सिनेमा आणि प्रेम
सिनेमा का कोण जाणे उगीचच बदनाम झालेला आहे. सर्वच उच्चभ्रू लोकांची त्याला येनकेनप्रकारेण नावं ठेवण्याची अहमहमिका लागलेली असते. सर्वसामान्यांना आवडतं त्याला नाकं मुरडल्याशिवाय स्वतःला विचारवंत आणि उच्चभ्रू म्हणवूनच घेता येत नाही. 'सिनेमे बघून मुलं बिघडतात' हा त्यांचा सगळ्यात नवीन शोध. मुलं हे देशाचे भावी आधारस्तंभ असल्यामुळे मुलं बिघडली की समाज बिघडतो, आणि त्यातूनच कॉंग्रेससारख्या पक्षाचं राज्य दशकानुदशकं टिकून राहतं. अर्थात लवकरच हे बदलणार आहे, त्यामुळे मला तर समाज बिघडलेला आहे याची चिंता वाटत नाही. पण तरीही या उच्चभ्रूंचा सिनेमांना नावं ठेवण्याचा उद्योग चालूच असतो. पूर्वी फक्त हिंदी सिनेमांनाच नावं ठेवली जायची. कारण मराठी सिनेमा होता कुठे तेव्हा? आणि मुलं तर इंग्लिश मीडियममध्ये घातलेली. त्यामुळे हिंदी सिनेमे बघायचे, त्यात जे काही भलंबुरं दिसेल त्यातल्या फक्त बुऱ्या गोष्टींनाच नाकं मुरडायची. हे असलं सगळं चालू असतं. आता हे लोण मराठी सिनेमांना नावं ठेवण्यापर्यंत पोचलेलं आहे.
पण सिनेमाने जशा मारामाऱ्या करायला शिकवल्या तसं प्रेमही करायला शिकवलं हे ही लोकं सोयीस्करपणे विसरतात. जितके तथाकथित समाजघातक संदेश दिले त्यापेक्षा कितीतरी जास्त समाजपोषक विचार दिले हे लक्षात घ्यायला हवं. मला स्पष्टपणे आठवतंय. माझी आजी सांगायची की तिच्या आईला मातृप्रेम म्हणजे काही माहीतच नव्हतं. जेव्हा 'श्यामची आई' चित्रपट आला तेव्हा तिला आईचं प्रेम म्हणजे नक्की काय असतं हे समजलं. 'माझ्या आईने माझ्यावर कधी प्रेम केलंच नाही' ती सांगत असे. 'आमच्या आसपासच्या सर्व मुलांचीही हीच कथा होती. त्यांच्या आयांना मुलांच्या आजारपणात रात्रीचा दिवस करणं, मुलांना मायेने जवळ घेणं, त्याला प्रेमाने डबा तयार करून देणं, आपल्या पोटचा घास काढून त्यांना भरवणं... या सगळ्या गोष्टी माहीतच नव्हत्या. श्यामची आई सिनेमा बघितला आणि आमचे डोळे खाडकन् उघडले. त्याचा आमच्या मनावर इतका गहिरा परिणाम झाला की तेव्हापासून आम्ही आमच्या मुलांवर प्रेम करायला शिकलो.' श्यामची आई हा सिनेमा या मातृशिक्षणात यशस्वी झाला, तेव्हापासून सिनेमाने मागे वळून पाहिलेलं नाही. अक्षरशः शेकडो सिनेमांतून आई मुलांवर कसं प्रेम करते याचे धडे त्यांनी नवीन पिढीला दिले. हिरॉइनगिरी करण्याचे दिवस अचानक संपलेल्या निरुपा रॉय वगैरेंसारख्या नट्यांना त्यामुळे आईची भूमिका करायला संधी मिळाली. अमर, अकबर, ऍंथनीमधला सीन आठवून बघा. ती तिघं बिछडी हुई मुलं हॉस्पिटलच्या तीन खाटांवर पडून आपापलं रक्त एकाच वेळी बेशुद्ध निरुपा रॉयला देतात. तीन धर्मांची तीन मुलं पण आई एकच. साक्षात भारतमातेचंच रूप. यातून अनेकांना मातृभक्ती आणि प्रतीकात्मक रीत्या देशभक्तीही शिकायला मिळाली. सिनेमांचं हे ऋण आपणा सर्वांवर आहे, ज्यांच्या आया आपल्या मुलांवर प्रेम करायला सिनेमे पाहून शिकल्या.
