ऊर्जेची गणिते ४: धोक्याची घंटा - १
कुठचीही थिअरी ही 'निव्वळ थिअरी' किंवा 'हायपोथिसिस' म्हणून सुरू होते. जसजसे तिच्या बाजूचे पुरावे मिळत रहातात तसतशी ती पसरत जाते. प्रथम तिचा पुरस्कार केवळ वैज्ञानिक वर्तुळात, तोही पुरस्कर्त्यांमध्ये होतो. जसजसे पुरावे वाढतात, तसतसे वैज्ञानिक वर्तुळातले विरोधक कमी होतात, आणि मान्य करणारे वाढतात. मग ती हळू हळू जनसामान्यांमध्ये पसरते. या पसरण्याच्या वाटेवर अनेक अडथळे असतात. काही रास्त असतात - म्हणजे त्या क्षेत्रातल्या ज्ञानी व्यक्तींची मान्यता मिळण्यासाठी ढीगभर पुरावे शास्त्रीय पद्धतीने गोळा करावे लागतात. जनसामान्यांमध्ये पसरण्यामागे जे अडथळे आहेत ते ती थिअरी किती कठीण आहे, सामान्य जीवनाशी किती प्रमाणात संबंधित आहे, कोणा उच्च शक्तीचे ती थिअरी पसरण्याविरुद्ध हितसंबंध गुंतले आहेत का या स्वरूपाचे असतात.
'पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरते' या थिअरींचा जनसामान्यांत झालेल्या प्रसाराविषयी हेच दिसून येईल. यात दोन विधानं आहेत. पैकी गोल असण्याबद्दल लवकर एकमान्यता झाली. पण ती सूर्याभोवती फिरते हे मान्य करण्यासाठी अधिक विदा लागला. चर्चनेही अधिक अडथळे आणले. तसंच जनसामान्यांच्या जीवनावर तितका प्रत्यक्ष परिणाम होत नसल्यामुळे या दोन्ही विधानांना पाठिंबा देण्याबाबत लोकांची उदासीनता होती. आता मात्र चौथीतल्या मुलाला हे ज्ञान असतं. तिथपर्यंत प्रगती करायला अनेक शतकं जातात.
त्या तुलनेत 'पृथ्वीचं तापमान वाढतं आहे, आणि त्यासाठी माणूस कारणीभूत आहे' ही थिअरी बघू. शतकानुशतकं जाण्याऐवजी, गेल्या काही दशकांतच तिचा पहिला भाग सिद्ध झाला. अजूनही तापमान वाढण्याचं प्रमाण आणि त्याचे अपेक्षित परिणाम याबाबत एकमत नाही. तुलनेत पृथ्वी गोल आहे - या सिद्धांताबाबत, त्रिज्येचं अत्यंत अचूक मोजमाप शक्य होतं. तापमान वाढीची मोजमाप ही त्रिज्या मोजण्याइतकी सोपी नाही. तसंच तापमान कसं निश्चित होतं याबाबत अचूक थिअरी नाही. त्यामुळे किती भागाला माणूस कारणीभूत आहे, आणि किती भाग आपोआप, नैसर्गिकरीत्या झाला आहे हे अजूनही ठरवता येत नाही. याउलट न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगितल्यावर ग्रहांच्या स्थानांची मोजमापं करून अचूक उत्तर काढणं शक्य होतं. इतकं असूनही पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सर्वसामान्य ज्ञान व्हायला न्यूटननंतरही शेकडो वर्षं गेली.
मग प्रश्न असा येतो, की ही इतकी नवीन थिअरी असूनही त्याविषयी पंचवीस वर्षांत निकाल लागून ती सर्वमान्य व्हावी असा प्रयत्न का केला जातो? हा प्रश्न तांत्रिक वर्तुळांतही पूर्णपणे सोडवला गेलेला नसताना तो हाताशी धरून अनेक राजकारणी लोक सभा गाजवताना का दिसतात? त्याचं कारण असं दिलं जातं, की या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही तर प्रचंड जीवितहानी होईल आणि हवामानबदलामुळे महाभयानक उत्पात होऊन आपल्या वंशजांसाठी पृथ्वी नावाची गोष्ट अस्तित्वातच रहाणार नाही. या गंभीर परिणामांची टूथपेस्ट एकदा ट्यूबमधून बाहेर आली की पुन्हा आत भरता येणार नाही. पण गेली किमान शंभर वर्षं तरी हे तापमान वाढतं आहे. या शंभर वर्षांमध्ये तापमानवाढीमुळे नक्की काय तोटे झाले? या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर सांगता येत नाही. गेल्या शंभर वर्षांत माणसाचं सरासरी आयुर्मान सुमारे दुप्पट झालेलं आहे. बालमृत्यू घटलेले आहेत. याचा अर्थ जो काही तापमानवाढीचा लपलेला परिणाम असेल त्याहीपेक्षा प्रचंड मोठे प्रश्न सोडवले गेले, अन्यथा आयुर्मान वाढताना दिसलंच नसतं.
मग तांत्रिक वर्तुळात पूर्ण निकाल लागलेला नसताना हा विषय सामाजिक वर्तुळात इतका कसा पसरला? याची माझ्या मते दोन कारणं आहेत. एक म्हणजे जुन्या काळपासून सामान्य माणसाला तंत्रज्ञानाबद्दल अढी आहे. माणूस निसर्गापासून दूर जातो आहे, सिमेंट कॉंक्रिटीकरण होत आहे, माणूस निसर्गावर अत्याचार करतो आहे वगैरे बाबत हळहळ आढळते. मर्ढेकरांच्या .... कवितेत ही द्विधा अवस्था खूप छान दाखवली आहे. मनात कुठेतरी गावच्या नदीच्या पाण्याची ओढ आहे, त्याकाळचं मुक्त डुंबणं आठवतं आहे, खुल्या चांदण्याच्या हाका मनात आहेत. पण पुन्हा तिथे जाण्याची भीतीही आहे. 'बरा म्हणून हा इथे दिवा पारवा पाऱ्याचा, बरी तोतऱ्या नळाची शिरी धार मुखी ऋचा' ही अवस्था आहे. काहीशी नाईलाजाची. 'पॅराडाइज लॉस्ट' ही ख्रिश्चन संकल्पनाही त्याच जातकुळीची. ऍडमने कुतुहलाने ज्ञानाच्या झाडाचं त्याज्य फळ खाल्लं आणि देवाचा त्याच्यावर कोप झाला. यातही माणूस देवाच्या आज्ञेबाहेर जाऊन काहीतरी करतो, निसर्गाविरुद्ध जातो आणि आपल्या ज्ञानावर विसंबून काही करतो. आणि हे पाप आहे, या कल्पनेची बीजं त्यात रुजलेली आहेत. सर्वच संस्कृतीत जुन्या कुठल्यातरी शांत, तंत्रज्ञानाने न वेढलेल्या आयुष्याकडे ओढ दिसून यते.
दुसरं कारण जास्त व्यापक आहे. ते म्हणजे कुठच्यातरी भीतीचा बागुलबुवा उभा करणारे विचार नेहमीच चटकन पुढे येतात. अशा थिअरींचे काही विशेष गुणधर्म असतात.
1. एक महाप्रचंड संकट मानवजातीवर येणार आहे अशी सुरूवात असते.
2. येत्या वीस ते पंचवीस वर्षांत त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येतील असा दावा असतो.
3. याची सिद्धता आकडेवारीने केलेली असते. गृहितकं शक्य तितकी वाईटाकडे झुकलेली असतात.
4. आत्तापर्यंत अनेकांनी अशा विनाशाच्या थिअरी मांडल्या असल्या, आणि त्या कदाचित खऱ्या ठरल्या नसल्या, तरी यावेळी मात्र नक्की, कारण आजचा काळ विशेष वेगळा आहे. या स्वरूपाची विधानं असतात.
5. या संकटावर उपाय आत्ताच केला नाही तर अटळ परिणाम होतील आणि ते दुरुस्त करता येणं शक्य नाही असं ठासून सांगितलेलं असतं.
6. संकटावर उपाय करण्यासाठी जगभरच्या सरकारांना अब्जावधींनी पैसे खर्च करण्याचं आवाहन असतं.
7. वीस ते पंचवीस वर्षांनी ते संकट आलं नाही तरी ती थिअरी मांडणारावर त्याचा काही परिणाम होत नाही. उलट योग्य वेळी ज्या काही हालचाली केल्या गेल्या त्यामुळे संकट टळलं असं जाहीर करता येतं.
यातला एक एक घटक आपण तपासून बघू.
महाप्रचंड संकट - गेली कित्येक दशकं मानवाचं जीवन अधिकाधिक सुरळीत, सुरक्षित आणि काहीसं सुखासीन होत चाललेलं आहे. पण त्याची धोक्यापासून रक्षण करण्याची, काळजी करण्याची नैसर्गिक ऊर्मी बदललेली नाही. त्यामुळे आपण एक जमात म्हणून जे काही करतो आहोत त्याचे प्रचंड दुष्परिणाम होणार असं परिणामकारकरीत्या सांगणाऱ्यांचं म्हणणं काळजीपूर्वक ऐकलं जातं. थोडक्यात त्यांना अधिक टीआरपी मिळतो.
वीस ते पंचवीस वर्षात - हा आकडा महत्त्वाचा आहे. कारण येत्या एक-दोन वर्षांत संकट येणार हे सांगितलं तर ते लगेच तपासून बघता येतं. जर अजून दोनशे वर्षांनी संकट येणार असं सांगितलं तर लोकांना इतक्या पुढच्या भविष्याची चिंता वाटत नाही. वीसेक वर्षांची मात्र चिंता वाटते. कारण वाचणारे/ऐकणारे बहुतेक जण अजून वीसेक वर्षं जिवंत असण्याची आशा बाळगून असतात. (टारगेट ऑडियन्स 25 ते 50 वयोगटातला असतो) आणि जे वरच्या वयाचे असतात त्यांना 'आपण आपल्या मुला नांतवंडांसाठी काय जग मागे सोडून जाणार आहोत?' ही भीती घालता येते.
आकडेवारीने सिद्धता आणि गृहितकं - गेल्या काही वर्षांचे आलेख काढून, 'हेच पुढे चाललं तर वीस वर्षांनी असं असं होईल' या पद्धतीची मांडणी असते. तशी मांडणी करण्यात काहीच हरकत नाही, पण हा प्रश्न सोडवण्यासाठी इतर काही मार्ग निघतील या शक्यतेकडे पार दुर्लक्ष केलेलं असतं.
आजचा काळ वेगळा आहे - बहुतेक लोकांना 'सध्याची वेळ किंवा परिस्थिती स्पेशल आहे' यावर ठाम विश्वास बसतो. स्टॉक मार्केटमध्ये चालू असलेली भरमसाठ चढ खूप काळपर्यंत चालू राहील असा अनेकांचा विश्वास बसतो. तीस वर्षांपूर्वी कोणीतरी अशीच भीती घातली होती, ती फोल ठरली याकडे दुर्लक्ष होतं. कारण त्यावेळी ती भीती वाटली तरी आजची भीती ही जास्त भयंकर आहे असंच सगळ्यांना वाटतं.
दुरुस्त न करता येणारे (irreversible) परिणाम - अमुक केलं तर बोटाला जखम होईल असं सांगणं आणि हात कामातून जाईल असं सांगणं यात जमीन अस्मानाचा फरक असतो. त्यामुळे परिणाम हे कायम महाभयानकच असतात. त्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही.
अब्जावधींचा खर्च अत्यावश्यक, आत्ताच्या आत्ता - महाप्रचंड संकटासाठी उपायही तितकेच जालीम आणि महागडे असतात. ते नाही केले तर परिणामांना सामोरे जाण्याची अध्याहृत धमकीही असते. त्यात गंमत अशी की येणाऱ्या संकटाविषयीची गणितं ही जास्तीत जास्त खर्च गृहित धरून केलेली असतात.
संकट आलं नाही तर - माझी काही अनुमानं चुकली असली तरी मूलभूत मुद्दा अजूनही बरोबरच आहे - हे संकट आत्ता नाही तर काही वर्षांनी येईलच असं ठासून म्हणता येतं. दरम्यानच्या काळात अशा धोक्याच्या घंटा वाजवणारांना प्रसिद्धी मिळते, रीसर्च करायला पैसा मिळतो, अनेक सरकारी समित्यांवर मानाची स्थानं मिळतात.
अशा थिअरींमध्ये मांडलेले प्रश्न खोटेच असतात महत्त्वाचे नसतात असं मला म्हणायचं नाहीये. पण ते किती महत्त्वाचे आहेत या बाबतीतला ताळतंत्र अनेक वेळा सुटतो. मर्ढेकरांच्याच भाषेत 'बंब पुकारिन आगीचा मी ज्वलंत या आग्काडीखातर्' या आवेशात प्रश्न मांडले जातात. गावाबाहेर एखादा लांडगा दिसला तर त्याऐवजी हजारोंच्या संख्येने लांडगे येणार आहेत, आणि ताबडतोब हातातली कामं टाकून त्यांच्याशी लढायला या नाहीतर आपली मेंढरंच काय गावातली माणसंही वाचणार नाहीत अशी बोंब ठोकली जाते. दुर्दैवाने अशी बोंब ठोकल्यावर दर वेळी माणसं धावतात, तो एक लांडगा मारतात आणि आपण बोंब ठोकली म्हणूनच एकही मेंढरू मेलं नाही असं स्वतःचंच कौतुक करून घ्यायला तो मेंढपाळ मोकळा होतो.
