंगात होते.
मुळातून अभ्यास वाढवा
हे बाकी खरे हो.
मिसइन्फर्मेशन फीडिंग भयंकर जोरात आहे आजकाल
हे म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.
वैयाकीत टीका केवळ बचाव म्हणून केली आहे.
मनोज: आणिबाणीदरम्यान
मनोज: आणिबाणीदरम्यान आत्ताच्या अनेक विचारवंतांनी काहीही केलं नाही.
आडकित्ता: संघ आणि सनसंघाचे लोक आणिबाणीत माफीनामे देउन बाहेर आले. (याचा मूळ मुद्द्याशी सबंध काय असा प्रश्न पडतो. पण ते असो.)
मनोजः काही लोक आले असतील पण सगळे मोठे नेते पूर्ण १८ महिने तुरुंगात होते.
आता या चर्चेत आजचं भाजपा वगैरे कुठुन आलं? बळच.
मी थांबतो .
पण या मंडळींचा नी हल्लीच्या आरेसेस किंवा भाजपाचा इतिहास वगळता संबंध (उरलाय) काय?
श्री.ऋषिकेश - मूळ मुद्दा 'प्रचारक आणि पदाधिकारी पूर्ण १८ महिने तुरुंगात होते आणि माफी मागितली नाही ' हा आहे. उगाच फाटे फोडून वाद वाढवू नका.
तर मधु लिमये ( जेष्ठ समाजवादी विचारवंत आणि हो पुरोगामी अर्थातच ) ह्यांच्या अत्मचारीत्रामध्ये एक सुंदर आठवण आहे. मधु लिमये यांना पोलिसांनी जबरी मारहाण केली. ते तेंव्हा येरवडा जेल मध्ये होते. त्या रात्री एका जेष्ठ नेत्याने मलमपट्टी केली व आपले कांबळे झोपायला दिले. ( नाव आठवत नाही - बहुदा रामभाऊ म्हाळगी ). मागच्या पिढीतले समाजवादीही अती सभ्य आणि आदरणीय होते.
मतभेद होते आणि असणारच.
काही उत्तरे
विनोबाजींनी अनुशासनपर्व म्हटले त्या वेळी ते खरेच अनुशासनपर्व होते. आणीबाणीच्या सुरुवातीसुरुवातीस समाजजीवनात जितकी शिस्त आली होती तितकी ती नंतर कधीही दिसलेली नाही. आणीबाणीच्या मध्य आणि शेवटावर शिस्त कायम होती पण दडपशाही आणि मनमानी प्रचंड वाढली होती.
सगळ्या समाजवाद्यांनी निषेध केला आणि लगोलग त्यांना तुरुंगात धाडण्यात आले.
वृत्तपत्रांवर, माध्यमांवर नियंत्रणे होती त्यामुळे निषेधाच्या घटना अप्रकाशित राहिल्या. जमावबंदी, सभाबंदी होती त्यामुळे निषेधसभा होऊ शकल्या नाहीत. खाजगी वाहिन्या त्या काळी नव्हत्या. आंतरजालही नव्हते. भूमिगत चळवळ जोरात होती आणि गुप्त बुलेटिन्स, पत्रके निघत होती.
आता कमाल झाली !
विनोबाजींनी अनुशासनपर्व म्हटले त्या वेळी ते खरेच अनुशासनपर्व होते
म्हणजे आणीबाणी चालेल (पण मोदी नको ) असेच ना ?
आणीबाणीच्या सुरुवातीसुरुवातीस समाजजीवनात जितकी शिस्त आली होती तितकी ती नंतर कधीही दिसलेली नाही.
काय पण विनोदबुद्धी ! मानले !!
सगळ्या समाजवाद्यांनी निषेध केला आणि लगोलग त्यांना तुरुंगात धाडण्यात आले.
मराठी मधले सगळे लेखकू - पुरोगामी - लेखणी म्यान करून बसले होते. समाजवाद्यांना आपल्या 'हिंदू विरोधी अभिव्यक्तीचा 'माज वंशपरंपरेने येतो. तर अशी मंडळी अलिबाग , रोह्याला लपून बसली होती. समाजवादी पक्षाचे नेते तुरुंगात होते पण विचारवंत म्हणाल तर - गोविंद तळवलकर , माधव गडकरी ,ह.रा. महाजनी , निळू फुले , वसंत बापट , विंदा करंदीकर , जयवंत दळवी , डॉ.श्रीराम लागू साहेब हे सगळे चिडी चुप्प होते. समाज वादी नेते फक्त तुरुंगात गेले आणि विचारवंत नाही. संघाचे मात्र उत्सवाला उपस्थित राहणारे स्वयंसेवक सुध्दा आत गेले.
