Skip to main content

काय करता! (उर्फ मातृभाषा आणि काही गट)

2 minutes

मातृभाषेबद्दल आस्था असलेल्या माझ्यासारख्या लोकांना एकाच वेळी अनेक निरनिराळ्या आघाड्यांवर झगडावं लागतं.

अ] अतिविशाल गट
एकीकडे नवश्रीमंत, मराठीबद्दल तुच्छता/न्यूनगंड बाळगणारे, अर्धवट आंग्लाळलेले, नवश्रीमंत लोक. या गटातले लोक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांत घालतात. वटपौर्णिमेच्या जोडीनं करवा चौथही साजरा करतात नि ’छान दिसतं’ म्हणून ’मांगमें सिंदूर’ भरतात. शक्यतो लोकांकडून मागून किंवा पायरेटेड कॉपीजमधून पुलं, वपु, मृत्युंजय, स्वामी, सिडने शेल्डन, चेतन भगत वाचतात. प्रशांत दामलेची नि हल्ली ’हर्बेरियम’मधली मराठी नाटकं बघतात. चर्चाबिर्चांबद्दल यांना पोटातून भीती कम तिरस्कार असतो, पण हे तसं उघडपणे म्हणू धजत नाहीत. या गटाला आपण अतिविशाल गट म्हणू.

आ] डांबरीकरण गट
दुसरीकडे प्रश्नांचं घातक सुलभीकरण करणारे, न्यूनगंडातून येणारा उद्धटपणा बाळगणारे, दस्तावेजीकरण-संशोधन-अभ्यास यांची गरजच काय, असा प्रश्न विचारणारे लोक. यांच्यातल्या बहुसंख्यांच्या ’ण’ नि ’न’च्या वापराबद्दल नाक मुरडण्याची प्रथा ’अ.वि.’ गटात आहे. (पण ’न’ नि ’ण’चा तथाकथित थारेपालट ही काही या गटात असण्याची पूर्वअट नाही). यांची मुलं तूर्तास इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नसतात. पण पहिलीपासून इंग्रजी सुरू झाल्यानंतर हेच लोक सर्वाधिक सुखावलेले असतात. ’मराठी माणूसच मराठी माणसाचा पाय ओढतो’ अशी तक्रार हे जगातल्या कुठल्याही प्रश्नाच्या उत्तरादाखल करू शकतात. दीर्घकालीन, वास्तवादी आणि किचकट उत्तरं यांना सहन होत नाहीत. त्यावर ते हमखास बिथरतात. या गटाला आपण डांबरीकरण गट म्हणू.

इ] चर्चील गट
तिसरीकडे निष्क्रिय, उदासीन, स्थितिवादी, इंटुक लोक. यांना संस्कृत, इंग्रजी किंवा युरोपियन भाषा यांपैकी एका तरी भाषेबद्दल मातृभाषेपेक्षाही जास्त प्रेम असतं. हे सहसा फिल्मफेस्टिवल्समधून किंवा प्रायोगिक नाटकांना भेटतात. काहीही लोकप्रिय झालं की ते वाईट, निकस असणारच, असा यांचा ठाम विश्वास असतो. यांचीही मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळांत असतात. पण ’त्याबरोबर आम्ही त्यांना उत्तमोत्तम मराठी साहित्याची ओळख करून देतो’ असं पालुपद जोडायला ते विसरत नाहीत. ’ष’चा अचूक उच्चार; चीज, वाईन, मोदक अशी अभूतपूर्व रेंज असलेल्या पदार्थांतली जाणकारी; गर्दीबद्दल कमाल तुच्छता नि तिरस्कार; ग्रेसबद्दल भक्तीच्या पातळीवरचं प्रेम; न कंटाळता कितीही चर्चा ही यांची खास लक्षणं. या गटाला आपण चर्चील गट म्हणू.

काही पोटगटही असतात. ’मरू दे ना च्यायला, आपल्याला काय करायचंय?’ हे घोषवाक्य असणारा ’आपल्याला काये’ गट; मराठीबद्दल प्रामाणिक, निरागस, घोर अज्ञान असणारा, फक्त क्रियापद तेवढं मराठी वापरून बोलणारा ’पत्र नव्हे मित्र’ गट; ’विलायती शब्दांचं आक्रमण होता कामा नये’ असा अभिनिवेश बाळगून ’मोबाइल नाही, भ्रमणध्वनी म्हणा’ असा हट्ट धरून बसणारा ’सावरकर बुद्रुक’ गट...

माझ्यासारख्या लोकांना वेळ बघून या सगळ्या आघाड्यांवर दोन हात करावे लागतात. कधी एका गटाला पाठीवर घेतलं, तर दुसर्‍याच्या तात्कालिक आश्रयाला जावं लागतं. कधी एकाला सहानुभूती दर्शवली, तर दुसर्‍याला ठेचावं लागतं. कधी सगळ्यांनाच थोडं चुचकारावं लागतं. कधी सगळ्यांना एकाच वेळी अंगावर - शिंगावर घ्यावं लागतं. कुणाशीच कायमस्वरूपी पातिव्रत्य ठेवून चालत नाही. कुणाशीच हाडवैर घेण्यात रस नसतो.

कारण शेवटी हे सगळे लोक तोंडानं काहीही बरळत असोत, शेवटी बोलतात माझ्याच भाषेत - मराठीत. काय करता!

Node read time
2 minutes

बॅटमॅन Fri, 16/08/2013 - 23:42

आवडलं.

चर्चिल गटाचे वर्णन लै आवडलं विशेषतः. सर्वांत वायझेड असतील तर हे असे लोक. आंजावरही असे लै णमुणे दिस्तात. यांचा "माय"देश तसा वेगळाच असतो. खरे तर आपण स्वर्गलोकातले, पण मृत्युलोकात रहावं लागतंय असा एकूण गळेकाढू सूर ते लोक विभिन्न प्रकारांनी आळवतात तो फार पथेटिक आणि म्हणून मनोरंजक असतो.

आदूबाळ Sat, 17/08/2013 - 00:35

हे हे हे. जबराच!

या गटांना राजकीय विचारसरणीचा छेद दिला की चित्र पूर्ण होईल. :)

बाकी अतिविशाल गट आणि प नव्हे मि गट जवळजवळ एकच. तसंच चर्चिल गट आणि सा बु गट सुद्धा! चर्चिल लोकांच्या श्रद्धास्थानांमध्ये जीए राहिले.

अवांतरः हे "इंटुक लोक" मधलं इंटुक काय असतं?

मेघना भुस्कुटे Sat, 17/08/2013 - 09:38

In reply to by आदूबाळ

डांबरीकरण गटातले लोक हे जनरली राजकीय 'दांड'गटांची (शब्दाचे श्रेयः गणेश मतकरी) आयती मेंढरं असतात.
प.न.मि. गट नि अतिविशाल गट एकच नव्हे. प.न.मि. गट हा मुख्यत्वेकरून सळसळत्या, तरुण रक्ताचा गट असतो. नि त्याहून इंट्रेष्टिंग बाब म्हणजे तो या तिन्ही गटांचा पोटगट असू शकतो.
सा.बु. गट मात्र बरेचदा चर्चील गटातच सापडतो. पण चर्चील गटाप्रमाणे हा गट आंतरराष्ट्रीय नव्हे, किंवा ते फिल्मफेस्टिवल नि प्रायोगिक नाटकांकडे फिरकत नाहीत. त्यांचं प्रेम बहुतकरून संस्कृतवरच. नि 'इंग्रजी कशी वाढली... तसं केल्याशिवाय मराठीचं काही व्हायचं नाही' असा हमखास गंड त्यांना असतो.

जयदीप चिपलकट्टी Sat, 17/08/2013 - 00:47

> कुणाशीच कायमस्वरूपी पातिव्रत्य ठेवून चालत नाही.