पुढच्या लेखांत आपण अशा धोक्याच्या घंटा वाजवणाऱ्या काही थिअरींचा अभ्यास करू. नंतर आपण 'पृथ्वीचं तापमान वाढतं आहे, आणि त्यासाठी माणूस कारणीभूत आहे' या थिअरीची त्यांच्याशी तुलना करू.
प्रतिक्रिया
वाचून प्रतिक्रिया देतेच.
वाचून प्रतिक्रिया देतेच. तोपर्यंत
आधीचे तीन भागः
ऊर्जेची गणितं १ : प्रास्ताविक
ऊर्जेची गणिते २: पहिला सोप्पा टेरावॉट
ऊर्जेची गणितं ३ : तापमानवाढ - एक पर्स्पेक्टीव्ह
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
धन्यवाद
पहिले तीन भाग कुठे लिहेले गेले आहेत हे 'सदस्याचे लेखन' मध्ये शोधत होतो. मिळाले नव्हते.
"वॉर्मिंग"
माझा समज :
"ग्लोबल वॉर्मिंग- अर्थात पृथ्वीचं तपमान वाढतं आहे - यापेक्षा "ग्लोबल क्लायमेट चेंज" या घटनेचा अभ्यास केला जातो, तीव्रतर उन्हाळे, तीव्रतर हिवाळे, अधिकाधिक वारंवारतेने घडणारे ओले-सुके दुष्काळ या सार्याचा संबंध उपरोल्लेखित हवामानबदलाशी आहे किंवा नाही याबद्दल पाहणी केली जाते.
तस्मात् "पृथ्वीचे तपमान वाढते आहे किंवा नाही" या (एकेकाळी इतपतच मर्यादित असलेल्या) बाबीपेक्षा अधिक विस्तृत स्वरूपाच्या घटनांचा अभ्यास केला जातो.
चूभूदेघे.
माझा दुसरा समज असा :
कदाचित धोक्याची घंटा वाजवणं अतिरेकीपणाचं असेल, कदाचित त्यामागे (कमिटी सदस्यत्व मिळवणं यासारखा) छुपा अजेंडा असेल. शक्य आहे. पण तरी काही गोष्टी बहुतांशी मान्य झालेल्या आहेत : हवामानात बदल घडत आहेत, प्रदूषण होतं आहे, त्याचे परिणाम (धोक्याची घंटा वाजवण्याइतपत मेलोड्रामाटीक असलेनसले तरी) वाईट आहेत आणि अर्थातच हे सगळं मानवनिर्मित आहे, विशेष करून गेल्या पन्नास साठ वर्षांतल्या बदलांचा तो परिपाक आहे.
याबाबतही चूभूदेघे.
आता काही प्रश्न :
काही गोष्टी ठसठशीतपणे नोंदल्या गेलेल्या आहेत. उदा. ध्रुवांवरच्या आईसकॅप्स वितळत आहेत की नाहीत ? की ही बाबसुद्धा अशीच संदिग्ध - अतएव दुर्लक्षिण्याजोगी - आहे ? या वितळत्या आईसकॅप्सचे परिणाम कदाचित वीसपंचवीस वर्षांत होणार नाहीतही.
म्हणजे या लेखमालेचा मुद्दा "येत्या पंचवीस वर्षांत एखादा घटक परिणाम करू शकत नसेल, तर त्या घटकाला विचारात घ्यायचं कारण नाही." अशा स्वरूपाचा आहे काय ? हीच टाईमफ्रेम पंचवीस वर्षांच्याऐवजी पन्नास वर्षांपर्यंत नेली तर ? पर्यावरणाचे प्रश्न, पृथ्वीच्या भवितव्याचा प्रश्न, मानवजातीच्या भवितव्याचा प्रश्न यांची चर्चा करण्याकरता पंचवीस वर्षांइतपत मर्यादा घालणे आणि त्याच्या पलिकडे विचार करू पाहणार्या ज्ञानशाखांचा अभ्यास रद्दबातल ठरवणे कितपत योग्य आहे ?
असो. पर्यावरणाचा समग्र विचार करणार्या एका मोठ्या प्रक्रियेचं वर्णन "जगबुडीरूपी लांडगा आला म्हणून आकांत करणारे मेंढपाळ" अशा प्रकारे केलं तर ते या पर्यावरणविषयक अभ्यासाचं अवमूल्यन नसून असं वर्णन करणार्यांचं ठरू शकेल. पर्यावरणविषयक घडामोडी, त्यातल्या धोक्यांची सूचना हा मेलोड्रामा नव्हे. तसा विचार करून जे लिहिलं जाईल त्याने मनोरंजन होईल इतपत मी मान्य करतो.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
असहमती
या दोन्ही बहुतांशी मान्य झालेल्या असा दावा असणार्या विधानांवर (आणि तशा दाव्यावरही) असहमती आहे.
परिणाम कोणासाठी वाईट आहेत? म्हणजे फक्त माणसाठी वाईट आहेत का? तेही कसे?
दुसरं हे मानवनिर्मित आहे याची इतकी खात्री कशी? का हे तापमान गेल्या शतकात वाढल्याने फक्त हा अंदाज? याला मानवेतर कारणे नसतीलच याची इतकी खात्री कशामुळे झाली? का केवळ मानवी अहंगंड?
बाकी, मूळ लेखातील चिकित्सा आवडली
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
जगात दरवर्षी १० कोटी
जगात दरवर्षी १० कोटी शार्क्सची हत्या होते.
समुद्रातले जीव सोडता पृथ्वीवर साधारण दहा लाख जीवजाती आहेत असे धरले तरी इतक्या जीवांच्या वाटेच्या सूर्याच्या नेट प्रायमरी प्रॉडक्शनपैकी ४०% मानवप्राणी वापरतो .
म्हणजे दहा लाख लोकसंख्येच्या शहरात नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव लोक छोट्या छोट्या झोपडीत राहत असताना त्या शहराचा ४०% भाग व्यापणार्या प्रासादात एक माणूस एकटा राहण्यासारखे हे आहे**.
गेल्या तीनशे वर्षांमध्ये नवीन लावलेली जंगले धरूनही १ अब्ज हेक्टर जंगले नष्ट झाली आहेत. हा आकडा यापूर्वीच्या नऊ हजार सातशे वर्षांत नष्ट झालेल्या जंगलांच्या क्षेत्रफळाइतकाच आहे.
अशी सगळी आकडेवारी निव्वळ अहंगंडातून निर्माण केली जात असेल असे मला वाटत नाही.
**उदाहरण श्रेयाव्हेरः डेरिक जेन्सन, What We Leave behind
संबंध समजला नाही पण असो.
याचा ग्लोबल वॉर्मिंगशी संबंध समजला नाही. पण असो.
मला मुळात माणसाला पर्यावरणापासून वेगळा का काढायचे हे समजले नाही. पृथ्वीवरील असंख्य प्रजातींपैकी एक प्रजाती स्वतःकडे असणार्या 'बुद्धी'च्या जोरावर इतर प्रजातींच्या पुढे जात आहे. या प्रक्रीयेत ती प्रजाती इतर प्रजातींना हानी पोचवत आहे किंवा नष्ट करू पाहत आहे. यामुळे या प्रजातीचेच अस्तित्त्व धोक्यात येऊही शकते किंवा नाहीही.
या सगळ्यात 'अनैसर्गिक' किंवा 'वाईट' ते काय?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पृथ्वीवरील असंख्य
पृथ्वीवरील असंख्य प्रजातींपैकी एक प्रजाती स्वतःकडे असणार्या 'बुद्धी'च्या जोरावर इतर प्रजातींच्या पुढे जात आहे. या प्रक्रीयेत ती प्रजाती इतर प्रजातींना हानी पोचवत आहे किंवा नष्ट करू पाहत आहे. यामुळे या प्रजातीचेच अस्तित्त्व धोक्यात येऊही शकते किंवा नाहीही.
माणसामुळे अन्य सजीवांचे अस्तित्व धोक्यात येणे हे वाईट का नाही?
तत्वतः वेगळे न काढणे ठीक आहे. पण विध्वंसक क्षमता असलेला माणसासारखा दुसरा कोणी सजीव असेल तर त्यालाही वेगळे काढले जाईलच-पर्यावरणात जाणतेपणी किंवा अजाणतेपणी.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वाईट नाहीच!
अनेक बॅक्टेरिया माणसाला घातक ठरतात, त्यांना योग्य वाटणार्या प्रसंगी आवश्यक प्रक्रीया करताना माणसाला हानी पोहोचते, प्रसंगी मृत्यूही येतो. अशावेळी त्या बॅक्टेरियामुळे माणसाचे आयुष्य धोक्यात येणे वाईट का नाही?
हत्तींसारखे जीव पोट भरल्यावरही कित्येकदा केवळ आनंदासाठी झाडे तोडतात, उपटतात. त्यांच्या या कृतीमुळे कित्येक जीवांचे नुकसान होते, प्रसंगी मृत्यूही येतो. अशावेळी हत्तींमुळे अन्य सजीवांचे अस्तित्त्व धोक्यात येणे वाईट का नाही?
प्रत्येक जीवाने आपल्या नैसर्गिक शक्तीचा वापर करणे हे नैसर्गिकच आहे, त्यात 'वाईट' ते काय?
बाकी मुळात हे जग माणूस सोडून इतर सजीवांसाठीच बनले आहे आणि या माणसाने नंतर येऊन (कानामागून येऊन) यात लुडबूड चालवली आहे हा दृष्टिकोन मला पटत नाही. ही पृथ्वी इतर सजीवांची जितकी आहे तितकीच माणसाची आहे. माणसाच्या वापराने टिकायच्या स्पर्धेत इतर जीवही हा फॅक्टर लक्षात घेऊन इव्हॉल्व्ह होत आहेत (त्याचे एक उदा धनंजय यांनी एका धाग्यात दिले होते). जर माणुस नावाचा जीव कित्येक प्राणघातक जीवांना 'संपवू' शकला नसता तर ते असते आणि माणूस नसता इतके ते स्वच्छ आहे.
माणूस हा जगाचा सेव्हियर आहे आणि त्याच्यावर अख्खे अख्खे जग + पर्यावरण वाचवायची जबाबदारी आहे, असेही मी अजिबातच मानत नाही.
विद्ध्वंस कशाला म्हणावे आणि नैसर्गिक बदल कशाला म्हणावे याची परिमाणे माणूस नावाचा जीव वेगाने बदलत आहे इतपत मी सहमत होऊ शकतो असे वाटते.
मला आवडतात, शांत वाटते, उपयुक्त आहेत म्हणून मी झाडे तोडत नाही. अस्वच्छता, रोगराई होऊ नये म्हणून मी कचरा टाकत नाही. प्लास्टिकचा वापरही मी अस्वच्छता-रोगराई-दुर्गंधी- माझ्या आरोग्यास अपाय वगैरे लक्षात घेऊन मला फायद्याचे असेल तेथेच करतो (आणि तेथे करतोच करतो). घरी शक्य झाल्यास सौर उर्जा वापरतो, रेन वॉटर हार्स्वेस्टिंगच्या बाजुनेही आहे इतरही अनेक पर्यावरणवादी जे करतात ते मी करतही असेन. पण हे सगळे करताना हे मी पर्यावरणासाठी वगैरे किंवा ग्लोबल वॉर्मिंगच्या अटकावाला माझ्यापडून पाकळी किंवा 'सेव्ह द वर्ल्ड' वगैरे कारणांसाठी नाही तर अनेक स्वार्थी कारणांसाठी पाळतो.
(जरा प्रकट चिंतन असे प्रतिसादाला स्वरूप आले आहे विस्कळीतपणाबद्दल क्षमस्व)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अनेक बॅक्टेरिया माणसाला घातक
ओके. वाईट आहे, पण त्यांची तीव्रता किती? ओव्हरऑल परिणाम किती आणि त्या तुलनेत मानवनिर्मित गोष्टींचा परिणाम किती? किमानपक्षी इतका साधा विचार केला तरी मानवनिर्मित गोष्टींच्या तीव्रतेमुळे मानवाला वेगळे काढणे जास्त आवश्यक आहे हे लक्षात यावे. ते सोडून हत्ती आणि बॅक्टेरिया यांची तुलना माणसाशी करणे तर्कदुष्ट व हास्यास्पद वाटले.
