सामसूम एक वाट
वाचकासह रचलेली तीनोळी :
सुरुवात करण्यास "*" वर टिचकी द्यावी. पहिली ओळ दिसेल. ओळीतील भावलेल्या कुठल्याही शब्दावर टिचकी द्यावी. त्या शब्दाच्या निवडीनुसार पुढची ओळ दिसेल. मग नव्या ओळीतील भावलेल्या कुठल्याही शब्दावर टिचकी मारून निवडीनुसार अखेरची ओळ दिसेल. कुठल्याही टप्प्यावरून पुन्हा पहिल्या ओळी कडे जायचे असल्यास "*" वर टिचकी मारावी.)
*
सामसूम एक वाट
सामसूम एक वाट
स्तब्ध रात्र स्तब्ध वात
*
सामसूम एक वाट
धामधूम तीच वाट
*
सामसूम एक वाट
वळत चढत डोंगरात
*
सामसूम एक वाट
स्तब्ध रात्र स्तब्ध वात
निश्चळीत काळजात
*
प्रतिक्रिया
सामसूम एक वाट
स्तब्ध रात्र स्तब्ध वात
काजळीत लुप्त ज्योत
प्रतिक्रिया
*
सामसूम एक वाट
स्तब्ध रात्र स्तब्ध वात
सळसळते पिंपळात
प्रतिक्रिया
*
सामसूम एक वाट
धामधूम तीच वाट
लग्नघरी ये वरात
प्रतिक्रिया
*
सामसूम एक वाट
धामधूम तीच वाट
खेळ चालत्या मनात
प्रतिक्रिया
*
सामसूम एक वाट
धामधूम तीच वाट
काळ लावितसे वाट
प्रतिक्रिया
*
सामसूम एक वाट
वळत चढत डोंगरात
सळसळतो नागराज
प्रतिक्रिया
*
सामसूम एक वाट
वळत चढत डोंगरात
धाप लय नि ताल धाप
प्रतिक्रिया
*
सामसूम एक वाट
वळत चढत डोंगरात
कुंद होत निर्झरात
प्रतिक्रिया
*
....
प्रतिक्रिया
कल्पना आवडली
अजून पूर्ण झाली का नाही वाचून आठवत नाही. काही तिनोळ्या आवडल्या, काही थोड्या ओढून ताणून वाटल्या. पण एकूण छान प्रयत्न !
सहमत
प्रयोग आवडला पण, त्यांत कवितेच्या दर्जाकडे थोडे दुर्लक्ष झाले असे वाटते.
हेच म्हणते.
प्रयोग स्वागतार्ह, पण रसनिष्पत्ती झाली नाही.
प्रतिमा
कविता आणि कवितेतल्या प्रतिमा आवडल्या - सामसूम वाट /स्तब्ध रात्र /स्तब्ध वात/ सळसळते पिंपळ या विशेषच.
हायकूच्या मूळ रूपाशी इमान राखण्याचा प्रयत्न दिसतो आहे. मला वाटतं मराठी भाषेसाठी अगदी तसाच फॉर्म वापरू गेल्यास बरीच ओढाताण होते.
हायकू चित्रत असेल /बोलत असेल आणि एक विचार पुर्णत्वास जात असेल तर ते माझ्यादृष्टीने पुरेसे आहे..
केवळ भन्नाट
तिनोळ्या (हायकू किंवा जे काही असेल ते) बद्दल फार लिहित नाही (कारण त्यातले फार काही कळत नाही!).
परंतु, टिचकी मारून वेग-वेगळ्या ओळींचे पर्याय पाहता येणारी आयडिया मात्र भन्नाट! (पेटंट घेऊन ठेवा म्हणतो ;))
आधी त्रिवेणी लिहिणंच इतकं
आधी त्रिवेणी लिहिणंच इतकं मुष्किल त्यात इतक्या छान लिहिल्या आहेत की अतिशय कौतुक वाटतं
आणि 'जालीय' अंक या माध्यमाचा उत्तम उपयोग करून आपल्या प्रतिभेचे हे प्रदर्शन अतिशय स्त्यूत्य वाटले!
बहुतांश रचना आवडल्या
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
फॉर्म
कविता चांगल्या आहेतच- मी फक्त फॉर्मबद्दल बोलत होतो, कृपया गैरसमज नसावा...
वा!