वृत्तपत्रांवर, माध्यमांवर नियंत्रणे होती त्यामुळे निषेधाच्या घटना अप्रकाशित राहिल्या. जमावबंदी, सभाबंदी होती त्यामुळे निषेधसभा होऊ शकल्या नाहीत. खाजगी वाहिन्या त्या काळी नव्हत्या. आंतरजालही नव्हते. भूमिगत चळवळ जोरात होती आणि गुप्त बुलेटिन्स, पत्रके निघत होती.
अरे वाह भलतीच मज्जा होती नै.
धन्यवाद.
धाग्यावर प्रतिसाद देणार्यां सर्वांचे आभार. महंमद अखलखच्या हत्येने मला धक्का बसला होता, ज्या भारतात मी वाढले तिथे वेगवेगळ्या समुहाचे लोक वेगवेगळ्या प्रकारचे मांस खातात हे गृहित धरलेले असावे असे वाटायचे. मतांच्या राजकरणामुळे बीफबंदी आली तरी बीफ न खाणार्या सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने हा मुद्दा गौण होता आणि कायदा काही झाला तरी कोण काय खातंय याने त्यांना काही फरक पडत असेलसे वाटले नव्हते. दोन ऑक्टोबरला दारुबंदी असते पण म्हणून कोणी विकली आणि कोणी प्यायली तर कोणाला काय पडलेली असते? तसे काहीसे बीफबंदीचे असावे असे मला वाटले होते पण महंमदच्या हत्येने मला खडबडून जाग आली, जनमत किती गढूळले आहे आणि धर्मांध उन्मादात जमाव कोणत्या थराला जाऊ शकतो हे पाहून शहारा आला. जे चुकीचे आहे, अन्याय्य आहे त्याला तसे म्हणणे हेदेखिल धाडसी वाटावे, असे एखादे सदर मराठी वृत्तपत्रात छापून येणं अवघड वाटावे आणि कोणाला तरी पाककृतीचाही निषेध करावासा वाटावा इतके विचित्र वातावरण तयार झालेले असेल तर कठीण आहे.
असो, पुढील भागात 'फिलो' पेस्ट्रीत गुंडाळून केलेल्या बीफच्या खिम्याची पाककृती लिहेन.
महंमदच्या हत्येने मला खडबडून
महंमदच्या हत्येने मला खडबडून जाग आली
हत्येचा त्रिवार निषेध. जरा काही दिवस थांबा आणि पहा कदाचित सत्य वेगळे किंवा याहूनही भयानक असू शकते.
पाककृतीचाही निषेध करावासा वाटावा इतके विचित्र वातावरण तयार झालेले असेल तर कठीण आहे.
महाराष्ट्रामध्ये तरी इतके काही वातावरण खराब नाही. भिवंडी मध्ये काही वर्षापूर्वी एक पोलीस चौकी जाळली गेली , त्याचा निषेध दूर पण एफ.आय.आर सुध्दा झाला नाही.काश्मीर आणि नवखाली ( https://en.wikipedia.org/wiki/Noakhali_riots) ह्यातर इतिहास जमा गोष्टी.
तर काय कायदा आहे आणि नाही हे महत्वाचे आहे पण त्याहूनही महत्वाचे कधी कुठे काय'सुयोग्य' ठरेल त्याचे तारतम्य असावे.
अवांतर - एका मित्राने आखाती देशात कुटलेली सुपारी नेली होती. तो 'ड्रग ' चा काही प्रकार असावा असे वाटून साहेब २ दिवस 'हवा ' खावून आले. अर्थात कुटलेली सुपारी खावू नये असा कोणताही कायदा त्या देशात नाही.
आपल्या कृतीमुळे आणि अभिव्यक्ती मुळे समाजाचे काही होवो - आपण संशय , तिरस्कार, घृणा , ह्या भावनांना निमंत्रण तर देत नाही ना ? एवढा विचार स्वतःची सुरक्षा म्हणून तरी करावा ही विनंती.
पुनश्च एकदा ह्या पाककृती चा निषेध.
हम्म!
