ऐसी अक्षरे कुल सम्मेलन, पुणे (वृत्तांतासहित)
(नवीन धागा काढण्याऐवजी याच धाग्यात वृत्तांत लिहितो आहे - राजेश घासकडवी)
कोणे एके काळी पुण्यनगरीतून 'कट्टा' नावाचं एक प्रकरण निघायचं. प्रकरण अशासाठी म्हटलं की ते साप्ताहिक, मासिक वगैरे काही म्हणावं असं नियतकालिक तर नव्हतंच, पण अनियतकालिक म्हणून सन्मान करण्याचंही प्रकाशन नव्हतं. माझ्या आठवणीप्रमाणे कुठल्यातरी कट्ट्यावर पडीक असलेल्या सुपीक मेंदूंतून निघणाऱ्या विचारतरंगांना कागदावर सायक्लोस्टायलित स्वरूपात अवतीर्ण करण्याचं ते एक माध्यम होतं. त्यात प्रसिद्ध झालेल्या अक्षर वाङमयातल्या मला फारच थोड्या अक्षरांनी दर्शन दिलं. आणि एकदोनच मौलिक सुवचनं माझ्या लक्षात आहेत. (ते वाङमय अक्षर असलं तरी माझी स्मृती सक्षर आहे त्याला काय करणार म्हणा!)
आलिया भोगासी असावे सादर,
शनिवारवाड्यासमोर भादर,
म्हशी
आता तुम्ही म्हणाल की हे जुनाट, विसाव्या शतकातलं काव्य मला आत्ता का आठवावं? तर उत्तर सोपं आहे. ऐसी अक्षरे या एकविसाव्या शतकातल्या आर्बिट्ररीनियतकालिकातल्या लोकांनी शनिवारवाडा असलेल्या पुण्यात एक कट्टा केला, त्याचं वृत्तांकन करण्याची म्हैस भादरण्याचा भोग माझ्यावर येऊन पडलेला आहे. म्हणजे, पुणे, कट्टा, म्हैस, भादरणे, भोग, त्यासाठी सादर होणे इतक्या कॉमन गोष्टी असताना हे काव्य आठवलं नसतं तरच नवल.
बरं, भोगच म्हटले तर किती ते? मुळात ऐसी अक्षरे ही साइट चालवायची, मालक म्हणून स्वतःच्या खिशाला तोशीस लावून. त्यासाठी किती आणि कुठच्या माड्या चढाव्या लागल्या याची गणती नाही. वर कट्टा यशस्वी होण्यासाठी जातीने हजर राहायचं. (इतर दोन हरामखोर मालक या संपूर्ण कट्ट्याच्या वेळी हिरव्या माजात झोपून होते) वर कट्ट्याला येणाऱ्या सगळ्यांसाठी गिफ्ट म्हणून पुस्तकं आणायची. आणि त्यावर सुवाच्य अक्षरात 'ऐसी अक्षरे कट्टा' असं लिहून देऊन आपलं नाव लिहायचं. मग फोटो काढायचे. कोण काय गमतीदार बोललं याच्या नोट्स काढायच्या. इतकं सगळं केल्यावर 'तुम्ही आता इतकं केलंच आहे, तर वृत्तांतही तुम्हीच लिहून टाका' हे ऐकून घ्यायचं. भोग भोग म्हणायचं, आणि सादर व्हायचं, ते याला नाहीतर कशाला?
