साहित्यविषयक अफवा आणि लेखनश्रेयातली नीतीमत्ता
'द न्यू यॉर्कर' या नियतकालिकामध्ये हा लेख वाचनात आला - Literary Hoaxes and the Ethics of Authorship : What happens when we find out writers aren’t who they said they were.
लेखातला मुद्दा असा की अनेक गोरे लोक आपण जे नाहीत, ते असल्याचा आव आणून लिहितात. आपण जे नाहीत यात मुख्यतः जन्मदत्त ओळख येते. गोऱ्या वंशाच्या लोकांना इतर वंशाच्या लोकांचं साहित्य वाचायचं असतं. बाजारात ते पुरेश्या प्रमाणात उपलब्ध नाही म्हणून गोरे लोक टोपणनावानं ते लिहितात. ते विकलं जातं. फक्त विकलंच जातं असं नाही, अनेकदा त्या-त्या वंशाच्या, देशाच्या, संस्कृतीचा अभ्यास केलेल्या लोकांनाही ते साहित्य अस्सल वाटतं.

पहिलं उदाहरण येतं ते 'गो आस्क अॅलिस' नावाच्या पुस्तकाचं. आता अॅमेझॉनवर हे पुस्तक अनामिक लेखिकेच्या नावानं विकलं जात असलं तरी प्रताधिकार एका मॉर्मन स्त्रीच्या नावावर आहे. पुस्तक म्हणजे अॅलिस नावाच्या ड्रग्जच्या आहारी गेलेल्या मुलीच्या डायरीची पानं आहेत. अनेकांना शंका आहे की हे लिहिण्याचं काम गोऱ्या स्त्रीनं केलंय, मात्र खपवताना ते अमेरिकी मूलनिवासी मुलीचं म्हणून सांगितलं जातं.
लेखात अशी बरीच उदाहरणं येतात; माजी नाझी सहानुभूतीदारानं आफ्रिकन देशांतला असल्याची बतावणी करून लिहिणं; गोऱ्या अमेरिकी पुरुषानं लॉस एंजेलिसमध्ये मोठ्या झालेल्या मेक्सिकन मुलाच्या मोठं होण्याबद्दल लिहिणं; अशी. अर्नेस्ट लेलर मॅली या कवीच्या नावानं ऑस्ट्रेलियात प्रकाशित झालेली कविता आणि त्यामागची गोष्ट लेखातच मुळापासून वाचा. (शोधण्याची सोपी युक्ती - लेख उघडा आणि पानावर 'Ernest Lalor Malley' हे शब्द शोधा.)
तर अशी भलती ओळख धारण केलेल्या लेखकांच्या लेखनाचं, पुस्तकांचं काय करावं?
लेखाच्या शेवटच्या तीन परिच्छेदांचं हे स्वैर भाषांतर -
आपण जर बार्रीओमधल्या (स्पेनमधला एक प्रांत) अनुभवांबद्दल एखादी कादंबरी वाचायला घेतली, किंवा तिबेटी भिक्खूचं पुस्तक किंवा नवीन कल्पना मांडणारं एखादं साहित्यविषयक (अ)नियतकालिक वाचायला घेतलं, तर काय अपेक्षा धरायच्या हे आपल्याला माहीत असतं. आपल्याला विश्वास ठेवायचा असतो त्यामुळे आपल्या विश्वास ठेवण्यात आपण तुष्ट असतो. लेखन हे अशक्त माध्यम आहे. वाचक आपल्या पूर्वानुभवांसकट येतील यावर ते माध्यम अवलंबून असतं, म्हणून त्याचा सहज फायदा उचलता येतो.
याचा अर्थ हा सगळा खेळ आहे का? हो, एक प्रकारे. साहित्य हा भाषिक खेळ आहे, आणि अफवांमुळे आपल्याला जाणीव होते की या खेळाचे नियम कुठेही लिहिलेले नाहीत - जसं लग्नात बिनचपलांचं गेल्यावर आपल्याला उमजतं की या गोष्टींवर नियंत्रणाचे काहीही नियम नाही. या कृतींमुळे आपली सामाजिक वीण थोडी उसवून ती किती सैल आहे, याकडे लक्ष वेधलं जातं. साहित्यविषयक अफवा समीक्षक आणि सैद्धांतिकांना अपील होतात कारण वाचनाच्या यमनियमांमधला नाजुकपणा अफवांमुळे उघडा पाडतो.
