देशाचा अर्थ काय?
देशात असहिष्णू वातावरण नाहीच असे अनेकजण ठासून सांगत आहेत. आणि त्याच वेळी देशातील असहिष्णू वातावरणामुळे देश सोडून जावे असा पत्नीच्या मनात विचार आल्याचे तिने बोलून दाखवले एवढे सांगणाऱ्या नटाच्या घरासमोर हिंदुत्ववाद्यांची निदर्शने झाली, बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली हे नेमके कशाचे द्योतक आहे?!
देश म्हणजे काय याचा विचार करू. देश म्हणजे एक विवक्षित भूमी... तिचे सौंदर्य, तिथल्या नद्या-जलाशय, तिथला समुद्र, तिथले स्थापत्य, तिथले रस्ते, तिथल्या वस्त्या, तिथले पर्वत, तिथले झाडे, तिथली फुलेफळेप्राणीपक्षी, तिथले अन्न; देश म्हणजे त्यातील अनेकानेक लोकसमूह, त्यांचे पेहराव, त्यांचे उत्सव, त्यांचे वैविध्य, त्यांच्या सवयी; देश म्हणजे त्यात असलेले अनेकानेक विचारांचे, मूल्यांचे प्रवाह,देश म्हणजे देशाचे राजकारण, समाजकारण आणि तेथील धर्मकारणही...
आणि तरीही हे संपूर्ण नाहीच. या सर्वांच्या मध्यात व्यक्तीव्यक्ती आणि कुटुंबे आपल्या स्वतःसाठी एक सुरक्षित, सुखद अवकाश शोधतात तो मिळण्याची सर्वात गहिरी शक्यता म्हणजे देश. अनेकदा व्यक्ती केवळ स्वतःसाठीच नव्हे तर आपल्या भावी पिढीसाठी, आपल्या मुलानातवंडांसाठी असा सुखद अवकाश मिळेल का, किंवा आहे त्या अवकाशापेक्षाही सरस अवकाश मिळेल का याचा विचार करतात.
एखादी गावखेड्यात रहाणारी व्यक्ती जेव्हा आपले गाव सोडते तेव्हा ती तिच्यापुरता तिचा देशच सोडत असते. तिला तिथे तिचा अवकाश सुखद होणे कमी झालेले असते किंवा थांबलेले असते. मोठ्या भावनिक तडफडीनंतरच गाव सोडला जातो. तसाच देशही.
आज मी स्वतः विचार करते आहे- की माझी मुले बरी आहेत दूर आहेत ती. आणि त्यांनी इथे परत यावे वगैरे आग्रह मी आईच्या प्रेमातूनही धरणार नाही. विशेषतः त्यांना मुलगी झाली तर नकोच त्यांनी इथे यायला असाही स्पष्ट विचार मनात येतो. विवेकनिष्ठांना इथे रहावेसे वाटू नये अशी परिस्थिती तर कायमच आहे. धर्म आणि त्यातून निपजलेले वेडाचार पश्चिमेकडेही आहेत. पण ते इथल्यासारखे अंगावर येत नाहीत. इथे रोज उठून बांगेपासून झांजेपर्यंत, पिंग्यापासून धांगडधिंग्यापर्यंत सारेच लाऊडस्पीकरवर असते. इथे कुणीही कुणाची वेडगळ श्रध्दा दुखवायची नाही म्हणून सार्वजनिक अवकाशात चाललेला गोंधळही थांबवू पाहात नाहीत. उलट ते करतात तर आम्ही का नाही अशी सर्वच समाजाची अहमहमिका दिसते. शेजारच्याने बारशाला लाऊडस्पीकर लावला तर आता साखरपुड्याला आपण डीजेच आणू असल्याच प्रकारातली ही अहमहमिका. त्यांनी लावला तेव्हा तुम्हाला त्रास झाला नाही, तेव्हा का नाही बोललात.