तेव्हा या सगळ्याच गटांना तुम्ही cuckold करून टाकलं अाहे म्हणा की! (संदर्भ: ही चर्चा).

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 17/08/2013 - 02:13

तुझ्यासारखंच झगडावं लागतं, पण ते बोलीभाषेबद्दल.

म्हणजे मुळात मी एका शहरातली. तिथे काही प्रमाण मराठी बोलत नाहीत, कारण सदाशिव पेठ या शहरात नाही. पण सदाशिव पेठेतल्या लो़कांशी बोलताना, आपण बाहेरचे आहोत, हे लक्षात येणार नाही इतपत प्रमाण मराठी बोलता येते. बाकी दुनियाभराची मराठी आणि इतर भाषा कानावर पडतात. फक्त मराठीच नाही तर ज्या दोन-चार भाषा समजतात त्यांतल्या वेगवेगळ्या वर्गाच्या भाषा कानावर पडतात. आणि मग उत्स्फूर्र्तपणे बोलताना यांची काहीतरी 'भेसळ' (किंवा मिसळ, एन्चिलाडा, काय हवं ते म्हणा!) तोंडात येते. आणि मग पातिव्रत्य राखण्याचे कष्ट करण्यापेक्षा जारिणी बनणं फारच सोपं असतं.

या गटोपटांमधली 'पत्र नव्हे मित्र' गट आणि ’सावरकर बुद्रुक’ गट ही नावं फारच आवडली. हे लोक बहुदा फार जास्त डोक्यात जातात म्हणून असेल कदाचित!

मेघना भुस्कुटे Sat, 17/08/2013 - 09:58

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पातिव्रत्य नाहीतरी बोअरिंगच!
बाकी नावांबद्दल: या नावांचं स्फूर्तिस्थान डॉ. विवेक बेळेंची नाटकं आहेत. त्यांच्या नाटकांतून ही असली अतरंगी आणि चपखल नावं असतात. (पेन्सिल, चाकू, पुस्तक - माकडाच्या हाती शॅम्पेन, कोकरू गट इ. - काटकोन त्रिकोण) हे वाचून माझी मलाच त्यांची आठवण झाली.

प्रकाश घाटपांडे Sat, 17/08/2013 - 10:02

मस्त, मेघना!
काही चतुर लोकांचा गट या सर्व गटांशी संधान बांधून असतो. मला ईद्वान म्हणा असाही गट असतो.

तिरशिंगराव Sat, 17/08/2013 - 11:38

सर्व गटांची वर्णने वाचून मी कुठल्या गटात बसतो याचा शोध घेतला असता धक्कादायक वास्तव समोर आले. चर्चिल गटातली बरीच वैशिष्ठ्ये मला चक्क फिट बसताहेत.
फक्त,
मला ग्रेसविषयी आंधळे प्रेम नाही, कारण त्याआधी ग्रेस समजायला पाहिजे.
मराठीपेक्षा जास्त असे दुसर्‍या कुठल्याही भाषेवर प्रेम नाही.
घरांत लोकशाही असल्याने, मनाला मुरड घालून, मुलांना ईंग्रजी माध्यमात घातले.

लेख आवडला. आणखी गट वर्णन करता आले तर पहा, म्हणजे आणखी चर्चा करता येईल.
जाताजाता: चर्चिल लोक त्या 'चर्चिल' प्रमाणेच 'देसी' लोकांना तुच्छ समजतात.

बॅटमॅन Sat, 17/08/2013 - 15:27

In reply to by तिरशिंगराव

चर्चिल लोक त्या 'चर्चिल' प्रमाणेच 'देसी' लोकांना तुच्छ समजतात.

अगदी, अगदी!! तुच्छ समजण्यात चर्चिल लोक लंबर येक असतात.

ऋषिकेश Sat, 17/08/2013 - 15:04

भ ह न्ना हा ट!!
फक्त अतिविशाल गट हा केवळ मराठी बद्दलच नव्हे तर एकूणच काही बाबतीत अहंगंडाने तर उर्वरित बाबतीत न्यूनगंडाने पछाडलेला असतो असे वाटते! ;)

सर्व_संचारी Sat, 17/08/2013 - 23:24

मातृभाषा आणि तिच्याकडे विविध पद्धतीने पाहणारे लोक असा हा विषय पाहून गेले अनेक दिवस मनात घोळत असलेला एक मुद्दा इथे मांडावासा वाटला. आपल्या भाषा शिकण्याच्या कार्यक्रमात - भाषिक खेळाना काहि स्थान आहे का ?
उदा : भाषिक खेळा ची पहिली ओळख इंग्रजी शिकताना झाली. (अर्थातच - च - ची भाषा वगैरे वगैरे खेळ आहेतच, आणि त्यांची ओळख हि नक्कीच होती.)
इंग्रजी शिकण्यासाठी - Scrabbles - खेळा असा सल्ला आमच्या अनेक मास्तेरांनी आणि समवयस्क मुलांनी दिला आणि असा खेळ पाहिल्यावर मला अद्भुत वाटू लागले होते. नंतर जर्मन भाषा शिकताना अनेक इतर भाषिक खेळांची ओळख झाली आणि भाषा शिकताना या खेळांनी फार मस्त साथ दिली, आजही देतात. भारतात राहून परकीय भाषा शिकताना मला वाटत होते, कि असे खेळ हे आपल्यासारख्या परकीय भाषा शिकणाऱ्या लोकांसाठी हे असणार, परंतु युरोपात आल्यावर लक्षात आले कि इथले लोक आपल्या मातृभाषेत देखील हे खेळ आवडीने खेळतात, आणि शाळा , कॉलेजे , घरे सगळीकडे असे खेळ अगदी भरपूर उपलब्ध आहेत.

बदलत्या भाषिक वातावरणात , आपल्या भाषेला , तिच्या प्रकृतीला साजेसे नवे खेळ निर्माण करण्यात रस असणारे , त्यात अगोदरच काम करणारे कोणी असतील तर त्यांना भेटायला नक्की आवडेल. तसेच आपल्या भाषेत आधीपासूनच परंपरेने उपलब्ध असणारे खेळ सुद्धा नव्याने मांडून ला हवेत. भाषिक प्रेम हे फक्त गहन साहित्यात , किंवा त्याच्या वाचनानेच निर्माण होईल असे मला वाटत नाही. भाषिक प्रेम , आणि भाषिक क्षमता दोन्हीही वाढीस लागण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले पाहिजेत. आणि मला यात सहभागी व्हायला आवडेल.

धन्यवाद,
मंदार पुरंदरे

चिंतातुर जंतू Sat, 17/08/2013 - 23:47

अ गट - हा वैश्यवृत्तीचा गट आहे.
आ गट - ह्याला बहुजनसमाजी वृत्ती म्हणता येईल.
इ गट - हा ब्राह्मणीवृत्तीचा गट आहे.

तर मग निष्कर्ष - अर्थात, लढवय्या क्षत्रियांना तुमच्या समाजात स्थान नाही असा निष्कर्ष काढला आहे. जर नाव द्यायचं झालंच तर मी त्यांना ह.पा.भा.भ. गट म्हणेन. थोडक्यात, हगल्या-पादल्याला भावना भडकून घेणारा गट. (प्रेरणा सांगायचीच झाली, तर - मकरंद साठ्यांचं 'चौक' नाटक.)

मी Sun, 18/08/2013 - 13:28

भावना एवढ्या तरल झाल्या आणि भाषा गढूळ झाली, एका गटाने दुसर्‍या गटाला अ/प्रत्यक्षरीत्या महत्त्व दिलं तर? गटांचे काठ एकमेकात मिसळले गेल्यासारखं वाटलं. अर्थात हे वैचारिक पातळीवर झालं नाही हे तर दिसतं आहेच, फक्त ह्यातच जिवंतपणा आहे वगैरे कुणास वाटला तर नवल नाही.