जर हा खेळच असेल तर कोणी लिहिलं आहे, यानं खरोखर काही फरक पडतो का? साहित्याच्या एका म्हाताऱ्या प्राध्यापिकेचा प्रतिसाद होता की आपल्या ओळखीसारखंच लेखनश्रेय ही रचना आहे; त्यामुळे फरक पडत नाही. मिलर ज्याला "the new identitarians" असं म्हणतो त्यांचा प्रतिसाद असा असतो की, लेखकांना माहीत नसलेल्या अनुभवांचे प्रतिनिधी म्हणून आपण त्यांना मान्य करू नये आणि त्यामुळे फरक पडतो. दोन्ही विधानं उचकवणारी आहेत. अस्सलता आणि ओळख या गोष्टी काय आहेत, याचा विचार करायला हे लोक भाग पाडतात. यांनी काय करू नये तर वाचनापासून आपल्याला रोखू नये.
पर्दाफाशानंतरही मुडदा जिताच अशी उदाहरणे
न्यू यॉर्कर लेखात ही वाक्ये वाचली
Exposed hoaxes often have a lucrative zombie afterlife. If the books are popular, it is often in everyone’s interest to continue pretending they’re genuine. They just go on being published.
ज्यू लोकांची एक मध्यवर्ती संघटना जागतिक कट करत आहे, त्या संस्थेची कागदपत्रे म्हणून एक पुस्तक प्रसिद्ध झाले होते (The Protocols of the Elders of Zion)
नात्झी जर्मनीत शाळांमधूनही हे पुस्तक शिकायला लावले होते, म्हणे.
हे कोणीतरी कपोलकल्पित बनवले आहे, हे खूप आधी सिद्ध झाले असले, तरी त्या पुस्तकाचा खप (किंवा तथ्य मानून मोफत वितरण) कित्येक दशके चालूच आहे.
------------------------------------------
कल्पित लेखन आणि इत्थंभूताचे व्यक्तिनिष्ठ पण जास्तीत जास्त इत्थंभूत वर्णन ही दोन टोके काळी-पांढरी अशी वेगळी वाटतात. परंतु त्यांतील मधले करडे क्षेत्र सुद्धा रचना करताना उपलब्ध आहे. या क्षेत्रात आपण नेमके कुठे आहोत, याबाबत आपल्याला काही जाण असावी अशी वाचकाची अपेक्षा रास्त वाटते. विशेषकरून इत्थंभूताच्या तपशिलांच्या आधाराने वाचक काही निर्णय घेणार असेल, तर ही जाण महत्त्वाची. कृतीबाबत "फिक्शन/नॉनफिक्सन" हे लेबल कृतीच्या बाहेर आणि प्रतिभेच्या निरपेक्ष लावले जावे.
म्हणजे कृतीचा अंतर्गत भाग नसलेले लेबल (सुद्धा) असावे
एखाद्या कल्पित कृतीच्या आत कल्पित आख्यात्याकडून "ही कृती कल्पित नाही" असे म्हणण्याची मुभा असते.
"दोन किहोते Don Quixote" लिहिणारा सेर्वांतेस प्रस्तावना-सदृश प्रकरणात "अमुक तमुक अरबी इतिहासकाराने लिहिलेल्या पुस्तकाचे हे केवळ सटीप भाषांतर आहे" वगैरे, म्हणतो. अशी कित्येक कल्पित कृतींची उदाहरणे दिसतील. आणखी उदाहरणार्थ ऑर्सन वेल्सचे "वॉर ऑफ द वर्ल्ड्स्"
अशा प्रकारची कृती-अंतर्गत-वर्णनांची पोटात-पोटात गुंफणही होऊ शकते :
ही तथ्यवार्ता आहे की (ही तथ्यवार्ता आहे की (... (कथानक) ...) )
किंवा
हे कल्पित आहे की (ही तथ्यवार्ता आहे की (... (कथानक) ...) )
यात सर्वात बाहेरच्या विधान बाहेरच्या जगात वापरण्याविषयी टीप आहे, असे वाचकाला वाटू शकते. याचे कारण असे, की अशाच प्रकारच्या पॅकेजमध्ये, अशाच प्रकारच्या भाषाशैलीत बाहेरच्या जगात वापरण्यायोग्य तथ्य वार्तांकने सुद्धा असतात. (पुस्तक, लेख, जाल-पान वगैरे.)
तथ्य वार्तांकन किंवा कल्पित कृती या निर्णयावरून वाचकाला साधारणपणे ठरवतात की "बाहेरच्या जगात याबाबत यथायोग्य कारवाई करावी की नाही?"
"प्रोटोकॉल्स ऑफ झायन"मधील सर्वात बाहेरची ग्वाही आहे की ती तथ्यवार्ता आहे. मग ज्यू लोकांच्या या गुप्त संघटनेचा शोध घेऊन त्यावर कारवाई केली तर (१) निरपराध लोकांना धोका उद्भवेल किंवा (२) सरकारी किंवा वैयक्तिक खजिन्याचा अपव्यय होईल
तर मग कल्पित-कृतीच्या अंतर्गत-आख्यात्याने "ही तथ्यवार्ता आहे" असे म्हणणे निषिद्ध करावे काय? पण कित्येकदा कल्पित-आहे-असे-कळूनही आख्यात्याने असे म्हटलेले वाचायला गंमत वाटते, त्या आनंदाला मुकावे काय?
वाचकाला तो आनंद निर्धोकपणे द्यायचा, तर सेर्वांतेस किंवा ऑर्सन वेल्स यांनी काय करावे?
तर एक जाणवेल की "दोन किहोते" किंवा "वॉर ऑफ द वल्ड्स्"चा आख्याता कृति-अंतर्गत पात्र आहे, त्या पात्राला बाहेरच्या जगात जबाबदारी नाही. सेर्वांतेस किंवा वेल्स बाहेरील जगात जबाबदारी असलेले लेखक/दिग्दर्शक या पात्रापेक्षा वेगळे आहेत.
मी सुचवतो आहे, की कृतीच्या बाहेर, आख्याता-या-पात्राने-लिहिलेले-नव्हे तर लेखक-या-बाहेरच्या-कायद्याने-जबाबदार-व्यक्तीने लिहिलेले लेबल असावे.
या सुचवणीकरिता पुढील वाक्यांत मी आख्याता-पात्राकरिता "()" चिन्हे वापरतो आणि बाहेरील-कायदेशीर-जबाबदार पात्राकरिता एकदाच "{}" चिन्हे
ही तथ्यवार्ता आहे की {ही तथ्यवार्ता आहे की (... (कथानक) ...)}
किंवा
हे कल्पित आहे की {ही तथ्यवार्ता आहे की (... (कथानक) ...) }
अशा तऱ्हेने कल्पित पात्र म्हणू शकेल "ही तथ्यवार्ता आहे" आणि बाहेरच्या जगातील जबाबदार लेखक सांगेल की "हे कल्पित आहे".
परंतु मी वर वापरली तशी "{}" नसली तरी कुठलीतरी चिन्हे समाजमान्य हवीत. नाहीतर आख्याता-हे-कृतीच्या-अंतर्गत-पात्र आणि बाहेरच्या-जगात-जबाबदार-लेखक यांच्या ग्वाहीत गोंधळ होऊ शकेल.
गंमत म्हणून पुनर्लेखन
थोड्या बोलचालीच्या भाषेत लिहायचा प्रयत्न म्हणून गंमत म्हणून पुन्हा लिहितो आहे.
---------------
कधीकधी सांगोवांगीच्या गोष्टीतच एक सांगोवांगीचा गोष्ट सांगणारा असतो. गोष्ट खऱ्या लेखकाच्या कल्पनेतली असली, तरी गोष्टीतला कथा सांगणारा म्हणतो, की "ही गोष्ट खरीच घडली आहे".