तर ऐसी अक्षरेचा कट्टा करायचा ठरलं. मग तो कुठे करायचा, कोण कोण येणार, कुठे जमायचं यावर बराच ऊहापोह झाला. मग साउथ इंडिजमध्ये बारा-तेरा लोक जमणार हे ठरलं. १८ तारीख एकदाची उजाडली. मी आणि मेघना साउथ इंडिजच्या समोर सव्वाबारा वाजता पोचलो. आता भारतीय वेळेनुसार साडेबाराला भेटायचं ठरवल्यावर इतक्या लवकर पोचणं ही आमची चूकच होती. तरीही मेघनाला वाटलं होतं की बारा वाजता भेटायचं आहे, त्यामुळे ती फारशी लवकर पोचली नव्हती, पण मला साडेबारा माहीत असूनही मी सव्वाबाराला येणं हा अक्षम्य अपराध होता. मेघनाप्रमाणेच गैरसमज झालेले घाटपांडेकाका तिथे आधीपासूनच होते. मग आमच्या त्रिकुटाला नक्की कोण येऊन मिळतंय हे पाहण्यात काही गमतीदार काळ गेला. म्हणजे, आसपास जाणाऱ्या रिक्षा, कार्स, मोटरसायकल्स, स्कूटर्स यांवरच्या मंडळींच्या चेहऱ्याकडे बघून 'हे ऐसीचे लोक असू शकतील का?' असा प्रश्न विचारायचा आणि स्वतःशीच त्याचं उत्तर द्यायचं. काही चूक आणि काही बरोबर उत्तरांनंतर ऋषिकेश, नितिन थत्ते, सचिन, अनुप ढेरे, केतकी आकडे, घनु, बॅटमॅन, मनोबा वगैरे दहाएक लोकांचा कोरम झाला. मग 'आपण वर रेस्टॉरंटमध्येच जावं' असा एक विचार झाला, आणि तो बरोबर आहे की नाही हे कळायच्या आत अमलात आणला गेला.
स्थानापन्न झाल्यावर चार टेबलांची दूरी फारच जाणवल्यामुळे त्यातल्या दोन दऱ्या बुजवून दोन लांबुडकीशी टेबलं तयार केली गेली. आणि अर्थातच गप्पांचे फड सुरू झाले. मग इतक्या सगळ्या लोकांची नावं, आणि आयडी लक्षात ठेवण्याची कसरत प्रत्येकाच्याच डोक्यात सुरू झाली. (आता मी [म्हणजे मी स्वतः, मी हा आयडी नव्हे], मेघना, नितिन थत्ते, केतकी, बिपिन वगैरे काही प्रामाणिक लोकांनी स्वतःच्या खर्याखुर्या नावाचेच आयडी घेतल्यामुळे ते काम काहीसं सोपं झालं. पण काही इतर हरामखोर लोकांनी [मी, तर्कतीर्थ, मन, सिफर, घनु, सोकाजी, अस्मि, सविता वगैरेंनी] आपली नावं आयडीच्या मुखवट्याखाली लपवल्यामुळे लोकांचे कष्ट वाढले. भडकमकर मास्तरांनी तर आपणच शरदिनी असं सांगून लोकांचं काम तिप्पट कठीण केलं.) पण एकदाचे अॅपेटायझर्स आले आणि सर्वजण एकमेकांची दखल घेण्याचे उपचार टाकून देऊन गरमागरम रसम ओरपायला मोकळे झाले.
मग यथावकाश कुठच्याही नव्या नव्या कट्ट्याला निघते तशी संस्थळांच्या इतिहासाची चर्चा झाली. बरेच नवीन सदस्य असल्यामुळे त्यांना केवळ सौम्य, पोलिटिकली करेक्ट इतिहास सांगितला गेला. अर्थातच इकडच्या तिकडच्या गप्पा चालू असताना कट्ट्याला येऊ न शकलेल्या, पण त्याबाबतची आपली जळजळ लपवू न शकणाऱ्यांचे फोन आले. नंदनने पृथ्वीच्या पार विरुद्ध टोकावरून बोलून कट्ट्यात सामील होण्याचा प्रयत्न केला. 'मी नाही तिथे तर माझ्या नावे चारपाच कोट्या कोणी तरी कराव्यात' अशी एक आखरी ख्वाइश सांगितली. अरुण जोशीही फोन करून सहभागी झाले. पण त्यांचा उद्देश कट्ट्यात सामील होण्याचा होता की आपला अरुणजोशी-बॅटमॅन-मनोबा-नगरीनिरंजन अॅक्सिस बळकट करण्याचा होता याबाबत शंकाच आहे. फोन उचलताना बॅटमॅन व मन उठून जोरात हात वर करून 'हेयल अरुण जोशी' असं ओरडले तेव्हा तर हा संशय आणखीनच बळावला.