कदाचित सत्य वेगळे किंवा याहूनही भयानक असू शकते
हो खरेच! व्यक्तिगत वैमनस्यातून खून झाला असे अजून कोणी कसे म्हटले नाही याचे आश्चर्य वाटत होते.
आपण संशय , तिरस्कार, घृणा , ह्या भावनांना निमंत्रण तर देत नाही ना ? एवढा विचार स्वतःची सुरक्षा म्हणून तरी करावा ही विनंती
!! माझा मुद्दा अधिरेखित केल्याबद्दल धन्यवाद! पाककृती वाचून आणि पाहूनही (न पाहण्याचा पर्याय असताना) भावना एवढ्या दुखावतात का हो? मोठेच दुखणे आहे म्हणजे.
बाकी आखाती देशांशी भारताची तुलना करायची असेल तर ... सिरीयासारखी यादवी भारतात नाही म्हणून स्वतःचा भाग्याचा हेवा वाटून घेऊन अशा फुटकळ खुनांकडे वगैरे दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे नाही का?
खरंय
लोकसत्तेचा अग्रलेख या विचारवंताना विधवा विचारवंत म्हणतो.
बाकी हिंदू जागृता होत आहेत आणि एकत्रितपणे काहीतरी मागणी करत आहेत हे पाहून आनंद झाला. नाहीतर 'ते' फारच आक्रमक आहेत सत्तेत ५०% वाटा मागतात असे म्हणत दर ६०-७० वर्षानी फाळणी करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
धन्यवाद पेशवे .
लोकसत्तेचे अग्रलेख वाच(व)त नाही. पण हा लेख हे आश्चर्यच म्हणावे इतका चांगला आहे. लिंक वद्दल आभार. विधवा विचारवंत हा 'पाशवी ' वाग्प्रचार आहे.
त्याऐवजी 'नपुंसक विचारवंत' किंवा 'बद्धकोष्ठी विचारवंत' हा मथळआ बरा.
( वैयक्तिक आणि टीकात्मक प्रतिसाद हे ही विचारवंतांचे आधुनिक लक्षण आहे )
रहा बरे खुशाल तसेच
शेवटी कोणी काही म्हटले तरी सत्य हे सत्य म्हणूनच उरतं. म्हणूनच ह्यायाखान म्हटला होता "पाकिस्तान भारताविरुद्ध युद्धात हरुच नाही शकत. कारण हिंदूंनी मार खायचा असा गेल्या १००० वर्षांचा इतिहास आहे." आज त्याविरुद्ध स्थानिक स्तरावर आवाज उठत असेल तर चांगले आहे. शेवटी बहुमताप्रमाणे गोष्टींचा निर्णय होणे ही लोकशाही आहे. :)
हत्या समर्थनीय नाहीच पण एकत्रितपणे मागणी करावी हे कळले हे ही नसे थोडके.
हत्या समर्थनीय नाहीच आभार
हत्या समर्थनीय नाहीच
आभार इतकेच म्हणायचे होते.
हे स्पष्ट झाल्यावर
पण एकत्रितपणे मागणी करावी हे कळले हे ही नसे थोडके.
याला अंशतः सहमती आहे. एकत्रित मागणी करावी हे चांगले लक्षण खरे (त्यात मार्ग शांततामय असेल तर अजून चांगले), पण एकत्र येताना कोणत्या मंचावर/कृत्यासाठी एकत्र येताहेत हे बघणेही रोचक ठरावे.
हिंदु म्हणून काही नागरीक एकत्र येऊन विधायक व स्पृहणीय काम करत असतील, काही चांगले - समाजाला पुढे नेणारे - बदल मागत असतील तर एक हिंदू म्ह्णून स्वागतच करेन - प्रसंगी त्यात सहभागीही होईन. मात्र कट्टरता दाखवणारा तो 'संघी धर्म' - धार्मिक नियमांची जंत्री देणार्या- अब्राहमीक माळेतला कोणतातरी वेगळाच धर्म आहे आहे. 'जो जे वांच्छिल तो ते लाहो' असे म्हणणारा तो हिंदु धर्म नक्कीच नाही! त्यांनी हिंदु धर्मियांची प्रतिमा अश्या कृत्यांनी मलीन करणे थांबवावे असे वाटते.
हो का!