गोष्ट खरी तर वाचणाऱ्याला वेगळा उपयोग होतो, खोटी असली तर वेगळा. गोष्ट खोटी असेल, तर मनोरंजन होते. पण गोष्ट खरी असली तर त्यात सांगितलेल्या संधीचा फायदा घेता येतो. त्यातल्या खऱ्याखुऱ्या अपराध्यांना अजून शिक्षा झाली नसेल, तर त्यांना शोधून त्यांचा पायबंद केला पाहिजे. वर्तमानपत्रांचा आणि बातम्यांबाबत पुस्तकांचा हा उपयोग होतो. खोट्या गोष्टींबाबत इतका त्रास करून घेतला तर आपला, समाजाचा वेळ आणि पैसा वाया जाईल.
मनोरंजनासाठी गोष्ट कुठली, आणि खराच उपयोग करण्यासाठी गोष्ट कुठली ते वाचकाने कसे ओळखावे?
लेखकांवर असे बंधन घालावे की "हे खरे आहे" म्हणणारे पात्रच नको? असे बंधन घातले तर मनोरंजन कमी होईल. कारण लेखकाने "हे खरे आहे" म्हणणारे पात्र मनोरंजनासाठी बनवले असते, वाचकाच्या नुकसानासाठी नाही.
एक लक्षात येते की कल्पनेतले गोष्ट सांगणारे पात्र वेगळे, आणि पुस्तक विकून फायदा-तोटा होणारा लेखक वेगळा. पात्राने "गोष्ट खरी आहे" म्हटले तर चालते, पण पुस्तक विकून फायदा मिळणारा लेखक असे म्हणून चालत नाही.
म्हणून पुस्तक बांधणीवर फायदा-तोटा होणाऱ्या जबाबदार लेखकाकरिता अशी एक जागा राखून ठेवली पाहिजे. तिथे जबाबदार लेखकाने सांगितले पाहिजे, की आतली गोष्ट खरी की खोटी. या बाहेर राखून ठेवलेल्या जागेत पुस्तकाच्या आतल्या कल्पनेतल्या पात्राने "हे खरे आहे" असे म्हटलेले नाही, याची खात्री वाचकाला असली पाहिजे.
थोडं विषयांतर
तर सध्याचा मला पडलेला गंभीर प्रश्न असा, की विविध माध्यमातून मोठ्या मोठ्या दिवंगत लेखकांच्या नावानेही आजकाल बरंच लिखाण "पुढे सरकवलं" जातं, जे कदाचित त्यांनी न लिहिलेलं असण्याचीच शक्यता जास्त असते. आता वरिल कविता खरंच शांताबाईंनी लिहिली की नाही हे मी गूगलवर तपासून पाहिल्यावर काही हाती लागलं नाही. शिवाय, कवितेतले अनेक शब्द, वाक्यप्रयोग "पैठणी" ह्या त्यांच्या प्रसिद्ध कवितेशी अतिशय मिळते-जुळते आहेत.
"चंद्रकळेचा हवाहवासा वास" "पदरा-आडून खुसूखुसू" हे अगदी "पैठणीच्या अवती भवती दरवळणारा सूक्ष्म श्वास" "शेवंतीची, चमेलीची आरास पदराआडून हसली" च्या जवळ जाणारे शब्दप्रयोग आहेत. पैठणी आजीच्या आठवणी सांगते, तशीच ही कविता "आठवणीतील चंद्रकळे" च्या आठवणी सांगते.
इतक्या प्रतिभावान कवयित्री, एकदा पैठणीवर लिहून झाल्यावर पुन्हा चंद्रकळेवर तशाच बाजची, त्याच त्या कल्पना मांडणारी कविता का लिहितील? व्हॉट्सअप ने त्यांना मरणोत्तर "संक्रांतीसाठी कविता पाडून द्या ना हो!" असे आवाहन केले असेल काय?
एकीकडे मोठमोठया कवी/लेखकांच्या नावाखाली आपल्याला हवे असलेले काहीही खपवणारे असले संदेश भावनेच्या भरात पुढे पाठवणारी माझीच सुशिक्षित, भरपूर वाचन करणारी वडीलधारी मंडळी आहेत. दुसरीकडे, कदाचित खरोखर शान्ताबाईंनीच ही कविता लिहिली असेलही, ह्यावर विश्वास बसू न शकणारी, कुठल्याच गोष्टीवर पुराव्याशिवाय विश्वास न ठेऊ शकणारी पुढची पिढी आहे. आणि ह्या पुढच्या पिढीला पाठवलेल्या कवितेमागच्या भावना समजून घ्यायची इच्छा असली, तरी त्यातला खोटेपणा अधिक जाचतो आहे.
पुलंनी "कला कसे जगायचे हे शिकवून जाईल" म्हंटलेलं फॉरवर्ड मी निदान १०० वेळा तरी वाचलंय, पण सिनेमा लागल्यावर त्यांच्या नावाने एक चक्क खोटा दिसणारा संदेशही आला होता, तो मी रागाने काढून टाकल्यामुळे इथे देता येत नाही. प्रश्न असा आहे, की खऱ्या लेखकांच्या खोट्या लेखनाचा विधिनिषेध करणं आज अत्यंत कठीण होऊन बसलंय. त्यासाठी जालावर काही ठोस प्रयत्न करायला
शांताबाई
इतक्या प्रतिभावान कवयित्री, एकदा पैठणीवर लिहून झाल्यावर पुन्हा चंद्रकळेवर तशाच बाजची, त्याच त्या कल्पना मांडणारी कविता का लिहितील?
तुमचे म्हणणे या वरील कवितेबाबतीत खरेच आहे यात काहीच दुमत नाही. त्यांनी एकच पैठणी ही कविता लिहीलेली होती हे ही खरेच. मात्र थोडी माहीती म्हणुन असे नमुद करतो की
शांताबाई या ग्रीटींग कार्ड साठी ही मजकुर लिहुन देत असत, महाराष्ट्र टाइम्स ची पत्रं नव्हे मित्रं ही लाइनही त्यांनी लिहुन दिलेली होती. पाडगावकरांनी लिज्जत पापड साठी लिहुन दिलं होतं. वगैरे
तर इतकच म्हणायच आहे की यावरुन अशी दाट शक्यता आहे की की शेळकेंनी जर आज त्या हयात असत्या तर व्हॉट्स अप ला नकार दिला नसता.
आजच्या व्हॉटस अपच्या पेक्षा भेट कार्डांची मजकुरे फार दर्जेदार होती.
कुणीतरी ग्रीटींग कार्डांवर धागा काढायला पाहीजे आर्चीज गॅलरी वगैरे , गिफ्ट टॉइज वगैरे आठवुन उमाळे काढल्यास मजा येइल.
अतुल खत्री ची एक छान कमेंट आहे आर्चिज च्या गिफ्ट अशा होत्या की युज कर के दिखा देना भैय्या
खरंय
शान्ताबाईंनी सुंदर मराठी चित्रपटगीते केली, त्यामुळे मोबदल्यासाठी केलेलं लेखन, हा मुद्दा नाही. उलट, वरील माहिती खूपच रंजक आहे.
निदान प्रख्यात मराठी लेखकांच्या समग्र लिखाणाचा आलेख (बिब्लिओग्राफी) उपलब्ध असावी/ती कुठे असेल, म्हणजे कोणाच्याही नावावर लिखाण खपवणे सोपे जाणार नाही... विकीवर फार काही सापडलं नाही.
जर हा खेळच असेल तर कोणी
नक्कीच. मुळात फरक पडावा की नाही हा प्रश्न वेगळा, त्याबद्दल इथे बोलणार नाही. पण लोकांना फरक पडतो, नक्कीच पडतो. आणि लोकांच्या प्रतिसादावरच लेखन अवलंबून असतं त्यामुळे फरक नक्कीच पडतो. आणि हा खेळच असेल तर ते बुकर, नोबेल, इ. पुरस्कार अशा पुस्तकांनाही दिले जावेत. मग मजा येईल. जर लेखकाचे स्वानुभव वगैरेला महत्त्व नसेल तर हे पुरस्कारबिरस्कार बंद करावेत किंवा पुरस्कार देताना जाहीर करावे की आम्ही फक्त पुस्तक वाचून पुरस्कार दिला, त्यातील मॅटर किती अस्सल/नक्कल याची शहानिशा केलेली नाही. हा डिस्क्लेमर दिल्यावर मग लोकांची प्रतिक्रिया कशी येईल ते पहावे.