इथे नैतिकता वैग्रे भानगडी उपटतात-सर्व नैसर्गिक गोष्टी नेहमीच बरोबर नसतात. माणसाचा मेंदू ताकदवान असल्याने विधायक अन विघातक अशी क्षमता त्यात ठासून भरलेली आहे. काही गोष्टींमुळे आपल्या नैसर्गिक इन्फ्रास्ट्रक्चरवर होणारा परिणाम आपल्याला अंतिमतः घातक आहे हे कळल्यामुळे वाईट असे लेबल त्याला लागणे क्रमप्राप्तच आहे. मुळात शुद्ध नैसर्गिक गोष्टींना नैतिक लेबल लावण्यात अर्थ नाही असा काहीसा सूर दिसतो. हा एक अतिशय चूक आणि सोयीस्कर दावा आहे-या संदर्भात तरी.
अधोरेखितांशी सहमत. पण तत्वतः सहमती एका बाजूला आणि लुडबूडवादी दाव्यांमागील वस्तुस्थिती दुसर्या बाजूला. इथे सर्व सजीव आपापल्या प्रकारे प्रदूषण करत असतात, पण मानवनिर्मित प्रदूषणाची तीव्रता अजून कुणाद्वारे निर्मित प्रदूषणापेक्षा जास्त असून ते प्रदूषण तुलनात्मकरीत्या पाहता अनेकपटीने जास्त सजीवांवर परिणाम करणारे आहे. त्यामुळे तसे दावे येणे साहजिकच आहे. त्यांचा प्रतिवाद करायच्या नादात वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष होऊ नये असे वाटते. माणसासाठी अपॉलोजेटिक पद्धतीचा हा प्रतिसाद जाणवला म्हणून लिहावे वाटले. तसे नसेल तर आनंदच आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ते सोडून हत्ती आणि बॅक्टेरिया
कोणाला काय वाटावे यावर कंट्रोल करू शकत नाही. त्यामुळे या मताकडे दुर्लक्ष करतो.
बाकी, त्या जीवांमध्ये सध्या तितकी तीव्रता नाही म्हणून त्यांचे दुसर्याचे जीव घेणे चालेल आणि माणसानेही अतिशय कष्टाने पिढ्यान् पिढ्या खर्ची घालून तितकी शक्ती कमावली आहे व त्याचा वापर तो करतो आहे तर तो मात्र वाईट?
नैतिकता वगैरे 'मानवी कल्पना' झाल्या आणि त्याही स्थल-काल-व्यक्ती या सगळ्याच कसोट्यांवर सापेक्ष आहेत. त्यांना या अखिल पृथ्वीच्या मल्टि-जीवांच्या पर्यावरण-प्रश्नामध्ये आणावेच का? आणि कसे?
अच्छा! म्हणजे थोडक्यात माणसाठी वाईट तेच जगासाठी वाईट?
होय! काहि तपशीलांसह असाच सूर आहे
कसा काय?
असे काही नाही. लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवरचे पर्यावरण काही सुक्ष्मदर्शी जीवांनी मिळून इतके बदलले की तत्कालीन बर्याच जमाती, जीव नष्ट झाले हे ठाऊक असेलच. त्यात तेव्हा त्या जीवांनी पर्यावरणात गैर 'लुडबुड' केली / प्रदुषन केले असे वाटते का? त्यांनी इतक्या जमाती नष्ट करून नक्की काय वाईट केले?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
बाकी, त्या जीवांमध्ये सध्या
मानवेतर जीवांचे समर्थन मी कुठे केले हे दाखवून द्यावे. मोठा फरक डिग्री ऑफ इंपॅक्टचा आहे-तो तुम्ही लक्षात का घेत नाही हे कळत नाही. ज्यांच्या करणीचा इंपॅक्ट जास्त त्यावरच फोकस आणि टीका जास्त असणार. निव्वळ क्वालिटेटिव्ह साम्य दाखवून अपॉलोजेटिक दावे करण्यात काही अर्थ नाही.
हे म्हणजे "प्राणीसुद्धा बलात्कार करतात, मग माणसाने केलेल्या बलात्कारालाच का वाईट म्हणावे?" असे म्हणण्यासारखे आहे.
सापेक्षतेच्या कसोट्या लावूनही "मानवी कृत्यांमुळे काही प्रमाणात पृथ्वीच्या पर्यावरणाला धोका पोहोचतो आहे" ही गोष्ट कशी चांगली ठरते हे वाचायला आवडेल. जर चांगलीवाईट लेबले न लावता जैसे थे प्रकार चालू ठेवला तर जे परिणाम होतील ते माणसासाठी चांगले आहेत हे सिद्ध करण्याला काही विदा आहे का? निव्वळ वितंडवादी सूर दिसतो आहे त्याला मुख्य आक्षेप आहे.
उदाहरणे द्या-माझ्या ज्ञानात भर पडेल. आणि त्याहीपेक्षा सर्वांत महत्वाचे म्हणजे माणसाच्या कृत्यांची तुलना कशी करता येते हेही सांगा. मी पुन्हा एकदा सांगतोय, की मानवनिर्मित प्रदूषणामुळे अन्य जाती तर राहोतच, खुद्द माणसालाही तोटाच होतोय. बरं, तुमचेच सर्व्हायव्हलचे निकष याला लावले तर इतर सूक्ष्मजीवांनी केलेल्या तथाकथित कत्तलीत आत्मघात होता का कुठे? निव्वळ मानवजात वाचण्यापुरते स्वार्थी निकष लावूनही मानवनिर्मित प्रदूषणाचे समर्थन करणे अशक्यच आहे- कारण ते आत्मघातकी आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सापेक्षतेच्या कसोट्या लावूनही
ही चांगली की वाईट हे नंतर येते. मुळात मानवी कृत्यांमुळे "पृथ्वीच्या पर्यावरणाला" "धोका" आहे हेच मान्य नाही. फारतर "मानवी कृत्यांमुळे काही प्रमाणात पृथ्वीच्या पर्यावरणात बदल होत आहेत. हे बदल इतर अनेक जीवांमुळे होणार्या बदलापेक्षा अधिक आहेत किंवा अधिक वेगाने होत आहेत." इतपत विधान स्वीकारार्ह ठरेल.
एकदा ठरवा चर्चा "माणसासाठी" की "पृथ्वीसाठी किंवा पर्यावरणासाठी" करायची आहे? जर फक्त माणसासाठी असेल तर पर्यावरण वाचवतोय किंवा पृथ्वी वाचवतोय हे दावे फोल आहेत. सरण "माणूस ही प्रजाती वाचवतोय" म्हणा आणि हे सारे माणसाठी चालले आहे असे मान्य केल्यास अधिक योग्य होईल आणि (माझ्यासारख्यां अल्पसंख्यांचे) अधिकचे समर्थन मिळेल. पण मग या विचार प्रक्रियेत माणसाच्या "मीच काय ती पृथ्वी/पर्यावरण वाचवणार" या अहंगंडाला कुरवाळता येत नसल्याने "पर्यावरण बचाओ" वगैरे परमार्थी दिसणार्या घोषणा केल्या जातात.
हा हा.. वैयक्तिक टिपणी .. पास!
बाकी शेवटच्या प्रतिसादासाठी उदा देताही येतील पण मुळात तुम्ही म्हणताय "माणूस वाचवा" ज्यावर माझा आक्षेप नाहिच्चे. मी ही माणूस वाचावा अश्याच स्वार्थी + नैसर्गिक विचारांचा आहे. पण त्याला "पर्यावरण वाचवा" असे म्हणण्यावर आक्षेप आहे. माणसाच्या कृत्यामुळे माणसाचा नाश होत असेलही किंवा नसेलही; पण पर्यावरणाचा "नाश होतोय" किंवा त्याला "धोका आहे" हे मला मान्य नाही.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
चर्चा फक्त मानव प्रजातीकरिता
चर्चा फक्त मानव प्रजातीकरिता केली तर "माणसाला प्रदूषणापासून धोका आहे"
आणि जण्रल पर्यावरणासंदर्भात केली तर "माणसापासून अन्य बर्याच सजीवांना धोका आहे"
ही दोन्ही वाक्ये खरीच आहेत.
पर्यावरणातले मानवनिर्मित बदल हे बर्याच अंशी अपायकारक आहेत.
तुमचे समर्थन मिळावे म्हणून दावा बदलण्यात काहीच अर्थ नाही. हा जो काल्पनिक अहंगंड आणि तथाकथित परमार्थ तुम्ही आरोपित करू पाहताहात, त्याचा मागमूस इथे कुठे आहे, तेही सांगावे.
मुळात वादासाठी वाद घालायचाच झाला तर "बलात्कार ही गोष्ट वाईट कशावरून आणि त्याने समाजाचा काय तोटा झाला" अशासारख्या हास्यास्पद विधानावरही घालता येतो. वैयक्तिक टिपणी करण्याचा मला शौक नाही. पण मुळात तुमच्या प्रतिसादातले मुद्दे आणि मांडणी चूक आहेत त्याला काय करणार. त्यामुळे त्यांचे समर्थन हा वितंडवाद वाटणारच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
चर्चा फक्त मानव प्रजातीकरिता
दोन्ही विधानांशी सहमत आहे
इथे पुन्हा "कोणाला?" हा प्रश्न येतो. जर माणसाला किंवा काही सजीवांना म्हणत असाल तर बर्याच अंशी सहमत आहे.
पर्यावरणाला किंवा इकोसिस्टिमला 'अपायकारक' आहे म्हणत असाल तर सहमती अगदीच निमुळती होते किंबहुना असहमतीच!
पण "पर्यावरणातले मानवनिर्मित बदल हे पर्यावरणात किंवा इकोसिस्टिममध्ये असे 'बदल घडवणारे' आहेत, ज्यामुळे काही प्रजातींना व पर्यायाने माणसाला अपाय होऊ शकतो" अश्या रचनेशी बराच सहमत होईन.
इथे माझी भुमिका याहून स्पष्ट करणे माझ्या कुवतीपलिकडचे आहे. माझी शाब्दिक + भाषिक मर्यादा म्हणा हवंतर!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
एफवायआय - 'पर्यावरण किंवा
एफवायआय - 'पर्यावरण किंवा इकोसिस्टिम' मधे माणूस सोडून(माणूसपण येतो?) इतर सजीव/निर्जीव प्रजाती/प्रकार येतात.
+१ हेच तर केव्हाचा सांगतोय
+१
हेच तर केव्हाचा सांगतोय
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
इथे पुन्हा "कोणाला?" हा
आपल्याला त्रास होतो, सोबत अजूनही बर्याच जणांना होतो इथपर्यंत मला बास आहे. स्वीपिंग स्टेटमेंटबद्दलसुद्धा म्हणायचे झाले तर काही अंशी तेही बरोबर आहेच. ओझोन लेयरची छिद्रे हे एक उदाहरण सांगता येईलच.
बाकी सहमत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वाद घालायचाच झाला तर
अगदी हेच उदाहरण सुचलेलं होतं. "पर्यावरणावर बलात्कार" अशी शब्दरचनाही करता येते.
"बलात्कार होऊ नये म्हणून काळजी घ्या" असा सल्ला आणि "पर्यावरणाची काळजी घ्या" असा सल्ला ... दोन्ही रिकामे आहेत. नक्की काय करा हे त्यातून समजत नाही. या लेखमालेतले आधीचेही लेख वाचले तर "अमकं करा, त्याचा एवढा फायदा होईल" अशा प्रकारचा विचार त्यात आहे. ("योगायोगाने" ऋषिकेशनेच बलात्कार टाळण्यासाठी या चार गोष्टी करा, दुर्दैवाने तो झालाच तर या चार गोष्टी करा असा लेख लिहीलेला आहे.)
ही चर्चा "बलात्कार वाईट का म्हणावा" अशा प्रकारच्या प्रश्नातूनच सुरू झालेली आहे. बलात्कारामुळे बाईचं आयुष्य कायमचं बरबाद होतं म्हणून बलात्कार रोखावेत का फक्त तिच्यावर मानसिक मानसिक आघात होतो, त्याची काळजी घ्यावी अशा प्रकारचा हा वाद आहे. पर्यावरणावर मानवी कृतींचे होणारे परिणाम टाळणं हे मनुष्यांसाठी चांगलं आहे (असं आत्ता दिसतंय) म्हणून करावं का दुनियेचा भार आपल्यालाच वहायचा आहे अशा प्रकारचा तुच्छतावादी (chavinist) विचार करावा असा ऋषिकेशचा प्रश्न आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पर्यावरणावर मानवी कृतींचे
तर यावर माझा प्रतिप्रश्न आहे की पर्यावरणावरील आपापल्या कृतींचा वाईट परिणाम टाळणे हे मानवाखेरीज कुणाच्या हातात आहे का? जर नसेल तर याला चॉव्हिनिझम म्हणावे तरी कसे? कारण गोष्ट खरी आहे-माणसाखेरीज सध्या तरी अन्य कुठलाही सजीव हे असलं काही करू शकत नाही.
बाकी सहमत हेवेसांनल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
याचा ग्लोबल वॉर्मिंगशी संबंध
तो प्रतिसाद अहंगंडाच्या समजासंबंधी होता.
यात अनैसर्गिक काहीच नाही. स्वतःचा रहिवास व्यापून स्वतःच्या विनाशाला कारणीभूत होणार्या प्राणिजाति हे अनैसर्गिक नाही; पण त्या प्राण्यांसाठी वाईटच म्हटले पाहिजे.