आपल्यालाही हे ऋण फेडता यावं यासाठी सिनेमांनी काही उत्कृष्ट संस्कार दिले. म्हणजे आपल्या आईला (पुन्हा निरुपा रॉयच) गळ्यात फास लटकावून डगडगत्या पिंपावर उभं केलेलं असेल तर आपली शस्त्रं टाकून द्यायची हे सिनेमात आलं नसतं तर आपल्याला शिकता आलं असतं का? शंभर वर्षांपूर्वीच्या पोरांना हे शिकायला मिळालेलं नसल्यामुळे ती खुशाल आयांना मरू द्यायची. कर्तव्य पिक्चर आला आणि तेव्हापासून हे थांबलं. पण या चांगल्या बदलाकडे कोणी लक्षच द्यायला तयार नाही. आईमुलांच्या प्रेमाबरोबरच बहन-भाईचा रिश्ता किती अटूट आणि गेहरा आहे हे सिनेमांच्या आधी कुठे माहीत होतं आपल्याला? जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा म्हणत बापालाही रडायला अलाउड असतं हे समाजाला समजणं ही आत्ता आत्ताची गोष्ट. पूर्वी पोरीला सासरी पाठवताना खुशाल बाप दारू पिऊन नाच वगैरे करत असत. आपल्या मित्रासाठी, मैत्रीसाठी प्रेमाची 'कुर्बानी' द्यायची असते हीदेखील हिंदी सिनेमाचीच शिकवण. मग भले झीनत अमान कितीही अंगप्रदर्शन करत असो, मित्राची गर्लफ्रेंड ती मित्राची गर्लफ्रेंड. मित्रावरचं प्रेम सिनेमाने शिकवण्याआधी होतंच कुठे?
चांगल्याबरोबरच काही वाईट गोष्टीही यायला लागलेल्या आहेत हे खरं आहे. उदाहरणार्थ पूर्वी लोक १७ व्या वर्षी प्रेमात वगैरे पडत नसत. लग्नच लवकर व्हायची, त्यामुळे त्याच्या बऱ्याच आधी सरळ शरीरसंबंधच सुरू होत. मग कुठला आलाय प्रेम वगैरेसारख्या प्लेटॉनिक कल्पनांना वेळ? सिनेमांमुळे लग्नाचं वय पुढे गेलं आणि तरुणांना रिकामा वेळ निर्माण झाला. पूर्वी लोक मुकाट्याने चौदाव्या वर्षापासून गायी हाकायला वगैरे जात. सिनेमांमुळे ते कॉलेजांत वगैरे जायला लागले. आणि मग तिथे वेळ कसा जाणार म्हणून मग प्रेमात वगैरे पडायला लागले. नाहीतर १७ हे काय प्रेमात पडायचं वय आहे? असो. पण सिनेमाच्या परिणामांकडे बघताना नुसत्या छोट्याशा नकारात्मक गोष्टीकडे बघून चालत नाही. संपूर्ण गोळाबेरीज बघायला लागते. मुळात पूर्वीच्याकाळी सगळ्याच लोकांना भावना हा प्रकार काय असतो ते माहीत नव्हतं. सिनेमे पाहून समाज हे शिकला. सिनेमांचे आपल्या सगळ्यांवरच अनन्वित उपकार आहेत. मग त्यासाठी मुलांनी १७ व्या वर्षी प्रेमात पडण्याची छोटीशी किंमत द्यावी लागली तरी हरकत नाही.
पण मी आशावादी आहे. जर यापुढे १७ व्या वर्षी आपल्या प्रियेला सोडून जाऊन देशकार्यासाठी स्वतःला जखडून घेणाऱ्या हिरोंबद्दल सिनेमे निघाले तर तेही चित्र पालटेल. मी नक्कीच या बाबतीत आशावादी आहे.
प्रतिक्रिया
'सिनेमे बघून मुलं बिघडतात'
'सिनेमे बघून मुलं बिघडतात'
उत्पल दत्त चा रंगबिरंगी आठवला.
-----
जर यापुढे १७ व्या वर्षी आपल्या प्रियेला सोडून जाऊन देशकार्यासाठी स्वतःला जखडून घेणाऱ्या हिरोंबद्दल सिनेमे निघाले तर तेही चित्र पालटेल.