खाणं चालूच होतं - साउथ इंडिज नावाच्या रेस्टॉरंटमध्ये इडली-मेदूवडे मिळतील या अपेक्षेला पार सुरुंग लावून मराठी माणसांचं साउदी जेवण म्हणजे काय याविषयीचं कल्पनादारिद्र्य उघडं पाडलं. मग गप्पांचा ओघ भलभलत्या ठिकाणी वळला. संजय सोनवणींनी मांडलेला अवकाश ताण सिद्धांत हा विडंबन म्हणून वाचला आणि त्यामुळे आवडला, असं मनोबाने म्हणताच बॅटमॅनने त्याला बाणेदार उत्तर दिलं 'छे छे, सर विडंबन करत नाहीत. आनंद जैसे मरते नही वैसे सर भी विडंबन नही करते'. आता या सगळ्याचा दवणेंशी आणि मराठी सीरियल्सशी काय, असं कोणीही विचारेल. पण काही क्षणांतच तो विषयही उद्बवला खरा. आणि परिसंवादातल्या अजेंड्याचा विषय असल्याप्रमाणे लोकांनीही त्यावर चर्चा झाडली.
जेवण संपवून लोकं खाली उतरली. तिथे एक सामुदायिक फोटो काढण्यात आला. सुदैवाने बटाट्याच्या चाळीतल्या सामुदायिक फोटोमध्ये जशी मारामारी झाली तशी न होता लोकांनी गुण्यागोविंदाने उभं राहून स्मितं दिली. तसेही 'आपण' ऐसीचे सदस्य मारामाऱ्या करतो ते व्हर्च्युअल जगात, (व्हर्च्युअल की व्हर्चअल यावर एक मारामारी अपेक्षित आहे) त्यामुळे प्रत्यक्षात बहुतेक लोकं बहुतेकांशी सामंजस्यानेच वागले. मग तिथेच उभं राहून पार्किंगसाठी जाणाऱ्या इतर गाड्यांना अडवत एक बिनमेजाची गोलमेज परिषद झाली. पोटं भरलेली असल्यामुळे तिथेही गप्पा रंगल्या. त्यात अस्मिने 'आजकाल काय लोक फार पेटताना दिसत नाहीत' अशी नोस्टॅल्जिक कळकळ व्यक्त केली. मग त्यावर 'हो, आजकाल डोकी फुटत नाहीत. कदाचित सोडावॉटरच्या बाटल्या पूर्वीइतक्या स्ट्रॉंग नसाव्यात' असं म्हणून बिपिन कार्यकर्तेंनीही दुजोरा दिला. हे 'न'वी बाजू कोण? हा प्रश्न खूप लोकांना पडलेला होता. त्या अनुषंगानेच इतरही गूढ आणि आकर्षक आयडी म्हणजे खवचट खान, काळा बैल, आडकित्ता वगैरे कोण अशा पृच्छा वर्तुळात परिभ्रमण करत होत्या. पण आडकित्ता डॉक्टर आहेत यापलिकडे बाकी कोण कोण हे कोणालाच माहीत नसल्यामुळे त्यांच्याभोवतीचं धूसरतेचं वलय अधिकच घनदाट झालं.