'न'वी बाजू Sun, 18/08/2013 - 18:33

शेवटी हे सगळे लोक तोंडानं काहीही बरळत असोत, शेवटी बोलतात माझ्याच भाषेत - मराठीत. काय करता!

अगदी!

उदाहरणादाखल, हा लेख (नि याला 'चान चान' म्हणणारे तमाम प्रतिसाद) शेवटी आहेत मराठीत(च) - माझ्या भाषेत! काय करता!

बाकी चालू द्या.

राजन बापट Sun, 18/08/2013 - 20:11

मजेशीर लेख.

>>> अ] अतिविशाल गट : एकीकडे नवश्रीमंत, मराठीबद्दल तुच्छता/न्यूनगंड बाळगणारे, अर्धवट आंग्लाळलेले, नवश्रीमंत लोक. या गटातले लोक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांत घालतात.

वरील वाक्यात "नवश्रीमंत" या विशेषणाला पुन्हापुन्हा वापरण्यातलं प्रयोजन काय ते कळलं नाही. "एकीकडे नवश्रीमंत" तर दुसरीकडे कोण ते कळलं नाही.

>>> वटपौर्णिमेच्या जोडीनं करवा चौथही साजरा करतात नि ’छान दिसतं’ म्हणून ’मांगमें सिंदूर’ भरतात.

या प्रकाराला मातृभाषेच्या आस्थेच्या संदर्भात नक्की कशाबद्दल तोंड द्यावं लागतं तेकना.

>>> या गटाला आपण अतिविशाल गट म्हणू.

या गटाचं नाव मजेशीर आहे. पण गटाच्या स्वभावगुणदर्शनामध्ये "अतिविशालत्व" कुठे आलं तेकना. त्यामुळे (निव्वळ चूष म्हणून नाव देण्याच्या कारणमीमांसेव्यतिरिक्त) हेच नाव का, तेकना.

>>> आ] डांबरीकरण गट : यांच्यातल्या बहुसंख्यांच्या ’ण’ नि ’न’च्या वापराबद्दल नाक मुरडण्याची प्रथा ’अ.वि.’ गटात आहे.

वरील वाक्याचा अर्थ

"डांबरीकरण गटातील बहुसंख्य लोकांमधे ’ण’ नि ’न’च्या वापराबद्दल नाक मुरडण्याची प्रथा आहे. ही प्रथा ’अ.वि.’ गटातसुद्धा आहे." असा , की
"डांबरीकरण गटातील लोकांमधे बहुसंख्यांच्या (पक्षी : बहुजनसमाजातल्या) ’ण’ नि ’न’च्या वापराबद्दल नाक मुरडण्याची प्रथा आहे. ही प्रथा अ.वि.’ गटातसुद्धा आहे." असा की
"डांबरीकरण गटातील बहुसंख्य लोक ’ण’ नि ’न’च्या वापर करतात त्यांच्या या वापराबद्दल नाक मुरडण्याची प्रथा अ.वि.’ गटात आहे." असा तेकना.

>>> ’ण’ नि ’न’च्या वापराबद्दल नाक मुरडण्याची प्रथा

म्हणजे बोलताना ’ण’ नि ’न’ या अक्षरांच्या चुकीच्या/बहुजनसमाजातल्या/ग्रामीण भागातल्या लोकांच्या वापराबद्दल नाक मुरडण्याची प्रथा, असे का? कारण केवळ या दोन अक्षरांच्या वापराबद्दल नाक मुरडण्याचे कारण काय तेकना.

कळावे , आपला,
ते. क. ना.

'न'वी बाजू Mon, 19/08/2013 - 01:48

मातृभाषेबद्दल आस्था असलेल्या माझ्यासारख्या लोकांना एकाच वेळी अनेक निरनिराळ्या आघाड्यांवर झगडावं लागतं.

अरेरे! च् च् च्! वाईट वाटते.

कीत्ती कीत्ती दुष्ट मेले ते! हात् रे!

पण उलटपक्षी, आमच्या - आणि कोण जाणे, कदाचित आपल्याही, कदाचित आपणां सर्वांच्याच - पुण्यात, 'रतिमग्न गर्दभे धारण केल्यास लत्तांचा सुकाळ सुनिश्चित होतो' अशा अर्थाची एक म्हण प्रचलित आहे. तेव्हा, नसत्या गोष्टी मुळात अंगावर का घ्याव्यात, असा प्रश्न उपस्थित होतो. (शिंगावर घ्याव्यात की नाही, ती फारच पुढची गोष्ट झाली.)

किंवा मग, एखादी गोष्ट धारण करण्याविषयीची धारणा इतकीच जर पक्की असेल, तर मग आलिया 'भोगा'सी सादर असण्यापलीकडे पर्याय राहत नाही, आणि त्या परिस्थितीत शंखध्वनीचे - उपरसदृश रुदनगीताचे - प्रयोजन उरत नाही, असे सुचवावेसे वाटते. असो.
=====================================================================================================================
म्हणीचा प्रस्तुत तर्जुमा हा संस्कृतप्रचुर मराठीत आहे, आणि (आपणच अन्यत्र म्हटल्याप्रमाणे) संस्कृतविषयी आपणांस सकारण राग आहे, याची आम्हांस पूर्ण कल्पना आहे. त्याउपर, मूळ म्हण ही संस्कृतप्रचुर मराठीत नसून, आपल्या सर्वांच्या लाडक्या रांगड्या मराठीत आहे. मात्र, नाइलाजास्तव ती येथे जशीच्या तशी छापणे आमच्याच्याने तरी होत नाही. कारण, (आपणांबाबत किंवा उपस्थित इतरांबाबत कल्पना नाही, परंतु) तिच्यामारी आपण तरी साले सभ्य आहोत. तेव्हा, काय करता!

'धारण करणे'करिता मराठी तर्जुमा: 'अंगावर चढवणे'. उदा., 'त्याने राजवस्त्रे धारण केली' = 'त्याने राजाने घालण्याचे कपडे अंगावर चढवले'.

हा आमच्यासारख्याच एका भटुरड्याने दिलेला सल्ला. लवणस्फटिकासहित घेतला जावा, हे ओघानेच आले.

'की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने' अशा चरणाने सुरू होणारी एखादी चतुष्पदी आपण ऐकली असेलच. नसल्यास, पुढील वेळेस एखाद्या सावरकर-बुद्रुक गटवाद्याकडून पिडून घेण्याचा प्रसंग आल्यास त्याकडून ही जरूर वदवून घ्यावी नि माहिती करून घ्यावी. अतिशय उद्बोधक नि प्रेरणादायक आहे. (किंबहुना, सावरकर अथवा सावरकर-बुद्रुक गटवाद्यांकडून क्वचितच येणार्‍या फार थोड्या उद्बोधक नि प्रेरणादायक गोष्टींपैकी ती एक आहे, असे आमचे प्रामाणिक मत आहे.)

अतिअवांतर: बंगाल्यांना 'प्रचुर' या शब्दाचे वावडे नाही. 'पुष्कळ' अशा अर्थाने खुशाल 'प्रचुर' (उच्चारी: 'प्रोचुर') असा शब्द वापरतात.

कारण शेवटी आम्ही भटेच! त्याला काय करणार? (प्रेरणा: पु.ल., स्रोत: 'अघळपघळ'.)

दुवा.

प्रेरणा: पु.ल. (स्रोत: आता नक्की आठवत नाही, पण बहुधा 'मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास - भाग १'मधील एक तळटीप.)