वाह! पुढे नेणारे, मागे नेणारे वरती नेणारे खालती नेणारे हे ठरवणारे कोण? तर वाट्टेल ते करायला मागणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मागणारे काय मग भले ती गोष्ट लोकशाही सरकारने केलेल्या कायद्यानुसार निषिद्ध असेल तरीही? जो जे वांछिल तो ते लाहो हे कोणासाठी आहे लक्षात घ्यावे आधी. ते 'व्यंकटी' सांडलेल्या खळांसाठी आहे.
हिंदू धर्म हा काय हा तो हिंदू धर्म(जीवन पद्धती)पाळणारे ठरवतील ना! आणि हो चार्वाकाचे तत्वज्ञान हे त्या हिंदू धर्माच्या एकूण तत्वज्ञानाचे ५% असेल (आकाराने आणि प्रभावाने). त्यामुळे लोकशाही मार्गाने म्हटले तरी जे तुम्हाला वाटत नाहीत त्याच लोकांचे हे ठरवण्यात प्राबल्य राहील हे उघडच आहे. फक्त हे सांगा मग त्या बहुमताचा आदर तुम्ही करता का नाही.
लेखा त म्हटले आहे -त्रिपुरात
लेखा त म्हटले आहे -
त्रिपुरात ख्रिश्चन दहशतवादी संघटनांनी स्थानिक िहदूंची मोठय़ा प्रमाणावर हत्या केली. त्याही वेळी या पुरोगामी विचारवंतांची दातखीळच बसली. यांतील पुरस्कारोत्सुक वा प्राप्त एकानेही ख्रिश्चन धर्मीय अतिरेक्यांचा निषेध करण्याचे धाडस केले नाही. कदाचित तसे करण्याने त्यांच्या पुरोगामित्वाचा कौमार्यभंग झाला असता.
"तेव्हा कुठे गेला तुझा धर्म" टाइप अशी बरीच उदाहरणे दिलेले आहेत. माझा प्रश्न हा आहे की - १० वेळा नसतील केले पुरस्कार परत. पण म्हणून ११ व्या वेळी "सुरुवात" तर होतेय याचा दिलासा मानायचा की १० वेळच्या चूकांचा पाढा उगाळत बसायचा? कुठेतरी सुरुवात करावीच लागते ना.
__
अर्थात ही सुरुवात आहे की स्वतंत्र घटना ते काळच ठरवेल (God forbid!)
ढोंगीपणाचा कळस !
पुरस्कार परत करणे म्हणजे साहित्यिकांच्या ढोंगीपणाचा कळस आहे. जनता त्यावर विश्वास ठेवते हा त्यांचा अल्लडपणा म्हणावा की भोळेपणा ?
एकंदर २५ साहित्यिकांनी पुरस्कार परत केल्याची घोषणा केली , प्रत्यक्ष ९ लोकांनी केलेत आणि पैसे परत करणारे फक्त ३ !
- सलमान रश्दी आणि तस्लिमाबाईंच्या मागे का नाही राहिले हे साहित्यिक उभे ? भिका मागून पुरस्कार मिळवायचे आणि हलकटपणा करून परत केल्याची प्रसिद्धी मिळवायची आणि जनतेने अश्रू ढालायचे !
मनो नाम:!
स्वाक्षरीसकट संपूर्ण प्रतिसाद
स्वाक्षरीसकट संपूर्ण प्रतिसाद आवडला. पुढेमागे स्वाक्षरी बदलशील तर ती आत्ता प्रतिसादात डकवून ठेवते.
देव एकच पाहीजे हा अट्टाहास कशाला माझ्या शरीराला जे अन्नघटक लागतात ते तुमच्या शरीराला लागत नाहीत, मला जे संगीत आवडतं ते तुम्हाला बोअरींग वाटू शकतं ज्या व्यक्तीला मी अॅडमायर करते ती व्यक्ती तुम्हाला नावडू शकते मग माझा देव व तुमचा देव एकच कसा असेल?
फोटो झकास. हे आणि शीक कबाब
फोटो झकास. हे आणि शीक कबाब करताना ते मिश्रण काडीवर चिकटेल असे करणे हे कौशल्याचे काम आहे.
बाकी इनेडिबल इंडिया नामक फेसबुक पेजचा अमेरिकेतील बीफ खाण्यावरचा टेकः
https://m.facebook.com/inedibleindia1/photos/pb.867695293284322.-2207520000.1444518730./898062053580979/?type=3&source=54&refid=17
करुन पहीनच. छान वाटला.
करुन पाहीनच. छान वाटला.