अशातच साडेतीन चार वाजायला आले. मग हळूहळू लोक गळायला लागले. सातच्या आत घरात पोचायचं म्हणून थत्तेचाचा लवकर निघाले. अनुप, घनु आणि केतकीही इतर कार्यक्रमांना जायचं म्हणून गेले. गोल रोडावला. दहा मंडळी शिल्लक राहिल्यानंतर कुठेतरी शांत बसूया म्हणून जवळच असलेली एक बाग शोधली. हे इतक्या सहज सांगितलं असलं तरी दोन गाड्या, काही जण चालत, रस्ते चुकणं, एकमेकांना फोन करून हे सगळं लटांबर योग्य दिशेला नेण्याचे प्रयत्न वगैरेमुळे ही साधी गोष्टही प्रचंड मनोरंजक झाली. बागेत जाऊन बसलो एकदाचे आणि मग पुन्हा गप्पांचा फड जमला. काय बोललो ते फारसं आठवत नाही, पण म्हशींच्या चेहऱ्यावर कसा इनोसंट भाव असतो यावरची चर्चा माझ्या लक्षात आहे. असंच तासभर थोडं फिदीफिदी झाल्यानंतर 'चहा हवा बुवा' अशी टूम निघाली. मग बाहेर जाऊन जवळच्याच दुर्गामधून (म्हणजे किल्ल्यामधून नाही) चहा कॉफ्या घेतल्या. पुन्हा बिनमेजाची गोलमेज परिषद जमली. आणि मग सरतेशेवटी साडेसहा झाले बुवा म्हणत मंडळी पांगली.
इतकं लिहून मी ही इनोसंट दिसणारी कट्ट्याची म्हैस भादरून संपवतो. शिल्लक असलेल्या केसांसाठी काढा आपापले वस्तरे!
धाग्याचा प्रकार निवडा:
क्रम (डावीकडून)
मागे उभे- सचीन, सोकाजी, ऋषीकेश, भडकमकर मास्तर, घनु, मनोबा, बिपिन कार्यकर्ते, अनुप ढेरे, सिफर, मी (म्हणजे मी हा आयडी)
पुढे उभे- मेघना भुस्कुटे, बॅटमॅन, राजेश घासकडवी, नितिन थत्ते, केतकी आकडे, अस्मि, सविता
(फोटो तर्कतीर्थांनी काढले आहेत म्हणून ते फोटोत नाहीत) :(
या कट्ट्याला फोनरूपेण
या कट्ट्याला फोनरूपेण उपस्थिती लावणारे दिल्लीकर ऐसीकर अरुणजोशी आणि क्यालिफोर्नियावाले णंदण होडावडेकर यांचेशी प्रत्यक्ष बोलून मजा आली. आमच्या वाल्गुदयंत्रातल्या गडबडीमुळे नीट न बोलता आल्याबद्दल णंदणसाहेबांचे दिलगीर आहोत. फॉक्सला कामाला लावावं लागतंय आता ;)
केवळ कमी (खामी नव्हे) जाणवून
केवळ कमी (खामी नव्हे) जाणवून काय उपयोग? त्यावर काही कृती करायला हवी ना. मी थेट दिल्लीत श्री. अरूण जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन १९ जानेवारी रोजी सायंकाळी त्यांची भेट घेतली. या भेटीचा सोयीनुसार संक्षिप्त अथवा सविस्तर वृत्तांत त्यांनी इथे अथवा स्वतंत्र धाग्यात टंकावा अशी मी त्यांस विनंती करतो.
मला मिनिट्स ओफ मिटिंग लिहायची
मला मिनिट्स ओफ मिटिंग लिहायची सवय नाही हो. तुम्हीच लिहा. वाटल्यास मी भर घालतो.
पण अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर चेतनजींसारखा उत्स्फूर्त, आगळावेगळा, सत्यवादी, (निर्व्यसनी) माणूस भेटल्याने आम्हाला आनंद झाला. त्यांची बायको दिल्लीकडची असल्याने ते पुनःपुनः येतील अशी आशा आहे.