प्रस्तुत माहिती 'फॉर व्हॉटेवर इट इज़ वर्थ' तत्त्वावर प्रस्तुत करण्यात येत आहे.

'न'वी बाजू Mon, 19/08/2013 - 07:23

In reply to by मेघना भुस्कुटे

वुड्डहौससाहेबाच्या निधनानंतर इंग्रजी विनोदी साहित्यात, नि पु.लं.च्या निधनानंतर मराठी विनोदी साहित्यात, एक फार मोठी पोकळी निर्माण झाली होती. पैकी, इंग्रजी विनोदी साहित्यातील पोकळी चेतन भगत नावाच्या एका समर्थ लेखकाने लीलया भरून काढली. मात्र, 'पु.लं.नंतर मराठी विनोदी साहित्यात ती जागा आता कोण भरणार', ही एक चिंताच होती.

मात्र, ती पोकळी आज भरून निघालेली असल्याकारणाने, हे चिंतेचे सावट आता दूर झालेले आहे. मराठी विनोदी साहित्य (त्याचे वाचकवर्गासुद्धा) याकरिता आपले आजन्म ऋणी राहील.

सहज Mon, 19/08/2013 - 07:49

>या सगळ्या आघाड्यांवर दोन हात करावे लागतात. कधी एका गटाला पाठीवर घेतलं, तर दुसर्‍याच्या तात्कालिक आश्रयाला जावं लागतं. कधी एकाला सहानुभूती दर्शवली, तर दुसर्‍याला ठेचावं लागतं. कधी सगळ्यांनाच थोडं चुचकारावं लागतं. कधी सगळ्यांना एकाच वेळी अंगावर - शिंगावर घ्यावं लागतं. कुणाशीच कायमस्वरूपी पातिव्रत्य ठेवून चालत नाही. कुणाशीच हाडवैर घेण्यात रस नसतो.

प्राचीन काळी ज्याने त्याने आपल्या गटातच रहावे, पूर्वपरवानगीशिवाय गटाबाहेर संबध प्रस्थापीत करायला जाउ नये वगैरेवगैरे गटनियम म्हणूनच तयार झाले असावेत काय? :-) भाषीक धोरणच नव्हे तर परराष्ट्र/राज्य धोरण, राजकीय समीकरणे, जालीय युत्या सर्वांबाबत भाष्य करणारे विधान!!

लेख, प्रतिसाद करमणूक करणारे. धन्यु.

सविता Mon, 19/08/2013 - 11:16

लक्षणे स्वतःला ताडून पाहिली, कुठल्याच एका गटात पूर्ण बसत नाही. निदान दोन तीन ची तरी भेसळ आहे.

बाकी "....मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांत घालतात" याबद्दल, मला ढीग माझ्या लेकीला मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचं आहे. पण "चांगल्या" मराठी शाळांची वानवा आहे. आम्ही ज्या शाळांमध्ये शिकलो, तिथे आम्ही शिकत असताना जो काय थोडा फार दर्जा होता (तोही खालावलेलाच होता पण २०-२५% काहीतरी शिल्लक होते) तो पण आता गेलाय. तेव्हा अशा शाळेत शिकून सुद्धा आम्ही कुठेतरी तरून गेलो.पण तो काळ वेगळा होता.. अजून २० वर्षांनी चालणार नाहीये.

खाजगी इंग्रजी शाळांमध्ये कशा प्रकारे शिकवले जाते, तिथून बाहेर पडलेल्या मुलांशी स्पर्धा करायला तिची मराठी शाळा पण तितकीच चांगली नको का?..माझ्या मराठी प्रेमापायी तिला टुकार शाळेत घालून मला तिचे नुकसान करायचे नाहीये....

तेव्हा अगदी गंभीर पणे विचारते... चांगल्या... आणि बहुदा खाजगीच (सरकारी.. आरक्षण... या फंदात पडणार्‍या नकोच!) मराठी माध्यमाच्या पुण्यातल्या शाळा दाखवा.... घालते तिकडे लेकीला! (अजून १.५ वर्षे आहेत!)

'न'वी बाजू Mon, 19/08/2013 - 11:27

In reply to by सविता

मुळात, भलत्या कोणाच्यातरी 'मातृभाषेबद्दलच्या आस्थे'चे गंडुशमन करण्यासाठी तिसर्‍या एखाद्या व्यक्तीने आपले वैयक्तिक निर्णय त्यानुसार का आखावेत? करू देत की जी काही वर्गीकरणे करायची आहेत ते. कोण विचारतो?

ऋषिकेश Mon, 19/08/2013 - 11:29

In reply to by 'न'वी बाजू

कोणाच्याही कोणत्याही कसल्याही शमनासाठी नाही मात्र एकूणच अधिक आकलनासाठी शिक्षण मातृभाषेतून असावे असे तज्ज्ञ म्हणतात त्याचे काय?

'न'वी बाजू Mon, 19/08/2013 - 11:34

In reply to by ऋषिकेश

... काय वाटेल ते म्हणोत. स्वतःच्या मुलांच्या बाबतीत अंतिमतः जो-तो तज्ज्ञ.

'तज्ज्ञां'नी आपापली मुले त्यांना योग्य वाटतील त्या शाळांत घालावीत की! (नव्हे घालत असतीलच!) त्यांना कोणी विचारायला किंवा सांगायला जाते काय?

ऋषिकेश Mon, 19/08/2013 - 11:48

In reply to by 'न'वी बाजू

अं? असो. क्षमस्व!

जाता जाता: प्रश्न तुम्हाला वाटतो आहे तितका सोपा नसावा असे वाटते. स्वतःचे शिक्षण झाले नसतानाही जेव्हा मुलांना शिक्षण देण्याचा निर्णय पालक घेतो तेव्हा पाल्याचे माध्यम तो पालक तज्ज्ञ म्हणून निवडतो की प्रवाहपतीतासारखा हे कसे ठरवावे? पण तो वेगळ्या चेर्चेचा विषय आहे तेव्हा या विषयावर या धाग्यावर माझ्याकडून इत्यलम्

'न'वी बाजू Mon, 19/08/2013 - 12:58

In reply to by ऋषिकेश

एखाद्या पालकाने घेतलेला निर्णय हा प्रवाहपतितासारखा किंवा कसे, हे आपण कशावरून (नि काय म्हणून) ठरवावे?

'न'वी बाजू Mon, 19/08/2013 - 12:59

In reply to by ऋषिकेश

अधिक आकलनासाठी शिक्षण मातृभाषेतून असावे असे तज्ज्ञ म्हणतात त्याचे काय?

ठीक आहे. 'तज्ज्ञां'नी अटलांटाच्या ईशान्य उपनगरांत मराठी माध्यमाची शाळा मला शोधून द्यावी. नसल्यास तशी ती माझ्यासाठी सुरू करावी. नि (केलीच सुरू, तर बहुधा खाजगीच असेल, म्हणजे फी दणकट असणारच, तेव्हा) माझ्या मुलाला तेथे फी-माफी द्यावी. (कोठल्याही सरकारी शाळेत मला फी शून्य द्यावी लागते.) मग कदाचित मी माझ्या मुलाला तेथे धाडण्याबद्दल विचार करेन. (पाठवेनच, असे नाही. तरीही बहुधा पाठवणार नाहीच.)

आणि हो, माझ्या मुलाचे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाऊन काहीही बिघडलेले नाही, आणि एकंदरीत उत्तम चाललेले आहे, आभारी आहे. दीड वर्षांचा असल्यापासून ते आजतागायत तो इंग्रजी माध्यमाच्या वेगवेगळ्या माँटेसर्‍यांतून नि प्राथमिक-माध्यमिक शाळांतून जात आलेला आहे, नि आजवर त्याला शालेय अभ्यासाच्या बाबतीत आकलनाची कोणतीही अडचण आलेली नाही.