काल एक मत असे मांडले गेले की त्या अमक्या मुसलमानाने आपल्या मुलीला बुरखा खाली घसरला म्हणून ठार केले याबद्दल का नाही ते बोलत, तेव्हा का नाही यांची संवेदनशीलता जागी झाली? हे मत युक्तिवादासारखे पुढे करणारांची बौध्दिक क्षमता बारसं नि साखरपुड्यात स्पर्धा करणाऱ्या त्या लोकांसारखीच आहे. अंशात्मक फरक आहे- वस्तुतः नाही.
या साऱ्या प्रकाराला साठ वर्षे सत्ता गाजवणारांनी पायबंद घातला नाही. ना थांबवल्या सार्वजनिक पूजा, ना थांबवले मशिदींवरचे भोंगे. ना थांबवली कुंभमेळ्यांवरची अमाप उधळपट्टी, ना रोखले हाजयात्रेवरचे व्यर्थ खर्च. गेली साठ वर्षे या देशातल्या राज्यकर्त्यांनी सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली केवळ धार्मिक श्रध्दांचे नको इतके लाड पुरवले. धार्मिक आधाराने वाढणाऱ्या, आक्रस्ताळी बोलणाऱ्या संघटनांनाही अमकातमका समाज दुखावला जाऊ नये म्हणून वाढू दिले.
आपले हिंदुस्थानाच्या अमक्या भागात स्वागत आहे अशा पाट्या विहिंपचे लोक सर्रास लावत होते, मुसलमानांवरचे हीन विनोद शिकवत, द्वेषाची पेरणी करत संघ वाढत होता- पण आम्ही किती चांगले सामाजिक कार्य करते या त्यांच्या मुखलेपाला भुलत त्यांनाही पायबंद बसला नाही. इंदिराबाईंच्या आणिबाणीच्या अतिरेकानंतर जनता पक्षाद्वारे जनसंघाला भारतीय राष्ट्रीय राजकारणात चंचुप्रवेश करू देण्याचे दुष्कर्म कॉन्ग्रेसच्या विरोधातील समाजवादीसाम्यवाद्यांनी केले या राजकीय बावळटपणाला तर देशाच्या इतिहासात तोडच नाही. नंतर पुन्हा एवढ्या बहुमताने सत्ता मिळवूनही काँग्रेसने धर्मवाद्यांचा बाष्कळपणा तसाच चालू दिला. खलिस्तानी चळवळीला मोडून काढण्यात, आसामी क्रोधाला, श्रीलंकेतील वणव्याला विझवण्याची मदत करताना पायाखालचे निखारे मात्र फुलत राहिले. आततायी हिंदू संघटने बहुसंख्येला असुरक्षित वाटायला लावण्यात प्रचारकी सफलता प्राप्त करीत होती हे काँग्रेसच्या नेतृत्वाला जाणवलेच नाही. मुस्लिम आततायी तर सौदीकडे पाहूनच आपले घड्याळ लावत. आणि त्यांच्या मूर्ख वक्तव्यांना लोकशाही व्यवस्थेत ठेचण्याची सोय असतानाही तिकडेही कानाडोळा करायचा असले गचाळ तंत्र काँग्रेसने वापरले. थोडक्यात काँग्रेसने या दोन उग्र संघटनांना ऊब दिली.
संघ आणि त्यांच्या समविचारी किंवा अधिक उग्र अशा पण भाईबंद संघटनांचा रेटा वाढत गेला. एका राज्यात त्यांच्या हाती सर्वंकष म्हणावी अशी सत्ता येताच काय कसं घडू दिलं गेलं त्याची रक्तलांच्छित नोंद तर इतिहासात कायमची रेखली गेली आहे. आणि या गुजरातच्या विकासाच्या फुगवून फुगवून जो प्रचारकी धुरळा उठवला गेला त्यातून साऱ्या देशातून विस्कळित मते एकवटण्याचा प्रयोग यशस्वी झाला.