माणसाच्या दृष्टीने वाईट इतकेच की दुर्दैवाने इतर प्रजातिंवर त्याचे अस्तित्व अजूनतरी अवलंबून आहे. धान्य दुकानातून येत नाही तर शेतांमध्ये उगवते आणि त्यासाठी उत्तमप्रकारची माती लागते (टॉप सॉईल) आणि ती निर्माण होण्याची प्रक्रिया अजूनतरी इतर जीवजंतूंवर अवलंबून आहे.
श्वसनासाठी लागणारा निम्मा ऑक्सिजन झाडे वातावरणात सोडतात आणि निम्मा समुद्रातले प्लँक्टन्स तयार करतात. दोन्हीकडच्या जीवसंस्था नष्ट होणे हे माणसाच्या अस्तित्वाला धोकादायक आहे.
पुढे तंत्रज्ञानाने मातीशिवाय वाढणारी पीके, फळझाडे, भाज्या येतील; कृत्रिमरीत्या तयार केलेला पॅकेज्ड ऑक्सिजन येईल तेव्हा मग काहीच वाईट राहणार नाही. तोवर तरी माणसाच्या अस्तित्वाच्या दृष्टीने हे वाईटच. अर्थात तेही सापेक्षच आहे. एखादा प्राणी नष्ट होणे यात म्हटलं तर वाईट काहीच नाही. पण ती चर्चा फ्रेम ऑफ रेफरन्स सोडून होईल.
लेट्स अॅग्री टु डिसअॅग्री
सहमत आहे. मला माणूस ही जमात नष्ट होणे ही आपत्ती वाटत नाही.
इथे मुळातच आपले विचार दोन टोकांचे असले तर लेट्स अॅग्री टु डिसअॅग्री. (तसे नसल्यास मला अजूनही तुमचे म्हणणे नीटसे समजलेले नाही. माझ्या आकलनशक्तीचा दोष)
बाकी माणूस हे सगळे थांबवू शकतो, बदलू शकतो, पर्यावरणातील बदल थांबवू किंवा प्रभावीपणे कंट्रोल करू शकतो या भावनेला मी माणसाचा अहंगंड मानतो. माणसामुळे जगात होणार्या एखाद्या दिशेने होणार्या बदलांचा वेग वाढला असु शकेल इतपत शक्यता मी मान्य करू शकतो.
पण Change is the nature हे मान्य केल्यावर त्यातही काही 'वाईट' दिसत नाही.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
वाचतोय....
पूर्वीही वाचलं होतच.
मुसुंना उपप्रतिसाद दिल्यास अधिक तपशील मिळू शकतील.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
लेख एकदा वाचला. पुन्हा निवांत
लेख एकदा वाचला. पुन्हा निवांत वाचेनच पण पहिल्या वाचनात मनात आलेल्या प्रतिक्रिया नोंदवून ठेवतो.
लेख मुद्देसूद आहे आणि भाषाही तर्कशुद्धतेचा भास निर्माण करणारी आहे. त्यातल्या काही मुद्द्यांमध्ये काही कॉग्निटिव्ह एरर्स आणि काही पक्षपात दिसून आले ते लिहितो.
त्याआधी, २५ वर्षांची थिअरी आणि येत्या २५ वर्षांतले परिणाम असे तापमानवाढ व त्या अनुषंगाने होणार्या हवामान बदलाच्या बाबतीत नाही हे लक्षात आणून देऊ इच्छितो. प्रदूषणामुळे हवेतले ग्रीन हाऊस गॅसेसचे प्रमाण वाढून पृथ्वीचे तापमान वाढू शकते असे प्रमेय मांडल्याला कमीत कमी शंभर वर्षे झाली असतील. अधिक माहितीसाठी कॉर्पोरेटिझमच्या धाग्यावर मी ऋषिकेशना दिलेल्या उपप्रतिसादात दिलेला व्हिडिओ पाहावा.
दुसरे म्हणजे तापमानवाढ आणि हवामान बदल याचा अनेक डूमसेयर्सनी गैरफायदा घेतला आहे हे मान्य असले तरी IPCC च्या अहवालांमध्ये असे काहीही म्हटलेले नाही आणि नेहमीच या शतकाच्या अखेरीपर्यंत काय बदल होतील ते मांडलेले आहे. येत्या २०-२५ वर्षांपुरतेच ते अहवाल नाहीत. काही लोक अर्थातच २०-२५ वर्षांतच सगळं कोसळेल वगैरे म्हणतात, पण ते सरसकट नाही.
"आजचा काळ वेगळा आहे" हा मुद्दा नक्की तापमानवाढीच्या थियरीच्या विरोधात मांडला आहे की बाजूने ते कळले नाही. गेल्या दहाहजार वर्षांमध्ये जितक्या म्हणून छोट्यामोठ्या नागरसंस्कृती अस्तित्वात आल्या त्यातली एकही टिकली नाही. प्रत्येक नागरसंस्कृतीने, मग ते ईस्टर आयलंड असो की रोमन साम्राज्य, जास्तीत जास्त वाढायचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात स्वतःच्याच क्लिष्टतेमुळे त्या नष्ट झाल्या. आजची नागरसंस्कृती जगभर पसरली आहे या एकमेव कारणामुळे ती नष्ट होणार नाही या समजाला आजचा काळ वेगळा आहे याशिवाय दुसरे काय कारण आहे? तरीही केवळ गेल्या २०० वर्षांमधल्या (अर्धवट) प्रगतीकडे बोट दाखवून पुढे अनंतकाळ असेच चालू राहिल असे म्हणणे हा अतिआत्मविश्वास आणि उपलब्धता पक्षपात आहे.
आकडेवारीने सिद्धता वगैरे मुद्दे दोन्ही बाजूंना लागू आहेत ते फक्त एकाच बाजूविरुद्ध कसे वापरता येतील ते समजले नाही.
माणसाचा पर्यावरणावर काहीही परिणाम होत नाही असे म्हटले तर अंटार्क्टिकावर ओझोनच्या थराला छिद्र पडणे आणि त्यावर उपाय करून ते भरून येणे ही एक काल्पनिक कथाच म्हणावी लागेल. निव्वळ योगायोगाने शास्त्रज्ञांनी क्लोरीन वापरून CFC तयार केले, क्लोरीनऐवजी ब्रोमीन (BFC) वापरले असते तर त्या ओझोनच्या छिद्राचा विस्तार खूपच वाढला असता हे बहुतेकांना माहित नसते.
जी काही प्रगती होईल ती माणसाच्या उद्यमशीलतेने आणि जे काही वाईट घडेल ते निसर्गाच्या लहरीपणाने असे गृहीतक असल्यावर त्याचा प्रतिवाद करणे अशक्य आहे.
ते सग्गळं खरं असेल हो...
ते सग्गळं खरं असेल हो..., एकवेळ प्रदुषणाने जगबुडी होणार आहे हे मान्य करूच!
पण 'अर्थ अवर' (पृथ्वीघंटा किंवा अवनीतास)साजरा करताना विजेचे दिवे बंद करून त्याजागी हजारो मेणबत्त्या लावणार्या आधुनिक 'पर्यावरणवाद्यांना' काय म्हणावे?
त्यांना माझा कोपरापासून नमस्कार!
>>एक म्हणजे जुन्या काळपासून
>>एक म्हणजे जुन्या काळपासून सामान्य माणसाला तंत्रज्ञानाबद्दल अढी आहे. माणूस निसर्गापासून दूर जातो आहे, सिमेंट कॉंक्रिटीकरण होत आहे, माणूस निसर्गावर अत्याचार करतो आहे वगैरे बाबत हळहळ आढळते.
याबाबत बराचसा सहमत आहे.
माझ्या लहानपणी जेव्हा टीव्ही आला तेव्हा टीव्ही पाहून डोळे बिघडतील अशी भीती घातली जात होती. वर्गातल्या मुलांना चष्मे लागल्यावर तर खात्रीच पटली. टीव्हीच्या स्क्रीनच्या आकाराच्या किमान सहापट अंतरावर बसून टीव्ही पहावा अशी स्टॅण्डर्ड्स सुद्धा सांगितली गेली.
पुढे व्हिज्युअल डिस्प्ले वाले पर्सनल काँप्युटर्स आले आणि स्क्रीनला डोळे चिकटवून (दोन फुटापेक्षा कमी अंतरावरून) कॅथोड रे ट्यूब असलेले डिस्प्ले पाहिले जाऊ लागले. तेव्हा आता इतक्या जवळून पाहिलेले कसे चालते या प्रश्नाचे उत्तर "स्क्रीनची प्रकासमानता टीव्हीच्या मानाने खूपच कमी असते (स्क्रीनवर फक्त टेक्स्टच दिसू शकत होते)." असे उत्तर मिळाले होते. पुढे विंडोज वगैरे आल्यावर टिव्हीइतकीच प्रकाशमानता असलेले स्क्रीन तितक्या जवळून लोक पाहू लागले. परंतु लोकांना लागणार्या चष्म्यांमध्ये काही सिग्निफिकंट वाढ मला दिसत नाही.
अलिकडचे उदाहरण मोबाईलचे आहे. मोबाईल कानाजवळ धरल्याने कॅन्सर वगैरे होतात (ब्याटरी डाऊन असताना रेडिएशन अधिक असते हा जावईशोध आहे असे माझे मत आहे चूभूदेघे) असे सांगितले जाऊ लागले. हल्ली मोबाईल टॉवरमुळे चिमण्या नष्ट झाल्या असे ठाम विधान माझ्या शहरातल्या घराच्या खिडकीतून चिमण्यांचा चिवचिवाट पहात ऐकले.
मला पडणारा प्रश्न हा.....
नव्या तंत्रज्ञानाने वैट्टच कसं काय घडतं? म्हणजे हल्ली लोक मोबाईल वापरतात त्यामुळे अमूक एक विकार हल्ली लोकांना होतच नाही असं कुठल्याच तंत्रज्ञानाबद्दल का ऐकू येत नाही? मोबाईलच्या रेडिएशनने चिमण्या नष्ट होत असतील तर त्यांच्यापेक्षा लहान/खूद्र असलेले हवेतले जंतू (किमानपक्षी डास) का नष्ट होत नाहीत?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
रोचक
टीव्हीबद्दलची भिती जी.ई. च्या टीव्हींमुळे बसली, १९६७साली त्यांच्या रंगीत टीव्हींमुळे (अतिरेकी एक्स-रे एमीशनमुळे) डोळे खराब होण्याचे प्रकार झाले होते, तसेही कॅथोड-रे-ट्यूबमुळे (रिफ्रेश रेट कमी असलेल्या) डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता आहेच/होती.
मोबाईल मुळे चिमण्यांचं माहित नाही पण माणसं मंद झाल्याचे दावे(?) आहेत.
पॉप्युलर मिथ्स भांडवलशाहीला पुरक अशा व्यवस्थेशी संबधीतच असतात हे कोरीलेशन रोचक आहे.
मोबाईलचा सिग्नल कमी प्रतीचा
मोबाईलचा सिग्नल कमी प्रतीचा असताना मोबाईल अधिक जोर लावून सिग्नल शोधायचा प्रयत्न करतो आणि त्यात ब्याटरी अधिक खातो हे मात्र तंत्रज्ञांकडून समजलेलं आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
जंपिंग द गन
ही तुलना मी आधीच करून त्या थिअरीला धोक्याची खोटीच घंटा वाजवणारी थिअरी म्हणून जाहीर केलेलं आहे अशा समजुतीने चर्चा चालू आहे. म्हणून काही स्पष्टीकरण.
मी या लेखात खालील मुद्दे मांडले आहेत.
१. 'पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि त्याला मानव कारणीभूत आहे' या थिअरीचा पहिला भाग सिद्ध झाला असला तरी दुसरा अजूनही वैज्ञानिकांत चर्चेतच आहे. ती चर्चा पूर्ण व्हायच्या आतच ती सामाजिक वर्तुळात चर्चेला आलेली आहे. याची मला वाटणारी कारणं दिलेली आहेत. [थिअरीचा पहिला भाग बरोबर, पण दुसरा बरोबर की चूक याबद्दल चकार शब्द नाही]
२. अनेक थिअरी अशा असतात ज्यांना 'डूमसेयर थिअरीज' असं म्हणता येईल. त्यांची लक्षणं दिलेली आहेत. [ती लक्षणं वरील थिअरीला लागू होतात की नाही याबाबत चर्चा नंतर करणार आहे]
ही लेखमाला ऊर्जावापर आणि त्यासंबंधीचे सामाजिक समज-गैरसमज यांचा आकडेवारीतून आढावा घेण्यासाठी आहे. ग्लोबल वॉर्मिंग हा त्यातला एक मोठा भाग आहे. या मालेतली 'धोक्याची घंटा' ही आणखीन एक पोटमालिका आहे. यात एकंदरीत असे समज-गैरसमज कसे पसरतात याच्याविषयीचे माझे विचार आहेत. धोक्याची घंटा वाजवणाऱ्या थिअरींमधले काही समान दुवे मी मांडतो आहे. अशा थिअरींमध्ये 'पंचवीस वर्षं' हा एक समान घटक असतो असं मी म्हटलेलं आहे. याचा अर्थ पंचवीस वर्षं हा आकडा जिथे आहे त्या सर्वच थिअरी या खोटा बागुलबुवा निर्माण करणाऱ्या नाहीत. माकडांना नाक असतं असं म्हटल्याने सर्वच नाक असलेले प्राणी माकड ठरत नाहीत.