हं, आता त्याची 'मातृभाषा' नेमकी कोणती, हा प्रश्न आहे खरा. तत्त्वतः 'मातृभाषा'/'प्रथमभाषा' मराठी म्हणता येईलही; 'प्राथमिक भाषा' मात्र इंग्रजी म्हणणे प्राप्त आहे. आणि ते नैसर्गिक आहे. अगदी लहानपणापासून मुलाच्या कानावर अधिकतर प्रमाणात जी भाषा पडणार, ती त्याची प्राथमिक भाषा बनणार. (सद्यपरिस्थितीत माझ्या मुलास जर मी मराठीतून शिक्षण द्यायचे म्हटले, नि अगदी समजा आजच्या घडीस त्याला त्याकरिता पुण्यास धाडून द्यावयाचे ठरविले, तर उलट ते त्यास आकलनाचे दृष्टीने तुलनात्मकदृष्ट्या प्रचंड अवघड पडावे. कारण साहजिक आहे. त्याचे मराठीचे एक्स्पोझर घरापुरते, म्हणजे दिवसातून काही थोडक्या तासांपुरते मर्यादित आहे. घराबाहेर मात्र त्याच्या कानावर जर सतत इंग्रजी पडते, आणि संभाषणही इंग्रजीतून होते, आणि शालेय विषयही जर तो इंग्रजीतून शिकत आलेला आहे, तर त्याच भाषेवर त्याचे प्राथमिक प्रभुत्व राहणार, नि तीच भाषा त्यास शिक्षणाकरिताही सोयिस्कर राहणार.)

पण मग द्याट बेग्ज़ द क्वेश्चन, की अधिक आकलनासाठी शिक्षण मातृभाषेत द्यावे वगैरे जे काही 'तज्ज्ञ' वगैरे म्हणतात, ते कोणत्या चौकटीतून? 'मातृभाषा' महत्त्वाची, की 'प्राथमिक प्रभुत्वाची भाषा'? नि अगदी लहानपणापासून जर एकाहून अधिक भाषांस समान एक्सपोझर देणे शक्य असेल (भारतात हे अशक्य नसावे), तर मातृभाषेव्यतिरिक्त आणखीही एखादी भाषा 'प्राथमिक प्रभुत्वाची भाषा' असणे शक्य नाही काय?

(टीप: वर ही मी माझ्या मुलाची पत्रिका मांडलेली नाही. नसते गैरसमज नसावेत. अन्यथा, 'पत्रिका जुळत नाही' हे उत्तर सर्व संबंधितांस आगाऊ देऊन ठेवत आहे.)

बादवे, माझे स्वतःचे चौथीपर्यंतचे शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून आणि त्यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेतून झालेले आहे. दोन्ही ठिकाणी मला आकलनाचे दृष्टीने काऽहीही अडचण आली नाही, हे कळविण्यास अतिशय आनंद होतो. (अर्थात, घरी आईवडिलांकडून दोन्ही भाषांतून उत्तम एक्स्पोझर होते, हा एक घटक यात असू शकतोच. आणि पाचवीपासून माझी मराठी माध्यमाच्या शाळेत उचलबांगडी ही आकलनाच्या कारणासाठी नसून, शाळेचे घरापासूनचे अंतर या व यासारख्या इतर व्यावहारिक कारणांसाठी नि पूर्णपणे ऐच्छिक होती, हेही येथे स्पष्ट करून ठेवतो.)

सरतेशेवटी, एक वैयक्तिक प्रश्न आपल्या परवानगीने विचारू इच्छितो. (फारच वैयक्तिक वाटल्यास कृपया सोडून द्यावा.)

अधिक आकलनाच्या दृष्टीने आपल्या पाल्याकरिता पुण्यात तमिळ माध्यमाची एखादी शाळा (शक्य असल्यास) शोधून काढणे आपणांस व्यक्तिशः आवश्यक वाटते काय? (या प्रश्नामागील गृहीतकांत त्रुटी असल्यास आगाऊ क्षमस्व.)

नितिन थत्ते Mon, 19/08/2013 - 13:13

In reply to by 'न'वी बाजू

मातृभाषेतून शिक्षण द्यावे या तज्ञांच्या म्हणण्याचा अर्थ 'प्रथमभाषेतून' शिक्षण द्यावे असा घ्यावा का? (पक्षी लहानपणापासून जी भाषा सर्वाधिक ऐकली बोलली त्या भाषेतून).

'न'वी बाजू Mon, 19/08/2013 - 13:20

In reply to by नितिन थत्ते

माझ्या मुलाचेच उदाहरण घ्यायचे झाले, तर त्याचे शिक्षण ज्या भाषेतून झाले, ती त्याची प्राथमिक भाषा (ऑपॉप) बनली.

सविता Mon, 19/08/2013 - 16:38

In reply to by 'न'वी बाजू

त्यांच्या वर्गीकरणामुळे नाही आणि त्या म्हणतात म्हणुन नाही, पण मला स्वतःला माहिती हवी आहे म्हणून विचारतेय. म्हटलं "मराठी" भाषेबद्दल सर्वात जास्त प्रेम असणार्‍या आणि लोक कसे पोरांना विंग्रजीत शिकवतात म्हणणार्‍यांना "मग दुसरे काय करावे" याबद्दल जरा जास्त माहिती असेल.

माझे वैयक्तिक ओढा मुळात मराठी माध्यमात घालण्याकडे आहे(खरेच चांगले पर्याय उपलब्ध असल्यास) पण ओळखीत कोणाला विचारले की "कशाला मराठी माध्यम पाहिजे काअही दर्जा नाही तिकडे, दिल्ली पब्लिक स्कूल आणि बिशप्स कसे भारी आहे" याच्या कथा ऐकायला मिळतात. त्या शाळा छान असतीलही
पण तेवढाच चांगला मराठीत पर्याय आहे का तेही तपासायचे आहे.

सगळे पर्याय (मराठी आणि इंग्रजी माध्यमाचे) माहित करून मग त्यावेळी सर्वात योग्य पर्याय निवडणार!

ऋषिकेश Mon, 19/08/2013 - 11:27

In reply to by सविता

बहुदा खाजगीच (सरकारी.. आरक्षण... या फंदात पडणार्‍या नकोच!)

आता राईट टु ए‍ज्युकेशन नंतर खाजगी शाळांमध्येही काही टक्के जागा विशिष्ट आर्थिक स्तराच्या खालील कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव (अर्थात आरक्षण) ठेवणे बंधनकारक झाले आहे.

बाकी तुर्तास केवळ प्रतिसादाच्या सुराशी (आणि काही तपशीलांशीही) असहमती नोंदवतो.

सविता Mon, 19/08/2013 - 16:50

In reply to by ऋषिकेश

आरक्षण हा विषय फार मोठा त्यामुळे....

विद्यार्थ्यांना आर्थिक स्तराच्या आरक्षणाबद्दल ठीकच आहे.

पण अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांमध्ये पण अमुक एक टक्का आरक्षण आधारित असावा असा नियम आहे. आमच्या शालेय जीवनात असे आरक्षणातून घुसलेले दिव्य शिक्षक पाहिले आहेत (सर्व तसे नव्हते पण बहुतांश नक्कीच!) ज्यांचा गुणवत्तेशी दूरदूर संबध नव्हता.

तेव्हा शिक्षक भरती जिथे "फक्त गुणवत्तेवर" आधारित आहे तिकडे घालायचे हे नक्की!

नितिन थत्ते Mon, 19/08/2013 - 17:53

In reply to by सविता

>>तेव्हा शिक्षक भरती जिथे "फक्त गुणवत्तेवर" आधारित आहे तिकडे घालायचे हे नक्की!

"फक्त गुणवत्तेवर" या शब्दप्रयोगाचे नक्की काय स्पष्टीकरण आहे?