त्यापूर्वी इथल्या आरक्षणामुळे, इथल्या लांड्यांच्या लाडामुळे देश सोडावासा वाटला असं म्हणणारे कमी नव्हते. त्यांना कुणी देशद्रोही म्हटले नव्हते. आणि अशा तऱ्हेने गेलेल्यांपैकी अनेकांनी या संघटनांची साथ केली आणि करत आहेत. त्यांचे इथले सहानुभाव आज देश सोडण्याचा विचार मनात येतो हे बोलून जे चालले आहे त्याबद्दलची केवळ व्यथा प्रकट करणारांवर ज्या हिंसकपणे व्यक्त होत आहेत, कठोर बोलत आहेत ते पाहून विषादाशिवाय मनात काहीच भरत नाही. इथे विकसनाची संधी नाही म्हणून तिथे जाणारे, इथल्यापेक्षा तिथेच चांगले वाटते म्हणून तिथले नागरिकत्व घेणारे किती आहेत हे मॅडिसनमधल्या भक्त आणि विरोधकांच्या, वेम्ब्लीतील भक्त आणि विरोधकांच्या संख्येवरून लक्षात येतेच. त्यांना कुणीही देशद्रोही म्हणून, इथेच राहून परिस्थिती बदला असे सल्ले देत नाहीत. पण विषादाला शब्द देणाऱ्या अनंतमूर्तींनाही हे विरोधक सोडत नाहीत... हा प्रसिध्द नट तर काय अधिकच सोपा आहे लक्ष्य करायला. त्याच्यावर आग ओकली की आपलेही वलय वाढतेच...
पुरस्कार परत करणारे दांभिक, हिंदुत्वातील हीणावर टीका करणारे हिंदू दांभिक, विरोधाचा सूर लावणारे सारेच दांभिक, भाजपचा पराभव झाला म्हणून आनंद व्यक्त करणारे दांभिक असे बोलणे आता सर्रास या हिंदुत्व सहानुभावींच्या तोंडी रुळले आहे. ही सारी नाझीझम किंवा फॅशिझमचे पदचिन्हे आहेत असे इतिहासाची पाने पाहिलेले लोक बोलतात ते तर खोटे, दांभिक, अनाकलनीय बोलणारेच ठरवले जात आहेत.
काही वर्षांपूर्वी एका शिक्षकांच्या सत्काराला गेले होते. त्यांचे वक्तृत्व, शैक्षणिक कार्य अतिशय उत्तम होते. पण त्यांनी लिहिलेल्या वैज्ञानिक विषयक ग्रंथाचे प्रकाशन करायला आलेले संघाच्या मुशीतून घडलेले एक कायदेपंडित त्यांच्याविषयी बोलताना त्यांची तरुणपणची एक आठवण सांगू लागले. म्हणाले,- अभ्यासवर्ग सुरू होता, आणि एक धिप्पाड, देखणा युवक बोलत होता... त्याच्या कपाळावर अडॉल्फ हिटलरसारखीच एक बट रुळत होती. तेव्हाच मला त्याबद्दल खूप आशा वाटली- की हा तरुण पुढे मागे काहीतरी भव्यदिव्य करणार. पण त्याने शिक्षण क्षेत्र निवडले आणि तिथेही भव्यदिव्य काम केले.