अशा घटकाला विचारात घेण्याचं कारण नाही असाही मुद्दा नाही. योग्य तितकं आणि तितकंच महत्त्व द्यावं असा मुद्दा आहे. हा पुढील काही लेखांतून स्पष्ट होईलच.
शंका....
वरील काही प्रतिसदातील चर्चा एकूणात "आख्खी पृथ्वी नष्ट झाली तर नक्की वाईट काय आहे?" किंवा "आख्ख्या मानवजातीचा इथून निर्वंश झाला तर नक्की काय बिघडलं?" ह्या लायनीवर जाताना दिसते.
जगात सर्व अण्वस्त्रधारीराष्ट्रांकडे मिळून पाच्-सात हजार अणुबॉम्ब आहेत म्हणे. त्यातील थोडेसुद्धा आख्खी पृथ्वी नष्ट करण्यास पुरेसे आहे. असे असताना "अणु स्फोटाने पृथ्वी आणि पर्यायाने माणूसच नष्ट केला तर वाईट काय" असे कुणी विचारले तर नक्की काय उत्तर द्यावे ह्या संभ्रमात आहे.
.
ह्याच धाटणीची उपक्रमावरील चर्चा उद्धृत करतोय.
http://mr.upakram.org/node/2850
.
.
असहमत
निखिल जोशी [25 Sep 2010 रोजी 05:10 वा.]
मानव हा प्राणी इतर प्राण्यांच्या तुलनेने पर्यावरणाच्या दृष्टीने फारसा महत्वाचा देखील नाही.
उल्कापाताचे संकट आले तर केवळ मानवच पृथ्वीला वाचवू शकतात.
उलट त्यांनी पर्यावरणाच्या र्हास लावला आहे.
हे संपूर्ण सत्य नाही. पृथ्वी निर्माण झाली तेव्हा हवेत ऑक्सिजन नव्हता आणि काही सजीव गुण्यागोविंदाने नांदत होते. त्यांनी स्वतःच्या हव्यासातून इतका ऑक्सिजन बनविला की त्यांच्या पर्यावरणाचा र्हास झाला आणि ते नष्ट झाले.
कोण महत्वाचे आणि कोण शुल्लक, हे ठरवणारे आपण कोण ?
निरुत्तर.
ते त्यांच्या स्वभाव गुणाप्रमाणेच वर्तन करतात, मनुष्य प्राणी सोडून इतर सगळे केवळ पोटासाठी आणि स्वरक्षणासाठी शिकार करतात.
पॉर्पॉइज, सील, इ.ची शिकार किलर व्हेल डॉल्फिन कधीकधी गंमत म्हणून करतात, पेंग्विनची शिकार सील कधीकधी गंमत म्हणून करतात, पेंग्विन मासे मारतात पण कधीकधी त्यांना न खाता टाकून देतात. मला वाटते की उधळपट्टी हेच प्रगतीचे खरे लक्षण आहे. मोराचा पिसारा हे त्याचे खूप चांगले उदाहरण आहे.
आहार, भय, मैथुन, निद्रा, यांच्यापलिकडेही आपण विचार करतो म्हणून तर आपण 'वेगळे' आहोत ना?
अन्यथा जो पर्यंत माझ्या जीवास कोण (प्राणी/मनुष्य) बाधा आणत नाही तो पर्यंत कोणासही (हेतुपुरस्सर) मारण्याचा मला नैतिक अधिकार नाही. असे मला वाटते.
उदरभरण/यज्ञकर्मासाठी?
निष्काळजीपणा वारंवार होत असेल तर ते देखील चुकीचेच आहे.
मान्य.
.
.
बिनमहत्त्वाचे
नितिन थत्ते [25 Sep 2010 रोजी 05:40 वा.]
>>उल्कापाताचे संकट आले तर केवळ मानवच पृथ्वीला वाचवू शकतात.
पृथ्वीला वाचवावे असे विश्वाच्या दृष्टीने पृथ्वीत काय महत्त्वाचे आहे?
नितिन थत्ते
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
(चक्क) श्री.निजोंशी सहमती!
(चक्क) श्री.निजोंशी सहमती! :-O
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
तांत्रिक आणि सामाजिक
> मग तांत्रिक वर्तुळात पूर्ण निकाल लागलेला नसताना हा विषय सामाजिक वर्तुळात इतका कसा पसरला? याची माझ्या मते दोन कारणं आहेत.
तुमचं बरोबर असेलही, पण हा विषय सामाजिक वर्तुळात पसरल्याचं मला वाईट वाटत नाही. माझी दोन कारणं अशी:
१. क्लायमेटॉलॉजी अाणि जिअॉलॉजी ही अत्यंत क्लिष्ट शास्त्रं अाहेत. पर्यावरणातल्या बदलाला अनेक घटक कारणीभूत असतात, आणि त्यांचे परस्परपरिणाम कसे होतात हे शोधून काढायचं तर मॉडेलिंग वगैरे करावं लागतं. ह्या मॉडेल्समध्ये सगळ्या घटकांचा विचार करायचा म्हटला तर ती वापरताच येणार नाहीत इतकी बोजड होतात, अाणि याउलट ती सोपी केली तर त्यांची उपयुक्तता मर्यादित होते. या सगळ्या तिढ्यात निर्णायक प्रगती फार अवघड आहे. तेव्हा सगळ्या डेटाचं स्पष्टीकरण मिळून 'क्लायमेट चेंज' या विषयावरचे सगळे तांत्रिक प्रश्न लवकरच सुटतील अशी शक्यता मला फार कमी दिसते. पण हे अजून झालेलं नाही अाणि शास्त्रज्ञांचा अापापसांत उहापोह चालू अाहे, तोपर्यंत सामाजिक वर्तुळाने खोळंबून राहावं अशी अपेक्षा करता येणार नाही. असं किती वेळ खोळंबून राहणार?
२. तरीही वादासाठी असं गृहीत धरू की तांत्रिक वर्तुळाने हा प्रश्न येत्या शुक्रवारी कायमचा सोडवला, अाणि 'तापमानवाढीत माणसाचा मोठा वाटा अाहे, अाणि ती थांबवली नाही तर बऱ्याच वाईट गोष्टी घडतील' असा निष्कर्ष निघाला. तरीही सामाजिक अाणि राजकीय वर्तुळाने याबद्दल काही ठाम कृती करायला अनेक दशकं लागतील, कारण या वर्तुळांचा स्वभावच तसा अाहे. कदाचित तोपर्यंत उशीर झालेला असेल.
तेव्हा तांत्रिक निष्कर्षांबद्दल सध्या काहीशी अनिश्चिती असतानादेखील 'balance of probabilities' चा अंदाज बांधून धोक्याची सूचना मनात ठेवणं हे मला श्रेयस्कर वाटतं. ही सूचना खोटी निघाली तर निघाली. माझ्या घराला गेल्या वर्षी अाग लागली नाही याचा अर्थ इन्शुरन्स विकत घेण्याचा निर्णय चुकीचा होता असा होत नाही.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
शेवटचा परिच्छेद
शेवटचा परिच्छेद दोन वाक्यात बरच काही सांगून गेला.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
माझ्या घराला गेल्या वर्षी अाग
इन्शुरन्स विकत घेण्याचा निर्णय चुकीचा की बरोबर हे शक्यतेनुसार ठरतं. जेव्हा घराला आग लागण्याचा इन्शुरन्स आणि आयुर्विमा हे साधारण समान महत्त्वाचे विमे घ्यायची संधी असते तेव्हा एक टाळून दुसरा घेणं बरोबर का, या प्रकारचा प्रश्न आहे. किंवा उपमा थोडी बदलायची असेल, तर केवळ खिडकी फुटण्याची शक्यता असताना आख्खं घर जळण्याची जर कोणी भीती घातलीत तर तुम्ही खिशातून जास्त पैसे काढून द्याल.
हा इन्शुरन्स घेण्यासाठी किती पैसे लागणार आणि त्याचे फायदे काय याबाबत कुठेही एकमत आढळलेलं नाही. ते असावं अशी अपेक्षाही नाही. कारण या सगळ्याभोवती असलेलं धूसरतेचं वलय. पण जे काही हिशोब ऐकलेले आहेत त्यावरून हगवण, मलेरिया, कुपोषण, अस्वच्छता या बाबतीत ते खर्च केले तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट अनेक पटीचं आहे. कारण या कारणामुळे होणारे मृत्यू जवळपास १००% खात्रीलायकरीत्या प्रेडिक्ट करता येतात. आणि ते पुढच्या वर्षी होणार असतात.
नुकसानभरपाई व विमा स्थापल्यास हरकत नाही
नुकसानभरपाई व विमा स्थापल्यास वरील मुद्दे बाद होतात, किंवा कमी प्रखर होतात.
१. काही देशांतील पाऊस कमी झाला आहे, त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान झालेले आहे. आणि काही सखल प्रदेश बुडाले आहेत, ही तथ्ये आहेत - पुढील परिणाम दुरुस्त करता येतील की नाही याबाबत शंका असली तरी घटितांबाबत शंका घेता येत नाही.
२. नुकसानभरपाईचा कायदेशीर वायदा आता केला तर अब्जावधींचा खर्च आताच्या आता करण्याबाबत जोर कमी होऊ शकेल. उदाहरणार्थ मोटारचालकाकरिता "तिर्हाइतास इजा झाल्यास नुकसानभरपाई"चा विमा उतरवणे आवश्यक असते. बहुतेक वाहनचालक दुसर्यांस इजा करत नाहीत. पण जे थोडे चालक इजा करतात, ती इजा पुष्कळदा जबर असते, आणि तेवढी भरपाई करायची ऐपत अपघातकरू चालकाकडे नसते. "वाट बघून मग चालकाची ऐपत चाचपू" नव्हे तर "आताच्या आताच विमा उतरवला पाहिजे" हाच कायदा सुयोग्य आहे.
३. विमा उतरवण्याच्या बिझिनेस मॉडेलमध्ये "बहुतेक प्रसंगी संकट येत नाही" हे अध्याहृत असते.
लेख एकांगी वाटला आणि काही मुद्दे चुकलेले असावे असे वाटले (किंवा इतके मोघम आहेत की लागू करता येत नाहीत). उदाहरणार्थ : "पण हा प्रश्न सोडवण्यासाठी इतर काही मार्ग निघतील या शक्यतेकडे पार दुर्लक्ष केलेलं असतं." आणि "त्यात गंमत अशी की येणाऱ्या संकटाविषयीची गणितं ही जास्तीत जास्त खर्च गृहित धरून केलेली असतात."
जागतिक तापमानवाढीबाबत जे काही गंभीर भाकितकरण होते त्यात अधिक मोठे<->अधिक सौम्य असे भाकितक्षेत्र दिले जाते. जर वरील वाक्यांचा काही अर्थ लावायचा म्हणावे, तर लेखकाच्या मते भाकितक्षेत्रापैकी सर्वात सौम्य भाकित हे जास्तीत जास्त खर्च गृहीत धरून केलेले असते. लेखकाचा असा आशय असेल, तर त्याकरिता आधार द्यायला हवा. किंवा लेखकाचा असा आशय असेल, की जे माहीतच नाही अशा कमी किमतीचे विश्लेषण केलेले नाही. आता जे माहीतच नाही त्याचे विश्लेषण केल्याशिवाय धोरण/कार्य करू नये, असे मत असेल तर धोरण/कार्यच करू नये असा अर्थ निघतो. अर्थातच लेखकाचा इतका सर्वविनाशक मुद्दा नसावा. लेखकाच्या मनात काहीतरी उंबरठा असावा, तितपत क्षुल्लक "अज्ञात शक्यता" लक्षात न-घेता धोरणे करता यावी. परंतु तो उंबरठा काय ते सांगितलेले नाही.
जर लेखक "अमुक-तमुक बाबतीत धोरण केल्याचे ऐतिहासिक उदाहरण ते योग्य, पण तापमानवाढीबाबत धोरण करणे अयोग्य" असे उदाहरण देता, तर तो उंबरठा काय त्याबाबत मी काही ठोकताळा बांधू शकलो असतो. पण यशस्वी भाकित म्हणून उदाहरण दिले आहे ते "पृथ्वी गोल असणे" आणि "पृथ्वी सूर्याभोवती फिरणे" हे जोडउदाहरण आहे. हे सामाजिक-आर्थिक धोरणांच्या चर्चेतले "पठडीतले" उदाहरण नाही. म्हणून या थियर्यांमुळे कुठले सामाजिक किंवा आर्थिक धोरण बदलले ते मला ठाऊक नाही. त्यामुळे लेखकाने "सामाजिक/आर्थिक धोरण बदलण्याकरिता थियरीचा सुयोग्य वापर" याचे दुसरे कुठले उदाहरण द्यावे, ही विनंती आहे. त्या यशस्वी उदाहरणाशी तुलना करून "कितपत अज्ञान चालून जाते" याबाबत लेखकाचा उंबरठा कळू शकेल.