आमच्या शाळेत उच्चवर्गीय + एम ए ला मुंबई विद्यापीठात गोल्ड मेडल मिळविलेल्या शिक्षिका होत्या. त्यांच्या शिकवण्याबद्दल विद्यार्थी अधिक पालक फारसे खूष नव्हते.

बाकीचे बरेचसे शिक्षक (संख्येने ५०च्या आसपास) उच्चवर्गीय + गोल्ड मेडल नसले तरी (वरच्या इयत्तांना शिकवणारे) डबल ग्रॅज्युएट व (खालच्या इयत्तांना शिकवणारे) किमान ग्रॅज्युएट होते. त्यापैकी एकदोन (म्हणजे ४-५ टक्क्याहून अधिक नाही) शिक्षक वगळता चांगले शिकवण्याबद्दल (आणि अर्थातच विषयाच्या सखोल ज्ञानाविषयी) कुणाचीच ख्याती नव्हती.

मुद्दा हा की आरक्षणातून आलेले शिक्षकच "दिव्य" असतात असे नाही. बहुतांश शिक्षक दिव्यच असतात.

माझ्या अपत्याच्या शाळाप्रवेशाच्या सुमारास आप्तमित्रांनी "चांगल्या शाळे"विषयी जी माहिती पुरवली त्यात त्या शाळेतील शिक्षकांच्या शिकवण्याच्या दर्जापेक्षा त्यांच्या "जन्माधिष्ठित दर्जा"ची माहिती अधिक होती.

म्हणून स्पष्टीकरण विचारले.

सविता Mon, 19/08/2013 - 18:06

In reply to by नितिन थत्ते

"जन्माधिष्ठित दर्जा" बद्दल माझा निकष नाहीये. मला शिकवणार्‍यांमध्ये तो असलेले आणि नसलेले दोन्ही चांगले आणि रद्दड प्रकार पाहिले आहेत. अर्थात चांगल्या मध्ये उच्चवर्गीय चे प्रमाण जास्त होते हेही खरे.

सरकारी कार्यालय आणि खाजगी कार्यालय यामध्ये फरक असतो की खाजगी मध्ये "वर्ग्/वर्ण" वर काही अवलंबून नसते, चांगले काम करा - बढती/पगार मिळेल, नाही केले डच्च्यू मिळेल.

माझा अंदाज निदान अपेक्षा आहे की शाळेमध्येही हेच चालत असावे. चांगले शिकवणार्‍या, विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असणार्‍या शिक्षकांना प्राधान्य मिळत असावे.

एकदा कुठल्यातरी निकषावर चिकटले आणि मग तिकडेच शिकवत राहिले/पाट्या टाकत राहिले असे नको.

ऋषिकेश Tue, 20/08/2013 - 10:42

In reply to by सविता

माझा अंदाज निदान अपेक्षा आहे की शाळेमध्येही हेच चालत असावे.

तुमचा अंदाज धादांत चुकीचा आहे असे (आणि इतकेच) नम्रपणे सांगु इच्छितो.

चिंतातुर जंतू Mon, 19/08/2013 - 13:10

In reply to by सविता

>> तेव्हा अगदी गंभीर पणे विचारते... चांगल्या... आणि बहुदा खाजगीच (सरकारी.. आरक्षण... या फंदात पडणार्‍या नकोच!) मराठी माध्यमाच्या पुण्यातल्या शाळा दाखवा....

'अक्षर नंदन' आणि 'ज्ञान प्रबोधिनी'विषयी काही पुणेरी पालकांकडून चांगले शब्द ऐकण्यात आले आहेत.

केतकी आकडे Mon, 19/08/2013 - 13:54

In reply to by चिंतातुर जंतू

एवढ्यातच 'ग्राम मंगल' बद्दल सुद्धा अतिशय छान ऐकलेय. जवळच्या एक नातेवाइकानेच स्वतःच्या मुलीला इथेच टाकलेय.

मेघना भुस्कुटे Mon, 19/08/2013 - 14:14

असो. चालू द्या.
अवांतर: विनोद म्हणा, तिरकी भाषा म्हणा, उपरोध म्हणा... बाकी कशापेक्षाही अधिक परिणामकारक, यावर माझा विश्वास बसला. :)

सहज Mon, 19/08/2013 - 14:21

In reply to by मेघना भुस्कुटे

मराठी माणूस व्याख्या/गुणविशेष मधे ऐकीव विनोद की "तास, दोन तास वितंडवाद करुन झाल्यावर समारोपाला म्हणेल ’मरू दे ना च्यायला, आपल्याला काय करायचंय?’" :-)

असो, चला 'पेठी-पुणेरी'करणाकडे भुस्कुटेबाईंची वाटचाल हेही नसे थोडके ;-)

मेघना भुस्कुटे Mon, 19/08/2013 - 14:38

In reply to by सहज

कसंय... धागा एका विषयावर. लोक भलतीकडंच उट्टं त्यावर काढताहेत. त्याला फाटा आणिक तिसर्‍याच विषयाचा फुटला. मी कुठल्या अधिकारात समारोप करू? त्याहून 'चालू द्या...' श्रेयस्कर. तसंही आपल्याला कुठल्याच गटाचं वावडं नव्हे. पेठकर काय, पुणेकर काय नि हिर्वा माजवाले गट काय!

सहज Mon, 19/08/2013 - 15:04

In reply to by मेघना भुस्कुटे

अवांतर - तुम्ही लिहले पाहीजे की धागा अमुक विषयावर आहे, त्याला धरुन बोलूया, शाळाप्रवेश व माध्यम चर्चा हलवा दुसरीकडे. मेरा धागा नही दूंगीवाल्या राणी मेघनाबाईंची मआंजाला आस आहे!! ;-)

अतिअवांतर - नंदन बघा, कधी काढतो असे धागे? शिका अरे शिका मुलांनो. तो किती व्यासंगी, तो किती हुशार, तो किती गुणी! चांगला शिकला, अमेरिकेत गेला. शिका शिका त्या नंदन कडून ;-)

अजो१२३ Mon, 19/08/2013 - 17:23

बोलीभाषा (मराठी), प्रमाणभाषा (मराठी), राष्ट्रभाषा (हिंदी), जगद्भाषा (इंग्रजी) यांचा कोणाच्या जीवनात किती प्रभाव आणि सहभाग आहे यावरून मराठी लोकांचे अनेक प्रकार करता येतील.

घरात, शाळेत, कामाच्या ठीकाणी, मनोरंजनासाठी, कलेसाठी, जालावर, समाजातल्या संवादांसाठी, इ आपण कोणत्या भाषा वापरू शकतो आणि कोणत्या वापरायला प्राधान्य देतो यावरून असे गट पाडता येतील.

भाषा येण्याच्या अनेक पातळ्या आणि प्रकार आहेत. इंग्रजीचेच म्हणाल तर -
१. न लाजता थँक्यू, इ म्हणणे
२. इंग्रजी लिहिता येणे
३. वाचता येणे
४. बोलता येणे
५. इंग्रजी ऐकता येणे
६. हेच सर्व वेगवेगळ्या अक्सेंटमधील इंग्रजीबाबत
७. अचूक व्याकरण माहित असणे
८. साधे सोपे अनौपचारिक इंग्रजी सहजतेने बोलता येणे
९. इंग्रजी गाणी कळणे
१०. न अडखळता कठीण विषयावर बोलता येणे
११. उत्तम गद्य, पद्य वाचन/रसग्रहण/निर्मिता येणे
१२. खूप शब्द माहित असणे
१३. वक्तृत्व , इ कला असणे

माणसाला बोलीभाषेत आणि आपल्या लोकांसमोर भाषेवर पूर्ण प्रभूत्व असते. तो जसा जसा या दोन गोष्टींपासून दूर जातो, तसा तसा अवघडायला लागतो. परंतु देश, धर्म, संस्कृती, इ शी जे भाषिकाचे नाते असते त्यापेक्षा भाषेशी ते बरेच वेगळे असते. भाषेशी प्रतारणा करण्याचे शल्य, असलेच तर, धर्म, देश, इ शी प्रतारणा करण्याच्या शल्यापेक्षा फारच सौम्य असते. 'सामाजिक प्रतिष्ठा', व्यवहार्यता हे भाषेच्या चयनामागचे मूळ निकष असतात. म्हणजे मराठी माध्यमातून शिकल्याने मला जीमॅट परिक्षा अवघड वाटली तर मराठीवर नितांत प्रेम असूनही मी माझ्या मूलीला इंग्रजी माध्यमातून शिकवेन.