सुनील यांच्याशी सहमत. त्रिवेणी रचनाही आवडल्या.
थोडे अवांतर -
आदल्या ओळीत येणार्या शब्दांवरून जाणता-अजाणता आपण येणार्या ओळीबद्दल काहीएक ठोकताळे बांधत असतो. त्यातल्या विविध पर्यायांचं हे दृश्य रूप म्हणता येईल. इथे अर्थात हा परस्परसंबंध अधिक स्पष्ट करणे, हा (एकमेव नसला तरी, एक) उद्देश असल्याने - आधीच्या ओळीतील शब्द आणि पुढची ओळ - यांच्यातला संबंध बर्यापैकी स्पष्ट आहे. मात्र कधी कधी कवी पुढल्या ओळीत एखादा अनपेक्षित शब्द योजतो, तेव्हा आपला चुकलेला अंदाजही आनंद देऊन जातो.
याचं पटकन आठवणारं उदाहरण म्हणजे पुलंनी बोरकरांच्या कवितांच्या केलेल्या अभिवाचनात 'घन लवला रे' ही कविता चालीवर म्हटली आहे. त्यातलं तिसरं कडवं 'हरखून जळ हे निवळे रे' या ओळीने सुरु होते. त्यापुढची ओळ 'गगन उन्हाने....' इथपर्यंत आली; की 'पिवळे रे' अशी संपेल - असं (निदान मला तरी) जवळजवळ प्रत्येकवेळा ऐकताना वाटतं - पण त्याऐवजी ती 'उजळे रे'ने संपते. ह्या उदाहरणात कृपया वाङ्मयीन महत्ता वा निकष शोधू नयेत, 'लीडिंग' अर्थात सूचक शब्दांबद्दल धनंजय यांच्या या त्रिवेणीने जे चटकन आठवलं, ते लिहिलं इतकंच.
प्रयोग
प्रयोग छान आहे. पण हा प्रयोग मला वाटतं फक्त तीनोळी, चारोळी यापुरताच यशस्वी होईल.
काही ओळी खूप आवडल्या. काही
काही ओळी खूप आवडल्या. काही तितक्याशा आवडल्या नाहीत.
तंत्रज्ञानात जास्त अडकल्यासारखं वाटलं मला.
"वाचकासह रचलेली तीनोळी' - यातलं "सह" मर्यादित अर्थानेच आहे - म्हणजे दिलेल्या पर्यांयापैकी एक निवडा इतकंच. मला त्या शब्दामुळे असं वाटलं की वाचका"सह" लिहिण्याचा काही प्रयोग आहे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने.
***
अब्द शब्द
प्रयोग प्रचंड आवडला.
प्रयोग प्रचंड आवडला. सुनील यांच्याप्रमाणेच म्हणतो.
प्रयोग आणि प्रयत्न
अनेकांनी या कवितेला एक 'प्रयोग' म्हटलं आहे. ते चूक नाहीच. पण त्यातून काहीतरी मुलखावेगळं केल्याचं चित्र निर्माण होतो. ते अपुरं वाटतं.
आंतरजालावरचं लेखन आणि कागदावरचं लिखाण यात मूलभूत फरक आहे. किंबहुना 'लेखन' हा एकच शब्द वापरावा का? असा प्रश्न पडण्याइतपत जातकुळी भिन्न आहेत. कागदी लिखाण हे माध्यम अर्थातच जालीय लिखित अभिव्यक्तीच्या माध्यमाचा सबसेट आहे. असं असताना जालीय माध्यमाचा वापर करून केलेल्या लिखित अभिव्यक्ती कडे 'मुलखावेगळं' म्हणून बघणं मला अन्यायकारक वाटेल. उलट हा मुलुखच वेगळा असल्यामुळे हे लिखाण 'मुलखाप्रमाणे' आहे. त्यामुळे हा मुलुख व्यापण्याचा प्रयत्न आहे असं म्हणणं मी पसंद करेन.
या दिवाळी अंकाची थीम 'अभिव्यक्तीची आणि ज्ञानप्रसाराची बदलती माध्यमं' अशा स्वरूपाची असल्यामुळे ही कविता अत्यंत चपखल आहे.
प्रत्यक्ष कवितेविषयी - अजून नीट अनुभवलेली नाही. प्रथमदर्शनी मत हे नंदनप्रमाणे झालं.
उर्ध्वमूल
Mathematically, the structure is that of a tree. The first line `सामसूम एक वाट' is the initial vertex of a tree. The reader is asked to choose one of the three branches emerging out of this vertex, each of which ends in a different second line for the poem. Then there are more branches emerging from each of the second level of vertices, and so on. I did not count the total number of possible poems, but it is probably about a dozen.
माझ्या मते हा सगळा प्रकार वाचून झाल्यानंतर वाचकाला या सर्वच्यासर्व कविता अाणि त्यांचे परस्परसंबंध लक्षात यायला हवेत. म्हणजेच या साऱ्या कविता एकाच साहित्यानुभवाचा भाग व्हायला हव्यात, अाणि त्यासाठी अख्खं झाड एकाच वेळी मनासमोर यायला हवं. अर्थात हे होणं-न होणं बरंचसं वाचकावर अवलंबून अाहे, पण तरीही दोन छोट्या सूचना कराव्याशा वाटतात. एकतर कवितांची संख्या थोडी कमी करावी. (यासाठी clicking unit म्हणून शब्द न वापरता शब्दसमूह वापरता येतील. उदा. 'एक वाट' हा एकसंध शब्दसमूह अाहे, तेव्हा त्याला clicking unit म्हणून वापरता येईल.) दुसरं असं की अाधी निवडलेल्या कविता पुसल्या जाणार नाहीत अशी काहीतरी तजवीज हवी. म्हणजे पहिल्या अोळीपासून सुरू होऊन झाड हळूहळू भरत यायला हवं. (अर्थात सूचना करणं मला सोपं अाहे; ते html मध्ये कसं साधायचं ही स्वतंत्र डोकेदुखी अाहे.)
अशासारखा काव्यप्रकार ही अजूनतरी 'सामसूम वाट' अाहे. म्हणजे 'सॉनेट' किंवा 'शार्दूलविक्रीडित' या वाटांवर पावलांच्या, टापांच्या अाणि 4 x 4 च्या खुणांची गिचमिड झालेली दिसते तसं इथे नाही.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
जगात काहीच नवीन नाही!
ही कृती मला वाटली तितकी नाविन्यपूर्ण नाही, असे अधिक वाचता माझ्या लक्षात आले. सदस्य श्रावण मोडकांनी म्हटले आहे की हा प्रकार तीनोळी-चारोळींकरिता तितका चालेल. मलाही सुरुवातीला तेच वाटले होते. परंतु काल-परवाच मला कळले की "गेमबुक" नावाचा साहित्यप्रकार आहे. त्यात प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी वाचकाला पर्याय दिले जातात, उदाहरणार्थ : नायिकेचे कुटुंब नायकाला अनुकूल असावे तर पृष्ठ क्रमांक क्ष वर जा; नसेल तर पृष्ठ क्रमांक य वर जा... रहस्यकथांसाठी गेमबुके लिहिली गेली आहेत.
सदस्य आतिवास म्हणतात की वाचका"सह" रचनेचा अनुभव मर्यादित आहे. काही प्रमाणात त्यांचे म्हणणे पटण्यासारखे आहे. परंतु वाचक आणि रचनाकार यांच्यात असंमिती (एसिमेट्री) असणार हे गृहीत धरावेच लागणार. दोन रचनाकार मिळून कृती करतात, अशी उदाहरणेसुद्धा आहेत - दोन लेखक एकमेकांना कच्चे खर्डे पाठवून एकत्रित पाठ्य तयार करतात. परंतु येथे तसा प्रकार नाही. सदस्य नंदन म्हणतात, त्याप्रमाणे रचना आहे : वाचकाचे स्वातंत्र्य असे की वाटेत फाटा फुटला, तर या बाजूला जावे, की त्या बाजूला, ही निवड करणे. परंतु त्या फाट्यावरची वाट कुठे जाणार याबाबत वाचकाची पूर्वकल्पना अंधुक असते. तरीसुद्धा निवड करण्यातली निर्णयक्षमता कमी लेखू नये. या निर्णयामुळे हळुवार किंवा थिल्लर तीनोळी - अगदी वेगवेगळा आस्वादानुभव मिळू शकतो. तीनोळी असल्यामुळे या कृतीत फार फाटे फुटलेले नाहीत. वाचकाला एक तीनोळी अनुभवण्याकरिता फक्त दोन फाट्यांवरती निर्णय करावे लागतात. जर सात-आठ निर्णय करावे लागले असते, तर वाचकाला निर्णयाच्या स्वातंत्र्यामुळे मिळणारी जोडीदारी अधिक जाणवली असती. नाहीतरी आपले आयुष्य जगताना आपण निर्णय घेतो, पण त्या निर्णयाचे परिणाम आपल्याला अंधुकच वर्तवता येतात. त्याचा नेमका परिणाम जगात काय होईल, ते जगातील अन्य लोक आणि निसर्ग ठरवतात. अशा प्रकारे भविष्य रचण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आपल्यापाशी नसते - जगात काय घडते, त्यात आपल्यापेक्षा अन्य सर्व गाड्याचे निर्णय शेकडो-हजारो पटीने अधिक निर्णायक असतात. तरी आपणही त्या भविष्याची वाट कुठली ते प्रत्येक फाट्यावर काही थोड्या प्रमाणात ठरवतो.