---
> प्रसिद्धी मिळते, रीसर्च करायला पैसा मिळतो, अनेक सरकारी समित्यांवर मानाची स्थानं मिळतात.
संशोधनाकरिता सुयोग्य आर्थिक चौकट काय आहे? लेखकाला मतलबी वाटणार नाही अशी कुठली सोय करता येईल, जेणेकरून असे संशोधन करणार्यांना वेतन मिळेल, संशोधनाकरिता होणारा खर्च निभावेल. आणि संशोधनाचे निष्कर्ष पसरवता यावे, पण संशोधकाला प्रसिद्धी मात्र मिळू नये (आपमतलब टाळण्याकरिता) अशी कुठली व्यवस्था उभारावी काय? सरकारने सल्लागार समित्या न नेमता दुसर्या कुठल्या तर्हेने संशोधनाचा धोरणाशी दुवा जुळवावा काय? किंवा फक्त समित्यांचे सदस्यत्व मानाचे नसावे, अशी काही कारवाई करावी?
(येथे असे काही नेमके म्हटलेले नाही. तरी असा काहीसा वास येतो, म्हणून हा मुद्दा : सरकारी अनुदान आणि कॉर्पोरेट संशोधन दोहोंमध्ये एकांगी संशोधन केल्याचा फायदा तुल्यबल असतो, हा विचार भासतो. असा विचार पुरेशा साधनसामग्रीअभावी केलेला भासतो. फार्मा कंपन्यांनी प्रसिद्ध केलेल्या संशोधनाबाबत पुढील निबंध वाचता येईल : http://www.bmj.com/content/326/7400/1167
तापमानवाढीबाबत म्हणावे, तर कोळसा-कंपन्यांनी प्रसिद्ध केलेले संशोधन आणि सरकारी अनुदानाने घडलेले संशोधन यांच्या एकांगीपणात असाच फरक असू शकतो. कदाचित त्याचा अभ्यासही झालेला असेल.)
१. काही देशांतील पाऊस कमी
संदर्भ हवे आहेत. यात 'कुठे बरं लिहिलंय असं, दाखवा पाहू?' असा पवित्रा नसून, आत्तापर्यंतचं नुकसान, आणि भाकित केलेलं नुकसान याविषयीची शक्य तितकी माहिती जमवायची आहे.
मी अजूनही जागतिक तापमानवाढीविषयी बोलत नाहीये. सर्वसाधारण धोक्याच्या घंटा वाजवणाऱ्या थिअरींबद्दल बोलतो आहे. त्यामुळे दिलेली लक्षणं सर्वसाधारण आणि काहीशी मोघम आहेत, प्रत्येक मुद्दा प्रत्येक थिअरीला लागू होईलच असं नाही. कृपया लेखातली शेवटची दोन वाक्यं वाचावी.
आयपीसीसी अहवाल पीडीएअफ
सखल प्रदेशांबाबत :
http://www.ipcc.ch/pdf/assessment-report/ar4/wg2/ar4-wg2-chapter6.pdf
उपविभाग ६.२.५ - "ऑब्झर्व्हड चेंजेस" वगैरे
> सर्वसाधारण धोक्याच्या घंटा वाजवणाऱ्या थिअरींबद्दल बोलतो आहे.
मीदेखील. उदाहरणार्थ आय एम एफ चा हा अहवाल बघावा :
http://www.imf.org/external/pubs/ft/weo/2008/01/pdf/c4.pdf
चित्र ४.३
अवांतर
धनंजय यांच्या प्रतिसादात,
असे म्हटले आहे. त्याविषयी घासूगुर्जींचं म्हणणं काय आहे? विशेषतः हा "उंबरठा" स्पष्ट झाला तर इतर अनेक मुद्दे आपसूक स्पष्ट होतील.
स्वगत: या धनंजयइतकं थंड डोक्यानं लिहायला शिकलं पाहिजे. जे म्हणायचं होतं, ते म्हणता येत नव्हतं. ते यानं नेमकं पकडलं आहे.
सहमत आहे!
सहमत आहे!
इथे मला वेगवेगळ्या संशोधनांतील सिद्धांतांच्या वेगवेगळ्या उंबरठ्यांबद्दल प्रश्न पडला होता; पण तो, निर्विकार भाषिक अचूकता आणि विशिष्ट क्लिष्टता यांच्या अभावी तितकासा बौद्धिकदृष्ट्या आवाहक झाला नाही.
शिवाय एखाद्याने भावनाशील असणे चांगले असले तरी ती भावनाशीलता भाषेत उतरल्यास लिहीलेले अचूक नसावे असा पूर्वग्रह होत असावा अशी माझी धारणा झाली आहे, याउलट निर्विकार भाषेत पक्षपाती लेखन केले तरी ते अचूक असावे असा सामान्यतः पूर्वग्रह होत असावा असे वाटते. अर्थात हाही संशोधनाचा विषय आहे
तरीही,
धनंजय यांच्याइतकं थंड डोक्यानं लिहायला शिकलं पाहिजे याच्याशीही सहमत.
आंशिक सहमती/असहमती
भावना गुंतल्या तर एखादे कार्य करत राहायला जोम येतो. त्या गुंतल्या नसतील तर कार्य सोडून द्यावेसे वाटते. चळवळीत आपल्या पक्षात असलेल्या लोकांचे मनोबल कायम ठेवण्याकरिता भावनिक आवाहने आणि चेतना अमूल्य असतात. (इतपत असहमती.)
आता दोन विरोधी विचारधारांचे बघावे. दोन्हीकडे भावनेने प्रेरित लोक असले, तर मात्र तुम्ही म्हणता त्याच्याशी सहमती आहे. अशा संवादांत प्रकट भावनाशीलता बहुधा तोट्याची. कारण विरुद्ध बाजूसुद्धा भावनेने भारलेली असते. त्या भावनेचे खरेपण प्रत्यक्ष अंतर्मनात अनुभवलेले असते. अंतर्मनाच्या प्रत्यक्ष अनुभवामुळे अन्य लोकांच्या विपरित भावना उथळ, अविचारी किंवा मतलबी मानायची शक्यताच फार.
कुठल्या चर्चासत्रात भावनाशीलता दाखवून हुरूप वाढतो, कुठल्या चर्चासत्रात भावनाशीलता दाखवून देवाणघेवाण खुंटते? हे ओळखले, तर कार्यक्षम संवाद साधता येतो.
---
क्लिष्टतेबाबत मात्र पुरती असहमती : ज्या लोकांना थेट आणि असंदिग्ध भाषेत मुद्दे मांडता येतात, त्यांना भावनिक आणि तटस्थ दोन्ही संवादांत अधिक यश मिळते.
उंबरठा
माझा मुद्दा 'अज्ञात/कमी शक्यतेच्या थिअरींवर/धोक्यांवर कार्यच करू नये' असा अर्थातच नाही. उंबरठ्याचा मुद्दा रास्त आहेच. माझा सर्वसाधारण युक्तिवाद असा आहे की शक्यतांचे खूप मोठे उंबरठे पार केलेली अनेक कामं बाजूला पडलेली असताना अज्ञात/कमी शक्यतेच्या धोक्यांचा विचार नंतर करावा - किंवा त्यासाठी धोका/खर्च यांच्या प्रमाणात संसाधनं द्यावीत.
धोक्याची घंटा वाजवणाऱ्या थिअरीपैकी काही थिअरींत प्रश्न आहे त्यापेक्षा प्रचंड मोठा असल्याचा दावा केला जातो. एक लांडगा आला आहे असं सांगितलं तर त्याला मारण्यासाठी चार माणसं यावीत. हे रास्त आहे. त्याऐवजी शंभर लांडगे आहेत असा ओरडा केल्याने तीनशे माणसांना हातातलं काम टाकून यावं लागतं. तसं झालं तर उपलब्ध तोकड्या संसाधनांची नासाडी होते.
आता मुद्दा मोजमापाचा झाला आहे
आता मुद्दा मोजमापाचा झाला आहे. हे चांगले.
किती माणसे काम सोडून लांडग्यामागे आली आहेत, हे आता तर्कशास्त्राचे नव्हे, तर मोजमापाचे कार्य झाले.
---
एक मिती सरकारी प्राथमिकतांची.
हे मोजण्याकरिता "राष्ट्रीय अर्थसंकल्पातल्या कुठल्या खात्यातून पैसे कमी झाले, आणि या खात्यातले वाढले" हा हिशोब कदाचित चालेल.
काही देशांचे अर्थसंकल्प आकडेवारीनिशी सापडले तर बघायला पाहिजे. "लोकांना अर्थसंकल्पांबाबत काय वाटते?" असे चालणार नाही. मागे वाचले होते, की कित्येक अमेरिकन नागरिकांच्या मते यू.एस. अमेरिकेच्या आर्थिक उलाढालीतील परदेश-मदत ५-१०% पेक्षा अधिक होती. खरे प्रमाण ०.५% पेक्षा कमी आहे.
---
सरकारचे सोडून घरगुती (हाउसहोल्ड ही तांत्रिक संज्ञा) व्ययाची मितीसुद्धा बघू शकतो :
ज्या देशांत "कार्बन क्रेडिट" बाजारपेठ उभारली गेली आहे, अथवा ज्या देशांत तेलाची सबसिडी कमी केली आहे, किंवा कुठल्या देशात किनार्यावरच्या घरांचा विमा महाग सरकारी सबसिडी हटल्यामुळे झाला आहे... त्या देशांत सरासरी घरगुती खर्चांपैकी कुठले कमी झाले आहेत, आणि कुठले वाढले आहेत (घरगुती लोकांच्या हाताचे कितपत काम आदले सोडून लांडग्याच्या पाठी लागले आहेत) ते बघता येईल.
अर्थात वरील दोन्ही मितींकरिता या काळात जीडीपी/परकॅपिटाजीडीपी वाढला/घटला असेल, तर तेसुद्धा सुयोग्य रीतीने हिशोबात घ्यायला हवे.
---
आणखी एक मिती. अन्य चांगले बदल घटले आहेत का? हे दाखवण्याची :
जागतिक तापमान-वाढीवर खर्च होऊ लागण्याआधी जोमात नंतर खुंटलेला सामाजिक बदल कुठला? उदाहरणार्थ, बालमृत्यूदर घटणे, स्त्री-साक्षरता-दर वाढणे वगैरे (हे नव्हे तर दुसरे कुठले दर सुचवा). या दरांतला बदल पूर्वी अधिक जोमाने चालू होता, परंतु आजकाल (म्हणजे इ.स. २००५ला क्योतो करार अमलात आल्यावर) खुंटला आहे काय? शिवाय करारावर सही केलेल्या देशांत या दरांत चिंताजनक फरक झाला, कराराचा विरोध करणार्या देशांत नव्हे... हेसुद्धा दाखवायला हवे. (बालमृत्यूदराबाबत तरी असे काही दिसत नाही.)
---
यांपैकी कुठल्याही मितीत, विशेषतः तिसर्या मितीत विश्लेषण बघितल्यास लांडग्यांची उपमा अधिक पटेल. नाहीतर नाही.
बहुतेक लोक मान्य करतात
बहुतेक लोक मान्य करतात त्यापेक्षा सरकारं फार हुशार असतात असं माझं मत आहे. त्यामुळे सरकारं अमुक एखाद्या धोक्याच्या घंटेच्या विषयावर किती खर्च करतात यापेक्षा त्यांच्याकडून खर्च व्हावा अशी मागणी करण्याबाबत हे लेखन आहे.
शंका...
बहुतेक लोक मान्य करतात त्यापेक्षा सरकारं फार हुशार असतात असं माझं मत आहे.
हे नक्की कोणत्या बाबतीत आहे?
सर्वसाधारण आर्थिक स्थिती किंवा प्राशासनिक कारभारही सरकारचा फारसा कल्पक दिसतो का?
२००८च्या आसपासचा आर्थिक तडाखा त्या आधीच्या सरकारच्या अंदाधुंद रिअल इस्टेट मार्केटला सवलती देण्यातूनच निर्माण झाला ना? अगदि तोंडावर आला तरी तो त्यांना दिसला नाही का?
"त्यांनी(सरकारनी) लुडबूड थांबवली असती आणी जी क्षेत्रे पडताहेत ती तेव्हाच पडू दिली असती तर हा आघात फारच किरकोळ ठरला असता" असं काहीतरी क्रुगमन बोलल्याचं आठवतय.
माझी तक्रार :-
सरकार हस्तक्षेप करतं. त्यांचा हस्तक्षेप समस्या अजूनच चिघळवतं.
.
आता ह्याच धर्तीचं पर्यावरणाबाबतही लावून पाहता येइल.