उषा देवासकर आठवल्या.
=))=))=))=))=))
=))=))=)) =))=))=))=))=)) =))=))=))
अजून गंभीरपणे वाचून
मग इतर मते लिहीतो. पण आपल्या गंभीर लेखाची दखल घेणे आवश्यक होते. निरूपा रॉय या महिलेवर अनेक आरोप झाले. स्वतःची मुले लहान असताना हरवून टाकायची व ती मोठी, कमावती वगैरे झाल्यावर मीच तुझी आई आहे म्हणून सांगून मोकळे व्हायचे हा सर्वात गंभीर आरोप. कोणत्याही चित्रपटीय आईवर हा आरोप झाला नसेल (तरी दीवार मधे तिने मुले हरवू दिली नव्हती). तसेच तिची मुले हरवतात हे लक्षात घेउन सुद्धा नंतर एकापेक्षा अनेक मुले असलेल्या अनेक चित्रपटात तिला पुन्हा आईची भूमिका देणार्यांकडेही थोडा दोष जातो हे सगळे विसरतात.
असो. सध्या एवढेच.
मातेच्या दुधाचे कर्ज फेडून घ्यायला..................
काय हो ,मुले हरवल्याशिवाय वेगवेगळ्या धर्मात वाढून टोणगी कशी होणार ? प्रेक्षकांना सगळे माहिती असले आणि ते थेट्रात निरुपाय मातेला बोंबलून सांगत असले तरी तिला मातेच्या दुधाचे कर्ज फेडून घ्यायला तिघांचे प्रत्येकी पाच लिटर रक्त शोषून घ्यावे लागते . एकच मूल असेल तर नाट्य कमी पडते . बिछडणा-मिळणा , खुणेची गाणी तसेच डाव्या ढुंगणावरचे गोंदण वगैरे कापूसकोंडा तपशील असले की तीन तास कसे चुटकीसरशी संपतात .
वामश्रोणीमुद्रण हे
वामश्रोणीमुद्रण हे गोविंदाच्या कुठल्याश्या पिच्चरमध्ये होते असे आठवते, चूभूद्याघ्या.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अगदी अनन्वित, सहमत
अगदी अनन्वित, सहमत.
> चांगल्याबरोबरच काही वाईट गोष्टीही यायला लागलेल्या आहेत हे खरं आहे.
असहमत. नुसते समतोलपणाचा आव आणण्याकरिता टाकलेले हे वाक्य आणि परिच्छेद आहे. टाकला नसता तरी चालले असते. सिनेमाने शिकवलेले विशुद्ध (प्लॅटॉनिक) प्रेम आहे, म्हणून आपल्या तरुणा-तरुणींना सांघिक कवायती व्यायाम करायला अवसर मिळतो. पूर्वी म्हशी हाकताना (श्शी - पूर्वी काही च्युतमातृभाव लोक गोमातांना पण हाकत म्हणे) काठी फिरवणार्या एका खांद्याला व्यायाम मिळे. कंबरेच्या स्नायूंना काहीच व्यायाम मिळत नसे. आता गाता-गाता नाच करताना सर्वांगसुंदर व्यायाम मिळतो.
समास समजावून सांगा...
यातील 'च्युतमातृभाव' शब्दाचा समास विग्रह कसा करावा हे आम्हाला सूचत नव्हते. आमच्या अल्प बुद्धी प्रमाणे आम्ही त्याचा असा विग्रह केला : च्युत +मातृ +भाव. आता याचा अर्थ काय हे अम्हाला कळत नाहीये. कोणी अर्थ सांगेल का?
तत्पुरुषगर्भी बहुव्रीही
{च्युत+(मातृ+भाव)तत्पु}बहुव्रीही
च्युत : पडलेले/कमी झालेले
मातृ : आई
भाव : भावना/प्रेम
आईकरिताचे प्रेम कमी झाले आहे ज्यांचे, असे लोक
+/-
भारतातल्या सगळ्या वाईट गोष्टींचं मूळ पाश्चात्य संस्कृतीत शोधता येतं तसं सिनेमा या वाईट गोष्टीचं मूळही पाश्चात्य संस्कृतीत शोधता येईल[१]. ना दादासाहेब फाळकेंनी हे खूळ पाहिलं असतं आणि हे सिनेमा बनवण्याचं खूळ त्यांच्या डोक्यात आलं असतं. मराठी माणूस असा काही चिथावणीशिवाय वाईट कृत्य करणाऱ्यातला नाही, हे यातून लगे हाथ सिद्ध होतंच.