१. व्हेगन म्हणजे काय २. धुळे ३. दिल्लीची रहदारी ४. सत्यतावाद ५. त्यांचे लग्न, आमचे लग्न असे विषय होते.
ऐसीकरांना मुख्य उत्सुकता असेल कोण किती बोलले याची. (हा प्रतिसाद वाचणारांचा विरस होऊ नये म्हणून ;) ) मी क्रम लिहित आहे, त्यात दुरुस्ती असेल तर चेतनजींनी करावी.
१. चेतनजींची सौ.
२. आमची सौ.
३. चेतनजी
४. मी
५. ईशान्य
६. चेतनजींच्या सासूबाई
मस्त
फोटू आणि वृत्तांत मस्त!
>>> 'मी नाही तिथे तर माझ्या नावे चारपाच कोट्या कोणी तरी कराव्यात'
--- फक्त चार-पाच? हा कोटा गुर्जी आणि बॅटमॅन यांनी एखाद-दोन वाक्यांतच पूर्ण केला असणार, ही खात्री आहे :)
बाकी एका फोटोत - सत्ताधारी आणि उच्चभ्रू यांच्यात सापडलेली एखादी व्यक्ती कशी 'मूर्तिमंत भीती उभी मजशेजारी राहिली' मोडमध्ये जाते, याचं प्रात्यक्षिक पहायला मिळतं - असं म्हणता येईल का?, असा प्रश्न पडला आहे ;)
वृत्तांत मस्त!!!!!! बाकी
वृत्तांत मस्त!!!!!!
बाकी म्हशीच्या चेहर्यावरच्या इनोसन्सपासून चर्चा पुढे ऑक्टोपस आणि सुकामेवा भरलेल्या डुकरांपर्यंत गेली. शरदिनीबद्दल भडकमकर मास्तरांचा गरगरां फिरणारे पंखे झाल्याची कबुली आम्ही कबुलामि मुहुर्मुहु: म्हणून दिली मास्तरांना. झालंच तर सौंस्थळेतिहासाचा एक गाळीव आढावा घेतला गेला.
अन कोट्यांचे म्हणाल तर नंदनसायबांची उणीव जाणवली असे आम्ही बोलून दाखवले. नंदनसाहेब इथे आले असते तर गेलाबाजार आम्हीही काही जिल्ब्या पाडल्या असत्या.
भडकमकर मास्तरांनी तर आपणच
भडकमकर मास्तरांनी तर आपणच शरदिनी
ब्याटम्यान काय हे! शर्दिनीतैंच्या "डंकर्कचे विद्धविवेचन*" आणि "डुडुळगावचा गोलंदाज" या कविता महान आहेत. "मोकलाया"हून जास्त!
http://www.misalpav.com/user/3807/authored?page=1&order=last_comment_ti…
*चुभू... वगैरे
"मी कोण"
"मी कोण " ह्या प्रश्नावर तिथे कुणीही विचार करीत बसल्याचे वाटत नाही.
"तो कोण" ह्या प्रश्नावर मात्र बरेच जण विचार करत होते.
बर्याच तपास यंत्रणाही "तो नेमका आहे तरी कोण" हे विविध गुन्ह्यांचा छडा लावताना गुन्हेगाराबद्दल किंवा अज्ञात राहून मदत केलेल्या व्यक्तीबद्दल असा विचार करितात. त्यांसी निरर्थक म्हणवत नाही.
खरं तर "नवी बाजू कोण" हे एकदा समजलं तर "नवी बाजू असं नेमकं का करतात" ह्याबद्दलही तर्क करता येउ शकतो.
कपाळ तुमचे!*
* (त्याच्या विस्तीर्णतेचा साधा ज़िक्रही न करता.)
खरं तर "नवी बाजू कोण" हे एकदा समजलं तर "नवी बाजू असं नेमकं का करतात" ह्याबद्दलही तर्क करता येउ शकतो.