मराठीचा राजकीय पराजय आपण मान्य केला आहेच. म्हणजे मराठीचे माहेरघर मानल्या जाणार्‍या पुण्याच्या महानगरपालिकेच्या सगळ्या महत्त्वाच्या निविदा 'फक्त' इंग्रजीतून निघतात. मराठीचा सामाजिक पराभवही आपण मान्य केला आहे. कोणत्याही उच्चभ्रू घरात मी मराठी साहित्य आणि सिनेमा अशी अभिरुची असणारे माझ्या पिढीतले लोक पाहिले नाहीत. जे क्रिम आहे ते सगळं मराठीला हिणवून पाहतं हे वास्तव आहे. यामागचं कारण भौतिक यश, उच्च पद, सामाजिक सन्मान, उच्च शिक्षण, व्यवसायिक यश मिळवून देण्यासाठीची मराठीची उपयुक्तता दिवसेंदिवस कमी होत आहे.

अशा वेळी मराठीसाठी धडपड करणे धबधब्यातील पाणी उलटे वर नेणे यासारखे अवघड आहे.

ऋषिकेश Mon, 19/08/2013 - 17:32

In reply to by अजो१२३

काहिसे अवांतरः वरील १३ पातळ्यांवर त्या भाषेत कोणत्याही अडथळ्याविना, ती भाषा ज्यांची प्रथम भाषा आहे अश्या व्यक्तींबरोबर, "कचाकचा भांडता" येणे ही ती भाषा येण्याची परमोच्च पातळी समजावी असे आस्मादिकांस वाटते त्याची नोंद १४ वी पातळी म्हणून करावी :) ;)

बॅटमॅन Mon, 19/08/2013 - 17:42

In reply to by ऋषिकेश

परमपूज्य श्री. रिचर्ड बर्टन साहेब (तेच ते हाजी अब्दुल्ला-मक्काप्रवासी आणि अरेबियन नाईट्सवाले) यांच्या जीवनातील एक प्रसंग या निमित्ताने आठवला. काही मित्रांसोबत मुलतान भागात एका नायकिणीकडे साहेब नाचगाणे पाहण्यास/ऐकण्यास गेले होते. बर्टनच्या डोक्यात काही दुसरेच विचार चालू असल्याने नायकिणीच्या काही जानलेवा अदांकडे त्याचे दुर्लक्ष झाले. आपल्या सौंदर्याचा हा अपमान तिला सहन न झाल्यामुळे ती मुलतानी भाषेत इंग्रजांना शिव्या देऊ लागली. बर्टनसाहेबांनी अस्सल मुलतानीत त्या शिव्यांची परतफेड केली. एक इंग्रज आपल्याच मातृभाषेतून आपल्याला शिव्या देतोय हे पाहिल्यावर ती इतकी चिडली की तिने घर डोक्यावर घेतले. सर्व इंग्रज तिथून शेवटी निघाले, आणि निघाल्यावरही अगदी दूरवर जाईपर्यंत तिच्या शिव्या ऐकू येत होत्या असे बर्टनने लिहून ठेवले आहे. त्याला एकूण ४० भाषा येत होत्या, आणि त्याचेही मत भाषेतल्या शिव्या शिकणे अवश्यमेव आहे असेच होते. किंबहुना एकदा शिव्या शिकल्या की बाकीचं फारसं अवघड नसतं अशीही त्याने एके ठिकाणी टिप्पणी केलेली आहे.

संदर्भः शापित यक्ष, लेखकः बाळ सामंत.

बॅटमॅन Mon, 19/08/2013 - 17:43

In reply to by अजो१२३

मराठीचा राजकीय पराजय आपण मान्य केला आहेच. म्हणजे मराठीचे माहेरघर मानल्या जाणार्‍या पुण्याच्या महानगरपालिकेच्या सगळ्या महत्त्वाच्या निविदा 'फक्त' इंग्रजीतून निघतात.

नक्की का? कामकाजात अजूनही मराठीच वापरले जाते आमच्या माहितीप्रमाणे.

मराठीचा सामाजिक पराभवही आपण मान्य केला आहे. कोणत्याही उच्चभ्रू घरात मी मराठी साहित्य आणि सिनेमा अशी अभिरुची असणारे माझ्या पिढीतले लोक पाहिले नाहीत. जे क्रिम आहे ते सगळं मराठीला हिणवून पाहतं हे वास्तव आहे. यामागचं कारण भौतिक यश, उच्च पद, सामाजिक सन्मान, उच्च शिक्षण, व्यवसायिक यश मिळवून देण्यासाठीची मराठीची उपयुक्तता दिवसेंदिवस कमी होत आहे.

शिन्माचं जौंद्या, साहित्याबद्दल अभिरुची असलेले उच्चभ्रू लोक मी तसे बरेच पाहिलेत- वय वर्षे ४०-५० च्या आसपासचे. आता उच्चभ्रू म्हंजे काय? ज्यांच्या नावावर कमीतकमी ३ बीएचके फ्ल्याट/बंगला आहे आणि चारचाकी किमान एक आहे(ती न्यानो/ऑल्टो नव्हे तर स्विफ्ट इ. प्रकारची) असे लोक. लठ्ठ पगाराच्या नोकर्‍या तर असतात नैतर व्यवसाय तरी असतो. परदेशवारी घरआंगण झालेली असते. अत्त्युच्चभ्रू म्हणत असाल तर मी तसे लोक लै कमी पाहिलेत मुळातच पण उच्चभ्रू लोकांत साहित्याभिरुची असलेले लै लोक आहेत. अन एखादा ट्रेंड निव्वळ पुण्यामुंबैत नसला तर उर्वरित महाराष्ट्राबद्दल त्यावरून निष्कर्ष काढणं चूक आहे हे महत्वाचं वाक्यही या निमित्ताने नोंदवतो.

अजो१२३ Mon, 19/08/2013 - 19:09

In reply to by बॅटमॅन

मी एकदा भारतातल्या स्थानिक आणि इंग्रजीतील प्रकाशन उद्योगांबद्दल एक रिपोर्ट वाचला (चाळला) होता. त्यात आश्चर्यजनकरित्या इंग्रजी प्रकाशन उद्योग इतर सर्व भाषांच्या बेरजेला पुरून उरला होता. पैसा आणि व्हॉल्यूम दोन्ही बाबीत.

इंग्रजी आणि अन्य सर्व भारतीय भाषांच्या पेपरांचे वितरण यावरही एक लेख चाळला होता. तिथे इंग्रजी पेपर कमी होते, पण ते लवकरच इतरांना मागे टाकणार होते असा त्यांचा वाढीचा ट्रेंड होता.

हि दोन्ही निरिक्षणे धक्कादायक होती.

आज पन्नास वर्षांचा असलेला उच्चभ्रू/ मध्यमवर्गीय मराठी माणूस बर्‍यापैकी मराठी साहित्य वाचतो हे खरे आहे, पण त्याचा २० वर्षाचा मूलगा? तो सगळी पूस्तके इंग्रजीच वाचतो.