मला वाटतं की आपण या प्रश्नासाठीही मुळावरच घाव घातला पाहिजे. सिनेमाने मनावर वाईट परिणाम होतो, त्यामुळे आपली मूळ संगीत नाटकांची, रात्र रात्र जागून नाटक बघण्याची, गाण्या-बजावण्याची, पुरुषांनी स्त्रीपात्र रंगवण्याची संस्कृती परत आणली पाहिजे. ती संस्कृती पुन्हा रुजवल्याशिवाय तुमचा हा आशावाद व्यर्थ आहे.
१. संदर्भ - हरिश्चंद्राची फॅक्टरी.[२]
२. खरीच तळटीप दिलेली आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आता प्रतिक्रिया: लाईफ
आता प्रतिक्रिया:
लाईफ इमिटेट्स आर्ट असा निकाल लावून हा प्रश्न झटक्यात निकाली काढल्याबद्दल अभिनंदन!
चित्रपटातल्या नायकाप्रमाणे हमाली, दारुचा धंदा, श्रीमंतांच्या पोरींचा माज उतरवणे, फसवाफसवी, गँगवॉर वा स्मगलिंग यापैकी काहीच करत नसल्याचे आयुष्यभर बाळगलेले दु:ख तुमच्या लेखाने पुन्हा ताजे केले.
नशिब ऋशिकेष मुखर्जी व अमोल पालेकरांचे काही चित्रपट आले म्हणून मध्यमवर्गीय जगणं जगता येतंय नाहीतर कसं झालं असतं या कल्पनेने काटा येतो अंगावर.
बागा-बागांमध्ये झाडामागे पळापळी करत प्रेम करणे किंवा जितेंद्र-श्रीदेवीसारखं पोजेस देत प्रेम करणे हा प्रकार लोक कधी शिकणार याची फार काळापासून उत्सुकता आहे.
मुळात माणसाच्या इतिहासाचा विचार सिनेमासापेक्ष नव्याने करायला हवा. उत्क्रांतीच्या सिद्धांताची तर या पुराव्यापुढे लक्तरे निघतात.
जर चित्रपट नसते तर माणसांना मुलं कशी होतात ते कळलंच कसं असतं? त्यामुळे माणसाचे अस्तित्त्व हे चित्रपटानंतरचे आहे हे सहज सिद्ध होते.
असो. तरीही लेख थोडा अपूर्ण वाटला. यात "समाजाचे देणे" हा भाग आलेला नाही. संपूर्ण मानवजातीला जन्माला घालणार्या ईश्वरसमान चित्रपटाने मानवी समाजाला प्रत्येकवेळी नवा विचार देणे ही सगळ्या मानवजातीला जी आस लागून राहिलेली असते तिचा उल्लेख लेखात राहून गेला असे वाटते.
लाईफ इमिटेट्स आर्ट असा निकाल
निकाल वगैरे लावण्यासाठी याबद्दल संदेह होताच कुठे? सामान्य जनांचे शब्द अर्थानुधावंते असतात, पण महान लोकांच्या बाबतीत अर्थ शब्दानुधावंते असतात. जेव्हा ते थोर ऋषि-मुनि बोलतात, तेव्हा त्या शब्दांनाच एक नवीन प्रमाण अर्थ प्राप्त होतो. जसजसे ऋषिमुनि संपत गेले तसतसा नाटक-सिनेमा त्यांची जागा भरून काढू लागला. त्यामुळे त्या कलाकृतींमधून जे 'शब्द' किंवा विधानं आली ती प्रमाण ठरायला लागली. आणि त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक पैलूवर सिनेमांमध्ये काय दाखवलं आहे याचा परिणाम व्हायला लागला. कारण सामान्य माणूस हा आदर्शांकडे टक लावून बघतो. मग ज्यांच्याकडे टक लावून बघायला झालं ते हिरो-हिरॉइनीच त्याचे आदर्श झाले. आणि मग तिथूनच सर्व लाइफ इमिटेटिंग आर्ट सुरू झालं. आर्टला इमिटेट करणार नाहीतर इमिटेट करायला दुसरं आहे तरी काय? आणि इमिटेट न करता आपल्या आपण काही करावं इतका प्रगल्भ थोडाच आहे माणूस?