जी गोष्ट खुद्द 'न'वी बाजूंना आजतागायत कळलेली नाही, त्याचा क्लू आपल्याला लागेल, अशी आशा आपणांस नेमक्या कशाच्या आधारावर वाटते?
('उम्मीद पे दुनिया क़ायम है', हेच खरे!)
वेडा
वेड्यालाही आपण काय करतो ह्याचा पत्ता लागत नाही, पण डॉक्टर किम्वा इतरेजन कार्यकारणभाव शोधू शकतात.
म्हणजे नबा वेडे आहेत* असे नव्हे, पण उदाहरण म्हणून बोलत आहे.
.
.
खरं तर नबा येडे नसून लोकांना येडे करणयत तरबेज आहेत, किंवा इतरांस येडे तह्रवण्यात निष्णात आहेत, असे नक्कीच वाटते.
साफ चूक!
म्हणजे नबा वेडे आहेत* असे नव्हे
काही काळाकरिता या मायाजालावर 'वेडा मुलगा' या नावानेही वावरल्याचे अंधुकसे स्मरते.१
सबब, साफ चूक!
(थोडक्यात, 'अभ्यास वाढवा' हा प्रेमळ सल्ला. असो चालायचेच.)
-----------------------------------------------------------------------------------
१ म्हणजे, आता शहाणा झालो आहे (अथवा आता वेडाचा झटका ओसरला आहे), असला काही(बाही) दावा नाही, पण... असो.
???
निदान एका केसमध्ये तरी तुमची स्वतःची कबुली जाहीर उपलब्ध झालिये.
"कबुली"???
उद्या "मी ताजमहाल बांधवून घेतला" अशी शाहजहानकडून जाहीर कबुली मिळालीय, म्हणाल!
"श्री चामुण्डराजे करवीयले"१ ही त्या कोणा चामुण्डराजाने काहीतरी केल्याची जाहीर कबुली आहे, असे म्हणाल काय?२
असो.
-----------------------------------------------------------------------------
१ चूभूद्याघ्या.
२ म्हणालसुद्धा! काही नेम नाही.
कट्ट्यात मला लागेलेले शोध
कट्ट्यात मला लागेलेले शोध
१. कांती शाह चा कल्ट गुंडा हा ऐसीकरांचा राष्टीय सिनेमा आहे (त्यावर बरीच चर्चा झाली )
२. बिपीन कार्यकर्ते (ते ओबीसी कार्यकर्ते असं काही नसून) हे त्यांच खर नाव आहे
३. मनोबा कुणाचाही केसाने गळा कापण्याचा साधा विचार सुद्धा डोक्यात आणू शकत नाहीत ;)
४. मनोबा च्या मते बाईक ला मेन स्टेन्ड ला लावली असताना यावर कुणी बसू नये, बाजूला पुरुषांनी उभं राहाव म्हणूनच त्याला " मेन स्टेन्ड" असं नाव दिलेल आहे (बिपीन कार्यकर्ते यांना एकाने त्याच्या बाईक वर बसू नये असे बजावल्यावर मनोबाचा असलेले मत)
५. अस्मि ह्या संतूर संतूर आहेत
६. बॅटमॅन यांना हड्डप्पा- मोहन्द्जदो चे रस्ते कुणी ची माहिती असली म्हणजे IRB ची असावीच असे नाही परत नावीगती(Nevigation) मध्ये पण ते चुकतात :)
७. आजकाल अरुण भौ थकतात पण मिपा वर पब्लिक कधीच थकत नाहीत… इति मेघना ताई ( त्यामुळे मी आज मिपा वर खात उघडणार).
