बीफचे चविष्ट पदार्थ - भाग दोन - चुकंदर गोष्त
काही वर्षांपूर्वी 'धोबीघाट' सिनेमा पहात असताना त्यातल्या'चुकंदर गोष्त' या पदार्थाच्या उल्लेखाने माझी उत्सुकता चाळवली. नंतर त्याबद्दल थोडी चौकशी करता चुकंदर म्हणजे बीट आणि चुकंदर गोष्त म्हणजे 'बीटरूटाबरोबर शिजवलेले मांस' अशी रोचक माहिती मिळाली. पालक, मेथी वगैरे भाज्यांबरोबर शिजवलेले मांस आपल्यासाठी बर्यापैकी परिचित आहे आणि पाश्चिमात्य पाककृतींमध्ये स्ट्यू बनवताना मांसाबरोबर अनेक भाज्या शिजवल्या जातात पण बीटासारखी लालभडक आणि किंचित गोड भाजी मांसाबरोबर शिजवणे थोडे नवीन वाटले पण कल्पना आवडली. बीट शिजायला बराच वेळ लागतो आणि मांस शिजायलाही जास्त वेळ लागत असल्याने हे दोन्ही घटक एकत्र शिजवता येतात शिवाय बीटामुळे रश्स्याला मस्त लालभडक रंग येतो. चवीला बेताचे तिखट असलेला असा हा पदार्थ बराच वैशिष्यपूर्ण आहे.
शर्मेन ओब्रायन नावाच्या एका ऑस्ट्रेलियन लेखिकेच्या 'रेसिपीज फ्रॉम अॅन अर्बन व्हिलेज' या पुस्तकात 'चुकंदर गोष्तची' पाककृती आहे. काही वर्षांपूर्वी मला ही पाककृती जालावर मिळाली होती आता पुस्तक मिळते का पहायला हवे. शर्मेन अनेक वर्षे भारतात रहात होती आणि तिची भारतीय खाद्यपदार्थांवरची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत.
साहित्य:
अर्धा किलो बीफचे इंचभराचे तुकडे (हाडांसह)
अर्धा किलो चिरलेले बीट
दोन मध्यम आकारचे उभे चिरलेले कांदे
खडा मसाला (दालचिनी, लवंग, वेलदोडा, तमालपत्र, मिरे इ.) २ चमचे
१ चमचा आल्याची पेस्ट
१ चमचा लसणाची पेस्ट
१ चमचा तिखट
१ चमचा धनेपूड
१ चमचा हळद
१ चमचा आमचूर पावडर
१ चमचा गरम मसाला
१/४ (पाव) कप फेटलेले
लिंबाचा रस २ चमचे
मीठ स्वादानुसार
अर्धा कप तेल
चिरलेली कोथिंबीर २ मोठे चमचे
*काहीजण त्यात टोमॅटोही घालतात, घालायचा असल्यास दोन मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घ्यावेत.
१) बीफला थोडे मीठ, हळद आणि लिंबाचा रस लावून मुरु द्यावे.
२) एका कढईत तेल गरम करून घ्यावे आणि त्यावर चिरलेले कांदे परतावेत. कांदे साधारण मातकट रंगाचे झाल्यावर झार्याने काढून घ्यावेत आणि मिक्सरला त्याचे वाटण करून घ्यावे, असे तळलेल्या कांद्याचे वाटण बर्याच मुस्लिम पदार्थांत वापरतात.
३) कांदे तळून उरलेले तेल प्रेशर कुकरमधे गरम करावे त्यावर खडा मसाला, आले-लसणाची पेस्ट, हळद आणि तिखट घालावे.
४) बीफ तेलावर थोडे परतून घ्यावे व त्यात बीटचे तुकडे, गरम मसाला व धनेपूड घालून अजून थोडे परतावे.
५) टोमॅटो घालायचे असल्यास ते घालून तेल सुटेपर्यंत शिजवावे.
६) आता त्यात मीठ आणि दीड कप पाणी घालावे आणि बीफ प्रेशर कुकरमधे शिजवून घ्यावे.
७) रस्सा शिजत आल्यावर त्यात कांद्याचे वाटण व फेटलेले दही मिसळावे, आमचूर पावडर घालावी आणि रस्सा दाट होईपर्यंत पुन्हा शिजवावे.
८) खायला देण्याआधी त्यावर चिरलेली कोथिंबीर पसरावी.
प्रतिक्रिया
रंग तर मनभावन आहे अगदी.
रंग तर मनभावन आहे अगदी. (बादवे हे अवांतर. (म्हणे) माणसाच्या उत्क्रांतीमधल्या शिकारी-मांसाहारी टप्प्याची आठवण म्हणून आपल्याला लाल रंगाचे पदार्थ अधिक आकर्षक वाटतात आणि हिरवे कमी. असं आहे का खरंच? माझा स्वत:वरून सहज विश्वास बसतो. पण याबद्दल संशोधन काय सांगतं ते ऐकणं मजेशीर असेल.)
मालिकेला मनःपूर्वक शुभेच्छा...
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
माणसाच्या उत्क्रांतीमधल्या
आम्ही जरा कमी/वेगळ्या अंगाने उत्क्रांत झालेले दिस्तोय
@रुची: समहाऊ या पदार्थाबद्दल काहीच (ऐकूनही) माहिती नव्हती. आभार!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अघोरी
आम्हाला परमपवित्र असलेल्या ह्या बीटपित्याचा नाश करतांना तुमची बोटं कशी लचकली नाहीत?
-संतप्त किमयागारबंगाली
पंगा.
तुमच्या अत्यंतिक बीटप्रेमाबद्दल कल्पना असल्याने ही पाकृ लिहून तुमच्या भावना दुखावणार याची पूर्वकल्पना आलीच होती पण सध्या पंगा घेण्याच्या मूडमधे असल्याने म्हटलं दुखवाव्यात तुमच्यापण हळव्या भावना! आता कधी लिहिताय यावर कविता?
आता कधी लिहिताय यावर कविता?
छ्या, तुमच्या ह्या धाग्यात काही दम नाही, मग कविता कशी लिहिणार?
तुम्ही 'तसा' धागा काढून दाखवा, मग लगोलग कविता आलीच म्ह्णून समजा!!!
(बीफ सोडल्याचं दु:ख्ख नाही, पण सनातनी सोकावतात!!!)
पिडां तुम्ही बीट प्रेमी असाल
पिडां तुम्ही बीट प्रेमी असाल तर उकडलेल्या बीटाची दह्यात घातलेली कोशिंबीर जरुर खाल्ली असेल मी या शनिवारी किंवा आज-उद्यात करणार आहे. त्याकरताच एक फ्लेव्हर्ड सोडून, प्लेन दही आणलय.
फोटो नेहमीप्रमाणे मस्त!
फोटो नेहमीप्रमाणे मस्त! चुकंदर नाव मात्र अजिबात आवडले नाही. बीटाला मराठीत काय म्हणतात?
बीटच ऐकले आहे
मराठीत बीटच म्हटलेले ऐकले आहे, इतर मराठी नावाची कल्पना नाही ब्वॉ.
इस्कू हिंदीमें बोलताय बीट,
इस्कू हिंदीमें बोलताय बीट, मराठीमें बोलताय वीट!
(वीट आला च्या चालीवर!!)
मस्त
मस्त पाकृ. रंगही सुंदर आला आहे. अजून चुकंदर गोश्त खाण्याचा कधी योग आला नसला तरी बीट + बीफ हे कॉम्बो पाहून, अलीकडेच सेंट पीटर्सबर्गमध्ये हादडलेले ("मैं स्वित्झर्लंड अक्सर जाता रहता हूं, मुझे वहां की शामें बहुत पसंद है|" छापाचा साटल्यशून्य झैरात-झैरात मोड) बीफयुक्त बोर्श्त (हे 'वेलचीयुक्त श्रीखंड'च्या चालीवर वाचू नये) आठवून अं.ह. झालो.
पुढचा भाग
पुढच्या भागात त्या पदार्थाचे रसग्रहण लिहा नंदनभाऊ!
सेंट पीटर्सबर्गमध्ये हादडलेले
अय्या, ते सेंट पीटसबर्गातल्या कम्युनिस्ट कचेरीच्या पाठीमागल्या गल्लीतलं हाटेल बोर्श्तमाता नं?
मलादेखील तिथलं बीफ खूपखूप आवडतं! अगदी टोफूसारखं लागतं नै चवीला!!!!
पिडां तुम्हाला या प्रतिसादावर
पिडां तुम्हाला या प्रतिसादावर बघा "विनोदी" श्रेणी मिळालीये. हा भेदभाव का? पुरुषांनी "अय्या" का म्हणू नये?
जेन्विन प्रश्न आहे.