सुचवायचे आहे एवढेच की संघाच्या मऊ कुशीतून, कठोर मुशीतून घडलेले अनेक लोक आपल्यात कुणीतरी अडॉल्फ हिटलर तयार होईल, नॉस्त्रदामसच्या भविष्यकथनातील कठोर नेता तयार होईल या प्रतीक्षेत होतेच. नव्वद वर्षे वाट पाहिली आहे त्यांनी. आणि त्यांना मोदी-शहा जोडी गवसली आहे. त्यांच्यात कदाचित् हिटलर होण्याची इच्छा नसेलही - पण भुतावळीला मात्र तीच प्रतीक्षा आहे. लोकानुनयाच्या राजकारणात - येते तीन दिवस हवे ते करा आम्ही सांभाळू असे सांगून मागे रहाणाऱ्या या नेतृत्वाकडून तसे होणारच नाही याची खात्री नाही. हिंसक उन्माद तर अनुयायांच्या शब्दांशब्दांतून सांडत चालला आहे. शस्त्र धरा, तयारी करा, यांना धडा शिकवा असे सांगणाऱ्या अनेक वेबसाइट्स सुरू आहेत. गोमांस खाणे आणि त्यावरील कट्टर बंदी या विषयावरून नको ते वाद पेटवण्याचा भरपूर प्रयत्न जागोजाग झाला, बळी गेले. तो प्रयत्न एक हत्यार आहे, ते मधूनमधून वापरले जाईलच.
तिकडे मुस्लिम धर्माच्या दहशतवाद्यांनी मूर्खपणाच्या, क्रौर्याच्या सर्व सीमा पार करायला केव्हाच सुरुवात केली आहे. त्यांना खणखणीत विरोध न करणारे आणि व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी करणारे इस्लामचे रूढीप्रिय पाईक या मूर्खांच्या आगजाळीत भरच घालतात.
एकूणात सारीकडचे धर्मवेडे मानवजातीतला गोंधळ अधिकच माजवत चालले आहेत. यात विवेकाचे थोडेथोडे आवाज, त्यांना वाटणारी व्याकुळता याचा गांभीर्याने विचार करण्याऐवजी, भूमिका न घेणारी अधलम्मधलम माणसेही अधिक घाण करीत आहेत. पुढल्या हाका सावधपणे ऐकून इतरांनाही सावध आणि विचारी बनवू पाहाणाऱ्या माणसांना होणारे अधिक्षेप बंद करावे एवढे किमान काम त्यांनी केले तरी खूप झाले.
शिक्षित, नागर आणि थोडीफार संपन्नता असलेल्या समाजाच्या बौध्दिक आळसातून ‘धर्म’संकटाचे ढग अधिकच गडद होतील. आयसिसची काळी छाया आहेच, त्यात आता सर्वधर्मीय अविवेकाची काळोखी नको.
जे समजत नाही असे वाटते ते समजून घेण्यासाठी प्रयत्न करा. प्रतिक्रियांवर मते बनवणे सोडून द्या. मूळ तपासा. हे साधे सांगणे, मागणे.
खेदपूर्वक सहमती.
खेदपूर्वक सहमती.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
एखादी गावखेड्यात रहाणारी
हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. आपला भोवताल, आपला परिसर, आपली पाळंमुळं जिथे रुजली आहेत ती जमीन - या सगळ्यातलं आपलेपण हा देशभावनेचा अर्क असतो. कोणासाठी ते गाव असेल, कोणाचे शहराशी सांधे जुळले असतील, कोणी भाषेशी आपली नाळ जोडली असेल. हे सर्व तोडून टाकण्याचा विचार करण्यासाठी त्या त्या प्रदेशात काहीतरी असह्य असावं लागतं. (किंवा अर्थातच नवीन जगाकडे धाव घेण्याचं आकर्षणही असू शकतं.) आपल्या आसपास असणारं वातावरण बदललं की 'इथे अजून बरंच काही आहे, पण पूर्वीचं काहीतरी राहिलेलं नाही' अशी जाणीव होऊ शकते. बाहेरून पाहाताना 'अशी जाणीव होते म्हणजे तू गद्दार' असं म्हणण्याऐवजी अशी जाणीव का होते याचा शांतपणे आणि सहानुभूतीपूर्ण विचार व्हावा.
उत्कृष्ट लेख
लेखातील भावनेशी सहमत
या परिच्छेदाशी विशेष सहमत.
देशात असहिष्णू वातावरण नाहीच
१) एखाद्या व्यक्तीच्या घरासमोर निदर्शने करणे हे आक्रमक अभिव्यक्तीचे द्योतक आहे. असहिष्णुतेचे नाही.
२) आमिर वर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू करणे (म्हंजे त्याच्याशी व्यक्तिगत, सामाजिक, व्यावसायिक, वाणिज्यिक संबंध न ठेवण्याची मोहिम सुरु करणे) हे कोणतीही एक व्यक्ती जर करत असेल तर ते ती व्यक्ती स्वतःच्या पूर्ण अधिकारात करतच असते. Nobody can be coerced into agreeing to deal with any one specific person. व हे जर एका व्यक्तीसाठी वैध असेल तर व्यक्तीसमूहासाठी अवैध नसायला हवे.
३) आमिर ला थप्पड मारण्याची धमकी देणे - जशी शिवसेनेने दिलेली आहे - हे नक्की असहिष्णुतेचे द्योतक आहे. (शिवसेनेने थेट धमकी दिलेली नाही - त्यांनी थप्पड मारणार्यास इनाम देऊ असे घोषित केलेले आहे.)
----
उर्वरित लेखातील अनेक वाक्यांशी सहमत.
त्यापूर्वी इथल्या
याच्याशी ठार असहमत. निवासी अनिवासी हा वाद जुना आहे. अगदी मराठी संस्थळांवरदेखील खूप उदाहरणं दिसतील.
वाह! लोकांनी बोलून पण असंतोष व्यक्त करायचा नाही का आता? म कसा करायचा?
इतके दिवस भक्त, इंटरनेट हिंदू, मौत का सौदागर वगैरे विशेषणं अनेक लोकांना लागली. लोकं ते इग्नोर करून त्याच्या पुढे जातात. 'ए माला हा अस्सं म्हणाला...' म्हणून रडत नाहीत.
बाकी संघाला श्या घालायला काही हरकत नाही. ते रिग्रेसिव आहेतच.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
केवळ व्यथा प्रकट करणारांवर
उपप्रतिसाद तुम्हाला असला तरी तुमच्या प्रतिसादाविषयी नाही.
आता एक सिच्युएशन पाहू:
बटाट्याच्या चाळीच्या भाडेकरुंची वार्षिक बैठक (उदाहरणार्थच आहे)
सोकाजीनाना त्रिलोकेकर: साला या चालीत नुसती घाण साला. लोक पन रॉटन साला. नो कल्चर. साला बाबलीबाई म्हणत होती की असल्या उकिरड्यात राहण्यापेक्षा चाळ सोडून जाऊया. बाबलीबाई ट्रू बोलते साला.. आमच्या कम्युनिटीच्या पोरांना या घाटी लोकांच्यात फ्यूचरच नाय अन सेफ्टी पन नाय. डर्टी फॅमिलीज साला एकजात. नुस्ता भांडन करते अन बेगरसारखी घाणेरडी राहणारी पब्लिक. साला मी पन म्हंटला चाल सोडायला पायजे साला.
एच्च मंगेशराव: ओ. तुम्हाला काय त्रास झाला हो चाळीकडून आजपर्यंत. चाळीने तुम्हाला सेक्रेटरीपण केलेलं की गेल्यावर्षी.
अण्णा पाबशे: एवढा त्रास आहे तर बिर्हाड आवरा आणि जावा मफतलाल पार्कात राहायला.
आचार्य बाबा: आपण त्रिलोकेकरांची मनःस्थिती समजून घेतली पाहिजे. ते आपले बांधवच आहेत. त्यांनी चाळीच्या सर्व कार्यक्रमांसाठी किती कष्ट घेतले आहेत ते आपण लक्षात घेतलं पाहिजे.
काशिनाथ नाडकर्णी: कसले कष्ट केलंतीत हो या त्रिलोकेकरान्..?? खजिनदार होण्यासाठी धडपड नुसती.. आणि आम्ही कष्ट नाय केले तर काय झोपा काढल्या?
जनोबा रेगे: ए त्रिलोकेकर. गप रे. वशाड मेलो.
गुप्ते: खेचा रे त्याला. याच्याशी इतकी वर्षं चांगले वागलो आणि आमच्याच तोंडावर थुंकतोय. फेका याला चाळीबाहेर.
...
सोकाजी त्रिलोकेकर: साला मी भर्डाचा स्टुडंट हाय. घाबरत नाय. हेडक्लार्कला तापवतो साला.. माईंड युअर ओन बिझनेस म्हणून सांगतो.. तोंडावर.. मी आणि बाबलीबाय कधी चाल सोडून गेलो नाय अन जानार पन नाय. पन साला या चालवाल्या कुत्र्यांनी बघा लगेच कसा भुंकायला बिगीन केला. आय टेल यू.. यू आर प्रूव्हिंग माय पॉईंट साला..सांगून ठेवतो साला..
...............................
या प्रकाराला म्हणतात होलसेलमधे उचकवून लायकी काढणे.
अगदी अगदी
श्रेणी देऊनही भागेना म्हणून.
.
Dark Humor चं उदाहरण जमलंय
अगदी सहमत.
अगदी सहमत.
२०१४ पासूनचे जे सरकार आलेले
२०१४ पासूनचे जे सरकार आलेले आहे त्या निवडणुकांच्या काळापासून- आणि कदाचित त्या आधीच्या काही वर्षांपासून - भाजप/मोदी/संघपरिवार इत्यादि गोष्टींची लाट आलेली होती आणि त्याच बरोबर भाजपपरिवार/नमोभक्त आणि त्यांचे विरोधक यांच्यामधल्या ध्रुवीकरणालाही वेग येत आहे, दोन पक्षांमधली कटुता अधिकाशिक शिगेला पोचते आहे असं साधारण दिसतंय. यातून "पप्पू विरुद्ध फेकू" पासून ते "आमीर खान पाकिस्तान जाव" या कालपरवाच्या वादंगापर्यंतचा इतिहास आणि त्याच्या अधल्यामधल्या असंख्य छोट्यामोठ्या घटना मिडिया आणि सोशल मिडियामधे दुमदुमत आहेत.
या तीव्र मतभेदांमधे सामान्य लोकांना काय वाटत असावे याबद्दल काही अंदाज करावेसे वाटतात ते येथे करावे म्हणतो. या अंदाजांमागे कुणाला मी नमोभक्त किंवा मोदीद्वेष्टा असा वाटलो तर माझा नाइलाज आहे.
- २०१४च्या आधीच्या १० वर्षांच्या काळातल्या केंद्रसरकारच्या राजवटीमधे भ्रष्टाचाराने कळस गाठला आणि याची प्रतिक्रिया म्हणून मोदीलाट अवतरली असं काहीसं अतिसुलभ समीकरण लोकांच्या डोक्यात असावं असा माझा अंदाज आहे. तो कितपत बरोबर आहे ? म्हणजे "मोदींच्या काळात गुजरातेत दंगल झाली व त्यात झालेल्या हत्याकांडामधे संघपरिवारातले हिंसक घटकच नव्हेत तर तत्कालीन सरकारचा सरळसरळ हात होता" हे लोकांनी स्वीकारले आहे आणि तरीही, हा भगवा हिंसाचार - जो कधीकाळी घडला नि त्यामुळे विसरून जाऊया (!) - तो परवडला पण भ्रष्टाचारी यूपीए नको, थोडक्यात अतिभ्रष्ट व्यवस्था विरुद्ध धार्मिक मूलतत्ववाद यात शेवटी मूलतत्ववाद चालेल असं सामान्य जनतेने ठरवल्यामुळे प्रस्तुत सरकार मोठ्या बहुमताने आलेले आहे. हे बरोबर आहे काय ?
- भ्रष्ट व्यवस्थेबरोबर लोकांच्या मनात "सुमारपणा" हा यूपीएच्या बनलेल्या प्रतिमेचा मोठाच भाग होता आणि राहुल गांधी यांचे दारुण अपयश आणि त्यांच्यातल्या नेतृत्वगुणांचा पूर्ण अभाव हा ढळढळीत घटक मोदींच्या राष्ट्रीय पातळीवरच्या उदयाला बळकटी देणारा ठरला हे मान्य होण्यासारखं आहे का ?
- मोदी आणि उजव्या विचारसरणीच्या पोकळपणावर, ढोंगीपणावर, त्यांच्या हिंसक प्रवृत्ती, प्रतिगामी, फाशिस्ट प्रवृत्तींवर कितीही अचूक भाष्य केलं तरी करोडोंच्या संख्येच्या मध्यमवर्गाचं काँग्रेस्/यूपीए बद्दलचं पर्सेप्शन बदलणं होत नाही तोवर, किमान शहरी भागातल्या वर्गावरचा मोदी/भाजपप्रभाव जाणार नाही असं दिसतं. जो सत्तापालट व्हायचा त्याची सूत्रं अजूनही खेड्यातल्या/छोट्या शहरातल्या आणि निम्न आर्थिक-सामाजिक स्तरातल्या लोकांकडूनच हलतील, शहरी/एकंदर मध्यमवर्गीयांमधला "उजवा" प्रभाव दीर्घकाल कायम राहील असं चित्र मला जाणवतं. या अंदाजात काही खोट आहे काय ?
- आणि वर जो अंदाज वर्तवला आहे त्यानुसार, मग प्रागतिक/लिबरल प्रकारचे लोक हे येती अनेक वर्षं अल्पमतातच राहातील आणि त्यांचा आवाज हा क्षीण राहील आणि त्यांच्या त्यांच्या वर्तुळापुरताच मर्यादित राहील असं काहीसं दिसतं. हे कितपत अचूक चित्र आहे? आणि तसं असल्यास उदारमतवादी लोकांचं हे अपयश आहे असं मानायचं का?
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
पूर्णपणे असहमत, फक्त एवढेच
पूर्णपणे असहमत, फक्त एवढेच म्हणेन मोदी आणि संघ अल्पसंख्यक विरोधी आहे, हे पूर्णपणे असत्य आहे. आजकाल 'असहिष्णुता' वाढली (देशात भाजप राज्यात सोडा देशात दीड वर्षात एक हि मोठा दंगा झाला नाही) हे जसे खोटे.
असहिष्णुतेचा कांगावा का होतो आहे, पूर्वगृहीत धारणा सोडून जरा डोके वापरून विचार करा. '(बाकी एकदा मी आमीर खानला प्रत्यक्ष भेटलेलो आहे, त्याची स्वाक्षरी हि घेतली होती).
बाकी एकदा मी आमीर खानला
आहे का हो खरंच असहिष्णु तो?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
परखड लेख
शेवटचा पॅरा अधिक आवडला. "एकूणात सारीकडचे धर्मवेडे .... प्रतिक्रियांवर मते बनवणे सोडून द्या. मूळ तपासा. हे साधे सांगणे, मागणे."
असहिष्णूतेच्या मुद्द्यावरून मतप्रदर्शन करणारे बरेच जण राजकीय भावनेने प्रेरीत असतात हे खरं आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमचं प्रांजळ मत व्यक्त केलंत (कुठल्याही बाजूचे), तर तुम्ही राजकीय भावनेने प्रेरीत आहात असा अर्थ आजकाल आपसूकच निघतो.
मला तर आमिर खान माझ्या
मला तर आमिर खान माझ्या मनातलंच बोलला असं वाटलेलं त्यादिवशी. मलापण माझ्या मुलांची काळजी वाटते. देश सोडून जाण्याचा मात्र विचार नाही. बघूयात काय होईल. इथे जन्मलो आहे इथेच मरू वेळ आली तर. माणुसकीवरचा विश्वास कायम आहे आणि तेच माझ्या मुलांनाही शिकवेन