सविता Mon, 19/08/2013 - 17:53

In reply to by अजो१२३

२५ वर्षांपुर्वी एखाद्या पाल्याने ठराविक माध्यमातून शिकणे आणि आत्ता शिकणे यात जमीन अस्मानाचा फरक पडू शकतो.

माझे पालक मराठी माध्यमातून शिकलेले, इंग्रजी शी त्यांचा परिचय फक्त जुजबी. त्यामुळे मी मराठी माध्यमातून शिकत असताना इंग्रजी बद्दल मला तितकेच अद्ययावत ठेवणे त्यांना शक्य नव्हते.

आज समजा मी माझ्या पाल्याला मराठी माध्यमातून शिकवले तर मी १०वी पास होईपर्यंत किंवा खरेतर नोकरीला लागेपर्यंत जितकी इंग्रजी बद्दल बिचकून राहिले, तितके माझे पाल्य नक्कीच बिचकून राहणार नाही.

आज तिला प्रत्येक शब्द शिकवत असतान मी तिला त्या गोष्टीला मराठी आणि इंग्रजी दोन्ही मध्ये काय म्हणतात ( तेही अनेक समानार्थी शब्दांसकट) सांगत राहते.

त्यामुळे वय वर्षे जेमतेम १.५ असून सुद्धा तिला फॅन म्हणजेच पंखा माहित आहे. सॉक्स हा मोजा म्हणूनही माहित आहे. अ‍ॅप्पल म्हणजेच सफरचंद हे माहित आहे.
आई ला एरवी आई म्हणूनच हाक मारली तरी इतर लोक कौतुकाने "तुझी मम्मा कुठे आहे" विचारतात त्यामुळे आई म्हणजेच मम्मा, मम्मी हे ही शिकवतेय ज्यामुळे कोणी इंग्रजाळलेले तिच्याशी बोलायला लागले तरी ती बिचकू नये.

पुढे यातच हिंदी समानार्थी शब्दांचा पण समावेश करायचा आहे.

हेच पुढे पुढे मी जास्त प्रमाणात करत गेले तर:
१. ती इंग्रजी माध्यमात शिकली तरी
- तुंबाडचे खोत सारखे मोठे पुस्तक सुद्धा लिलया वाचू शकली पाहिजे. (इंग्रजी मध्ये शिकलेली पार ७-८ वीला असलेली माझ्या बघण्यात असलेली मराठी कुटुंबातली मुले साधा मराठी पेपर सुद्धा जसा र-ट-फ करत वाचतात ते माझ्या डोक्यात जाते)
२. ती मराठी माध्यमात शिकली तरी
- मला जसे इंग्रजी बोलताना वाचताना प्रश्न आले ते तिच्यासाठी असणार नाहीत कारण तिचे त्या बाबतीतले प्रश्न सोडावायला मी समर्थ असेन आणि ती जड जड इंग्रजी पुस्तके आरामात सुद्धा वाचू शकेल, आणि अर्थात स्पर्धा परिक्षा पण देऊ शकेल.

राही Mon, 19/08/2013 - 19:18

In reply to by सविता

खरं म्हणजे एकापेक्षा अधिक भाषा येणं याचा अर्थ बाहेरचं जग पहाण्यासाठी एकापेक्षा अधिक खिडक्या उपलब्ध असणं. मग ज्या खिडकीतून अधिक विशाल, अधिक सुंदर, तपशीलवार दृश्य अधिक चांगल्या कोनातून दिसेल तिथेच कोणीही रेंगाळणार. मी पाहिलेल्या आमच्या आजूबाजूच्या वीस ते तीस वर्षे वयोगटातल्या इंग्रजीतून शिकलेल्या तरुणांबाबत असे सांगता येईल की ते इंग्लिश पुस्तकांत, चित्रपटांत, वाहिन्यांत, जालावर अधिक रमतात. फास्टर फेणेपेक्षा त्यांना फेमस फाइव किंवा तत्सम पुस्तके आवडत असत, अनेक कार्टून्मालिका आवडत असत. आताही देशी साहित्य,मनोरंजन याकडे त्यांचा ओढा नसतो. केवळ मराठीच नव्हे तर अन्यभाषक मुलांबाबतही हेच म्हणता येईल.भारताविषयीचे सखोल ज्ञान त्यांना नसते जे आजच्या याच वयोगटातल्या मराठीतून शिकलेल्यांनाही नसतेच. तसेही सर्वसामान्यांना कुठल्याही भाषेचे, संस्कृतीचे सखोल ज्ञान आवश्यक नसते. आम्ही तरुणपणात वाचलेले, अनुभवलेले त्या तरुणांनाही स्वारस्यपूर्ण वाटावे, ही अपेक्षा वाजवी नाही. प्रत्येक पिढीचे स्वारस्य वेगवेगळ्या गोष्टीत असणे साहजिक आहे. अर्थात माझे निरीक्षण प्रातिनिधिक नाही हेही खरेच.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 19/08/2013 - 19:24

In reply to by सविता

- तुंबाडचे खोत सारखे मोठे पुस्तक सुद्धा लिलया वाचू शकली पाहिजे. (इंग्रजी मध्ये शिकलेली पार ७-८ वीला असलेली माझ्या बघण्यात असलेली मराठी कुटुंबातली मुले साधा मराठी पेपर सुद्धा जसा र-ट-फ करत वाचतात ते माझ्या डोक्यात जाते)

असली पुस्तकं मराठी, इंग्लिश अशा अनेक भाषा/लिपीत लिहीलेली आहेत; पण ती मला वाचायला लावली तर मी ब-म-फ करत बसेन. दया करो। ;-)

मला जसे इंग्रजी बोलताना वाचताना प्रश्न आले ते तिच्यासाठी असणार नाहीत कारण तिचे त्या बाबतीतले प्रश्न सोडावायला मी समर्थ असेन

भाषा विषय मला फार समजतात असा माझा दावा नाही. बर्‍यापैकी इंग्लिश बोलणार्‍या, वाचणार्‍या आमच्या पालकांनी इंग्लिश-इंग्लिश शब्दकोष आमच्या हाताला सहज लागतील अशा ठिकाणी ठेवले. इंग्लिश शिकण्याच्या सुरूवातीच्या वर्षांमधे, (इयत्ता पाचवी ते दहावी), बहुतांशी प्रश्नांवर त्या कपाटाच्या दिशेला बोट दाखवलं. अलिकडे, काही शब्दकोश-मित्रांशी चॅट करताना मी एकीकडे मेरियम-वेबस्टरची टॅब उघडूनच ठेवते. (सुदैवाने मराठीत एवढे शब्द नाहीत, निदान वापरात नाहीत, नाहीतर एक मोल्सवर्थची टॅबही उघडायला लागली असती.)

ऋषिकेश Tue, 20/08/2013 - 10:51

In reply to by सविता

अनेक भाषा शिकु नयेत असे मत नाहीच नाही. मात्र इंग्रजी माध्यमात घालण्याचा उद्देश "चांगले इग्रंजी' यावे असा असेल तर उद्देश आणि कृती यात मोठी तफावत आहे. इंग्रजी हे केवळ "माध्यम" आहे.
जर घरात बोलली जाणारी प्रथमभाषा इंग्रजी नसेल तर मुलांचा वेळ व श्रम ती भाषा शिकण्यात जाईल आणि मग मूळ विषयाकडे वळावे लागेल. तुलनेने परिचित भाषेत प्राथमिक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याला थेट त्या त्या विषयावर लक्ष केंद्रित करता येईल.

शिक्षणाचे माध्यम कोणते आहे आणि कोणती भाषा शिकणे आवश्यक आहे या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत.