Skip to main content

शेजारच्या काकूंनी जिवतीचा कागद पुन्हा वापरला.

कडोंमपा, २१ ऑगस्ट.

शेजारच्या काकूंनी पर्यावरणस्नेहापोटी जिवतीचा कागद पुन्हा वापरल्याची बातमी आमच्यापर्यंत पोहोचली आहे.

जिवती

याबद्दल काकूंना अधिक तपशिलात विचारण्याची गरज पडली नाही. काकूंनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे -

"आपण नेहमी फक्त पर्यावरणाबद्दल बोलतो, पण स्वतः काही करत नाही. गेल्या वर्षी करोनाचं संकट आलं तेव्हाच मी ठरवलं की आपण याबद्दल काही केलं पाहिजे. झाडं वाचवली पाहिजेत, कागद कमी वापरला पाहिजे. म्हणून मी गेल्या वर्षी जिवतीचं विसर्जन करून, तो कागद निर्माल्यात टाकण्याऐवजी ज्ञानेश्वरीत ठेवला. आमच्याकडे मोठ्या प्रिंटची ज्ञानेश्वरी आहे. माझ्या सासऱ्यांकरता ती मुद्दाम आणली आहे. चीनी मालावर बहिष्कार म्हणून ते चश्मा वापरत नाहीत. म्हणून मीही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जिवतीचा कागद जपून ठेवला."

"दिवाळीला फटाक्यांना विरोध करणाऱ्या पुरोगाम्यांनाही यातून एक चपराक बसेल. भारतीय सणांवर आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. आता भारतीय सण आणि उत्सवही eco firendly झाले आहेत."

काकूंच्या या फेसबुक पोस्टवर अनेक पर्यावरणस्नेहींनी आनंद व्यक्त केलेला दिसला. हिंदू धर्मच कसा आधुनिक, जागतिक प्रश्नांना तोंड देण्यासाठी सज्ज आहे, याबद्दलही चर्चा सुरू झाल्याचं दिसलं.

मार्मिक गोडसे Sat, 21/08/2021 - 09:28

जिवतीचा कागद पुठ्ठ्याला ( नवीन बनियनच्या पॅकिंमधील बाबांनी जपून ठेवलेला ) चिकटवयाचे काम माझ्याकडेच असायचे. गेले तीन वर्ष हे काम देणे आईने बंद केले आहे, आता तोच कागद पुन्हा पुन्हा वापरते. वर्षभर ज्ञानेश्वरीमध्ये ठेवते.

तिरशिंगराव Sat, 21/08/2021 - 09:55

ज्ञानेश्वरीमध्ये तोच कागद ठेवल्यामुळे पर्यावरणाबद्दलचे ज्ञान ज्ञानेश्वरांपर्यंत पोचेल का ?

'न'वी बाजू Sat, 21/08/2021 - 10:20

आपण नेहमी फक्त पर्यावरणाबद्दल बोलतो, पण स्वतः काही करत नाही. गेल्या वर्षी करोनाचं संकट आलं तेव्हाच मी ठरवलं की आपण याबद्दल काही केलं पाहिजे. झाडं वाचवली पाहिजेत, कागद कमी वापरला पाहिजे.

करोनाचा नि झाडांचा काय संबंध? नाही म्हणजे, झाडे वाचवली पाहिजेत, कागद कमी वापरला पाहिजे, वगैरे सर्व ठीक आहे, पण हे सर्व करोना आले म्हणून काय म्हणून?

म्हणून मी गेल्या वर्षी जिवतीचं विसर्जन करून, तो कागद निर्माल्यात टाकण्याऐवजी ज्ञानेश्वरीत ठेवला.

भारतात टॉयलेट पेपरच्या वापराची पद्धत नाही, हे चांगलेच आहे. अन्यथा, काकूंवरून प्रेरणा घेऊन शेजारच्या एखाद्या काकांना, दररोज टॉयलेट पेपरचे "विसर्जन" करून त्या कागदाची विल्हेवाट लावण्याऐवजी तो कागद कोठे ठेवावा लागला असता (आणि मग - पर्यावरणस्नेहापोटी! - कितीदा तो रोजरोजरोज पुन्हापुन्हापुन्हा - रामारामारामा! - वापरावा लागला असता) ते सांगवत नाही.

"दिवाळीला फटाक्यांना विरोध करणाऱ्या पुरोगाम्यांनाही यातून एक चपराक बसेल. भारतीय सणांवर आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. आता भारतीय सण आणि उत्सवही eco firendly झाले आहेत."

कार्यकारणभाव समजला नाही. (अर्थात, ज्या गोटांतून ही असली थेरे चालतात, तसल्या गोटांत कार्यकारणभाव समजलाच पाहिजे - किंबहुना, मुळात कार्यकारणभाव असलाच पाहिजे - अशी अपेक्षा नसतेच, म्हणा.)