एक्झॅक्टली! कुठच्यातरी एका आदिवासी समाजात पुरुषांचा उपयोग काय - मूल तर स्त्रीला होतं - असा प्रश्न पडलेला असल्याचं मी ऐकलेलं आहे. मागास समाजात सिनेमे न पोचल्यामुळे कशी दुरवस्था होते हे उघडच दिसून येतं. त्या समाजाला म्हणे शेती करायला लागल्यावर 'अच्छा, बी टाकली की जमिनीत काहीतरी उगवतं!' हे पाहून समजलं म्हणे. आता त्याच जागी जर हिंदी सिनेमे असते तर 'मै तुम्हारे बच्चे की मॉं बनने वाली हूॅं.' नंतर येणाऱ्या ढॅण् बरोबरच समजलं नसतं का?
तुम्ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडलात. आत्तापर्यंतच्या इतिहासात माणसाने देवाचं दर्शन मिळावं म्हणून किती प्रयत्न केले. संतांनी त्याची आळवणी केली, ऋषिमुनिंनी घोर तपश्चर्या केली. पण त्या काळी सिनेमेच नव्हते. आणि आपण असे नतद्रष्ट की आपल्यासमोर आज हजारोंनी सिनेमे आहेत, पण आपल्या डोळ्यासमोर देव असून दिसत नाही. परीस शोधणाऱ्या, आणि तो हाती गवसूनही न कळलेल्या माणसाप्रमाणे आपण वागत आहोत.
लेख आणि प्रतिसाद _/\_
लेख आणि प्रतिसाद _/\_
+१
+१
मस्त.
दिवसाची सुर्वात झक्कास.
अतिशहाण्याचा प्रतिसादही कल्पक.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
पुरवणी
वा वा वा! अश्या लेखनाची गरज होतीच, पण लेखन अपूर्ण आहे. आधुनिक सिनेमाने लोकांना शिकवलेल्या काही चांगल्या गुणांशी यादी लेखात आलेली नाही. असो पुरवणी जोडतो.
सर्वप्रथम मुळात स्त्री-पुरूष रेशो मध्ये स्त्रीयांचे प्रमाण घटत असताना, म्हशी चारायचेही बंद केले असल्याने जुन्या चित्रपटांकडे बघुन कॉलेजात जाऊ लागलेल्या परंतू 'प्रेमं करायला मुली न मिळणार्या' मुलांचा जटिल प्रश्न नव्या काळात जन्माला येऊ लागला होता. हा प्रश्नही चित्रसृष्टीने मोठ्या खूबीने सोडवला आहे. एकतर स्त्रीभृण हत्या कसे पातक आहे हे पटवायचे प्रयत्न करून स्त्रीया "मां दुर्गा", आदीशक्ती, जन्माता वगैरे असतात हे समाजावर बिंबबून त्यांची हत्या रोखायसाठी अनेक चित्रपटांची रांग मराठी चित्रसृष्टीनं लावली. मात्र हे प्रयत्न पुरे पडेनात तेव्हा या चित्रसृष्टीने 'होमोसेक्युअॅलिटी' नावाचा प्रकर शोधून दोन मुलांमधील प्रेमसंबंध शक्य असल्याचे दाखवून अशा 'रिकाम्या' परुंतू 'उपलब्ध' मुलांच्या प्रश्नाची वासलात लाऊन टाकली आहे.
दुसरी एक भावनाही तुम्ही लेखात टाळली आहे ती म्हणजे "भक्तीरस". काही आरत्या नी श्लोक वर्षानु वर्ष रटून व वडिलांच्या माराच्या धाकाने घोकणार्या समाजाला माता वैष्णोदेवी पासून ते साईबाबांपर्यंत (आणि ए राममुर्तींपासून ते झेड कृष्णमूर्तींपर्यंत) सर्वांची भक्ती करायला तर शिकवलेच, पण 'नास्तिक' सारख्या चित्रपटांनी भक्तीरसाचा कल्लोळ उडवून दिला. मग माताने बुलाया है पासून गणपती उत्सव अधिक जोशात साजरे होऊ लागले. वैष्णोदेवीपर्यंत टार रोड झाला, अमरनाथ यात्रा करताना लाऊडस्पीकरवर भक्तीसंगीताने भक्तांचे कान
किटुभरू लागले.- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
बाप मेला कि काय?