८. विद्रोही मेघनाताई एक अ-विद्रोही "आपण" हा धागा लवकरच सुरु करणार आहेत
९. सचिन आणि तर्कतीर्थ यांच्या रोचक चर्चेतून बुध आणि मंगल च्या मधे एक वाळूचा पट्टा आहे आणि त्याची गती, संक्रमण, परिवर्तनकाळ ची माहिती मिळाल्यास जोतिष्य शास्त्र अधिक प्रगती करू शकत
१०. माझ्या ऐसीवर १ लाख वैगेरे सभासद असतील काय? या अती-दुर्बोध/निरर्थक/अवांतर प्रश्नाला सुद्धा गुर्जी ने माझा अपमान न करता प्रतिसाद दिल्यामुळे मला भरून आल, ते कुणालाही प्रतिसाद देतांना दुखावत नाहीत याची प्रचीती झाली आणि मला देखील माझ्या विदा-रहित बुद्धीच्या बुदधांकाचा नव्याने शोध लागला (एक दोनदा मी गुर्जीना "सर" म्हणून संबोधल्याबद्दल दिलगीरी)
बाकीच्या लोकांसोबत चर्चा झाली पण फार शोध लागू शकले नाहीत
उसंत सखू इदर्भाचा मुद्दा मी काही लाऊन धरू शकलो नाही , पुढल्या वेळी तुमी बी या मंग पाहू कोण आवाज करते ते !!!
हा हा हा. बऱ्याच गप्पांना
हा हा हा. बऱ्याच गप्पांना उजाळा मिळाला. काही गप्पांच्या वेळी मी अन्यत्र होतो त्यामुळे नीट कळलं नाही.
५. अस्मि ह्या संतूर संतूर आहेत
म्हणजे नक्की काय?
माझ्या ऐसीवर १ लाख वैगेरे सभासद असतील काय?
संपूर्ण महाराष्ट्रात १२ कोटी लोकं असताना ऐसीचे केवळ १ लाख सभासद आहेत अशा कल्पनादारिद्र्याचा मला खरंतर राग आला होता. पण मी तो न दाखवता तिरकसपणे 'छे रे, लाख कसले, हजारभर असतील' असं सांगितलं. आणि गंमत म्हणजे या गड्याचा त्याच्यावर विश्वास बसला!
९. सचिन आणि तर्कतीर्थ यांच्या
९. सचिन आणि तर्कतीर्थ यांच्या रोचक चर्चेतून बुध आणि मंगल च्या मधे एक वाळूचा पट्टा आहे आणि त्याची गती, संक्रमण, परिवर्तनकाळ ची माहिती मिळाल्यास जोतिष्य शास्त्र अधिक प्रगती करू शकत
थोडीशी दुरुस्ती -मी असे म्हटले की, "अवकाशात सूर्याभोवती फिरत असलेल्या कोणत्याही वस्तुच्या परिभ्रमणाची मानवी जीवनाशी सांगड घालता आली तर ती पत्रिकेत मांडुन भाकीतासाठी त्याचा विचार करता येतो. मग तो एखादा दगड असो किंवा एखाद्या अवकाश यानातून बाहेर फेकलेला कचरा!"
गैरसमज झाला असल्यास दिलगीर आहे...
बाग कोणती हो?
नक्की कोणत्या बागेत गेलेलात हो? नाही काही लोकांचे चेहरे जवळून एखादा मोठा नाला गेल्याने होतात तसे झालेले दिसताहेत म्हणून विचारतोय. कधी वेळ आलीच बागेत जायची, तर आपलं माहिती असलेली बरी! ;-)
बाकी बॅट्याला का उगाच रडवले म्हणे बेंचवर बसवून? त्याच वेळी मनोबांचे पक्षीनिरिक्षण चाल्लेले दिसते! ह्या सगळ्या गमतीजमती नुसत्या बघायला सुद्धा काय धमाल आली असती! ;-)
आणि भेटी वाटल्यावरही गुर्जी बॅगेला एव्हढे का कवटाळून राह्यलेत?
पळा आता...
संमेलन सात्विक होत ते एक बर
संमेलन सात्विक होत ते एक बर आहे नाही तर अक्षरे जड झाली असती!