अप्पा
अप्पाची खिचडी आणि तदनुषंगिक उल्लासी चर्चापुराण आठवलं
मलाही बोर्श्तचीच आठवण झाली.
मलाही बोर्श्तचीच आठवण झाली. (मी रश्श्याला गेले नाहीये...पण इथे बरेच रश्श्यन लोक राहतात आणि त्यामुळे हा पदार्थ मेन्युवर कधीकधी दिसतो)
भारतीयपणा जपण्याबद्दल अभिनंदन
फोटो खल्लास आहेत. शिवाय पहिल्या फोटोत पाश्चात्यांसारखा काटा न वापरता चमचा ठेवण्याची भारतीय संस्कृती जपण्याबद्दल रुचीचं विशेष अभिनंदन.
हाडांसह मांसाचे तुकडे घेतल्यामुळे चव, पोतामध्ये काही फरक पडतो का? बीट शिजायला जेवढा वेळ लागतो तेवढाच मांस शिजायला लागतो का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हाडांसह मांसाचे तुकडे
अजिबात नाही. फक्त हाडांसह मांसाचे तुकडे घेतल्यास शेवटी सांगाडा शिल्लक रहातो!!!
हे मात्र काहीही हं श्री!!!!!
चिकन विथ बोन्स च्या रश्शाला ,
चिकन विथ बोन्स च्या रश्शाला , बोनलेस चिकनहून जास्त चव असते.
____
आई गं आय मिस पाया
हाडाच्या सर्वात जवळचे मांस काहीसे गोडसर
हाडाच्या सर्वात जवळचे मांस काहीसे गोडसर असते. (स्नायू हाडाला जोडणारे "कनेक्टिव्ह टिश्यू" शिजल्यावर गोडसर होतात.)
ह्म्म्म पाया गोडुस असतो खरा.
ह्म्म्म पाया गोडुस असतो खरा.
निषेध
मी पूर्ण नास्तिक असलो, माझ्या धार्मिक भावना नसल्यामुळे दुखावण्याचा प्रश्नच नसला तरी,
या पद्धतीने निषेध व्यक्त करण्याचा त्रिवार निषेध!
बी पॉजिटिव्ह तिमा. "बीफ न
बी पॉजिटिव्ह तिमा. "बीफ न घालता हा पदार्थ कसा करायचा?" असा प्रश्न विचारा.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
A +ve
@ आदुबाळ,
मी बी + नसून A +ve आहे. एखादी अनिष्ट गोष्ट समाजात घडली तर ती लोकांनी विसरावी म्हणून प्रयत्न करायचा की सारखा तोच विषय लावून धरुन लोकक्षोभ जागृत ठेवायचा ? या वृत्तीला माझा विरोध आहे आणि तो राहील. ही घटना आधीच्या राजवटीत झाली असती तरी मी हेच मत मांडलं असतं!
पहिल्या धाग्याला मी काही लिहिले नाही. पण त्याची लेखमालाच चालू ठेवण्याचा प्रयत्न दिसला म्हणून लिहिले.
एखादी अनिष्ट गोष्ट समाजात
एखादी अनिष्ट गोष्ट समाजात घडली तर ती विसरावी असा प्रयत्न करणे आणि त्याबद्दल न बोलणे म्हणजे सतरंजीखाली कचरा ढकलण्यासारखे आहे ज्या वृत्तीला माझा विरोध आहे. लोकक्षोभ जागृत ठेवायचाच आहे पण तो अनिष्ट वृत्तींच्या विरोधात त्याच्या समर्थनात नव्हे! अशा कारणाने एका व्यक्तीची हत्या झाली ही कदाचित दुर्मिळ आणि अपवादात्मक घटना झाली अशी आशा बाळगायला हरकत नाही पण म्हणून बीफबंदी उठली नाही किंवा त्याचे समर्थन करणार्यांची संख्या घटली नाही किंबहुना आता सरकार बहुसंख्यांच्या मतांवर निवडून येणार म्हणजे लोकशाही पद्धतीत अल्पसंख्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी झाली तर त्यात काय चुकीचे आहे असे म्हणणार्यांची संख्या वाढलीच आहे.
लेखमाला लिहिण्याचा माझा उद्देश अतिशय सरळ आहे, इतरांच्या (पक्षी अल्पसंख्यांच्या) खाद्यपरंपरेकडे सन्मानाने पहाणे, बहुसंख्यांच्या धार्मिक भावनांमुळे अल्पसंख्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याच्या होत असलेल्या गळचेपीचा निषेध करणे आणि त्याचबरोबर जिथे बहुसंख्य लोक बीफ खात नाहीत अशा प्रांतातल्या बीफसेवनाशी निगडित परंपरांबद्दल चर्चा करणे.
आजकाल काळाच्या पडद्याआड गेलेल्या पारंपारिक खाद्यपदार्थांबद्दल भरपूर चर्चा होत असतात, त्या परंपरा टिकवाव्यात याबद्दल बर्याच जणांना आस्था असते (जी असावीही) पण मग एखाद्याला बीफविषयी खाद्यपदार्थांची चर्चा करायची असल्यास बीफ न खाणार्यांना ते त्यांच्या श्रद्धांची थट्टा केल्यासारखे का वाटावे हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे.
आता तुम्हाला काही प्रश्न:
१) तुम्ही नास्तीक आहात आणि तुम्हाला त्यामुळे बीफविषयी धार्मिक भावना नाहीत असे तुम्ही आवर्जून नमूद केलेत मग निधर्मी भारतात बीफबंदी असावी असे तुम्हाला वाटते का?
२) नागरिकांनी कोणता प्राणी खावा यासंबंधी कायदे करणे ही व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी आहे असे तुम्हाला वाटते का?
३) नाझी जर्मनीमधे झालेल्या ज्यूंच्या कत्तलीबद्दल आता चर्चा करणे बंद करावे असे तुम्हांस वाटते का? (हा प्रश्न बीफ मुद्द्यासंदर्भात अप्रस्तुत आहे असे वाटू शकते पण "अनिष्ट गोष्ट समाजात घडली तर ती लोकांनी विसरावी म्हणून प्रयत्न करायचा" या तात्विक मुद्द्याशी संदर्भात आहे म्हणून विचारले.)
४) बीफसेवनाच्या संशयावरून झालेल्या माणसाच्या हत्येचा आवर्जून निषेध करावासा वाटला नाही पण त्याच्या हत्येच्या निषेधार्थ चालू असलेल्या धागामालिकेचा मात्र आवर्जून निषेध करावासा वाटला यामागची आपलली वैचारिक धारणा तपासून पहावे असे तुम्हाला वाटले होते का?
तुमची प्रतिक्रिया पाहिल्याबरोबर त्याला त्वरित प्रत्युत्तर द्यायची माझी इच्छा मागे सारून मला आधी या धाग्यामागची माझी वैचारिक भूमिका तपासून पहायची होती, त्यात काही विसंगती आहेत का हे पडताळायचे होते. आपण हे लिहिण्यामागे 'होलिअर दॅन दाऊ' इतकाच मुद्दा मांडायचा होता की काही ठाम भूमिका मांडायची होती हे पुन्हा तपासून पहायचे होते. त्या चिंतनानंतर मला वाटते की हा धागा सुरू केला तेंव्हा त्यामागे संताप होता आणि निषेधासाठी काहीशी प्रतिक्रियास्वरूप प्रक्रिया होती पण धागामालिका चालू ठेवण्यामागे ठाम वैचारिक भूमिका आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते.
+१
सहमत आहे.
-Nile
+१
सहमती वेगळी सांगायला नकोच. प्रतिसादात सगळे मुद्दे आले आहेत. तरीही थोडी भर. (कारण तुझा प्रतिसाद कधीही मर्यादा ओलांडून जाणार नाही. पण इथे पार मर्यादेपर्यंत जाऊन काही गोष्टी बोलल्याशिवाय मला चैन पडणार नाही.)
पाककृती लिहिण्यासारख्या निरुपद्रवी, काहीशा मवाळ निषेधामुळे कुणाच्या भावना दुखावतील, आगीत तूप टाकले जाईल, उगीच चिथावल्यासारखे होईल - असे म्हणणार्या लोकांसाठी काही प्रश्न. मुद्दामहून दांडीयात्रेत सहभागी होऊन मूठभर मीठ उचलण्याची (निरुपद्रवी, मवाळ) गांधीप्रणित कृतीही ब्रिटिशांना चिथावण्यासाठीच होती का? की उपोषण करून, सत्याग्रहाला बसून राज्यकर्त्यांवर दबाव टाकण्याची कृती चिथावण्यासाठी होती?
इतर माणसांच्या स्वैपाकघरातील कृतींबद्दल ऐकल्यावाचल्यामुळे विटाळतील-चिथावले जातील-बेभान होतील इतके कुणाचे कान हलके आहेत इथे? नि असे एखाद्याचे कान हलके असले, तर 'भारी हळवा आहे हो तो प्राण्यांच्या बाबतीत. नका तुम्ही उगाच मुंग्यांच्या औषधाबद्दल गप्पा मारू. उगीच त्याच्या भावना दुखावतील. मग तो काहीही वेड्यासारखे फेकून मारील' या चालीवर त्याचे लाड करायचे आहेत?
मराठी लोक आवडीने मोड आलेली कडधान्ये खातात. जैनांच्यात त्याला 'एखाद्याला जिवाची आशा लावून मग ठार करणे' असे लेबल लावून निषिद्ध मानतात. उद्या डाळिंब्यांच्या पाककृती लिहिण्याने जैनांच्या भावना दुखावू लागल्या, तर तेही 'नका उगाच चिथावू त्यांना' म्हणून बंद करायचे आहे काय? (हे इतके अशक्य नाही. जैनांनी मांसविक्रीवर आणू पाहिलेली बंदी ताजी आहे.) आणि जर तसे नसेल, तर या दोन गोष्टींतला फरक नक्की काय आहे? की फक्त एकाच समाजाला टारगेट करणे तितकेसे अन्याय्य नाही म्हणून त्याच्याकडे काणाडोळा करायचा आहे?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
दोन्ही प्रतिसादांशी
दोन्ही प्रतिसादांशी सहमत.
मुळात भारतीय (फक्त हिंदू नाही, भारतीयच) संस्कृती मांस खाणं हे हलकं मानतेच. अगदी माझ्याच वयाची माझी शाकाहारी मैत्रिण 'फक्त शाकाहारी' हॉटेल असेल तरच आत जाते. मग मुरड घालणं हे ईतरच करतात. "ई बाई काय ते खाता" असं उघडपणे एखादी शाकाहारी म्हणताना मी पाहीलेलं आहे. पण मांसाहारी स्वतःच्या भावना दुखावून घेत नाहीत. उलट थोडं ओशाळतातच. या चार दिवसात इथल्याच एका प्रतिक्रियेत "आपण गोमांस खाणार होतो पण तुम्ही नका खाउ" असा आग्रह विभिन्नधर्मी मित्राने/माणसाने केल्याचा उल्लेख आहे. मग तरीही हे हिंदू मत आहे म्हणून कोणी हेका धरून रहाणार असेल तर त्याचा विरोध व्ह्यायला हवाच आणि तो पाककृतीतून होणं हा निषेधाचा अतीशय सौम्य प्रकार आहे.
दुरुस्ती
ब्राह्मणी संस्कृती आणि काही इतर अल्पसंख्य संस्कृती (जैन, वगैरे) मांस खाणं हलकं मानतात एवढंच. भारतात मांसाहार हा बहुसंख्यांचा व्यवहार आहे आणि शाकाहार हा अल्पसंख्यांचा व्यवहार आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
+१
आणि मुख्य म्हणजे भारतीय मांसाहारी माणसाच्या पानात एका वेळेस एक किंवा दोन पदार्थच मांसाहारी असतात. सगळं ताट मांसाने भरलेलं नसतं.
इतर सगळे पदार्थ शाकाहारीच असतात त्यामुळे वनस्पतीजन्य न्युट्रियंट्सच्या अभावाचाही प्रश्न नसतो.
दुसरं म्हणजे माझ्या पहाण्यात मांसाहारी हे शाकाहार्यांची कधीमधी थोडी थट्टा जरी करत असले तरी कुणा शाकाहार्याच्या तोंडात जबरदस्तीने मांस खुपसतांना दिसलेले नाहियेत.
मांसाहारी जरी स्वतः मांस खात असले तरी एखादा स्ट्रिक्ट शाकाहारी पाहुणा घरी आल्यावर त्याला शाकाहारी जेवणच देतात (आणि त्यावेळेस स्वतःही शाकाहारच खातात). तसेच जर मांसहारी कुणा शाकाहार्याच्या घरी गेले तर तिथे मांसाहार मिळालाच पाहिजे असा हट्ट धरत नाहीत.
मांसाहारी हा शाकाहार्याला मांसाहाराचा आग्रह करत नाही (कारण भाव वाढतील ही भीती!!)
तसेच तो मांसाहार सोडा हा आग्रहही मानणं शक्य नाही!!
मांसाहारी हा शाकाहार्याला
हाण्ण!!!
नाय तर काय!
माझी माता मांसाहारी होती.
तिची माता मांसाहारी होती.
तिची माता मांसाहारी होती.
हे गेल्या अनेक पिढ्या चालत आलंय...
आता काय ह्या गोमातेच्या पुत्रांचं ऐकून मांसाहार बंद करू?
मातृपरंपरा तोडल्याचं पाप नाही लागणार?
व्यवहार
व्यवहार अल्पसंख्यांकाचा आहे की बहुसंख्यांकाचा, यातल्या तथ्याला फारसा अर्थ नाही. कारण व्यवहाराची प्रतिष्ठा व्यवहारकर्त्यांच्या संख्येवर ठरत नाही तर समाजातल्या त्यांच्या स्थानावर ठरते. म्हणजे एक तर त्यांचा सामाजिक दर्जा उंचावला तर त्यांच्या व्यवहाराला प्रतिष्ठा प्राप्त होउ शकेल. किंवा, तितकी वाट बघायची तयारी नसेल तर नवीन नॉर्म्ज़ निर्माण करण्याची ऊर्जा तरी पाहिजे. संस्कृतिची व्याख्या बदलण्याचे हे कार्य विद्रोहातून होऊ शकते आणि सध्या त्याच मार्गाने ते हळूहळू चालू आहे, पण आपण केलेली संस्कृतीची व्याख्या विद्यमान अभिजनांना पटली तर पाहिजे. ते असेच म्हणत राहाणार की ही खरी संस्कृती नाही. जोपर्यंत संस्कृतीवरच्या अभिजनांच्या पगड्याला झुगारून देण्याइतपत बहुजनांचे व्यवहार तगडे होत नाहीत तोपर्यंत ह्या बहुसंख्येला काही अर्थ नाही. म्हणजे पुन्हा बहुजनांचे सक्षमीकरण, आरक्षण वगैरे मुद्दे आलेच.
पण एक आशा आहे. सध्याच्या बाजारखपाऊपणाच्या दिवसांत, व्यवहारांच्या वारंवारितेमुळे निर्माण होणारी विक्रीची संधी आणि पैशाचे हस्तान्तरण या बाबींमुळे हे व्यवहार 'इन थिंग' किंवा फॅशनेबल बनू शकतात आणि मागणीनुसार पुरवठा वाढून ते मुख्य प्रवाहात येऊन त्यांचे संस्कृतिमूल्य वाढू शकते. म्हणजे पैशाच्या आवकीच्या दिशेने संस्कृती वळू शकते.
अवांतर समांतर
अगदी अशाच प्रकारचा कडवट विचार काही दिवसांमागे फेसबुक वापरताना आला होता. काही लेखक-लेखिका-कवि-चित्रकार (तेजायला..... दोन पादर्या ओळी लिहील्या अन अन झाले कवि, लहान पोरं मुतल्यासारखी ३ चित्रं काढली अन झाले चित्रकार) सो कॉल्ड "इन्टुक स्थानातून" इतके तोंडपूजक, चमचे गोळा करुन ठेवतात, की ..... मी टिंकू ला म्हटलं होतं - "अमका/की पाद* तरी त्याला लाईक येतात"
.
असो इथे त्याचा संबंध नाही पण "सामाजिक स्थानमहती" काय वर्णावी एवढच स्पष्ट करायचे आहे.
भावना वगैरे
सहमतच आहे, मात्र इथे काही लोक 'बहुसंख्यांच्या भावनांविषयी संवेदनशीलता दाखवा' वगैरे युक्तिवाद करत असतात. म्हणून हे म्हणणं महत्त्वाचं वाटतं की शाकाहार हा बहुसंख्य भारतीयांचा व्यवहारच नाही
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
शेन वॉर्न
इथे मुद्दा इन-जनरल मांसाहाराचा नसून गोमांस भक्षणाचा आहे. जो माझ्या माहितीनुसार बहुसंख्यांचा व्यवहार नाही. बाकी चालू द्या.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
संदर्भासह
मी जे वाक्य वर उद्धृत केलं त्या संदर्भात बोलतोय. तुमच्या संदर्भासाठी पुन्हा एकदा देतो -
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
इथे मुद्दा इन-जनरल
तो आज.
त्याला मान्यता दिल्यावर उद्या सगळाच मांसाहार बंद ठेवण्याविषयीचा मुद्दा येणार नाही कशावरून?
त्या जैनांच्या सणाच्या केसमध्ये तर तो टेस्ट बलून उडवूनही झाला आहे.
तेंव्हा इथे मुद्दा हा आहे की कोणी काय खावं वा खाऊ नये हा ज्याच्यात्याच्या स्वतःपुरता विषय आहे.
दुसर्याने काय खावं किंवा खाऊ नये हे सांगण्याचा इतरांना अधिकार का असावा?
तेंव्हा इथे मुद्दा हा आहे की
अधिकार नसावा हे मान्य आहेच. त्याच्याशी असहमती नाहीच. पण हा मुद्दा मांडताना मुद्द्यांची सरमिसळ होते आहे एवढच म्हणायचं होतं.
बाकी मुंबैत मांसभक्षणाला बंदी नसून खाटीकखान्यांना दोन दिवस बंद ठेवलं होतं. आणि तो टेस्ट बलून नक्की नव्हता.
अधिक माहिती
http://www.opindia.com/2015/09/meat-bans-in-maharashtra-rest-of-india-a-...
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मुद्दाम वाद घालायचा नहिये पण,
ते ही का असावं? खाटिकखान्यात काम करणारे लोकं जैन होते?
जर जैनांचा मांसाहाराशी आणि म्हणून त्या खाटिकखान्याशी काही संबंध नाही तर ते खाटिकखाने चालू राहिले काय किंवा न राहिले काय, जैनांना त्याचा त्रास का व्हावा?
जमिनीच्या खाली तयार होतात म्हणून बटाटे, रताळी वगैरे न खाणारे जैनही माहितीत आहेत. मग आता त्यांच्या सणाच्या दिवशी काय बटाटे-रताळी विक्रीवरही बंदी आणायची?
कुण्या एका समाजाला एखादी वेडगळ श्रद्धा पाळायची असेल तर त्याने ती जरूर पाळावी पण इतरांना त्याचा त्रास का?
सहमत आहे.
सहमत आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
दोनाचे आठ/अठराचे आठ
धवल पटेल या पाहुण्या लेखकांचा तुम्ही दिलेला लेख (की ओपिनियन पीस?) वाचला. त्यात त्यांनी आठ दिवसांच्या बॅनचा उल्लेख करून we were told by media that Mira-Bhayander Municipal Corporation (MBMC) had imposed a Meat-Ban for 8 days during the Jain festival of Paryushan वर अशीही मखलाशी केली आहे - (FYI Mira Bhayander boasts of a Jain population of 2.5 lakhs out of a total population of 8.5 lakhs).
पुढे आदर्श लिबरल्स, भाजपा सरकार याला कसं जबाबदार नाही असे नेहमीचे कीवर्ड्स आहेत. पण त्यांनी ८ दिवसांच्या बॅनची बातमी चुकीची होती असं कुठे म्हटल्याचं, किंवा तसे पुरावे/दुवे दिल्याचं लेखात आढळलं नाही.
राष्ट्रीय माध्यमांतल्या बातमीत तर मीरा-भाईंदरच्या महापौरांनी आम्हाला खरं तर १८ दिवस बंदी घालायची होती, असं म्हटलं आहे (दुवा) -
The Mayor, Geeta Jain, justified the decision. "We had initially decided to shut it for 18 days but since it clashed with Bakri-Id we are enforcing it only. This is a democracy and this has been passed by a vote," said Ms Jain.
८ दिवसांची बातमी चूक आहे अस
८ दिवसांची बातमी चूक आहे अस त्यांनी म्हटलेलं नाही. हेही प्रपोजल जुनंच आहे. आठ दिवसांचं. (इथून)
असो, त्या आर्टिकलचा मुद्दा दुसर्यांची पापं या सरकारच्या नावावर खपवण्याचा आहे. पोलिस जसं एखादा चोर एका चोरीत सापडला की इतर दोन-चार न सुटलेले चोरीचे गुन्हे त्या चोरावर चिकटवतात तसं झालय. त्या चोराने पहिला गुन्हा केलाय हे मान्य आहेच (बीफ बंदीचा). पण म्हणून इतर गुन्हे त्याच्यावर चिकटवणं चूक आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
?
तशी शक्यता तत्त्वतः अगदीच नाकारता येण्यासारखी नाही खरी. पण मग समस्येचे उत्तर प्रश्नातच दडलेले आहे, नाही काय?
भारतात ती लोकशाही की कायशीशी म्हणतात ना, ती (अजूनपर्यंत तरी) आहे, असे कायसेसे ऐकून आहे ब्वॉ. बोले तो, लोकच सरकार निवडून देतात, ज्या पक्षाला निवडणुकीत बहुमत मिळते, त्याचे सरकार बनते, असे काहीतरी. (रोचक कल्पना आहे खरी.)
आता, ज्या देशात शाकाहार हा बहुसंख्यांचा व्यवहारच नाही, तेथे मांसाहारावर बंदी आणणार्या सरकारला लोक बहुमताने निवडूनच कसे देऊ शकतील ब्वॉ? बरे, ('विकासा'बिकासाच्या नावावर भाळून जाऊन वगैरे) एकदा चूक करतील, पुन्हा पुढच्या वेळेस कशाला निवडून देतील? (आणि दिलेच, तर दे गॉट व्हॉट दे आस्क्ड फॉर, त्याला आपण आक्षेप कोणत्या आधारावर घेणार? इन द्याट केस, जनतेची मर्जी आहे; बहुमताचा आदर न करून कसे चालेल?)
मांसाहारावर बंदी घालणारे सरकार जर निवडून आले, तर बहुमताचा तो कौल मानावयास नको काय?
की... की... की... हेदेखील सरकार अल्पसंख्यांचे लांगूलचालन करणार्यांपैकीच म्हणावयाचे?
आलांत, या! तुम्हाला मध्यंतरी
आलांत, या! तुम्हाला मध्यंतरी खूप मिस केलं होतं!!
तुम्ही म्हणता ते सग्गळं बरोबर आहे, म्हणजे ते लोकशाही, निवडणुका वैग्रे.
पण निवडणुका ह्या 'सबका साथ, सबका विकास' हा मंत्र जागवत लढायच्या आणि मग लोकांनी विकासाला मत दिल्यावर मागल्या दाराने हे मांसाहारबंदी, घरवापसी वगैरे अजेंडा लढवायचा ही शुद्ध बदमाषी आहे असे आपल्याला वाटत नाही का?
तुमच्या तोंडात साखर पडो!
अगदी जनता पार्टीच्या राजवटीवेळची आठवण येते आहे. देजाव्हू!!
मतदारांनी दिलं पण स्वकर्माने घालवलं!!
अॅज इफ द हिस्ट्री इज रिपीटिंग इट्सेल्फ!!!!!
आमेन!!!!
...
अलबत! ती तर आहेच.
पण हे पब्लिकला कळायला नको काय?
मुळात याहून वेगळी अशी नेमकी काय अपेक्षा केली होती पब्लिकने? कशाच्या आधारावर?
जनता पार्टीच्या वेळेसच कशाला, मागच्या वेळेस नाही का ती 'इंडिया शायनिंग, इंडिया शायनिंग' म्हणून धूळ उडविली होती? काय झाले पुढच्या वेळेस?
पण या वेळेस जनता पार्टीच्या वेळेच्या तुलनेत किंचित फरक आहे. बोले तो, 'योजकस्तत्र दुर्लभः'|
जनता पार्टीच्या वेळेस, त्यांच्या 'कर्मा'चा बरोबर फायदा घेऊन, त्यांचे कच्चे दुवे बरोबर ओळखून, चक्रे आपल्याला हवी तशी फिरवून बाजी उलटविण्यास काबिल असे तरबेज नेतृत्व 'त्या दुसर्या पक्षा'त होते. (काय बाई होती राव!) तूर्तास दुर्दैवाने 'त्या पक्षा'त - फॉर व्हॉटेवर रीझन - काही दम उरलेला आहेसे वाटत नाही. असो.
(काय बाई होती राव!) सहमत.
सहमत. स्वातंत्र्योत्तर भारताचा सगळ्यात समर्थ नेता!!
वडणुका ह्या 'सबका साथ, सबका
इथेच तर गोची ए, लोकांनी नक्की काय कारणाने मत दिलंय त्याबद्दल आता मला संदिग्धता (वाटू लागली) आहे.
जर लोकांचा खरंच विरोध असता तर असली ठराविक-आहारबंदी, घरवापसी वगैरे चाळे सोडा नी विकास दाखवा असे लोकांनी बोलायला सुरूवात करायला हवी होती.
मात्र प्रत्यक्षात या गोष्टींमुळे अनेकांना काहीच फरक पडत नाहीये! फरक पडणे सोडाच, उलट कशाला नाउगायच रेसिपी द्यायची असेही वर बोलले जातेय
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
म्हातारी मेल्याचं दु:ख आहेच,
म्हातारी मेल्याचं दु:ख आहेच, ते कलौघात विसरताही येईल, पण हा 'संघी' काळ सोकावतोय - उद्या मला मी ब्राह्मण असूनही मांसभक्षण केलं म्हणून लोक मारायला येतील कोणी सांगावं? (नी मनुस्मृतीत किंवा कोणत्याही हजारो वर्षांपूर्वीच्या कालबाह्य अबक ग्रंथात ते कसं लिहिलंय, नी मी मांस खाल्याने कसा धर्म भ्रष्ट होतो वगैरे तोंड वर करून सांगतिल, काही विवक्षीत मासिकात लेखही छापतील!)- त्यासाठी हा उपाय उत्तम वाटतो
माझ्यावर ही वेळ येऊ नये म्हणून मी आजच आवाज करणे गरजेचे आहे. मीच नाही तुम्हीही!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सहमत
सहमत
गरज काय?
>> उद्या मला मी ब्राह्मण असूनही .....
मुळात हे मुद्दाम सांगायची गरज का पडावी? असे होईल, तसे होईल हे Fear mongering कशाला? ज्याला जे आवडेल ते खावे, इतपत बोलणे ठीक आहे.
रुची ताई वाईट वाटू घेऊ नका,
रुची ताई वाईट वाटू घेऊ नका, सद्य परिस्थितीत हि रेसिपी पाहून मला काय वाटले ते. काही वर्षांपूर्वी एका वरिष्ठ व्यक्तीने मला सांगितले होते, आग लागल्यावर सामान्य लोक शांत राहतात, शहाणे लोक आग विझविण्यासाठी पाणी टाकतात आणि पुरोगामी लोक आगीत तूप टाकतात आणि त्यावर आपली पोळी भाजतात.
.
अहो, पाककृतीचा आनंद घ्या की जरा.
सारखं काय "पुरोगामी पुरोगामी"?
थोडं चिलॅक्स!
==================
भूतकाळातील आस्वल्य.
वाईट वाटून घेऊ नका
"वाईट वाटून घेऊ नका" हे तुमचे म्हणणे म्हणजे "मी रेसिस्ट नाही पण.." अशी सुरवात करून मग "सगळे कृष्णवर्णीय अमुकतमुक करतात..." वगैरे रेसिस्ट बोलायचे अशा सारखे दिसतेय. बाकी तुमची ही वरिष्ठ व्यक्ती आपल्या धार्मिक भावना दुखावल्यावर एखाद्याची हत्या करण्याबाबत काय म्हणत होती?
“We all know what to do, we just don’t know how to get re-elected after we’ve done it.” Jean-Claude Juncker
हो पण त्यात कुणाचीही हत्या
हो पण त्यात कुणाचीही हत्या असता कामा नये. त्या हिरव्यागार भाज्यांची कापाकापी बघून आम्हा पर्यावरणवाद्यांच्या नैसर्गीक(निसर्गाशी संबधीत)भावना दुखावतात.
हिरव्यागार भाज्यांची कापाकापी
गळ्याशी नख खुपसून अंदाज घेत
क्रूरपणे त्वचा सोलली जातीये
दुधी भोपळ्याची..
सपासप सुरी चालवत
कांद्याची कापाकाप चालली आहे,
डोळ्याची आग आग होतीये..
शहाळ्या-नारळावर कोयत्याने दरोडा घातला आहे..
हे भाजलं जात आहे वांगं,
निथळतंय त्वचेतून पाणी, टप टप..
तडतडल्या मोहोरीत हा खेळ चाललाय
फडफडत कडीपत्त्याच्या पंखांचा
उकळत्या तेलात..
आणि तिखट टाकलं जात आहे
भाजीच्या अंगावर, डोळ्यांत..
धारेवर किसली जात आहेत गाजरं,
पिळवणूक चालली आहे आंब्याची,
सर्वहारा बनलीये कोय..
वरवंट्याखाली चिरडली जाते आहे मीठमिरची,
बत्ता घातला जातो आहे वेलदोड्याच्या डोक्यात,
फडक्याने गळा ओढून मुसक्या बांधून
दह्याला फासावर चढवलं आहे चक्का बनवण्यासाठी..
हे भरडले जाताहेत गहू,
लाही लाही होतीये मक्याची, ज्वारीची..
भर बाजारात सुरा खुपसला जातोय
कलिंगडाच्या पोटात..
पोलीस नुसतेच बघतायत,
संत्र्या-मोसंबी-केळ्यांची वस्त्रं उतरवली जातायत..
हे काय चाललंयं,
हे काय चाललंयं...
– अशोक नायगावकर
ओहोहो!!! क्या बात है!! बहोत
ओहोहो!!! क्या बात है!! बहोत बढीया.
अमुक इतकी मस्त कविता इथे दिल्याबद्दल आपले आभार
ते पोळ्या भाजत आलेत म्हणून
ते पोळ्या भाजत आलेत म्हणून समाज इतका पुढारलाय! नैतर कल्पना करवत नाही!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
चिलॅक्स आजोबा, तुम्ही याला
चिलॅक्स आजोबा, तुम्ही याला प्रत्युत्तर म्हणून दिल्लीसाइडच्या चांगल्या प्रतिगामी(ह. घ्या.) व्हेज रेसिपीज टाका!
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
धन्यवाद
यज्ञात तूप टाकून त्यावर आपली पोळी भाजणारे (पक्षी: उपजिवीका करणारे) पुरोगामी? छे हो! त्यांना आमच्याकडे भटजी म्हणतात आणि मराठी संस्थळांवर पाककृती टाकून त्यावर कोण कसली पोळी भाजणार?
बाकी पुरोगामी हा आजकाल बदनाम केला गेलेला शब्द असला तरी मी त्याकडे नेहमी मूळ अर्थाने पहाते. नेहमी आपल्या काळापुढचे विचार करणार्यातले आणि इतरांना त्यामार्गाने चालण्यात मार्गदर्शन करणार्यातले आपण नाही याची मला खात्री आहे. आता काहीजण आपले हितसंबंध सांभाळण्यासाठी अजूनही मागल्या शतकात वावरतात आणि असे करताना आता सिद्ध झालेली वैज्ञानिक सत्ये नाकारतात, आपल्या धारणांमुळे इतरांवर अन्याय झाला तरी त्याकडे काणाडोळा करतात, अशा सनातन्यांसाठी काळाबरोबर चालणारे आणि त्याप्रमाणे आपल्या धारणा तपासून पहाणारे सर्वसामान्य लोकही पुरोगामी असतात.
अर्थात तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, अशा सनातन्यांचे मी केवळ उदाहरण दिले होते. तुम्ही खर्या अर्थाने आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या आजूबाजूला असणारे सर्वसामान्य नागरीक आणि आमचेच भाऊबंद आहात याची मला खात्री आहे.
चुकंदर म्हणजे चूंचुद्री
चुकंदर म्हणजे चूंचुद्री वाटले.
असं म्हणून तुम्ही मुसहारा
असं म्हणून तुम्ही मुसहारा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.
प्रश्न
१) तुम्ही नास्तीक आहात आणि तुम्हाला त्यामुळे बीफविषयी धार्मिक भावना नाहीत असे तुम्ही आवर्जून नमूद केलेत मग निधर्मी भारतात बीफबंदी असावी असे तुम्हाला वाटते का?
निधर्मी भारतात बीफबंदी नसावी. ज्याला जे पाहिजे ते तो खाऊ शकतो, पण त्याचा गवगवा करुन इतरांना डिवचू नये.
२) नागरिकांनी कोणता प्राणी खावा यासंबंधी कायदे करणे ही व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी आहे असे तुम्हाला वाटते का?
हो, नक्कीच गळचेपी आहे.
३) नाझी जर्मनीमधे झालेल्या ज्यूंच्या कत्तलीबद्दल आता चर्चा करणे बंद करावे असे तुम्हांस वाटते का? (हा प्रश्न बीफ मुद्द्यासंदर्भात अप्रस्तुत आहे असे वाटू शकते पण "अनिष्ट गोष्ट समाजात घडली तर ती लोकांनी विसरावी म्हणून प्रयत्न करायचा" या तात्विक मुद्द्याशी संदर्भात आहे म्हणून विचारले.)
बाकीचे जग जरी त्यावर चर्चा करत असले तरी जर्मनीतल्या लोकांना त्यावर चर्चा नको वाटते आणि ते अशी चर्चा करणे टाळतात कारण त्यांना तो इतिहास लाजिरवाणा वाटतो.
४) बीफसेवनाच्या संशयावरून झालेल्या माणसाच्या हत्येचा आवर्जून निषेध करावासा वाटला नाही पण त्याच्या हत्येच्या निषेधार्थ चालू असलेल्या धागामालिकेचा मात्र आवर्जून निषेध करावासा वाटला यामागची आपलली वैचारिक धारणा तपासून पहावे असे तुम्हाला वाटले होते का?
बीफसेवनाच्या संशयावरुन झालेल्या घटनेचा निषेधच काय, त्यावरुन आत्यंतिक संताप माझ्या मनांत दाटला होता. एवढेच नाही तर त्यावर मोदींनी मौन पाळणे हेही तितकेच संतापजनक आहे. असल्या अमानुष घटनेचा फक्त निषेध करणे हीही मला मवाळ वाटते.
"कच्च्या कांद्यावर बंदी आणावी"
कोणीतरी काहीतरी खाण्यामुळे डिवचलं कसं जातं हे समजत नाही.
मला कच्चा कांदा अजिबात आवडत नाही. गंमतीत "कच्च्या कांद्यावर बंदी आणावी", असंही मी म्हणते. माझ्या घरात कांद्याचा वापर अतिशय मर्यादित प्रमाणात होतो. कधी कोणाकडे पाहुणी म्हणून गेले असता तिथल्या स्वयंपाकात आपण मदत करावी असं मला कर्तव्यबुद्धीपोटी वाटतं. भाज्या चिरून देणे, भांडी घासणे इत्यादी प्रकारची मदत. तेव्हा 'कांदा कापून दे' किंवा 'कांदा कापलेली सुरी, चॉपिंग बोर्ड घासून दे', असं मला म्हटलं तर माझ्या भावना दुखावल्या असं मी म्हणायचं का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अवान्तर
आपल्याकडे काही कल्पना आणि शब्दांचं फारच स्तोम आहे. पावित्र्य, मांगल्य, शुद्धी, सात्त्विक, तामसी वगैरे. साधी आंघोळ, पण मंगलस्नान म्हटलं की कसं पवित्र पवित्र वाटतं. आणि या शब्दांच्या व्याख्यासुद्धा उच्चनीचतेच्या गृहीतकावर ठरलेल्या. (पाण्याअभावी) रोज आंघोळ न करणारे लोक हे अस्वच्छ असण्यापेक्षा अपवित्र, अमंगळ, नीच(जातीचे) वगैरे. आहारसुद्धा सात्त्विक म्हणजे पवित्र. म्हणजे थोडक्यात मिश्राहार अपवित्र. एक दोन वर्षांपूर्वी सिंहगडावर 'जागेचे पावित्र्य राखावे' अशा पाट्या होत्या. त्यातच 'मद्यमांस निषेध' अश्याही काही थोड्या होत्या. का बाबा? मक्याच्या कणसांच्या उरलेल्या बुडख्यांचा कचरा चालतो. त्यावरच्या सालांचा प्रचंड ढिगाराही चालतो. पण हाडं आणि पिसं चालत नाहीत. त्यामुळे म्हणे अमंगळता येते. खुद्द त्या युद्धात लढलेले मावळे हयात असते तर त्यांनी डोक्यावर हात मारून घेतला असता. 'शांतता आणि स्वच्छता राखा' असं सांगणं वेगळं. पण पावित्र्य?
मध्यन्तरी एका नाट्यगृहाच्या मंचावर (नाटक नसलेल्या दिवशी) कोणी सामिष जेवणाची पंगत ठेवली. दुसर्या दिवशी वर्तमानपत्रांत बातम्या: मंचावर धिंगाणा. नटराजाची विटंबना. ही सभागृहं नाटकाव्यतिरिक्त इतरही वेगवेगळ्या कारणांसाठी भाड्याने घेतली जातात. (सभा, सेमिनार, बैठकी वगैरे) तेव्हा सभागृहात आणि मंचावरसुद्धा खाणं घडतं. ते शाकाहारी असेल तर काही बिघडत नाही. मात्र मिश्राहार? छे छे. पावित्र्यभंग झालाच.
भारतात प्रथिनकुपोषणाचं प्रमाण जास्त आहे असं सांगतात. सध्या डाळीपेक्षा चिकन स्वस्त आहे असंही वाचनात येतं. तरीही मांसाहार हा उपाय म्हणून सांगितला जात नाही. बहुसंख्य आहारतज्ञ हे (कदाचित अलीकडेपर्यंत एका विशिष्ट स्तरातून आल्यामुळे असेल) रुग्णाला कोलेस्टेरॉल वगैरे इतर काही आजार नसताना प्रथिनांसाठी साधं स्वस्त अंडं सुचवत नाहीत. खुद्द मिश्राहार्यांना देखील मांसाहाराबद्दल अपराधीपणा वाटतो. हा न्यूनगड पिढ्यानुपिढ्यांच्या अपप्रचारातूनच आला आहे. टीवी मालिकांतून, चित्रपटांतून मांसाहार फारच दुर्मीळ प्रसंगांत दाखवला जातो. साहित्यातही मिश्राहाराला स्थान नाही. नाही म्हणायला बंगाली साहित्यात मात्र त्याचा नि:संकोच उल्लेख असतो.
मांसाहार तामसी असतो हे असंच एक घिसंपिटं तर्कट. अनेकांनी अनेकदा मुद्देसूद प्रतिवाद करूनही लोकमानसात ही भावना आहेच. अगदी भारतीय ऋषिमुनी, संस्कृत नाटककार, महान चक्रवर्ती शककर्ते राजे, इतकंच काय भारतीय किंवा भारतीय वंशाचे नोबेल विजेता हे बहुसंख्येने मिश्राहारी आहेत हे अनेकदा सांगूनही मांसाहार हा लोकांना निम्न दर्जाचाच वाटतो आणि आपण असे निम्न नाही हे दाखवण्याच्या धडपडीत आहारसवयी लपवल्या जातात.
पुन्हा सामाजिक विषमतेवर येणं अटळ आहे. जसजसं मांसाहारी लोकांकडून सांस्कृतिक योगदान वाढेल, त्यांच्यातली त्यांच्या कलाकृतींच्या आस्वादकांची संख्या वाढेल, तसतशी बाजारन्यायानुसार मांसाहाराला सांस्कृतिक प्रतिष्ठा प्राप्त होईल असं वाटतं.
तुम्ही अतिच मार्मिक लिहिता.
तुम्ही अतिच मार्मिक लिहिता. मग हिरिरिने भावनांना हात घालायला येणार्यांची किती पंचाईत होते? या असहिष्णुतेबद्दल तुमचा निषेध!
+१
अतिशय उत्तम प्रतिसाद.
अतिशय विचारी प्रतिसाद असतात
अतिशय विचारी प्रतिसाद असतात आपले, राही. फॅनक्लबात घेणे अवश्य करावे.
___
इथे मी फॉलो करणारे, इतके फॅनक्लब्स झालेत की २४ तास अपुरे पडतायत तेजा**
लोकांच्या भावना दुखविल्या वर
लोकांच्या भावना दुखविल्या वर ते काय करतात, हे विचार स्वतंत्रांच्या पुरस्कार करणार्यांनी एका निरर्थक प्रतिसादाला झाकून दाखवून दिले.
आता ज्या उत्तर प्रदेशात गो वधावर बंदी आहे, तिथे गेल्या ३-४ वर्षांत अवैध गोहत्याच्या घटण्यात किती वाढ झाली (मी सांगत नाही RTI करून विचारून घ्या). शासन यावर काहीच उपाय करीत नाही, (वोट बँकची चिंता असल्यामुळे). मग अफवा या उठणारच.
रुची ताईना बीफ खायला आवडत असेल, पण ही योग्य वेळ आहे का? हाच मुद्दा मी उपस्थित केला होता. पण सार्थक उत्तर देण्याएवजी, प्रतिसादाच झाकला. जर स्वत:ला शिकलेले म्हणणारे पुरोगामीच जर असहिष्णुता दाखवितील तर, सामान्य अशिक्षित किंवा कमी शिकलेली ग्रामीण जनतेकडून सहिष्णुतेची अपेक्षा करणे व्यर्थच नाही का?
धागाकर्त्याला विरोधासाठी बीफचा पदार्थ आताच टाकण्याची काय आवश्यकता. २-३ महिन्यानंतर हि पाककृती टाकता येऊ शकत होती. चर्चा आणि लेख इतर मार्ग हि होते.
माझ्या वैचारिक स्तर बाबत: माझे बालपण गंगा जमुना संस्कृतीत जुन्या दिल्लीत गेले आहे. आमच्या राशन द्कानादरा पासून शिंप्या पर्यंत सर्व मुस्लिमच होते. आजोबांच्या काळी घरात एक नौकर हि मुसलमान होता. माझे कित्येक मित्र हि मुसलमान होते. आत्ता हि आहेत. माझा आवडता कवी हि 'अमीर खुसरोच' आहे. या घटनांमुळे जेवढे दुख: मला होते, तेवढे तरी तुम्हाला होणे शक्य नाही.
आपल्या भावना समजतायत, तिकडचा
आपल्या भावना समजतायत, तिकडचा मुद्दाही समजतोय. आपल्यालाही रोचक, धाग्यालाही ५/५ .... हाकानाका
तुम्हीच का?
हा खालचा प्रतिसाद देणार्या तुम्हीच का?
-Nile
माझे बालपण गंगा जमुना
या ओळींसाठी ते "रोचक" आहे हो.
.
हे चक्क निरर्थकच्च आहे.
प्रतिसादाचं दुःख किती आणि मनुष्याच्या जीवाचं किती?
एका माणसाचा खून झाल्यानंतर काही पाककृती लिहिणं हे असहिष्णू आहे! एक प्रतिसाद झाकला (काढला नाहीच आणि कमी थ्रेशोल्ड असणाऱ्यांना तर तो दिसणारच) तर तुम्ही एवढा तळतळाट व्यक्त करत आहात, पण मनुष्याचा जीव जाणं ही घटना तुम्हाला पाककृती लिहिण्यापुरतं महत्त्व देण्यासारखी वाटत नाही.
महाराष्ट्रात बीफबंदी लादल्यानंतर हा धागा, ही लेखमाला आली नाही. मनुष्याचा जीव गेल्यावर लेखमाला आली, आणि तुम्हाला प्रश्न पडतो, हीच वेळ योग्य आहे का? शक्य असेल तर मार्टीन निमलरची ही कविता वाचा. काही समजलंच तर "हीच वेळ योग्य आहे का" असे निरर्थक प्रश्न येणार नाहीत. (होय, मी तुमच्या वरच्या प्रतिसादाला निरर्थक म्हणत्ये.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कविता एकदम अतिशय १००% चपखल
कविता एकदम अतिशय १००% चपखल बसते आहे.
पण ही योग्य वेळ आहे
रामाने सीतेला शोधायला जायची आणि रावणाशी युद्ध करण्याची कुठची वेळ योग्य होती?
पांडवांनी शमीच्या झाडावरून शस्त्रं काढून हातात घेण्याची कुठची वेळ योग्य होती?
माझ्या मते योग्य वेळ कोणती हे प्रत्येकाने आपापल्या आतल्या आवाजावरून ठरवावं. त्यामुळे तुमच्यासाठी योग्य वेळ नसेल कदाचित, रुचींसाठी असेल. ती वेळ योग्य का वाटते हेही त्यांनी समजावून सांगितलेलं आहे.
तुमच्या प्रश्नातून मला एक असा सूर जाणवतो की काहीतरी गंभीर गोष्ट घडलेली असताना तिचा गाजावाजा करू नये. विशेषतः आपल्या तथाकथित संस्कृतीच्या विरोधात जाणारांनी करू नये. हाच सल्ला गे व्यक्तींनाही दिला जातो - की तुम्हाला काय हवं ते करा ना, पण गाजावाजा का करता? गाजावाजा करणं हे बहुसंख्यांकडून अल्पसंख्यांकांवर अन्याय होत असताना आवश्यक असतं. या विशिष्ट बाबतीत तर हे खूपच लागू आहे. बीफबंदी ही बहुसंख्येच्या जोरावर लादली गेलेली आहे. आता लोकशाही पद्धतीने झाल्यामुळे त्यावर तक्रार करणं कमी महत्त्वाचं वाटेल कोणाला. पण एका व्यक्तीचा जमावाने केवळ संशयावरून ठेचून मारून खून केला की तो अन्याय असतो, आणि त्या अन्यायाविरुद्ध त्या च्या त्याच वेळी बोलणं आवश्यक असतं. प्रत्येकाची बोलण्याची पद्धत वेगळी, विरोध करण्याची पद्धत वेगळी. मात्र विरोध हा केलाच पाहिजे.
कोठे बरे ऐकले आहे हे?
http://rationalwiki.org/wiki/Friend_argument
Hello darkness, my old friend
हेच्च डोक्यात आलं होतं. साच्याबरहुकूम सारं काही!
अवांतर - वेलकम बॅक
शुभेच्छा
अवान्तर : प्रकटदिन मुबारक.
नील साहेब मी 'मूर्खतापूर्ण
नील साहेब मी 'मूर्खतापूर्ण प्रतिसाद देत नाही.
उत्तर प्रदेशात गोहत्या बंदी आहे. तरी तिथे मोठ्या प्रमाणावर गोकशी सुरु आहे. जर गोकशी थांबविणे शक्य नाही आणि त्या वरून वातावरण बिघडतंय. तर बंदी ठेवण्यात अर्थ नाही. पण सत्ता जाण्याची भीती वाटते, म्हणून तेही करता येत नाही. वोट बँक साठी 'गोकशी' करणार्यांवर सख्त कारवाई करणे पण शक्य होत नाही. मजबूरीने त्यांना हि संरक्षण द्यावे लागते. कुठल्या हि बाजूने काही कठोर पाऊले उचलल्यास 'बहेनजी' सत्तेवर येण्याची भीती वाटते. गोरक्षकांवर 'तस्करांचे' हल्ले होतातच. (त्यांचा जीव गेला तरी कुणाला हि दुख होत नाही, कारण दुख व्यक्त केल्यास प्रतिगामी ठप्पा लागू शकतो). अश्या संशयित परिस्थितीत अफवा पसरतात आणि त्यावर लोक विश्वास ठेवतात.
शेवटी, राजेश साहेब मी या परिस्थितीत 'पाककृती' याच समयी देणे योग्य आहे का हा प्रश्न केला होता. पण माझा मुद्दा कुणालाच समजला नाही, त्याचेच दुख आहे. इथे एका माणसाचा जीव गेला. सारासार परिस्थितीचा कुणी विचार केला का?
>>मूर्खता<< असं काही
>>मूर्खता<<
असं काही म्हणायचं नाहीय. आक्षेप फक्त जाड ठशात पुरोगाम्यांना बोल लावण्याला, त्याच त्याच गोष्टी रेटण्याला होता. तुम्हाला जशी ही अभिव्यक्तीची एक तर्हा वाटते तशीच त्या हत्येचा निषेध आपल्या परीने व्यक्त करण्याचा रुची यांची ही तर्हा आहे. याला वेळ काळ काय असणार? सगळा प्रकार पाहून उद्विग्न जसं तुम्हाला वाटतं, तसंच इतरांनाही वाटतं. गोरक्षक असोत किंवा गोभक्षक असोत, कुणी कुणाच्या जीवावर उठणं चुकीचं आहे. त्यात कसलं आलंय पुरोगामित्व आणि प्रतिगामित्व! या लेखांत लोक तात्काळ चवताळून उठतील असा कोणताही प्रक्षोभ भडक माथ्याने व्यक्त केलेला नाहीय. किंवा ज्यांचे फलक लावून दोन जमाव तलवारींनी दंगली करतील अशी कुठलीही वाक्ये जाड ठशात किंवा कशीही पेरलेली नाहीत. हेच इतर प्रतिसादांना लागू आहे. राहीजींचे प्रतिसाद चिंतनीय आहेत. बहुतांशांना पोळ्या भाजून काडीचाही फायदा नाहीय किंवा काड्या पेरून द्यायच्याच नाही आहेत.
तुम्हाला दुसर्या अंगाचे म्हणणं मांडायचं असेल, यामागच्या अर्थकारणाचं, राजकारणाचं विश्लेषण करायचं असेल तर बिनधास्त तुम्ही लिहू-मांडू शकता. तुमचा मुद्दा समजला नाही याची खंतही व्यक्त करू शकता. शिवाय पाककृती हा तुमच्या आवडीचा प्रांत आहेच. पण प्रतिकिया द्यायची तुमची पद्धत वेगळी असू शकते, हे इथं कुणालाही मान्य व्हावं.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
मुद्दा इतरांची खाद्य संस्कृती स्विकारण्याचा
मला वाटतं, मुद्दा मांसाहार वा गोमांस भक्षणाचाही नाही. मुद्दा इतर समाजाची खाद्य संस्कृती स्विकारण्याचा आहे. दादरीची घटना निमित्त होतं. दादरीच्या अगोदर मुंबईत दहिसर परिसरात एका जैन सोसायटीत मांसाहार करणार्या रहिवाश्याच्या घरावर झालेला हल्ला, ही सुद्धा अशीच एक घटना. त्यामुळे 'दुसर्यांची खाद्य संस्कृती जरी आपल्या तथाकथित भावनांच्या विरुद्ध असली तरी ती स्विकारणं' हा विचार जनमानसात पोहचणं गरजेचं आहे. "मी गोमांस भक्षण करत नाही, पण माझ्या बाजूला बसून कुणी ते करत असेल तर माझ्या भावना दुखावण्याचे कारण काय?" आणि हा विचार मांडण्यासाठी कुठली एखादी वेळ योग्य-अयोग्य अशी असू शकेल?
आमच्या लंच ग्रुप मध्ये एक जैन मुलगी होती. सुरुवातीला ज्यादिवशी ग्रुपमधले काही जण मांसाहर करत त्या दिवशी ती वेगळ्या बाकावर जाऊन जेवायची. पण एक-दोन वर्षात जग फिरल्यावर थोडी उदारमतवादी झाली. ती अजूनही शाकाहारीच आहे पण बाजूला कुणी मांसाहार करत असेल तर तिला आता काहीच आक्षेप नसतो. ग्लोबलाझेशनच्या युगात, बिफ (हो आणि पोर्क सुद्धा) हे जगात बर्याच ठिकाणी खाल्ले जाते हे सत्य स्विकारण्याची गरज आहे.
भावनाच पकडून ठेवायच्या असतील तर वाद घालून काही फायदा नाही.
याच्याशी कोणी असहमत असेल असं
याच्याशी कोणी असहमत असेल असं वाटत नाही.
पण इथे ज्यांनी आक्षेप घेतलेत त्यांचे आक्षेप 'अशा पाककृतींची मालिका प्रकाशित करणे हा निषेध करण्याचा योग्य मार्ग आहे का' या धरतीचे आहेत. ( असा धागा आणि प्रतिक्रिया वाचून माझा झालेला समज आहे.)
मनसेने पर्युषण कालात जैन मंदिरांसमोर कोंबड्यांच्या माळा टांगणे किंवा चार्ली हेब्दो नंतर महंमदाची कार्टून काढण्याची जाहीर स्पर्धा घेणं यात आणि या वरील मालिकेत फरक आहे का?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
माफक अवांतर
मनसेने खरोखरच असा अभिनव निषेध नोंदला असेल, तर मला त्यांच्या कल्पकतेचं अतिशय कौतुक वाटतं आहे. पर्युषण म्हणजे आसपासच्या सगळ्या लोकांच्या व्यवहारांवर बंदी घालणं नक्की नसणार. स्वतःवर नियंत्रण ठेवणं हाच अर्थ असणार. मग देवळासमोर कुणी कोंबड्या टांगा, नाहीतर सोललेले साप टांगा. ज्याला खरं व्रत करायचंय त्याला फरक का बरं पडावा?
स्पर्धेबद्दलः हेब्दोनंतर कुणी असं केलं असेल, तर त्यांचंही अर्थात कौतुकच आहे (पण ते कोंबड्यांपेक्षा बरंच जास्त आहे, कारण तो अक्षरश: जिवावर उदार होऊन केलेला अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आविष्कार आहे.)
भावना दुखावणे हा मुळात कुणाच्याचसाठी बचावाचा मुद्दा असता कामा नये. जे काय बोलायचं, ते थेट भौतिक बाबींवर बोला. भावनांसारख्या मोजता न येणार्या गोष्टी वापरता येणार नाहीत, स्वारी. मग जैन असोत, मुसलमान असोत की हिंदू असोत. पूर्णविराम.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
सहमती.अजूनही एका बाबतीत
सहमती.
अजूनही एका बाबतीत पुन्हा पुन्हा अनुभवलेले वाद नोंदते. मासे. माशांना एक विवक्षित असा वास असतो. ओल्या मासळीला येणारा, सुक्या मासळीला येणारा, मासळी शिजवताना येणारा आणि मासळीसाठी वापरले जाणार्या तीव्र मसाल्यांना येणारा - असे निरनिराळे तीव्र गंध असतात. सुक्या मासळीचा वास तर ज्याला दर्प म्हणावा, असा असतो. अनेक शाकाहारी लोक या वासाबद्दल तीव्र आक्षेप नोंदवतात. "बाकी काही त्रास नाही, पण वासामुळे उमासे येतात, त्यामुळे चालतच नाही" असा त्यांचा दावा असतो. या दाव्यात कितपत तथ्य आहे? मलाही अनेक तीव्र वासांचा त्रास होतो. देवापुढे लावलेल्या काही भणभणत्या वासाच्या उदबत्त्या, काही विशिष्ट गोड-घमघमाट असलेले सुगंध (डिओडरन्ट्स आणि पर्फ्यूम्स), काही विशिष्ट वासांचे साबण, काही विशिष्ट घरांतून येणारा लोणी कढवल्याचा वास (बहुधा हे लोणी/साय साठवून मग कढवण्याची पद्धत असेल, आणि स्वच्छतेच्या पातळीत थोडाफार फरक असेल, तर हा वास खमंग न उरता अतिशय तीव्र आणि त्रासदायक (माझ्यासाठी!) असतो), काही जण हौशीनं मेणाबिणाची फुलं बनवतात तेव्हा येणारा मेण वितळल्याचा वास, मोहरीच्या तेलाचा वास... यांचा मला अतिशय त्रास होतो. डोकं उठतं. कधी कधी उमासे येतात. मग मी या वासांसकट येणार्या सगळ्या लोकांना माझ्या ठरावीक परीघात येण्याची किंवा त्या त्या क्रिया करण्याची बंदी करायची का? वास ही सवयीनं कमी त्रासदायक वाटणारी गोष्ट आहे, याकडे काणाडोळा करून शक्यतोवर माझं भवताल या वासांपासून 'पवित्र' राखायचं? त्यासाठी वाद-माफक ओरडा करायचा?
की मी त्या वासाकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करायचा? मी त्याकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करते. कारण काही अॅलर्जीसारखे प्रकार वगळत बरेचदा वास सवयीनुसार वाकवता-वळवता येतात, हे मला ठाऊक आहे. तसंच हे वास मला त्रासदायक असले, तरी त्या त्या लोकांसाठी त्या त्या क्रिया करताना ते अपरिहार्य - कधी आनंदाचेही - असतात हे मला माहीत आहे. खेरीज, कितीही तीव्र झाले, तरी वास अगदी प्रचंड मोठ्या आवाजानं-गदारोळानं होऊ शकते, तेवढीही शारीरिक हानी करू शकत नाही; हेही सत्य आहे.
सगळे शाकाहारी लोक अशी सहिष्णू भूमिका का घेऊ शकत नाहीत? आपली 'उच्च नैतिक भूमिका' त्यांना सोडता येत नाही, की आपल्या पानात कुणीतरी मांसाहार बळंच आणून टाकेल, आपल्याला भरवेल, आपण वासानंही विटाळले जाऊ, अशी त्यांना भीती वाटते?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
विरोधी विचार मांडण्याची पद्धत
माझं मत या बाबतीत थोडं वेगळं आहे.
मला वाटतं, आपले विरोधी विचार मांडण्याची पद्धत असते. "जैन मंदिरांसमोर कोंबड्यांच्या माळा टांगणे" किंवा "चार्ली हेब्दो नंतर महंमदाची कार्टून काढण्याची जाहीर स्पर्धा घेणं" ह्या पद्धती मला अती टोकाच्या वाटतात. (त्या चुकीच्या की बरोबर ते मला माहीत नाही). त्यामुळे विरोधी विचार रुजण्याऐवजी, एकमेकांत अजून विसंवाद होण्याची शक्यता अधिक. पण ज्या पाककृती इतरत्र आधिच प्रसिद्ध झाल्यात त्यांचं संकलन करून पुन्हा एकदा मांडण्याची पद्धत त्यामानाने नक्कीच तितकी टोकाची नाही. (उलट मला तर ही पद्धत सुसंस्कृतच वाटते, कदाचित इतरांना ती वाटणार नाही). धागा वाचायचा की नाही हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.
ताई, पुढचा भाग आणा की हो...
ताई, पुढचा भाग आणा की हो...
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
+१ इथे खायला नाही मिळाले तरी
+१
इथे खायला नाही मिळाले तरी बघाय-वाचायला तर मिळेल!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
एक प्रतिक्रिया
नमस्कार, आमच्या एका स्नेह्यांना आपली पाककृती पाठवली. त्यांच्या प्रतिकिया इथे चिकटवत आहे –
“पदार्थ खूपच रुचकर आणि स्वादिष्ट होता – मिसेस फडणवीस”
वरील प्रतीक्रेयाचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी (मृत प्राण्याशी असला तरीही) संबंध नाही.
--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life