दुसरं म्हणजे "कित्येकदा पॉप्युलिस्ट, सवंग अपेक्षांचा दबाव तयार झालेला असतो. त्यालाही, त्या तात्कालिक फायद्यालाही बळी पडून दूरगामी फायद्याचे निर्णय टाळले जातात" ह्या तक्रारीबद्दल काय मत आहे?
.
सरकार नक्की हुशार असते की बिनडोक ते माहित नाही. पण त्यांनी केलेल्या उचापत्यांनी समस्या तयार होतात; चिघळतात.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
>>दुसरं म्हणजे "कित्येकदा
>>दुसरं म्हणजे "कित्येकदा पॉप्युलिस्ट, सवंग अपेक्षांचा दबाव तयार झालेला असतो. त्यालाही, त्या तात्कालिक फायद्यालाही बळी पडून दूरगामी फायद्याचे निर्णय टाळले जातात" ह्या तक्रारीबद्दल काय मत आहे?
इथे आपल्याला जनलोकपालाचे उदाहरण घेता येईल. कुठलेच नियंत्रण नसलेला सर्वंकष-सर्वसत्ताधीश लोकपाल आणण्याविषयी पॉप्युलिस्ट आणि सवंग अपेक्षांचा प्रचंड दबाव सरकारवर तयार झाला होता. पण सरकारने त्याला बळी न पडता दूरगामी फायद्याचा निर्णय घेतला (त्यात विरोधी पक्षांचेही श्रेय आहे).
संसदहल्ल्यानंतर आणि २६ नोव्हेंबरनंतरही पाकिस्तानवर हल्ला करण्याविषयी सवंग आणि पॉप्युलिस्ट दबाव होता. त्या त्या वेळच्या सरकारांनी दूरगामी योग्य असलेलेच निर्णय घेतले.
संरक्षण खात्यावर खर्च करण्याविषयी मागणी नसते हे धनंजय यांचे मत पटले नाही. काही सरकारांवर तर "गवत खाऊन राहिलो तरी चालेल पण अणुबॉम्ब बनवायला हवा" इतकासुद्धा दबाव असतो.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
trap
इथे आपल्याला जनलोकपालाचे उदाहरण घेता येईल.
trap
संसदहल्ल्यानंतर आणि २६ नोव्हेंबरनंतरही पाकिस्तानवर हल्ला करण्याविषयी सवंग आणि पॉप्युलिस्ट दबाव होता.
trap
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
(अर्थसंकल्पातील) मागणी->पुरवठा याचे इन्पुट आउटपुट फंक्शन हवे
(अर्थसंकल्पातील) मागणी->पुरवठा याचे इन्पुट आउटपुट फंक्शन हवे.
१. इन्पुट-आउटपुट फंक्शन : मागणी करणारे लोक नेमका किती पैसा खर्च करण्याबाबत म्हणत आहेत? ही बाब महत्त्वाची असली, तर चर्चेत ही बाब थेट समोर यायला पाहिजे. "क्ष" मागणी करता साधारणपणे "य" अर्थसंकल्पात उतरते त्याचा अनुभव (इन्पुट आउटपुट फंक्शन) विश्लेषणात हवा. म्हणजे मागणी योग्य की अयोग्य ते ठरवण्याबाबत युक्तिवाद करता येईल.
२. अर्थसंकल्पातील वेगवेगळ्या कलमांकरिता वेगवेगळे मागणी-पुरवठा फलन : न-कुरकुरणार्या चाकांना वंगण मिळत राहिले, तर "कुरकुरणार्या चाकाने वंगण मागितले, बाकीच्या चाकांनी कुरकुर केली नाही, बाकीची चाके मोठ्या जरुरीची, काय हा अन्याय" अशा प्रकारची तक्रार अयोग्य वाटते. भरपूर कुरकुर करून थोडेसेच/योग्य इतपतच वंगण मिळणार असेल तर भरपूर कुरकुर करणे योग्यच. अर्थसंकल्पातील वेगवेगळ्या शाखांकरिता हे इन्पुट-आउटपुट फंक्शन वेगवेगळे आहे. उदाहरणार्थ, "सैन्यावरती क्ष%तरी खर्च हवा" अशी लोकांत मोठी चळवळ नाही, तरी त्या कलमाखाली खर्च होत राहातो. सैन्याकरिताचे जे इन्पुट-आउटपुट फंक्शन आहे, ते अन्य बाबतीत वापरले, तर "प्रकट मागणी अगदी कमी प्रमाणात करावी, प्रत्यक्षात भरपूर खर्च होईल अशी अपेक्षा करावी" असे चुकीचे धोरण मिळू शकते.
हुशार सरकारं
>>> बहुतेक लोक मान्य करतात त्यापेक्षा सरकारं फार हुशार असतात असं माझं मत आहे. <<<
हे मात्र मान्य व्हायलाच पाह्यजे. आपल्या महाराष्ट्राचंच घेऊया. गेल्या पंधरा वर्षांत म्हणे सत्तर हजार कोटी रुपये जलसंधारणाकरता केंद्रसरकारकडून मिळाले. आणि त्याच्या परिणामस्वरूपी जेव्हढी जमीन पाण्याखाली यायची त्याच्या सुमारे ०.०१ टक्के आली. असं असताना "सरकारं फार हुशार असतात आणि कुठल्या गोष्टीवर किती खर्च करावा याचं अचूक ज्ञान सरकारांना असतं" या विधानाचा आणखी मोठा पुरावा काय द्यायचा !
या संबंधी काही दुवे :
http://www.thehindu.com/news/national/irrigation-scam-a-drain-on-maharas...
http://tehelka.com/between-thirst-and-darkness/
http://tehelka.com/warped-schemes-parched-earth/
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
दुष्काळ पडलेला असताना
दुष्काळ पडलेला असताना सर्वसामान्यांचा सरकारवर राग उफाळून येणं साहजिकच आहे. त्यामुळे वाद घालत नाही. भारताची प्रगती ही मालिका वाचून ती होण्यासाठी वेगवेगळ्या सरकारांनी प्रयत्न केले नाही असं वाटत असेल तर तिथे चर्चा करू. 'सरकारं हुशार असतात' या दाव्याची या लेखमालेसाठी काहीच गरज नाही. अशा ऑफ द कफ रिमार्कमुळे जर कोणाची पिसं विसकटली असतील तर त्या जागी 'बहुतेक सरकारांनी अजून तरी मोठ्या प्रमाणावर या बाबतीत गुंतवणूक केलेली नाही (जी काही केली आहे ती पर्यायी ऊर्जेच्या निर्मितीसाठी केलेली आहे) हे मला रुचलेलं आहे.' असं वाक्य जरूर वाचावं.
सरकारं कशी मूर्ख असतात, किंवा निरुपयोगी असतात यावर स्वतंत्र धागा येऊ द्यावा. आनंदाने चर्चा करेन.
ऑफ द कफ रिमार्क्स
"ऑफ द कफ रिमार्क्स" वर बंदी आणली - किंवा ते काही लोकांनाच राखीव ठेवायचे असतील - तर मग संवादप्रस्तावाचं नि संवादप्रक्रियेचंच प्रयोजन काय असा प्रश्न उरतोच.
>>>दुष्काळ पडलेला असताना सर्वसामान्यांचा सरकारवर राग उफाळून येणं साहजिकच आहे. <<<<
सरकारवर आलेला राग हा भावनिक (आणि म्हणून चर्चेतून तात्काळ बाद करण्याजोगा !) मुद्दा असला तरी काही लोकांच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर झालेल्या भ्रष्टाचाराचा - अतएव एका अर्थाने मानवनिर्मित दुष्काळाचा - तो परिपाक आहे.
या "ऑफ द कफ" रिमार्कचा दुवा : http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/XYZ/entry/mahadrought?fb_ac...
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
ऑफ द कफ रिमार्क माझा होता.
ऑफ द कफ रिमार्क माझा होता. त्यामुळे बंदीचा प्रश्नच नाही.
माझ्या मते हा विषय स्वतंत्र लेख किंवा चर्चाप्रस्ताव होण्याइतका महत्त्वाचा आहे. त्याला 'धोक्याची घंटा' या विषयावर जागा देणं अवांतरच नाही, तर काउंटरप्रॉडक्टिव्ह होईल.
एक प्रश्न
आजच 'Scientists link frozen spring to dramatic Arctic sea ice loss' ही बातमी वाचली. या अशा बातम्या तुमच्या मते वर वर्णन केलेल्या चौकटीत बसतात का? वरवर चाळता असं दिसतं की बातमीमध्ये संशोधनाचा संदर्भ आहे.
किंवा २००६ सालचा 'Nepal's farmers on the front line of global climate change' हा लेख पाहा. त्यात असं म्हटलेलं आहे -
पाश्चात्य वाचकांना देणग्या देण्याचं आवाहन लेखाच्या अखेरीला केलेलं आहे. नाताळच्या आसपासचा हा लेख खास धर्मादायासाठी लिहिलेला असावा. पण त्यातून दिशाभूल केली जाते आहे किंवा उगीचच धोक्याची घंटा वाजवून भीती उत्पन्न केली जात आहे असं वाटतं का?
(एरवी 'गार्डियन'ची प्रतिमा ही सनसनाटी वृत्तपत्र अशी नाही; तर जबाबदारीनं वृत्तांकन करणारं अशी आहे. लेखातले दाखले ज्यांना लागू होतात त्यांत कोणत्या प्रकारचे दावे लेखकाला अभिप्रेत आहेत याविषयी स्पष्टतेची गरज भासली, म्हणून ही दोन उदाहरणं दिली.)
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
दोन्ही बातम्यांत काहीच
दोन्ही बातम्यांत काहीच सनसनाटी नाही. मात्र दुसऱ्या लेखात बिटवीन द लाइन्स खालील गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्यांकडे दुर्लक्ष करता येत नाही.
- ब्रिटनसारख्या प्रगत देशांनी कार्बन् प्रचंड वापरला म्हणून त्याचे परिणाम नेपाळसारख्या गरीब देशाला भोगावे लागत आहेत.
- या प्रगतीचा फायदा म्हणून ब्रिटनचे नागरिक नेपाळींच्या १२५ पट उत्पन्न मिळवतात.
- तेव्हा त्यांनी आपापल्या खिशातनं पैसे काढून द्यावेत. हे जवळपास त्यांचं कर्तव्य आहे.
ब्रिटन श्रीमंत का आहे आणि नेपाळ गरीब का आहे या वादात मला शिरायचं नाही. मात्र (प्रगत) माणसांनी कार्बन् वापरून पर्यावरणाची नासाडी केली त्यातून हे सर्व प्रश्न निघाले असं गृहितक उघड उघड वापरलेलं आहे. ते म्हणण्याची गरज पडत नाही, कारण ते बहुतेक वाचकांच्या मनात असतंच. (हे मला किती वेळा सांगावं लागणार कोण जाणे पण) पर्यावरणात बदल होत आहेत, तापमान वाढतं आहे हे मी मान्य करतोच. मात्र त्यात मानवाचा हात किती आहे याबाबत शंका वाटते. तसंच मानवाने आपलं जीवन बदललं तरी हे बदल व्हायचे थांबतील यावरही विश्वास ठेवण्यासाठी काहीच आधार नाहीत.
आता तुम्ही एक प्रयोग करून पहा. ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज गूगल करून पहा. दोन्हीचे मिळून सुमारे दीड बिलियन रिझल्ट्स येतात. त्यानंतर डायरिया, पॉवर्टी, हंगर, चाइल्ड मॉर्टॅलिटी, मालन्यूट्रिशन असे सध्याचे महत्त्वाचे प्रश्न असलेले कीवर्ड सर्च करून बघा. या सर्वांसाठी मिळून फक्त चारशे मिलियन उल्लेख सापडतात. या सर्वांमुळे जो तोटा पुढच्या वर्षी निश्चित होईल तेवढा तोटा ग्लोबल वॉर्मिंगमुळे पुढच्या काही दशकांत कदाचित होईल. ग्लोबल वॉर्मिंग कदाचित माणसामुळे आहे. मात्र श्रीमंत जगाचा (इंटरनेट वापरणारे) माइंडशेअरचा अतिरेकी मोठा हिस्सा क्लायमेट चेंजने व्यापला आहे. या परिस्थितीबद्दल माझी तक्रार आहे.
दोन प्रश्न
गूगलवर सर्चमध्ये एखाद्या गोष्टीविषयी अधिक निकाल येणं याचा राष्ट्रीय/जागतिक पातळीवरचे प्राधान्यक्रम अन् त्यात असलेला पैसा यांचा परस्परसंबंध आहे का? तसं होत असेल तर ते जास्त गंभीर ठरेल. मला वाटतं की त्यापेक्षा प्रतिगामी-पुरोगामी यांच्यामध्ये जे वादग्रस्त विषय आहेत त्यांचा आणि गूगलवर सर्चमध्ये येण्याच्या त्या त्या विषयाच्या प्रमाणाचा अधिक संबंध असू शकेल. उदाहरणार्थ, उत्क्रांतीविषयीही कदाचित (उदा : डायरियाच्या तुलनेत) असंच म्हणता येईल की माइंडशेअर अधिक आहे.