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 22/08/2021 - 02:28

In reply to by 'न'वी बाजू

लोकांना ऑक्सिजनचे सिलेंडर मिळत नव्हते तेव्हा लोक झाडे-लावा-ऑक्सिजन-मिळवा म्हणत होते. 'न'बा, तुम्ही असता कुठे हो!

anant_yaatree Sun, 22/08/2021 - 11:23

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

यावर 188 मिनिटे विचार केल्यावर मला ते पटलं. झाडे लावली तर माणसे जगतील. माणसे जगली तर ती ऑक्सिजन प्लांट चालवतील. ऑक्सिजन प्लांट चालले तर ऑक्सिजन मिळेल. शिंपल

Rajesh188 Sat, 21/08/2021 - 16:42

पर्यावरण ची नासाडी करूनच .
उंच इमारती,गाड्या,विमान,यंत्र,टीव्ही,कॉम्प्युटर,मोबाईल,विविध औषध,वैद्यकीय यंत्र सामुग्री,सर्व ऐश आरामाची साधन बनली आहेत.
त्या सर्वांचा पुरेपूर फायदा घेणाऱ्या लोकांच्या तोंडून पर्यावरण ह्या विषयावर कसलेही मत ऐकलं की डोक्यात तिड जाते.
मग त्या काकू असतील किंवा त्यांच्या शेजारी.

माचीवरला बुधा Sat, 21/08/2021 - 17:38

वरील सर्व “ऐषारामांचा” प्रत्यक्ष उपभोग आणि किमानपक्षी अप्रत्यक्ष फायदा तुम्ही भरभरून घेताय, पर्यावरणाबद्दलही बोलताय, आणि तसे करणाऱ्या लोकांवर टीकाही करताय. वा!

Rajesh188 Sun, 22/08/2021 - 10:02

जिथे आज पर्यंत फक्त बर्फ च पडत होता तिथे ह्या वेळी पावूस पडला आहे.ह्या वर्ष देशभर लोकांना पावसाने चांगलेच फटके दिले आहेत.जग ला पावूस,दुष्काळ,वादळ,पिकांवर कीड,रोगराई ह्यांचे असे झटके आणि फटके बसतील की लोक नको नको सांगितले तरी जबरदस्ती नी स्वतःचे अस्तित्व वाचवण्यासाठी स्वतःच पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्न करतील.
आता फक्त समुद्र किनारी असणाऱ्या शहरांना जल समाधी मिळण्याची सुरुवात होणे च बाकी आहे.
रोगराई ची झलक बघायला तर मिळालीच आहे.

मनीषा Wed, 25/08/2021 - 16:04

असंबद्धतेचा टोन चांगला साधलाय.

जिवतीचा फोटो बघून मला जुने दिवस आठवले..
आमच्याकडे पण जिवतीची पूजा वगैरे असे. तसंही पूर्ण श्रावण महिन्यात काहीना काही असेच.
आमच्या वाड्यात एक बाई येत असे आघाडा, दुर्वा आणि फुले विकायला. डोक्यावर भलीमोठी टोपली घेऊन ती जोरात हाळी देई.
मग घराघरातील बायका, मुली तिच्या भोवती जमा होत. व्हरांडा आणि अंगण जोडणारी जी जागा होती तिथे ती टोपली ठेवून बसत असे.
प्रत्येकवेळी किंमत म्हणून पैसेच द्यावे लागत असे नाही. काही वेळा तेल, तांदूळ, पीठ असेही काही दिलेले चालत असे. काही वेळा तीच सांगे , "आज पैसे नकोत, उलीसं तेल द्या वैनी."
सगळी देणीघेणी उरकली की ती एक फडकं गोल गोल गुंडाळून डोक्यावर ठेवे .. (त्याला काय म्हणतात ते आत्ता आठवत नाहीये), आणि आजूबाजूला जमलेल्या पोरासोरांना म्हणे, "टोपलीला हात द्या जरा.. " मग ती टोपली डोक्यावर ठेवून परत "आघाडा, दुर्वा, फुले घ्या वो माय .." असे ओरडत निघे. ती पुष्कळ दूर जाईपर्यंत तिचा आवाज येत राही.
जिवतीचा कागद बघून हे सारं आठवले..

सामो Wed, 25/08/2021 - 20:19

>>>>असंबद्धतेचा टोन चांगला साधलाय.
+१
या लेखांची मजा कळू लागली आहे. चीनी मालावरती बहिष्कार म्हणुन चष्मा न घालणे म्हणजे अगदी तस्से नाही पण थोडेफार स्वत:चे नाक कापून शेजारच्याला अपशकुन म्हणावे का?
काकू कीबोर्ड वॉरियर दिसतायत.