सदस्य जयदीप चिपलकट्टींची इच्छा आहे, की सर्व पर्याय एकत्र दिसण्याची, सर्वांचा एकत्र अस्वादानुभव घेण्याची काही सोय असावी. याकरिता पर्याय कमी असावेत, असे त्यांना वाटते. त्यांचा विचार त्या दृष्टीने पटण्यासारखा आहे. परंतु या प्रकारात वाचकाच्या निवडीमुळे तयार होणार्या तीनोळ्या भावनेच्या दृष्टीने, थिल्लरपणा/गूढपणा/शांतरस वगैरे प्रकारात अतिशय विसंवादी आहेत. त्या एकत्र बघून रसभंग होण्याची शक्यता अधिक. आणि वेगवेगळ्या निवडींमुळे विसंवाद होणे हे या कृतीकरिता अपेक्षित आहे. आयुष्यात प्रत्येक फाट्यावर हे किंवा ते निवडले, तर होणार्या परिणामशृंखला विसंवादी असू शकतात. तीनोळींकरिता मी दिलेल्यापुरते फाटे आणि पर्याय ठीक आहेत. परंतु पर्याय कमी न करता साधारण ५०-१०० पर्याय उपलब्ध असते, तर ते "फंक्शनली" अगण्य झाले असते. कोणीच वाचक सर्व पर्याय अनुभवायच्या भानगडीत पडणार नाही. आणि आपल्या निवडींमुळे आपण बघितलेल्या थोड्याफार रचना त्याच बघितल्या हे स्पष्ट जाणवेल. आतिवास यांना वाचकाचे कर्तृत्व तितकेसे जाणवले नाही, ते ५०-१०० पर्याय असते, तर जाणवले असते.
मला असे वाटते, की सदस्य ऋता-तिरशिंगराव-सानिया यांनी अनेक (बहुधा सर्व) तीनोळ्या अनुभवल्या, आणि त्यांचा एकत्र आस्वाद घेतला तो या मर्यादित पर्यायांमुळेच. यातील काही तीनोळ्या थिल्लर आहेत, त्या आहेतच. परंतु त्या थिल्लर असण्यात वाचकाची निवडही कारणीभूत आहे.
पुन्हा "जगात नवीन काही नाही"बाबत. होर्हे लुईस बोर्हेसच्या "फाटे फुटणार्या वाटांचा बगीचा" कथेत अशा एका कादंबरीचे वर्णन आहे. एका राजवंशाचा इतिहास आहे. त्यात "अमुक-घडले-किंवा-तमुक-घडले-असू-शकते" अशा प्रत्येक फाट्यावर दोन्ही प्रकारे कथानक पुढे नेलेले आहे. अथवा पुंजभौतिकीच्या अमेक-विश्वे इन्टरप्रेटेशनचे असेच काही तत्त्व आहे.
सदस्य अनंत ढवळे म्हणतात की हे हायकूच्या आकृतिबंधाला फारच घट्ट धरू पाहाते. हायकूपेक्षा या रचना कातरलेल्या चारोळीच्या आकृतिबंधाच्या आहेत. शिवाय मात्रावृत्त आणि काही पर्यायांत यमके ही या रचनांमधला "सांगाडा" आहेत.
सदस्य घासकडवी वगैरेंनी केलेले वर्णनही सुयोग्य आहे.
सर्वांचे आभार मानतो.