हवामान बदलाच्या तुलनेत डायरिया हा अधिक चांगला समजलेला प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर चिंतन कमी होत असेल तर ते ठीकच नाही का?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
प्राथमिक प्रयोग
हा अत्यंत प्राथमिक प्रयोग होता. पण मला वाटतं या प्रकारचं काहीतरी मोजमाप करता यावं. कोणीतरी केलेलंही असावं. उदाहरणार्थ 'जगापुढे सध्याच्या सर्वात मोठ्या समस्या काय आहेत?' असा प्रश्न विचारल्यावर काय उत्तरं मिळतील? माझा अंदाज आहे की डायरियापेक्षा ग्लोबल वॉर्मिंगचा नंबर वरचा लागेल.
(प्रतिसाद लिहिल्यानंतर थोडी शोधाशोध केली तर पुढील लिंक सापडली.)
http://www.news.cornell.edu/stories/July08/world.crises.sl.html
क्लायमेट चेंज, ग्रहाची तब्येत, माणसांकडून पर्यावरणाचा दुर्वापर अशा तीन गोष्टी दहात आल्या. गरीबी, आणि पिण्याचं पाणी त्या तिन्हीच्या खाली आलं. या सर्व्हेपेक्षा वेगळी उत्तरं देणारे सर्व्हे बघायला आवडेल.
Cornell faculty identify climate change as world's most pressing problem, study finds
10 most important problems
• Climate change and its effects on ecosystems (4.39, 2.63)
• Corporations have too much influence in governing (4.24, 3.35)
• Lack of long-term perspective in political, environmental and social actions (4.23, 2.69)
• Humans are unsustainably exploiting the environment (4.13, 2.79)
• Maintaining the health of the planet (4.1, 2.67)
• Lack of global responsibility on the part of corporations, governments and individuals (4.03, 2.97)
• Global poverty and its effects (3.98, 2.48)
• Inequitable distribution of wealth among people (3.97, 2.32)
• Unsuitable growth in energy use (3.96, 2.95)
• Shortage of potable and clean water (3.94, 3.59)
चांगला दुवा
चांगला दुवा. त्या यादीच्या खालीच "जगातील दहा सर्वात निरसन करण्यालायक समस्या" ही यादी दिली आहे.
10 most easily solved problems
• Lack of sufficient education in science, critical thinking and environmental issues (3.8, 3.87)
• The epidemic of preventable illnesses in the third world (3.44, 3.81)
• Inequitable access to health care (3.86, 3.77)
• Loss of civil liberties in the U.S. under the guise of fighting terrorism (4.02, 3.75)
• Shortage of potable and clean water (3.94, 3.59)
• Death of children due to preventable causes (3.38, 3.35)
• Women's reproductive health, education, control and options are dictated by others (3.85, 3.34)
• People and governments are paying less attention to basic science research (3.74, 3)
• Growing obesity that impacts health by increasing the risk of chronic diseases (3.59, 2.89)
• Children's activities are too structured and do not engage them in community (3.78, 2.64)
येथे शिक्षण, आरोग्य सर्वात वरच्या पायरीवर येतात. हे काहीसे चिंतातुर जंतूंच्या म्हणण्यासारखे आहे. काही समस्या कशा सोडवता येतील हे स्पष्ट आहे (most easily solved), आणि काही समस्या महत्त्वाच्या (most important) आणि जटिल आहेत. हा भेद सर्वेक्षणात उत्तरे देणार्यांना ठाऊक होते. माइन्डशेअर बाबत चर्चा करताना हा भेद लक्षात ठेवायला पाहिजे.
(मी आजतागायत गणित शिकतो आहे. बेरीज-वजाबाकीची गणिते रोजच्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहेत. पण बेरीज-वजाबाकीची गणिते कशी सोडवावी या अभ्यासात माझी फारशी माइन्डविड्थ खर्च होत नाही. सांख्यिकीमधील काही नवीन पद्धती मी वर्षातून एखाद्यावेळा वापरेन असे वाटते, त्या मन लावून शिकतो आहे - भरपूर माइन्डविड्थ खर्च करतो आहे. माइन्डविड्थची अशी विभागणी केल्यामुळे माझे फारसे नुकसान होत नाही, असा माझा दावा आहे.)
Maintaining the health of the
Maintaining the health of the planet (4.1, 2.67) (म्हणजे नक्की काय कोण जाणे) हा माणसापुढला प्रश्न असु शकतो याचीच गंमत वाटली. मी अहंगंड अहंगंड म्हणतो आहे तो यालाच!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
का बरे?
"मनुष्यांच्या विचार आणि कार्यास सुसंदर्भ" असे अध्याहृत तितकेसे स्पष्ट नाही काय?
म्हणजे मनुष्यांच्या कार्या-धोरणांशी नि:संदर्भ अशा प्रचंड घटना पृथ्वीच्या गर्भात घडत आहेत - किरणोत्सारी पदार्थांच्या विघटनामुळे लाव्हाचे द्रवीभवन, त्यावर तरंगणार्या महाखंडांची हालचाल... वगैरे. त्यांच्याबाबत "Maintaining the health of the planet (4.1, 2.67)" नाही : हे अध्याहृत सुस्पष्ट नाही काय?
एखादा प्रश्न "एका देशापेक्षा अधिक + सर्व प्रदेशांस लागू" असला, तर त्याला "जागतिक"/"पृथ्वीस लागू" असे म्हणणे सोयीचे नाही काय? अहंगंड टाळायचा असल्यास अशा प्रश्नांकरिता कुठला शब्द वापरावा? नवीन शब्द घडवणे अथवा संदर्भानुसार "पृथ्वीचे आरोग्य" शब्दाचा अर्थ "मनुष्यांच्या विचार आणि कार्यास सुसंदर्भ" असा लावणे तितक्याच यत्नाचे आहे.
आता अहंगंड आहे किंवा अहंगंड नाही असे ठरल्यामुळे काय क्रियात्मक फरक पडणार आहे? अहंगंड आहे असे ठरल्यास अमुक कारवाई करू नये, अहंगंड नाही असे ठरल्यास अमुक कारवाई करता यावी, असा काही प्रत्यक्ष परिणाम होणार आहे काय? "अहंगंड" या भावुक ठरावापेक्षा पुढील निकष बरा : "कारवाई करून जो फरक पडायचा ते मोजमाप करू, फरक पडत नसल्यास कारवाई व्यर्थ आहे"
---
वैयक्तिक उदाहरण बघू :
एखादी परिचारिका हागवण झालेल्या बाळाला स्वच्छ पाणी (ओरल रिहायड्रेशन वगैरे) पाजत असेल. "उपचाराने वेदना शमतील आणि मृत्यू टळेल" असे परिचारिकेने म्हटले, समजा. तर अखेर मृत्यू अटळ आहे, आज नाही तर उद्या वेदना होतीलच, तिकडे शेकडो बाळे आजही तडफडत आणि मरत आहेत, अगदी याच बाळाच्या पोटातील जंतू मोठ्या प्रमाणात मरत आहेत... हे सर्व मुद्दे त्या वाक्यात येत नाही. परिचारिकेच्या मनातही ते आले नसतील. म्हणून कदाचित परिचारिकेचा "आपण अवघ्या वेदना शमवू शकतो, अवघे मृत्यू टाळू शकतो" असा अहंगंड आहे, असे आपण ठरवूदेखील.
परंतु "या बाळाची नाडी, या जिभेचा सुकलेपणा, हे बाळ हसणे, हालचाल करणे..." वगैरे, हे उपचाराचे मोजमापे करण्यालायक फरक आहेत, हे त्या परिचारिकेला ठाऊक आहे. आणि तशी मोजमापे ती करतसुद्धा आहे. अन्य बाळे मरत आहेत, आणि हे बाळही पुढे कधी मरणार आहे, ही नम्र भावना असलेली शेजारची परिचारिकासुद्धा नेमकी हीच मोजमापे करते, आणि उपचारही तसाच करते. अहंगंड असलेल्या परिचारिकेने उपचार थांबवावा, नम्र परिचारिकेने चालू ठेवावा, असे काही आहे का?
माझे असे मत आहे : मोजमापांबाबत संदेह नसेल, तर "वेदना शमणे आणि मृत्यू टळणे" म्हणजे "या एका बाळाची वेदना सध्या शमणे आणि तात्पुरता मृत्यू टळणे" असा संदर्भानुसार अर्थ लावून काम चालते. अहंगंडाचा आरोप टाळूनही तटस्थ व्यक्तीला घटनेचे वर्णन करता येते. (ऑकमच्या वस्तर्याने वर्णनातून अहंगंडाचा आरोप कातरता येतो.)
त्याच प्रमाणे वरील यादीतील "पृथ्वीचे आरोग्य" अहंगंडाचा ठराव बाजूला ठेवून समजून घेता येते.
+१०१०१००.अहंगंडाचा आरोप इथे
+१०१०१००
अहंगंडाचा आरोप इथे इर्रिलेव्हंट आहे हे नेमकेपणाने दाखवल्याबद्दल बहुत धन्यवाद.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
म्हणजे मनुष्यांच्या
नाही. ते अध्याहृत पुरेसे सुस्पष्ट नाही.
विशेषतः हा घटक ज्या यादीत आहे त्यात माणसाशी संबंधीत अनेक घटक आधीच येऊन गेले आहेत. जसे Climate change and its effects on ecosystems, Lack of long-term perspective in political, environmental and social actions आणि Humans are unsustainably exploiting the environment वगैरे मुद्दे इतरत्र आहेत मग जेव्हा Maintaining the health of the planet असे 'एक्स्प्लिसिटली' (मराठी?) म्हणावे लागते आहे तेव्हा ते माणसाशी नि:संदर्भ घटकांबाबत नाही हे अध्याहृत सुस्पष्ट कसे?
किंबहूना या नि:संदर्भ घटकांबाबतही हा मुद्दा आहे असे मला वाटते.
नाही. तो फार तर अखिल मानवजातीशी निगडीत प्रश्न म्हणता येतील. "आपल्या ग्रहाच्या तब्येतीचे व्यवस्थापन" हे मला तरी चुकीची शब्दयोजना वाटते. मात्र माणसाचा अहंगंड आणि विचार करायची पद्धत विचारात घेतल्यास तर वाक्याला अधिक अपेक्षित अर्थ प्राप्त होतो.
केवळ यत्न तितकाच आहे म्हणून अर्थ वेगळे असूनही नवा व अधिक योग्य शब्द योजणे का टाळावे? हे तुमचे मत अजिबातच चुकीचे वाटते. किंबहुना दुसरी योग्य शब्दयोजना मुद्दाम टाळली आहे कारण तुम्हाला अपेक्षित अर्थ प्रतीत करायचाच नाहिये हा दावा मी केला तर तो कसा बरे खोडता येईल?
होय माझ्या दृष्टीने फरक पडणार आहे. केवळ अहंगंड शमण्यासाठी ग्रहाच्या मेंटेनन्सच्या नावाखाली पैसे वाया घालवायला मी तयार नाही. (मात्र माणसाला वाचण्याच्या स्वार्थी कारणासाठी काही प्रमाणात पैसे द्यायची / गुंतवायची माझी तयारी आहे.)
बाकी वैयक्तीक उदा आणि मुळ मुद्याचा संबंध समजला नाही किंवा जो समजला तो अजिबात संबंधित वाटला नाही त्यामुळे त्याबद्दल काहिच प्रतिक्रीया नाही.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
(ब्रॅण्ड रिकॉलसारखं) समस्या
(ब्रॅण्ड रिकॉलसारखं) समस्या रिकॉल मध्ये ग्लोबल वॉर्मिंग हगवणीच्या वर येत नसले तरी त्याचा अर्थ हगवणीला लोक महत्त्व देत नाहीत असे नाही हे बरोबर आहे. म्हणून तुलना करण्यासाठी ग्लोबल वॉर्मिंगवर मात करण्यासाठी तिसर्या जगातल्या देशांनी (भारत, पाकिस्तान, चीन, ब्राझील) किती खर्च करावा अशी अपेक्षा केली जात आहे (क्योटो करार वगैरे) आणि त्याच्या तुलनेत हगवण नियंत्रणासाठी (प्राथमिक आरोग्य केंद्रे, स्वच्छ पाणीपुरवठा सर्वांसाठी, कचरा व्यवस्थापन, प्रसिद्धी वगैरे) किती खर्च त्या राष्ट्रांमध्ये केला जात आहे ही आकडेवारी काढून बघता येईल.
खोडसाळपणा: गूगल सर्चमध्ये गरीबी ही ग्लोबल वॉर्मिंगच्या पेक्षा खाली दिसते हाच विदा घासकडवी गरीबी हटत आहे- देशाची प्रगती होत आहे हे सिद्ध करण्यासाठी वापरणार नाहीत अशी आशा आहे. (घासुगुर्जींनी हलकेच घ्यावे)
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
म्हणून तुलना करण्यासाठी
प्रयत्न चालू आहे. कोणी मदत केल्यास आवडेल.
खो़डसाळपणा आवडला हे वे सां न ल.