काय फक्त आईच? बापाने काय घोडं मारलय? अहो जन्मभर हतावर 'माझा बाप चोर' म्हणून आई(होय तीच ती निर्पी) आणि पोरे मजेत रहातात आणि त्यांना तोशीस पडू नये म्हणून बाप बेवारस मरतो, जवानीमधे काय ते शुक्राणूप्रोक्षणामुळे पैदा झालेल्या आणि आईला थांबविण्याची जरा वेळ काय ती हुकली म्हणून आयुष्यभर एका कर्तुत्ववान पोराला मुकून स्वतःपाशी मात्र दिसेल त्या अबलेवर बलात्कार करणार्या रणजीत टाइप नराधमाला पाळायची रादर पोळायची वेळ येते तरी बाप दोघांवर तेवढेच प्रेम करतो, तसेच केवळ करिअरसाठी ब्रेकअप झाल्यावर (आणि पोटात गर्भ आहे हे लपवून ठेवल्याने) स्वतःजवळ परत एक नालायक शशीक्पूर टाइप औलाद आणि आपलाच पोरगा आपल्याशीच खुन्नस घेतलेला पहाण्याचे दुर्दैव आल्यावरही त्याच्यासाठी गोळ्या झेलायला तयार बापच असतो हे विसरून चालणार नाही. आपल्या विम्याचे पैसे मुलांना मिळावेत म्हणून आपलेच श्राद्ध आपल्या डोळा बघणारा तो फक्त बापच, आणि मुलींवरचे बापाचे प्रेम तर जगजाहीर आहे आपल्याकडे काय किंवा इराणी चित्रपटात काय मुलीबरोबर चुकून-माकून रत होणारे बाप ते शल्य पचवू शकत नाहीत आणि आपले अस्तित्त्वच खल्लास करुन टाकतात त्यामुळे सिनेमा हिट किंवा अधुनिकोत्तर वगैरे होतो तीही त्या बापांचीच देणगी. मातृप्रेमातून केवळ आडियन्सच्या भावनेला हात घालत तुम्हीही तद्दन व्यवसायिक प्रतिसादभरू लेखक झालात, मला वाटलं तुमचं ह्या संस्थळावर बापासारखं प्रेम असेल.
विषये विषये रुचिर्भिन्नः
लिखाणातील बराचसा भाग 'श्यामची आई', निरुपा रॉय वगैरे भलभलत्या स्त्रियांविषयीच्या प्रेमाने ओथंबलेला आहे. घासकडवींची पूर्वकृत्ये (पूजेची पथ्यं, हेलन वगैरे) पाहता आणि 'सिनेमा आणि प्रेम' हा विषय पाहून विषयातुर होऊन धागा उघडला खरा; मात्र, सतराव्या वर्षाविषयीचा भाग वगळता घासकडवींनी विषयाला हात घातलेला नाही, हे पाहून अपेक्षाभंग (पक्षी : डीडीएल्जे की केएल्पी वगैरे काय म्हणतात ते) झाला. तद्वत, घासकडवी यांनी लोकप्रिय पण ऐसीवरच्या आजकालच्या विचारजंतीपणामुळे अंमळ दुर्लक्षित राहिलेल्या त्या वाचकप्रिय विषयाकडे पुन्हा एकदा आपला लेखणीनामक फॅलिक अवयव वळवावा, किंवा कळफलकनामक घोडा त्या दिशेनं दौडवावा, आणि आपल्या संस्कारक्षम वाचकांप्रति आपण लेखक जे ऋण लागू असतो ते झीनत अमानच्या वस्त्रे फेडण्याच्या तत्परतेइतक्याच तत्परतेने फेडावे अशी (द्वयर्थी) विनंती.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अनुमोदन!
अनुमोदन!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अश्लील आणि वैषयिक प्रतिसाद
अश्लील आणि वैषयिक प्रतिसाद
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
चिंजं आणि बॅटू, दोघांनाही
चिंजं आणि बॅटू, दोघांनाही अनुमोदन!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
अनुमोदनांच्या फैरीमध्ये माझे
अनुमोदनांच्या फैरीमध्ये माझे ही अनुमोदन! (नेमके कशाला? असले फाल्तु प्रश्न विचारल्यास अपमान करण्यात येईल)
- (राज'कमल' चे लोगो असलेले 'कमळ' आज फुललेले बघितलेला) सोकाजी
ब्लॉग हा माझा...